Wednesday, 19 February 2025

पत्र - एक गोड आठवण


पत्र खरंच आता हा शब्दच खरं तर आता आऊट डेट झाला आहे, कारण आता आपण सगळीकडे एक तर मेल करतो किंवा लेटर देतो पत्र देतच  नाही . आणि हल्ली माणसांना तसा खास पत्र लिहिण्याचा  प्रसंग येतच नाही.  अगदी आपल्या जवळच्या माणसांना ही  आपण पत्र लिहित नाही. हल्ली या सोशल मीडियाच्या जगात लिहायची सवय ही मोडली. आणि कुणाला आता  एवढा वेळ ही नाही की  कुणी कुणासाठी पत्र लिहिण्याचे कष्ट घेईल.  या सोशल मीडियामुळे जग किती जवळ आलं असलं तरी मनाने मनाने मात्र आपण सगळेजण एकमेकांपासून दुरावत आहोत. 

थोडा ट्रॅक बदलला पण मूळ मुद्दा की हल्लीं पत्र कुठंही लिहिलं जात नाही पूर्वीसारखे.

आपल्या हृदयाला एखाद्याने अगदी चार ओळींचं  पत्र लिहिलं तरी त्या व्यक्तीच्या मनातील भावना आपल्या पर्यंत जशाच्या तशा पोहोचतात.  एखादे पत्र ते  वाचताना त्या व्यक्तीचा आवाज हळूहळू आपल्या कानात घुमायला  लागतो,  ते अक्षर पाहताना त्या व्यक्तीचा चेहरा त्या पत्रात आपल्याला दिसायला  लागतो, त्या व्यक्तीचे हावभाव आपल्याला  जाणवायला लागतात, जणू काही ती व्यक्तीच आपल्यासमोर येऊन व्यक्त होतेय. आपसूकच त्या व्यक्तीच्या भावभावना आपल्या हृदयाला भिडतात.

हल्ली आपला  कोणाशी वाद झाला, कुणाशी भांडण झालं की हे भले भले भले मेसेजेस व्हाट्सअप वर आपण   लिहून पाठवतो.  पण त्यातनं त्या भावना तितक्या प्रभावीपणे व्यक्त होत नाहीत.  त्यातून हल्ली  भरीस भर काय तर त्या शब्दांची जागा ही  आता इमोजींनी घेतली आहे त्यामुळे तर आपल्या भावना व्यक्त करणे हे अगदीच सोपे झाले आहे.  पण त्या समोरच्याला कितपत पोचतात हे सांगणं मात्र कठीण. 

पण काही म्हणा हे असे  मेसेजेस चे उतारेच्या उतारे लिहून पाठवले तरी ते भावनाहीन वाटतात.  ते वाचलेलं काही तसे प्रभावीपणे लक्षातच राहत नाही. पण तेच आपल्याला लिहिलेलं एक छोटसं पत्र सुद्धा आपल्याला कायम लक्षात राहतं.

अजून एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे तार. एका ओळीत खुशाली किंवा दुःखद बातमी दोन्ही कळायचे. तार आली म्हणजे वाईटच बातमी असे काहीसे समीकरण होते. त्यामुळे तार आली की आधी पोटात गोळाच यायचा.  तार वाचणाऱ्याच्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणारी मंडळी त्या तार वाचणाऱ्या माणसांकडे आशेने पहायची. त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरून प्रयत्न करायचे समजण्याचा की बातमी वाईट आहे की चांगली.

नोकरीचे अर्ज असोत, की  कुठले सरकारी कामें असो तेव्हा पत्रांशिवाय पर्याय नव्हता.  पूर्वी कुणी बाळंत झालं,  कुणी एखादी परीक्षा पास झालं, कुणाला नोकरी लागली असे काही  पत्र  आले की घरात अगदी आनंदी आनंद असायचा. ते पत्र सगळ्यांना दाखविलं जायचे अगदी पेढे वाटले जायचे.  घरात ज्याला लिहिता वाचता यायचं त्यांच्यावर पत्र सगळ्यांना वाचून दाखवायची  जबाबदारी असायची. गावाकडची माणसं शहरात खुशालीचे पत्र पाठवायचे किंवा शहरातून गावाकडे तेव्हा तो आनंद  आणि दुराव्याचे  दुःख असे मिश्र अश्रू ते पत्र   व्यक्तीच्या डोळ्यातून वाहायचे.

 आमच्या वेळी  पेन फ्रेंड म्हणून एक संकल्पना होती. ते  नक्की काय होतं ते मला माहित नाही कारण मी ते कधी अनुभवलं नाही.  पण आपल्या परदेशात राहणाऱ्या एखाद्या मित्र-मैत्रिणीला पत्र लिहायचे. आपण कुणाला तरी अंतर्देशीय पत्र लिहितोय  किंवा आपल्याला कुणीतरी अंतर्देशीय पत्र पाठवतेय हेच खूप भारी होते.

पूर्वी तारेप्रमाणे अजून एक गोष्ट होती , ती म्हणजे ज मनी ऑर्डर.   शहरात कमावत असलेला मुलगा / मुलगी , आई-वडिलांना गावी पैसे पाठवायचे किंवा दुसऱ्या गावात शिकत असलेल्या मुलामुलींना त्यांच्या घरून पैसे पाठवले जायचे.  मनी ऑर्डर सोबत दोन ओळींमध्ये खुशालीही कळवली जायची.  त्या मनीऑर्डर चे पैसे घेताना त्या पैशाला झालेला आपल्या माणसांचा स्पर्श तोही जाणवायचा.  आता नेट बँकिंग सारख्या सुविधांमुळे मनी ऑर्डर ही विस्मृतीत जात आहे.

दोन मित्रमैत्रिणीं मधील संवाद असो,  माहेरवाशीणीचे  माहेराला पत्र असो किंवा तिच्या माहेरहून आलेलं पत्र असो, किंवा दूरदेशी राहणाऱ्या कुणाचे किंवा आपल्या एखाद्या सीमेवरच्या जवानांचे  पत्र असो ,  ते पत्र पाठवण्यात आणि त्या पत्राचे  उत्तर येण्याची वाट बघण्यात एक वेगळीच मजा होती, एक प्रकारची हुरहूर होती. जणू आपलं घरच त्यांच्यापाशी त्या पत्राच्या रुपात पोहोचत होते. 

आता मेसेज सेंड केला की तो डिलिव्हर होतो, वाचला जातो. किती पटापट सगळं.   तो वाचला की नाही हे कळू नये म्हणून हल्ली ब्लू टिक ही ऑफ ठेवतात , त्यामुळे  त्या सगळ्या वाट बघण्याची आणि एकंदरीतच त्या देवाणघेवाणीची गंमतच निघून गेली आहे.

या सगळ्या पत्रांमध्ये एका पत्राची फार गंमत होती ते पत्र प्रियकराने प्रेयसीला लिहिलेलं किंवा प्रेयसीने प्रियकरायला सगळ्यांपासून लपवून लिहिलेलं प्रेम पत्र. अर्थात त्या त्या पिढीचं  ते लव लेटर. प्रत्येकाने हा प्रयत्न एकदा तर नक्कीच केला असेल. तर कितीतरी प्रेमपत्र अजूनही तशीच कुठेतरी लपवलेली ही असतील. 

या पत्रांनी आपल्या मराठी,  हिंदी  सिनेसृष्टीत कितीतरी  प्रसंग आणि कितीतरी अजरामर गाणी दिली आहेत.  हल्ली परदेशी असलेल्या मुलांशी आपण व्हिडिओ कॉल वर कधीही बोलू शकतो (फक्त वेळेचे बंधन पाळून).  पण आजही चिट्ठी आई हैं हे गाणं ऐकताना सगळ्यांचे डोळे भरून येतात.  तसंच बॉर्डर सिनेमातलं संदेसे आते हैं गाणं ऐकताना आपल्या सैनिकांचे दुःख हृदयाला भिडून जाते. डोळ्यासमोर साहजिकच ती सगळी माणसे तरळून जातात.

पूर्वी शाळेत परीक्षेला पत्र लेखन असा खास प्रश्न असायचा. त्याचे विषय ही किती छान असायचे सुट्टीत मामाच्या गावी जाऊन केलेली धमाल मित्र किंवा मैत्रिणीला पत्राने कळवा. मुख्यध्यपकांना पत्र लिहा. हॉस्टेल मध्ये असलेल्या आपल्या भावंडाना पत्र लिहा. मार्क तर मिळायचेच पण ते लिहायला वेगळी मज्जा ही यायची. 

प्रत्येकाला पत्र लिहिताना करायची सुरवात आणि शेवट याचे काही नियम असतात. तीर्थरूप, स.न. वि. वि, माननीय, आदरणीय असे.....तर शेवटी आपला लाडका/ लाडकी, आपले कृपाभिलाशी असे कितीतरी शब्द. आता dear आणि yours लिहिलं की झाले.

मला अजूनही आठवतंय मी जेव्हा माझ्या आई-बाबांकडे राहायला गेले,   त्यावेळेला मी माझ्या आजोबांना  एका पोस्ट कार्डवर पत्र लिहून पाठवलं होतं. तेव्हा त्यांना इतका आनंद झाला होता की माळ्यावरच्या सगळ्यांना त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं होतं.  अर्थात त्या काळात लँडलाईन होते , शेजारी कोणाकडे तरी असं... पण त्या पत्राची गंमत काही वेगळीच.

आपल्याला कुणी पत्र पाठवणार नाही माहीत असताना, त्या पोस्टमन काकांच्या घंटीचा आवाज आला की लगेच त्यांच्या मागे धावायचे. कुणा कुणाचं पत्र आलेय ते पहायचे. आणि ज्याचे असेल त्याला जोरात ओरडून सांगायचे. आणि आपल्याच घरात पत्र आलेलं असलं की हर्षवायूच व्हायचा 

आमच्या लहानपणी आम्ही एक खेळ ही खेळायचो "आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आता मुळात आईची मम्मी किंवा मॉम झाली आणि पत्र तर गायबच झालं आहे त्यामुळे आता तो खेळही गेला काळाच्या पडद्याआड.

आता अंतर्देशीय पत्र, पोस्ट कार्ड, पोस्ट पाकीट हे फक्त ऐकायला मिळतं,  तेही फार कमीच.  हा पण तुम्ही गुगल केलं की त्याच्या इमेजेस मात्र आपल्याल दिसतात. 

या पत्राबरोबर खरं तर खाकी  गणवेशातले  ते पोस्टमन काका,   लाल काळ्या रंगांच्या त्या पोस्टाच्या पेट्या, ती सायकल ची घंटी , गुडूप अंधारातले  पोट ऑफिस हे सुद्धा काळाच्या पडद्याआड गेले.

आज अशा कितीतरी गोष्टी आहेत की या पत्रलेखनाच्या मागे पडण्याने आपण अनुभवू शकत नाही.

चला तर मग जर तुम्ही हा ब्लॉग वाचला असेल, आणि तुम्हांला तो आवडला असेल  तर तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला पत्र लिहून द्या आणि  बघा त्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि जमल्यास ती आम्हालाही कळवा आमच्या ब्लॉगवर कंमेंट करून.

सौ. मिलन राणे - सप्रे🖋️






Thursday, 5 December 2024

एका वेगळ्या वाटेवर

एका वेगळ्या वाटेवर


एअरपोर्ट ची वेटिंग रूम, फ्लाईट ला अजून वेळ होता. सगळेच प्रवासी इथे तिथे रेंगाळत होते. ती हि एका खुर्ची वर आपला लॅपटॉप उघडून बसली होती. कुठल्यातरी कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करणारी असावी. छोटे केस, डोळ्याला महागडा चष्मा, फॉर्मल शर्ट पॅन्ट  आणि काळ्या रंगांचे बूट. काम करता करता तिला कंटाळा आला बहुतेक तिने जरा आळस दिल्यासारखे केले. चष्मा काढून पुसला,आणि आजू बाजूला पाहायला लागली. तिथे बसलेल्या एका आई आणि मुलीकडे ती बराच वेळ निरखून बघत होती.

मग हळूच डोळे मिटून नकारार्थी मान हलवली. थोडीशी मागे टेकली आणि हाताची घडी घालून विचार करायला लागली. तिची मुलगी अन्विता आता दहावीत गेली होती. गेल्या १०-१२ वर्षात एकटीने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून ती थकली होती. तिने डोळे मिटले आणि सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोरून तरळला . अगदी तिच्या शिक्षणापासून. त्या दोघी बहिणी अर्चना आणि अश्विनी.अर्चना मोठी आणि हि अश्विनी धाकटी .  स्वभावाला तितक्याच उलट. अर्चना अबोल, हुशार, अति अभ्यासू आणि  अश्विनी बोलकी , हुशार, अभ्यास जेवढ्यास तेवढा पण तरीही पहिल्या पाचात येणे तिने कधी सोडले नाही. वडील सरकारी कर्मचारी त्यामुळे घराची परिस्थिती हि चांगली. अर्चना ला सी. ए व्हायचे होते म्हणून ती कॉमर्स ला गेली.  हिला इंजिनीअर व्हायचे होते. 

बारावीनंतर स्वतःच्या अभ्यासाच्या बळावर स्कॉलरशिप मिळवून ती हट्टाने इंजिनीअरिंग ला गेली. आणि त्याच हट्टाने आणि जिद्दीने इंजिनीयर ही झाली.  तिच्या हुशारीच्या बळावर तिला एका चांगल्या कंपनीत नोकरीहीमिळाली. ऑफिसच काम ती अगदी इमानेइतबारे करत होती. तिचे ते वयच होते मजा मस्ती करण्याचे त्यामुळे  ऑफिसच्या पार्ट्या, पिकनिक सगळे ती एन्जॉय करत होती. काही गोष्टी तिच्या आईला खटकत होत्या पण अश्विनी तशी कुणाचे ऐकणारी नव्हती. तिला जे बरोबर वाटेल पटेल तेच ती करत असे. याच दरम्यान तिची ओळख झाली माधवशी. माधव तिच्या प्रेमात पडला होता , त्याने तिला रीतसर लग्नासाठी हि विचारले होते. पण तिची मनाची तयारी नव्हती.   घरी अर्चनाच्या  लग्नाची गडबड सुरू झालीच होती .  अर्चनाला तिच्या मनासारखा नवरा मिळत नव्हता त्यात २ वर्ष गेली आणि मग अर्चनाचे लग्न ठरले. तिच्या अनुभावरून शहाणे होऊन अश्विनी ने माधव शी लग्न करायचे ठरवले. खरे तर आंतरजातीय विवाह म्हणून आधी कुणाला मान्य नव्हते पण अश्विनीच्या आणि माधवच्या निर्णयापुढे कुणाचे काही चालले नाही . आतापर्यंत अश्विनी चे आयुष्य अगदी सरळ रेषेत सुरु होते पण या लग्नानंतर तिच्या आयुष्यात खूप वेगवेगळी वळणे आली ज्याचा कुणीच कधीच विचार केला नव्हता. 

लग्नानंतरचे सुरवातीचे दिवस खूपच छान होते. निदान वर वर तरी सगळे छान वाटत होते. तिला जमेल तशी ती घरात मदत करत होती. लग्नानंतरची सुट्टी संपली आणि दोघांनी ऑफिस ला जायला सुरवात केली आता मात्र तिची तारांबळ उडत असे. माधव आणि ती एकाच ऑफिस मध्ये असल्याने दोघे एकत्र निघत. पण घरातले सगळं आटपून निघायला उशीर होत असे. सुरवातीला तिच्यासाठी थांबणारा माधव आता आधी निघायला लागला.   लोकल चा प्रवास , घराची कामे अश्विनी थकून जात असे. पहिला महिनाभर तिला काही नको करणारी सासू आता काही करत नसे. 

लग्नानंतर तीनच महिन्यात अश्विनी ला येणाऱ्या बाळाची चाहूल लागली . बापरे!!! हे काय होऊन बसले होते. दोघांचीही मनाची तयारी नव्हती. माधव तर जबाबदारी साठी तयारच नव्हता. पण आशिवनी ला बाळाचा असा जीव घेणे तिला पटत नव्हते. तिने ते बाळ वाढवण्याचा निर्णय घेतला. रोजचा प्रवास , घराची कामे, गर्भारपण सगळे सांभाळताना अश्विनी ची खूप वाईट अवस्था झाली. खूप अशक्त झाली होती. माधव तिला डॉक्टर काय नेणे आणणे करत होता पण त्याच्या मनात अजूनही होते कि हे बाळ अश्विनीने ठेऊ नये. त्याच्या मनाची तयारी नव्हती मुलाची जबाबदारी . पण घरात तिला आराम नव्हता. आता सहा महिने उलटले अश्विनी खूप अशक्त झाली होती डॉक्टरांनी तिला धावपळ कमी करायला सांगितली. म्हणून तिने आईकडे राहण्याचा निर्णय घेतला. 

माधव अधून मधून तिला येऊन भेटून जात असे. अश्विनी ने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी म्हटल्यावर आधीच नाराज असलेला माधव अजून नाराज झाला. तिथे सासरीही जास्त काही कुणाला आनंद झालेला दिसला नाही. तिच्या आईला दोन्ही मुलीच म्हणून हिला मुलगी असा टोमणा हि मारून झाला. महिनाभर आई कडे राहून पुन्हा सासरी जाणे तिला जड झाले होते. पण पर्याय नव्हतया. त्याच दरम्यान माधव ची बदली बँगलोर  झाली. अश्विनी ला कळेना काय सुरु आहे हे ? एका मागून एक समस्या तिच्या समोर येत होत्या. अजून तिची १ महिना सुट्टी शिल्लक होती. त्या दरम्यान तिने ऑफिस मध्ये प्रयत्न करून स्वतःचींहि बदली बँगलोर  करून घेतली. आता त्या तिघांचा त्रिकोणी संसार सुरु झाला. मुलीची पाळणाघरात सोय करून तिने ऑफिसला जाणे सुरु केले. मन तुटत होते पण पर्याय नव्हता. पण या सहा महिन्याच्या दुराव्यात तिला माधव चे बदलेले वागणे खटकत होते.  

अन्विता मोठी होऊ लागली. अश्विनी ऑफिस च्या कामासाठी बाहेर गेली कि अश्विनीची आई अन्विता साठी येऊन राहत असे. माधव हि जास्त वेळ ऑफिस मधेच असे. माधव चे असे जास्त वेळ बाहेर राहणे, सतत मोबाईल वर असणे आई ला हि खटकत असे. अश्विनीला तिने बोलूनही दाखवले होते पण अश्विनीने दुर्लक्ष केले होते. आता अन्विता शाळेत जाऊ लागली होती. अश्विनी सगळ्या जबाबदाऱ्या अगदी नीट पार पाडत  होती. कधीतरी माधव शनिवार रविवार अन्विताला स्वतःहून बाहेर  फिरायला नेत  असे. एक दिवस अन्विता येताना रडत घरी आली , ती कुठेतरी  पडली होती आणि तिला बऱ्यापैकी लागले होते. माधव च्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. खूप खोदून खोदून विचारल्यावर अन्विता ने सांगितले पप्पा मीरा मावशीबरोबर बोलत होते, ती नेहमी भेटते आम्हाला. अश्विनी ने रागाने माधव कडे पहिले तो मान घालून उभा होता. अश्विनीचे विचार चक्र सुरु झाले. माधवची बदललेली वागणूक , मीरा ची जवळची मैत्रीण म्हणून करून दिलेली ओळख, तिचे सतत घरी येणे जाणे, माधव चे सतत फोनवर असणे. तिचा पारा चढला पण त्यावेळी शांत राहिली. अन्विता ला घेऊन बेडरूम मध्ये गेली. त्यादिवशी कोणीच कुणाशी काही बोलले नाही. दोन तीन दिवस असेच शांततेत गेले. आणि एक दिवस अश्विनीने अन्विता शाळेत गेल्यावर जाब विचारला आणि आश्चर्य म्हणजे माधव ने काही आढेवेढे ना घेता कबूल  केले कि त्याचे मीरा वर प्रेम आहे. पुढचे वाक्य जास्त धक्कदायक होते त्याला अश्विनीपासून घटस्फोट हवा होता. अश्विनी हतबल होऊन तिथेच बसली. काय करावे सुचेना पण अशी हार मानणारी ती नव्हती. त्यानंतर बऱ्याच वेळा सगळ्यांनी समजावून बघितले पण माधव ऐकायला तयार नव्हता. शेवटी घटस्फोटाची केस उभी राहिली त्यात ३-४ वर्ष गेली , अश्विनी आई कडे येऊन राहिली होती. शेवटच्या दिवशी जेव्हा कोर्टात विचारले गेली मुलीच्या कस्टडी विषयी माधवने चक्क अन्विताचे पालकत्व हि नाकारले. सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का होता. अश्विनीची आपला संसार टिकवायची शेवटची आशा हि मालवली होती. 

खूप विचित्र अवस्थेतून अश्विनी जात होती . मुलीची जबाबदारी, नोकरी, प्रेमविवाह करून झालेला घटस्फोट, लोकांमध्ये होणारी चर्चा सगळेच. लग्नापर्यंत सरळ धोपट असणारे तिचे आयुष्य अचानक अगदी गुंतागुंतीचे झाले होते. पण कशानेही हार मानेल ती अश्विनी कुठली. आईबाबांसोबत राहायचे म्हणून तिने मोठे घर घेतले. माधवसोबत झालेल्या भांडणानंतर तिने परत मुंबई ला बदली घेतली होती. तेव्हा पासूनच तिच्या डोक्यात होते कि स्वतःचे काहीतरी सुरु करायचे, सतत स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवायचे .  आणि हळू हळू त्या दिशेने तिने तयारी करायाला हि सुरवात केली होती.  तिने स्वतःचा ज्ञानाचा उपयोग व्हावा या दृष्टीने स्वतःचे छोटे क्लासेस सुरु केले. २-४ बाहेरचे शिक्षकही ठेवले. त्यातच एक शिक्षिका होती पल्लवी. पल्लवी अत्यंत हुशार मुलगी. आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी करत होती ३ वर्षात तिने ४ नोकऱ्या केल्या होत्या. घरातून लग्नासाठी मागे लागले असले तरी तिला स्वतःला एम बी ए करायचे होते. म्हणून ती पार्ट टाइम नोकरी करत होती. तिची मुलाखत घेतानाच अश्विनीला तिच्यातले वेगळेपण जाणवले होते. ती स्वतःला तिच्यात पाहत होती. अश्विनी नसली कि पल्लवी सगळं व्यवहार बघत असे. दोघींचे विचार बरेच सारखे असल्यामुळे दोघी सतत एकत्र असत. त्यांच्यामध्ये वेगळेच नातं तयार झाले होते. 

अश्विनीच्या घटस्पोटाच्या धक्क्याने आई खचली होती आणि एक दिवस अचानक ती झोपेतच गेली. सगळे नीट होत असताना परत एकदा अश्विनीला मोठा धक्का. त्यावेळी वयाने बरीच लहान असून पल्लवीने अश्विनी ला आधार दिला. अन्विता, बाबा , क्लास तिन्ही गोष्टी ती सांभाळत होती. त्यामुळे त्याही परिस्थितीत अश्विनीला ऑफिसमध्ये लक्ष देता येत होते. या घटनेने त्या दोघी अजून जवळ आल्या. न बोलता सांगता दोघीना लक्षात आले होते कि त्यांच्यात मैत्रीपेक्षा एक वेगळे नाते तयार झाले आहे. लोकांच्या दृष्टिने हे कदाचित चुकीचे होते पण दोघीनाही त्याची पर्वा नव्हती. पल्लवीच्या घरी हि या विषयावरून वाद होत असत पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. प्रश्न होता तो बाबांना आणि मुख्य अन्विताला समजावण्याचा. दोघी जेव्हा कधी या विषयवार बोलत तेव्हा त्यांना सतत अन्विताच्या प्रतिक्रियेचा विचार येत असे. अश्विनी आडून आडून अन्विताला तिच्या आणि पल्लवीच्या नात्याची कल्पना देत असे. अन्विताही आजच्या काळातली मुलगी असल्यामुळे तिला काही गोष्टी काळात होत्या पण त्या आपल्या घरात घडाव्या हे तिला पचायला जड जात होते. पण कधी कधी ती आईच्या सगळ्या मनस्थितीचाही विचार करत असे. पल्लवी तिला आवडत होती. पण तरीही... . अश्विनीला जे काही करायचे होते ते अन्विताच्या परवानगीने. यावेळी ऑफिस च्या कामानिमित्त बाहेर पडताना तिने खूप विचार केला. अन्विताच्या दहावी पर्यंत थांबून मग तिला , आणि पल्लवीला कुठेतरी बाहेर फिरायला नेऊन अन्विताला सगळ्यागोष्टींची कल्पना द्यायची आणि कायमचे पल्लवी सोबत राहायचे अर्थात अन्विताला घेऊन.  

तिचे मन भूतकाळात फिरत असतानाच विमानाच्या  घोषणेने ती भानावर आली. डोळ्यात आलेले पाणी हलकेच टिपले. लॅपटॉप बंद करून बॅग मध्ये ठेवला. कुणालातरी फोन लावला ..... पल्लवी मी तयार आहे कायमची तुझ्यासोबत राहायला पण अजून एका वर्षानंतर ... अन्विताला मी सांगेन समजावून इतके म्हणून फोन ठेवला आणि गालातल्या गालात हसत काउंटर च्या दिशेने चालायला लागली.

सौ. मिलन राणे - सप्रे🖋️





Thursday, 27 June 2024

मै ऐसी क्यूँ हूँ ?.........

 मै ऐसी क्यूँ हूँ ?.........


खरंतर लिखाण म्हटलं की माझा आवडतं काम, पण कुणी  विषय देऊन लिही म्हटलं की जरा कठीणच जाते, पटकन सुचतच नाही.  अय्या बघाना !!!! पहिला पॉईंट इथेच झाला . तर राधिका मॅमनी विषय दिल्यानंतर वाटत होतं लिहावं लिहावं पण वेळ जुळून आली नाही.  आणि ज्या वेळेला एक एक लेख  वाचले तेव्हा   काही लेख वाचताना असं झालं  की " अरेच्चा!!मी पण अशीच वागते".  तर एखाद लिखाणात असं वाटलं हेच लिहायचे मला. 


पण तरीही आता राधिका मॅमनी अजून एक संधी दिलीच आहे तर म्हटलं मौके पे चौका मार देते है।  हा एक दुसरा गुण झाला नाही का ? की संधी मिळाली की त्याचा सोनं करायचं. 


खरंतर  कुठल्याही स्त्रीला आपले  दुर्गुण कबूल करणं हे जरा कठीणच जाते. 


तर पॉईंट नंबर तीन,  तुम्ही  वरती वाचलेच की दोन पॉईंट.  तर तिसरा पॉईंट असा, मी  अतिशय हळवी आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेते.  म्हणजे कोणी मस्करीत काही बोललं तरी मी लगेच कंठ दाटून येणं, डोळे भरून येणं या सगळ्या गोष्टी घडतात. थोडक्यात काय तर मला मस्करी कळतच नाही पटकन.😀


दुसरी गोष्ट सॉरी चौथी गोष्ट.  मी थोडीशी, किंवा थोडी जास्त किंवा जास्तच हट्टी होते. म्हणजे एखादी गोष्ट मला जशी हवी आहे  तशीच घडली पाहिजे असा हट्ट असायचा.  आणि ती  तशी नाही घडली आकाड  तांडव करायचा.  खूप चिडचिड करायची, रुसून बसायचे, आदळआपट करायची . हो हो अगदी हे सगळं करायचे.  पण आता वयामनाने म्हणा, किंवा अनुभवाने म्हणा स्वभावात  बराच म्हणजे खूप जास्तच फरक झालाय. आणि तो हल्ली माझ्या लिखाणातून जास्त दिसायला लागलाय.


आता आपण पॉइंटला बाजूलाच ठेऊ या. असं बघायला गेलं तर मी थोडी अंधश्रद्धाळू आहे . म्हणजे एखादा रंग घातला की तो अनलकी, मांजर आडवं गेलं किंवा बाहेर पडताना कोणी शिंकलं की जरा मागे फिरणं. अशा  छोट्या छोट्या गोष्टी मी अजूनही करते कधी कधी. हा पण  मी पाळते म्हणून घरच्यांनी ही पाळाव्यात असा अट्टाहास  कधीच केला नाही. आता प्रयत्न करते मी बाहेर पडायचा जमेल हळूहळू. 


हट्टीपणाच्या बाबतीत मात्र माझी एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे जर मी एखादी गोष्ट करायची ठरवली,  तर ती करण्यासाठी लागेल ती मेहनत, कष्ट, जिद्द आणि एकाग्रता या सगळ्या गोष्टी करायची माझी तयारी असते . एखादी गोष्ट मिळवण्यासाठी दोन गोष्टीचा त्याग करायची  ही तयारी असते. त्यासाठी मग कसलीही कुरबूर नसते. एक उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्या कष्टाने माझ्या छोट्याश्या लाडूच्या व्यवसायाच्या कमाईतून  घेतलेला माझा पुण्याचा फ्लॅट.


अजून एक गोष्ट जी साधारण आपल्या सगळ्या स्त्रियांमध्ये कॉमन आहे, आपण समोरच्या व्यक्तीवर खूप पटकन विश्वास ठेवतो.  म्हणजे ती व्यक्ती जरा गोड वागली की आपण आपल्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी त्या व्यक्तीकडे व्यक्त करतो.  पुरुष किंवा स्त्री असा भेदभाव त्यात नसतो . आणि नंतर त्याच व्यक्तीने जर  आपल्याला दगा दिला , किंवा दूर निघून गेली तर आपण त्या गोष्टीचा खूप विचार करत राहतो. आणि स्वतःला त्रास करून घेतो. मी ही अगदी अशीच आहे.


आणि हो थोडीशी आळशी आहे.  आळशी म्हणण्यापेक्षा म्हणजे मला कधी कधी त्या त्या गोष्टी त्या त्या वेळेवर करायला कंटाळा येतो.  म्हणजे कपडे घडी करायचे असले तर  एखादा सिरीयलचा एपिसोड बघू मग करू किंवा थोड्या वेळाने करू,  असं मी करते.  अगदीच दरवेळी नाही पण अधून मधून येतो  कंटाळा. आणि म्हणूनच कदाचित हा लिहायला आज उजडवा लागला.


एक गोष्ट खूप चांगली आहे की मी समोरच्या व्यक्तीला पटकन  बोलते करते.  त्यामुळे माझी बरीचशी काम ही थोड्याशा गोड बोलण्याने होतात.  माझ्याकडे लाडूला असणारी मदतनीस म्हणते की , "ताई , दगडालाही बोलायला लावाल तुम्ही."   या गोष्टीचा फायदा असा माझी कामे जास्त अडून राहत नाही . आणि अगदीच अडलं  तर कुठलंही काम करायला मी मागे राहत नाही म्हणजे  प्लंबर,  कार्पेंटर,  इलेक्ट्रिशियन यांची छोटी छोटी  काम मी स्वतःची स्वतः करून घेते.


इतरांना मदत करायला मला खूप आवडते. माझ्या ताकती आणि कुवतीनुसार हा पण.....आणि एक गोष्ट फारच गंमतीची मला ना अगदी कशाचीही भीती वाटते. वेळ पडली तर मी रणरागिणी ही होते . पण बऱ्याच वेळा माझा भित्रा ससा असतो. 😂😂😂


एक अत्यंत वाईट गुण आहे . हा गुण म्हणावा की वयानुसार आलेली ही गोष्ट.  तो म्हणजे विसरभोळेपणा.  रोज शंभर वेळा मी मोबाईल कुठे ठेवला? चष्मा कुठे ठेवला? याचा शोध घेत असते.  मोबाईलला मिस कॉल देऊन शोधता येतो , पण चष्म्याचा काय?  तो शोधाण्यासाठी घरातल्या सगळ्यांना कामाला लावते.  तसंच कधी एखादी गोष्ट कुठेतरी ठेवते आणि विसरून जाते. आणि मग ती मिळाली नाही,  कि  चिडचिड करते.  आणि सापडली की स्वतःवरच कधी रागावते तर कधी हसते.


एक गोष्ट मी सगळ्यात शेवटची पण खूप महत्त्वाची मला लिपस्टिक लावायला प्रचंड आवडतं. म्हणजे मी अगदी घरीच असले तरी लिपस्टिक लावते.  आंघोळ झाल्यावर देवाला नमस्कार करायच्या आधी ओठांवर लिपस्टिक फिरवणं चुकत नाही.  बऱ्याच वेळा लोकांनी टीका ही केलीय यावर   पण who केअर्स😏. ते  मला प्रचंड आवडतंआणि ते मी करणारव.


आणि खूप महत्वाचे मी माझ्या मनाचा कुणालाही थांगपत्ता लागू देत नाही. मनातली वादळं मनात ठेवून छान हसत राहणे  मला उत्तम जमते.


अजून असं काही आठवत नाहीये. (विसारभोळेपणा😂)


पण राधिका ताई खरंच छान!!!  तुमच्या या मै ऐसी क्यूँ हूँ ?...  टॉपिक मुळे  कधी नव्हे ते आम्हांला आत्मपरीक्षण करायची संधी ही मिळाली आणि वेळही मिळाला.  


धन्यवाद राधिकाताई🙏🏻


आणि सर्व सखींचे लेख खूप खूप छान आहेत.   त्यांचे लेख वाचून, इन्स्पायर होऊन , मलाही वाटलं  यार !!!थोडा लिखना तो बनता है😜.


तर थोडी खट्टी बहुत मीठी ऐसी ही हूं मैं♥️


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️


Sunday, 16 June 2024

वडील

 आज जागतिक पितृ दिन या दिवसाच्या निमित्ताने थोडसं वडिलांविषयी......


खरं तर वडील म्हटलं अगदी कडक स्वभावाचे, शिस्तीचे अशी व्यक्ती असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे  राहते.  कारण  वर्षानुवर्षे आपण तेच बघत आलो 

आहोत किंवा आमच्या पिढीपर्यंत वडील म्हटलं की साधारण अशीच व्यक्ती असायची म्हणूनही.


पण जसा जसा काळ बदलतोय , आणि  त्याबरोबर इतर गोष्टी बदलत आहेत तसं हल्लीच्या काळात वडिलांची प्रतिमाही थोडीशी बदलत जात चाललीये असं मला वाटतं. म्हणजे काळानुरूप प्रत्येक व्यक्ती आपल्यात बदल घडवत आली आहे त्यामुळे ही हा बदल होत असावा.


आईची माया, आईचं प्रेम,  आईचे कष्ट या विषयावर भरपूर लिहिलं जातं, बोललं जातं, सादर केले जाते.  वडील या विषयावर तितके भाष्य होत नव्हतं , पण हल्ली हल्ली थोडं फार लिहिलं जातेय, बोललं जातंय, सादर ही केले जातेय.


पूर्वीच्या काळी बहुतांश वेळा वडील नोकरी करायचे, किंवा कामानिमित्त बाहेर असायचे. त्यामुळे आपसूकच घर सांभाळायची जबाबदारी ही घरातल्या स्त्रियांवर असायची.  त्यामुळे घरातले प्रत्येक मूल हे आईच्या खूप जवळ असायचं, आणि आईला त्याची प्रत्येक गोष्ट माहीत असायचीच. हट्ट करायचा तर आईकडे, हवं नको असेल तर आईकडे,  राग  काढायचा तर आईवर असंच दिसतं बहुतेक ठिकाणी.


बाबांपासून थोडा दुरावा असायचा आणि तो अजूनही असतो. बाबा या शब्दाविषयी मनात आदरयुक्त भीती असते म्हणूनच कदाचित बाबांच्या इतके जवळ नाही जाऊ शकत. आईला आपण एकेरी संबोधतो आणि बाबांना बहुवचनी त्यामुळे इथेच दुराव्याची सुरुवात होत असावी.  कुठेतरी आपल्या घरातूनही ते शिकवलं जातं की  आईला अगं आई म्हटलं तर चालतं पण बाबांना अरे बाबा नाही म्हणायचं अहो बाबाच म्हणायचं. आता हल्ली बऱ्याच ठिकाणी बाबांनाही अरे बाबा म्हणायची पद्धत सुरू झाली ही चांगली का वाईट याबद्दल चर्चा नको.  पण त्या पाल्यातला आणि वडील यांच्यातला जो दुरावा आहे तो  थोड्या अंशी कमी व्हायला नक्कीच मदत होत असेल.


बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की , बाबा तर नुसते कडक शिस्तीचेच आहेत,  त्यांना कुठे कळतंय मुलांना काय वाटतं, काय हवंय. ते फक्त नाहीच म्हणतात. पण हे असं नसावं. कारण मुख्य गोष्ट इथूनच सुरू होते की पुरुषाला रडता येत नाही,  मोकळेपणाने व्यक्त होत येत नाही. जसं स्त्री करू शकते.  तसे पाहायला गेले तर तो ही दोनदा मोकळेपणाने रडतो एकदा त्याची आई गेल्यावर आणि दुसऱ्यांना मुलीची पाठवणी  करताना. कुठल्याही दुःखद प्रसंगात त्यांना वाईट वाटत नसेल असं नसावं बहुतेक , मी एक स्त्री आहे मी फक्त माझा  पॉईंट ऑफ यू मांडत आहे. आपल्या भावना मोकळेपणानं पुरुषाला मांडताच येत नाही बहुतेक.  म्हणजे पुरुष म्हणून जी प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या मनात असते त्याचा एक भार कुठेतरी ते सतत वाहत असतात.  आपल्या या धीरगंभीर प्रतिमेला कुठेतरी धक्का बसेल  या भीतीने ते कमी व्यक्त होत असतील.


एखादी गोष्ट करायला देताना कधीकधी आईचा होकार असतो पण  बाबांचा नकार असतो.  त्यामागे वेगळं कारणही असू शकते फक्त शिस्त किंवा  पैसे नाहीत म्हणून तो नकार असं नसतं.  एकंदरीतच पूर्ण संसाराच्या  खर्चाचा विचारही, पुढे जाऊन त्याचे परिणाम याचाही विचार ते करत असतील. कधी कधी आपली राहिलेली स्वप्न मुलांनी पूर्ण करावीत , किंवा जे आपण सहन केले ते मुलांनी करू नये म्हणून वेळप्रसंगी त्यांना मनाविरुद्ध ही कठोर निर्णय घ्यावे लागतात.


वर  म्हटलं त्याप्रमाणे हल्ली वडिलांचे एक मृदू रूप ही आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काळात बहुतांश वडील कधी आपल्या पाल्याचे मित्र होऊ शकले नाहीत. आता हे चित्र थोडं  बदलायला लागले आहे.  हल्ली  वडिलांना   बऱ्याच ठिकाणी  सर्रास एकेरी नावाने  नावाने संबोधले जाते.  त्यामुळे बाबा हा नुसता आपला बाबा नसून आपला मित्रही आहे असं मुलांना वाटतं.  अर्थात तिथं ही एक पुसटशी रेषा असते जिथे वडिलांचा धाक हा कायम असतोच. 


हल्लीचे बाबा मुलांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये लक्ष घालतात त्यांना मार्गदर्शन करतात. वेळीच त्यांच्या सोबत ते ही एखादी गोष्ट करायला संकोच बाळगत नाहीत.


पण तरीही मुलांपेक्षा मुली वडिलांच्या जास्त जवळच्या असतात , हे ९९% टक्के खरं आहे.  वडिलांचे जेवढे प्रेम मुलीवर असतं तितकं प्रेम मुलावर नसतं असेच नाही अगदी  पण त्या नेहमीच वडिलांच्या हृदयाच्या खूप जवळच्या असतात.  मुलीसाठी वडिलांचा जीव जास्त तुटतो.  मुली बद्दल एखादा निर्णय घेताना  ते जास्त सजग असतात.  मुलींच्या वडिलांना तारेवरची कसरत असते आधी आई आणि बायको मध्ये कुणाची बाजू घ्यायची याची आणि नंतर बायको आणि मुलगी यांच्या मध्ये कुणाची बाजू घ्यायची याची.


बऱ्याच वेळा मुलांचे आजारपणा आले की  त्यांची काळजी घेणं ही आईची जबाबदारी असायची,  पण हल्ली हल्ली वडील ही आपली कामे बाजूला ठेवून , किंवा आपली कामे सांभाळून मुलांसाठी वेळ काढतात.  आई इतकी जबाबदारी घेण्याचा ते ही प्रयत्न करतात. 


पूर्वीच्या काळी मुलींची मासिक पाळी वगैरे आली की वडिलांना तिला कावळा शिवला असे सांगितले जायचे किंवा त्या गोष्टी लपवल्या जायच्या.  पण हल्ली या गोष्टी जितक्या आईला माहिती असतात तितक्याच वडिलांनाही माहिती असतात.  म्हणूनच हल्लीचे बाबा त्या काळात होणाऱ्या मुलीच्या बदलाला जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात.  त्या काळात तिची होणारी चिडचिड कमी करण्यासाठी  आपल्या परीने प्रयत्न ही करतात. 


पूर्वी प्रगती पुस्तकांवर फक्त वडिलांची सही लागायची , त्यावेळी कमी मार्क मिळाले की ते काम आईवर सोपवलं जायचे. वडिलांशी बोलणे , त्यांना काही सांगणे हे मोठे दिव्य काम असायचे. आता मात्र वडिलांशी चर्चा होतात, आपले मुद्दे मांडले जातात, समजावले जातात. दोन पिढ्यांमधील वैचारिक फरक हा असतोच पण तो कमी करण्यासाठी प्रयत्न होणे महत्त्वाचे.


 हल्लीची मुले मुली एखाद्या मित्राच्या हक्काने हात ठेवावा तेवढ्या हक्काने आपल्या वडिलांच्या खांद्यावर ही हात ठेवतात.  इतकंच नाही तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून घरातली जबाबदारी घेतात. हे होणारे बदल चांगलेच ना. 


पण एक गोष्ट नक्की वडील कितीही मित्रासारखे वागले तरी  मुलीच्या लग्नाचा विषय येतो , त्या वेळेला मात्र त्यांच्यातला *बाबा*  जागा होतो.  आपली जागा आता दुसरा कोणीतरी घेणार ही कल्पना त्याला सहन होत नाही. जसा आपण आपल्या मुलीला जपलं वाढवलं तसं समोरच्या पुरुषांनीही करावं त्यांची अपेक्षा असते. आणि म्हणूनच त्याचे निर्णय कधी कधी कठोर असतात.


जसं आपण म्हणतो मुलीला आई झाल्या शिवाय तुला कळणार नाही.  मुलांच्या बाबतीतही असतं ज्या मुलांचं त्यांच्या तारुण्यात वडिलांशी अजिबात पटलेलं नसतं किंवा वैचारिक मतभेद असतात.  ती मुले ज्यावेळी बाबा होतात त्यावेळी त्यांना वडिलांची तळमळ  कळून येते. आणि कधीही त्यांच्या वडिलांच्या जवळपास बसलेली मुलंही त्यांच्या म्हातारपणात त्यांना हात धरून सगळीकडे नेतात, आजारपणात त्यांची सेवा करतात.


याच कडक शिस्तीच्या बाबांचा जेव्हा आजोबा होतो. तेव्हा यांच्यातला तो मृदू माणूस  आपल्याला दिसू लागतो. आणि त्यावेळेला प्रत्येक मूल हाच विचार करतो ही नातवंडांशी इतके प्रेमाने वागणारे बाबा माझ्याशी का इतक्या कडक शिस्तीत का बरे वागले?  तेव्हा कुठं होते हे रूप?  आपल्याला कारण कळत नाही कारण तेव्हा आपण  त्यांच्या वयात असतो आणि त्यांच्या भूमिकेत ही.


एक नक्की की वडिलांचे प्रेम आईसारखे दिसत नसले तरी ते आपल्या मुलांवर तितकेच असते. फक्त कधी कधी ते  समजून घ्यायची गरज असते. 


सगळ्याला अपवाद असतातच त्यामुळे कुणाला वडिलांच्या बाबतीत वाईट अनुभव ही आले असतील.


माझा हा लेख माझ्या आजूबाजूला असणाऱ्या ते कुल बाबा तसेच  कडक शिस्तीच्या वडिलांना जागतिक पितृदिनानिमित्त भेट. 💐



सौ. मिलन राणे - सप्रे🖋️




   या

Saturday, 15 June 2024

एक जुनी आठवण

आज दहावीचा निकाल लागला. दरवर्षी दहावीच्या निकलाच्या दिवशी माझा दहावीचा निकाल लागल्यानंतर ची एक घटना मला आठवते. अर्थात त्या घटनेशी निगडित दोन्ही व्यक्ती आज हयात नाहीत.  पण त्या घटनेनिमित्त त्या दोन्ही व्यक्तींची आठवण नव्याने ताजी होते.


मी दहावी झाले मार्च १९९२ला. आमच्या वेळी ७०-७५ टक्के म्हणजे खूप असायचे. हल्ली सगळ्यांचे मार्क बघून नवल वाटते. ८५ ते ९८ मध्ये  मार्क असतात. आमच्या काळात मंगेश म्हसकर नावाचा मुलगा ९६% नी पहिला आला होता, कोण कौतुक झालं होतं त्याच. आजही ते पेपर मधले रकाने आठवतात. 


 माझा दहावीचा निकाल लागायच्या आधीच आईला सांगितलं होतं ७५ ते ७८% च्या मध्ये मिळतील त्यापेक्षा जास्त नाही त्यापेक्षा कमी नाही.  एक ताई बोर्डाच्या ऑफिस मध्ये असल्यामुळे एक दिवस आधीच निकाल कळला होता.  पण शाळेत जाऊन पाहिल्यावर त्याच्यावर शिक्कामोर्तब  झाले.  मला ७५.४२टक्के होते.मिळालेल्या मार्कांचे कौतुक सगळ्यांनाच होतं, कारण ज्या परिस्थितीत आम्ही शिकत होतो त्या परिस्थितीत ते मार्क जरा जास्तच होते.


माझा निकाल लागला, त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट. त्यावेळी  काही असे मोबाईल वगैरे नव्हते, की स्टेटसला टाकलं किंवा फोन करून सांगितलं.  फोनही फार कमी होते.  त्यामुळे नातेवाईकांना मार्क कळायला एक दोन दिवस लागायचे. 


 तर दुसऱ्या दिवशीची गोष्ट ते तीन साडेतीन वाजले होते. आणि आमच्या घराची कडी वाजली ,तेव्हा  बेल हा प्रकार चाळींमध्ये जास्त अस्तित्वात नव्हता.  मी दार उघडलं समोर आमचा बॉम्बे सेंट्रल चा बाळा मामा होता. जो बीएसटीत कामाला होता.


 मला आणि आईला दोघींनाही आश्चर्य वाटलं.  की हा आता यावेळी इथे कसा? तो येऊन बसला. आईने त्याला पाणी वगैरे दिलं. मला मामानं जवळ बोलावलं आणि त्याने पार्ले जी चा पुडा माझ्या हातात दिला. माझे अभिनंदन केलं. तो आईला म्हणाला मला माहितीच नव्हतं मिलन इतकी हुशार आहे.  आत्तापर्यंत घरातल्या इतर मुलांचं कौतुक ऐकून होतो.  मला वाटलं होतं की हिला ५०-५५% मिळतील.  पण खरंच खूप चांगले टक्के मिळाले. खूप छान वाटलं हिला ७५ टक्के मिळाले हे ऐकून.    मला अगदीच रहावलं नाही म्हणून हाफ डे टाकून मी भेटायला आलो.  मला आणि आईला दोघींनाही अगदी भरून आलं होतं.   त्याचं येणं अगदीच अनपेक्षित होतं.  आमचा बाळा मामा म्हणजे अगदी साधाभोळा  माणूस.  आपल्या भाचीचे कौतुक करायसाठी खास हाफ डे घेऊन बॉम्बे सेंट्रल होऊन विरारला येणं  हे खरंच कौतुकास्पद होतं. त्यानंतर आईने त्याला तिची स्पेशलिटी खिचडी करून घातली. खिचडी लोणचं तो जेवला आणि नेहमी तो म्हणायचा गोविंद गोविंद म्हणत तृप्त मनानं पानावरुन उठला.


त्याने आणलेल्या त्या पार्ले जी च्या पुड्याची किंमत काही लाखाहून कमी नव्हती. मला त्या वेळेला मिळालेलं सगळ्यात मोठ बक्षीस आहे कारण ते आजही माझ्या लक्षात राहिले आहे. आणि खूप निर्भेळ कौतुकानं दिलेलं होते ते.


दुर्दैवाने मामा खूप लवकर गेला.  त्याची जाण्याची तारीख आणि माझ्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख ही एकच आहे. काही योगायोग मनाला चटका लावून जातात.


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️

सहजच.....५

 काल सुशांत सिंग च्या बातमीनंतर इतक्या पोस्ट आल्या, एकटे राहू नका, कुणाशी तरी बोला, मोकळे व्हा....अगदी १००% खरे आहे. पण काही गोष्टी अशा घडतात की आपण त्या कुणाला पटकन नाही सांगू शकत.कुठेतरी ही भीतीही असते याच गोष्टींचा आधार घेऊन समोरच्या व्यक्तीने कधी पुढे आपल्याला दुखावलं तर....त्यामुळं नाही मोकळं होता येत. 

जेव्हा आपल्याला कुणी विश्वासाने काही सांगितलं तर ते आपल्यापर्यंत ठेवण्याची आपलीही तयारी हवी.  समोरच्या व्यक्तीला हा विश्वास हवा की मी सांगितलेल्या गोष्टींचा दुरूपयोग होणार नाही.  

तर काही वेळा असेही होते की आपण चांगले काहीतरी करायला जातो आणि समोरच्या व्यक्तीला ते त्याच्या बाजूने नसल्यामुळं चूक वाटते. हा अनुभव ही प्रत्येकाने घेतला असेल. 

काल हे सगळे वाचताना एक मराठी सिनेमा आठवला लॉस्ट अँड फाउंड. त्यात एकटे वाटणाऱ्या व्यक्ती सोबत २४ तास घालावायचे अशी संकल्पना एक ग्रुप राबवत असतो. खूप वेगळी कल्पना असे असायला हवे कुठेतरी. आज प्रत्येकाला गरज आहे अशा आधाराची. 

माझ्या डॉक्टर बीना वागळे ने टाकले आहे की कधी वाटले तर माझ्याशी बोला निःसंकोचपणे असे टाकणारी मी पाहिलेली पहिलीच व्यक्ती .....तेच मला ही सांगावेसे वाटते....

(उगाच टाईमपास म्हणून नाही... जर खरंच कुणी नसेल व्यक्त व्हायला तेव्हा)

बोलून मन हलकं होते आणि साठवून फक्त ओझे होते😊

Friday, 7 June 2024

सहजच .....४

 दिलसे.....❤️


आज आपल्या लाडक्या वरूणराजाचा  वाढदिवस...७ जूनला पाऊस पडणार आणि १३ जून ला शाळा उघडणार हे समीकरण आमच्या पिढीच्या मनात अगदी पक्के बसलेलं आहे....🌧️🌧️🌧️


या निमित्ताने आठवण झाली जुन्या दिवसांची. जून महिना सुरू झाला की शाळेचे आणि पावसाचे वेध लागायला सुरवात व्हायची. पहिला पाऊस कधी येतो आणि त्यात कधी भिजतो असे होऊन जायचे. आणि दोन महिन्यांनंतर शाळा सुरू होणार आणि लवकर उठावे लागणार म्हणून मन थोडेसे खट्टू ही व्हायचे.


आभाळ जरा भरून आले की हातातली कामे टाकून आकाशाकडे पाहत राहायचे की कधी पाऊस पडतोय. पाऊस पण इतका खोडकर की जेव्हा फावला वेळ असायचा तेव्हा पडायचा  नाही आणि सगळे कामात गर्क असले किंवा जेवायला बसणार इतक्यात हा बरसायचा. मग सगळे पटापटा आवरायचं , घास कोंबायचे आणि पावसात भिजायला पळायचे. त्यावेळी सर्दी होईल, खोकला होईल अशी कारणे नसायची. उलट उन्हाळ्यात आलेलं घामोळे पहिल्या पावसात भिजून जाते म्हणून सर्रास भिजायला जायचो. 

बऱ्याच बिल्डिंगमध्ये पावसात फुटबॉल खेळला जायचा. साचलेल्या त्या पाण्यात उड्या मारायच्या. सगळेच चिंब भिजलेले असताना एकमेकांवर ओंजळीत येईल तेवढं पाणी एकमेकांवर उडवायचे. दहा वेळा तोंड धुवायचे. आणि गच्चीवरून पाईप मधून खाली येणाऱ्या पाण्याखाली उभे राहायचे. कोण काय म्हणेल, कोण बघतेय, कोण ओरडेल याची अजिबातच चिंता आणि तमा दोन्ही नसायची. ते क्षण त्या छोट्या ओंजळीत सामावून घ्यायची धडपड असायची.


पाऊस हजेरी लावून गेला की शाळेच्या तयारीला सुरवात व्हायची. जुन्या पावसाळी चपला प्रथम बाहेर निघायच्या. जुने रेनकोट , छत्र्या सगळं काढलं जायचे. नवीन गणवेश शक्यतो घरातल्या मोठ्या मुलीला किंवा मुलाला मिळायचा. बाकीच्यांना शक्यतो जुनाच. दप्तराची ही तीच गत. तेव्हा खाकी दप्तर असायची बहुतेक. अगदी श्रीमंतांची जराशी वेगळी. पुस्तकं ही आधीच्या वर्गातल्या कुणाची तरी , किंवा मोठ्या भावाबहिणीची. नवीन पुस्तकं मिळाली की त्याचा रुबाब काही वेगळाच असायचा. त्या पुस्तकांच्या पानांचा वास घेण्यात आणि पानावरुन हात फिरविण्यातच बराच वेळ जायचा. फक्त वह्याच काय त्या नवीन असायच्या. त्याला पेपर, कॅलेंडर किंवा खाकी कव्हर घातलं जायचे. लेबल लावून नावं घातली जायची. कव्हर घालणे हा एक वेगळा कार्यक्रम असायचा. शक्यतो तो एखाद्या रविवारी असायचा किंवा दुपारी फावल्या वेळेत. आवडत्या विषयाच्या वहीला अगदी सांभाळून आणि व्यवस्थित कव्हर घातले जायचं. घरात ज्याचे अक्षर चांगलं असेल त्याला सगळ्यांच्या वह्यांवर नावे घालावी लागायची. नवीन वर्ग, नवीन वर्गशिक्षिका , यावर्षी वर्गात नवीन कोण मुलं मुली येणार याची उत्सुकता असायची. पहिला बेंच मिळवायचा म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी लवकर जाण्याचे प्लॅन ही केले जायचे. 


जून महिना नवीन ऋतू आणि नवीन शालेय वर्ष याची चाहूल घेऊन यायचा.


काही म्हणा पण ते मंतरलेले दिवस पुन्हा  येणे नाही. पण त्या सुखद आठवणींवर आयुष्य जाते...आणि मित्रमंडळी सोबत गप्पांच्या फडात हे प्रसंग अगदी जिवंत उभे राहतात डोळ्यासमोर❤️


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️

Friday, 6 October 2023

सहजच...........३

 एकांत आणि एकटेपणा किती सारखे शब्द..पण दोहोंचे अर्थ अगदी टोकाचे. एकांत हवाहवासा वाटणारा तर एकटेपणा नकोसा झालेला, खायला उठणारा.


एकटेपणा ...... माणूस कशालाही घाबरत नाही तितका एकटेपणाला घाबरतो. एकट्यानं सगळे करता येते असे म्हणणाऱ्या व्यक्तींनाही कधीतरी, कुठंतरी हा एकटेपणा सलत असतो. वयाच्या कुठल्याही टप्प्यात एकटेपणा येणे हे त्रासदायकच. पण तरीही त्याला सामोरं जाऊन ,त्यातून काहीतरी करण्याचे, बाहेर पडण्याचे मार्ग शोधणे हे ज्यांना जमते ते खऱ्या अर्थाने आयुष्य जगतात. 


प्रत्येकाला एकांत हवा असतो. कधी स्वतःसाठी, तर कधी आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालविण्यासाठी. माणूस एकांतात असला बऱ्याच गोष्टींचा गुंता त्याला शांत चित्ताने सोडवता येतो. निवांत काही क्षण स्वतःबरोबर घालवता येतात. एकांत ही एक अनुभूती आहे जी गरजेची आहे. कधी कधी आजूबाजूला खूप गर्दी असणे, सतत कशात तरी व्यस्त असणे , या दैनंदिन जीवनातील धावपळीपासून थोडासा निवांतपणा मिळावा म्हणून एकांत गरजेचा असतो.


काही क्षण एकांतात घालवायचा बरे वाटतात , पण तरीही त्या एकांताच्या क्षणात एकटेपणा जाणवायला लागक की ते एकांताचे क्षण ही नकोसे वाटतात.


घ्यावा एकांताचा थोडा निवारा,

दूर कराया एकटेपणा जरा,

ना गल्लत करावी दोहोंची,

दोहोंची साथ असावी क्षणीची,

मनाने घ्यावी नवी उभारी,

जसे मातीमध्ये बीज अंकुरी♥️


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️

सहजच...........२

 सहजच..........


पूर्वी आकाशात अशी धुराची रेष दिसली की रॉकेट आलं, रॉकेट आलं म्हणून त्या धुराच्या रेषेमध्ये आम्ही पळत सुटायचो.  त्यावेळेला कल्पनाही नव्हती ते विमान असतं ,  ते धूर सोडत जाते म्हणजे रॉकेट इतकंच डोक्यात असायचे. ती रेषा एकाला ती दिसली  रे दिसली की तो किंवा ती  अरे ते बघ रॉकेट चाललंय असं करून ओरडत सुटायचे.  आणि मग अजून चार जण त्यांच्या मागे. मग अशी  आमची अख्खी फलटण ते बघायला जमायची. ती बघत जिथं पर्यंत जाता येईल तिथपर्यंत त्या रॉकेटच्या रेषेमागे जायचं.  मग घरचे ओरडतील म्हणून जास्त पुढे जजायचं नाही. पण  आकाशात  मागे सोडलेली ती धुराची रेषा पुसट होईपर्यंत बघत राहायचं. 


कधी कधी वाटायचं   १५ ऑगस्ट,  २६ जानेवारीला  टिव्हीवर दाखवतात,  तसा रंगीत धूर दिसेल त्या रॉकेट मागे.  पण तो कधी तसा दिसलाच नाही त्यामुळे थोडीशी निराशा व्हायची पण तरीही त्या रेषेची मज्जा कमी झाली नाही.


आता हे रॉकेट नाही हे विमानच आहे हे कळण्याइतके मोठे आम्ही सगळेच झालो.  तरीही  त्या रॉकेटच्या धुराकडे अनिमिष नजरेनं बघण्याचा बालिशपणा प्रत्येकाच्या मनात तसाच आहे अजूनही.   


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️




सहजच.........१

 परदेशी गेलेल्या पाल्यांच्या पालकांचं मनोगत♥️


वेळ कशी भुरकन उडून जाते. तसंच आपल्या घरट्यातली चिमणी पाखरं ही मोठी झाली की घरटी सोडून उडून जातात. काही शिक्षणसाठी, काही करियरसाठी.  अशावेळी त्या पालकांच्या मनात जे काही त्याचा सुरू असेल, त्याचा प्रत्यय मीही घेतला आहे हल्लीच.  तोच अनुभव  शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न.


आपलं मूल बाहेर जाणार, मग ते वेगळ्या शहरात असो  किंवा वेगळ्या देशात असो.  सगळ्यात आधी त्याचं आनंदातलं दुःख असतं ते आईला, एकीकडे मुलाची प्रगती असते आणि दुसरीकडे ते आपल्यापासून दूर होणार याची भीती असते.  थोड्याफार फरकाने वडिलांची ही तीच स्थिती असते. पण दिवसभर आपली मुलंच आपलं  जग असणाऱ्या आईसाठी ते जास्त त्रासदायक असतं.


मूल बाहेर जाणार म्हटलं की त्या तयारीसाठी सात-आठ महिने जातात. म्हणजे अगदी अप्लिकेशन देण्यापासून सुरवात होते.   मग हळूहळू  एक एका गोष्टींची सुरुवात होते.  आधी पेपर जमा करणे.  त्या पेपरवर्क मध्येच आपला बहुतांश  वेळ जातो. ते एकदा मार्गी लागले की मग व्हिसा आणि तिकिटांची गडबड सुरू होते. व्हिसा इंटरव्ह्यू कसा होईल ? मिळेल ना व्हिसा? या टेन्शन मध्ये काही दिवस जातात. मग त्याप्रमाणे तिकिट कधीचं काढायचं, कुठल्या कंपनी चे काढायचे, कधीच स्वस्त आहे ते पाहून ते काढून ठेवायचे. आणि एकदा का व्हिसा हातात आला की अर्धा जीव भांड्यात पडतो.


हे सगळं दिव्य सुरू असतानाच , दुसरीकडे एक वेगळीच गडबड सुरू असते. आपल्या कधीही काही काम न करणाऱ्या बाळाला सगळ्या कामांची ओळख करून द्यायची. त्यांना निदान स्वतःचे पोट भरता येईल इतका स्वयंपाक शिकवायचा. त्यांना तिथे लागणार सामान कुठं कुठं काय काय मिळते याची चौकशी करायची.  खरंतर हल्ली कुठे काय मिळत नाही असं नाही, सगळीकडे सगळंच मिळतं. पण तरीही घरचं ते घरचं असं म्हणत आपण बऱ्याच गोष्टी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. त्यातून तिथे मिळणाऱ्या गोष्टी महाग पडतील म्हणून शक्य तेवढं इथून द्यायचे. आताच्या काळात रेडी टू कूक मूळे खूप सोप्प ही झालंय सगळे.


या मधल्या काळात देश सोडून जाणार म्हणून सगळ्यांना भेटून घ्यायची गडबड. कुणी राहून जाऊ नये म्हणून सगळ्यांना भेटायचे वेळापत्रक आखणे म्हणजे अजून एक दिव्य. पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या, काळजी करणाऱ्या, आपल्या पाठीशी आशीर्वाद असणाऱ्या सगळ्यांना भेटणं हे ही तितकेच गरजेचे असते. या काळात प्रत्येक जण आपल्या ओळखीतल्या कुणाची ओळख सांगत असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करायचा प्रयत्न करतात. तेव्हा लक्षात येते की , जिव्हाळ्याची माणसे कशी असतात. कधीतरी आपल्यावर ही वेळ येईल न येईल याचा विचार न करता , आणि उपकाराची कुठलीही भावना मनात न ठेवता मदत करतात. ती मुलं तिथे गेल्यानंतर ही पालकांना मुलांची खुशाली विचारली जाते. त्यांना धीर ही दिला जातो. ही सगळी भावना खूप सुखकर असते.


"तू जास्त रडारड करू नको" असे सांगणारी मुलेही निघायच्या वेळी जास्त भावुक होतात. आणि मग ते मुलं दिसेनाशी होईपर्यंत ती मागे फिरून बघतात आणि बाहेरची माणसे त्यांना टाटा करत राहतात.


मुल एकदा बाहेरगावी निघून गेलं, त्यादिवशी ते तिथे पोहोचेपर्यंत आपल्या मनात धाकधूक असते. इतका मोठा प्रवास नीट करतील ना? बॅग्स नीट घेतील ना? तिथे नीट उत्तरे देतील ना? नंतर तिथे त्याचा कसं होईल काय होईल याची भीती. एकट्याने सगळं कसं मॅनेज करेल याचे भीती.  या सगळ्या भीती आपण आपल्या मनात साठवलेल्या असतात, पण तरीही आपण त्यांना या दाखवून देत नाही आणि त्यांना धीर देतो हे उत्तमच नाही का?


माझ्या मैत्रिणीने मध्ये व्हिडिओ केला होता की माझी मुलगी अजिबात होमसिक फील करत नाही. तिने करावं म्हणजे मी तिला काहीतरी सल्ला  देईन.  मला तो व्हिडिओ बघून फार हसायला आलो होते कारण थोड्या दिवसाने माझाही कदाचित तेच होणार होतं. पण नशिबाने माझी मुलगी ही होमसीक फील करत नाहीये.  याचा अर्थ तिला घरची आठवण येत नाही किंवा ती बिनधास्त आहे, असं नाही.  त्यांनी तेवढ्या स्ट्रॉंगली त्या गोष्टी घेतल्या.  आणि खरंतर ही खूप चांगली गोष्ट आहे. अर्थात जी मुलं होमसिक फील करतात ते चांगलं नाही असा नाही होत नाही. काही काळानंतर ती ही यातून व्यवस्थित बाहेर पडून तिथे छान रमतात.


त्या पहिल्या एक-दोन दिवसात आपल्याला घर इतकं रिकामी वाटतं.  आपल्या घरातुन एक व्यक्ती निघून गेलेली असते. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी गेल्यावर आईवडिलांना वाटतं, तीच भावना परदेशी गेलेल्या आई-वडिलांची असते.  कारण इतके महिने, इतके दिवस, केलेली धावपळ, केलेली इतकी कामे, बारीकसारीक गोष्टी .....हे  अचानक कुठेतरी थांबून गेलेले असते. त्यामुळेच एक रिते पण आलेलं असतं.   म्हणूनच  आपल्याला खूप एकटं एकटं वाटत. घर खायला उठतं


आपल्याला वाटत असतं आपलं मूल तिथे जाऊन एकटं पडेल.  त्याच्या आजूबाजूला कोणी नसेल आपलं असं. पण खरंतर मनाने आपण एकटे पडलेलो असातो.  पण मुलांच्या आनंदात आनंद म्हणून  तो एकटेपणा ही आपण आनंदाने स्वीकारतो.  आणि तो प्रत्येकाने स्वीकारायलाच हवा. कारण आपल्या भावनांची बेडी मुलांच्या पायात अडकवणं म्हणजे त्यांच्या प्रगतीत अडथळा आणण्यासारखा आहे. आणि खरंतर इतकी वर्षे आपण मुलांची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडलेली असते तर थोडा वेळ आपलेही आयुष्य जगायला मिळतो. तो वेळ ही आपण आपल्या आवडी जोपासत , काहीतरी नवीन करत छान घालवू शकतोच.


सौ. मिलन राणे - सप्रे 🖋️

Thursday, 5 October 2023

मनातला प्रेमाचा कोपरा

 1. ग्रीष्माचा उन्हासारखा देह माझा

दाह दाह करणारा

पावसाच्या थेंबासारखा स्पर्श तुझा

त्याला शांत करणारा.........♥️


©सौ. मिलन राणे - सप्रे🖋️




2. मन असे सैरभैर होई 

दिवास्वप्न पाहताना

का भास तुझे होती

मनीं विचार करताना

का तव छबी दिसावी

मज आरशात न्याहाळताना........♥️


©सौ. मिलन राणे - सप्रे🖋️



3. तुला भेटल्यावर 

सगळी गणितं चुकतात

क्षणासारखे दिवस

अगदी भुर्रकन उडतात

विचारांची चाके

गाडीच्या पुढे पळतात

मनाची पाखरं

आभाळावर उडतात

स्पर्शाने तुझ्या 

फुलांचे ताटवे फुलतात

तुला भेटल्यावर

ऋतू ही बदलतात

ग्रीष्माच्या उन्हात

श्रावणधारा बरसतात

काहीतरी जादूच

असावी  बहुधा  तुझ्यात

अशक्य गोष्टी ही

शक्य वाटू लागतात......♥️


©सौ. मिलन राणे - सप्रे🖋️


4. जादू ऐशी तुझ्या नजरेची

करी चलबिचल मनाची

रोख तुझ्या त्या कटाक्षाचा

ठोका चुकवी मम हृदयीचा

काय सांगावी दोहोंची कमाल

वार करत जाती उरी आर पार.........♥️


©सौ. मिलन राणे - सप्रे🖋️



5.तुझं रागावणं

तुझे चिडणें

तुझें प्रेमानं जवळ घेणे,

सगळंच या श्रावण सरीं सारखे,

एकाचा अनुभव घेता घेता,

दुसरं दत्त म्हणून हजर,

रागावण्यातले प्रेम 

आणि प्रेमातले रागावणं

ऊनपावसाच्या  खेळासारखे,

तरीही हवेहवेसे वाटणारे,

याच पाठशिवणीच्या 

खेळानंतर अनुभवता येतं

ते सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य,

वेगवेगळ्या रंगात रंगलेले

तुझं प्रेम, कधी गडद, कधी पुसट,

कधी प्रखर , तर कधी सौम्य,

तरीही खूप लोभसवाणे,

भान हरखून टाकणारं,

आणि दरवेळी नव्याने,

अनुभवास येणारे.......,,♥️


©सौ. मिलन राणे - सप्रे🖋️







Friday, 29 September 2023

घरगुती उद्योजकांची खंत

 खरंतर आता मी जे लिहिणार आहे त्याने माझ्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.  हे लिहिणं लोकांना  जहाल वाटू शकतं . पण आज मला हे लिहावसं वाटते माझ्या व्यवसायासाठी किंवा माझ्यासारख्या छोट्या प्रमाणात  घरगुती व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी. मला आलेला अनुभव आहे हा . कदाचित हा अनुभव बाकी ही बऱ्याच जणांना आलेला असेल. 


एक तर माझा व्यवसाय घरगुती असल्यामुळे लोकांना त्याचं महत्त्व वाटत नाही.  म्हणजे घरगुती छोटासा काहीतरी व्यवसाय आहे इतकंच, वेळ जाण्यासाठी काहीतरी हवे म्हणून.  दुसरी गोष्ट म्हणजे मी जे बनवते  तो खाण्याचा पदार्थ असल्यामुळे,  मला बऱ्याच वेळा लोक म्हणतात अगं इतके लाडू बनवतेस ना, मग द्यायचे एक-दोन टेस्ट ला.  आपल्या ओळखीची हजार माणसं असतात, जर असे एक दोन लाडूचा टेस्टला द्यायला लागले कसा चालणार माझा उद्योग. साधी गोष्ट आहे जर तुमच्या ओळखीच्यातल्या कोणाचं एखाद्या मशीनचं दुकान आहे किंवा कपड्याचे दुकान आहे  त्यांना सांगता का मला एक मशीन किंवा एखादा ड्रेस देता का वापरून बघायला.  किंवा साधीच गोष्ट जर आपल्या ओळखीत कोणाचं सोन्याचे दुकान असेल तर आपण असं सांगू का की एखाद ग्राम द्या मला सोनें, बघू तरी तुमचे सोनं शुद्ध आहे की नाही.


मग हे घरगुती व्यवसाय करणाऱ्यांच्या बाबतीतच का?  तुम्ही घरची माणसं असा किंवा जवळची माणसं असा थोडासा डिस्काउंट घेऊन तुम्ही एखादी गोष्ट विकत नाही घेऊ शकत का?  का प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी अशाच हव्या असतात?  कुठलीही गोष्ट बनवताना त्याला लागणार मटेरियल,  त्याच्यावरची मेहनत हे सगळं असेच येतं  का? आणि एखाद्याने मेहनतीने केलेली गोष्ट आपण अशी फुकट का मागावी यामागचं लॉजिक अजून मला कळलेलं नाहीये.


कधी कधी एखादा  व्यवसाय करणारी व्यक्ती ही सर्रास म्हणते लाडू चवीला  दे. तुम्ही एखादी गोष्ट विकता तेव्हा तुम्ही ती समोरच्याला फुकट देता का नाही ना?  तो दुसऱ्याच्या व्यवसायाच्या बाबत लागू होत नाही का?  हा एखादी वस्तू थोडा डिस्काउंट  दे हा मला हे सांगणं योग्य आहे पण असेच मागणे किती योग्य आहे याचा विचार प्रत्येकाने करा बोलायच्या आधी.


हा अनुभव मला आला आहे छोटे घरगुती व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकालाच येत असे पण काय होतं की जाऊदे घरचीच माणसे जवळचीच माणसे आहेत किंवा मी जर असं बोलले तर माझ्या व्यवसायावर याचा वाईट परिणाम होईल म्हणून आपण हे बोलायचं लिहायचं टाळत तिला तिथल्या तिथे उत्तर द्यायचं टाळतो किंवा त्या व्यक्तीला तिथे उत्तर द्यायचं टाळतो


मला इतकंच म्हणायचं व्यवसाय असो की छोटा तो व्यवसाय करायला त्या व्यक्तीची मेहनत लागते त्या व्यवसायावर त्या व्यक्तीचं पोट भरत असतं, त्याचा उदरनिर्वाह चालू असतो.  अशी गोष्ट आपण फुकट मागणं कितपत योग्य आहे याचा दहा वेळा विचार करा.  एखाद्या व्यक्तीने समोरून जर तुम्हाला काही भेट म्हणून दिलं तर ती गोष्ट वेगळी, पण जर तुम्ही त्या व्यक्तीकडून काही घेत नसाल,  त्यांच्या  व्यवसायाला कुठल्याही प्रकारची मदत करत नसाल तर त्या व्यक्तीकडून काही आपल्याला असंच मिळेल याचीही अपेक्षा धरू नका.


आणि घरगुती व्यवसाय करणारा माणूस ही तितकाच बिझी असतो किंवा मेहनत करतो, ऑफिसमध्ये आठ तास  काम करणारी व्यक्ती करते.  त्याचा प्रॉफिट  शेकडोत असो किंवा लाखात असो तो पूर्णपणे त्या व्यक्तीच्य मेहनतीचं फळ असतं.


तसंच तो व्यवसाय घरगुती आहे म्हणून त्याची अगदी खोलात चौकशी करण्याची गरज नसते.  प्रत्येक व्यवसायाचे सिक्रेट्स असतात.  व्यवसाय म्हंटला की प्रत्येक गोष्ट उघडपणे आपण कोणालाही सांगू शकत नाही.  हे लहान मोठा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला माहीत असतं.  त्यामुळे उगाचच काहीतरी कारण काढून कोणाच्याही व्यवसायाची अगदी खोलात चौकशी करण्याची काही गरज नसते. 


जर तुम्हाला खरंच त्याचं त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर त्या माणसाला तुम्ही खास भेटायला जा.  त्यांच्याशी बसून बोला. त्यांच्या व्यवसायाबद्दलची त माहिती करून घ्या. बोलायला काही विषय नाहीये म्हणून व्यवसायाची चौकशी करणे आणि मग मागून त्याला नाव ठेवणं  ही जी प्रवृत्ती आहे ना ती बंद झाली पाहिजे.


जर आपल्याला कोणाचं कौतुक करता येत नसेल निंदाही करू नये.  त्या व्यक्तीने त्याचा व्यवसाय उभा करायला , मग तो छोटा असू दे की मोठा असू दे किती काबाडकष्ट केलेत हे त्या व्यक्तीलाच माहीत असू शकते.


त्यामुळेच जमलेच तर घरगुती व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून खरेदी करा. त्यांचा आदर करा. त्यांना कमी लेखू नका.


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️

Tuesday, 6 June 2023

चप्पल

 



चप्पल खरं तर हा विषय लिहिण्यासारखा नाही किंवा हा काय विषय आहे का लिखाणाचा?  असे लगेचच  मनात येतं.  पण मोच्याकडून शिवून आणलेल्या ठेवायला म्हणून चपलेचा खण उघडला आणि समोर एकदम दहा एक जोड. त्यातील एक घरी घालायला, एक लग्नाला किंवा एखाद्या समारंभाला जाताना,  चालायला एक, धावायला एक.  परत जरा जसा वेष त्याला तश्याच चपला असे म्हणत म्हणत  एकाचेच किमान चार पाच तरी चप्पल जोड घरात असतात.  एखादी चप्पल तुटली की ती  शिवून आणणे ही ही पद्धत आता फार जुनी झाली आहे. तुटली की ती टाकून द्यायची आणि नवीन घ्यायची. त्या इतक्या सगळ्या चपला  बघून आणि हा सगळा विचार करत मन भूतकाळात गेले.


आमच्या लहानपणी म्हणा किंवा अगदी कॉलेजमध्ये असतानाही,  आमच्याकडे जेमतेम दोन जोड असायचे चपलांचे. एक नेहमीच्या  वापराचे  आणि एक पावसाळ्यासाठी. पूर्वी सगळयाच शाळांतून बूटच घालायला हवे अशी सक्ती नव्हती. त्या काळात कितीतरी जण अनवणीही शाळेत येत असत. आणि जरी असलीच बूट घालायची सक्ती, तरी खूप जर कमी जण असे होते की ज्यांच्याकडे नवीन बूट असायचे.  घरातल्या मोठ्या मुलाला किंवा मुलीला ते बूट घेतले जायचे आणि मग त्यापेक्षा धाकटी बहीण,  भाऊ यांना ते वापरायला दिले जायचे . त्यांनाही पायात बसेनासे झाले की नंतर कुणाला तरी दिले जायचे. एक तर कुठल्या तरी नातेवाईकांच्या मुलांना किंवा मग घरी काम करणाऱ्या बाईंच्या मुलांना.



मला आठवतंय आम्ही लहान असताना जवळपास सगळ्यांकडेच  असायची, टॉयलेट बाथरूमला जाण्यासाठी म्हणून ठेवलेली  किंवा सगळ्यांची मिळून कधी  पायात चढवता येईल आणि पटकन बाहेर घालून बाहेर पडता येईल अशी पांढऱ्या रंगाची निळ्या पट्ट्यांची स्लीपर.  ती स्लीपर थोडीशी महागातली घेतली की  हिरव्या पट्ट्याची आणि थोडीशी हिरवी झाक असलेली  ती स्लीपर असायची. साधारण सगळ्यांकडे सारख्या आणि वेगवेगळ्या मापाच्या त्या स्लीपर घातल्या जायच्या. मला आठवतंय आम्ही चेंबूर ला असताना जवळजवळ सगळेच तीच घालून खेळायला यायचो आणि मग बॉनीच्या दारात त्या काढून ठेवायचो. आणि निघताना माझी कुठली, तुझी कुठली यावरून भांडणे व्हायची. पण पायात घातली की प्रत्येकाला कळायचे आपली स्लीपर कुठली, कारण प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, त्यामुळे ती एका विशिष्ट बाजूने झिजली जायची , पायात चढवली की आपोआपच समजून यायचे. आणि त्यातूनही घोळ झालाच, तर घरी गेल्यावर घरच्यांना बरोबर ओळखू यायची ती आणि मग कुणाकडे गेली असेल म्हणून शोधाशोध. पण ती ही वेगळी गंमतच होती.

पावसाळ्यात या स्लीपरच्या पट्ट्याच्या मागची बाजू उघडून त्यात एक जाड रब्बर टाकला की झाली पावसाळ्यासाठी ती तयार. तो रब्बर मागच्या बाजूने पायावर चढवला की झाली स्लीपर ची सॅंडल आणि चिखल उडायची ही भीती नाही. अशी टू इन वन , स्वस्त आणि मस्त अशी आपल्या सगळ्यांची लाडकी स्लीपर.



जशी ही स्लीपर सगळ्यांकडे असायची.  तशीच पावसाळी चप्पल खास मुलींसाठी किंवा बायकांसाठी होती ती म्हणजे बाटाची पट्ट्या पट्ट्यांची सॅंडल. लाल किंवा काळा या दोनच रंगात ती यायची. पण बहुतांश वेळा लाल रंगाची सॅंडल सगळ्या जणी घ्यायच्या. त्यामुळे पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या चार मुली असतील तर, त्यापैकी तिघींच्या  पायात तरी नक्कीच या लाल रंगाच्या सॅंडल असायच्या. 


पावसाळ्यात अजून एक गंमत असायची ते म्हणजे गंबुट.

हेही लाल किंवा काळ्या रंगाचे असायचे. आणि मग मुलं मुद्दामून त्या गंबुटात पाणी साठवून पचाक पचाक असा आवाज करत चालायची. घराजवळ आले की ते गम्बुट काढून उलटे करून त्यातलं पाणी काढून टाकलं जायचं म्हणजे घरी ओरडा मिळणार नाही. त्या गंबुटातले पाणी एकमेकांवर उडवणे हे असले प्रकार ही काही मुले करायची.


त्यावेळी शक्यतो नवीन चपला या दिवाळीला घेतल्या जायच्या. मग कोणाची चप्पल कशी आहे याच्या याचाही एक वेगळा कार्यक्रम असायचा.  ज्या मुलीला जरा उंच टाचांचे वेगळे असे बूट जर मिळाले असतील,  तर तिचा रुबाब जरा जास्त असायचा. त्यावेळी फार कमी लोक उंच टाचांच्या आपला घालायचे.  त्या उंच टाचांच्या चपलांचं इतकं अप्रूप होते आम्हाला. की ती चप्पल घालून जाणाऱ्या मुली बद्दलही डिस्कशन व्हायचं. कसं जमत असेल हिला एवढे हिल्स चे चप्पल घालून चालायला? पडायला होत नसेल का? उंच टाचांच्या चप्पल घालणाऱ्या किंवा बायका या जरा श्रीमंत अशीच काहीशी धारणा होती. एखाद्या मैत्रिणीचे तसे असतीलच चप्पल आणि ती मैत्रीण तितकी चांगली असेल.  तर तिचे ते उंच टाचांचे चप्पल घालून चालायचा प्रयत्न करायचा.  चालणं कसलं धडधडणे असायचे ते.  पाय सारखा वाकडाच व्हायचा. आणि मग जाऊ दे, पायच मुरगळेल म्हणून तो नाद सोडून दिला जायचा.



अजून एक चप्पल जिचं सगळ्यांनाच आकर्षण असायचं आणि आजही आहे,  पण तेव्हा मात्र ती शक्यतो मोठ्यांनाच मिळायची.  ती म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती कोल्हापुरी चप्पल. हल्ली कोल्हापुरी चपला सगळेच घालतात एक फॅशन म्हणून, पण त्या काळी फार कमी लोक ती चप्पल घालायचे.   मला आठवतंय माने काका ती कोल्हापुरी चप्पल घालायचे,  तसे माझे आजोबाही कधीतरी  कोल्हापुरी चप्पल घालायचे पण  शक्यतो बुटातच असायचे ते. कोणी कोल्हापूरला जाणार असले की त्यांना कोल्हापुरी चप्पल आणा हा नक्की,  करर्कर वाजणाऱ्या असे अगदी आवर्जून सांगितलं जायचं. त्या चपलांचा रुबाब काही औरच.


आता सारख्या निरनिराळ्या प्रकारच्या चपलांचे फॅड ही त्याकाळी नव्हते . आणि त्यावेळी चपलांचे इतके सगळे ब्रँडही सर्वसामान्य माणसांना माहीत नव्हते. बूट म्हटले की चामड्याचे बूट, आणि शाळेच्या  मुलांसाठी कॅनव्हास चे बूट. पावसाळी किंवा इतर चपला म्हटलं की फक्त बाटा. त्यानंतर पॅरागॉन हे नाव क्वचित कुठेतरी यायचं. आणि त्यावेळी  एखाद्या ओळखीच्या लहानश्या चपलांच्या दुकानातूनच त्या घेतल्या जायच्या.


कुठल्यातरी एका हिंदी सिनेमात एक संवाद आहे की चपलांवरून त्या माणसाची लायकी कळते.  हे वाक्य ऐकलं पु ल देशपांडे यांचे चितळे मास्तर आठवतात. त्यांच्या चपला किती झिजल्या असतील, हे त्या नुसत्या वर्णनावरून आपल्या डोळ्यासमोर येतं. खऱ्या आयुष्यातही काहींच्या बाबतीत हे असेच  सत्य सस्ते. म्हणजे हा संवाद प्रत्येकालाच लागू होतो असं नाही कारण त्या चपलांच्या मागे एक वेगळी कहाणीही असू शकते. आणि ती कहाणी जास्त महत्त्वाची असते,  त्या चपलांच्या ब्रँड आणि किमतीपेक्षा.


 आत्ता आपल्याकडे पैसा आहे, म्हणून कदाचित आपल्याला त्या साध्या चप्पल ची किंमत नसते. तुटली कि  टाकून दिली.  पण पूर्वी अगदी  मोच्याने सांगेपर्यंत, की आत्ता ही शिवता येणार नाही, इतकी ती चप्पल वापरलेली असायची.  ती त्या काळच्या लोकांची काटकसर असायची,  आणि त्या साध्या वस्तू वरले प्रेम ही.  ती काटकसर, तो ओलावा बहुधा आत्ता थोडासा कमी झाला आहे. सगळ्याच गोष्टींपासून आपण डिट्याच होऊ लागलो आहोत. कदाचित म्हणूनच आपल्या घरात माणसांपेक्षा चपलांची संख्या वाढली आहे.....एक विचार करण्यासारखी गोष्ट.


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️


Saturday, 15 October 2022

दिवाळीचा अभ्यास

 हल्ली शाळा ही वेगवेगळ्या बोर्डाच्या असल्यामुळे सुट्ट्यांचे वेळापत्रक बदललं आहे. आमच्या वेळेला साधारण नवरात्रीच्या वेळेला सहामाही परीक्षा सुरू व्हायच्या, आणि साधारणपणे दिवाळीच्या तिच्या आठ दिवस आधी संपायच्या. मोजून २१ दिवस सुट्टी असायची त्यावेळी दिवाळीची.


वर्षाचा सगळ्यात मोठा सण म्हणून नेहमी अगदी आतुरतेने वाट बघितली जायची. तशी अजून बरीच कारणं होती, बाबांचा होणारा बोनस, नवीन कपडे, फटाके,  फराळाचे पदार्थ, सुट्टीत येणारे पाहुणे.  त्यामुळे लहानांपासून  मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दिवाळीची आतुरता असायची.


या दिवाळीच्या निमित्ताने एक गोष्ट मला आठवली जी आता बरीच विस्मरणात गेली आहे, बऱ्याच  शाळांमध्ये बंद ही झाली आहे.  ती म्हणजे *दिवाळीचा अभ्यास*.   हा दिवाळीचा अभ्यास म्हणजे मोठी गंमत होती.


शेवटच्या पेपर च्या दिवशी किंवा जर परीक्षेनंतर एखाद दिवस शाळा असेल त्या दिवशी एक सायकलोस्टाइल पेपर वर्गातील  सगळ्या मुलांना वाटला जायचा. त्याच्या सुरुवातीला शुभ दीपावली असे लिहुन दोन बाजूला छोटे छोटे कंदील, किंवा पणत्या प्रिंट केलेल्या असायच्या. कधी कधी वेली सारखं नक्षीकाम केलेले असायचं.  तो पेपर आला की काही मुलांना आनंद व्हायचा,  तर काही मुलांची नाक मुरडायची, सुट्टीतही अभ्यास करावा लागणार म्हणून.


त्या कागदाला एक विशिष्ट प्रकारचा वास असायचा, त्या सायक्लोस्टाईल च्या शाई चा असावा. तो वासच आमच्या दिवाळीची सुरुवात असायची.


त्या पेपर वर तारखेनुसार त्या दिवशी काय अभ्यास करायचा ते लिहिलेलं असायचं.  म्हणजे उदाहरणार्थ दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ :  बे ते 10 चे पाढे लिहिणे. मराठीचे शुद्धलेखन पाच ओळी. 

दिवाळीचे चित्र काढणे.

दिनांक २३ ऑक्टोबर २०२२: बे ते १५ चे पाढे लिहिणे. मराठीचे शुद्धलेखन पाच ओळी. गोटीव कागदाचा कंदील बनवून चिकटवणे. त्या अभ्यासात फुले, पाने गोळा करून चिकटवणे. चित्रं काढणे, चित्र काढून त्यावर डाळी चिकटवणे , एखाद दुसरा निबंध. अशाप्रकारे प्रत्येक दिवसाचा अभ्यास हा लिहिलेला असायचा.  


तो अभ्यास करण्यासाठी नवीन वही ही घेतली जायची. कारण त्या कागदा वर लिहिलेलं असायचं की दिवाळीच्या अभ्यासासाठी नवीन वही करणे व ती सजवणे.  


ती वही आणायला जातानाही एक वेगळा उत्साह असायचा. कशी वही घ्यायची, कशी ती सजवायची याचे मनात चित्र रेखाटले जायचे. एकदा ती वही घरी आणली,  की अगदीं पहिल्या पानावर श्री लिहिला जायचा , मग नाव, इयता, शाळेचं नाव नेहमीप्रमाणे हे सगळे लिहीलं जायचे. आणि त्या नंतर मोठ्या दिमाखात *दिवाळीचा या अभ्यास*  असे  लिहिलं जायचे. मग वाटले तर एखादी पणती, कंदील ही रेखाटला जायचा. 


पाढे लिहिताना पट्टीने छान पैकी रेषा आखून घ्यायच्या. शुद्धलेखन लिहिताना आवडीच्या धड्यातले आवडते परिच्छेद लिहिले जायचे. सुरवातीचे दोन तीन दिवस अगदी उत्साह असायचा. रोज अगदी ना चुकता अभ्यास केला जायचा.


त्यानंतर साधारण सगळ्यांच्या परीक्षा संपून सगळी मित्र मंडळी मोकळी व्हायची. आणि मग खेळात बराच वेळ निघून जायचा. घरात  साफसफाई , फराळाचे पदार्थ याची तयारी सुरू व्हायची. नवीन कपड्यांची खरेदी, फटाके या सगळ्यांत त्या अभ्यासाच्या वहीच्या विसर पडलेला असायचा.  किंवा आज नाही करत पण उद्या नक्की दोन दिवसांचा अभ्यास करिन असे वचन देऊन , आजचे खेळाचे दान पदरी पडून घेतले जायचे. आणि नेहमीप्रमाणे उद्या कधी उजडायचा नाही.   हा अगदीच  कुणी अभ्यासू मुलांनी केला ही असेल पण त्याची शक्यता अगदीच कमी.


 दिवाळीचे चार दिवस कसे निघून जायचे कळायचे ही नाही. त्यानंतर भाऊबीजेच्या निमित्ताने आलेले पाहुणे घरी असायचे, मग तेव्हाही त्या वही चा विसर पडलेला असायचा.


हे सगळं झाल्यानंतर जशी सुट्टी संपायची वेळ जवळ यायची, तेव्हा अगदी प्रकर्षाने आठवण यायची या दिवाळीच्या अभ्यासाच्या वहीची. आणि मग व्हायची ती धावपळ.  आजचा अभ्यास उद्या करू म्हणणाऱ्या आम्हाला, आज उद्या काय तर परवा तेरवा आणि त्या आधीचा ही बऱ्याच दिवसांचा अभ्यास एकाच दिवशी करावा लागायचा. त्यात काही बनवायचं असेल तर त्या साठी लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठीची धावपळ. आणि नेहमीप्रमाणे घरातल्यां मोठ्या माणसांना लहान मुलांना ओरडायला अजून एक निमित्त मिळायचे.


मला आठवतं, आमची आशा मावशी मग दुपारी आमचं खेळणं बंद करून, आम्हाला तो अभ्यास पूर्ण करायला लावायची. त्याबरोबर पाठीत दोन धपाटे ही पडायचे. पण घाईगडबडीत ती वही पूर्ण करण्याची मजाही काही वेगळीच होती. ती वही पूर्ण झाल्यावर व्हायचीच असं नाही पण त्यातल्या त्यात  ९९ टक्के पूर्ण झाल्यावर त ती कोणी व कशी कशी सजवली आहे यावर मित्र-मैत्रिणींचा चर्चासत्र असायचं आणि कोणाला किती मार पडला याचंही.


ती वही पूर्ण करण्याची वेळ  आली की, जाणीव बाईची व्हायची ती दिवाळीची सुट्टी संपणार आहे याची आणि मग जास्त वाईट वाटायचे.... परंतु  ते वाईट वाटणे ही शाळेत जाई पर्यंतच असायचे. एकदा का शाळेत गेलं, मित्रमैत्रिणी भेटले , कुणी कुणी काय केलं, कुठं जाऊन आले हे बोलणं सुरू झाले की त्या वाईट वाटण्याचा विसर पडायचा.


पण काही म्हणा त्या दिवाळीच्या अभ्यासाची  वेगळीच गंमत असायची. आजही  त्या सायकलोस्टाइल पेपर चा वास नाकात जाणवतो.  त्या अभ्यासाची आठवण येते आणि वाटतं की पुन्हा एकदा तो अभ्यास अपूर्ण ठेवावा आणि त्यामुळे आपल्याला बोलणारी आपली  सगळी मंडळी आपल्या सोबत असावीत.... आणि पुन्हा एकदा ती जुनी दिवाळी साजरी व्हावी.



सौ. मिलन राणे - सप्रे🖋️




Friday, 8 July 2022

वडापाव

 *वडापाव*


वडापाव म्हणजे आपला सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. वडापाव हे नाव घेतलं की आपल्या तोंडाला पाणी सुटते.  सुटलं की नाही तोंडाला पाणी? 

खूप दिवस झाले,  सारखे आपले मी वडापाव चे फोटो टाकते आहे. आणि बऱ्याच दिवसात लिहायला काही सुचतच नव्हतं पण काल फोटो बघताना म्हटलं अरे!!! हा विषय आहेच की लिहायला.


बनवायला अगदी तसा सोपा उकडलेल्या बटाट्याची भाजी करायची, मग ती बेसनच्या पिठात घोळवून तेलात छान पैकी तळून काढायची. आणि मग एक पाव घेऊन त्याला छान लाल तिखट चटणी थोडीशी गोड चटणी लावून वडा घालून खायचा, इतका साधा सोपा वडापाव. पण तरीही गाडीवरचा वडापाव खाण्याची मजा काही औरच. 

 आम्हा मुंबईकरांसाठी तर वडापाव म्हणजे आद्य खाद्य असं म्हणायला हवं. कारण मला वाटतं मुंबई ८० ते ९० टक्के माणसं ही दिवसातून एकदा तरी वडापाव खात असतीलच.   एखादी व्यक्ती दिवसभर  अगदी उपाशी राहिला, काहीच खायला नाही मिळालं तरी, ती व्यक्ती दिवसभर एका वडापाव वर राहूच शकते.  


आपण जर कोणाच्या स्ट्रगल स्टोरीज ऐकला म्हणजे एखाद्या उद्योगपतीची किंवा जास्त करून एखाद्या सिनेसृष्टीत काम करणाऱ्या व्यक्तीची.  सिनेसृष्टीत काम करताना जे बाहेरून आलेत, किंवा जे इथेच असून सुरवातीच्या दिवसात काम मिळविण्यासाठी धडपडत होते.  अशी प्रत्येक व्यक्ती म्हणतेच,  की माझ्या सुरुवातीच्या दिवसात मी एक कटिंग चहा आणि एक वडापाव खाऊन दिवस काढलेले आहेत.  


बसचा प्रवास, वडापाव, रेल्वेचा प्रवास, हे म्हणजे मुंबईचा सर्वस्व आहे.  इथे येणारी अशी एकही व्यक्ती नसेल की जिने ट्रेन मधला प्रवास नसेल केला. ट्रेन, बस मधून प्रवास केला नाहीये आणि ज्या व्यक्तीने वडापाव खाल्लेला नाही अशी व्यक्ती मुंबईकर असणे कठीण.  मुंबईत राहून मुंबईचा वडापाव न खाणं म्हणजे एक पापच जणू. 

 तर असा हा वडापाव,  सगळ्या शहरात हा वडापाव फेमस आहे.  आता तर वडापाव अगदी दिल्ली काय तर  सातासमुद्रापारा पलिकडेही पोहोचला आहे, परंतु मुंबईत येऊन जर वडापाव खाल्ला नाही तर ती मुंबई ट्रीप पूर्ण होत नाही एवढे मात्र नक्की.


आता वडापाव ची स्टोरी ही बऱ्याच वेळा आपण व्हाट्सअप वर वगैरे वाचलेली, ऐकलेली आहे. वडापाव या खाद्याची  सुरुवात कुठून झाली,  त्याचा उगम कसा झाला.  पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं असतं ही आपल्या शहरात कुठला वडापाव जास्त फेमस आहे.  प्रत्येक ठिकाणी असं असतं की  हा वडापाव म्हणजे जगात भारी;  असा वडापाव दुसरीकडे मिळणार नाही.  हे वाक्य प्रत्येक शहरातला माणूस आपल्या शहरातल्या वडापावच्या टपरी बद्दल बोलत असतो. 


आमच्या चेंबूरचा ४२ चा वडापाव  म्हणजे ४२ नंबर बिल्डिंगच्या जवळ गाडी लागलेली असते म्हणून ४२चा वडापाव ( खरं नाव अनिलचा वडापाव).  विरारला बेस्ट प्रकाश वडापाव फेमस, बोरिवली चा मंगेश वडापाव फेमस आहे.  अरे, अमुक इकडचा वडापाव हा जगात भारी हे वाक्य  म्हणजे आपण जर एखाद्या  शहरात गेलो कि तिकडची लोक सांगतात की आलेच आहात  तिकडचा वडापाव एकदम भारी असतो, खाऊन जा.  म्हणजे तो वडापाव हा त्यांच्यासाठी अगदी म्हणजे हायक्लास असतो.  दुसरीकडचा वाईट असतो असं नाही . आणि गंमत म्हणजे  आपणही अगदी चवीने तो वडापाव खातो वगैरे, अगदी त्यांच्यासमोर सांगतो ही की अगदी मस्त वडापाव आहे.  पण तरीही  तिथून बाहेर पडल्यावर नक्कीच म्हणतो की आमच्याकडच्या वडापावची सर नाही या वडापावला.  असं  हे प्रत्येक जण करतो, म्हणजे आता मनातल्या मनात सगळे हसत असतील पण हे खरं आहे. 


वडापाव खाणे म्हणजे सुख आहे आणि   मुंबईच्या बाहेर जाऊनही चविष्ट वडापाव खायला मिळणं म्हणजे म्हणजे दुप्पट सुख. आम्ही गावी जातों तेव्हा खारेपाटण चा वडापाव आमच्या तराळ्यातला गगनगिरी वडापाव म्हणजर एकदम खासच.


मला आठवतो तेव्हा या वडापावची किंमत अगदी  काहीतरी सव्वा-दीड रुपया होती.  यावरून अगदी दोन ते चार रुपये वडापाव झाला होता. त्यावेळेस अगदी रुपया सव्वा रुपया इतके ही पैसे नसायचे. अगदीच कोणी पाहुणे आले आणि त्यांनी काही हातावर पैसे टेकवले तर त्याचा वडापाव खायचा. अगदीच वडापाव खायचा नसेल तर आमच्या बेचाळीसच्या वडापाववाल्याकडे (अर्थात त्याच्याकडे असं नाही सगळ्याच वडापाववाल्यांकडे) चुरापाव  मिळत असेल.  म्हणजे वडे तळल्यानंतर उरतो तो चुरा पावाला  गोड चटणी तिखट चटणी त्यात घालून दिला जातो तो चुरापाव. आम्ही खायचो त्या वेळेला तो चार आणे होता आणि नंतर तो आठ आणे झाला.  वडापाव खायला दिलेले पैसे चार वेळा चुरापाव खाऊन होईल म्हणून वडापाव खायचा ही टाळलं आहे. कधीतरी कोणी अगदीच  जर पार्टी दिली तर तो फुकटचा वडापाव खाण्याची मजा काही औरच आणि वाचवलेल्या पैशात चुरापाव.


वडापावच्या बाबतीतची एक गमतीदार आठवण आहे चेंबूरची. आमच्याकडे गणपती असायचे पाच दिवसाचे. गणपती  विसर्जनाला जाताना प्रत्येकाची धडपड असायची गणपतीच्या रिक्षातून जायची.   पण येताना मात्र आम्ही अनंतमामा ज्या रिक्षात असेल त्या रिक्षात बसायला धडपडायचो, कारण येताना अनंतमामा त्याच्या रिक्षात असणाऱ्या प्रत्येकाला वडापाव द्यायचा. अर्थात सुरुवातीला फक्त त्याच्या रिक्षात असणाऱ्या लोकांना मिळायचा.  पण काही लहान मुलांनी चुगली  केल्या नंतर मात्र मग तो सगळ्यांसाठी आणला जायचा. पण तरीही तिकडे गाडीवर उभं राहून गरम-गरम वडापाव खाण्याची जी मजा होती, ती घरी पार्सल करून आणलेल्या वडापावला येत नाही. यावरून बाकीच्यांना चिडवायला जरा मजा यायची त्यामुळे त्यावेळेला  त्या रिक्षात बसायला आमची धावपळ असायची.


खरंच असं कधी कधी वाटतं की आमची पिढी तशी खूप कमी खर्च करणारी आहे. आम्हाला वडापाव, पाणीपुरी याच्यावर भागायचं.  अगदी तुमचं स्टारबक्स मॅकडोनल्ड या गोष्टी आम्हाला नकोच असे नाही किंवा हव्या असे ही नाही.  चार मित्र मैत्रिणी असले आणि वडापाव किंवा शेव पुरी पाणीपुरी समोर असली खायला,  तरी तेवढी पार्टी ही  आमच्यासाठी पुरेशी असते 


मी जेव्हा चेंबूरला राहायचे, त्या वेळेला मी आणि माझी मैत्रीण आम्ही बऱ्याच वेळा वडापाव किंवा चुरापाव खायला जायचो.  म्हणजे जर  दोघींकडे पैसे असतील तरच खायला जायचो.  मग आम्ही दोघी जाणार तर काहीतरी कारण काढायचं की असंच फिरायला जातोय , जरा राऊंड मारून येतो. किंवा आमच्या बिल्डिंग मधली मोठी मुलं जायची वडापाव खायला, तेव्हा मग त्यांच्या बरोबर कोणालातरी दोन लहान मुलांना घेऊन जायचे त्यात कधीतरी नशिबानं नंबर लागला तर.   कोणी पाहुणे आले  की घरातली वडीलधारी माणसे सांगायची, जा तिकडचा वडापाव घेऊन ये.  मग वडापाव घेऊन येणार त्यालाही एक वडापाव मिळायचा,  त्यामुळे एवढ्या लांब वडापाव आणायला जाण्यासाठीही आमची चढाओढ असायची.  की तू जाणार की मी जाणार. 


बेचाळीसच्या  वडापावची चव अजूनही जिभेवर तशीच रेंगाळते  आहे. त्या वडापावच्या गाडीवर कितीतरी आठवणी आहेत.  तिकडे वडापाव खायला गेल्यावर  खूप गर्दी असली की थांबावं लागायचे मग कुणीतरी ओळखीचे भेटले की गप्पा,  किंवा काहीतरी गुपित सांगायचे म्हणून ही स्पेशल वडापाव पार्टी. तेव्हा असे कॉफी शॉप नव्हतें ना तास तास बसायला देणारे.  वडापावच्या गाडीवर गेल्यावर लपून-छपून वडापाव खायची मजा काही वेगळीच होती.  काहीतरी कारण खोटं सांगून आलेले असलो की मग कोणीतरी बघेल म्हणून अगदी त्या गाडीच्या मागे जाऊन पाठ करून वडापाव खाल्ला जायचा.  अर्थात असे हे सगळ्यांनीच केलं असेलच. आता या सगळ्याचा हसू येतंय पण या त्यावेळच्या गोष्टीची मजा काही वेगळीच होती.

होते असे एक खाऊन पोट भरतच नाही, कमीत कमी दोन हवे. तर कुठे जरा पोटातला वणवा  शांत होतो.  असतात काही असे लोक म्हणजे एक तर प्रकृतीची जरा जास्तच काळजी घेणारे किंवा डायबेटीस पेशंट किंवा अगदीच नाही तर ज्यांना ॲसिडीटी खूप होते  म्हणून एका वडापाव धन्यता मानणारे.  


पाऊस पडायला लागला की बटाटा भजी, कांदा भजी हा बेस्ट ऑप्शन असतो. वडापाव ला तोड नाही. बाहेरचे खायचं नाही म्हणून बऱ्याच दिवसांत वडापाव खाल्ला गेला नाही तर घरी तरी वडापाव कर आशु भुणभुण  मागे लागते. पण जरी घरी किती वडापाव खाल्ला तरी गाडीवरच्या वडापावचे समाधान घरच्या वडापावला येत नाही. वडापाव  तळलेली मिरची खाणारे ही आहेत.  म्हणजे जेवढा वडापाव आवडीने खातात तेवढ्याच आवडीने ते तळलेली मिरची ही खातात.  वडापाव,  मिरची आणि सोबत गरमागरम कटिंग चहा काय सुटलं ना तोंडाला पाणी???


वडापाव खाणे हा एक अध्यात्मिक आनंद आहे असं प्रत्येक मुंबईकराला वाटत असेल. अर्थात वडापाव न आवडणारी माणसे ही कदाचित असतील पण माझ्या लेखी अशा माणसांना गाढवाची गाढवाला गुळाची चव काय असं म्हणायला हरकत नाही. असा हा तुमचाआमचा सगळ्यांचा जिवाभावाचा वडापाव.


 अर्थात तुमच्या शहरात एखादा वडापाव फेमस असेलच ना तर त्याच्या बद्दल ची  एखादी गोष्ट मला कमेंट मध्ये लिहून पाठवा तेवढीच आठवणींची उजळणी.  किंवा तुमच्या इकडच्या वडापाववाल्याचं  नाव तरी लिहून पाठवा, म्हणजे  समजा कधी आलो तुमच्या शहरात तर निदान तिकडचा वडापाव तरी खाता येईल.


 *सौ. मिलन राणे - सप्रे*🖋️











Sunday, 11 October 2020

एक अविस्मरणीय भेट विस्मरणात गेलेली

 

खरेतर तसे आमच्याकडे तशी नाटक पाहायची  जास्त आवड नव्हती. आणि चेंबूर ला सहकार थिएटर अगदी जवळ असल्यामुळे तिथे सिनेमा पाहायला जाणे अगदीच सोयीचे पडायचे. काही मोजकी नाटके सोडली तर बाकीचा उल्लेखही घरात होत नसे. 

मी माझ्या अंकुश चौधरी च्या ब्लॉग मध्ये लिहिले आहे कि मी पाहिलेले पहिले नाटक " ऑल द बेस्ट ". हा ते अगदी नाट्यगृहात जाऊन पाहिलेले  ते  पहिले नाटक. त्याकाळी सोशल मीडिया चा इतका सुळसुळाट नव्हता , त्यामुळे कलाकारांना असे सहज भेटणे वगैरे शक्य नव्हते. आणि त्यावेळी ते इतके लक्षात हि यायचे नाही. 

 पण ते नाटक पाहायला गेलो होतो तेव्हा बाहेर एक व्यक्ती लिंबू रंगाचा टी शर्ट आणि जीन्सची पॅन्ट घालून अगदी बाजूला उभी होती. ती व्यक्ती मला बरीच ओळखीची वाटत होती पण कुठे पहिले आहे ते आठवत नव्हते. पण नाटक पाहताना जेव्हा श्रेयनामावली वाचली गेली त्यात ते नाव आल्यावर लक्षात आले ती व्यक्ती होती " महेश मांजरेकर". 

त्यादिवशी यूट्यूब वर एक नाटक बघताना मला आठवले कि मी पहिले पाहिलेले नाटक हे वेगळेच आहे. आणि तो प्रसंग आठवला आणि असे झाले कि मी कशी काय विसरू शकले इतका अविस्मरणीय    क्षण .आम्ही तेव्हा नुकतेच विरार ला राहायला आलो होतो. सगळेच नवीन होते. आई कधीतरी विक्रोळीला मोठ्या मावशीकडे जात असे. त्यावेळी ती तिथून आली होती. मोठ्या मावशीची मैत्रीण साधना ऑंटी त्यावेळी नाटकातून कामे करत असे. आई विक्रोळीला असताना साधना ऑंटी तिला भेटली होती, त्यावेळी ती करत असलेल्या नाटकाचा प्रयोग विरार ला कुठल्यातरी गावात होणार होता म्हणून तिने आईला त्याचे आमंत्रण दिले. 

प्रयोग होता रात्रीचा त्यात गावात विरार हुन लांब, त्यामुळे आधी जाऊया कि नको इथून सुरवात होती. मग एकदाचे जायचे ठरले. विरार हुन एस टी ने गेलो मग पुढे बरेच चालत त्या गावात पोहोचलो. तेव्हा  स्पेशल रिक्षा चे पीक आले नव्हते आणि थोड्या प्रमाणात होते ते खिशाला परवडणारे नव्हते. 

तिथे गेल्यावर आम्ही आधी साधना ऑंटी ला भेटलो , तिने सांगितले कितीही उशीर झाला तरी नाटक पूर्ण बघून जा. आणि संपल्यावर या भेटायला सांगा कसे वाटले नाटक आणि बाकीच्या कलाकारांशी भेट होईल. आम्ही ते नाटक पूर्ण पहिले. अर्थातच नुसते तिने सांगितले म्हणून नाही तर ते नाटक अर्धवट सोडून जाण्यासारखे अजिबातच नव्हते. कधी नाटक संपले कळलेच नाही. 

नाटक संपल्यावर आम्ही ऑंटीने सांगितल्याप्रमाणे तिला भेटायला गेलो. ते कुणाचे तरी घर होते. आपले आटपून बाकीचे कलाकारही तिथे चहापानासाठी बसले होते. त्या घरातली काही मंडळी, गावातली काही मान्यवर आणि आम्ही आई, मी आणि माझी दोन भावंडे असे तिथे होतो. साधना ऑंटी ने आमची जुजबी ओळख करून दिली. ऑंटीला सांगितले खूप छान आहे नाटक. त्या आजोबांना आणि काकांना नमस्कार केला. आणि तिथून निघालो. ते आजोबा खूप छान दिसत होते.प्रसंग इथेच संपला . 

 

पण खरी मेख तर पुढे आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल त्यात काय साधा तर प्रसंग आहे. हो प्रसंग अगदीच साधा आहे पण ते नाटक हि साधे नव्हते आणि ते काका आणि आजोबा हि.  ते नाटक होते "नटसम्राट" आणि ज्या काकांना मी नमस्कार केला ते होते "शरद पोंक्षे" आणि ज्या खूप छान आजोबांना मी नमस्कार केला ते आजोबा होते दस्तुरखुद्द "श्री. प्रभाकर पणशीकर". 

आज हा प्रसंग लिहिताना आपसुखच डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 



Friday, 9 October 2020

चित्रे काका आणि जो अंकल (काही आठवणी चेंबूरच्या)



रूम नंबर. ९९७ , बिल्डींग नो.२८, श्री गुरुदत्त को ऑप हौ सो , टिळकनगर, चेंबूर हा पत्ता अजून जसाच्या तास पाठ आहे, आता तिथे राहत नसलेल्या प्रत्येकाला पाठ असेल. आमचं बालपण जिथे गेले ती वास्तू. खूप आठवणी आहेत त्या बिल्डींगच्या. आमची बिल्डिंग नंबर २८ म्हणजे ३६ बिऱ्हाडांचे एक छोटे कुटुंब.

त्यातल्याच काही लोकांशी निगडित आठवणी मी एक एक करून उलगडणार आहे. 


आज भेटूया त्यातल्या दोन व्यक्तींना ज्या मला नेहमीच आदरस्थानी राहिल्या. एक थोड्या धाकामुळे तर दुसरी व्यक्ती त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे. खरे तर दोघांमध्ये तसे साम्य काहीच नाही. हा एकच साम्य दोघे ही बाहेर उभे राहून सिगारेट ओढत. 


त्यातली पहिली व्यक्ती म्हणजे मधुसूदन चित्रे उर्फ चित्रे काका उर्फ आमचे दादा आणि दुसरे जोसेफ डिसिल्वा म्हणजे आमचे जो अंकल.


आधी आपण चित्रे काकांविषयी बोलू. अतिशय शांत (म्हणजे मला तसेच आठवतात). अगदी गोरेपान, उंच आणि दिसायला छान. त्यांना पाहिले की  बऱ्याचवेळा हिंदी सिनेमातल्या खलनायक ( ते त्याच्या अगदी उलट होते ) साकारणाऱ्या अजित यांची आठवण यायची . पांढरा शुभ्र लेंगा आणि बनियन असे घरात आणि बाहेर जाताना लाईट रंगाचे शर्ट असा त्यांचा पेहेराव असे. दादा म्हणजे कमी बोलणारे तरी दिलखुलास व्यक्तिमत्व. मला पुसटसे आठवतेय ते कधीतरी आम्हाला नकला ही करून दाखवायचे. एकावेळी तीन चेंडू हातात घेऊन ते उडवून पकडायचा जो खेळ असतो तो हि प्रत्यक्षात  दादांकडून पाहायला मिळाला होता.


बरेच वर्षे दादा आमच्या बिल्डिंग नं २८ चे सेक्रेटरी होते. मीटिंग च्या वेळीच काय ते मी दादांना रागावलेले पाहिले असेल ते ही तेवढ्याच वेळा पुरता. इतर वेळी कधी दादांना रागावलेले मी कधी पाहिलेले मला तरी आठवत नाही.  आणि त्यांच्या मुलींतर इतक्या गुणी की त्यांना रागावायचा प्रश्नच नाही😁. 


चित्रे काका स्वभावाने खूप प्रेमळ. मला आठवतंय त्यांच्या मेहुण्याचा मुलगा म्हणजे डोंबिवली च्या मामांचा मुलगा अजय (अजू) आणि माझा भाऊ अमोल या दोघांना नेहमी ती पिच्चर ला जायला पैसे द्यायचे. सोसायटीच्या प्रत्येक मीटिंग नंतर मिनिट्स लिहायला लागतात. चित्रे काका ते मिनिट्स माझ्याकडून किंवा कधीतरी उमा कडून लिहून घेत, ते मिनिट्स लिहायला पण छान वाटायचे, कारण दादा कधी सांगायला घाई घाई करत नसत, अगदी सावकाशपणे ते सांगत पुन्हा पुन्हा वाचून घेत. शक्यतों एकही चूक होत नसे त्यांच्या सांगण्यात त्यामुळे माझ्या लिहिण्यात. आणि मला प्रत्येक पानामागे काही पैसे देत . ते पैसे कमवून (आमची पाहिली कमाई) माझी सुट्टीतल्या वडापाव ची सोय व्हायची. आणि हे पैसे चित्रे काका नेहमी त्यांच्या खिशातून देत. तास दीड तासाचा हा कार्यक्रम चाले पण एरवी एका जागी बसायला कंटाळणारे आम्ही अगदी एकाग्रतेने हे काम करतं असू. दादांनी बोलावले म्हटले की मला तर फार आनंद होत असे कारण त्यांनी बोलावले म्हणजे काहीतरी मिळणारच याची शाश्वती असे, त्यामुळे ज्या कुणाला ते आवाज देत ते पटकन जात असत. 


चित्रे काका पनामा सिगारेट ओढायचे. कधीतरी आम्हाला ते आणायला पाठवायचे (तेव्हा आपले परके नव्हते) तेव्हा ही ५-१०पैसे आमची बक्षिसी असायची. दादांची एक लाकडी आराम खुर्ची होती. हो दादांचीच कारण त्यांच्याशिवाय कुणीच त्या खुर्चीवर बसायचे नाही. मला त्या खुर्चीवर बसायला खूप आवडायचे. त्या खुर्चीवर बसले की मस्त आराम वाटायचा एकदम झोप यायला लागायची. पण काकींच्या धाकामुळे फार कमी वेळा बसायचे. चित्रे काकींच्या घरात एक खायच्या सुपारीचा (मुखवासचा)एक डब्बा होता. ती सुपारीही मला खूप आवडायची. ती जास्त खायची नसते तरी ती थोडी थोडी करून गुपचूप खायचो. दादा काकी आत असल्या की सांगायचे खा म्हणून ....एक दोनदा काकीनी आमची ही चोरी पकडली होती. आणि माझ्या सोबत दादांना पण रागावल्या होत्या. पण तेव्हढ्यापुरता परत थोड्या दिवसांनी तेच पुन्हा.


दादांनी त्यांच्या दोन मुलींसारखे माझे ही लाड केले. ताईच्या लग्नानंतर तिच्या सासरी मुलुंडला कधी ही जायचे असले की ते मला घेऊन जायचे. काका काकी आणि मी आम्ही टॅक्सीतून जायचो. दादांकडे खायची ही मौज असायची. चित्रे काकींच्या भावाची दोन्ही मुले संजय आणि अजय म्हणजे संजू अजू सुट्टीत राहायला येत. त्यावेळी त्यांच्यासोबत आम्हालाही वडापाव ची पार्टी मिळायची.


दादांचा स्वभाव त्यांच्या दोन्ही मुलींमध्ये पुरेपूर उतरला आहे.
दुर्दैवाने दादांच्या अंत्यदर्शनासाठी नाही जाता आले. पण त्यांच्या आठवणी मात्र नेहमी आमच्या सोबत राहतील.

दुसरे आमचे जो अंकल. जो अंकल दिसायला एकदम कडक. त्यांच्या मिशा बघूनच भिती वाटायची. त्यांना पाहून ते सेनेत आहेत असेच वाटायचे. तसे ते शिस्तीचे कडकच होते. जो अंकल सोबतच्या तशा आठवणी फार नाहीत कारण एक तर ते नोकरी करायचे त्यामुळे फक्त रविवारी घरी, किंवा सणासुदीला आणि मुख्य कारण त्यांच्या बद्दलची आदरयुक्त भीती ज्याने त्यांच्याशी बोलायला जाणे कमीच व्हायचे.

जो अंकल बारीक, उंच आणि सावळे. घरात असताना ते नेहमी हाफ पॅन्ट मध्ये असत. बाहेर सिगारेट ओढत असताना त्यांची ती टिपिकल पॅन्ट आणि वर उघडे असे ते त्या कट्ट्याला रेलून उभे राहत. त्यांची उभे राहण्याची हि एक वेगळी स्टाईल होती. एक हात दुमडून कट्ट्यावर ठेवत ( आता सारखे कुणी आले म्हणून पुरुषाने पटकन शर्ट चढवावे , असा अलिखित रिवाज तेव्हा नव्हता). जो अंकल फोर स्केअर सिगारेट ओढत असत. 


जो अंकलच्या आवाजात ही एक वेगळी जरब होती. आम्ही जेव्हा संध्याकाळी मैदानात खेळत असायचो, बरोबर ७ वाजता जो अंकल आवाज द्यायचे ब्रायना की आहे तो खेळ तिथेच टाकून ब्रायन , बॉंनी काय तर आम्ही सगळेच घरी धूम ठोकायचो. अंकलला येताना पाहिले की आधीच बोंबाबोंब व्हायची कारण बॉंनी शांत होता पण ब्रायन आमचा खूप मस्तीखोर. कधी मारामारी, आरडाओरडा सुरू असायचा. मग डॅड आले ही धोक्याची सूचना द्यायचो. जेणेकरून सगळे शांत व्हायचे. बिलिंडा, बॉनी आणि ब्रायन तिघांनीही अंकलच्या हाताचा मार खाल्ला आहे. पण बिलिंडा ने जरा कमी. आणि ब्रायन ने जरा जास्त. बॉनी गुणी मुलगा होता. पण  परीक्षेच्या निकालाच्या दिवशी मात्र तिघांचीही घाबरगुंडी उडालेली असे. त्यादिवशी त्यांच्या घरून मारल्याचा आणि रडल्याचा दोन्ही आवाज येत. (अर्थात सगळ्यांच्या घरी सारखीच स्थिती).

 रविवारी चर्च  जाताना जो अंकल अगदी सुटाबुटात असायचे. तेव्हा ते अगदी वेगळे दिसायचे. त्यात त्यांचा रुबाब काही निराळाच असायचा. जो अंकलमुळे एक चांगली सवय लागली आहे. सकाळी गुडमॉर्निंग करयाची. सकाळी कधी दुकानात जाताना ते बाहेर असले आणि आपण असेच पुढे गेलो कि ते स्वतःहून गुडमॉर्निंग असे म्हणायचे, मग हळू हळू सवय झाली ते दिसले कि आपसूखच गुडमॉर्निंग अंकल असे निघून जायचे.

जो अंकलपेक्षा लीना ऑंटी जास्त कडक स्वभावाची होती. पण अंकल ची भीती जास्त वाटायची. एक गोष्ट मात्र खरी कि जो अंकल ला उगाच रागवताना मी कधीच पहिले नाही. जो अंकलची एक गोष्ट खूप चांगली होती ते सगळ्यांवर सारखेच प्रेम करत. मग ती त्यांची बहीण मेरी ऑंटी असो किंवा त्यांची मेहुणी बेटू ऑंटी असो. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांसारखं अजून एका मुलीवर आपल्या मुलांसारखे प्रेम केले ती म्हणजे रचना ची बहीण चिंकूली. जो अंकल तिच्यासोबत एखाद्या लहानमुलांसारखे रमून जायचे. जो अंकलचे एक वेगळे रूप त्या निमित्ताने आम्हाला बघायला मिळाले होते. 

अंकल जितके कडक दिसत तितके ते प्रेमळही होते. याचा प्रत्यय दिवाळीच्या वेळी येत असे. आम्ही जेव्हा फटाके फोडायला खाली येत असू. प्रत्येकाची एक पिशवी असे ज्यात आपापल्या वाटणीचे फटाके असत. कधी कधी आमचे फटाके लवकर संपत . ते नेहमी बाहेरच असत मग ते ब्रायन ला त्याच्या वाटणीचे फटाके आम्हाला द्यायला सांगत असत. त्यांच्या धाकामुळे नाही पण ब्रायन नेहमीच त्याचे फटाके आम्हाला देत असे.

 
माझी आजी १९९४ ला गेली. आजी पहाटेच गेली , आमच्या शेजारी विरार ला एकमेव फोन होता तो ही त्यादिवशी लागला नाही. म्हणून जो अंकल चेंबूरहुन विरार ला आले आजी गेल्याचा निरोप द्यायला. त्यावर्षी आजी गेली म्हणून ख्रिसमसच्या दिवशी त्यांनी फटाकेही फोडले नव्हते. कारण तेव्हा आजीला जाऊन फक्त १० दिवसच झाले होते. तेव्हापासून  जो अंकल बद्दलची आदरयुक्त भीती जाऊन फक्त आदर राहिला.

जो अंकल खूप लवकर आणि अचानक गेले त्यांच्या ही दर्शनाला जाता नाही आले हे दुर्दैव. अर्थात त्यांच्या ही आठवणी सोबत आहेतच आणि आमचा बॉनी आता बराचसा जो अंकल सारखा दिसतो. त्यामुळे त्याला पहिले कि सतत त्यांची आठवण येते.


Tuesday, 28 July 2020

संवाद मेकअप बॉक्स मधला

लॉकडाऊनच्या काळात सगळेच घरात बसून कंटाळलेत. अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळे काळात सगळेच घरात बसून कंटाळलेत. अगदी लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळे. ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे ते ही सुरवातीला जरा बरे वाटत होते पण आता ते ही नकोस झालेय. 


तसेच आपल्या वस्तू ही कंटाळल्या असतील ना. म्हणजे एखाद्या  स्त्रीच्या कपाटातील कपडे, तिची सौंदर्य प्रसाधने ते ही कंटाळले असतील ना साधारण काय संवाद असेल बरे त्यांचा....चला जरा गंमत करूया....


लिपस्टिक: किती दिवस झाले, साधे झाकण ही उघडले नाही. गुदमरायला झाले...तरी ह्या गुलाबीचे बरे...रंग फिका म्हणून निदान जरा तरी बाहेर काढली जाते. आम्ही मेले डार्क म्हणून ...आतच


पावडर: हो ना....कधीतरी काढते बाई मला बाहेर ...इतके हायसे वाटते, मोकळ्या हवेत.


काजळ: हं....हल्ली संगणकावर काम करते म्हणून मला मात्र जास्त भाव मिळायला लागला आहे. डोळ्यांना गारवा मिळावा म्हणून सारखी बाहेर काढते आणि तशीच बाहेर ठेवते. किती धूळ ती....मला त्रास होतो.


तेल: हो...ना तुझी जी गत तीच माझी, आधी आठवड्यातून एकदाच माझी आठवण व्हायची, आता मात्र वरचेवर येते हो...


मस्कारा, ब्लश, आईशाडो: (एकसुरात)... आम्हाला तर पूर्णच विसरून गेली आहे...


नवीन कपडे: आमची ही काही वेगळी व्यथा नाही. (पायजमा मध्येच) अरे!! निदान शर्ट, टॉप यांना त्या ऑनलाईन मीटिंगच्या निमित्ताने घातले जाते. आम्ही ...तर कधीतरीच...ह्या शॉर्टस चे बरे त्यांनाही वाव आहे. ( मध्येच साडी) हो की नाही. मलाही फक्त काही व्हिडिओ कॉल च्या वेळी काढलं तर काढलं नाहीतर हा पंजाबी ड्रेस आहेच माझी जागा घ्यायला. बघू आता सणांच्या निमित्ताने तरी बाहेर येतोय का?


नेलपेंट: अरे....ह्या कोरोना मुळे नखं वाढवायला भीती, आणि सारखे हाथ धुवायचे मग मी तर दूरच. किती सुकलोय मी...आता थोडया दिवसाने केराच्या टोपलीत जागा( मोठ्याने रडायला लागते)


आयलाईनर: अरे रडू नको. माझे ही तसेच आहे ना मला ही भीती वाटते कधी बाहेरचा रस्ता कधी दाखवेल सांगू शकत नाही.


बांगड्या, गळ्यातल्या माळा: तुमची तर आठवण तरी आहे ....आम्ही तर बॉक्स मधेच. आठवण पण नाही होत आमची. साडी आपण सम दुःखी आहोत.


टिकली: हो ना...ह्या लॉक डाऊन मुळे सगळे  घरी ....जास्त वेळ स्वयंपाकघरात ...सणवार ही घरात...त्यामुळे मला ही विसरत चालली ही.


कानातले झुमके: आधी माझ्याशिवाय पण हलायचे नाही बाईचे. मी जिथं दिसेन तिथून उचलून आणायची. फक्त कानातले घालायचे बाकी काही ओरनामेण्ट नको असा ट्रेंड आहे म्हणे.. किती भाव वधारला होता माझा . पण आता (रडत) गेले ते दिन गेले.  आता नुसती लंकेची पार्वती बनून राहते.


पर्स: एरवी माझ्यावर ओझे असायचे सगळे. आता आल्यावर सगळे सॅनिटाईज करायला नको म्हणून छोटं पाकीट सोबत. खरंतर खूप दिवसांनी हलके हलके वाटतंय पण हा एकटेपणा नको झालाय आता. पाण्याची बाटली, रुमाल, भाजी , तुम्ही सगळं ....खूप मिस करतेय मी. कधी तिच्या हातात मिरवेन असे झालेय.

लिपस्टिक: (वैतागून) ह्या मास्कमुळे आमची किंमत अजून डाऊन.... ह्या मास्क ला जास्त महत्व आले ना आता. 


मास्क: का असे रागावला आहेत सगळे.... मी रक्षणकर्ता आहे सध्या. मला तर वाटते की जितकं लवकर माझे महत्व कमी होईल तेवढे बरे.. मला ही तुम्हा सगळ्यांना आनंदाने हसता खेळताना बघायचे आहे  सगळयांना बाहेर फिरताना बघायचे आहे. मजा  करताना बघायचे आहे. तेव्हा सगळे मिळून देवाची प्रार्थना करू या.



सगळे मिळून: हे देवा, गणपतीबाप्पा तू आता येतो आहेस ना. प्लीज ह्या कोरोनाचा लवकरात लवकर संहार कर. आणि आमचे आयुष्य परत पूर्वीसारखे कर. स्वैर नाही , समाधानी कर...(गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया)

Wednesday, 25 March 2020

टोपण नाव

विषय वाचूनच उत्सुकता वाढली असेल प्रत्येकाची ... कारण हा विषय आपल्या सगळ्यांचा लाडका विषय आहे हो कि नाही ? काही दिवसांपूर्वी एक मालिका बघत असताना त्यात विषय होता " टोपण नाव" ... तो भाग बघता बघता सगळीच टोपण नावे आठवली आणि गम्मत वाटली.

टोपण नाव किंवा लाडाचे नाव ... हि एक सोय असते लांबलचक नाव घेण्यापेक्षा छोटेसे नाव दिले जाते, किंवा घरात लाडाने बोलले जाते. पण हेच नाव कधी कधी त्या व्यक्तीची ओळख बनते. आपल्या प्रत्येकालाच एक टोपणनाव असते. कधी घरच्यांनी दिलेले, तर कधी मित्रमैत्रिणींनी तर कधी कधी आपल्या शिक्षकांनी दिलेले.

अर्थात प्रत्येक जण कुणाला ना कुणाला नावं ठेवतच असतो पण टोपणनाव हि आपण प्रत्येकजण देतोच कुणा ना कुणाला.

खरी गम्मत असते ती कोकणात. इथे कुणाला सरळ नावाने हाक मारलीच जात नाही. अर्थात बरेसचे हे नावाचे अपभ्रंश हि असतात.प्रभाकर चे परब्या , बबन चे बबन्या , सुनील चे सुनग्या . कोकणात तुम्हाला एकही माणूस शोधून सापडणार नाही ज्याला टोपण नाव नाही. एखाद्याचे खरे नाव म्हणजे कागदोपत्री नाव शोधणे हा एक पी एच डी चा विषय होऊ शकतो . 

आता बंटी हे नाव ऐकले कि अगदी दोन अडीच वर्षाच्या मुलापासून अगदी पन्नाशीतला माणूस असे सगळेच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. तसेच गुड्डी नावाचे हि आहे आमच्याकडची एक गुड्डी एका बाळाची आई आहे तर एक लग्नाला आलीय तरी अजून गुड्डीच. पूर्वी बंड्या, बाळा, बाबा,बाबू,  सोनू , गुड्डी,बेबी,  बाय हि नावं अगदी हमखास वापरली जायची. प्रत्येक घरात या नावाची किमान एक तरी व्यक्ती असतेच. बेबी मावशी किंवा बेबी आत्या हि हवीच ... आमच्या घरात हि एक आहेच कि. बंड्या हे नाव तर खूपच वापरले जायचे. पूर्वी चाळीत इतकी कुटुंब असायची त्यात अशा नावांची अगदी रेलचेल असायची. .... आमच्या कडे तीन बाळा मामा आहेत, तर एक बाळा दादा ....मग त्यातही उपभाग आहेत बरे का ...   म्हणजे  पनवेल ला राहतो तो पनवेल चा बाळा मामा, बॉम्बेसेन्ट्रल चा वेगळा आणि गोरेगावचा वेगळा. म्हंजे एकापेक्षा जास्त व्यक्तींची सारखी टोपण नावे असली कि त्या टोपणनावापुढे अजून एक उपनाम लागतेच.

मोठ्या भावाला दादा आणि मोठ्या बहिणीला ताई किंवा आक्का म्हटले जाते... आणि मग आयुष्यभर हीच त्याची ओळख होते. दादा काका किंवा मामा, ताई मावशी, आक्का मावशी  किंवा आत्या. हेच प्रचलित होऊन जाते. आपल्या वडिलांना बाबांऐवजी अण्णा, दादा म्हणतोच पण त्याही पलीकडे जाऊन बाबांच्या अपरोक्ष त्यांना डॉन, किंवा गब्बर म्हणणारी अनेक जण असतात. बघा सगळे कसे  मनातल्या मनात हसले. 

टोपण नावाची गम्मत पण बघा कशी म्हंजे इथे नवरा नवरी बोहल्यावर उभे आहेत आणि कुणीतरी अरे छोटू मान करून बघू नकोस, किंवा गुड्डी  आता नीट संसार करायचा हा...  असे म्हणतात .... त्यावेळी अख्ख्या  मंडपात हशा पिकतो. बऱ्याच वेळा मुलं मोठी झाली कि त्यांना अशा टोपणनावाने हाक मारलेली नाही आवडत . पण घरातल्यानंच काय, तर मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी सगळ्यांनाच त्या टोपण नावाची सवय झालेली असते. अगदी रस्त्यात भेटणारी माणसे हि गर्दीत जेव्हा त्या नावाने हाक मारतात तेव्हा कावरेबावरे व्हायला होते. लग्नानंतरहि घरच्या नावाने हाक मारली कि त्या नवरदेवाची बायको समोर अशी अवस्था होते आणि त्यात घरची मंडळी अजूनच चिडवायला मोकळी होतात. 

हे टोपणनाव अगदी कशावरूनही पडू शकते अगदी नावाच्या अपभ्रंशापासून, एखादाच्या सवयीवरून, कुणाच्या आडनावावरून, तर अगदी कुणाच्या वडिलांच्या नावावरूनही. आता आमची एक मैत्रीण आहे तिने नाव आणि बाबांचे नाव यांचे पहिले अक्षर घेऊन आम्ही तिला टोपण नाव दिले " मका" . 

हे टोपण नाव कुणालाही चुकलेले नाहीये अगदी श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत , तर जन्मलेल्या बाळापासून म्हाताऱ्यांपर्यंत ... कुठल्याही क्षेत्रात असो किंवा कुठल्याही पदावर असो ... प्रत्येकाला काही ना काही टोपण नाव हे असतेच.  आपल्या बॉलीवूड मध्ये तर टोपण नाव अगदी खास आहे. म्हणजे करिष्मा  कपूर लो लो , गोविंदा ची ची, करीना कपूर बेबो.  अशी काही खास नावे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. सिनेमातूनच आलेली खलनायकाची नावे आपण एखाद्याला टोपण नाव म्हणून वापरतो उदा. शाकाल, मोगॅम्बो, गब्बर. सिनेमातली टोपण नावे म्हटली कि मला तेजाब मधला एक संवाद नक्की आठवतो " ये महेश से मुन्ना कैसे बन गया ?" 

खरे तर टोपण नावाची गम्मतच वेगळी आहे. या नावांमुळे समोरचा माणूस आपल्याला जवळचा वाटतो ( चिडवायला वापरतात ती गोष्ट वेगळी ) .  आता साधं उदाहरण द्यायचे म्हटलं तर आपले क्रिकेटर घ्या महेंद्रसिंग धोनी पेक्षा माही जास्त जवळचा वाटतो, युवराज पेक्षा युवी, आणि आपला सगळ्यांचा लाडका सचिन तेंडुलकर पेक्षा  ..... तेंडल्या जास्त जवळचा असतो ना आपल्याला , अशी बरीच उदाहरणे आहेत आपल्या आवडत्या खेळात . अर्थात या नावांमुळे त्यांच्याबद्दलचा आदर कमी होत नाही .... पण आपल्यातले जे अंतर आहे ते मात्र नक्कीच कमी होते. 

आता टोपण नावाचा विषय निघालाच आहे तर अजून एक गोष्ट सगळ्यांना आठवलीच असेल....अं ... अं ... आठवली का ? अरे असे कसे नाही आठवली... तुम्ही आम्ही सगळ्यांनीच केलीय हि गोष्ट. अर्थात खुलेपणाने कुणी कबूल नाही करणार पण ..... अहो असे काय करता .... शाळेतली गोष्ट ... आता आठवले असेल ना .... हं ... तेच आपण आपल्या शिक्षकांना ठेवलेली टोपण नावं ... नाही हा आम्हीं नाही ठेवली ... असे अजिबात म्हणू नका ... आता तुम्ही शिक्षक असलात तरी तुमच्या शालेय जीवनात तुम्ही हे केलेच असेल. अगदी स्वतःहून नसतील ठेवली नावे.. पण कुणाशी कधीतरी बोलताना त्या नावाचा उपयोग नक्कीच केला असणार. मोठे झाल्यावर वाटतं कि काय आपण आपल्या गुरूंना नावं ठेवायचो. पण ती तेवढ्यापुरताच होती .... त्यांच्याबद्दलचा आदर तेव्हा हि कमी नव्हता आणि कधी होणारही नाही.

काही टोपण नावे हि जरा विचित्र असतात कुणाच्या तरी केसावरुन, शरीरयष्टीवरून , व्यंगावरून ठेवलेली नावे. खरे तर हे चुकीचं आहे हे आपल्याला कळत असते पण तरीही आपण ती ठेवतो. पण हे आपण सगळ्यांनीच टाळले पाहिजे, कारण अशी वेळ कधी कुणावर येईल हे सांगता येत नाही.

काही नावं हि आपली सिक्रेट लपवायला ठेवलेली असतात. म्हणजे कुणाविषयी  बोलायचे असेल त्याला न कळता किंवा चार लोकांमध्ये काही बोलायचे असेल एखाद्या व्यक्ती विषयी तर आपण त्या व्यक्तीसाठी एक विशिष्ट टोपण नाव वापरतो. (लगेच बायका आल्या असतील सगळ्यांच्या डोळ्यासमोर ) पण या बाबतीत पुरुषही मागे नाहीत बरं का :) ....यात सगळ्यात अग्रस्थानी असतात ती प्रेमात आकंठ बुडालेली जोडपी.... त्यांचे बाबू , शोना, स्विटी , जानू हे पालुपद सुरूच असते ... 

  जाता जाता तुम्हाला माझे एक टोपण नाव सांगते ... माझे नाव मिलन आहे पण बरेच जण त्याचे मीनल करतात त्यामुळे मीनल चे मिनू झालेय... नूतन ताईची मी जपानी डॉल आहे. तशी अजून बरीच नावे आहेत (माझ्यामागून ठेवलेली नाही हा!!!! ) प्रेमाने ठेवलेली ...माझी आशा मावशी मला प्रेमाने एका प्राण्याच्या नावाने हाक मारायची,अहं ती नाही सांगायची बरे का .... कारण नंतर माझ्या काही मित्र मैत्रिणींना मला छळायला अजून एक निमित्त मिळेल.  पण तुमची जर काही छान टोपणनावं कंमेंट मध्ये लिहिलीत तर चालतील ...... 

चला या निमित्ताने बऱ्याच जणांना बऱ्याच जणांच्या जुन्या नावांची आठवण झाली असेल. तर मग फोन उचला आणि करा कॉल... एखाद्या पिंट्या, बंटी.  बबल्या, गुड्डी, बेबी ला या सक्तीच्या सुट्टीमध्ये तेवढाच विरंगुळा.... 

घरी राहा ... सुरक्षित राहा.... आणि एकमेकांच्या संपर्कात रहा ....