Wednesday, 19 February 2025

पत्र - एक गोड आठवण


पत्र खरंच आता हा शब्दच खरं तर आता आऊट डेट झाला आहे, कारण आता आपण सगळीकडे एक तर मेल करतो किंवा लेटर देतो पत्र देतच  नाही . आणि हल्ली माणसांना तसा खास पत्र लिहिण्याचा  प्रसंग येतच नाही.  अगदी आपल्या जवळच्या माणसांना ही  आपण पत्र लिहित नाही. हल्ली या सोशल मीडियाच्या जगात लिहायची सवय ही मोडली. आणि कुणाला आता  एवढा वेळ ही नाही की  कुणी कुणासाठी पत्र लिहिण्याचे कष्ट घेईल.  या सोशल मीडियामुळे जग किती जवळ आलं असलं तरी मनाने मनाने मात्र आपण सगळेजण एकमेकांपासून दुरावत आहोत. 

थोडा ट्रॅक बदलला पण मूळ मुद्दा की हल्लीं पत्र कुठंही लिहिलं जात नाही पूर्वीसारखे.

आपल्या हृदयाला एखाद्याने अगदी चार ओळींचं  पत्र लिहिलं तरी त्या व्यक्तीच्या मनातील भावना आपल्या पर्यंत जशाच्या तशा पोहोचतात.  एखादे पत्र ते  वाचताना त्या व्यक्तीचा आवाज हळूहळू आपल्या कानात घुमायला  लागतो,  ते अक्षर पाहताना त्या व्यक्तीचा चेहरा त्या पत्रात आपल्याला दिसायला  लागतो, त्या व्यक्तीचे हावभाव आपल्याला  जाणवायला लागतात, जणू काही ती व्यक्तीच आपल्यासमोर येऊन व्यक्त होतेय. आपसूकच त्या व्यक्तीच्या भावभावना आपल्या हृदयाला भिडतात.

हल्ली आपला  कोणाशी वाद झाला, कुणाशी भांडण झालं की हे भले भले भले मेसेजेस व्हाट्सअप वर आपण   लिहून पाठवतो.  पण त्यातनं त्या भावना तितक्या प्रभावीपणे व्यक्त होत नाहीत.  त्यातून हल्ली  भरीस भर काय तर त्या शब्दांची जागा ही  आता इमोजींनी घेतली आहे त्यामुळे तर आपल्या भावना व्यक्त करणे हे अगदीच सोपे झाले आहे.  पण त्या समोरच्याला कितपत पोचतात हे सांगणं मात्र कठीण. 

पण काही म्हणा हे असे  मेसेजेस चे उतारेच्या उतारे लिहून पाठवले तरी ते भावनाहीन वाटतात.  ते वाचलेलं काही तसे प्रभावीपणे लक्षातच राहत नाही. पण तेच आपल्याला लिहिलेलं एक छोटसं पत्र सुद्धा आपल्याला कायम लक्षात राहतं.

अजून एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे तार. एका ओळीत खुशाली किंवा दुःखद बातमी दोन्ही कळायचे. तार आली म्हणजे वाईटच बातमी असे काहीसे समीकरण होते. त्यामुळे तार आली की आधी पोटात गोळाच यायचा.  तार वाचणाऱ्याच्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणारी मंडळी त्या तार वाचणाऱ्या माणसांकडे आशेने पहायची. त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावांवरून प्रयत्न करायचे समजण्याचा की बातमी वाईट आहे की चांगली.

नोकरीचे अर्ज असोत, की  कुठले सरकारी कामें असो तेव्हा पत्रांशिवाय पर्याय नव्हता.  पूर्वी कुणी बाळंत झालं,  कुणी एखादी परीक्षा पास झालं, कुणाला नोकरी लागली असे काही  पत्र  आले की घरात अगदी आनंदी आनंद असायचा. ते पत्र सगळ्यांना दाखविलं जायचे अगदी पेढे वाटले जायचे.  घरात ज्याला लिहिता वाचता यायचं त्यांच्यावर पत्र सगळ्यांना वाचून दाखवायची  जबाबदारी असायची. गावाकडची माणसं शहरात खुशालीचे पत्र पाठवायचे किंवा शहरातून गावाकडे तेव्हा तो आनंद  आणि दुराव्याचे  दुःख असे मिश्र अश्रू ते पत्र   व्यक्तीच्या डोळ्यातून वाहायचे.

 आमच्या वेळी  पेन फ्रेंड म्हणून एक संकल्पना होती. ते  नक्की काय होतं ते मला माहित नाही कारण मी ते कधी अनुभवलं नाही.  पण आपल्या परदेशात राहणाऱ्या एखाद्या मित्र-मैत्रिणीला पत्र लिहायचे. आपण कुणाला तरी अंतर्देशीय पत्र लिहितोय  किंवा आपल्याला कुणीतरी अंतर्देशीय पत्र पाठवतेय हेच खूप भारी होते.

पूर्वी तारेप्रमाणे अजून एक गोष्ट होती , ती म्हणजे ज मनी ऑर्डर.   शहरात कमावत असलेला मुलगा / मुलगी , आई-वडिलांना गावी पैसे पाठवायचे किंवा दुसऱ्या गावात शिकत असलेल्या मुलामुलींना त्यांच्या घरून पैसे पाठवले जायचे.  मनी ऑर्डर सोबत दोन ओळींमध्ये खुशालीही कळवली जायची.  त्या मनीऑर्डर चे पैसे घेताना त्या पैशाला झालेला आपल्या माणसांचा स्पर्श तोही जाणवायचा.  आता नेट बँकिंग सारख्या सुविधांमुळे मनी ऑर्डर ही विस्मृतीत जात आहे.

दोन मित्रमैत्रिणीं मधील संवाद असो,  माहेरवाशीणीचे  माहेराला पत्र असो किंवा तिच्या माहेरहून आलेलं पत्र असो, किंवा दूरदेशी राहणाऱ्या कुणाचे किंवा आपल्या एखाद्या सीमेवरच्या जवानांचे  पत्र असो ,  ते पत्र पाठवण्यात आणि त्या पत्राचे  उत्तर येण्याची वाट बघण्यात एक वेगळीच मजा होती, एक प्रकारची हुरहूर होती. जणू आपलं घरच त्यांच्यापाशी त्या पत्राच्या रुपात पोहोचत होते. 

आता मेसेज सेंड केला की तो डिलिव्हर होतो, वाचला जातो. किती पटापट सगळं.   तो वाचला की नाही हे कळू नये म्हणून हल्ली ब्लू टिक ही ऑफ ठेवतात , त्यामुळे  त्या सगळ्या वाट बघण्याची आणि एकंदरीतच त्या देवाणघेवाणीची गंमतच निघून गेली आहे.

या सगळ्या पत्रांमध्ये एका पत्राची फार गंमत होती ते पत्र प्रियकराने प्रेयसीला लिहिलेलं किंवा प्रेयसीने प्रियकरायला सगळ्यांपासून लपवून लिहिलेलं प्रेम पत्र. अर्थात त्या त्या पिढीचं  ते लव लेटर. प्रत्येकाने हा प्रयत्न एकदा तर नक्कीच केला असेल. तर कितीतरी प्रेमपत्र अजूनही तशीच कुठेतरी लपवलेली ही असतील. 

या पत्रांनी आपल्या मराठी,  हिंदी  सिनेसृष्टीत कितीतरी  प्रसंग आणि कितीतरी अजरामर गाणी दिली आहेत.  हल्ली परदेशी असलेल्या मुलांशी आपण व्हिडिओ कॉल वर कधीही बोलू शकतो (फक्त वेळेचे बंधन पाळून).  पण आजही चिट्ठी आई हैं हे गाणं ऐकताना सगळ्यांचे डोळे भरून येतात.  तसंच बॉर्डर सिनेमातलं संदेसे आते हैं गाणं ऐकताना आपल्या सैनिकांचे दुःख हृदयाला भिडून जाते. डोळ्यासमोर साहजिकच ती सगळी माणसे तरळून जातात.

पूर्वी शाळेत परीक्षेला पत्र लेखन असा खास प्रश्न असायचा. त्याचे विषय ही किती छान असायचे सुट्टीत मामाच्या गावी जाऊन केलेली धमाल मित्र किंवा मैत्रिणीला पत्राने कळवा. मुख्यध्यपकांना पत्र लिहा. हॉस्टेल मध्ये असलेल्या आपल्या भावंडाना पत्र लिहा. मार्क तर मिळायचेच पण ते लिहायला वेगळी मज्जा ही यायची. 

प्रत्येकाला पत्र लिहिताना करायची सुरवात आणि शेवट याचे काही नियम असतात. तीर्थरूप, स.न. वि. वि, माननीय, आदरणीय असे.....तर शेवटी आपला लाडका/ लाडकी, आपले कृपाभिलाशी असे कितीतरी शब्द. आता dear आणि yours लिहिलं की झाले.

मला अजूनही आठवतंय मी जेव्हा माझ्या आई-बाबांकडे राहायला गेले,   त्यावेळेला मी माझ्या आजोबांना  एका पोस्ट कार्डवर पत्र लिहून पाठवलं होतं. तेव्हा त्यांना इतका आनंद झाला होता की माळ्यावरच्या सगळ्यांना त्यांनी ते पत्र वाचून दाखवलं होतं.  अर्थात त्या काळात लँडलाईन होते , शेजारी कोणाकडे तरी असं... पण त्या पत्राची गंमत काही वेगळीच.

आपल्याला कुणी पत्र पाठवणार नाही माहीत असताना, त्या पोस्टमन काकांच्या घंटीचा आवाज आला की लगेच त्यांच्या मागे धावायचे. कुणा कुणाचं पत्र आलेय ते पहायचे. आणि ज्याचे असेल त्याला जोरात ओरडून सांगायचे. आणि आपल्याच घरात पत्र आलेलं असलं की हर्षवायूच व्हायचा 

आमच्या लहानपणी आम्ही एक खेळ ही खेळायचो "आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं. आता मुळात आईची मम्मी किंवा मॉम झाली आणि पत्र तर गायबच झालं आहे त्यामुळे आता तो खेळही गेला काळाच्या पडद्याआड.

आता अंतर्देशीय पत्र, पोस्ट कार्ड, पोस्ट पाकीट हे फक्त ऐकायला मिळतं,  तेही फार कमीच.  हा पण तुम्ही गुगल केलं की त्याच्या इमेजेस मात्र आपल्याल दिसतात. 

या पत्राबरोबर खरं तर खाकी  गणवेशातले  ते पोस्टमन काका,   लाल काळ्या रंगांच्या त्या पोस्टाच्या पेट्या, ती सायकल ची घंटी , गुडूप अंधारातले  पोट ऑफिस हे सुद्धा काळाच्या पडद्याआड गेले.

आज अशा कितीतरी गोष्टी आहेत की या पत्रलेखनाच्या मागे पडण्याने आपण अनुभवू शकत नाही.

चला तर मग जर तुम्ही हा ब्लॉग वाचला असेल, आणि तुम्हांला तो आवडला असेल  तर तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला पत्र लिहून द्या आणि  बघा त्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि जमल्यास ती आम्हालाही कळवा आमच्या ब्लॉगवर कंमेंट करून.

सौ. मिलन राणे - सप्रे🖋️






2 comments:

  1. मिलन छान विषय घेतला...👌✨👍🏻 नॉस्टॅल्जिक...अगदी अलीकडेच मी बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिलेलं एक पत्र मला जेव्हा क्ष व्यक्तीने दाखवलं तेव्हा खरंच तुझ्या लेखातल्या गोष्टीं सारखे बरेच विचार मनात येऊन गेले. आता इतकेच. सविस्तर भेटू तेव्हा. 😃😃

    ReplyDelete
  2. Mast Milan, aajchya yuva pidhine, lahan mulani vachaylach have, kalaaad gelele patr tu punha samor aanles, khup khup aathvani jagya jalya, aajhi majya kade family Mitra matrini hi chi patre aahet, jun thevleli, aani mi sudaivi aahe ase mla vatate, Tujya sarkhi ajun ekmatrin milali mhanun, asech lihat raha Milan, Mrunal

    ReplyDelete