Friday, 7 June 2024

सहजच .....४

 दिलसे.....❤️


आज आपल्या लाडक्या वरूणराजाचा  वाढदिवस...७ जूनला पाऊस पडणार आणि १३ जून ला शाळा उघडणार हे समीकरण आमच्या पिढीच्या मनात अगदी पक्के बसलेलं आहे....🌧️🌧️🌧️


या निमित्ताने आठवण झाली जुन्या दिवसांची. जून महिना सुरू झाला की शाळेचे आणि पावसाचे वेध लागायला सुरवात व्हायची. पहिला पाऊस कधी येतो आणि त्यात कधी भिजतो असे होऊन जायचे. आणि दोन महिन्यांनंतर शाळा सुरू होणार आणि लवकर उठावे लागणार म्हणून मन थोडेसे खट्टू ही व्हायचे.


आभाळ जरा भरून आले की हातातली कामे टाकून आकाशाकडे पाहत राहायचे की कधी पाऊस पडतोय. पाऊस पण इतका खोडकर की जेव्हा फावला वेळ असायचा तेव्हा पडायचा  नाही आणि सगळे कामात गर्क असले किंवा जेवायला बसणार इतक्यात हा बरसायचा. मग सगळे पटापटा आवरायचं , घास कोंबायचे आणि पावसात भिजायला पळायचे. त्यावेळी सर्दी होईल, खोकला होईल अशी कारणे नसायची. उलट उन्हाळ्यात आलेलं घामोळे पहिल्या पावसात भिजून जाते म्हणून सर्रास भिजायला जायचो. 

बऱ्याच बिल्डिंगमध्ये पावसात फुटबॉल खेळला जायचा. साचलेल्या त्या पाण्यात उड्या मारायच्या. सगळेच चिंब भिजलेले असताना एकमेकांवर ओंजळीत येईल तेवढं पाणी एकमेकांवर उडवायचे. दहा वेळा तोंड धुवायचे. आणि गच्चीवरून पाईप मधून खाली येणाऱ्या पाण्याखाली उभे राहायचे. कोण काय म्हणेल, कोण बघतेय, कोण ओरडेल याची अजिबातच चिंता आणि तमा दोन्ही नसायची. ते क्षण त्या छोट्या ओंजळीत सामावून घ्यायची धडपड असायची.


पाऊस हजेरी लावून गेला की शाळेच्या तयारीला सुरवात व्हायची. जुन्या पावसाळी चपला प्रथम बाहेर निघायच्या. जुने रेनकोट , छत्र्या सगळं काढलं जायचे. नवीन गणवेश शक्यतो घरातल्या मोठ्या मुलीला किंवा मुलाला मिळायचा. बाकीच्यांना शक्यतो जुनाच. दप्तराची ही तीच गत. तेव्हा खाकी दप्तर असायची बहुतेक. अगदी श्रीमंतांची जराशी वेगळी. पुस्तकं ही आधीच्या वर्गातल्या कुणाची तरी , किंवा मोठ्या भावाबहिणीची. नवीन पुस्तकं मिळाली की त्याचा रुबाब काही वेगळाच असायचा. त्या पुस्तकांच्या पानांचा वास घेण्यात आणि पानावरुन हात फिरविण्यातच बराच वेळ जायचा. फक्त वह्याच काय त्या नवीन असायच्या. त्याला पेपर, कॅलेंडर किंवा खाकी कव्हर घातलं जायचे. लेबल लावून नावं घातली जायची. कव्हर घालणे हा एक वेगळा कार्यक्रम असायचा. शक्यतो तो एखाद्या रविवारी असायचा किंवा दुपारी फावल्या वेळेत. आवडत्या विषयाच्या वहीला अगदी सांभाळून आणि व्यवस्थित कव्हर घातले जायचं. घरात ज्याचे अक्षर चांगलं असेल त्याला सगळ्यांच्या वह्यांवर नावे घालावी लागायची. नवीन वर्ग, नवीन वर्गशिक्षिका , यावर्षी वर्गात नवीन कोण मुलं मुली येणार याची उत्सुकता असायची. पहिला बेंच मिळवायचा म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी लवकर जाण्याचे प्लॅन ही केले जायचे. 


जून महिना नवीन ऋतू आणि नवीन शालेय वर्ष याची चाहूल घेऊन यायचा.


काही म्हणा पण ते मंतरलेले दिवस पुन्हा  येणे नाही. पण त्या सुखद आठवणींवर आयुष्य जाते...आणि मित्रमंडळी सोबत गप्पांच्या फडात हे प्रसंग अगदी जिवंत उभे राहतात डोळ्यासमोर❤️


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️

No comments:

Post a Comment