Sunday, 16 June 2024

वडील

 आज जागतिक पितृ दिन या दिवसाच्या निमित्ताने थोडसं वडिलांविषयी......


खरं तर वडील म्हटलं अगदी कडक स्वभावाचे, शिस्तीचे अशी व्यक्ती असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे  राहते.  कारण  वर्षानुवर्षे आपण तेच बघत आलो 

आहोत किंवा आमच्या पिढीपर्यंत वडील म्हटलं की साधारण अशीच व्यक्ती असायची म्हणूनही.


पण जसा जसा काळ बदलतोय , आणि  त्याबरोबर इतर गोष्टी बदलत आहेत तसं हल्लीच्या काळात वडिलांची प्रतिमाही थोडीशी बदलत जात चाललीये असं मला वाटतं. म्हणजे काळानुरूप प्रत्येक व्यक्ती आपल्यात बदल घडवत आली आहे त्यामुळे ही हा बदल होत असावा.


आईची माया, आईचं प्रेम,  आईचे कष्ट या विषयावर भरपूर लिहिलं जातं, बोललं जातं, सादर केले जाते.  वडील या विषयावर तितके भाष्य होत नव्हतं , पण हल्ली हल्ली थोडं फार लिहिलं जातेय, बोललं जातंय, सादर ही केले जातेय.


पूर्वीच्या काळी बहुतांश वेळा वडील नोकरी करायचे, किंवा कामानिमित्त बाहेर असायचे. त्यामुळे आपसूकच घर सांभाळायची जबाबदारी ही घरातल्या स्त्रियांवर असायची.  त्यामुळे घरातले प्रत्येक मूल हे आईच्या खूप जवळ असायचं, आणि आईला त्याची प्रत्येक गोष्ट माहीत असायचीच. हट्ट करायचा तर आईकडे, हवं नको असेल तर आईकडे,  राग  काढायचा तर आईवर असंच दिसतं बहुतेक ठिकाणी.


बाबांपासून थोडा दुरावा असायचा आणि तो अजूनही असतो. बाबा या शब्दाविषयी मनात आदरयुक्त भीती असते म्हणूनच कदाचित बाबांच्या इतके जवळ नाही जाऊ शकत. आईला आपण एकेरी संबोधतो आणि बाबांना बहुवचनी त्यामुळे इथेच दुराव्याची सुरुवात होत असावी.  कुठेतरी आपल्या घरातूनही ते शिकवलं जातं की  आईला अगं आई म्हटलं तर चालतं पण बाबांना अरे बाबा नाही म्हणायचं अहो बाबाच म्हणायचं. आता हल्ली बऱ्याच ठिकाणी बाबांनाही अरे बाबा म्हणायची पद्धत सुरू झाली ही चांगली का वाईट याबद्दल चर्चा नको.  पण त्या पाल्यातला आणि वडील यांच्यातला जो दुरावा आहे तो  थोड्या अंशी कमी व्हायला नक्कीच मदत होत असेल.


बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की , बाबा तर नुसते कडक शिस्तीचेच आहेत,  त्यांना कुठे कळतंय मुलांना काय वाटतं, काय हवंय. ते फक्त नाहीच म्हणतात. पण हे असं नसावं. कारण मुख्य गोष्ट इथूनच सुरू होते की पुरुषाला रडता येत नाही,  मोकळेपणाने व्यक्त होत येत नाही. जसं स्त्री करू शकते.  तसे पाहायला गेले तर तो ही दोनदा मोकळेपणाने रडतो एकदा त्याची आई गेल्यावर आणि दुसऱ्यांना मुलीची पाठवणी  करताना. कुठल्याही दुःखद प्रसंगात त्यांना वाईट वाटत नसेल असं नसावं बहुतेक , मी एक स्त्री आहे मी फक्त माझा  पॉईंट ऑफ यू मांडत आहे. आपल्या भावना मोकळेपणानं पुरुषाला मांडताच येत नाही बहुतेक.  म्हणजे पुरुष म्हणून जी प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या मनात असते त्याचा एक भार कुठेतरी ते सतत वाहत असतात.  आपल्या या धीरगंभीर प्रतिमेला कुठेतरी धक्का बसेल  या भीतीने ते कमी व्यक्त होत असतील.


एखादी गोष्ट करायला देताना कधीकधी आईचा होकार असतो पण  बाबांचा नकार असतो.  त्यामागे वेगळं कारणही असू शकते फक्त शिस्त किंवा  पैसे नाहीत म्हणून तो नकार असं नसतं.  एकंदरीतच पूर्ण संसाराच्या  खर्चाचा विचारही, पुढे जाऊन त्याचे परिणाम याचाही विचार ते करत असतील. कधी कधी आपली राहिलेली स्वप्न मुलांनी पूर्ण करावीत , किंवा जे आपण सहन केले ते मुलांनी करू नये म्हणून वेळप्रसंगी त्यांना मनाविरुद्ध ही कठोर निर्णय घ्यावे लागतात.


वर  म्हटलं त्याप्रमाणे हल्ली वडिलांचे एक मृदू रूप ही आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काळात बहुतांश वडील कधी आपल्या पाल्याचे मित्र होऊ शकले नाहीत. आता हे चित्र थोडं  बदलायला लागले आहे.  हल्ली  वडिलांना   बऱ्याच ठिकाणी  सर्रास एकेरी नावाने  नावाने संबोधले जाते.  त्यामुळे बाबा हा नुसता आपला बाबा नसून आपला मित्रही आहे असं मुलांना वाटतं.  अर्थात तिथं ही एक पुसटशी रेषा असते जिथे वडिलांचा धाक हा कायम असतोच. 


हल्लीचे बाबा मुलांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये लक्ष घालतात त्यांना मार्गदर्शन करतात. वेळीच त्यांच्या सोबत ते ही एखादी गोष्ट करायला संकोच बाळगत नाहीत.


पण तरीही मुलांपेक्षा मुली वडिलांच्या जास्त जवळच्या असतात , हे ९९% टक्के खरं आहे.  वडिलांचे जेवढे प्रेम मुलीवर असतं तितकं प्रेम मुलावर नसतं असेच नाही अगदी  पण त्या नेहमीच वडिलांच्या हृदयाच्या खूप जवळच्या असतात.  मुलीसाठी वडिलांचा जीव जास्त तुटतो.  मुली बद्दल एखादा निर्णय घेताना  ते जास्त सजग असतात.  मुलींच्या वडिलांना तारेवरची कसरत असते आधी आई आणि बायको मध्ये कुणाची बाजू घ्यायची याची आणि नंतर बायको आणि मुलगी यांच्या मध्ये कुणाची बाजू घ्यायची याची.


बऱ्याच वेळा मुलांचे आजारपणा आले की  त्यांची काळजी घेणं ही आईची जबाबदारी असायची,  पण हल्ली हल्ली वडील ही आपली कामे बाजूला ठेवून , किंवा आपली कामे सांभाळून मुलांसाठी वेळ काढतात.  आई इतकी जबाबदारी घेण्याचा ते ही प्रयत्न करतात. 


पूर्वीच्या काळी मुलींची मासिक पाळी वगैरे आली की वडिलांना तिला कावळा शिवला असे सांगितले जायचे किंवा त्या गोष्टी लपवल्या जायच्या.  पण हल्ली या गोष्टी जितक्या आईला माहिती असतात तितक्याच वडिलांनाही माहिती असतात.  म्हणूनच हल्लीचे बाबा त्या काळात होणाऱ्या मुलीच्या बदलाला जास्त चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात.  त्या काळात तिची होणारी चिडचिड कमी करण्यासाठी  आपल्या परीने प्रयत्न ही करतात. 


पूर्वी प्रगती पुस्तकांवर फक्त वडिलांची सही लागायची , त्यावेळी कमी मार्क मिळाले की ते काम आईवर सोपवलं जायचे. वडिलांशी बोलणे , त्यांना काही सांगणे हे मोठे दिव्य काम असायचे. आता मात्र वडिलांशी चर्चा होतात, आपले मुद्दे मांडले जातात, समजावले जातात. दोन पिढ्यांमधील वैचारिक फरक हा असतोच पण तो कमी करण्यासाठी प्रयत्न होणे महत्त्वाचे.


 हल्लीची मुले मुली एखाद्या मित्राच्या हक्काने हात ठेवावा तेवढ्या हक्काने आपल्या वडिलांच्या खांद्यावर ही हात ठेवतात.  इतकंच नाही तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून घरातली जबाबदारी घेतात. हे होणारे बदल चांगलेच ना. 


पण एक गोष्ट नक्की वडील कितीही मित्रासारखे वागले तरी  मुलीच्या लग्नाचा विषय येतो , त्या वेळेला मात्र त्यांच्यातला *बाबा*  जागा होतो.  आपली जागा आता दुसरा कोणीतरी घेणार ही कल्पना त्याला सहन होत नाही. जसा आपण आपल्या मुलीला जपलं वाढवलं तसं समोरच्या पुरुषांनीही करावं त्यांची अपेक्षा असते. आणि म्हणूनच त्याचे निर्णय कधी कधी कठोर असतात.


जसं आपण म्हणतो मुलीला आई झाल्या शिवाय तुला कळणार नाही.  मुलांच्या बाबतीतही असतं ज्या मुलांचं त्यांच्या तारुण्यात वडिलांशी अजिबात पटलेलं नसतं किंवा वैचारिक मतभेद असतात.  ती मुले ज्यावेळी बाबा होतात त्यावेळी त्यांना वडिलांची तळमळ  कळून येते. आणि कधीही त्यांच्या वडिलांच्या जवळपास बसलेली मुलंही त्यांच्या म्हातारपणात त्यांना हात धरून सगळीकडे नेतात, आजारपणात त्यांची सेवा करतात.


याच कडक शिस्तीच्या बाबांचा जेव्हा आजोबा होतो. तेव्हा यांच्यातला तो मृदू माणूस  आपल्याला दिसू लागतो. आणि त्यावेळेला प्रत्येक मूल हाच विचार करतो ही नातवंडांशी इतके प्रेमाने वागणारे बाबा माझ्याशी का इतक्या कडक शिस्तीत का बरे वागले?  तेव्हा कुठं होते हे रूप?  आपल्याला कारण कळत नाही कारण तेव्हा आपण  त्यांच्या वयात असतो आणि त्यांच्या भूमिकेत ही.


एक नक्की की वडिलांचे प्रेम आईसारखे दिसत नसले तरी ते आपल्या मुलांवर तितकेच असते. फक्त कधी कधी ते  समजून घ्यायची गरज असते. 


सगळ्याला अपवाद असतातच त्यामुळे कुणाला वडिलांच्या बाबतीत वाईट अनुभव ही आले असतील.


माझा हा लेख माझ्या आजूबाजूला असणाऱ्या ते कुल बाबा तसेच  कडक शिस्तीच्या वडिलांना जागतिक पितृदिनानिमित्त भेट. 💐



सौ. मिलन राणे - सप्रे🖋️




   या

No comments:

Post a Comment