आज दहावीचा निकाल लागला. दरवर्षी दहावीच्या निकलाच्या दिवशी माझा दहावीचा निकाल लागल्यानंतर ची एक घटना मला आठवते. अर्थात त्या घटनेशी निगडित दोन्ही व्यक्ती आज हयात नाहीत. पण त्या घटनेनिमित्त त्या दोन्ही व्यक्तींची आठवण नव्याने ताजी होते.
मी दहावी झाले मार्च १९९२ला. आमच्या वेळी ७०-७५ टक्के म्हणजे खूप असायचे. हल्ली सगळ्यांचे मार्क बघून नवल वाटते. ८५ ते ९८ मध्ये मार्क असतात. आमच्या काळात मंगेश म्हसकर नावाचा मुलगा ९६% नी पहिला आला होता, कोण कौतुक झालं होतं त्याच. आजही ते पेपर मधले रकाने आठवतात.
माझा दहावीचा निकाल लागायच्या आधीच आईला सांगितलं होतं ७५ ते ७८% च्या मध्ये मिळतील त्यापेक्षा जास्त नाही त्यापेक्षा कमी नाही. एक ताई बोर्डाच्या ऑफिस मध्ये असल्यामुळे एक दिवस आधीच निकाल कळला होता. पण शाळेत जाऊन पाहिल्यावर त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले. मला ७५.४२टक्के होते.मिळालेल्या मार्कांचे कौतुक सगळ्यांनाच होतं, कारण ज्या परिस्थितीत आम्ही शिकत होतो त्या परिस्थितीत ते मार्क जरा जास्तच होते.
माझा निकाल लागला, त्याच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट. त्यावेळी काही असे मोबाईल वगैरे नव्हते, की स्टेटसला टाकलं किंवा फोन करून सांगितलं. फोनही फार कमी होते. त्यामुळे नातेवाईकांना मार्क कळायला एक दोन दिवस लागायचे.
तर दुसऱ्या दिवशीची गोष्ट ते तीन साडेतीन वाजले होते. आणि आमच्या घराची कडी वाजली ,तेव्हा बेल हा प्रकार चाळींमध्ये जास्त अस्तित्वात नव्हता. मी दार उघडलं समोर आमचा बॉम्बे सेंट्रल चा बाळा मामा होता. जो बीएसटीत कामाला होता.
मला आणि आईला दोघींनाही आश्चर्य वाटलं. की हा आता यावेळी इथे कसा? तो येऊन बसला. आईने त्याला पाणी वगैरे दिलं. मला मामानं जवळ बोलावलं आणि त्याने पार्ले जी चा पुडा माझ्या हातात दिला. माझे अभिनंदन केलं. तो आईला म्हणाला मला माहितीच नव्हतं मिलन इतकी हुशार आहे. आत्तापर्यंत घरातल्या इतर मुलांचं कौतुक ऐकून होतो. मला वाटलं होतं की हिला ५०-५५% मिळतील. पण खरंच खूप चांगले टक्के मिळाले. खूप छान वाटलं हिला ७५ टक्के मिळाले हे ऐकून. मला अगदीच रहावलं नाही म्हणून हाफ डे टाकून मी भेटायला आलो. मला आणि आईला दोघींनाही अगदी भरून आलं होतं. त्याचं येणं अगदीच अनपेक्षित होतं. आमचा बाळा मामा म्हणजे अगदी साधाभोळा माणूस. आपल्या भाचीचे कौतुक करायसाठी खास हाफ डे घेऊन बॉम्बे सेंट्रल होऊन विरारला येणं हे खरंच कौतुकास्पद होतं. त्यानंतर आईने त्याला तिची स्पेशलिटी खिचडी करून घातली. खिचडी लोणचं तो जेवला आणि नेहमी तो म्हणायचा गोविंद गोविंद म्हणत तृप्त मनानं पानावरुन उठला.
त्याने आणलेल्या त्या पार्ले जी च्या पुड्याची किंमत काही लाखाहून कमी नव्हती. मला त्या वेळेला मिळालेलं सगळ्यात मोठ बक्षीस आहे कारण ते आजही माझ्या लक्षात राहिले आहे. आणि खूप निर्भेळ कौतुकानं दिलेलं होते ते.
दुर्दैवाने मामा खूप लवकर गेला. त्याची जाण्याची तारीख आणि माझ्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख ही एकच आहे. काही योगायोग मनाला चटका लावून जातात.
सौ. मिलन राणे - सप्रे🖋️
No comments:
Post a Comment