Saturday, 15 October 2022

दिवाळीचा अभ्यास

 हल्ली शाळा ही वेगवेगळ्या बोर्डाच्या असल्यामुळे सुट्ट्यांचे वेळापत्रक बदललं आहे. आमच्या वेळेला साधारण नवरात्रीच्या वेळेला सहामाही परीक्षा सुरू व्हायच्या, आणि साधारणपणे दिवाळीच्या तिच्या आठ दिवस आधी संपायच्या. मोजून २१ दिवस सुट्टी असायची त्यावेळी दिवाळीची.


वर्षाचा सगळ्यात मोठा सण म्हणून नेहमी अगदी आतुरतेने वाट बघितली जायची. तशी अजून बरीच कारणं होती, बाबांचा होणारा बोनस, नवीन कपडे, फटाके,  फराळाचे पदार्थ, सुट्टीत येणारे पाहुणे.  त्यामुळे लहानांपासून  मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दिवाळीची आतुरता असायची.


या दिवाळीच्या निमित्ताने एक गोष्ट मला आठवली जी आता बरीच विस्मरणात गेली आहे, बऱ्याच  शाळांमध्ये बंद ही झाली आहे.  ती म्हणजे *दिवाळीचा अभ्यास*.   हा दिवाळीचा अभ्यास म्हणजे मोठी गंमत होती.


शेवटच्या पेपर च्या दिवशी किंवा जर परीक्षेनंतर एखाद दिवस शाळा असेल त्या दिवशी एक सायकलोस्टाइल पेपर वर्गातील  सगळ्या मुलांना वाटला जायचा. त्याच्या सुरुवातीला शुभ दीपावली असे लिहुन दोन बाजूला छोटे छोटे कंदील, किंवा पणत्या प्रिंट केलेल्या असायच्या. कधी कधी वेली सारखं नक्षीकाम केलेले असायचं.  तो पेपर आला की काही मुलांना आनंद व्हायचा,  तर काही मुलांची नाक मुरडायची, सुट्टीतही अभ्यास करावा लागणार म्हणून.


त्या कागदाला एक विशिष्ट प्रकारचा वास असायचा, त्या सायक्लोस्टाईल च्या शाई चा असावा. तो वासच आमच्या दिवाळीची सुरुवात असायची.


त्या पेपर वर तारखेनुसार त्या दिवशी काय अभ्यास करायचा ते लिहिलेलं असायचं.  म्हणजे उदाहरणार्थ दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ :  बे ते 10 चे पाढे लिहिणे. मराठीचे शुद्धलेखन पाच ओळी. 

दिवाळीचे चित्र काढणे.

दिनांक २३ ऑक्टोबर २०२२: बे ते १५ चे पाढे लिहिणे. मराठीचे शुद्धलेखन पाच ओळी. गोटीव कागदाचा कंदील बनवून चिकटवणे. त्या अभ्यासात फुले, पाने गोळा करून चिकटवणे. चित्रं काढणे, चित्र काढून त्यावर डाळी चिकटवणे , एखाद दुसरा निबंध. अशाप्रकारे प्रत्येक दिवसाचा अभ्यास हा लिहिलेला असायचा.  


तो अभ्यास करण्यासाठी नवीन वही ही घेतली जायची. कारण त्या कागदा वर लिहिलेलं असायचं की दिवाळीच्या अभ्यासासाठी नवीन वही करणे व ती सजवणे.  


ती वही आणायला जातानाही एक वेगळा उत्साह असायचा. कशी वही घ्यायची, कशी ती सजवायची याचे मनात चित्र रेखाटले जायचे. एकदा ती वही घरी आणली,  की अगदीं पहिल्या पानावर श्री लिहिला जायचा , मग नाव, इयता, शाळेचं नाव नेहमीप्रमाणे हे सगळे लिहीलं जायचे. आणि त्या नंतर मोठ्या दिमाखात *दिवाळीचा या अभ्यास*  असे  लिहिलं जायचे. मग वाटले तर एखादी पणती, कंदील ही रेखाटला जायचा. 


पाढे लिहिताना पट्टीने छान पैकी रेषा आखून घ्यायच्या. शुद्धलेखन लिहिताना आवडीच्या धड्यातले आवडते परिच्छेद लिहिले जायचे. सुरवातीचे दोन तीन दिवस अगदी उत्साह असायचा. रोज अगदी ना चुकता अभ्यास केला जायचा.


त्यानंतर साधारण सगळ्यांच्या परीक्षा संपून सगळी मित्र मंडळी मोकळी व्हायची. आणि मग खेळात बराच वेळ निघून जायचा. घरात  साफसफाई , फराळाचे पदार्थ याची तयारी सुरू व्हायची. नवीन कपड्यांची खरेदी, फटाके या सगळ्यांत त्या अभ्यासाच्या वहीच्या विसर पडलेला असायचा.  किंवा आज नाही करत पण उद्या नक्की दोन दिवसांचा अभ्यास करिन असे वचन देऊन , आजचे खेळाचे दान पदरी पडून घेतले जायचे. आणि नेहमीप्रमाणे उद्या कधी उजडायचा नाही.   हा अगदीच  कुणी अभ्यासू मुलांनी केला ही असेल पण त्याची शक्यता अगदीच कमी.


 दिवाळीचे चार दिवस कसे निघून जायचे कळायचे ही नाही. त्यानंतर भाऊबीजेच्या निमित्ताने आलेले पाहुणे घरी असायचे, मग तेव्हाही त्या वही चा विसर पडलेला असायचा.


हे सगळं झाल्यानंतर जशी सुट्टी संपायची वेळ जवळ यायची, तेव्हा अगदी प्रकर्षाने आठवण यायची या दिवाळीच्या अभ्यासाच्या वहीची. आणि मग व्हायची ती धावपळ.  आजचा अभ्यास उद्या करू म्हणणाऱ्या आम्हाला, आज उद्या काय तर परवा तेरवा आणि त्या आधीचा ही बऱ्याच दिवसांचा अभ्यास एकाच दिवशी करावा लागायचा. त्यात काही बनवायचं असेल तर त्या साठी लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठीची धावपळ. आणि नेहमीप्रमाणे घरातल्यां मोठ्या माणसांना लहान मुलांना ओरडायला अजून एक निमित्त मिळायचे.


मला आठवतं, आमची आशा मावशी मग दुपारी आमचं खेळणं बंद करून, आम्हाला तो अभ्यास पूर्ण करायला लावायची. त्याबरोबर पाठीत दोन धपाटे ही पडायचे. पण घाईगडबडीत ती वही पूर्ण करण्याची मजाही काही वेगळीच होती. ती वही पूर्ण झाल्यावर व्हायचीच असं नाही पण त्यातल्या त्यात  ९९ टक्के पूर्ण झाल्यावर त ती कोणी व कशी कशी सजवली आहे यावर मित्र-मैत्रिणींचा चर्चासत्र असायचं आणि कोणाला किती मार पडला याचंही.


ती वही पूर्ण करण्याची वेळ  आली की, जाणीव बाईची व्हायची ती दिवाळीची सुट्टी संपणार आहे याची आणि मग जास्त वाईट वाटायचे.... परंतु  ते वाईट वाटणे ही शाळेत जाई पर्यंतच असायचे. एकदा का शाळेत गेलं, मित्रमैत्रिणी भेटले , कुणी कुणी काय केलं, कुठं जाऊन आले हे बोलणं सुरू झाले की त्या वाईट वाटण्याचा विसर पडायचा.


पण काही म्हणा त्या दिवाळीच्या अभ्यासाची  वेगळीच गंमत असायची. आजही  त्या सायकलोस्टाइल पेपर चा वास नाकात जाणवतो.  त्या अभ्यासाची आठवण येते आणि वाटतं की पुन्हा एकदा तो अभ्यास अपूर्ण ठेवावा आणि त्यामुळे आपल्याला बोलणारी आपली  सगळी मंडळी आपल्या सोबत असावीत.... आणि पुन्हा एकदा ती जुनी दिवाळी साजरी व्हावी.



सौ. मिलन राणे - सप्रे🖋️




No comments:

Post a Comment