चप्पल खरं तर हा विषय लिहिण्यासारखा नाही किंवा हा काय विषय आहे का लिखाणाचा? असे लगेचच मनात येतं. पण मोच्याकडून शिवून आणलेल्या ठेवायला म्हणून चपलेचा खण उघडला आणि समोर एकदम दहा एक जोड. त्यातील एक घरी घालायला, एक लग्नाला किंवा एखाद्या समारंभाला जाताना, चालायला एक, धावायला एक. परत जरा जसा वेष त्याला तश्याच चपला असे म्हणत म्हणत एकाचेच किमान चार पाच तरी चप्पल जोड घरात असतात. एखादी चप्पल तुटली की ती शिवून आणणे ही ही पद्धत आता फार जुनी झाली आहे. तुटली की ती टाकून द्यायची आणि नवीन घ्यायची. त्या इतक्या सगळ्या चपला बघून आणि हा सगळा विचार करत मन भूतकाळात गेले.
आमच्या लहानपणी म्हणा किंवा अगदी कॉलेजमध्ये असतानाही, आमच्याकडे जेमतेम दोन जोड असायचे चपलांचे. एक नेहमीच्या वापराचे आणि एक पावसाळ्यासाठी. पूर्वी सगळयाच शाळांतून बूटच घालायला हवे अशी सक्ती नव्हती. त्या काळात कितीतरी जण अनवणीही शाळेत येत असत. आणि जरी असलीच बूट घालायची सक्ती, तरी खूप जर कमी जण असे होते की ज्यांच्याकडे नवीन बूट असायचे. घरातल्या मोठ्या मुलाला किंवा मुलीला ते बूट घेतले जायचे आणि मग त्यापेक्षा धाकटी बहीण, भाऊ यांना ते वापरायला दिले जायचे . त्यांनाही पायात बसेनासे झाले की नंतर कुणाला तरी दिले जायचे. एक तर कुठल्या तरी नातेवाईकांच्या मुलांना किंवा मग घरी काम करणाऱ्या बाईंच्या मुलांना.
मला आठवतंय आम्ही लहान असताना जवळपास सगळ्यांकडेच असायची, टॉयलेट बाथरूमला जाण्यासाठी म्हणून ठेवलेली किंवा सगळ्यांची मिळून कधी पायात चढवता येईल आणि पटकन बाहेर घालून बाहेर पडता येईल अशी पांढऱ्या रंगाची निळ्या पट्ट्यांची स्लीपर. ती स्लीपर थोडीशी महागातली घेतली की हिरव्या पट्ट्याची आणि थोडीशी हिरवी झाक असलेली ती स्लीपर असायची. साधारण सगळ्यांकडे सारख्या आणि वेगवेगळ्या मापाच्या त्या स्लीपर घातल्या जायच्या. मला आठवतंय आम्ही चेंबूर ला असताना जवळजवळ सगळेच तीच घालून खेळायला यायचो आणि मग बॉनीच्या दारात त्या काढून ठेवायचो. आणि निघताना माझी कुठली, तुझी कुठली यावरून भांडणे व्हायची. पण पायात घातली की प्रत्येकाला कळायचे आपली स्लीपर कुठली, कारण प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, त्यामुळे ती एका विशिष्ट बाजूने झिजली जायची , पायात चढवली की आपोआपच समजून यायचे. आणि त्यातूनही घोळ झालाच, तर घरी गेल्यावर घरच्यांना बरोबर ओळखू यायची ती आणि मग कुणाकडे गेली असेल म्हणून शोधाशोध. पण ती ही वेगळी गंमतच होती.
पावसाळ्यात या स्लीपरच्या पट्ट्याच्या मागची बाजू उघडून त्यात एक जाड रब्बर टाकला की झाली पावसाळ्यासाठी ती तयार. तो रब्बर मागच्या बाजूने पायावर चढवला की झाली स्लीपर ची सॅंडल आणि चिखल उडायची ही भीती नाही. अशी टू इन वन , स्वस्त आणि मस्त अशी आपल्या सगळ्यांची लाडकी स्लीपर.
जशी ही स्लीपर सगळ्यांकडे असायची. तशीच पावसाळी चप्पल खास मुलींसाठी किंवा बायकांसाठी होती ती म्हणजे बाटाची पट्ट्या पट्ट्यांची सॅंडल. लाल किंवा काळा या दोनच रंगात ती यायची. पण बहुतांश वेळा लाल रंगाची सॅंडल सगळ्या जणी घ्यायच्या. त्यामुळे पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या चार मुली असतील तर, त्यापैकी तिघींच्या पायात तरी नक्कीच या लाल रंगाच्या सॅंडल असायच्या.
पावसाळ्यात अजून एक गंमत असायची ते म्हणजे गंबुट.
हेही लाल किंवा काळ्या रंगाचे असायचे. आणि मग मुलं मुद्दामून त्या गंबुटात पाणी साठवून पचाक पचाक असा आवाज करत चालायची. घराजवळ आले की ते गम्बुट काढून उलटे करून त्यातलं पाणी काढून टाकलं जायचं म्हणजे घरी ओरडा मिळणार नाही. त्या गंबुटातले पाणी एकमेकांवर उडवणे हे असले प्रकार ही काही मुले करायची.
त्यावेळी शक्यतो नवीन चपला या दिवाळीला घेतल्या जायच्या. मग कोणाची चप्पल कशी आहे याच्या याचाही एक वेगळा कार्यक्रम असायचा. ज्या मुलीला जरा उंच टाचांचे वेगळे असे बूट जर मिळाले असतील, तर तिचा रुबाब जरा जास्त असायचा. त्यावेळी फार कमी लोक उंच टाचांच्या आपला घालायचे. त्या उंच टाचांच्या चपलांचं इतकं अप्रूप होते आम्हाला. की ती चप्पल घालून जाणाऱ्या मुली बद्दलही डिस्कशन व्हायचं. कसं जमत असेल हिला एवढे हिल्स चे चप्पल घालून चालायला? पडायला होत नसेल का? उंच टाचांच्या चप्पल घालणाऱ्या किंवा बायका या जरा श्रीमंत अशीच काहीशी धारणा होती. एखाद्या मैत्रिणीचे तसे असतीलच चप्पल आणि ती मैत्रीण तितकी चांगली असेल. तर तिचे ते उंच टाचांचे चप्पल घालून चालायचा प्रयत्न करायचा. चालणं कसलं धडधडणे असायचे ते. पाय सारखा वाकडाच व्हायचा. आणि मग जाऊ दे, पायच मुरगळेल म्हणून तो नाद सोडून दिला जायचा.
अजून एक चप्पल जिचं सगळ्यांनाच आकर्षण असायचं आणि आजही आहे, पण तेव्हा मात्र ती शक्यतो मोठ्यांनाच मिळायची. ती म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती कोल्हापुरी चप्पल. हल्ली कोल्हापुरी चपला सगळेच घालतात एक फॅशन म्हणून, पण त्या काळी फार कमी लोक ती चप्पल घालायचे. मला आठवतंय माने काका ती कोल्हापुरी चप्पल घालायचे, तसे माझे आजोबाही कधीतरी कोल्हापुरी चप्पल घालायचे पण शक्यतो बुटातच असायचे ते. कोणी कोल्हापूरला जाणार असले की त्यांना कोल्हापुरी चप्पल आणा हा नक्की, करर्कर वाजणाऱ्या असे अगदी आवर्जून सांगितलं जायचं. त्या चपलांचा रुबाब काही औरच.
आता सारख्या निरनिराळ्या प्रकारच्या चपलांचे फॅड ही त्याकाळी नव्हते . आणि त्यावेळी चपलांचे इतके सगळे ब्रँडही सर्वसामान्य माणसांना माहीत नव्हते. बूट म्हटले की चामड्याचे बूट, आणि शाळेच्या मुलांसाठी कॅनव्हास चे बूट. पावसाळी किंवा इतर चपला म्हटलं की फक्त बाटा. त्यानंतर पॅरागॉन हे नाव क्वचित कुठेतरी यायचं. आणि त्यावेळी एखाद्या ओळखीच्या लहानश्या चपलांच्या दुकानातूनच त्या घेतल्या जायच्या.
कुठल्यातरी एका हिंदी सिनेमात एक संवाद आहे की चपलांवरून त्या माणसाची लायकी कळते. हे वाक्य ऐकलं पु ल देशपांडे यांचे चितळे मास्तर आठवतात. त्यांच्या चपला किती झिजल्या असतील, हे त्या नुसत्या वर्णनावरून आपल्या डोळ्यासमोर येतं. खऱ्या आयुष्यातही काहींच्या बाबतीत हे असेच सत्य सस्ते. म्हणजे हा संवाद प्रत्येकालाच लागू होतो असं नाही कारण त्या चपलांच्या मागे एक वेगळी कहाणीही असू शकते. आणि ती कहाणी जास्त महत्त्वाची असते, त्या चपलांच्या ब्रँड आणि किमतीपेक्षा.
आत्ता आपल्याकडे पैसा आहे, म्हणून कदाचित आपल्याला त्या साध्या चप्पल ची किंमत नसते. तुटली कि टाकून दिली. पण पूर्वी अगदी मोच्याने सांगेपर्यंत, की आत्ता ही शिवता येणार नाही, इतकी ती चप्पल वापरलेली असायची. ती त्या काळच्या लोकांची काटकसर असायची, आणि त्या साध्या वस्तू वरले प्रेम ही. ती काटकसर, तो ओलावा बहुधा आत्ता थोडासा कमी झाला आहे. सगळ्याच गोष्टींपासून आपण डिट्याच होऊ लागलो आहोत. कदाचित म्हणूनच आपल्या घरात माणसांपेक्षा चपलांची संख्या वाढली आहे.....एक विचार करण्यासारखी गोष्ट.
सौ. मिलन राणे - सप्रे🖋️
No comments:
Post a Comment