Friday, 6 October 2023

सहजच.........१

 परदेशी गेलेल्या पाल्यांच्या पालकांचं मनोगत♥️


वेळ कशी भुरकन उडून जाते. तसंच आपल्या घरट्यातली चिमणी पाखरं ही मोठी झाली की घरटी सोडून उडून जातात. काही शिक्षणसाठी, काही करियरसाठी.  अशावेळी त्या पालकांच्या मनात जे काही त्याचा सुरू असेल, त्याचा प्रत्यय मीही घेतला आहे हल्लीच.  तोच अनुभव  शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न.


आपलं मूल बाहेर जाणार, मग ते वेगळ्या शहरात असो  किंवा वेगळ्या देशात असो.  सगळ्यात आधी त्याचं आनंदातलं दुःख असतं ते आईला, एकीकडे मुलाची प्रगती असते आणि दुसरीकडे ते आपल्यापासून दूर होणार याची भीती असते.  थोड्याफार फरकाने वडिलांची ही तीच स्थिती असते. पण दिवसभर आपली मुलंच आपलं  जग असणाऱ्या आईसाठी ते जास्त त्रासदायक असतं.


मूल बाहेर जाणार म्हटलं की त्या तयारीसाठी सात-आठ महिने जातात. म्हणजे अगदी अप्लिकेशन देण्यापासून सुरवात होते.   मग हळूहळू  एक एका गोष्टींची सुरुवात होते.  आधी पेपर जमा करणे.  त्या पेपरवर्क मध्येच आपला बहुतांश  वेळ जातो. ते एकदा मार्गी लागले की मग व्हिसा आणि तिकिटांची गडबड सुरू होते. व्हिसा इंटरव्ह्यू कसा होईल ? मिळेल ना व्हिसा? या टेन्शन मध्ये काही दिवस जातात. मग त्याप्रमाणे तिकिट कधीचं काढायचं, कुठल्या कंपनी चे काढायचे, कधीच स्वस्त आहे ते पाहून ते काढून ठेवायचे. आणि एकदा का व्हिसा हातात आला की अर्धा जीव भांड्यात पडतो.


हे सगळं दिव्य सुरू असतानाच , दुसरीकडे एक वेगळीच गडबड सुरू असते. आपल्या कधीही काही काम न करणाऱ्या बाळाला सगळ्या कामांची ओळख करून द्यायची. त्यांना निदान स्वतःचे पोट भरता येईल इतका स्वयंपाक शिकवायचा. त्यांना तिथे लागणार सामान कुठं कुठं काय काय मिळते याची चौकशी करायची.  खरंतर हल्ली कुठे काय मिळत नाही असं नाही, सगळीकडे सगळंच मिळतं. पण तरीही घरचं ते घरचं असं म्हणत आपण बऱ्याच गोष्टी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. त्यातून तिथे मिळणाऱ्या गोष्टी महाग पडतील म्हणून शक्य तेवढं इथून द्यायचे. आताच्या काळात रेडी टू कूक मूळे खूप सोप्प ही झालंय सगळे.


या मधल्या काळात देश सोडून जाणार म्हणून सगळ्यांना भेटून घ्यायची गडबड. कुणी राहून जाऊ नये म्हणून सगळ्यांना भेटायचे वेळापत्रक आखणे म्हणजे अजून एक दिव्य. पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या, काळजी करणाऱ्या, आपल्या पाठीशी आशीर्वाद असणाऱ्या सगळ्यांना भेटणं हे ही तितकेच गरजेचे असते. या काळात प्रत्येक जण आपल्या ओळखीतल्या कुणाची ओळख सांगत असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करायचा प्रयत्न करतात. तेव्हा लक्षात येते की , जिव्हाळ्याची माणसे कशी असतात. कधीतरी आपल्यावर ही वेळ येईल न येईल याचा विचार न करता , आणि उपकाराची कुठलीही भावना मनात न ठेवता मदत करतात. ती मुलं तिथे गेल्यानंतर ही पालकांना मुलांची खुशाली विचारली जाते. त्यांना धीर ही दिला जातो. ही सगळी भावना खूप सुखकर असते.


"तू जास्त रडारड करू नको" असे सांगणारी मुलेही निघायच्या वेळी जास्त भावुक होतात. आणि मग ते मुलं दिसेनाशी होईपर्यंत ती मागे फिरून बघतात आणि बाहेरची माणसे त्यांना टाटा करत राहतात.


मुल एकदा बाहेरगावी निघून गेलं, त्यादिवशी ते तिथे पोहोचेपर्यंत आपल्या मनात धाकधूक असते. इतका मोठा प्रवास नीट करतील ना? बॅग्स नीट घेतील ना? तिथे नीट उत्तरे देतील ना? नंतर तिथे त्याचा कसं होईल काय होईल याची भीती. एकट्याने सगळं कसं मॅनेज करेल याचे भीती.  या सगळ्या भीती आपण आपल्या मनात साठवलेल्या असतात, पण तरीही आपण त्यांना या दाखवून देत नाही आणि त्यांना धीर देतो हे उत्तमच नाही का?


माझ्या मैत्रिणीने मध्ये व्हिडिओ केला होता की माझी मुलगी अजिबात होमसिक फील करत नाही. तिने करावं म्हणजे मी तिला काहीतरी सल्ला  देईन.  मला तो व्हिडिओ बघून फार हसायला आलो होते कारण थोड्या दिवसाने माझाही कदाचित तेच होणार होतं. पण नशिबाने माझी मुलगी ही होमसीक फील करत नाहीये.  याचा अर्थ तिला घरची आठवण येत नाही किंवा ती बिनधास्त आहे, असं नाही.  त्यांनी तेवढ्या स्ट्रॉंगली त्या गोष्टी घेतल्या.  आणि खरंतर ही खूप चांगली गोष्ट आहे. अर्थात जी मुलं होमसिक फील करतात ते चांगलं नाही असा नाही होत नाही. काही काळानंतर ती ही यातून व्यवस्थित बाहेर पडून तिथे छान रमतात.


त्या पहिल्या एक-दोन दिवसात आपल्याला घर इतकं रिकामी वाटतं.  आपल्या घरातुन एक व्यक्ती निघून गेलेली असते. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी गेल्यावर आईवडिलांना वाटतं, तीच भावना परदेशी गेलेल्या आई-वडिलांची असते.  कारण इतके महिने, इतके दिवस, केलेली धावपळ, केलेली इतकी कामे, बारीकसारीक गोष्टी .....हे  अचानक कुठेतरी थांबून गेलेले असते. त्यामुळेच एक रिते पण आलेलं असतं.   म्हणूनच  आपल्याला खूप एकटं एकटं वाटत. घर खायला उठतं


आपल्याला वाटत असतं आपलं मूल तिथे जाऊन एकटं पडेल.  त्याच्या आजूबाजूला कोणी नसेल आपलं असं. पण खरंतर मनाने आपण एकटे पडलेलो असातो.  पण मुलांच्या आनंदात आनंद म्हणून  तो एकटेपणा ही आपण आनंदाने स्वीकारतो.  आणि तो प्रत्येकाने स्वीकारायलाच हवा. कारण आपल्या भावनांची बेडी मुलांच्या पायात अडकवणं म्हणजे त्यांच्या प्रगतीत अडथळा आणण्यासारखा आहे. आणि खरंतर इतकी वर्षे आपण मुलांची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडलेली असते तर थोडा वेळ आपलेही आयुष्य जगायला मिळतो. तो वेळ ही आपण आपल्या आवडी जोपासत , काहीतरी नवीन करत छान घालवू शकतोच.


सौ. मिलन राणे - सप्रे 🖋️

No comments:

Post a Comment