Wednesday, 15 March 2017

संगत

माझा मुलगा किंवा मुलगी त्याच्या संगतीत राहिली म्हणून बिघडली हे वाक्य प्रत्येक घरात आपल्याला ऐकायला मिळते . आपला तो बाब्या दुसऱ्याचे  ते कार्ट असेच आहे ना  आपल्याकडे. आपल्या चुकांचे खापर आपण दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडायला नेहमी तयार असतो.  वाईट संगतीत राहून मुले बिघडतात मान्य आहे, पण त्यात आपलीही चूक असतेच ना, पण  ते पाहायचा प्रयत्न न करता आपण दुसऱ्याला दोष देऊन मोकळे होते. आपली मुले बिघडली तर त्याला आपणही कुठेतरी जबाबदार असतोच ना.  वाईट संगतीत राहूनही स्वतःचा चांगुलपणा टिकवणारी माणसे आहेतच कि जगात. कुठल्या गोष्टीच्या किती आहारी जायचे ते आपण ठरवायचे असते. आपला आपल्यावर असलेला ताबा जास्त महत्वाचा नाही का ? जर वाईट लोकांमध्ये राहून आपण बिघडू शकतो तर चांगल्या लोकांमध्ये वाईट लोकांना सुधारवायची ताकद नाही का ? वाईटावर चांगल्याच विजय होतो असे आपण म्हणतो मग दैनंदिन जीवनात ती गोष्ट अश्यक्य आहे असे का वाटते आपल्याला?
असे म्हणतात एक सडका आंबा पेटीतल्या बाकीच्या आंब्यांना खराब करतो म्हणून त्याला पेटीतून  काढून टाकायचं. हे झाले निर्जीव वस्तूंचे. पण जर दहा माणसांमध्ये १ वाईट प्रवृत्तीचा माणूस असेल तर त्याला बाहेर काढण्यापेक्षा इतर नऊ माणसांनी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणे जास्त चांगले नाही का? दुसऱ्याच्या नावाने आपण शंख करतो की तमुक व्यक्ती  बिघडली असे आपण सहज म्हणून जातो पण जी व्यक्ती बिघडते तिच्या घराचे संस्कार , परिस्थिती याचा विचार करत नाही आपण. नुसते संतांच्या संगतीत राहून संत होता येत नाही तसे गुंडांच्या संगतीत राहून  कुणी गुंड बनत नाही. हल्लीच्या काळात म्हणा किंवा या २०-२५ वर्षांत म्हणा टिव्ही , इंटरनेट मुले लहान वयातच मुलांना सगळी माहिती मिळायला लागली आहे. त्यामुळे हल्ली बिघडायला कुणा मित्र मैत्रिणीची गरज नाही , टीव्ही आणि मोबाइलची संगत हि मुलांना बिघडवायला पुरेशी आहे. कुठलीही व्यक्ती हि १००% वाईट नसते, त्यांच्यातही काही चांगले गुण असतात पण काही अंशी आपलीही प्रवृत्ती अशी आहे ना कि चांगल्या गोष्टीं पेक्षा वाईट गोष्टी आपण लगेच आत्मसात करतो. दुसऱ्यांकडे बोट दाखवताना आपण आपल्यातल्या त्रुटींचा विचार करत नाही. 
 रावणाच्या संगतीत राहून विभीषणाचे राम प्रेम नाही ना कमी झाले? सिंहाला जर कुत्रांबरोबर ठेवले तर तो त्यांच्या सारखा नाही ना वागणार? मूळ प्रवूत्ती जी "जंगलाच्या राजाची" आहे ती नाही ना बदलणार. तसेच आपले हि आहे ना. वाईट लोकांबरोबर राहून आपण जर कणखर राहिलो तर संगतीचा परिणाम कसा होईल. ऑफिसमधल्या किंवा आजूबाजूच्या घाणेरडया राजकारणाचा  अनुभव घेऊन किंवा त्या लोकांबरोबर सतत राहून हि, आपण जे करतो ते चूक आहे हे जाणून , आपल्या हातात सर्व सत्ता असून त्याचा गैरवापर न करणारी माणसे हि या जगात आहेत. " असंगाशी संग , प्राणाशी गाठ " हे माहित असताना त्या पासून लांब राहणे हे जितके चांगले त्यापेक्षा त्यांच्यात बदल घडवून आणणे जास्त चांगले. 
दुसऱ्याकडे बोट दाखवून दोष दाखविण्यापेक्षा ते दोष सुधारण्याचा प्रयत्न केला तर वाईट संगतीमुळे येणारी पिढी बिघडण्याचे प्रमाण नक्की कमी होईल.


 

4 comments:

  1. चान लिहिलेयस मिलन ... थोडकेच पण मार्मिक ... विचार करायला भाग पाडते

    ReplyDelete
  2. दुसऱ्याकडे बोट दाखवून दोष दाखविण्यापेक्षा ते दोष सुधारण्याचा प्रयत्न केला तर वाईट संगतीमुळे येणारी पिढी बिघडण्याचे प्रमाण नक्की कमी होईल. 👍

    ReplyDelete