'घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती' खरंच आहे हे . घर म्हटलं की डोळ्यासमोर येतात आई वडील,भावंड. आपले प्रत्येकाचे आपल्या घराशी एक वेगळेच नाते असते. पूर्वी दहा बाय दहा च्या खोलीत दहा माणसांचा संसार व्हायचा . तीन चार पिढ्या त्याच घरात लहानाच्या मोठ्या व्हायच्या. लग्न ,बारसे ,साखरपुडा असे सगळे समारंभ त्या लहान घरात संपन्न व्हायचे. आता वडील चाळीत राहतात ;मुलाचे लग्न झाले की मुलगा मोठे घर घेतो, त्याला मुलं झाली की अजून मोठे घर. का तर प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते. आणि मग सगळे आपापल्या कामावर निघून गेले की त्या इतक्या मोठ्या घरात राहतात ती दोघे म्हातारा म्हातारी एकमेकांना सोबत करत. एका
मोठ्या फिल्म स्टार ने आपल्या मुलाखतीत सांगितले होते कि लहान घरात मला
काही झाले तरी आई उठायची आणि मोठा झाल्यावर माझी आई एका खोलीत गेली ते मला
कळलेच नाही. मोठे घर आले कि प्रत्येकाची स्वतंत्र खोली. घरी आला कि जो तो आपल्या खोलीत स्वतःला बंद करून घेतो. प्रायव्हसी आणि स्पेस च्या नावाखाली कुटुंब एकमेकांशी तुटली जात आहेत. घरात आजी आजोबा असले तरी नातवंडे आपल्या मोबाइल आणि लॅपटॉप मध्ये जास्त रमतात. घरातले संवाद कमी होत चालले आहेत. छोट्या घरात आपण ऍडजस्टमेन्ट करून राहत होतो. एकमेकांना समजून घेत होतो. पण कितीही मोठ्या घरात गेले तरी आपल्या जुन्या घराच्या आठवणी काही पुसल्या जात नाही. तिथे आम्ही असे करायचो हा सण तो सण असा साजरा करायचो मज्जा यायची हि वाक्य प्रत्येक संमेलनाच्या वेळी बोलली जातात. घर कितीही मोठे असले तरी त्यात घरपण हवे नुसत्या विटा सिमेंट च्या भिंती काय उपयोगाच्या. घर म्हणजे आजी आजोबांचे आशीर्वाद, आई बाबांचे प्रेम, भावा बहिणींची लुटुपुटू ची भांडणे, शेजारच्यांचे प्रेम. आपण कितीही मोठी घरे घेतली , तरी आपल्या पहिल्या घराच्या आठवणीतच आपला जीव जास्त रमतो. त्या जुन्या घराच्या सगळ्याच गोष्टी आपण दर वेळी आपण नव्याने जगत असतो.
Kharach g jun te son mantatat na te hech.
ReplyDeleteVery true
ReplyDeleteyes khare ahe tai..
ReplyDelete