Friday, 24 February 2017

सॉरी

" सॉरी" एका शब्दात सगळे गुन्हे माफ. काही करा आणि सॉरी म्हणा कि समोरच्या व्यक्तीने माफ केलेच पाहिजे असे काहीसे गृहीत धरूनच आपण सॉरी म्हणतो. एखाद्या व्यक्तीला खूप दुखावून मग माफी मागण्यात काय अर्थ आहे , नुसत्या सॉरी ने समोरच्याचे दुःख हलके होणार असते का ? आश्चर्य अशा व्यक्तींचे वाटते जे ३-४ वर्ष किंवा जास्त एकमेकांसोबत असतात आणि अचानक एक दिवस त्यातले कुणीतरी एक म्हणते " सॉरी आपले काही जमणार नाही , आज पासून सगळे संपले."  इतक्या काळाचे ऋणानुबंध असे एका शब्दाने संपवता येतात?? हल्लीच्या पिढीचे हि थोडे फार असेच आहे मित्र मैत्रिणींना शंभर वेळा सॉरी म्हणतील पण आपण एखाद्या चुकी वरून रागावलो , ओरडलो तरी एका शब्दाने सॉरी येणार नाही. घरच्यांना किंवा पालकांना सॉरी म्हणायला थोडा कमीपणा प्रत्येकालाच वाटत असतो. काही जण असेही हि असतात कि सतत सारख्या त्याच त्याच चुका करतात आणि दर वेळी सॉरी म्हणतात , अशा वेळी आपल्याला " अंग्रेज चले गए , सॉरी छोड गए" हे वाक्य आठवते. 
जशा नाण्याच्या दोन बाजू तश्या या सॉरी च्या हि दोन बाजू आहेत . एखादी व्यक्ती अगदी मनापासून तुमची माफी मागते, नकळत का होईना आपण एखाद्याला दुखावले आहे याची जाणीव असते त्यांना. पण तरीही कधी कधी परिस्तिथी इतकी हाताबाहेर गेलेली असते कि नुसते सॉरी म्हणून परिथिती बदलत नाही. समोरची व्यक्ती तुम्हाला माफ करण्याच्या पलीकडे गेलेली असते. आपल्या सगळ्यांनाच स्वतःची चूक पटकन लक्षात येत नाही. पण समोरच्याने जराही दुखावले तरी आपण सॉरी ची अपेक्षा करतो. " सॉरी" या एका शब्दात खरंतर तुटणारी नाती टिकवण्याची ताकद  आहे. त्यामुळे परिस्थिती वाईट होण्या आधीच , एकमेकांच्या चुका शोधण्यापेक्षा एक पाऊल पुढे होऊन आपणच " सॉरी" म्हणून तुटणारी नाही जोपासण्याचा प्रयत्न करूया. फक्त लहानांनीच माफी मागावी हि प्रथा मोडून आपणही आपल्या मनाचा मोठेपण दाखवूया. 
दुसऱ्याला दुखावून  माफी मागण्यापेक्षा , त्याची कमीत कमी वेळ यावी असेच वागण्याचा आपण प्रयत्न करू या. 



Monday, 20 February 2017

पुनर्भेट

सकाळी १०-१०.३० ची वेळ तिचा फोन वाजला , नंबर पहिला आणि तिला थोडा धक्का बसला आज अचानक इतक्या वर्षांनी. तिने फोन उचलला समोरून "हॅलो कशी आहेस?" त्याचा आवाज. तिने जेमतेम हुंदका गिळत उत्तर दिले "बरी आहे आणि तू?" . "ठीक " नेहमी प्रमाणे एका शब्दात उत्तर. त्याच्या पुढच्या प्रश्नाने ती थोडी गडबडली, " उद्या काय करते आहेस भेटशील का?" एकदम अनपेक्षित. कितीतरी वर्षांनी अचानक त्याचा आवाज ऐकून आधीच तिच्या पोटात गोळा आला होता त्यात भेटणे म्हणजे डोक्यावरून पाणी. तिने विचारले कुठे? आपल्या नेहमीच्या ठिकाणी संध्याकाळी ४. ३० ला भेटू. ती हो म्हणाली आणि फोन ठेवला. परत एकदा तिचे मन भूतकाळात गेले. मोठ्या मुश्किलीने ती सगळे विसरायचा प्रयत्न करत होती. अशक्य गोष्टी शक्य करायचा खोटा प्रयत्न. आणि आज अचानक त्याचे असे परत येणे. तिला भूतकाळ डोळ्यासमोरून जात होता त्यांची पहिली भेट. पहिला स्पर्श. त्यांचे बोलणे भेटणे सगळेच. आज त्याचा फोन हि त्याच वेळेत आला ज्या वेळेत नेहमी त्याचा गुड मॉर्निंग चा मेसेज यायचा.  दोघांचे एकमेकांवर प्रेम होते पण ती  प्रत्येक वेळी  व्यक्त होत होती , तो कधीतरिच. तिला खूप काळजी होती त्याची आणि जरा जास्तच प्रेम होते तिचे. कदाचित हेच नकोसे झाले होते त्याला. तिचे त्याच्यावर हक्क गाजवणे त्याला जड गेले. तिला त्याचा तो शेवटचा फोन आठवला आणि इतक्या वर्षांनीही तिच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. किती तोडून बोलला होता तो. कानात शिसे ओतावे तसे प्रत्येक शब्द पडत होते कानावर. तिने सगळी कल्पना देऊनही त्याने तेच केले होते ज्याची तिला भीती होती. ती त्याच्या कडे आपले मन मोकळे करत होती. आपली सगळी सुख दुःख त्याला सांगत होती. म्हणूनच कदाचित त्याचे एक वाक्य तिला जास्त खटकले होती " तुमचे त्रास तुमच्या जवळ ठेवा, मला सांगू नको". त्याच्याशी बोलताना तिला जाणवत होते कि तिचीही चूक होतीच. जरा जास्तच अधीर झाली होती ती त्याला भेटायला. त्याची त्या वेळची  परिस्थिती माहित असूनही तिने समजुदार पण दाखवला नाही. त्याची शिक्षा तिला मिळाली होती त्याने तिला सगळीकडे ब्लॉक केले होते. फोन ठेवताना तिने म्हटलेले सॉरी हि त्याला नकोसे झाले होते. तो दिवस आणि आजचा दिवस काही कॉन्टॅक्ट नव्हता त्यांचा. मग आज अचानक?
दुसऱ्या दिवशी पटापट कामे आटपून निघाली. उशीर नको व्हायला म्हणून जरा अंमळ लवकरच निघाली. काल  पासून चित्त थाऱ्यावर नव्हते. भेटून काय बोलणार? का काही राहिले होते ते ऐकवायला परत? हजार शंका. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट विचारच जास्त होते. ठरल्या ठिकाणी वेळे आधीच आणि आश्चर्य तो तिच्या आधीच आला होता. काही बदल झाले नव्हते झाले त्याच्यात तसाच होता चेहऱ्यावरचे तेज हि जराही कमी नव्हते. तिला पाहून त्याचे डोळे हि लाकाकले , जसे आधी व्हायचे तसेच. तिच्या डोळ्यात मात्र पाणी होते. इतक्या वर्षांनी. मधल्या काळात जणू गायबच झाला होता तो. एकमेकांना बघून नुसते हसले आणि दोघे आत गेले , नेहमीच्या टेबल वर जाऊन बसले. तो तिला टक लावून पाहत होता. तिची मात्र हिम्मत होत नव्हती त्याच्या कडे पाहायची, आणि डोळ्यातले पाणी लपवायला ती खाली  मान घालून बसली होती. एक भयाण शांतात होती दोघांमध्ये. जशी त्याच्या पहिल्या भेटीच्या वेळी आणि शेवटच्या फोन च्या वेळी होती. शेवटी तोच बोलला कशी आहेस? तिने जेमतेम मन डोलावली. मग तो बोलत होता. त्या वेळी रागाच्या भरात खुप बोललो. पण काही केल्या राग शांत होत नव्हता , आणि परत तू तसेच वागशील म्हणून बोललोच नाही. वाटत होते कधीतरी भेटावे बोलावे पण परत तुझे वागणे आठवले कि नको वाटायचे. ती शांतपणे ऐकत होती. डोळ्यातून अश्रूंची धार सुरूच होती. तशाच कातर  आवाजात तिने सुरवात केली, मला हि पटले होते कि चूक दोघांचींहि होती. मी खरंच समजुदारपणा दाखवायला हवा होता, पण काही गोष्टी नाही घडत आपल्या मनासारख्या. आणि नंतर कशी माफी मागणार होते तुझी , तू सगळे मार्ग बंद केले होतेस. तू ब्लॉक करूनही मी रोज मेसेज करत होते पण जोपर्यंत मी धीर धरला होता ते मेसेज पोचलेच नाही आणि मग मी आशा सोडून दिली. नंतर ती भडाभडा बोलत होती तो फक्त ऐकत होता. थोडासा तो हि हळवा झाला होता. आणि त्याच्या तोंडून पटकन  निघाले "सॉरी" . तिने हि  पटकन वर पहिले त्याच्या हातावर हात ठेवून थँक्स म्हणाली आणि छोटीशी स्माईल दिली. इतक्या वेळात प्रथम दोघांनी एकमेकांकडे पहिले होते. तो पटकन म्हणाला खूप बदलली आहेस तू. तिचे उत्तर " तूच शिकवलंस". ना विसरणार धडा दिलास.  मग सगळ्या जुन्या आठवणी , इतर गप्पा मधेच रडून मधेच हसून दोघे बोलत होते मनमोकळे . खूप वर्षांनी . दोघे निघाली तो म्हणाला सोडू का म्हणाली नको जाईन मी , त्याला अपेक्षित नव्हते हे. थोडा नाराज झाला तो. तिने रिक्षा थांबवली. दोन पावले पुढे जाऊन परत मागे फिरली त्याच्या जवळ येऊन म्हणाली " I still Love you" . तो हि पटकन "me too" म्हणाला. त्याने विचारले आता कधी भेटशील , तिने हसून उत्तर दिले " नो आयडिया ", आणि निघून गेली. तो हसत तिच्या पाठमोऱ्या आकृती कडे पाहत राहिला. पुढच्या भेटीची स्वप्न पाहत ...................................................



Thursday, 16 February 2017

रंग

आपल्या कडे सुंदर म्हणजे साधारण गोरी व्यक्ती असे काहीसे समीकरण आहे. अगदी दोन सारख्या दिसणाऱ्या व्यक्ती असल्या तरी जी व्यक्ती जरा रंगाने उजळ असते तीच छान असे काहीसे समीकरण आहे. लग्न करताना हि प्रत्येक जण मुलगा किंवा मुलगी दिसायला कसे आहेत ते पाहतात. नाकाचे भजे असले , डोळे बारीक असो किंवा आणखी काही पण रंग गोरा असला कि सगळे चालून जाते. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम असतात. पण हा विचार कुणी करत नाही कि अचानक काही झाले आणि कुरुपत्व आले मग काय संसार अर्ध्यावर सोडून जाणार का ? 
"अगं तू गोरी आहेस, कुठलाही रंग शोभेल तुला" असे संवाद बऱ्याच वेळा ऐकायला येतात आपल्याला. सावळ्या  रंगावर काही शोभत नाही का? हा दुजाभाव का? आपणच स्वतःला का कमी लेखतो. मुळात रंग हा काही गुण नाही ज्याची तुलना व्हावी. मुळात कोणाची कोणाही तुलना करणेच चूक आहे कारण प्रत्येक जण वेगळा असतो , त्याचे गुण वेगळे असतात. तुलना करून  आपण लोकांना दुखावते आणि मग नको त्या जाहिराती वाल्यांचे फावते. 

मुळात रंगाने सावळे असणे म्हणजे वाईट दिसणे हे समीकरणच कळत नाही. भगवान श्रीकृष्ण हि सावळे आणि आपली विठू माउली हि सावलीच ना . पण आपण मनोभावे पूजा करतो ना त्यांची. मग माणसांमध्ये हा भेद का? आपण त्या बाहेरच्या देशांनाही म्हणतो गोऱ्यांचे  देश पण आपल्या देश सारखी रंगाचीच काय तर इतर कशाचीही विविधता आहे का त्यांच्या कडे?

आपल्या गोऱ्या रंगावर गर्व करणारी हि बरीच माणसे असतात , पण देवाने दिलेली गोष्ट आहे ती, जी कमावण्यात आपला काहीच वाटा नाही त्या गोष्टीचा गर्व का करावा? 

सुंदर दिसण्याचा प्रयत्न करण्या पेक्षा मानाने सुंदर होण्याचा प्रयत्न करावा, अगदी जग नाही जिंकता आले तरी या जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसांची मने मात्र नक्कीच जिंकता येतील. 




Tuesday, 14 February 2017

"घेई छंद"


खरंतर नोकरी करणारी गृहिणी म्हटलं कि तिला स्वयंपाक आणि ऑफिसचे काम या व्यतिरिक्त काही छंद जोपासता येत नाही. खरं हि आहे, घर ऑफिस या तारेवर
​च्या ​
 कसरती मूळे वेळच मिळत नाही. 
​पण त्यातुन वेळ काढून आमच्या सारख्या काही हौशी गृहिणी आपले छंद जोपासतात. तसाच मी हि एक छंद जोपासलाय "लिखाणाचा". खूप काही नाही पण जेव्हा खूप एकटं वाटते किंवा एकदम कधीतरी काही सुचायला लागले कि हातात पेन आणि वही घेऊन लिहायला बसायचे. मनातल्या सगळ्या वादळांना मोकळे करून द्यायला हा उत्तम मार्ग आहे. 
     सुरवातीला सगळं फक्त  वहीतच राहिले होते पण "मुंटा " च्या माध्यमाने २-३ लेख पेपर मध्ये छापून आल्यावर वाटले कि आता काहीतरी जास्त लिहायला हवे म्हणून मी स्वतःचा ब्लॉग सुरु केला https://milan1303.blogspot.in/​. वेगवेगळ्या विषयांवर लिहायला आवडायला लागले. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींवर आपले मत मांडायला हा एक मार्ग. मनात येणाऱ्या विचारणा एक वाट म्हणून ब्लॉग चे नाव हि दिले आहे " कधी गोष्टी मनातल्या"  ब्लॉग वाचून होणारे कौतुक पाहून जास्त जबाबदारी वाढवायला लागली आहे याची जाणीव होते. 


     तसा मला अजून एक छंद  आहे " मिरर इमेज " मध्ये लिहिण्याचा. काहीतरी नवीन करून पाहावे म्हणून सहज उलट लिहायचा प्रयत्न केला आणि जमायला लागले. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये आता बऱ्यापैकी 
" मिरर इमेज "
 लिहायला यायला लागले आहे.
     दोन्ही गोष्टी करताना एक वेगळा मानसिक आनंद मिळतो. आपण हि काहीतरी वेगळे करू शकतो हि जाणीव खूप आत्मविश्वास देऊन जाते. मनाला आणि शरीराला आलेली मरगळ निघून जाते. 
    खरेच प्रत्येक गृहिणीने असा आपल्याला आवडणारा एक तरी छंद जोपासावा. सगळ्या दगदगीतू, रुटीन मधून आपल्यासाठी थोडासा वेळ नक्की काढावा. आपल्या मधील कलागुणांना असे दाबून का ठेवायचे? आपल्या छंदासोबत आपल्याला आपले अस्तित्व हि जोपासता येते. 

माझ्या लिखाणाला सगळ्यांचे प्रेम, प्रोहत्सान असेच मिळत राहो आणि माझ्या कडून अजून काहीतरी चांगले लिखाण घडो हीच प्रार्थना.    






Monday, 13 February 2017

"थँक यू "

"थँक यू " आहेत दोनच शब्द पण म्हणायला खूप कठीण. एखाद्या परक्या माणसाला आपण सहज म्हणून टाकतो पण तेच आपल्या माणसांना म्हणायला ते खूप जड. कुणा एका अनोळखीव्यक्तीने आपल्याला थोडी  हि मदत केली तर आपण लगेच थँक्स म्हणून मोकळे होतो , अगदी सहजच ते आपल्या तोंडून जाते. पण कधी विचार केलाय आपण आपल्या आसपासच्या लोकांचे कधी मानतो का आभार? आपले आई वडील आपल्या साठी इतके काही करतात पण आपण त्यांना कधी थँक्स म्हणत नाही. जे करतात ते त्यांचे कर्तव्य आहे असाच समज असतो आपला. आपल्या मुलांनाही कधी थँक्स म्हणावे असे आपल्याला  वाटत नाही. आता मुलांना का म्हणायचे थँक्स हा प्रश्न आहेच. पण आपल्याला पालकत्व देणाऱ्या त्या चिमुरड्या जीवाला का देऊ नये धन्यवाद ? जगातली सर्वात सुंदर जाणीव आपल्याला करून देणाऱ्या मुलांना कधीतरी थँक्स म्हणायला काय हरकत आहे. त्यांच्या मुळे किती तरी वेळा आपल्या आयुष्यात अभिमानाचे क्षण येतात. घरातली कुठलीही व्यक्ती जी आपले काम एक कर्तव्य म्हणून करते त्या प्रत्येकालाच आपण "थँक्स" म्हटले पाहिजे, मग ते आई, बाबा असोत , नवरा बायको असोत किंवा आपली मुले.
 आपल्याला मदत करणारे आपले शेजारी , इमाने इतबारे आपल्याकडे बरेच वर्ष काम करणारी आपली कामवाली किंवा नोकर माणसे. त्यांना पगार देतो म्हणून ते काम करतात ठीक आहे पण तरीही माणुसकी म्हणून कधीतरी त्यांचे हि आभार मानायला काय हरकत आहे.
तिथे परदेशात म्हणे "थँक्स गिविंग डे " साजरा करतात म्हणे. आपण तर रोजच साजरा करू शकतो ना. आपल्या आयुष्यात अशी बरीच माणसे असतात जी अप्रत्यक्षपणे आपल्याला मदत करत असतात, बरीच माणसे अशी असतात कि ज्यांना तुमच्या कडून थँक्स ची अपेक्षा नसते किंवा तुम्ही हि त्यांच्या साठी काही करावे अशीही अपेक्षा नसते तरी ती तुमच्या साठी काही ना काही करत असतात. आपणही त्यांना कधीच थँक्स म्हणत नाही , मुद्दाम असे नाही पण त्यांचे प्रयत्न आपल्या ध्यानातच येत नाहीत. अशा सगळ्यांनाच एकदा थँक्स म्हणायलाच हवे.  जितक्या सहजतेने आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणीच्या खांद्यावर थाप मारून म्हणतो "थँक्स यार " , तसेच आपल्या साठी मनापासून काहीतरी प्रत्येकाच्या खांद्यावर अशी प्रेमाची थाप नक्कीच द्या . तुमच्या एका आभार मानण्याने त्यांच्या मनातले तुमच्या बद्दल चे प्रेम आपुलकी दुपटीने वाढेल.
माझ्या हि आयुष्यात आलेल्या माझ्या प्रत्येक शुभ चिंतकाला, मला  अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष पणे मदत करणाऱ्या प्रत्येकालाच माझ्या कडून शतशः धन्यवाद.

Friday, 10 February 2017

"नाती"

'नातं' शब्द म्हटलं कि आठवतात ती रक्ताची नाती. आई बाबा मामा मामी मावशी आत्या काका काकू भाऊ बहीण आणि अशीच बरीच चुलत मावस नाती. पण आपण हल्ली कितीशी जपतो हि रक्ताची नाती? लग्न मुंज बारसे आणि अगदी कुणी गेले कि आपल्याला सगळ्यात आधी आठवतात. अर्धी अधिक नाती तर " लोक काय म्हणतील?" या भीतीपोटीच जपली जातात. आपल्याकडे  बराचश्या नात्यांबद्दल गैरसमज जास्त आहेत, म्हणजे सासू-सून , नणंद - भावजय , भाऊ-भाऊ यांचं पटत नाही. नात्याची सुरवातच जर आपण मानत अढी धरून केली तर  ती नाती फुलणार कशी? कितीतरी ठिकाणी सासू-सुना, नणंद -भावजय मैत्रिणीसारख्या तर सासरे-जावई , भाऊ-भाऊ मित्रांसारखे राहतात. जिथे नाती येतात तिचे हक्क येतो, अपेक्षा येतात आणि साहजिकच मग अपेक्षा पूर्ती ना झाल्याने ने होणारे वाद येतात. इथे प्रत्येक जण दुसऱ्याला जबाबदार धरत असतो, मी मोठा तो लहान मीच का नमते घेऊ असे अहंकार घेऊन बसतो. एखादे पाऊल मागे जाण्याची कुणाची तयारी नसते कारण आपल्यावर लहानापासून हेच बिंबवले गेले असते ना कि चूक मोठ्यांची नसते लहानांनी माफी मागायची असते. दर वेळी लहानांनी माफी मागावी असे नाही कधी कधी मोठ्यांनीही आपला मोठेपणा दाखवून लहानांना माफ करायला हवे.  बऱ्याचदा नात्यांमध्ये कडवडपणा हा एकमेकांना गृहीत धरल्यानेच येतो. कदाचित नात्यांमध्ये असलेल्या बंधनांमुळे आजची पिढी हि मित्र मैत्रीणमध्ये जास्त रमते. 
आपल्या आयुष्यात अजून एक नातं असते ते गुरु शिष्याचे नातं . शाळेत असताना एखाद्या शिक्षकांशी आपण अगदी बांधले जातो. आपल्या आई वडिलांसारखे आपण त्यांना मानतो. त्यांनी शिकवलेले संस्कार आपण कधीच विसरत नाही. कधी कधी घरच्यांपेक्षा आपण त्यांचे जास्त ऐकतो. 
खरेतर सर्वात सुंदर नातं 'मैत्रीचं' , निखळ आणि अतिशय सुंदर. या नात्याला कुठलीही सीमारेषा नसते. आपल्या कडे ना एक सवय आहे दोन माणसं जर एकमेकांच्या जवळ असतील , मग ते पुरुष असोत व स्त्रिया त्यांच्या नात्याला एक नाव दिले जाते. कुठल्याही नात्याला नाव दिले कि त्यावर बंधन येते. त्यातली मोकळीक निघून जाते. एका मित्राने दुसऱ्या मित्राला घरासाठी पैसे कमी पडतात म्हणून स्वतःच्या बायकोचे दागिने गहाण ठेऊन पैसे दिले. असे एखादा सख्खा भाऊ हि करणार नाही.
बऱ्याच वेळा वयात आलेल्या मुलांच्या आई बाबाना सांगितले जाते कि त्यांचे पालक कमी आणि मित्र जास्त व्हा , कारण खरंच जर प्रत्येक नात्यात जर मैत्रीचा ओलावा असेल तर त्या नात्याचा गोडवा आयुष्य भर अनुभवता येतो.



Tuesday, 7 February 2017

वॅलेंटाईन्स ​डे

फेब्रुवारी महिना म्हटलं कि वेध लागतात ते वॅलेंटाईन्स ​डे  चे. अगदी शाळेच्या मुलांपासून ते अगदी लग्न झालेल्या जोडप्यांपर्यंत सगळ्यांनाच. नुकत्याच प्रेमात पडलेल्या लोकांना तर हा दिवस म्हणजे दिवाळीच. खरतर हा दिवस म्हणजे त्या "वॅलेंटाईन्स" नावाच्या संतांचा पुण्यस्मरण दिवस म्हणायला हवा. ज्या मुलाला एखादी मुलगी किंवा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडत असेल तर याच दिवशी प्रेम व्यक्त करायाचे कारण या दिवशी नकार यायची शक्यता फार कमी असते असा समज आहे . नकार पचवायची ताकद नसेल तर प्रेम करायचेच का? असे जबरदस्ती चे प्रेम काय उपयोगाचे. जर तुमचे खरंच प्रेम आहे तर  वर्षांचे ३६५ दिवस आहेत कि,  कशाला निवडून एकच दिवस हवा प्रेम व्यक्त करायला. आणि प्रेम साजर करायला हि तो एकच दिवस कशाला हवा? तुमची झालेली पहिले भेट, त्याचा वाढदिवस तिचा वाढदिवस, प्रथमच एकमेकांशी बोललात तो दिवस , कितीतरी दिवस असतात साजरे करायाला पण आपण मात्र तो एकच दिवस धरून बसतो. काही काही लोकांची तर मला गम्मतच वाटते म्हणजे एरवी त्यांना अजिबात वेळ नसतो एकमेकांशी बोलायला, भेटायला पण या दिवशी आवर्जून वेळ काढतील. एकमेकांना भेटी देतील. हे कसले दिखाऊ प्रेम. आणि प्रेम फक्त एक मुलगी आणि मुलगा यातच येत का? आपण आपल्या आई वडील , भावंडांवर हि प्रेम करतो , मित्र मैत्रिणींवर हि करतो मग त्यांच्या सोबत का नाही करत हा दिवस साजरा? आणि जर तुमचे प्रेम खरें असेल ना तर त्याला अशा विशिष्ट दिवसाची गरज नाही ते कधीही व्यक्त करा ते तुमचेच असेल. त्या दिवशी होकार घेऊन २ महिन्यांनी वेगळे होणारे प्रेम करायचेच कशाला? आधी कुठे होता वॅलेंटाईन्स ​डे तरी लोकं प्रेमात पडतच होती ना आणि निभावत पण होती. एका अपंग व्यक्ती वर एका धडधाकट माणसाने २५ वर्ष प्रेम केले आणि लग्न हि केले तिच्याशीच त्यांनी नाही केला कधी वॅलेंटाईन्स डे साजरा. आज वयाच्या साठी मध्ये हि ते एकमेकांची सोबत देत आहेत याला म्हणतात प्रेम. करायचे असेल तर निर्मळ, निस्वार्थी प्रेम करा. असे पाश्चात्य संस्कृती चे अनुकरण   कशाला? त्यापेक्षा आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यांना सरप्राइज द्या , त्यावेळी त्यांच्या चेहऱ्या वरचा आनंद हा तुमच्या ठरवून दिलेल्या वॅलेंटाईन गिफ्ट पेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद देईल त्यांना हि आणि तुम्हालाही. 

तरीही नुकत्याच प्रेमात पडलेल्या आणि वॅलेंटाईन्स ​डे च्या दिवशी प्रेमाच्या महासागरात हेलकावे खाणाऱ्या सगळ्याच प्रेमवीरांना आमच्याकाढून खूप खूप शुभेच्छा.  




Sunday, 5 February 2017

गोष्ट "ती" च्या "त्या " ची -"ती" च्या निस्वार्थी प्रेमाची

ती नुकतीच वयात आलेली , तो हि आसपास तितकाच एक दोन वर्षाचा फरक. पहिल्यांदा रस्त्यात त्याला पाठमोरे पहिले आणि त्याच्या त्या पाठमोऱ्या आकृतीच्या ती प्रेमात पडली. एकदा बरेच सामान घेऊन ती येत होती इतक्यात मागून आवाज आला " Excuse me " हे तुमचे आहे का? , "बापरे!! हा तर त्याचाच आवाज. ती झर्रकन मागे फिरली आणि त्याच्या हातातली पिशवी घेतली. तिचा आवाजही फुटत नव्हता कसे बसे त्याचे आभार मानून ती भरभर पुढे गेली.  त्याला असे अचानक  समोर पाहून  तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. अगदीच मदनाचा पुतळा नसला तरी पहिल्यांदा पाहिल्यावर कुणीही प्रेमात पडावे असा नक्कीच होता. ती पहिल्यांदाच आणि पाहताक्षणी त्याच्या प्रेमात पडली. नंतर कधी रस्त्यात कधी एखाद्या कार्यक्रमात त्यांची भेट होत होती. त्याला एकदा पाहता यावे म्हणून तिची सतत धडपड असायची, तो मात्र या पासून अगदीच अलिप्त होता. आधी नुसतेच हसणे, मग बोलणे आणि मग हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. एकमेकांचे नंबर घेतले गेले. मग कधी मेसेज कधी फोन त्यांच्यातले संवाद वाढू लागले. आणि एक दिवस आता एका भेटूच अशा निर्णयावर पोचले. दोन दिवस आधी पासूनच तिच्या हृदयाची धडधड वाढली होती, काय होईल , तो काय बोलेल या विचाराने तिला झोपही लागली नाही. त्याच्या मनात नक्की काय होते हे त्याचे त्यालाच ठाऊक नेहमी प्रमाणे ती  " प्रश्नचिन्हा " तच  होती.  भेटीचा दिवस उजाडला कधी स्वप्नातही विचार केला न्हवता ती गोष्ट प्रत्यक्षात घडत होती. "तो" "तिच्या सोबत असणार होता पूर्ण दिवस. दिवसभर दोघे खूप भटकले, खूप गप्पा झाल्या , जेवणही झाले. मोठ्या मुश्किलीने "ती" आपल्या भावनांना बांध घालत होती, कारण तो अगदी शांत होता समुद्रासारखा , मनात खोलवर असणारी खळबळ चेहऱ्यावर दिसू देत नव्हता.पण शेवटी त्याच्याच संयम सुटला त्याने आपल्या भावना मोकळ्या केल्या. तिला कळतच नव्हते की नक्की काय करावे , हसावे कि रडावे. तो आपला आहे हि जाणीव खूप सुखकर होती पण त्याहि पेक्षा त्याला गमावण्याची भीती जास्त होती. पण दोघेही खुश होते. मग हळू हळू सवांद वाढले . फोन , मेसेजेस जास्त होऊ लागले. तिला त्याच्या शिवाय दुसरे काही सुचत नव्हते,   थोड्या फार फरकाने त्याचे हि तसेच होते. त्यांच्या भेटी हि वाढल्या आणि एका बेसावध क्षणी ते दोघे एक झाले. हवीहवीशी वाटणारी पण तरीही नकॊ असणारी गोष्ट घडली होती. पण नियतीच्या मनात बहुदा हेच होते. आता ती त्याच्या जास्त जवळ गेली होती आणि तो थोडासा लांब. त्याला कुठलेही बंधन नको होते, असे कुणात गुंतून पडणं त्याला नको होते. हळू हळू त्याने तिला टाळायला सुरवात केली , त्यांच्यातले संवाद कमी झाले. तिने कितीही भेटायचं हट्ट केला तरी तो काही ना काही कारण काढून टाळता होता. मेसेजस ला रिप्लाय येत नव्हता. फोन ची नुसती वाजणारी रिंग ऐकून तिच्या डोळ्यात पाणी दाटत असे.  कधी तरी जनरल बोलणे होत होते. नक्की काय झाले होते त्याचे काम करियर जास्त महत्वाचे होते ? कि त्याच्या आयुष्यात दुसरे कुणी आले होते? ती परत एकदा "प्रश्नचिन्हात" गेली होती. तिचे त्याच्या  वरचे प्रेम काही केल्या कमी होत नव्हते. "तो" तिच्यासाठी सर्वकाही होता. त्याच्या गुणदोषांसकट तिने त्याला स्वीकारले होते.पण  त्याचे असे अचानक पाठ फिरवणे तिच्या पचनी पडत नव्हते . एकट्यात रडून रडून ती तिचे दुःख सगळ्यांपासून लपवून ठेवत होती. त्याचे असे सतत  दुर्लक्ष करणे तिला सहन होत न्हवते , शेवटी मनावर दगड ठेवून तिने ठरवले कि आपणही त्याच्या आयुष्यात ढवळा ढवळ करायाची नाही.आपले प्रेम आपल्या पुरता मर्यादित ठेवायचे. कळत होते कि त्याच्याशिवाय राहणे शक्य नाही तरी तिने फक्त "त्याच्या " साठी स्वतःला बदलायचे ठरवले. एक पाऊल ती मागे गेली. त्याने दिलेल्या सुंदर आठवणींवर ती जगत होती. त्याच्याबद्दल तिच्या मनात काही अढी नव्हती कि राग नव्हता , "तो" "ती" चे पहिले आणि शेवटचे प्रेम होता, जे काही होते ते अगदी मनापासून होते. पण मनातून ती सतत त्याची वाट पाहत होती. आपल्या फोनवर कधीतरी त्याचे नाव फ्लॅश होईल या वेड्या आशेवर सतत तिचे लक्ष फोन कडे असायचे. रिंग वाजली कि कुठेतरी आशेचा किरण दिसायचा पण तिच्या पदरी फक्त निराशाच होती. तो कधी तिला समजू शकला नाही. कुठलेही कारण न देता तो तिला दुरावला होता. शेवटी तिला पडलेले सगळे प्रश्न , त्याच्या बद्दल वाटणारे प्रेम , सगळ्या गोड आठवणी आपल्या सोबत घेऊन ती लांब निघून गेली  ........ कायमची. आता कधीतरी त्याचे नाव फ्लॅश होईल तिच्या मोबाईल वर पण ती नुसती वाजणारी रिंग ऐकून कदाचित त्याच्या हि डोळ्यात पाणी येईल अगदी "ती" च्या यायचे तसेच....................


   

Saturday, 4 February 2017

स्पर्श

*स्पर्श*

कधी कधी बोलून दाखवू शकत नाही अशा भावना डोळ्यातून आणि स्पर्शातून व्यक्त करता येतात.  प्रत्येक स्पर्शाची एक वेगळी भाषा असते. ती भाषा त्या त्या वेळी आपण सगळे ह अनुभवत असतो. जन्म ते शेवट या प्रवासात निरनिराळ्या स्पर्शाची आपल्याला अनुभुती येते. सगळ्याच चांगल्या वाईट.

बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या आईचा झालेला  त्या बाळाचा पहिला स्पर्श, त्या स्पर्शा इतकादुसरा सुखद,सुंदर आणि अप्रतिम स्पर्श या जगात नाही. सगळ्यांच्या आयुष्यातला पहिला अनुभव. बाळाच्या कोमल स्पर्शाने आईला झालेली मातृत्वाची जाणीव ,आणि त्या चिमुरड्या जीवाला जगात आल्यावर मिळालेला पहिला आधार. त्यानंतर वडिलांनी बाळाला हातात घेतल्यावर आपल्यावरच्या जबाबदऱ्यांची जाणीव झालेला तो स्पर्श.

आपण एखादी चांगली गोष्ट केल्यावर आजी, आजोबा, आई ,बाबा किंवा घरातील कुठल्याही वडीलधाऱ्या व्यक्तींनी मायेने फिरावलेला हात, आपल्याला अजून काहीतरी नवीन करण्याची जिद्द देऊन जातो. आपण जेव्हा खूप मोठे होतो, आणि त्यावेळी काहीतरी चांगले घडल्यावर किंवा खूप एकटं वाटत असताना आपल्याला शब्दांच्या आधारापेक्षा  गरज असते ती त्या मायेच्या स्पर्शाची. आपण एकटे असताना , खूप संकटात असताना आपल्या जवळच्या व्यक्तीने प्रेमाने पाठीवर ठेवलेला हात आपल्याला भक्कम आधाराची जाणीव करून देतो. आणि आपण एकटे असताना  त्या स्पर्शाची उणीव आपल्याला बऱ्याच वेळा जाणवते.

उमलत्या वयात झालेला पहिल्या प्रेमाचा स्पर्श , नेहमीच प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. त्या काळात चुकून झालेला स्पर्श ही तन आणि मन दोहोंवर मोरपीस फिरवून जाते. गर्दीत प्रियकरचा हात घट्ट पकडताना, घाबरल्यावर त्याला बिलागताना प्रेयसीला त्याच्या त्या उबदार स्पर्शात सुरक्षिततेची जाणीव होते. शब्दांपेक्षा प्रियकर प्रेयसी स्पर्शाने एकेमएकांशी जास्त बोलतात. लग्नानंतर आपल्या जोडीदाराचा पहिला स्पर्श आपल्याला आयुष्यभर साथ देण्याचे वचन देऊन जातो. 

म्हातारपणी मुलांनी किंवा नातवंडांनी आधारासाठी पुढे केलेला हात , आपल्याला सगळे कष्ट त्रास विसरायला लावतो. विचारात असताना त्या म्हाताऱ्या हातांवर हात ठेवून "कशाला आता कसला विचार करायचा आता मस्त जगायचं" असे म्हटलं तर त्याचं म्हातारपण हि सुखकर असल्याची जाणीव होईल आणि चेहऱ्यावरचे गोड हसू जगण्याची ताकत. तसेच आपल्या वडीलधाऱ्या व्यतीचा तो सुरकुत्या पडलेला हात डोक्यावरून फिरला की अंगात नवचैतन्य संचारते.  त्या सुरकुत्यांमधून त्यांनी पाहिलेल्या व झेललेल्या सर्व चढउतारांनी आलेली ताकत ते आपल्याला बहाल करतात जणू.

ज्या व्यक्तींना बोलता येत नाही , दिसत नाही अशा व्यक्तीचे स्पर्शज्ञान खूप चांगले असते असे म्हणतात. नुसत् स्पर्शून ते सगळे ओळखू शकतात.  तसेच प्रत्येक स्त्रीला हि एक स्पर्श ओळखण्याचे एक वेगळे ज्ञान देवाने दिले आहे.  तिला व्यक्तीच्या स्पर्शातूनच काय तर नजरेच्या स्पर्शातून ही  जाणवते कि समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे. त्यामुळेच तिला मृदू हृदया सोबत एक रणरागिनींचे हृदय ही दिले आहे. वेळ पडली तर ते ही रूप ती घेऊ शकते.

कोणी रागावल्यावर , रुसल्यावर त्या व्यक्तीला प्रेमाने जवळ घेतल्यावर त्या व्यक्तीचा राग रुसवा कुठल्या कुठे पळून जातो. आपण जेव्हा आजारी माणसाला पाहायला जातो तेव्हा निघताना त्या रुग्णाच्या हातावर हात ठेवून *काळजी घे*  म्हटलं की त्या व्यक्तीला किती बरे वाटतं हे त्या व्यतीचा पाणावलेल्या डोळयांच्या कडा सांगून जातात.


जीवनात हरलेल्या माणसाला प्रेमाचे चार शब्द आणि मायेने पाठीवरून फिरवलेला हात जगण्याची नवी उमेद नक्कीच देऊन जातो. आणि म्हणूनच एखाद्याच्या एकटेपणाच्या वेळी, दुःखाच्या वेळी नुसते शाब्दिक सांत्वन न करता त्या व्यक्तीच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला तर त्याचे अर्धे टेन्शन निघून जाईल.

म्हणूनच कदाचित म्हणतात ना *Keep in Touch*


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️