Tuesday, 24 January 2017

मैत्री

"मैत्री" शब्ध उच्चरला तरी आपल्या समोर बरीच माणसे येतात. लहानपणापासून अगदी म्हातारे होईपर्यंत आपली बऱ्याच जणांशी मैत्री होते. शाळेत, आजूबाजूला, कॉलेज मध्ये, मग नोकरी शेजारी, ट्रेन मध्ये, अगदी रोज येण्या जाण्याच्या रस्त्यावर सुद्धा आपली एखाद्याशी मैत्री होते. ह्या सगळ्या मध्ये प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या खूप जवळचे होते. त्या व्यक्तीला  आपण आपले सगळे त्रास, आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. ती हि व्यक्ती तितक्याच आत्मीयतेने आपले ऐकून हि घेते. प्रत्येक वयात झालेली मैत्री हि वेगळी  असते. बालपणीची,शाळेतली निरागस मैत्री, कॉलेज मध्ये थोडासा विचार करून केलेली,आई वडिल्यांच्या धाकाने मोजक्याच लोकांशी केलेली मैत्री. मग ऑफिस मध्ये ८ तास ज्याच्या सोबत काढतो त्यांच्याशी आपसूकच होऊन जाते ती मैत्री. मग शेजारी ज्यांच्या कडे " आमचा गॅस येणार आहे , घ्याल का जरा?" अशा काहीश्या  संवादाने सुरु होते ती मैत्री.  कधी कधी आपण त्या व्यक्तींना दुखावतो हि , कधीतरी आपण दुखावले जातो पण तरीही त्या व्यक्ती पासून आपण दुरावत नाही. 

मैत्री म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची मैत्रीची व्याख्या वेगळी.  कुणासाठी  फोन वर तास तास बोलने  म्हणजे मैत्री, तर कुणासाठी विकेंड ला हँगआउट करणे म्हणजे मैत्री. सध्याच्या ह्या वर्चुअल जगात मैत्री धरून ठेवणे बरेच सोप्प झालेय. कुठल्याही सोशल साईट वर ग्रुप करायचा आणि मग तिथे सगळ्यांशी मेसेजेस ने टच मध्ये राहायचे. पण याच साईट वर २४ तास ऑनलाईन असणाऱ्यां या मित्र मैत्रिणींना प्रत्यक्षात भेटायचे म्हटले तर बऱ्याच वेळा जमतच नाही. सातासमुद्रा पार राहणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींशी जोडून राहण्याचा हा उत्तम पर्याय असेलही पण खरंच आपण मनापासून असे किती जणांशी जोडलेले असतो. मैत्री म्हणजे तरी काय " "निखळ आनंद ' . ज्यांच्या सानिध्यात आपण आपले " मी " पण  हरवून बसतो ती खरी मैत्री. कितीही भांडलो तरी एका हाकेला धावून येणे म्हणजे मैत्री. तो बोलत नाही तर मी का बोलू असे ना करता " साल्या तुला काय धाड भरलीय ?? ना बोलायला....  " असे हक्काने विचारणे म्हणजे मैत्री. 

मैत्री दिनाच्या निमित्ताने एकमेकांच्या हातावर दोरे बांधून हल्ली मैत्री व्यक्त करतात. मला तर हसायलाच येते दुसऱ्या दिवशी ह्यांची मैत्री केराच्या टोपलीत जाते. हातावर पेनाने नाव काय लिहितात. त्यापेक्षा मनावर नाव गोंदवले तर ते कायम नाही का राहणार? अशी नुसती दिखाऊ मैत्री काय कामाची ? आपल्या आयुष्यात बरेच मित्रमैत्रिणी असतात, पण ज्यांच्याकडे आपण आपले मन मोकळे करतो असे जिवाभावाचे अगदी मोजकेच. लांब जाऊनही जे नेहमी हृदयाच्या जवळ असतात असे फार थोडेच,  कधी कधी बालपणापासून एकत्र असून एखाद्याशी आपली गट्टी जमत नाही तेवढी कधीतरी अचानक आपल्या आयुष्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीशी जमून जाते. 

मैत्रीचे दुसरे नाव म्हणजे " विश्वास". जिथे विश्वास नाही तिथे मैत्री टिकूच शकत नाही. मैत्रीत रोज भेटणे गरजेचं नसते पण जेव्हा भेटतो तेव्हा विरह काळाचा पत्ता न लागता एकरूप होणे म्हणजे मैत्री. " अरे!! आम्ही रोज बोलतो , he is or she is my good friend" असे म्हणणाऱ्या व्यक्तीला हि अडचणीत आपल्यावर सगळ्यात आधी जी व्यक्ती डोळ्यासमोर येते ती त्याची खरी मैत्री. आपला मित्र किवा मैत्रीण आपल्याशी कितीही भांडली असेल तरी हि सुखदुःखात आपल्यासमोर तीच व्यक्ती येते. पण मैत्री तरी कुठे आपण ठरवून करतो ती हि आपोआपच होते ना? असे म्हणतात मैत्री होण्यासाठी गुण नाही दुर्गुण जुळावे लागतात कधीतरी वाटते खरंच आहे कि काय हे जेव्हा शाळेत मित्रांसोबत केलेला दंगा आठवतो. 

मैत्री म्हणजे एखाद्याला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारणे, नुसते स्वीकारणं नाही तर त्या दोषांना सुधारणे. नाही पटले म्हणून पटकन ब्रेक अप करता येतो प्रेमात, पण मैत्री अशी सहजासहजी तुटत नाही. आणि तुटलीच तर एक चांगला मित्र किंवा मैत्री गमावल्याची जाणीव मनाला आयुष्यभर सलत राहते. मैत्रीत नेहमीच समोरच्याला आपली चूक सुधारायची संधी देतो आपण. 

एक समीकरण मात्र पटत नाही कि एक मुलगा आणि एक मुलगी कधी मित्र बनू शकत नाही. जर एखाद्या मुलाला खूप मैत्रिणी असतील किंवा एखाद्या मुलीला खूप मित्र असतील तर ते काय प्रत्येकाच्या प्रेमात पडतात? एखादा मित्र आणि मैत्रीण एकमेकांना खूप जवळचे असले म्हणजे त्यांचे नाते मैत्रीपलीकडचे आहे असे समाजणे चूक नाही का?  मैत्रीला कशाचीच अट नसते ना वयाची ना स्त्री पुरुष अशा लिंगभेदाची. आपल्यापेक्षा खूप वयाने खूप जास्त असणारी व्यक्ती हि आपली मित्र असू शकते ना. मन जुळली आणि आपोआप मैत्री होते. मग वेळ काळ जागा याचेही बंधन नसते. 

वयाच्या सगळ्या टप्प्यांवर आपल्याला कुणाची ना कुणाची गरज लागते ज्यांच्या कडे आपण व्यक्त होऊ शकतो. अशी हि मैत्री प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी. आपल्यातले लहान मूल  जपणारी. आपले प्रत्येक दुःख सुखकर करणारी अशी हि मैत्री."  मैत्रीत प्रेम नसले तरी प्रेमात मात्र मैत्री नक्कीच हवी. 

एक अक्षरही ना बोलता डोळ्यातले भाव वाचते ती " मैत्री", " मी ठीक आहे" असे म्हणताना आपल्या मनातली वादळे ओळखते ती  " मैत्री", काहीही ठीक नसताना , आपल्या पाठीवर विश्वासाने हात ठेवून " सगळे ठीक होईल" असा विश्वास देते ती  " मैत्री", स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रुना थांबवून समोरच्याचे डोळे पुसते ती  " मैत्री", सगळे मतभेद भांडण विसरून आपल्याला मनापासून स्वीकारते ती  " मैत्री", दुःखात एकटेपणात ज्या आठवणींनींनी ओठांवर हसू फुलते ती  " मैत्री". 

माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्पयावर मला भेटलेल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना , २५ वर्ष लांब राहूनही मला अजिबात ना विसरणाऱ्या , मी त्यांची बालमैत्रीण नसूनही मला त्यांच्यात मिसळून घेऊन मला आपलेसे करून घेणाऱ्या , माझ्या चुका , माझी बडबड सगळ्या कडे दुर्लक्ष करून मला एक चांगली मैत्रीण बनवणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. 





7 comments: