Wednesday, 29 March 2017

"उन्हाळा"

शाळेत असताना आपल्याला निबंध लिहायला द्यायचे माझा आवडता ऋतू . आपण कदाचित कधीच कुणी  लिहिले नसेल "उन्हाळा". आणि खरे हि आहे  ना आपल्यापैकी बऱ्याच जणांना उन्हाळा अजिबात आवडत नाही.  आपल्या मुंबईत घामाने भिजवून टाकणारा, पुण्यात आणि नागपूर मध्ये अंग कारपवून टाकणारा हा उन्हाळा कुणाला आवडेल म्हणा. "शी!! किती उकडतेय" " या घामाने तर कंटाळा आला, अंग सगळे चिकचिकीत झालेय" असे बरेसचे संवाद सगळीकडेच ऐकायला मिळतात. ट्रेन मध्ये,बस मध्ये जाताना तर अजून कंटाळा. आजू बाजूला येणारा तो दर्प, घामाने डबडबलेले चेहेरे सगळेच नकोसे वाटत या ऋतूत. बरे आता ह्या उन्ह्याच्या त्रासाला कंटाळून दोनदा अंघोळ करावी म्हटली तरी पंचाईत. जवळजवळ सगळीकडेच हल्ली पाणी कपात असते. " अरे मेल्या पाणी कमी उपस , पाणी कमी येतेय" "एक तर पाणी कमी त्यात यांचे कपडे ढीगभर धुवायला " असे सवांद हि याच काळात ऐकायला मिळतात, पाणी वाचवायचा प्रयत्न मात्र कुणी करत नाही.
पण गम्मत अशी कि याच ऋतू मध्ये सगळ्यात जास्त लग्न कार्ये असतात. " बाई ऐन उन्ह्याळात काय बरे लग्न करतात ?" म्हणणाऱ्या बऱ्याच जोडप्यांची याच उन्हाळ्यात लग्न झालेली असतात. 
बरे या ऋतूत खाण्यावरही बरीच बंधन येतात. हे खाऊ नको गरम आहे. ते खाऊ नको पोटात दुखेल , पाणी जरा जास्त पी अशा हजार सूचना ऐकायला मिळतात. मांसाहार करणार्यांना तर बऱ्याच मर्यादा येतात. बाहेर पडताना सामान कमी आणि पाण्याच्या बाटल्याचं जास्त अशी आपली अवस्था असते. कुठेतरी अडगळीत पडलेल्या छत्र्या, टोप्या , स्कार्फ बाहेर येतात. आणि पूर्वी दरोडेखोर बांधायचे ना तसे सगळ्याच ललना आपल्या चेहऱ्यावर तो स्कार्फ बांधायला लागतात.  प्रेमी युगुलांना मात्र याचा बराच फायदा होत असणार, जोडीदाराबरोबर असताना कुणी ओळखण्याची शक्यता जरा कमी.
कितीही उकाडा असला, कितीही बंधन असली तरी मुलांनाच मात्र नक्कीच हा आवडता ऋतू आहे. याच काळात येते ती आपली लाडकी 'मे' महिन्याची सुट्टी.मुलांची धमाल करायची हक्काची सुट्टी. या सुट्टी साठी किती किती प्लॅन केले जातात. पत्ते , बॅडमिंटन, गोट्या, भवरे,बॅट बॉल असे बरेच खेळ पोतडीतून बाहेर पडतात. तुटलेल्या,मोडलेल्या सायकली दुरुस्त केल्या जातात. कुणी गावी जाते, तरी कुणीतरी लांब कुठेतरी फिरायला. मज्जा असते नुसती. पूर्वी मे महिना म्हटले कि प्रत्येकाकडे कुणी ना कुणी पाहुणे यायचे. कुणाची मामे भावंडे, कुणाचे चुलत तर कुणाची मावस आत्ये भावंडे सुट्टीत राहायला यायची. आणि मग सगळी मुलांची गॅंग खूप धमाल उडवून द्यायची. सकाळ , दुपार , संध्याकाळ  अगदी रात्री सुद्धा फक्त खेळ आणि खेळच. दिवसभर खेळ आणि रात्री गप्पांचा कट्टा. तहान भूक हरपून मुले नुसती धमाल करत असतात. खेळताना होणारी भांडण यातही एक वेगळीच गम्मत असते. " ए तू रडीचा डाव खेळतोस " हे वाक्य तर हमखास सगळीकडे ऐकायला मिळते.  शाळा , अभ्यास याचे बंधन नाही, फक्त एक टेन्शन असते ते निकालाचे. तो एक दिवस फक्त हि सगळी मंडळी जरा शांत असतात. पण एकदा का रिझल्ट हातात आला कि हि मंडळी परत दंगा करायाला सुटतात.
इथे मुलांची खेळण्याची धमाल तर तिथे आईची लोणची , पापड घालायची तयारी. वर्षभराचे मसाले , पावसाळ्याची बेगमी ची तयारी याच काळात. सगळ्या प्रकारची वाळवणे या दिवसात बघायला मिळतात. आणि सुकवलेल्या आंब्याच्या आमसुलाच्या फोडी अर्ध्या तर मुलांनी पळवूनच संपून जातात. आणि मग त्या मागे होणारी आरडा ओरड हि गमतीशीर असते.या ऋतूत येतो तो फळांचा राजा आंबा. नुसते नावानेच तोंडाला पाणी सुटते. कोकणात तर आंबा, फणस, काजू, करवंद अश्या कितीतरी फळांची नुसती रेलचेल असते. आंबा, फणसाची साट , कोकम सरबत किती किती प्रकार ते खाण्याचे. याच ऋतूत आपण हक्काने थंड पेय मागू शकतो." किती गरम होतेय, प्लीज आई दे ना एक पेप्सी" अशी विनवणी प्रत्येक मूल आपल्या आईला करते. कुल्फी , आईस्क्रीम हे खाण्याची मज्जा हि याच काळात अनुभवता येते. हल्ली म्हणा सगळ्याच ऋतूत मिळते हे पण मे महिन्यात याची मजा काही औरच . 
या ऋतूत सगळ्यात जास्त कमतरता जाणवते ती झाडांची. गाडी पार्क करताना खूप ऊन आहे सावलीत गाडी उभी कर हा असे प्रत्येक जण म्हणत. रस्त्यात चालताना"अरे !!!इथे एकही झाड नाही बाई ,थोडी सावली तर लागली असती" असे म्हणतो आपण. पण असे म्हणणारे आपण स्वतः किती झाडे लावतो? हा मोठा प्रश्नच आहे. त्या वेळी जाणवते कि खरंच किती गरज आहे झाडांची. मोठमोठ्या टॉवर च्या घरात एअरकंडिशन मध्ये बसायला मजा येते, मॉल मध्ये ए .सी मध्ये फिरायला मजा येते. पण त्यातून बाहेर पडलो कि आठवत कि किती गरजेची आहेत हि झाडे. या मे महिन्यात आपण सगळ्यांनीच एक निश्चय करूया कि पुढच्या मे पर्यंत आपण एक तरी झाड लावू आणि ते जगवू.

पण एक मात्र आहे प्रत्येक उन्हाळ्याचा शेवट हा गोड आठवणिनीचं होतो. आणि मग वेध लागतात ते शाळेचे , नवीन वर्गाचे , नवीन पुस्तक वह्यांचे. आणि सगळ्यात जास्त वेध लागतात ते उन्ह्याळ्यामुळे शुष्क झालेल्या प्रत्येक गोष्टीला भिजवून टाकणाऱ्या, गार आणि तृप्त करणाऱ्या पावसाचे. 




Friday, 24 March 2017

"सल्ला"

*सल्ला*

सगळ्यात सोप्पी , फुकट आणि सगळ्यात जास्त जी गोष्ट आपण दुसऱ्याला देतो ती म्हणजे "सल्ला". खूप सोपं असते दुसर्यांना सल्ले देणे. मोठी माणसे तर सतत लहानांना काही ना काही उपदेश देत असतात जसा तो त्यांचा जन्मसिध्द हक्कच आहे. पण त्यापैकी किती वेळा त्याची खरंच गरज असते याचा कुणी विचार करत नाही.

कुणी आजारी पडले कि प्रत्येकजण आपापल्या अनुभवाप्रमाणे पेशंट ला सल्ले देत असते. औषधे तर इतकी सांगितली जातात की विचारता सोय नाही. कधी कधी तर कुणीतरी असे काहीतरी अनुभव सांगतात कि ती व्यक्ती बिचारी अजूनच घाबरून जाते. अर्थात सगळे सांगतात ते काळजी पोटीच असते पण कुठली गोष्ट कुठे आणि कधी बोलायची याचा हि विचार करायला हवा ना.

हल्ली सोशल मीडिया मुळे या सल्ल्याचे पीकच आलेय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उपदेशपर ३०-४० मेसेजेस तरी दिवसाला असतातच. प्रत्येकजण काही ना काही , कुणाला ना कुणाला अप्रत्यक्षपणे सल्ले देतच असतात. नक्की कोण बिघडले आहे आणि कोण कुणाला सुधारायचा प्रयत्न करत आहे हेच कळत नाही कधी कधी. ग्रुप वर टीका करणारे, अर्वाच्य शब्दात आपली मत मांडणारे लोकही दुसऱ्यांनी रचलेले उपदेशपर मेसेज पटापट पाठवतात. पण पाठवायच्या आधी एकदाही कुणी हा विचार करते का,  कि माझ्या आयुष्यात  मी कितीसा या  गोष्टी अंमलात आणतोय.

दुसऱ्याला सल्ला देणे हि खूप सोपी गोष्ट आहे. पण समोरची व्यक्ती कुठल्या बिकट परिस्थितीतून जात आहे याची आपल्याला कल्पनाही नसते कधीतरी. सल्ला देताना आपण त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून विचार करत नाही, तर आपल्याला काय वाटते हे त्या व्यक्तीला आपण पटवून देत असतो. समोरच्याचे दुःख हे नेहमी आपल्याला कमीच वाटते, आणि तेच डोक्यात ठेवून बऱ्याचदा सल्ले दिले जातात. पण जेव्हा कुणीतरी समोरून , अगदी स्वतःहून आपल्याकडे सल्ला मागते ना तेव्हा आपण खूप विचार करतो. आपण सांगितलेल्या गोष्टीमुळे, परिस्तिथी काय होऊ शकते याचा आपण दहा वेळा विचार करतो. कठीण प्रसंगी आपल्या जवळच्या व्यक्तींनी दिलेले पाठबळ, त्यांनी दिलेला सल्ला आपल्याला खूप मोठा आधार देऊन जातो.

सगळ्यात जास्त गम्मत असते ती लग्नाच्या वेळी, लग्नाआधी हि प्रत्येकजण उपवर मुलामुलींना भरपूर सल्ले  देतात, आणि लग्नात त्यांच्या आई बाबाना , बिचारे आधीच भांबावलेले असतात त्यात १०० लोकांच्या वेगवेगळ्या सल्ल्याने ते अजूनच गोंधळून जातात. लग्नानंतरही नवरा बायकोला प्रत्येकाचे वेगवेगळे सल्ले आयुष्यभर ऐकावेच लागतात. तसेच असते घर घ्यायच्या वेळी. दहा डोकी दहा सल्ले. सगळ्यांचे ऐकून आपण इतके गोंधळून जातो की आपल्याला नक्की काय वाटतंय हे विसरूनच जातो.

 काही वेळा तर आपण एखाद्याला काही समजावत असतो तेव्हा समोरची व्यक्ती अगदी मनापासून ते ऐकत आहे आहे आणि आपले सगळे त्या व्यक्तीला पटले आहे असे वाटते आपल्याला. पण नंतर उशिरा कधीतरी आपल्याला कळते कि आपण फक्त बोलत होतो आणि समोरची व्यक्ती फक्त ऐकत होती. आपण सांगितलेली एकही गोष्ट त्या व्यक्ती ने आचरली नाही.  तर कधी तरी एखाद्या व्यक्ती ने सांगितलेल्या छोट्या छोटया गोष्टीवर आपण विचार करतो. कुणीही कितीही सल्ले दिले तरी त्यातून काय घ्यायचे आणि काय नाही हे आपणच ठरवायचे असते.  आपली प्रवृत्ती हि अशीच आहे ना कि जे लोक आपल्याला आवडतात त्यांचे  चुकीचे सल्ले हि कधीतरी  आपण सकारात्मक घेतो आणि नावडतीचे मीठ अळणी तसे आपल्याला आपल्या नावडत्या  लोकांचे सल्ले हि नकोशे वाटतात.

एखाद्यावेळी कुणीतरी दिलेला अनमोल सल्ला आपले आयुष्य बदलून टाकतो. चुकीच्या वाटेवर जाणारी पावले सावरायला मदत करतात. ऐकावे जनांचे करावे मनाचे असे असले तरीही  वाल्याकोळ्याला नारदांनी दिलेला उचित  सल्ला त्याने ऐकला म्हणून वाल्याचा "वाल्मिकी" झाला हे ही लक्षात ठेवायला हवे.

सौ. मिलन राणे - सप्रे🖋️






Thursday, 16 March 2017

आठवण

आपले आयुष्य म्हणजे काय तर चांगल्या वाईट आठवणींचा प्रवास. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर , प्रत्येक दिवस आपल्याला नवीन आठवण देऊन जातो. बालपणीच्या आठवणी ह्या खूप सुखद असतात. लहानपणीच्या आठवणीत आपले आई बाबा घराचे सगळेच रमून जातात. लहानपणीच्या खोड्या आठवून मग आपलेच आपल्याला हसू येते. कधीतरी कोणाचा तरी खाल्लेला मार , केलेली दंगामस्ती , चोरून खाल्लेल्या चिंचा बोरे, आपल्याला मिळालेले पहिले बक्षीस, पहिली शाबासकी . काही वेळा आपण केलेल्या शुल्लक चुका आठवल्या कि वाटते किती मूर्ख होतो आपण. शाळा , कॉलेज मध्ये मित्र मैत्रिणीबरोबर केलेली मजा. शिक्षकांना दिलेला त्रास. एखाद्याच्या नावाने केलेली चिडवा चिडव किंवा एखाद्याचे झालेले भांडण. सगळ्याच आठवणी गोड असतात .  मग वयात आल्यावर  झालेले पहिले प्रेम ,पहिली मैत्री,  पहिला स्पर्श  सगळ्याच गोष्टी आपण मनात साठवून ठेवतो. शाळा कॉलेज ऑफिस मित्र मैत्रिणी सगळ्याच ठिकाणी आपल्या काही आठवणी असतात. खूप वर्षांनी जेव्हा एखाद्या स्नेहसंमेलनाला सगळे जमले कि अशा आठवणींना उजाळा दिला जातो. आणि मग पोटभर हसून डोळ्यात पाणी येत. आणि या स्नेहसंमेलनाच्या निम्मिताने आणखी आठवणी जोडल्या जातात , जुन्या आठवणींसोबत.
मोठे झालो , कमवायला लागलो कि मग पहिला पगार,  पहिले ऑफिस, सगळेच साठवण करून ठेवण्या सारखे. अगदी पहिली ट्रेन आणि त्यात झालेल्या मैत्रीचा हि एक वेगळा आठवणींचा कप्पा असतो प्रत्येकाच्या हृदयात. प्रेमात पडलेल्याना तर आठवणींचा साठाच तयार करता येतो. अगदी पहिल्या भेटी पासून ते पहिल्या ब्रेकअप पर्यंत सगळ्याच आठवणी. आपल्या पहिल्या प्रेमाच्या आठवणीनी अंगावर मोरपीस फिरवल्यासारखे वाटते.  आयुष्यात आपण पहिल्यांदा म्हणून ज्या ज्या गोष्टी करतो त्यांच्या आठवणी खूप नाजूकपणे जपून ठेवतो आपण.अगदी आपल्या पहिल्या आजारपणाची आठवण हि जपून ठेवतो .  बाई साठी तिचे पहिले गरोदरपण या सारखी दुसरी गोड आठवण नाही.
कधीतरी निवांत बसलेले असताना एखादे गाणे कानावर येते आणि मग त्या गाण्याबरोबर बऱ्याच आठवणी डोळ्यासमोरून जातात. कित्येक वेळा एखादा सिनेमा पाहताना म्हणा किंवा दुसऱ्यांच्या गप्पा हि ऐकताना आपल्याला आपले काहीतरी आठवायला लागते. आणि मग आपण एकटेच मनातल्या मनात हसत राहतो. 
सगळ्यात मजा येते ती जुने फोटो पाहताना. आता काय प्रत्येक क्षण तुम्ही मोबाईल च्या कॅमेऱ्यात बंद करू शकता. पण पूर्वी फोटोचे अल्बम होते. लग्नाचे म्हणा किंवा  बारशाचे म्हणा किंवा अगदी आपल्या वाढदिवसाचे. ते जुने अल्बम पहिले कि हसून हसून वाट लागते. कोण कसे दिसायचे या पासून ते कुणी आता कुठे आहे या पर्यंत सगळ्या आठवणी निघतात. त्या वेळी डिलिट चा पर्याय नसल्यामुळे कधी कधी  चमत्कारिक फोटो निघत. ते पाहताना तर गम्मतच येते. ज्या व्यक्तीच्या संदर्भात ते असेल त्याला ओशाळल्यासारखे होते आणि मग अशाच घडलेल्या गमती जमती चे किस्से सांगितले जातात. 
 आठवण जितकी चांगली तितकी वाईट.  सगळ्यात वाईट असते ती आपल्याला सोडून गेलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण . मग त्या कायमच्या असोत  किंवा गैरसमजामुळे लांब झालेल्या असो. जाणारी व्यक्ती निघून जाते आपण मात्र त्या व्यक्तीच्या आठवणीत गुरफटून राहतो. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेशी त्या व्यक्तीच्या आठवणींचा संदर्भ लावायचा प्रयत्न करतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करतो. मन कासावीस होते पण विसरायचा प्रयत्न करूनही न विसरता येणाऱ्या आठवणी असतात   जोडलेल्या. त्या व्यक्तीच्या आठवणीने दर वेळी आपले डोळे पाणावतात. असे म्हणतात कि आपण जी गोष्ट जास्त विसरायचा प्रयत्न करतो ती तितक्याच तीव्रतेने आपल्याला आठवते. आणि मग कुणीतरी पाठीत भाला मारावा तश्या त्या आठवणींच्या जखमा भळभळत राहतात.
हल्लीच्या काळातल्या विभक्त कुटुंबामुळे सगळ्यानांच फक्त जुन्या आठवणींवर जगावे लागते. मुले कुठेतरी परदेशी आणि आई वडील एकटेच. अशा वेळी दोन्ही कडे या आठवणीच एकमेकांना सोबत देतात.

एकटेपणात आपल्याला हक्काने कुणी साथ देते तर त्या आपल्या आठवणी, अशा आठवणींच्या कट्ट्यावर एकदा बसलो  ना कि तासनतास कसे निघून जातात ते कळतच नाही. या जुन्या नव्या आठवणींचे पोते उघडून बसलो  कि त्यातून किती वर्षांपूर्वीच्या आणि किती प्रकारच्या वस्तू निघतील हे सांगणे कठीणच. आठवण कशीही असो चांगली किंवा वाईट कुठल्याही कारणाने आलेली आठवण डोळ्यात पाणी नक्कीच आणते. 
आणि ह्या आठवणींची गम्मत माहित आहे? या कधीच म्हाताऱ्या होत नाहीत. त्या सतत ताज्या आणि टवटवीत असतात. 


 

Wednesday, 15 March 2017

संगत

माझा मुलगा किंवा मुलगी त्याच्या संगतीत राहिली म्हणून बिघडली हे वाक्य प्रत्येक घरात आपल्याला ऐकायला मिळते . आपला तो बाब्या दुसऱ्याचे  ते कार्ट असेच आहे ना  आपल्याकडे. आपल्या चुकांचे खापर आपण दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडायला नेहमी तयार असतो.  वाईट संगतीत राहून मुले बिघडतात मान्य आहे, पण त्यात आपलीही चूक असतेच ना, पण  ते पाहायचा प्रयत्न न करता आपण दुसऱ्याला दोष देऊन मोकळे होते. आपली मुले बिघडली तर त्याला आपणही कुठेतरी जबाबदार असतोच ना.  वाईट संगतीत राहूनही स्वतःचा चांगुलपणा टिकवणारी माणसे आहेतच कि जगात. कुठल्या गोष्टीच्या किती आहारी जायचे ते आपण ठरवायचे असते. आपला आपल्यावर असलेला ताबा जास्त महत्वाचा नाही का ? जर वाईट लोकांमध्ये राहून आपण बिघडू शकतो तर चांगल्या लोकांमध्ये वाईट लोकांना सुधारवायची ताकद नाही का ? वाईटावर चांगल्याच विजय होतो असे आपण म्हणतो मग दैनंदिन जीवनात ती गोष्ट अश्यक्य आहे असे का वाटते आपल्याला?
असे म्हणतात एक सडका आंबा पेटीतल्या बाकीच्या आंब्यांना खराब करतो म्हणून त्याला पेटीतून  काढून टाकायचं. हे झाले निर्जीव वस्तूंचे. पण जर दहा माणसांमध्ये १ वाईट प्रवृत्तीचा माणूस असेल तर त्याला बाहेर काढण्यापेक्षा इतर नऊ माणसांनी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करणे जास्त चांगले नाही का? दुसऱ्याच्या नावाने आपण शंख करतो की तमुक व्यक्ती  बिघडली असे आपण सहज म्हणून जातो पण जी व्यक्ती बिघडते तिच्या घराचे संस्कार , परिस्थिती याचा विचार करत नाही आपण. नुसते संतांच्या संगतीत राहून संत होता येत नाही तसे गुंडांच्या संगतीत राहून  कुणी गुंड बनत नाही. हल्लीच्या काळात म्हणा किंवा या २०-२५ वर्षांत म्हणा टिव्ही , इंटरनेट मुले लहान वयातच मुलांना सगळी माहिती मिळायला लागली आहे. त्यामुळे हल्ली बिघडायला कुणा मित्र मैत्रिणीची गरज नाही , टीव्ही आणि मोबाइलची संगत हि मुलांना बिघडवायला पुरेशी आहे. कुठलीही व्यक्ती हि १००% वाईट नसते, त्यांच्यातही काही चांगले गुण असतात पण काही अंशी आपलीही प्रवृत्ती अशी आहे ना कि चांगल्या गोष्टीं पेक्षा वाईट गोष्टी आपण लगेच आत्मसात करतो. दुसऱ्यांकडे बोट दाखवताना आपण आपल्यातल्या त्रुटींचा विचार करत नाही. 
 रावणाच्या संगतीत राहून विभीषणाचे राम प्रेम नाही ना कमी झाले? सिंहाला जर कुत्रांबरोबर ठेवले तर तो त्यांच्या सारखा नाही ना वागणार? मूळ प्रवूत्ती जी "जंगलाच्या राजाची" आहे ती नाही ना बदलणार. तसेच आपले हि आहे ना. वाईट लोकांबरोबर राहून आपण जर कणखर राहिलो तर संगतीचा परिणाम कसा होईल. ऑफिसमधल्या किंवा आजूबाजूच्या घाणेरडया राजकारणाचा  अनुभव घेऊन किंवा त्या लोकांबरोबर सतत राहून हि, आपण जे करतो ते चूक आहे हे जाणून , आपल्या हातात सर्व सत्ता असून त्याचा गैरवापर न करणारी माणसे हि या जगात आहेत. " असंगाशी संग , प्राणाशी गाठ " हे माहित असताना त्या पासून लांब राहणे हे जितके चांगले त्यापेक्षा त्यांच्यात बदल घडवून आणणे जास्त चांगले. 
दुसऱ्याकडे बोट दाखवून दोष दाखविण्यापेक्षा ते दोष सुधारण्याचा प्रयत्न केला तर वाईट संगतीमुळे येणारी पिढी बिघडण्याचे प्रमाण नक्की कमी होईल.


 

Saturday, 11 March 2017

घर

'घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती' खरंच आहे हे . घर म्हटलं की डोळ्यासमोर येतात आई वडील,भावंड. आपले प्रत्येकाचे आपल्या घराशी एक वेगळेच नाते असते. पूर्वी दहा बाय दहा च्या खोलीत दहा माणसांचा संसार  व्हायचा . तीन चार पिढ्या त्याच घरात लहानाच्या मोठ्या व्हायच्या. लग्न ,बारसे ,साखरपुडा असे सगळे समारंभ त्या लहान घरात संपन्न व्हायचे.  आता वडील चाळीत राहतात ;मुलाचे लग्न झाले की मुलगा मोठे घर घेतो, त्याला मुलं झाली की अजून मोठे घर. का तर प्रत्येकाला आपली स्पेस हवी असते. आणि मग सगळे आपापल्या कामावर निघून गेले की त्या इतक्या मोठ्या घरात  राहतात ती दोघे म्हातारा म्हातारी एकमेकांना सोबत करत. एका मोठ्या फिल्म स्टार ने आपल्या मुलाखतीत सांगितले होते कि लहान घरात मला काही झाले तरी आई उठायची आणि मोठा झाल्यावर माझी आई एका खोलीत गेली ते मला कळलेच नाही.  मोठे घर आले कि प्रत्येकाची स्वतंत्र खोली. घरी आला कि जो तो आपल्या खोलीत स्वतःला बंद करून घेतो. प्रायव्हसी आणि स्पेस च्या नावाखाली कुटुंब एकमेकांशी तुटली जात आहेत. घरात आजी आजोबा असले तरी नातवंडे आपल्या मोबाइल आणि लॅपटॉप मध्ये जास्त रमतात. घरातले संवाद कमी होत चालले आहेत. छोट्या घरात आपण ऍडजस्टमेन्ट करून राहत होतो. एकमेकांना समजून घेत होतो. पण कितीही मोठ्या घरात गेले तरी आपल्या जुन्या घराच्या आठवणी काही पुसल्या जात नाही.  तिथे आम्ही असे करायचो हा सण तो सण असा साजरा करायचो मज्जा यायची हि वाक्य प्रत्येक संमेलनाच्या वेळी बोलली जातात. घर कितीही मोठे असले तरी त्यात घरपण हवे नुसत्या विटा सिमेंट च्या भिंती काय उपयोगाच्या. घर म्हणजे आजी आजोबांचे आशीर्वाद, आई बाबांचे प्रेम, भावा    बहिणींची लुटुपुटू ची भांडणे, शेजारच्यांचे प्रेम. आपण कितीही मोठी घरे घेतली , तरी आपल्या पहिल्या घराच्या आठवणीतच आपला जीव जास्त रमतो. त्या जुन्या घराच्या सगळ्याच गोष्टी आपण  दर वेळी आपण नव्याने जगत असतो. 

Thursday, 9 March 2017

'माझी जागा '

​"​रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू

​"​
, प्रत्येका
​चा ​
 हक्का
​चा  असा एक कोपरा.एकटेपणा घालवायला किंवा निवांतपणा साठी म्हणा घरातली एक
​ खास ​
जागा . आमच्या घरची खिडकी 
​'​
 माझी सखी
​'​
​आमचे घर रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे खिडकीतून रस्ता अगदी स्पष्ट दिसतो. 
कधी कंटाळा आला तर मस्त त्या खिडकीवर रेलून मस्त बसायचे आणि रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना निरखायच, 
​त्यांचे  चेहरे वाचायचे.
 
येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं निरीक्षण करताना खूप मज्जा येते. ​ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव .  कुणी फोन वर बोलत, कुणी सोबत  असलेल्या व्यक्ती बरोबर गप्पा मारत जात असते.व्यक्ती तितक्या प्रकृती याचा प्रत्यय येतो. त्यांना पाहता पाहता वेळ कसा निघून जातो कळत नाही.
खिडकीतून  सगळ्या ऋतूंची मजा अनुभवता येते . उन्हाळ्यात टोप्या घालून घाम पुसत जाणारी माणसे, थंडीत हातावर हात चोळत स्वेटर घालून जाणारी माणसे, आणि पावसाळ्यात छत्री , कपडे संभाळत जाणारी माणसे पाहायला गम्मत वाटते. 
जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा तर जास्त गम्मत असते. मस्त चहाचा कप घेऊन तो कोसाळणारा पाऊस पहायचा.  शाळेत जाणारी छोटी छोटी रेनकोट मधली ती गोड मुले पहिले कि अगदी लहान व्हायला होते. असाच पाऊस असताना एखादे छान से रोमँटिक गाणं गुणगुणत भूतकाळातल्या सगळ्या जुन्या छान आठवणींना उजाळा द्यायचा.
​ रस्त्यावरच्या झाडांवर येणारे निरनिराळे पक्षी पाहायचे. पाऊस पडत असताना पत्रावर येणार टपटप आवाज किती सुमधुर वाटतो.
सकाळी खिडकीवर बसून कोवळे ऊन अंगावर घेतले कि लहानपणीच्या चाळीतल्या घराची आठवण येते . ब्लॉक पद्धतीमुळे सगळ्याच खिडक्यांवर ऊन येतेच असे नाही. संध्याकाळी खाली खेळणारी मुले बालपणीची आठवण करून देतात. तर बाकावर बसलेल्या सिनिअर सिटिझन्स ना पहिले कि आपले म्हातारपण कसे असेल याची कल्पना येते. 
आयुष्यातल्या प्रत्येक ऋतूचे आणि काळाचे दर्शन घडवणारी हि खिडकी. जसे आपल्या जीवनात नातेवाईक , मित्र मैत्रिणी जितके महत्वाचे तसंच एक अशीही जागा हवी जिथे आपण आपल्याला सोबत करतो , आपल्या सुख दुःखाचे आपणच सोबती असतो.आणि ती जागा आपली सोबत कधीच सोडणार नाही याची खात्री असते. 


 


 

Tuesday, 7 March 2017

मासिक पाळी

मासिक पाळी ,
बापरे!!! हा विषय का दुसरा विषय नाही का? इथून सुरवात. या विषया विषयी आपल्या कडे समज कमी आणि गैरसमज जास्त आहेत. कधी पासून लिहायची इच्छा होती पण थोडीशी भीती हि होती मनात. वादाचा विषय का लिहावा? सुरवातीलाच रोष ओढवून का घ्यावा? पण आज " जागतिक महिला दिनानिमित्त " वाटले कि लिहावेच  आता.
आपण सगळ्यांनीच या गोष्टीचा बाऊ करून ठेवला आहे. आम्ही लहान असताना मोठी माणसे सांगायची कि तिला शिवू नकोस तिला कावळा शिवलाय. तेव्हा विचार यायचा घरात कसा कावळा येतो? मी कधी पहिला नाही. एकदा गच्चीत खेळत असताना माझ्या डोक्यावर कावळा चोच मारून घेला. मी रडत घरी आले मला कावळ्याने शिवले आता मी पण बाजूला बसू ? मी नाही बसणार. तेव्हा मावशीने समजावले होते कि नक्की काय असते कावळा शिवणे. खरतर हि गोष्ट मुली सहावी सातवी मध्ये गेल्या कि समजावयाला हवी. पण आपल्याकडे जो पर्यंत तिला पाळी येत नाही तोपर्यंत ती गोष्ट लपवली जाते. हल्ली एक बरे आहे कि शाळेतच मुलांना या गोष्टीची माहिती दिली जाते. तरीही आपण हवे तितके मोकळेपणाने या विषयात चर्चा करत नाही. 
आपण हि गोष्ट इतकी चुकीच्या पद्धतीने कधी कधी मुलांना सांगतो कि त्या विषयाची किळस वाटते मुलींना. हि गोष्ट खरंतर एक देणगी आहे आपल्या स्त्री जन्मासाठी. ज्या मुळे  आपल्याला मातृत्वासारखा  खूप सुंदर , अप्रतिम आणि अवर्णनीय अनुभव  अनुभवायला मिळतो ,मग ती गोष्ट अशी किळसवाणी कशी असेल. 
काही घरात अजूनही हि गोष्ट पाळली जाते,  आपण जनावर पाळतो हि गोष्ट काही पाळण्यासारखी नाही. खरेतर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे तरीही. या दिवसात होणाऱ्या त्रासामुळे तिला आराम  देणे गरजेचं आहे पण तिला ना शिवणे हा प्रकार चूकच ना? सासू ने आतापर्यंत पाळले  म्हणून सुनेने हि ती परंपरा पुढे सुरु ठेवावी हे किती योग्य आहे? ह्या मागचे वैज्ञानिक कारण कुणाला माहित असेल तर त्यांनी ते नक्की सांगावे. काही घरातले पुरुषही बायकोला साथ न देता आई म्हणते म्हणून हि गोष्ट करण्यास बायकोला भाग पडतो. एक स्त्रीच स्त्रीची भावना समजून घेत नाही तर पुरुष तर दूरच. वयात आलेली मुलगी घरात असली आणि तिला पाळी  असेल तर वडिलांना किंवा घरातल्या कुठल्याही पुरुषाला सांगितले जाते कि तिच्या पोटात दुखते आहे. पण त्या मागचे खरे कारण मात्र लपवले जाते. हल्ली मुले आई वडिलांशी सगळ्या गोष्टी शेअर करतात मग हि गोष्ट का नाही? आपल्या सगळ्यांचा जन्म याच गोष्टीमुळे झाला आहे मग घरातल्या पुरुषांना का सांगू नये हे. त्यांना हि कळू दे कि स्त्री ला किती दिव्यातून जावे लागते या काळात. काही देशात स्त्रियांना चार  दिवसांची सुट्टी दिली जाते याच काळात. सुनीता विल्यम , कल्पना चावला या सारख्या अंतराळात गेलेल्या स्त्रियांनी जर का हा शिवाशिवीचा खेळ खेळाला असता तर चालले असते का ? हल्लीच्या काळात सगळ्याच क्षेत्रात स्त्रियांनी आपली जागा निर्माण  केली आहे , काही ठिकाणी दिवस रात्र स्त्रिया कार्यरत असतात, अशावेळी त्यांना असली बंधन घालणे किती योग्य आहे? या काळात आपल्याला देवा जवळ जाणे हि निषिद्ध असते. ठीक आहे प्रत्येकाची श्रद्धा वेगळी प्रत्येकाचे विचार वेगळे .  आज प्रत्येक बाई कामानिमित्त बाहेर पडते अजून शंभर स्त्रियांना भेटते , ट्रेन मध्ये बस मध्ये सगळीकडेच तरीही आपण देवळात जातोच ना. ट्रेन मध्ये देवाची पुस्तक हि वाचतो .   आपण देवासाठी हार विकत घेतो, कधी कधी ते विकणारी स्त्रीच असते. कितीतरी ठिकाणी हल्ली देवदर्शनासाठी जाताना होणाऱ्या तपासणी साठी महिलाच असतात. बाहेर आपण सगळे चालवून घेतो, मग घरातच हे सगळे का ? माझ्या सारख्या असंख्य गृहिणींना हा प्रश्न पडला असेल कि नक्की हे कुठे लिहून ठेवले आहे? आणि जर कुणाला माहित असेल तर ते आम्हालाही कळावे.

देवाला बळी  दिलेल्या जनावराचे रक्त लोकांना चालते पण एका स्त्रीच्या कपड्यावर पडलेला रक्ताचा डाग मात्र चालत नाही. त्या बद्दल हजार शंका कुशंका मनात येतात.. 

इतकेच सांगायचे आहे कि ज्यांना या गोष्टी मनापासून कराव्याशा वाटतात त्यांनी कराव्या पण दुसऱ्यावर जबरदस्ती करू नये तसेच त्यांना नावे  हि ठेवू नये. बदलत्या काळाबरोबर आपणही थोडे बदलायला हवे.