Saturday, 28 January 2017

काही व्यक्ती अशा हि ​.........

             कधी कधी आपल्याला खूप एकटे एकटे वाटते , आपल्या माणसांनाही आपल्याशी बोलायला वेळ नसतो. सगळेच खूप बिझी बिझी. तेव्हा प्रश्न पडतो आपणच एकटे रिकाम टेकाडे आहोत कि काय? सगळे चांगले गुण असूनही नाकर्ते असल्या सारखे वाटते. खरेच आहे पण आताच्या युगात नुसते भावनिक असून चालत नाही, तर व्यवहारी हि असावे लागते. सगळ्या भावना बाजूला ठेवून फक्त काम आणि पैसे या दोनच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. या शर्यतीच्या जगात कुणी कुणाचे नसते, फावल्या वेळात मन रामवायला प्रत्येकाला काहीतरी हवे असते. त्यात मानसिक गुंतवणूक नको असते. या हल्लीच्या शर्यतीच्या युगात फक्त व्यवहारी माणसांचाच निभाव लागू शकतो. 
                 पण तरीही या जगात आहेत काही व्यक्ती ज्या फक्त मनाने विचार करतात, जी आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाशी इमोशनली बांधली जातात. कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता नाती जोडतात. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानतात,ज्यांना प्रत्येक क्षणाच्या आठवणी जपायला आवडते, आपल्या माणसांसोबत वेळ घालवायला आवडते, खूप बोलायला हि आवडते आणि खळखळून हसायला हि आवडते. मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता आपले मत सांगायला आवडते, समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक करायला आवडते, माणसे जोडायला आवडतात , आपल्या माणसांवर छोट्या छोट्या गोष्टींवर रुसायला आवडते आणि रुसलेल्यानची समजूत काढायला हि आवडते. 

              कधी कधी त्याची हि अपेक्षा असते कि आपण रुसलो रागावलो तर समोरच्या व्यक्तीने आपलीही समजूत काढावी. कुणीतरी म्हणावे कि " खूप काम होते पण फ़क्त तुझ्यासाठी सगळे बाजूला ठेवले" , कुणाच्या तरी इतके जवळ असावे कि त्या व्यक्तीने आपल्याशी सगळे शेअर करावे. 
                  
           पण असे कधीच होत नाही जी व्यक्ती भावनिक तीच जास्त दुखावली जाते,कारण त्या व्यक्तीच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात, ज्या पैशानं पूर्ण होणाऱ्या नसतात तर मायेने पूर्ण होणाऱ्या असतात. ज्या या व्यस्त आणि स्पर्धा युगात पूर्ण होणे कठीण. अशा व्यक्तींना दुखावण्या पेक्षा त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा. खरंच जर अशी कोण व्यक्ती असेल तर एकदा तरी त्या व्यक्ती साठी वेळ काढून तिच्या साठी आणि तिच्या सारखे जागून पहा. तुमच्या साठी सतत हरणाऱ्या व्यक्ती ला एकदा जिंकायची संधी द्या. कदाचित त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हालाही जगण्याचा वेगळा मार्ग दाखवून देईल. 

Wednesday, 25 January 2017

टिम १९९२

​​१९९० मध्ये आम्ही विरार ला राहायला आलो आणि अ .व. स्मारक विद्यामंदिर मध्ये प्रवेश घेतला  .​
एक वर्ष मागच्या वर्गात काढल्यावर दहावीत मला "ब" वर्ग मिळाला. तसे पाहायला गेलो तर एकच वर्ष जेमतेम . पण त्या वर्षभरात सगळ्यांनी मला ग्रुप मध्ये सामावून घेतले. शाळेनंतर सर्वजण वेगवेगळ्या कॉलेज ला गेल्यामुळे कुणाची भेट अशी होत न्हवती. २१ डिसेंबर २००८ मध्ये आम्ही मुली मुले एकत्र असे पहिल्यांदा भेटलो. शाळेत असताना 'अ' वर्ग फक्त मुलांचा असल्यामुळे 'अ' आणि 'ब' वर्गांमध्ये अगदी खुन्नस होती. त्यामुळे संवाद व्हायला जरा वेळ लागला. पण त्यानंतर दर वर्षी आम्ही २-३ वेळा भेटतोच. १८ जानेवारी २०१४ ला आम्ही सगळ्या म्हणजे अगदी बालवर्गापासूनच्या जवळ जवळ ४५ शिक्षकांना बोलवून शाळेच्या पटांगणातच एक स्नेहसंमेलन केले. 
मी,मंदार,मितेश,रत्ना,शीतल,मृणाल,बंटी,मुक्ता ​,आनंद,अमित,दीपाली ,वैभवी, स्वप्ना ,​स्मिता, दुर्गेश, शैलेश, दीपक, योगेश , विंदा ,आणि असे बरेच जण, आम्ही सर्व जण एक टीम बनून काम करतो. आम्ही आमच्या टीम चे नाव हि ठेवलेय " टीम १९९२". आमची टीम नुसती मजा मस्ती करत नाही तर आम्ही काही चांगली कामे करण्याचाही प्रयत्न करतो. २०१० पासून आतापर्यंत आम्ही आमच्या शाळेत, काही वृद्धाश्रम, अनाथाश्रम, शेतकरी संघटना , अशा काही ठिकाणी देणग्या दिल्या आहेत. तसेच ह्या सगळ्यात प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करत असतो. काही परदेशी असणाऱ्या मित्र मैत्रिणींचा ह्या देणग्या देण्यात बराच मोठा हातभार लागतो. शाळेत एकमेकांशी अजिबात ना बोलणारे , खुन्नस ठेवणारे आता मोकळेपणाने बोलायला लागलेत. शाळेत मस्तीखोर वाटणारी मुले आता खूप काळजी करणारी , मुलींना समजून घेणारी झालीत. कुठेही गेटटूगेदर असले तरी आम्हाला त्या स्थळापर्यंत आणून घरी परत सोडायची जबाबदारी ते आनंदाने घेतात. जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा अगदी आमचे सध्याचे वय विसरून अगदी शाळेच्या सहलीला करावी तशी धमाल करतो. आपल्या शाळकरी मित्र मैत्रिणींबरोबर प्रत्येक जण आपले त्रास, टेन्शन विसरून एन्जॉय करतो. 

शाळेत असतानाचे भेदभाव विसरून आता आमच्यात झालेली मैत्री अशीच घट्ट राहू दे  आणि मौजमजेसोबत आमच्याकडून ह्या  पुढेही समाजाची सेवा घडू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 


Tuesday, 24 January 2017

मैत्री

"मैत्री" शब्ध उच्चरला तरी आपल्या समोर बरीच माणसे येतात. लहानपणापासून अगदी म्हातारे होईपर्यंत आपली बऱ्याच जणांशी मैत्री होते. शाळेत, आजूबाजूला, कॉलेज मध्ये, मग नोकरी शेजारी, ट्रेन मध्ये, अगदी रोज येण्या जाण्याच्या रस्त्यावर सुद्धा आपली एखाद्याशी मैत्री होते. ह्या सगळ्या मध्ये प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या खूप जवळचे होते. त्या व्यक्तीला  आपण आपले सगळे त्रास, आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. ती हि व्यक्ती तितक्याच आत्मीयतेने आपले ऐकून हि घेते. प्रत्येक वयात झालेली मैत्री हि वेगळी  असते. बालपणीची,शाळेतली निरागस मैत्री, कॉलेज मध्ये थोडासा विचार करून केलेली,आई वडिल्यांच्या धाकाने मोजक्याच लोकांशी केलेली मैत्री. मग ऑफिस मध्ये ८ तास ज्याच्या सोबत काढतो त्यांच्याशी आपसूकच होऊन जाते ती मैत्री. मग शेजारी ज्यांच्या कडे " आमचा गॅस येणार आहे , घ्याल का जरा?" अशा काहीश्या  संवादाने सुरु होते ती मैत्री.  कधी कधी आपण त्या व्यक्तींना दुखावतो हि , कधीतरी आपण दुखावले जातो पण तरीही त्या व्यक्ती पासून आपण दुरावत नाही. 

मैत्री म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची मैत्रीची व्याख्या वेगळी.  कुणासाठी  फोन वर तास तास बोलने  म्हणजे मैत्री, तर कुणासाठी विकेंड ला हँगआउट करणे म्हणजे मैत्री. सध्याच्या ह्या वर्चुअल जगात मैत्री धरून ठेवणे बरेच सोप्प झालेय. कुठल्याही सोशल साईट वर ग्रुप करायचा आणि मग तिथे सगळ्यांशी मेसेजेस ने टच मध्ये राहायचे. पण याच साईट वर २४ तास ऑनलाईन असणाऱ्यां या मित्र मैत्रिणींना प्रत्यक्षात भेटायचे म्हटले तर बऱ्याच वेळा जमतच नाही. सातासमुद्रा पार राहणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींशी जोडून राहण्याचा हा उत्तम पर्याय असेलही पण खरंच आपण मनापासून असे किती जणांशी जोडलेले असतो. मैत्री म्हणजे तरी काय " "निखळ आनंद ' . ज्यांच्या सानिध्यात आपण आपले " मी " पण  हरवून बसतो ती खरी मैत्री. कितीही भांडलो तरी एका हाकेला धावून येणे म्हणजे मैत्री. तो बोलत नाही तर मी का बोलू असे ना करता " साल्या तुला काय धाड भरलीय ?? ना बोलायला....  " असे हक्काने विचारणे म्हणजे मैत्री. 

मैत्री दिनाच्या निमित्ताने एकमेकांच्या हातावर दोरे बांधून हल्ली मैत्री व्यक्त करतात. मला तर हसायलाच येते दुसऱ्या दिवशी ह्यांची मैत्री केराच्या टोपलीत जाते. हातावर पेनाने नाव काय लिहितात. त्यापेक्षा मनावर नाव गोंदवले तर ते कायम नाही का राहणार? अशी नुसती दिखाऊ मैत्री काय कामाची ? आपल्या आयुष्यात बरेच मित्रमैत्रिणी असतात, पण ज्यांच्याकडे आपण आपले मन मोकळे करतो असे जिवाभावाचे अगदी मोजकेच. लांब जाऊनही जे नेहमी हृदयाच्या जवळ असतात असे फार थोडेच,  कधी कधी बालपणापासून एकत्र असून एखाद्याशी आपली गट्टी जमत नाही तेवढी कधीतरी अचानक आपल्या आयुष्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीशी जमून जाते. 

मैत्रीचे दुसरे नाव म्हणजे " विश्वास". जिथे विश्वास नाही तिथे मैत्री टिकूच शकत नाही. मैत्रीत रोज भेटणे गरजेचं नसते पण जेव्हा भेटतो तेव्हा विरह काळाचा पत्ता न लागता एकरूप होणे म्हणजे मैत्री. " अरे!! आम्ही रोज बोलतो , he is or she is my good friend" असे म्हणणाऱ्या व्यक्तीला हि अडचणीत आपल्यावर सगळ्यात आधी जी व्यक्ती डोळ्यासमोर येते ती त्याची खरी मैत्री. आपला मित्र किवा मैत्रीण आपल्याशी कितीही भांडली असेल तरी हि सुखदुःखात आपल्यासमोर तीच व्यक्ती येते. पण मैत्री तरी कुठे आपण ठरवून करतो ती हि आपोआपच होते ना? असे म्हणतात मैत्री होण्यासाठी गुण नाही दुर्गुण जुळावे लागतात कधीतरी वाटते खरंच आहे कि काय हे जेव्हा शाळेत मित्रांसोबत केलेला दंगा आठवतो. 

मैत्री म्हणजे एखाद्याला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारणे, नुसते स्वीकारणं नाही तर त्या दोषांना सुधारणे. नाही पटले म्हणून पटकन ब्रेक अप करता येतो प्रेमात, पण मैत्री अशी सहजासहजी तुटत नाही. आणि तुटलीच तर एक चांगला मित्र किंवा मैत्री गमावल्याची जाणीव मनाला आयुष्यभर सलत राहते. मैत्रीत नेहमीच समोरच्याला आपली चूक सुधारायची संधी देतो आपण. 

एक समीकरण मात्र पटत नाही कि एक मुलगा आणि एक मुलगी कधी मित्र बनू शकत नाही. जर एखाद्या मुलाला खूप मैत्रिणी असतील किंवा एखाद्या मुलीला खूप मित्र असतील तर ते काय प्रत्येकाच्या प्रेमात पडतात? एखादा मित्र आणि मैत्रीण एकमेकांना खूप जवळचे असले म्हणजे त्यांचे नाते मैत्रीपलीकडचे आहे असे समाजणे चूक नाही का?  मैत्रीला कशाचीच अट नसते ना वयाची ना स्त्री पुरुष अशा लिंगभेदाची. आपल्यापेक्षा खूप वयाने खूप जास्त असणारी व्यक्ती हि आपली मित्र असू शकते ना. मन जुळली आणि आपोआप मैत्री होते. मग वेळ काळ जागा याचेही बंधन नसते. 

वयाच्या सगळ्या टप्प्यांवर आपल्याला कुणाची ना कुणाची गरज लागते ज्यांच्या कडे आपण व्यक्त होऊ शकतो. अशी हि मैत्री प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी. आपल्यातले लहान मूल  जपणारी. आपले प्रत्येक दुःख सुखकर करणारी अशी हि मैत्री."  मैत्रीत प्रेम नसले तरी प्रेमात मात्र मैत्री नक्कीच हवी. 

एक अक्षरही ना बोलता डोळ्यातले भाव वाचते ती " मैत्री", " मी ठीक आहे" असे म्हणताना आपल्या मनातली वादळे ओळखते ती  " मैत्री", काहीही ठीक नसताना , आपल्या पाठीवर विश्वासाने हात ठेवून " सगळे ठीक होईल" असा विश्वास देते ती  " मैत्री", स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रुना थांबवून समोरच्याचे डोळे पुसते ती  " मैत्री", सगळे मतभेद भांडण विसरून आपल्याला मनापासून स्वीकारते ती  " मैत्री", दुःखात एकटेपणात ज्या आठवणींनींनी ओठांवर हसू फुलते ती  " मैत्री". 

माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्पयावर मला भेटलेल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना , २५ वर्ष लांब राहूनही मला अजिबात ना विसरणाऱ्या , मी त्यांची बालमैत्रीण नसूनही मला त्यांच्यात मिसळून घेऊन मला आपलेसे करून घेणाऱ्या , माझ्या चुका , माझी बडबड सगळ्या कडे दुर्लक्ष करून मला एक चांगली मैत्रीण बनवणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. 





अव्यक्त प्रेम

प्रत्येक जण एकदा तरी असा प्रेमात पडतोच. आपल्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती असते कि आपण त्या व्यक्ती वर मनापासून प्रेम करतो पण व्यक्त कधीच करत नाही. त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावे अशी आपली अट हि नसते पण त्या खास व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडते. ते प्रेम आपले अगदी पहिले प्रेम असेलच असे नाही. आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर आपल्या जीवनात अशी व्यक्ती येते, कि तीच नुसते आपल्या आसपास असणेही खूप सुखकर असते. ती व्यक्ती  फक्त आपलीच असावी असा अट्टाहास नसतो किंवा त्या व्यक्तीला दुसऱ्या कुणाबरोबर पाहून आपल्याला राग हि त्यात नाही. अशा काहीश्या त्या भावना असतात. कधी चुकून ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आलीच तर तो आनंद कशी पेक्षा खूप जास्त असतो. पण जरी ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आली नाही तरी त्याचा खंत किंवा खेद  नसतो , कारण आपले त्या व्यक्ती वर मनापासून आणि निस्वार्थी प्रेम असते. जे फक्त आणि फक्त आपल्यालाच ठाऊक असते. असे अव्यक्त प्रेम प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी होतेच. ती व्यक्ती अशी असते कि तिच्या नुसत्या आठवणीने आपल्या ओठावर कुठल्याही वेळी, कुठल्याही परिस्थितीत एक स्मितहास्य खुलवून जाते.

Saturday, 21 January 2017

आम्ही मैत्रिणी " आमची शाळेच्या"​

मी आणि आसावरी अगदी शिशु वर्गापासुंच्या एकत्र .मला पाचवी नंतर १९८८ मध्ये आम्ही शिफ्ट झालो. त्यामुळे मला चेंबूरची आमची शाळा सोडून विरारला शाळेत जावे लागले. त्यावेळी फोन, सोशल नेट वर्कींग  साईट्स  नसल्यामुळे आम्हला एकमेकींशी संवांद नाही साधता आला. आठवण तर भरपूर यायची दोघीनाही. पण २०१३ मध्ये आमच्या शाळेच्या साईट वर मला राजेश गावडे चा नंबर मिळाला, आणि मग त्याच्याकडून आसावरी चा. तब्बल २३ वर्षानंतर आम्ही एकमेकिंशी फोनवर बोललो. असे वाटले जसे आत्ताच कधीतरी मी शाळा सोडली. तिच्याशी बोलल्यावर जवळ जवळ अर्धा तास मी रडत होते. सगळा भूतकाळ डोल्यासारोम उभा रहिल. मला तिने ५ वि मध्ये असताना गायलेले " केशवा माधवा" गाणे अजूनही आठवतेय. आणि तिला मी पाचवीत असताना पहिल्याच दिवशी तिने मारले म्हणून बाईन कडे केलेली तक्रार आठवतेय. शाळा सुटल्यावर आम्ही अगदी हातात हात घालून बाहेर पडायचो आणि " किस्मत अपनी खूल गयी" ह्या गाण्यावर मान  डोलवत आणि दोन वेण्या हलवत बाहेर पडायचो. अगदी एकमेकिंना दिसेनास्या होईपर्यंत  टाटा  करत राहायचो.  एकदा बोलल्या नंतर आम्ही दर ३-४ महिन्यातून एकदा तरी भेटतोच . योगायोग असा कि आम्हला दोघीनाही एक एक मुलगी आणि दोघींची नावे " अ" पासून सुरु होतात.
​​

​खंत एकच आहे कि तिने गाणे सोडले , पण आता ती एक उत्तम निवेदिका अहे. ​
खरच बालपणी ची मैत्री किती शुध्द  आणि सच्ची असते. इतक्या वर्षाच्या ग्याप नंतर हि आमची मैत्री तशीच आहे जशी आम्ही शाळेत असता
​ना होती निखळ, एकमेकींवर निस्सीम प्रेम आणि विश्वास.

Friday, 20 January 2017

थँक यू नूतन ताई

खरंतर थँक यू परक्यांना म्हणतात पण असे काही लोक आपल्या आयुष्यात येतात त्यांना आपण समोर कधीच थँक्स म्हणत नाही पण मनात खूप असते त्यांच्या विषयी. अशीच एक व्यक्ती म्हणजे माझी ताई " नूतन ताई" "नूतन चित्रे" आताची नूतन काम.
. आमच्या शेजारी राहायची. मी अगदी लहान होते तेव्हा पासून मला नेहमी तिच्या सारखे व्हायाचे होते. तिचे बोलणे राहणे सगळेच मला आवडायचे. मी कॉलेज ला असताना ती कॉलेज ला प्रोफेसर होती. मराठी मध्यम मधून शिकून पण तिचे इंग्रजी फार अस्सखलित होते. मी कॉलेज ला असताना ती मला इंग्रजी शिकवायची. स्टारडस्ट , फिल्मफेअर सारखी मासिक किंवा टाइम्स ऑफ इंडिया मधला एखादा परिच्छेद वाचायला द्यायची आणि मग त्याचा अर्थ सांगायला सांगायची. आणि मी कुठलीही लबाडी करू नये म्हणून तिच्या सामोरं  बसायला लावायची. नुसता अर्थच नाही विचारायची तर एखाद्या शब्दाचा अर्थ हि विचारायची. आणि माझे जे काही चुकले असेल ते नीट समजावून सांगायची. बरेचसे शब्द त्या वेळी डोक्यावरून जायचे पण ती नीट समजावून त्याचा अर्थ सांगायची. जवळ जवळ एक वर्ष भर तिने हे करून घेतले होते माझ्या काढून. आता माझे जे काही बरे इंग्लिश आहे ते तिच्यामुळेच. माझ्या मध्ये जो काही आत्मविश्वास आहे तो बराचसा तिच्या मुळेच आहे. सगळ्या चांगल्या गोष्टीचे कौतुक करून, जिथे रागवायचे तिथे ती नेहमी रागावची. मी बऱ्याच गोष्टी तिच्याकडून शिकले. कुणालाही कमी न लेखणे, आपल्याला जमेल तितकी दुसऱ्याची मदत करणे. आणि आपल्या पेक्षा लहानांना मोठ्या बहिणीच्या मायेने सांभाळणे. आता जरी आमची भेट होत नसती तरी फोन , वॉट्सअँप वर ती मला आधार देत असते. थँक यू ताई मला एक चांगली व्यक्ती बनविण्यासाठी. आणि आत्मविश्वासाने काहीतरी करण्याची जिद्द देण्यासाठी.
​ ​
 लव्ह यू ताई.