Sunday, 31 December 2017

व्यसन

व्यसन  शब्द उच्चरला कि आपल्या डोळ्यासमोर कुठलातरी अमली पदार्ध सेवन करणे  हेच येते. पण खरंच फक्त एखादी झिंग अण्णांरी गोष्ट घेणे म्हणजेच व्यसन का ? 
 पिढी दार पिढी आपली व्यसने बदलत असतात. आपल्या आधीच्या पिढीला दारू, पान , तंबाखू अशी व्यसन होती. आपल्या ९०च्या दशकातल्या मुलांना होते ते टीव्ही चे व्यसन. नवीनच आलेल्या ह्या इडियट बॉक्स ने सगळ्यांचं वेड लावले होते. त्यावर येणाऱ्या अड्वर्टाइस मुले नको नको त्या गोष्टी हि मुलांपर्यंत पोचायला लागल्या. पानपराग , गुटखा अश्या गोष्टींची  भर पडत गेली. पण त्यावेळी रिमोट प्रकार नसल्यामुळे थोडेसे बंधन होते त्यावर. पण आता ह्या इडियट बॉक्स पेक्षा एक भयंकर व्यसन लागलेय सगळ्यांना. अगदी लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच ते म्हणजे " मोबाइल". या विषयावरून सगळ्याच घरात थोड्या फार प्रमाणात सारखेच वातावरण असते. सतत वाद होतच असतात. " काय हि आज कालची मुले सतत त्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून असतात " असे संवाद जिथे तिथे ऐकायला येतात. दिवस असतो रात्र असो सतत सगळे मोबाइलवर. या मोबाइल मुले आपली मुले अजून कशाकशाच्या आहारी जातील हे सांगणे कठीणच. हल्ली ब्लू व्हेल सारख्या गेम चे हि व्यसन लागू शकते मुलांना. कुणी आले गेले संभाषण नाही, कुठल्या समारंभात गेले तिथे हि नुसते सगळे " सेल्फी" काढण्यात व्यस्त असतात. मोबाइल मुले एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद कमी झालेत आणि नुसते व्हर्च्युअल अटॅचमेंट वाढल्यात.
 आत्ताच्या परिस्थितीत लोकांना अजून एक गंभीर व्यसन लागले आहे ते म्हणजे " काम " करण्याचे. हल्ली कुणालाही विचार  " काय आहेत कुठे ?" " नाही यार !! खूप काम आहे रे ऑफिस मध्ये " . जो तो कामात बुडालेला . वेळ, काळ, घरदार सगळे सोडून फक्त काम आणि काम. हे हे एक  व्यसनच ना? अशी माणसंही जर एखाद दिवस ह्यांना चुकून आराम मिळाला ना तर कासावीस होतात.
माझ्या एका मित्राने मला म्हटले कि "अगं !!! किती बोलतेस जरा कमी बोल मी" त्याला उद्धटपणे उत्तर दिले "तू किती पितोस जरा कमी पी" तर तो हसून म्हणाला कि " मी कमीच पितो" मग मी हि म्हटले कि जसे तुला वाटते ना तसे मला हि वाटते कि मी कमीच बोलते. हि खरेच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात करणे हे एक व्यसनच ना.कुठलीही गोष्ट अति प्रमाणात करणे हे एक व्यसनच ना.
काही जणांना सट्टा , जुगार व्यसन असते. त्याचा आहारी ते इतके जातात कि त्यात सगळेच गमवून बसतात आणि मग त्या टेन्शन ला विसरायला अजून कसलेतरी व्यसन मागे लावून घेतात. 
कितीतरी वेळा या व्यसनांमुळे संसार तुटले जातात. घरातल्या वादांमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. घरादाराची राखरांगोळी होते. आणि मग शेवटी डोक्याला हात लावून बसण्याशिवाय पर्याय नसतो.
पण खरंच व्यसन करणे इतकं गरजेचं असते?. जी काही टेन्शन  असतात ती जातात का व्यसने करून? अशा वेळी देवानंद चे गाणे आठवते मैं जिंदगी का साथ निभाता चला गया .... हर फिक्र को धुवे मे उडाता  चला गया
मला हेच कळत नाही का लोकांना आपल्या माणसांपेक्षा ही व्यसने जवळची वाटतात. ह्यात पराभव नक्की कुणाचा त्या व्यसनी माणसाच्या इच्छाशक्तीचा की त्याच्या जवळच्या माणसांचा जी त्या व्यक्तीला समजून घ्यायला कमी पडली. की विजय त्या सगळ्या निरुपयोगी वस्तूंचा जी माणसांपेक्षा वरचढ ठरली.
का बरे लोकांना ही व्यसने जवळची वाटतात.  जगात एकही माणूस नाही की ज्याला टेन्शन नाही म्हणून प्रत्येक जण व्यसनी होते का?? जसे विचार करून आपली दुःख कमी होत नाहीत तशी या निरुपयोगी वस्तूंच्या सेवनानेही नाही होत.   जसे आपण म्हणतो की येणाऱ्या अडचणीना सामोरे जायचे टेन्शन घ्यायचे नाही तसेच व्यसन ही करायचे नाही.
कुठल्याही व्यसनाचे आपल्या शरीरावर वाईट परिणामाच होतात. कुठलातरी असाध्य आजार होण्याची शक्यता ही असतेच. पण आपण हे जर कुणाला समजवायला गेलो तर म्हणणार की निर्व्यसनी व्यक्तींना ही होतात की असे आजार. खरे आहे पण तरीही ज्या गोष्टींचे दुष्परिणाम माहीत आहेत त्या सवयी लावूनच का घ्या?
प्रत्येक व्यसनी माणसाकडे लोकांचा दृष्टिकोन वेगळाच असतो. ते कितीही नीट वागले तरी त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवणे कठीणच.
पण एख्याद्या माणसाला एखादे व्यसन आहे म्हणून आपण त्याला पूर्णपणे वाईट नाही ठरवू शकत. कदाचित ती व्यक्ती आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या अगदी नेटाने पार पडत असेल. पण कितीही चांगली व्यक्ती असली तरी बोलताना माणसे आधी त्याचे दुर्गुणच आठवतात.
तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे शक्य होईल तितके व्यसनांपासून दूर राहा. जगा आणि जगू द्या. सिगारेटच्या धुरात किंवा दारूच्या ग्लासात आपली दुःख लपवण्यासपेक्षा ती आपल्या माणसासोबत राहून विसरायचा प्रयत्न करा.

असाही नवीन वर्षाचा काही ना काही संकल्प आज सगळेच करणार जमले तर हा संकल्प करा जमले तर एक तरी व्यसन सोडू. 

नूतन वर्षाभिनंदन 

 

Thursday, 21 December 2017

संदिती

संदिती
आमची मैत्री नेमकी कशी आणि कधी   झाली ते आठवत नाही. पण दहावीत असताना ती माझ्या मागच्या बेंचवर बसायची. शाळेत जाता येताना ही आम्ही जास्त कधी एकत्र नासायचो. पण दहावीच्या त्या वर्षात आम्ही एकत्र आलो. आमच्या दोघींची कॉलेज वेगवेगळी होती पण आम्ही कायम एकत्र असायचो. माझा एक दादा आम्हाला " चंगू  मंगू " म्हणायचा.  कॉलेज ती ५ वर्ष . दिवसातून एकदा तरी आम्ही भेटायचोच. सकाळी किंवा संध्याकाळी . माझ्या दिवसभराच्या गमती जमती कधी तिला सांगते असे व्हायचे. बऱ्याच वेळा माझा संध्याकाळचा चहा तिच्याच घरी असायचा. तिच्या आई साठी हि मी घरातली चौथे अपत्य झाले होते. तिच्या घरी २-३ तास गप्पा मारल्यावर ती मला खाली सोडायला यायची मग तिथे परत तासभर गप्पा. मग थांब तुला थोडे पुढे सोडायला येते म्हणून ती घरपर्यंत यायची. मग मी परत तिला अर्ध्या रस्तात सोडायला जायचे. जेव्हा कुठे बाहेर जाऊन आलो कि हे चक्र उलट असायचे मी तिला सोडायला जायचे. त्या जीवदानी रोड ला हि आमच्या सगळ्या गप्पा पाठ असतील इतका वेळ आम्ही रस्त्यात गप्पा मारायचो. माझी आई मला नेहमी रागवायची कि तुमच्या गप्पा कधी संपणारच नाही म्हणून. पण तिची आई मात्र कधी रागावलेली मला आठवत नाही.  आम्ही ना जेव्हा एकमेकांना बाय म्हणताना ना दोन बोटे जुळवून मग शेक हॅन्ड करतात तसे करायचो, म्हणजे आता फायनल बाय  असे पण त्या नंतर हि आमच्या गप्पा चालूच राहायच्या. असे निदान ३-४ वेळा म्हणायचो कि " ए , आता हे फायनल हा!" पण ते फक्त बोलण्यापुरताच. माझा दादा मला म्हणायचं अरे झाले ३ वेळा जा आता. आम्ही एकमेकींच्या इतक्या जवळ होतो तरी कधी आम्ही एकमेकींच्या घरी राहायला गेलो नाही. जे काही असेल ते रात्री ८.३० पर्यंत. मग दुसऱ्या दिवशी. 
 माझ्या आयुष्यातली एकही घटना किंवा गोष्ट नाही जी तिला माहित नाही. माझी सगळी सीक्रेट तिला माहित आहेत आणि तिची मला.माझे पहिले प्रेम, पहिली नोकरी, पहिला पगार, माझ्या सगळ्या आवडी निवडी अशी एकही गोष्ट नाही जी तिला माहित नाही. ज्यावेळी मी अगदी बावळट, दोन वेण्या घालणारी , कुणाच्याही खिजगणतीत नसणारी होते ना तेव्हापासून तिला मात्र माझ्यावर काहीतरी वेगळाच आत्मविश्वास होता. तेव्हा हि ती माझे नेहमीच कौतुक करायची. माझी एकूण परिस्थिती त्यातून मी केलेला स्ट्रगल सगळ्याची ती साक्षीदार आहे. 
आम्ही दोघी सोबत अर्धी मुंबई भटकलो आहोत. सिद्धिविनायक, महालक्ष्मी, फॅशन स्ट्रीट. खूप मज्जा करायचो. खूप भटकायचो. फॅशन स्ट्रीट वरून तिला घेतलेले दोन स्कर्ट मला अजूनही आठवतात. आयुष्यात पहिल्यांदा तिने घासाघिस केली असेल. आणि सांगितलेल्या भावापेक्षा कमी भावात कपडे घेऊन आल्यामुळे भलतीच खुश होती ती. एकदा ती पाटकर कॉलेज ला असताना ची गोष्ट. मी तिच्यासोबत तिच्या कॉलेज ला गेले होते मग तिथून थोडी खरेदी करून आम्ही गोरेगावलाच एका हॉटेल मध्ये गेलो. तिथे आम्ही डोसा ऑर्डर केला होता. आणि तो वेटर असा शंकू सारखा भाला मोठा डोसा डिश मध्ये घेऊन आला . मला तो काही काट्याचमच्याने खाता येईना म्हणून आम्ही तो हाताने खायला सुरवात केली. मग लक्षात आले कि समोरच्या टेबल वर बसलेली दोन मुले आमची ती त्रेधातिरपीट बघून हसत होते. इतके लाजल्यासारखे झाले. आम्ही पटापट तो डोसा संपवून बाहेर आलो. आणि वेड्यासारख्या हसत होतो. त्या मुलांना घाबरून असे बाहेर येण्यावर आम्हाला आमचेच हसू येत होते. 
अजून एक प्रसंग आहे जो तिला आठवत नसेल. एकदा तिला दिवाळीला दोन ड्रेस मिळाले होते तेव्हा तिने ते दोन्ही ड्रेस मला दिले होते कारण होते तिला ते आवडले नव्हते. पण खरे कारण होते कि त्या वेळी माझ्याकडे नवीन ड्रेस नव्हता हे तिला माहित होते म्हणून तिने मला ते ड्रेस दिले होते.
त्याकाळात एकत्र असणाऱ्या आम्ही तिच्या लग्नानंतर खूप दूर झालो होतो. मनाने नाही तर फक्त शरीराने.  कितीतरी वर्षे  आमचा एकमेकांशी अजिबात कॉन्टॅक्ट नव्हता. साधे फोनवर बोलणेही झाले नाही आमचे. पण तरीही जेव्हा तिच्या बाळाला बघायला आम्ही गेलो होतो असे वाटलेच नाही कि इतकी वर्षे आम्ही लांब होतो.  ती माझ्यावर कधी रागावली नाही कि मी तिला फोन केला नाही कि सगळीकडे भटकते पण तिला भेटायला गेले नाही. कसली म्हणून तक्रार नसते तिची. आताही तिला भेटायला येते म्हणून कितीतरी वेळा मी जात नाही पण ती गेल्यावर मागचे कधीच बोलून दाखवत नाही.
मला तिच्या लग्नाला ही जाता आले नव्हते पण तिच्या साखरपुड्याची मेहंदी मी काढली होती.
मला तिच्या बोलण्याची पद्धत जाम भारी वाटते म्हणजे मी एखादी गोष्ट तिला सांगितली नसेल आणि म्हटले कि अग बोलले होते तुला तर तिचे उत्तर असणार " साली , नालायक कधी बोललीस मला ? हे मला माहीतच नाही " आणि एखादे चांगले काम केले तर म्हणेल " मेले , काय काय उद्योग करत असतेस." आता माझ्या भटकंती करण्यावरून मला नवीन नाव ठेवलेय " भिंगरी" . ती काही बोलली ना तरी मला राग नाही येत. तिच्या शिव्याहि (नॉर्मल) गोड वाटतात मला. कारण त्यात तिचे प्रेम असते.
संदिती विषयी एक गोष्ट कदाचित  जास्त कुणाला माहीत नाहीये ती म्हणजे ती खूप छान गाते.  शाळेत असताना " शिशा हो या दिल हो " हे गाणे तिच्या कडून खूप वेळा ऐकले आहे. आता बहुतेक गाणे सोडलय तिने. ज्या वेळी माझ्या चपात्या म्हंजे देशाचे नकाशे असायचे तेव्हा  तिच्या चपात्या अगदी गोल गोल असायच्या. तिच्या हाताचा स्वयंपाक हि अप्रतिमच. तिच्या आईच्या हाताची चव तिच्या हातात उतरली आहे.
मला तिच्याबद्दल एक खूप वेगळंच फीलिंग आहे. खूप खंबीर , सहनशील आहे ती. असे म्हणतात की बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म पण हीचा तीसरा जन्म होता तो. बाळंतपणाच्या वेळी झालेले ट्यूमर चे ऑपेशन,  त्यातून आलेले पॅरॅलीसिस पण. बाळापासून ८-१० दिवस लांब ठेवले होते तिला. पण या सगळ्यावर मात करून जिद्दीने उभी राहिली ती. . खरे तर युग मुळे तिला पुनर्जन्म मिळाला. तीन महिन्यांच्या युग ला घेऊन जेव्हा ती विरार ला आली होती मी आणि दीपाली तिला बघायला गेलो होतो. खूप अशक्त दिसत होती पण तरीही सगळे करत होती. तिच्या माने वरचा तो ऑपेशन चा कट पाहून काळजात एक चमक उठून गेली. तिच्या शारीरिक त्रासाचे दुःख तर होतेच पण त्यापेक्षा जास्त मनात सल होती की माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणींच्या गरजेच्या वेळी मी तिच्या जवळ तर नव्हतेच पण मला काही माहिती ही नव्हते. ज्या वेळी ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा माधवी तिला बघून अली होती. आणि आम्ही तिला जास्त फ़ोन करून तिला त्रास देऊ नका असे स्पष्ट बजावले होते. त्यावेळी माधवी मैत्रीण कमी आणि डॉक्टर जास्त होती. त्यामुळे तिचे ते म्हणणे आम्ही निमूटपणे ऐकले होते. आता हि ती पडली तिच्या पायात रॉड टाकावा लागला पण त्याही अस्वस्थेत तिचे काम करणे काही  थांबले नाही. दोन -तीन महिन्यातच ती व्यवस्थित चालायला लागली. तिच्या या जिद्दीला मनापासून सलाम. सगळी दुखणी सहन करून तिच्या चेहऱयावर सतत एक स्माईल असते. देवाने तिला भरपूर बळ दिले आहे. 
असे म्हणतात ना की सगळ्या जगाने पाठ फिरवली तरी अशी एक व्यक्ती असते जी आपल्या सोबत राहते आणि मी खात्रीने सांगते की माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती म्हणजे संदिती. ती माझ्यावर ओरडेल, रागावेल पण मला एकटे पडणार नाही.  माझी चूक असली तरी ती आधी ती मी का केली ते समजून घेईल. पण मी चुकले म्हणून मला वाळीत टाकणार नाही. कारण माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती कि तेव्हा ती एकटीच माझ्या बाजूने बोलली होती.
माझ्या आयुष्यातली संदिती अशी एकमेव व्यक्ती असेल जिच्या विषयी मी कधीच काहीच वाईट बोलले नसेन अगदी तिच्या पाठीमागे हि नाही . तिच्यातल्या उणीवा मला कधी जाणवल्याचं नाहीत किंवा मला त्या जाणून घ्यायची इच्छा झाली नाही. आम्ही कधी भांडलो नाही , तिने मला कधीच रडवले नाही आणि मी तिच्या समोर कधी रडले नाही. पण आज  लिहिताना मात्र माझ्या डोळ्यात पाणी आहे कारण देवाची मी  खूप खूप आभारी आहे मी त्याने मला पूर्णपणे समजून घेणारी मैत्रीण दिली. इतके असूनही आता जेव्हा ती विरार ला आलेय तर मी विरार सोडून गेलेय. मला तिच्यासाठी काहीच करता येत नाही हि गोष्ट मनाला सारखी खटकत राहते.
माझा हा लेख वाचल्यावर कदाचित माझ्या बऱ्याच जवळच्या व्यक्तींची मने दुखावली असतील, तुम्ही सगळेच माझ्या जवळचे आहात पण कदाचित जी नाळ संदितीशी जोडली गेली ती कुणाशीही जोडली नाही जाणार. तिचे आणि माझे नाते म्हणजे दुधात मिसळलेल्या साखरेसारखे आहे कधीही वेगळे न होणारे.


Friday, 8 December 2017

१४ डिसेंबर १९९४

१४  डिसेंबर १९९४ (बुधवार) माझ्या आयुष्यातील कटू दिवसांपैकी एक दिवस. ज्या दिवशी माझी लाडकी आजी आम्हाला सोडून गेली. अजूनही तो दिवस जसाच्या तास आठवतोय . 
मला नीट आठवत नाहीये पण सोमवार का मंगळवारी आजीचा फोन आला होता कि आज आजोबांबरोबर चेंबूर स्टेशन ला जाऊन आले नवीन मंगळसूत्र घेतलेय तर तू येऊन बघून जा. पण मी नाही म्हटले म्हणाले "अगं ! रविवारी येते म्हणजे राहायला मिळेल. उद्या आले तर परत सकाळचे कॉलेज ." तिने दोन तीन वेळा परत सांगितले पण मी माझ्या नाही वर ठाम माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे. मग म्हणाली ठीक शनिवारी ये कॉलेज हुन डायरेक्ट. तस माझ्या आजीला दागिन्यांचा सोस नव्हता तिला कसलाच सोस नव्हता खरंतर . खूप साधी भोळी होती. सगळे तिला " बाई" म्हणायचे. आणि आजोबा "इंदू". कधी कधी आम्ही तिला हाक मारायचो " इंदू आजी". आजी आजोबानी खूप लाड केले माझे. 
मी F.Y.B.Com ला होते सकाळचे कॉलेज आम्ही ५.२५ ची ट्रेन पकडायचो.  त्यादिवशी आमच्या कॉलेज चा पिंक डे होता. मस्त पूर्ण पिंक पंजाबी ड्रेस घालून अगदी तयार होऊन कॉलेज ला गेले. साधारण १०-१०.३० ची वेळ ऑफ पिरियड होता म्हणून आम्ही बाहेर कॉरिडोर मध्ये टाइमपास करत उभे होतो. मी, नमा, सोनाली, आशु, शिल्पा सगळेच. इतक्यात आशु म्हणाला "मिलन तुझी आई आलीय बघ. " मी मागे वळून न बघताच त्याला ओरडले कि "प्लीज अशी काहीतरी मस्करी करू नको". तेवढ्यात अजून कुणीतरी म्हणाले "अरे तुझे भाऊ , बहीण पण आलेत."  तेव्हा मात्र मागे पहिले तर खरंच आई , अमोल , शीतल तिघेही आले होते. आईचा चेहरा रडवेला वाटत होता. आई म्हणाली चल निघायचे आहे चेंबूर ला जायचे आहे. मला काही कळेना पण जास्त प्रश्न ना विचारात मी बॅग घेऊन आई बरोबर निघाले. कॉलेज च्या बाहेर आईने टॅक्सी केली. टॅक्सी म्हटल्यावर लक्षात आले कि नक्कीच काहीतरी झालेय वाईट. कारण टॅक्सी ची चंगळ परवडणारी नव्हती त्या काळात. गाडी सुरु झाल्यावर वैतागून आईला विचारले काय झालेय सांग तरी. मग आई म्हणाली कि सकाळी 'जो' अंकल आले होते त्यांनी सांगितले कि आजी गेली. त्या वेळी फोन असला तरी एखाद कुणाकडे तरी. आणि नेमके सगळे फोन बंद होते म्हणून ते चेंबूर हुन विरार ला आले होते. पण मला विश्वास बसत नव्हता कि आजी गेली. दोन दिवस आधी तर बोललो होतो आम्ही. पण 'जो' अंकल खोटे का सांगतील?  
तरी एकदा मी आई ला म्हणाले कि तू चुकून  आजी ऐकले असेल आजोबा म्हटले असतील ते. कारण आजोबाना दोन अटॅक येऊन गेले होते. पण आई म्हणाली आजीचं गेली. मला तरीही विश्वास बसत नव्हता. आई सारखी रडत होती. मला काही केल्या रडायला येत नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी डोळ्यातून पाणी येत  माझ्या पण त्या वेळी जराही नाही. माझा विश्वासच नव्हता त्या गोष्टीवर. आजीचे असे अचानक जाणे माझ्या पचनी पडत नव्हते. आईचे रडणे सुरु होते , मध्ये मध्ये ती आजीच्या जुन्या आठवणी सांगत होती. त्यात मला ओरडून हि झाली तुला बोलावले होते ना तू गेली का नाहीस. मला कळतंच नव्हते का आई अशी का करतेय? माझा विश्वास नव्हताच बसत काही केल्या.  शेवटी आमच्या बिल्डिंग समोर गाडी थांबली. बरीच गर्दी होती खाली. काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे दिसत होते. टॅक्सितून उतरल्यावर आई जोरजोरात रडायला लागली. मी मात्र अजूनही शांतच होते. घर कडे जाताना सगळे डोक्यावरून हात फिरवत होते. सगळेच रडत होते मी सोडून. जिने चढून वर गेलो आई धावत आमच्या खोलीत गेली  आतली रडारड जास्त जोरात सुरु झाली तरी मी मात्र अजूनही रडत नव्हते. कदाचित त्या वेळी लोकांना वाटले असेल कि जिच्यावर आजीचा सगळ्यात जास्त जीव होता तिला साधे तिच्या जाण्याने रडू हि येऊ नये. पण माझे फक्त मला आणि मलाच माहित होते. मी मान्यांच्या दारात पोचले आणि एकदम आजोबा समोर आले मला जवळ घेऊन म्हणाले " मिनू, तुझी आजी गेली ग" . त्या क्षणी असे वाटले कि पायाखालची जमीन सरकतोय कि काय. आजोबाना घट्ट मिठी मारून मी जोरजोरात रडायला लागले. इतक्यावेळची माझी खोटी अशा संपली होती. खरंच माझी आजी हे जग सोडून गेली होती कायमची. त्या क्षणी वाटले का नाही आले मी  ती बोलावत होती तेव्हा. खरंच तिला कळले होते का तिचे मरण? तिची मला भेटायची शेवटची इच्छा हि मी पूर्ण केली नाही.  मान्यांचे घर ते आमचे घर जेमतेम १० फुटांचे अंतर पण ते हि १० मैलांसारखे वाटत होते. आजोबानी मला आत नेले. सगळेच जोरजोरात रडायला लागले. म्हणे बघ बाई तुझी लाडकी नातं आलीय. आजीला त्या आराम खुर्चीत बसवले होते. समोर आशा मावशी होती तिची अवस्था तर बघवत नव्हती. काही वेळ वाटले सगळे म्हणत आहेत तसे खरंच मी आलेय म्हणून उठेल का एकदा आजी. मी जाऊन तिच्या जवळ बसले. तिचा हात हातात घेऊन तिची बोटे फोल्ड करायचा प्रयत्न केला. तिच्या हाताला जेव्हा फ्रॅक्चर झाले होते तेव्हा मी अशीच तिची बोटे फोल्ड करायचे आणि मग ती म्हणायची नको ग दुखतंय  वाटले कदाचित आताही बोलेल ती. पण नाही सगळे संपले होते. 
देवाने तिला हवे तसे मरण दिले होते. चालता फिरता पहिल्याच अटॅक मध्ये ती गेली. कधी कधी देवाचा राग येतो मला किती लवकर नेले माझ्या आजीला. आमचे कुणाचे शिक्षण हि पूर्ण झालेलं पहिले नाही तिला. ताईचा तर लास्ट वर्ष होते. डॉक्टर होणार होती ती. पण म्हणतात ना कि जो माणूस सगळ्यांना आवडतो तो देवालाही आवडतो म्हणून नेले असेल त्याने आजीला. त्यादिवसापासून आज पर्यंत जेव्हा जेव्हा तो दिवस आठवतो डोळ्यात पाणी येते. डोळ्यासमोरून तो दिवस काही जात नाही. आजही १४ डिसेंबर ला सकाळी उठले कि मनात एक भीती दाटते. २३ वर्ष उलटली पण जखम काही सुकत नाही , दरवर्षी तिच्यावरचे खपली निघतेच. आजी गेल्यानंतर कितीतरी वर्ष तिचे अस्तित्व जाणवत होते. चेंबूर हुन निघाले कि मागच्या खिडकीत ती नेहमीच उभी राहून टाटा करायची अगदी आम्ही दिसेनासे होईपर्यंत. खूप वेळा ती तिथे आहे असेच वाटायचे. खालून खेळून आल्यावर मी बाहेरच्या खोलीत बसून राहायचे कि आता आजी आतून चहा घेऊन येईल. पण बराच वेळ झाल्यावर लक्षात यायचे कि आता मागितल्याशिवाय चहा नाही मिळणार. सगळे हातात द्यायची आजी. माझी आवडीचे काही बनवले कि मला ते नेहमी जास्त मिळायचे. शैला मावशी कधी कधी म्हणायची मुलींवर केले नाही तितके प्रेम तुम्ही नाती वर करता. खरेही होते ते. मला कुणी ओरडले तरी आजीला वाईट वाटायचे. मग जवळ घेऊन समजवायची ती. आजही कधी कधी खूप एकटे वाटले कि आजीचं आठवते सगळ्यात आधी, असे वाटते कि तिच्या मांडीत डोके ठेऊन झोपावे. आजी आजोबा दोघेच असे होते कि ज्यांनी निस्वार्थी प्रेम केले. माझ्या चुकांना प्रेमाने पोटात घेणारे. मी कितीही हट्टी , जिद्दी असले तरी मायेने समजावणारे. माझे एकूण एक लाड पुरवणारे. 

आम्हाला तिच्यासारखे साधी राहणी , उच्च विचार असे नाही जगाता येणार,  तिच्यासारखे सगळ्यांचे सगळेच निरपेक्ष भावनेने नाही करता येणार पण तिच्या सारखे कायम माणसे जोडून राहण्याचा नक्की प्रयत्न करू.
 
 आजी खूप आठवण येते ग तुझी  ....... .......






Thursday, 16 November 2017

अधुरी कहाणी

संध्याकाळचे ७ वाजले होते  तो घरी आला बूट काढले आणि सोफ्यावर बॅग ठेवूली. शूज काढताण त्याच्या लक्षात आले होते कि  सना आलीय. शक्यतो ती त्याच्या नंतर घरी येते पण आज अचानक लवकर? त्याचा डोक्यावर सूक्ष्म आठी पडली. फ्रेश होऊन आल्यावर चहा घेता घेता त्याने विचारले " सना आज लवकर आली का ? आहे कुठे ? ' बायकोने जरा वैतागूनच उत्तर दिले " हो कधीच आलीय. बरे वाटत नाही म्हणून लवकर आलीय . आल्यापासून मूड खराब आहे बाहेरही आली नाही. " त्याला आता जरा चिंता वाटू लागली. हातात चहाचा कप घेऊन तो सनाच्या खोली जवळ गेला आणि बाहेरूनच म्हणाला " सना बेटा ... काय झाले? बरे वाटतेय का आता ? ये चहा घेऊ एकत्र.. " आतून आवाज आला " हो पप्पा आले" आवाज थोडा रडवेला होता. सना बाहेर अली तिचे डोळे लाल झाले होते . नाकातून पाणी वाहत होते. डोळे थोडे सुजले होते. त्याला आता खरंच चिंता वाटू लागली नक्की काहीतरी बिनसले आहे. नाहीतर अशी स्वतःला कोंडून घेणारी सना नाही. प्रत्येक गोष्ट पॉसिटीव्हली घेणाऱ्या सनाचे नक्कीच काहीतरी मोठे बिनसले आहे.
        सना त्याची एकुलती एक मुलगी. त्याच्या काळजाचा तुकडा. त्याच्या लाडाने तिला बिघडवले असे सगळ्यांचेच मत. सनाच्या सडेतोड स्वभावामुळं आईशी तिचे सूत हवे तसे  जुळत  नव्हते. जे काही सीक्रेट शेअरिंग असेल ते पप्पा कडे.  गेल्या एक महिन्यापासून सना सतत उदास राहत होती. कशातही लक्ष नसायचे. बऱ्याच वेळा चेहराही रडवेला असायचा. घरी असली तरी स्वतःच्या खोलीत बसून असायची. जरा जराश्या गोष्टींवरून चिडचिड करत होती.  आधी वाटले विशाल यु.एस ला गेला कदाचित त्याच्या आठवणीमुळे असेल. पण विशाल ला जाऊन तर आता वर्ष होत आले होते. विशाल सनाच्या ऑफिस मध्ये काम करत होता. तो सनाला सिनिअर होता. एकत्र काम करता करता कधी एक मेकांच्या प्रेमात पडले त्यांनाही कळलं नाही. ज्या दिवशी विशाल ने सनाला प्रपोज केले होते तो दिवस आठवला. त्या दिवशी गाणं गुणगुणत सना ने घरात एन्ट्री केली 'आज मै उपर आसमान नीचे' .  आल्या आल्या आईने विचारले काय आज स्वारी जाम खुश आहे तर आईला मिठी मारून एक पापा घेऊन ' होsss ' असे जोरदार उत्तर देऊन " आई कडक चहा ठेव ग " अशी आरोळी ठोकत सना फ्रेश व्हायाला  गेली .  तो घरी आल्यावर आई आणि त्याला दोघांना तिने ती गोड बातमी दिली. आई ने हजार शंका काढल्या नक्की कोण, जात काय ? सिरीयस आहेत ना? कि फक्त टाइमपास? पण तो मात्र खुश होता आपल्या मुलीला खुश पाहणे हेच त्याच्यासाठी सबकुछ होते. पण आपली मुलगी आता पूर्णपणे आपली राहिले नाही हि भावना कुठेतरी थोडेसे हलवून गेली त्याला. त्याने सांगितले " बेटा , एक दिवस घरी घेऊन ये विशाल ला ". सना आनंदात हो पप्पा म्हणून फोन घेऊन तिच्या रूम मध्ये पळाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच होता. 
         एक दिवस सना विशाल ला घरी घेऊन अली . त्याची ओळख करून दिली. देखणा , रुबाबदार आणि मनमिळावू.  भेटीत विशाल ची आणि त्याची गट्टी जमली. त्यानंतर विशाल चे घरी येणे जाणे होतच होते. सनाच्या आईला कधी कधी त्याचे हे अति जवळीक साधणे  आवडत नसे. आई वडील परगावी असल्यामुळे हा मित्रांबरोबर भाड्याने घर घेऊन राहत होता. त्यामुळे कधीतरी डिनर ला , कधी सणावाराला त्याचे येणे होत होते . आईचा सनाच्या मागे तगादा असे कि " अगं , त्याच्याशी बोल . त्याच्या आई बाबांना भेट , काय ते एकदा नक्की करा." पण जॉब नवीन असल्यामुळे ते दोघे तयार नव्हते. त्यात १-२ वर्ष एकमेकांना समजून घेऊन मग निर्णय घ्यायचा असे त्यांचे ठरले होते. त्याला हे पटत होते पण सनाच्या आईला नाही. त्याला हि कुठंतरी खटकत होते पण मुलीच्या प्रेमापोटी तो थोडे दुर्लक्ष करत होता. 
           मध्यंतरीच्या काळात विशाल ची परगावी बदली झाली होती. त्या दिवशी सनाचा अगदी चेहरा रडवेला होता. तिला विशाल शिवाय राहणे कठीण जाणार होते.त्या पंधरा दिवसात सना खूप बैचेन होती. विशाल चा फोन आला कि मात्र तिची कळी  खुलत होती. कधी कधी दोघे रात्र भर गप्पा मारत. सकाळी मग तिचे डोळे सुजलेले असत. दोघांना एकमेकांशिवाय करमत नव्हते. ज्या दिवशी विशाल परत आला त्याच दिवशी रात्री तो घरी जेवायला आला होता. सगळ्या तिकडच्या गोष्टी, मजा आणि कामाचे स्वरूप सगळेच शेअर करत होता. त्याच्या बोलण्यातून त्याचा आत्मविश्वास दिसत होता. त्याच्या याच कामाचे चीज म्हणून त्याला नवीन प्रोजेक्ट साठी परदेशी पाठवण्यात आले होते. सुरवातीच्या १-२ महिन्यात सगळे सुरळीत चालले होते. पण नंतर काहीतरी बिनसले होते. सनाच्या रूम मधून तिचे जोरजोरात भांडायचे आवाज यायचे. बऱ्याच वेळा सकाळी तिचे डोळे सुजलेले असायचे. त्याने खूप प्रयत्न केला विचारायचा पण सना नीट उत्तर देत नव्हती. त्याने एक दोनदा विशाल ला हि कॉन्टॅक्ट केला पण त्याने हि नीट काही सांगितले नाही. त्याचे टेन्शन वाढत होते. सनाची होणारी तगमग त्याला पाहवत नव्हती , त्यात सनाच्या आईची भुणभुण सुरूच होती. तो जास्तच वैतागला होता . आणि शेवटी आज इतक्या महिन्यांनी काहीतरी विपरीत घडलेय हे नक्की झाले. 
     सना चहा चा कप घेऊन तिच्या रूम मध्ये गेली. आई तिच्याकडे रागाने पाहत होती. याने तिला डोळ्यानेच शांत राहा अशी खूण केली. आणि तो सनाच्या मागोमाग तिच्या रूम मध्ये गेला. चहा चा कप बाजूला ठेवून सना रडत बसली होती. त्याने कप बाजूला ठेवला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले " काय झालेय बेटा ? विशाल सोबत भांडलीस का ? काय ते नीट सांग ? आम्ही आहोत तुझ्या सोबत." आता मात्र सणाचा बांध फुटला ती ओक्सबोक्शी रडू लागली " पप्पा विशाल ने मला फसवले . तो तिथे कुठल्यातरी दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात पडलाय आणि आता मला टाळतोय. आज त्याचे सगळी नाती तोडलि. " . सनाच्या अश्रुनी त्याचा शर्ट ओला झाला. त्याने तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पहिले. तो आतून थरारला. आज सनाच्या डोळ्यात त्याने "तिचे" दुःख पहिले. त्याला हि आपला भूतकाळ आठवला. त्यानेही कुणा  दुसऱ्या व्यक्ती साठी कुणाला तरी असेच अर्धवट सोडले होते. ती  बिचारी जग सोडून गेली होती. हे आठवले आणि आता मात्र तो पूर्णपणे हादरला.  त्याच्या चुकीमुळे झालेल्या गोष्टीची त्याला पुनरावृत्ती करायची नव्हती. नियती कसा खेळ खेळली होती.  आपल्या आयुष्यात घडलेल्या त्या काळ्या घटनेची पुनरावृत्ती नको. आज इथे त्याच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. सनाला जवळ घेत त्याने निर्णय घेतला कि सनाला या धक्क्यातून सावरायचे, काही झाले तरी.




 

Thursday, 2 November 2017

आनंदाची बात काही औरच ...... ( महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स ३१.१० . २०१७ )

​​
​​
​​
आम्ही विद्यामंदिर ​, विरार ​चे १९९२ विद्यार्थी.  ​हल्ली प्रत्येकाचेच स्नेहसंमेलन होते. सगळेच शाळा कॉलेज चे मित्र मैत्रिणी भेटतात. आम्ही हि भेटतो अगदी ना चुकता ३ -४ महिन्यातून एकदा. वर्षातून एक दोनदा पिकनिक ला हि जातो.

पण वर्षातून एकदा तरी आम्ही असे काहीतरी काम करतो ज्याने आम्हाला आपल्या समाजांचे ऋण हि फेडता येतात आणि एक मानसिक समाधान हि लाभते.  प्रत्येक वर्षी एकदा तरी आम्ही सगळे मिळून एक डोनेशन फंड काढतो आणि एखादा वृधाश्राम, किंवा गरजू व्यक्ती, किंवा अनाथाश्रम किंवा जिथे खरंच कुणीतरी काहीतरी द्यायची गरज आहे अशा ठिकाणी मदत करतो.

ह्या वर्षी आम्ही वसई मधील एका वृध्दाश्रमाला औषध आणि काही खाण्याचे जिन्नस दिले. तिथे असलेल्या त्या वृद्ध बायकांना किती आनंद झाला आम्हाला भेटून. आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांना खाऊ दिला तेव्हा त्यांनी अगदी आजी सारखे जवळ घेऊन आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. त्यांना कुणीतरी दिवाळी निम्मित भेटण्यास आले आहे याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

त्यानंतर आम्ही लोकनारायण जयप्रकाश हॉस्पिटल इथे गेलो. जिथे कुष्ठरोग्यांसाठी हॉस्पिटल कम केअर सेन्टर मध्ये गेलो. बाहेरून पाहताना वाटले काय असेल इथे ? पण आत गेल्यावर आम्ही भारावून गेलो. ३५ एकर जागेत डॉ. सामंत आणि त्यांचे सोबती डॉ. परुळेकर यांनी नंदनवन फुलवले आहे.  हॉस्पिटल, शाळा, कॅन्सर पेशंट साठी वेगळा वॉर्ड, ऑपेरेशन थिएटर , शेती, बायोगॅस प्लांट, वसतिगृह सगळेच. इथे येणाऱ्या लोकांवर फुकट उपचार केले जातात. तिथे हि आम्ही थोडे जिन्नस व त्यांना लागणाऱ्या काही उपयोगी वस्तू दिल्या.

आम्ही जे दिले होते ते १% हि नव्हते. डॉ. सामंत, डॉ. परुळेकर आणि त्या महिलाश्रम सांभाळणाऱ्या महान लोकांसमोर आपण किती खुजे वाटतो. पण अशा काम करणाऱ्या लोकांना पाहून आम्हालाही आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. मनापासून असे वाटते कि आपण जसे आपल्या मजा मस्ती साठी पैसे खर्च करतो तसे प्रत्येक ग्रुप ने असे  जर छोटे मोठे काही केले तर कितीतरी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीची दिवाळीही आमच्या  "टीम १९९२" ने सार्थकी लावली. आणि अशीच पुढेही आम्हाला जमेल तशी हि सेवा अशीच सुरु ठेव

Tuesday, 17 October 2017

मला भावलेली झी मराठी वरील मालिका - श्रीयुत गंगाधर टिपरे

मला भावलेली झी मराठी वरील मालिका - श्रीयुत गंगाधर टिपरे 

खूप अप्रतिम मालिका . ती मालिका कमी आणि आपल्याच घरातले चित्रण जास्त वाटायचे.   प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात आजी आजोबा हवे असतात. आपले लाड पुरवणारे , गोष्टी सांगणारे आणि छान छान खाऊ देणारे. असेच शिऱ्या आणि शलाकाचे लाडके आजोबा  श्रीयुत गंगाधर टिपरे म्हणजे "आबा". नातवा इतकेच नाती वरही प्रेम करणारे. तिच्या करियर आणि भविष्यासाठी निर्णय घ्यायला मदत करणारे , शिऱ्या चे क्रिकेट चे वेड जपणारे आणि त्याचा बरोबर कधी कधी खोडकर होणारे आबा. सुनेला मुलीप्रमाणे वागवणारे आणि मुलाच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे. 

आबांचा मुलगा शेखर टिपरे. नोकरी आणि घर एवढेच विश्व. एकदम मध्यमवर्गीय माणूस. खूप साधा सरळ. मुलांशी संवाद साधणारा त्यांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला पाठिंबा देणारा आणि वेळ पडल्यावर रागावणारा हा बाबा. अगदी बघताना आपल्या वडिलांनीच आठवण यावी. शेखर चे ऑफिस चे मित्र अगदी घरच्यासारखे. त्यांचे ऑफिस च्या टी टाइम मध्ये चहाच्या टपरीवर चहा प्यायला जाणे. कोणालाही आपल्या ऑफिस चे आठवण यावी असेच वातावरण. शेखर खूप शांत आणि संयमी. 

आबांची सून म्हणजे श्यामला टिपरे. एक साधी सरळ गृहिणी. घर संसार, तिची मुले , सासरे आणि नवरा इतकेच विश्व आहे तिचे. घरातल्या सगळ्यांची काळजी घेणे हे तिचे परमकर्तव्य. तरीही मुलांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवणारी. मायेने जवळ घेणारी तर शिऱ्याचा चुकांवर रागावणारी. आपली मुलगी शलाका हिची आई कमी आणि मैत्रीण जास्त. सासऱ्यांना वडिलांप्रमाणे जपणारे हि लघवी सून. 

आबांचा लाडका नातू आणि त्यांच्या खोडकरपणाचा भागीदार "शिऱ्या". आपल्या घरात जसा एकादे भावंडं असते ना खूप मस्तीखोर तरीही लाडके असा हा "शिऱ्या".  इतर मुलांसारखे ह्याला हि क्रिकेट चे खूप वेड. म्हणून दार वेळी घरच्यांचा ओरडा हि खातो. आई ने काही काम सांगितले कि ते करायचा कंटाळा पण खेळायला म्हटले कि तयार.  घरात असलेले आजोबा म्हणजे त्याची ढाल. काही असेल तरी सगळे आधी आबांना सांगायचे आणि मग  आबांकडून घरच्यांना. चूक झाली तरी आबांना माहित होते म्हणून आपला बचाव करायला मोकळा. तरीही घरातल्या प्रत्येकाचा आदर करणारा आणि आज्ञानधारक मुलगा. 


टिपरे घरातली लाडोबा म्हणजे शलाका टिपरे. नटण्या मुरडण्याची आवड असणाऱ्या या मुलीला करियर हि त्याच क्षेत्रात करायचं आहे. खूप मनमिळावू शांत मुलगी . आपली कामे सांभाळून आईला जमेल तशी मदत करणारी. आई बाबांची लाडकी. भावाशी वाद झाले तरी त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी हि मुलगी. 


श्रीयुत गंगाधर टिपरे-"आबा" -दिलीप प्रभावळकर . त्यांच्या "अनुदिनी" या कादंबरीवर आधारलेली हि मालिका. केदार शिंदे यांची निर्मिती आणि तितकेच सहज दिग्दर्शन. झी वरच्या सर्वोतोकृष्ट  मालिकांपैकी हि एक. 


दिलीप प्रभावळकर - श्रीयुत गंगाधर टिपरे उत्तम अभिनय. त्यांनी रेखाटलेल्या ८०-८५ वर्षाच्या वृद्धाची भूमिका अप्रतिमच. त्याच्या बोलण्याची ती ढब काही वेगळीच. किती जणांना अजूनही त्यांच्या बोलण्याची नक्कल करावीशी वाटते. 

राजन भिसे- शेखर टिपरे. मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुखाची साकारलेली भूमिका अतिशय सुंदर. बघताना आपले वडील आठवावेत इतकी जिवंत. 

शुभांगी गोखले- श्यामला टिपरे. आई , सून , बायको असावी तर अशी इतका छान अभिनय. साडीचा पदर खोचलेला आणि अंबाडा अगदी आईची आठवण. स्वयंपाक घराबाहेर येताना त्याच पदराने घाम पुसण्याची प्रत्येक गृहिणीची सवय. खूप बारीक बारीक गोष्टी अगदी खुलून मांडल्या आहेत. 

विकास कदम- शिऱ्या टिपरे . आपल्या घरातला वाटावा इतका जिवंत अभिनय. आज हा नवीन काय घोळ घालणार अशी नेहमीच उत्सुकता. आजोबांशी असलेली त्याची मैत्री पाहून कितीतरी मुलांनी आपल्या आजोबांशी मैत्री केली असेल. 

रेश्मा नाईक - शलाका टिपरे. आपणही हिच्यासारखेच असावे असे कितीतरी कॉलेज कन्यकांना वाटले असेल. साधी, सरळ, सोज्वळ आणि सुंदर अशा सगळ्याच गोष्टी शलाका मध्ये. 

त्या मालिकेचे शीर्षक गीत हि किती निराळे होते. " सोयम तोयंम ताना नुंम तू तानांनी " हेच बोल आणि संगीत. पण त्याचे चित्रीकरण इतके सुंदर होते कि ती पात्र सगळी डोळ्यासमोर यायची. नुसते शीर्षक गीत ऐकून मालिका पाहायची इचछा व्हायची.

एकंदरीतच हे कुटुंब आपल्या आसपासचे वाटावे इतके खरे. मनाला भावणारे. आपले विश्व विसरायला लावून आपण अगदी त्यांच्यात सामावून जातो इतके अप्रतिम कलाकृती. म्हणूनच माझ्याच काय तर झी च्या सगळ्याच प्रेक्षकांना हि मालिका नक्कीच भावली असणार

Tuesday, 10 October 2017

त्या एका पत्राचे उत्तर

प्रिय मित्र,
       बरे झाले त्या दिवशी माझे एक काम तुझ्या ऑफिस जवळ होते आणि तू मला तुझ्या ऑफिस मध्ये येऊन भेटायची परवानगी दिलीस. काय मस्त गप्पा झाल्या आपल्या. फोनवर नीट नाही बोलता येत त्यापेक्षा समोरासमोर गप्पा जास्त छान होतात. आणि मूख्य म्हणजे मला तू मलाच लिहिलेल्या पत्रा बद्दल कळले. कसला आहेस रे तू चक्क ६ महिने ते तसेच ऑफिस च्या लॉकर मध्ये ठेवलेस.  मी आले नसते तर पत्र तसेच राहिले असते आणि मग तू फाडून टाकले असतेस.
खूप छान लिहीलं आहेस. वाचताना थोडेसे हसू आलेच त्याबद्दल सॉरी. पण वाचताना मन अगदी भूतकाळात गेले. किती सुंदर आठवणी लिहिल्या आहेस तू. अगदी सगळे डोळ्यासमोर आले. मला तुझ्या इतके काही सगळेच आठवत नाहीये पण वाचता वाचता काही गोष्टी सहज लक्षात आल्या.
      खरे सांगायचे तर मला अगदीच कळलं नव्हते असे नाही पण लक्षात आले होते की तू माझ्याकडे सतत पाहत असतोस. आणि ते आवडत ही होते की आपण कुणासाठी तरी स्पेशल आहोत. ते वयच असते ना अल्लड या सगळ्या गोष्टींनी भारावून जाणारे. आणि काय रे शहाण्या मला डेंजर म्हणतोस तू ही काही अँग्री यंग मॅन पेक्षा कमी नव्हतास  जरा काही आले की हमरी तुमरी वर यायचास. किती वेळा तरी शाळेच्या मैदानात भांडताना पाहिलेय मी तुला आणि तुझ्या मित्रांना. शाळेतही शिक्षकांना काय कमी त्रास दिलात का तुम्ही. काय एक एक गोष्टी  ऐकायला यायच्या तुमच्या... बापरे!!!! काय टारगट ग्रुप होता तुमचा आता बदलले सगळे ती गोष्ट वेगळी.  मला ही ना तू सेंड ऑफ च्या दिवशी घातलेला वांगी कलर चा शर्ट आठवतो. माझा आवडता रंग म्हणून लक्षात राहिला बहुतेक. खरे सांगू तर सेंड ऑफ च्या दिवशी तू येऊन काहीतरी बोलशील असे वाटले होते पण तू काही आला नाहीस भित्री भागूबाई.  तुझे मित्र तुला चिडवतात मी बाजूने गेले की कुजबुजतात सगळे काळात होते आणि त्याची गम्मत ही वाटत होती. हळू हळू तू ही मला आवडायला लागला होतास हे आता मी कबूल करते. हे फक्त माझ्या एकाच मैत्रिणीला माहीत होते. त्यादिवशी मलाही वाटले होते की आता काही आपली भेट नाही आणि तुझे ते चोरून पाहणे ही नाही.
      ज्या दिवशी मलाही फोन आला ना आपल्या गेट टू गेदर चा त्यादिवशी मी ही खुश होते इतक्या वर्षांनी सगळे भेटणार होते आणि तू ही. मस्त वाटले खूप बोलता नाही आले पण नंबर मिळालं होते सगळ्यांचे. मी खूप दिवस वाट पाहिली पण तू काही कॉल केला नाहीस शेवटी मीच कॉल केला.  थोड्याफार फरकाने माझी ही अवस्था सारखीच होती. तुझ्याशी बोलून छान वाटतं होते. मलाही आठवतेय मी पहिल्यांदा तुझ्या गाडीत बसले तेव्हाच. आमची मैत्रिणींची बडबड सुरू होती आणि तू एकटाच बिचारा ड्राइवर सारखा. तरीही डोळ्याच्या एक कोपऱ्यातून तुझे माझ्याकडे बघणे जाणवत होते. मनातल्या मनात खूप हसू येत होते. तुला एक सांगू का तू काही बोलला नाहीस, तरी तुझे डोळे बरेच काही बोलून जातात. आपल्या प्रत्येक पिकनिक किंवा गेट टू  गेदर च्या वेळी तुझे माझ्या आसपास असणे सगळ्यांच्याच लक्षात येत होते. मला कधी कधी खूप हसू यायचे तुझे.
        ए!! तू म्हणालास ते अगदी खरंय त्या चॅट पेक्षा हे पत्र मस्त ऑपशन खरेच खूप मस्त वाटते लिहिताना आणि जास्त मोकळेपणानं लिहिता येते. आपण बहुधा शाळेत लिहिली त्यानंतर पत्र लिहिलीच नसतील ना कुणाला? हा बेस्ट मार्ग शोधल्यास तू. तसा हुशारच आहेस तू आणि स्मार्ट सुद्धा.
         मला ना तुझे खूप कौतुक वाटते की इतक्या सगळ्या गोष्टी होत्या पण तू अजिबात बोलला नाहीस. आणि मुळात तुझे प्रेम नव्हते हे स्पष्ट केलेस. हे पत्र एकआर्थी मला वाचायला मिळाले ते बरेच झाले. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. त्यामुळे सगळे चिडवतील किंवा तू काहितरी गैरसमज करून घेशील म्हणून मला ही आता तुझ्याशी बोलणे टाळायाला नको. आता अगदी छान मोकळं मोकळ वाटतेय.
         शाळेनंतर आपण बऱ्याच वेळा समोरासमोर आलो पण कधी बोललोच नाही ना..मला तर तुझे शाळेतले रूप आठवून भीती वाटायची बोलायला यायची. आणि नंतर लग्न संसार करिअर यात गुंतून गेल्यावर हळू हळू विसर पडला. त्या गेट टू गेदर च्या निमित्ताने आठवण झाली सगळी. आता खूप बदलला आहेस तू. खूप समजूतदार आणि केअरिंग झाला आहेस. दर वेळी तुझे नवीन रूप समोर आले.  
       खरेच पण शाळेचे दिवस काही वेगळेच म्हणजे सगळेच असायाचे अभ्यासाचे टेन्शन , बाईंचा धाक, मजा मस्ती आणि प्रेमप्रकरणं सुद्धा. बहुतेक  पहिले प्रेम किंवा तुझ्यासारखी पहिली आवड हि शाळेतलीच असेल. आपल्या बॅच ला हि असे किती जण असतील ना ज्यांना कुणी ना कुणी आवडत असेल. मला ना तुझे पत्र वाचताना आताचा तो नवीन चित्रपट "ती सध्या काय करते " आठवला. तुझ्यासारखेच त्या पिच्चर च्या हिरो चे. शाळेतले पहिले प्रेम. हा आता तुझे प्रेम नाही म्हणता येणार इतकेच बाकी सगळे सारखेच. तीच हुरहूर , तेच चोरून पाहणे, आणि मुळात सगळे फक्त मनातल्या मनात ठेवणे. फक्त तो बोलला स्पष्ट आणि तू लिहून काढलेस इतकेच. पण खरेच मस्त मला तर खूप स्पेशल वाटते आहे. कुणाला तरी आपण आवडणे आणि ते हि इतकी वर्ष हे किती मस्त आहे. एकदम झकास !!!!. आणि मला तसे खूप जण म्हणतात कि तुझे स्माईल छान आहे पण तू बोलल्यावर जास्तच आवडायला लागले माझे मलाच. 
   तू म्हणालास तसे नक्कीच मला हि आयुष्यभर तुझी एक चांगली मैत्रीण बनून राहणे खूप आवडेल. आणि तू हि लक्षात ठेव कि काही गैरसमज झाले तर तू हि परस्पर निर्णय नको घेऊ. आम्ही मुली जरा रडूबाई असतो ना म्हणून. आणि माझी एक अट आहे हा आपण जेव्हा कधी भेटू त्या वेळी तू मला न विसरता एक चॉकलेट घेऊन यायचे. 
तुझी प्रिय मैत्रीण,
    ए पण एक मात्र नक्की आपण कुठल्याही वयाचे असलो तरी आपली आवडती व्यक्ती आपल्या समोर आली की पोटात आपोआपच फुलपाखरे उडायला लागतात.

आणि तू हि हसू नकोस पत्र वाचताना. आणि आपण ना ह्यापुढे ६ महिन्यातून एकदा तरी पत्र लिहू एकमेकांना तेवढीच गम्मत. 


Monday, 25 September 2017

मंदार

*मंदार*
खरे तर याच्या विषयी काय आणि किती लिहायचे हा खूप मोठा प्रश्न. आमची मैत्री कधी झाली नीटसे आठवत नाही. पण दहावीच्या सुट्टीत अमितच्या घरी केलेली मजा आठवते आहे. कदाचित तीच आमची पहिली नीट झालेली भेट.
त्यानंतर आमची बऱ्याच वेळा भेट झाली पण ती नुसतीच hi hello पर्यंत मर्यादित होती. मंदार चे घर साने काकूंच्या  शेजारी होते त्यामुळे अशा भेटी होत होत्या. पण पुढे हीच मैत्री इतकी घट्ट होईल असे वाटलेच नव्हते.
२००८ मध्ये जेव्हा आमचे पाहिलं गेट टू गेदर झाले तेव्हा आमचे काही जास्त बोलणे झाले नाही सगळेच पहिल्यांदा भेटत होते त्यामुळे प्रत्येकाशी मोजकेच बोलणे झाले. त्यावेळी प्रत्येकाचे फ़ोन नंबर घेतले . पण तरीही २००८ ते २०१० आमचे जास्त काही बोलणे किंवा भेटणे झालेले मला आठवत नाही. २०११ मध्ये जेव्हा त्याच्या नवीन घरी गेलो होतो तेव्हा सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या आणि तेव्हा वाटलं की आपण शाळेतल्या मित्रमैत्रिणींनी भेटले पाहिजे आणि तिथून सुरू झाला आमच्या टीम १९९२ चा प्रवास.
कधी कधी मंदार चा खूप राग ही येतो. नुसता बॉसिंग करत असतो. हे कर ते कर नुसत्या ऑर्डर्स देणार. आणि मग त्याचा फॉलो अप . इतक्या वेळा एकच गोष्ट विचारेल की मग मी तर वैतागून सांगते तूच कर ना सगळे. आणि कधी तर असा वागतो की जगात हाच एकटा बिझी आहे बाकी रिकामी. पण तरीही तो आणि मी अगदी मनापासून काम करतो आमच्या ग्रुप साठी. ग्रुप मध्ये कार्यक्रमाचे मेसेज टाकणे , सगळ्यांना आठवण करून देणे बरीच कामे तोच करतो. कधी कल्पना त्याची कृती माझी तर कधी कल्पना माझी कृती त्याची. आता तर आम्ही एकमेकांना इतके ओळखतो की बऱ्याच वेळा त्याच्या आणि माझ्या कल्पना बऱ्याच वेळा सारख्याच होतात.
दाखवताना असे दाखवतो की मी कुठलीही गोष्ट सिरियसली घेत नाही पण तसा हळवा आहे. कुणी आजारी असो किंवा  कुणाचे काही झालेले असो याला जायला जमले नाही तरी फोन करून हा नक्की चौकशी करणारच.  कधी कधी  तो इतका पॅनिक होतो की बस मी आजारी पडले तर कार्यक्रम पुढे धकलूया म्हणत होता. एखादी गोष्ट नाही म्हटली की लगेच जाऊ दे मग सगळे कॅन्सल करू हे उत्तर ठरलेले. इमोशनल ब्लॅक मेल करणे कोणी याच्या कडून शिकावे. पण तरीही एक खूप चांगला, काळजी घेणारा आणि सगळ्यांना जोडून ठेवणारा आहे. मला जास्त अभिमान वाटतो की हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात तो त्याचा आई वडिलांच्या सोबत आहे आणि खूप छान सांभाळून आहे. अर्थात त्यात त्याला त्याच्या बायकोची म्हणजे मनालीची ही तितकीच उत्तम साथ आहे. मुख्य म्हणजे ती आमच्या मध्ये  ही अगदी मिसळून जाते.  मंदार बद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे त्याने " देहदान" केले आहे आणि आमच्या समोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.
‌२०१४  मध्ये जेव्हा आम्ही सगळ्या शिक्षकांना बोलावून स्नेहसंमेलन करणार होतो तेव्हा काही कारणाने आमच्यात खूप वाद झाले होते . किती तरी दिवस आमचा अबोला ही होता. त्यानंतर जवळपास ६ महिने आम्ही एकमेकांशी नीट बोलतही नव्हतो. असे वाटत होते की कदाचित आता काही परत पूर्वी सारखे होणार नाही. एकमेकांना खूप बोलून सगळे आरोप प्रत्यारोप करून आम्ही मोकळे झालों होतो. पण आमच्या अबोलयाचा परिणाम जेव्हा जाणवायला लागला तेव्हा आम्ही दोघांनीही माघार घेतली.  हीच वेळ असते की ज्या वेळेला आपली मैत्रीची भावना आपल्याला सावरते. आणि एका गेट टू गेदर च्या निमित्ताने आम्ही परत बोलायला लागलो.  मैत्री च्या परीक्षेत आम्ही शंभर पैकी शंभर गुणांनी पास झालो. अशी तर लुटुपुटूची आमची बरीच भांडणं होतात रागाने कधी मी तर कधी तो ग्रुप ही सोडतो पण ते तेव्हढ्यापुरताच असते. आपल्याला कोणीतरी मस्का मारावा ही निव्वळ भावना. राग वैगरे प्रकार नाही.  आमचा ग्रुप जिवंत ठेवण्यामागे मंदार चा खूप मोठा वाटा आहे. सतत काही न काही बोलणे असतेच ग्रुप वर. मी केलेल्या कुठल्याही पोस्ट वर त्याचे कंमेंट नाही असे होतच नाही. मलाही त्याचे काही कंमेंट नाही आले तर चुकल्या सारखे होते. कोणाची फिरकी कशी घ्यायची हे त्याला पक्के ठाऊक आहे. मला तर चिडवून चिडवून बेजार करतो. आता आम्हाला एकमेकांबरोबर गोष्टी शेअर करायची इतकी सवय झालीय की त्याने एखादी गोष्ट मला न सांगता दुसऱ्या कुणाकडून कळली तर वाईट वाटते. माझ्याशीच असे नाही तर प्रत्येकाशी त्यांचे संवाद सुरू असतात. पण तरीही कधीतरी सिक्रेट ठेवतोच. 

‌इथे ना एक गंमत सांगावीशी वाटतं अमित ला मंदार ला डिफेकटिव्ह पीस म्हणतो  मलाही आधी नवल वाटायचे असे का?? पण त्याची छोटी छोटी १०-११ ऑपरेशन झाली आहेत. काय सहनशीलता ....बापरे. कदाचित त्यामुळे तो अर्धा डॉक्टर झालाय😊😊.

‌मंदार मध्ये एकच बदल हवा त्यानें थोडे धीर धरायला शिकायला हवे. कधी कधी यामुळे तो आम्हाला सगळ्यांना धारेवर धरतो.

‌पण तरीही  एक चांगला मित्र , भाऊ ,मुलगा वडील आणि नवरा मला वाटतं सगळ्याच भूमिका तो व्यवस्थित पार पडतोय .
‌जोपर्यंत टीम १९९२ आहे तोपर्यंत मिलन आणि मंदार आहेत किंवा जोपर्यंत मिलन आणि मंदार आहेत तोपर्यंत  टीम १९९२ ची धुरा अशीच सांभाळत राहणार.👍

Wednesday, 20 September 2017

एक पत्र

प्रिय मैत्रीण ,

खरंतर पत्र लिहिण्याची काही गरज नाही आणि आताच्या मेसेजच्या जमान्यात अगदी आऊटडेटेड तरीही पत्र ते पत्र टाइप करण्यापेक्षा लिहून जास्त छान व्यक्त होता येते असे मला वाटते. . जे काही आहे ते आता आपण समोरासमोर बोलू शकतो इतकी मैत्री आपल्यात आता नक्कीच झाली आहे. पण तरीही काही गोष्टी अशा नाही जमणार मला तुझ्यासमोर बोलायला . अर्धे अधिक तर मी तुला पहिले कि विसरूनच जातो, तरी मला बोलल्याचे समाधान . म्हणून हा उपाय मस्त तुझ्यापर्यंत नाही पोचले तरी मला आपले बोलल्याचे समाधान. तू त्या दिवशी विचारात होतीस ना कि सांग बरे दोन चार आठवणी. आता सांगतो पण कंटाळू नकोस हा आणि हसू तर अजिबात नकोस. कारण तुझ्या स्माईल वरच तर फिदा झालो ना मी. आठवत नाही पहिल्यांदा तुला कुठे पाहिले ते. पण एक दिवस शाळेच्या गेटजवळ मुलींच्या घोळक्यात तुला  खळखळून हसताना पहिले आणि संपलोच मी. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी खूप वेगळीच वाटलिस तू इतर मुलींपेक्षा. आणि त्यानंतर मात्र माझा एकही दिवस गेला नाही कि मी तुला शोधले नाही. कधीतरी चोरून तर कधी समोरासमोर तुला पाहणे हा छंदच झाला होता माझा. शाळा सुटताना , भरताना अगदी मधल्या सुट्टीत सुद्धा फक्त तुला बघण्यासाठी माझा सगळं आटापिटा असायचा. मित्रांच्या किती शिव्या खाल्ल्या  आहेत ते माझे मलाच माहित. तू मला आवडतेस हे जवळजवळ सगळ्या वर्गालाच ठाऊक झाले होते . कदाचित तुलाही त्याची कल्पना आलीच होती. पहिल्यांदा मला कुणीतरी इतके आवडले होते आणि कुणीतरी आवडणे हि चूक नाही. म्हणून माझ्या खास मित्रांमध्ये मी हे बोललो हि होतो. त्यामुळे त्यांचे मला तुझ्यावरून चिडवणे अंमळ जास्तच वाढले होते. 

मला चांगले आठवतेय शाळा सुटताना एका मुलाने तुला धक्का मारला होता. कसले झापले होतेस तू त्याला. तुझ्या बरोबर तुझ्या दोन चार मैत्रिणी हि आल्या मग त्याला ओरडायला . तेव्हा मात्र थोडी भीती वाटली होती कसली डेंजर मुलगी आहे असे वाटले होते क्षणभर. मी हि तुझ्या मागे पुढेच असायचो शाळा भरताना आणि सुटताना त्या मुळे  थोडे टेन्शन आले होते. शाळेतही कुठल्या शिक्षकांनी काही  आणायला सांगितले कि जाता येता माझी नजर तुझ्या वर्गावर जायची. कधीतरी तू दिसायचीस कधीतरी नाही. मग थोडेसे नाराज व्हायला व्हायचे. तू शाळेला दांडी मारलीस कि माझा जीव मात्र कासावीस व्हायचा. मग दहा वेळा काही ना काही कारणाने आवारात दहा फेऱ्या व्हायच्या. 

आता अगदी आपण दोघेही संसारात व्यवस्थित रमलोय तरीही तुझ्याविषयीची ओढ किंवा आवड कमी झाली नाही. तुझ्या बरोबर लग्न करावे किंवा साधा रोमान्स करावा असे स्वप्नातही वाटले नाही. तुझे आसपास असणेही आवडायचे मला. मला अजूनही तू आपल्या सेंड ऑफ च्या दिवशी नेसलेली ती जांभळ्या रंगाची हिरव्या काठाची साडी आठवतेय. किती गोड दिसत होतीस तू त्यात. असे वाटत होते कि दिवस संपूच नये. कारण त्या नंतर शाळा हि बंद म्हणजे तुझे दिसणेही बंद मन कासावीस झाले होते. नंतर परीक्षेच्या काळात आपलीच शाळा सेन्टर असल्यामुळे दिसलीस तू पण त्या दहावीच्या परीक्षेच्या टेन्शन मध्ये बाकी काही सुचत नव्हते. 

त्यानंतर कॉलेज , जॉब लग्न सगळे होईपर्यंत आपले काही कधी भेटणे झालेच नाही. कधीतरी रस्त्यात एकमेकांसमोर आल्यावर एक स्माईल इतकेच . पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात तुझी छबी नेहमीच राहिली. तुला पूर्णपणे विसरलो असे कधी झालेच नाही. नंतर एक दिवस फोन आला " अरे !! आपल्या दहावीच्या बॅचचे गेटटुगेदर आहे. आणि मन परत भूतकाळात गेले. त्या निमित्ताने  तू परत भेटशील म्हणून त्या मित्राचे हजार वेळा आभार मानले असतील मी.  ज्या वेळी तुला पहिले ना त्या लाल रंगाच्या ड्रेस मध्ये किती छान दिसत होतीस. आणि तुझे ते हसू जसेच्या तसे सगळे विसरायला लावणारे. त्या दिवशीही माझ्या मित्रांनी मला काही सोडले नाही तुझ्या वरून चिडवणे सुरूच होते. त्या ऑकवर्ड स्थिती मुले तुझ्याशी धड बोलताही आले नाही मला. असा राग आला होता त्या मित्रांचा पण तरीही त्यादिवशी आपण सगळ्यांचेच फोन नंबर घेतले होते त्यामुळे एक आनंद होता मनात. पण तरीही तुला फोन करायचे हिम्मत काही झाली नाही. पण ज्या दिवशी तुझा फोन आला बापरे!!!! ऑफिस च्या खुर्चीत जवळ जवळ उडालोच होतो मी. किती बालिशपणा तरीही मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पहिल्यांदा तुझा आवाज ऐकला मस्त वाटले. अगदी नॉर्मल गप्पा मारून ५-१० मिनिटात फोन ठेवलास तू. मी मात्र आठवडाभर त्याच विश्वात होतो. कदाचित बायकोलाही ती गोष्ट जाणवली असेल. त्यानंतर मात्र बऱ्याच वेळा आपल्या छोट्या छोट्या भेटी होत होत्या. मला अजूनही आठवतेय तू पहिल्यांदा जेव्हा माझ्या गाडीत बसली होतीस पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होतास. तुला घरी ड्रॉप करेपर्यंत माझ्या काळजाची धडधड काही थांबत नव्हती. तू मात्र बडबड करण्यात दंग होतीस. तू, तुझी बडबड आणि तुझे हसू समोरच्याची पार विकेट घेते. 

पण तरीही एक गोष्ट सांगू का तू इतक्या मुलांशी बोलतेस अगदी मोकळेपणाने. शाळेतही तुला एका मुलाच्या नावाने चिडवायचे पण कधीही मला राग नाही आला. किंवा जळफळाट हि नाही झाला. तू माझी होतीस माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी. एकतर्फी प्रेम नाही म्हणता येणार तरीही अव्यक्त प्रेम म्हणता येईल. आता तर आपण इतके छान बोलतो. महिन्यातून कधी कधी तर आठवड्यातून हि बोलणे होते आपले. अगदी आपल्यात काही नसले तरी तुला गमवायची भीती वाटायला लागली आहे मला . तुझ्याबरोबर असताना ना का कुणास ठाऊक अगदी तरुण झाल्यासारखे वाटते. सगळे त्रास टेन्शन विसरायला होतात. तुझी बडबड ऐकत राहावीशी वाटते आणि तुझे हसू पाहत राहावेसे वाटते. एक विनंती आहे तुला समज उद्या देव ना करो आपल्यात काही गैरसमज झाले तर काही न बोलता बोलणे बंद नको करू. जमले तर बोलून किंवा भेटून गैरसमज दूर करू.  पण न बोलता मला न कळवता परस्पर निर्णय नको घेऊस इतकीच विनंती.  कारण माझ्या आयुष्यातली माझी पहिली आवड आणि माझी एक चांगली मैत्रीण मला गमवायची नाही. मैत्रीची हि अस्पष्ट रेषा ना ओलांडता सगळे सांभाळून अगदी मरेपर्यंत मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस. कारण तुझे असणेच माझ्या साठी खूप जास्त महत्वाचे आहे. 

तुझाच एक मित्र, 

ता. क. :  व्याकरणाच्या चुका काढू नकोस आणि अक्षर पाहून किंवा लिहिलेलं वाचून हसू नकोस प्लिज







Tuesday, 19 September 2017

निरागस मैत्रीचे रूप...... महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स १५. ०९. २०१७ )

आम्ही आमच्या शाळेचे 

आम्ही चेंबूर च्या " आमची शाळा " चे १९९२ बॅच चे विद्यार्थी. आमच्या पैकी बरेच जण अजूनही चेंबूर मध्ये असल्यामुळे भेटीगाठी होत होत्या. एप्रिल २०१३ ला आमचा वॉट्सअँप चा शाळेचा ग्रुप बनवला.  आणि त्यानंतर  आम्ही  २९ जुन २०१३  ला चेंबूर ला आमच्या शाळेजवळच पहिल्यांदा भेटलो.  १९८८ मध्ये इयत्ता पाचवी  झाल्यावर मी चेंबूर ची आमची शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेले, नंतर तब्बल  २५ वर्षांनी मला माझे बालमित्रमैत्रिणी  भेटले. काय क्षण होते ते. इतक्यावर्षानंतर प्रथमच.. आम्ही साधारण ११ जण होतो त्यावेळी. बरेच जण बदलले होते तर काहींच्या चेहऱ्यात अजिबात बदल नव्हता अर्थात वय वाढल्याच्या खुणा थोड्या फार खुणा प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसत होत्या. त्यातले काही जण हि शाळा किंवा कॉलेज सोडल्यावर प्रथमच एकमेकांना भेटले होते.  पुन्हा भेटण्याच्या निमित्तानं सगळेच परत एकदा बालपणात रमून गेले होते. सगळ्या जुन्या आठवणी निघत होत्या , काहीत मी होते तर काहीं मध्ये मी नव्हते. मनातून थोडे वाईट वाटत होते कि मी बरेच काही मिस केले याचे. पण त्या पुनर्भेटीचा आनंद काही औरच होता.  त्यानंतर आम्ही दर ३ महिन्यातून एकदा भेटतोच. ' फ्रेंडशिप डे ' च्या निम्मिताने एक पावसाळी पिकनिक असतेच.  खूप मज्जा करतो आम्ही अगदी वय विसरून लहान मुलांसारखी मज्जा करतो.  अशा वेळी अगदी खूप व्यस्त असलेले आमचे बरेच मित्र मैत्रिणी आवर्जून वेळ काढून येतातच. दर वेळी अजून कुणीतरी नवीन मित्रमैत्रिण आमच्या सोबत असते. खूप छान वाटते जेव्हा मित्र मैत्रिणीची संख्या कमी न होता ती वाढत जाते.  आणि प्रत्येक वेळी आठवणींच्या आल्बम मध्ये नवनवीन आठवणींची भर पडत जाते. खरंच शाळेत झालेली ती निरागस मैत्री कायम तशीच राहते कारण तेव्हा जातपात , गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो. आमची हि मैत्री अशीच कायम निरागस आणि घट्ट राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना . 




Saturday, 5 August 2017

मैत्री



"मैत्री" शब्द उच्चरला तरी आपल्या समोर बरीच माणसे येतात. लहानपणापासून अगदी म्हातारे होईपर्यंत आपली बऱ्याच जणांशी मैत्री होते. शाळेत, आजूबाजूला, कॉलेज मध्ये, मग नोकरी शेजारी, ट्रेन मध्ये, अगदी रोज येण्या जाण्याच्या रस्त्यावर सुद्धा आपली एखाद्याशी मैत्री होते. ह्या सगळ्या मध्ये प्रत्येक वेळी कोणी ना कोणी आपल्या खूप जवळचे होते. त्या व्यक्तीला  आपण आपले सगळे त्रास, आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. ती हि व्यक्ती तितक्याच आत्मीयतेने आपले ऐकून हि घेते. प्रत्येक वयात झालेली मैत्री हि वेगळी  असते. बालपणीची,शाळेतली निरागस मैत्री, कॉलेज मध्ये थोडासा विचार करून केलेली,आई वडिल्यांच्या धाकाने मोजक्याच लोकांशी केलेली मैत्री. मग ऑफिस मध्ये ८ तास ज्याच्या सोबत काढतो त्यांच्याशी आपसूकच होऊन जाते ती मैत्री. मग शेजारी ज्यांच्या कडे " आमचा गॅस येणार आहे , घ्याल का जरा?" अशा काहीश्या  संवादाने सुरु होते ती मैत्री.  कधी कधी आपण त्या व्यक्तींना दुखावतो हि , कधीतरी आपण दुखावले जातो पण तरीही त्या व्यक्ती पासून आपण दुरावत नाही. 

मैत्री म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची मैत्रीची व्याख्या वेगळी.  कुणासाठी  फोन वर तास तास बोलने  म्हणजे मैत्री, तर कुणासाठी विकेंड ला हँगआउट करणे म्हणजे मैत्री. सध्याच्या ह्या वर्चुअल जगात मैत्री धरून ठेवणे बरेच सोप्प झालेय. कुठल्याही सोशल साईट वर ग्रुप करायचा आणि मग तिथे सगळ्यांशी मेसेजेस ने टच मध्ये राहायचे. पण याच साईट वर २४ तास ऑनलाईन असणाऱ्यां या मित्र मैत्रिणींना प्रत्यक्षात भेटायचे म्हटले तर बऱ्याच वेळा जमतच नाही. सातासमुद्रा पार राहणाऱ्या आपल्या मित्र मैत्रिणींशी जोडून राहण्याचा हा उत्तम पर्याय असेलही पण खरंच आपण मनापासून असे किती जणांशी जोडलेले असतो. मैत्री म्हणजे तरी काय " "निखळ आनंद ' . ज्यांच्या सानिध्यात आपण आपले " मी " पण  हरवून बसतो ती खरी मैत्री. कितीही भांडलो तरी एका हाकेला धावून येणे म्हणजे मैत्री. तो बोलत नाही तर मी का बोलू असे ना करता " साल्या तुला काय धाड भरलीय ?? ना बोलायला....  " असे हक्काने विचारणे म्हणजे मैत्री. 

मैत्री दिनाच्या निमित्ताने एकमेकांच्या हातावर दोरे बांधून हल्ली मैत्री व्यक्त करतात. मला तर हसायलाच येते दुसऱ्या दिवशी ह्यांची मैत्री केराच्या टोपलीत जाते. हातावर पेनाने नाव काय लिहितात. त्यापेक्षा मनावर नाव गोंदवले तर ते कायम नाही का राहणार? अशी नुसती दिखाऊ मैत्री काय कामाची ? आपल्या आयुष्यात बरेच मित्रमैत्रिणी असतात, पण ज्यांच्याकडे आपण आपले मन मोकळे करतो असे जिवाभावाचे अगदी मोजकेच. लांब जाऊनही जे नेहमी हृदयाच्या जवळ असतात असे फार थोडेच,  कधी कधी बालपणापासून एकत्र असून एखाद्याशी आपली गट्टी जमत नाही तेवढी कधीतरी अचानक आपल्या आयुष्यात आलेल्या एखाद्या व्यक्तीशी जमून जाते. 

मैत्रीचे दुसरे नाव म्हणजे " विश्वास". जिथे विश्वास नाही तिथे मैत्री टिकूच शकत नाही. मैत्रीत रोज भेटणे गरजेचं नसते पण जेव्हा भेटतो तेव्हा विरह काळाचा पत्ता न लागता एकरूप होणे म्हणजे मैत्री. " अरे!! आम्ही रोज बोलतो , he is or she is my good friend" असे म्हणणाऱ्या व्यक्तीला हि अडचणीत आपल्यावर सगळ्यात आधी जी व्यक्ती डोळ्यासमोर येते ती त्याची खरी मैत्री. आपला मित्र किवा मैत्रीण आपल्याशी कितीही भांडली असेल तरी हि सुखदुःखात आपल्यासमोर तीच व्यक्ती येते. पण मैत्री तरी कुठे आपण ठरवून करतो ती हि आपोआपच होते ना? असे म्हणतात मैत्री होण्यासाठी गुण नाही दुर्गुण जुळावे लागतात कधीतरी वाटते खरंच आहे कि काय हे जेव्हा शाळेत मित्रांसोबत केलेला दंगा आठवतो. 

मैत्री म्हणजे एखाद्याला त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारणे, नुसते स्वीकारणं नाही तर त्या दोषांना सुधारणे. नाही पटले म्हणून पटकन ब्रेक अप करता येतो प्रेमात, पण मैत्री अशी सहजासहजी तुटत नाही. आणि तुटलीच तर एक चांगला मित्र किंवा मैत्री गमावल्याची जाणीव मनाला आयुष्यभर सलत राहते. मैत्रीत नेहमीच समोरच्याला आपली चूक सुधारायची संधी देतो आपण. 

एक समीकरण मात्र पटत नाही कि एक मुलगा आणि एक मुलगी कधी मित्र बनू शकत नाही. जर एखाद्या मुलाला खूप मैत्रिणी असतील किंवा एखाद्या मुलीला खूप मित्र असतील तर ते काय प्रत्येकाच्या प्रेमात पडतात? एखादा मित्र आणि मैत्रीण एकमेकांना खूप जवळचे असले म्हणजे त्यांचे नाते मैत्रीपलीकडचे आहे असे समाजणे चूक नाही का?  मैत्रीला कशाचीच अट नसते ना वयाची ना स्त्री पुरुष अशा लिंगभेदाची. आपल्यापेक्षा खूप वयाने खूप जास्त असणारी व्यक्ती हि आपली मित्र असू शकते ना. मन जुळली आणि आपोआप मैत्री होते. मग वेळ काळ जागा याचेही बंधन नसते. 

वयाच्या सगळ्या टप्प्यांवर आपल्याला कुणाची ना कुणाची गरज लागते ज्यांच्या कडे आपण व्यक्त होऊ शकतो. अशी हि मैत्री प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी. आपल्यातले लहान मूल  जपणारी. आपले प्रत्येक दुःख सुखकर करणारी अशी हि मैत्री."  मैत्रीत प्रेम नसले तरी प्रेमात मात्र मैत्री नक्कीच हवी. 

एक अक्षरही ना बोलता डोळ्यातले भाव वाचते ती " मैत्री", " मी ठीक आहे" असे म्हणताना आपल्या मनातली वादळे ओळखते ती  " मैत्री", काहीही ठीक नसताना , आपल्या पाठीवर विश्वासाने हात ठेवून " सगळे ठीक होईल" असा विश्वास देते ती  " मैत्री", स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रुना थांबवून समोरच्याचे डोळे पुसते ती  " मैत्री", सगळे मतभेद भांडण विसरून आपल्याला मनापासून स्वीकारते ती  " मैत्री", दुःखात एकटेपणात ज्या आठवणींनींनी ओठांवर हसू फुलते ती  " मैत्री". 

माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्पयावर मला भेटलेल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना , २५ वर्ष लांब राहूनही मला अजिबात ना विसरणाऱ्या , मी त्यांची बालमैत्रीण नसूनही मला त्यांच्यात मिसळून घेऊन मला आपलेसे करून घेणाऱ्या , माझ्या चुका , माझी बडबड सगळ्या कडे दुर्लक्ष करून मला एक चांगली मैत्रीण बनवणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा. 











Thursday, 20 July 2017

स्त्री

आपण कितीही पुढारलो ना तरी स्त्री पुरुष हा भेद आपल्या मधून जाणे फार कठीण आहे. जाईल पण अजून बरीच वर्ष लागतील त्या गोष्टीला. आताही बघितले तर स्त्रीभृण हत्या थांबण्यासाठी किती प्रयत्न केले जातात, किती जनजागृती केली जाते तरीही हे प्रमाण काही कमी होत नाही. असे पाहायला गेलो तर टीव्ही मालिकांचा आपल्या आयुष्यावर किती तरी मोठा पगडा असतो . पण त्यातल्या वाईट गोष्टी पटकन घेतल्या जातात. पण त्याच मालिकांमध्ये मुलगी झाली म्हणून आनंद साजरा करणे हे मात्र बरेच जण नाक मुरडून पाहत असतील. मी मेल्यावर मुलगाच मला अग्नी देणार अशीच धोरणा साधारणपणे सगळी कडे आहे. पण आज प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेली मुलगी आपल्या आई बाबाना अग्नी देऊ शकत नाही का ? मधली आहे म्हणून मुलीने अग्नी द्यायचा नाही तोच जर दोन बहिणींच्या मध्ये मुलगा असता तर त्या मधल्या मुलाने अग्नी दिलेला चालतो. पण आयुष्यभर सांभाळणाऱ्या मुलीने नाही. किती विचित्र पद्धती आहेत ना आपल्याकडे?

अजूनही बाई म्हटली कि ती अबला च असाच गृह केलेला असतो. आजही बलात्काराच्या , छेडछाडीच्या कितीतरी घटना आपण वाचतो ऐकतो. यात प्रत्येक वेळी एक स्त्रीच असते जी छळली  जाते.  आतापर्यन्त आपण अशा किती घटना ऐकल्या आहेत कि ज्यात  ४-५ मुलींनी मिळून एका मुलांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला? किंवा २-३ टारगट मुलींनी एखाद्या मुलाची छेड काढली ? नाही !!!!! अशी एकही घटना आपल्या ऐकिवात नसते. ज्या स्त्रीच्या उदरातून तुम्ही जन्म घेता तिचाच विनयभंग करताना शरम नाही वाटत?  पुरुषांना वाटत स्त्री बद्दल आकर्षण तसे स्त्री ला नाही वाटत? पण ती तिच्या मर्यादा ओळखून असते.  

स्त्री ला सगळीकडेच बंधनात ठेवण्याचा प्रयत्न असतो. एखादा पुरुष कामानिमित्त ऑफिस मध्ये थांबला तर तो कामसू त्याची कामा प्रति श्रद्धा आणि तेच जर एखादी बाई थांबली तर हिला काही घरदार नाहीच नुसते कामाचे नाटक करत असते . आणि नाही थांबली तर हिलाच का एकटीला घरदार आम्ही काय रस्त्यावर पडलोय अशी धारणा.  पुरुष अर्ध्या चड्डीत कुठेही फिरू शकतो, उधडाबंब राहू शकतो. तेच जर एखाद्या मुलीने छोटे कपडे घातले तर तिला पाहून यांच्या नको त्या भावना जागृत होतात. आणि मग अगदी आशाळभूत नजरेने तिचे निरीक्षण केले जाते. मग याना ना स्वतःच्या वयाचे भान असते ना लाज असते.  हेच स्वभावात हि एखादा पुरुष जर १० बायकांशी बोलत असेल तर किती मनमिळावू, किंवा कोणी त्याच्याशी बोलत असेल तर त्याचे व्यक्तिमत्वच किती छान कि सगळ्यांना हवासा वाटतो. पण हेच जर त्या जागी एखादी बाई असेल तर ती ना तसलीच आहे सतत पुरुषांमध्ये असते. काही लाज शरम नाही तिला. जरा मर्यादा ठेवून वागायचे सगळ्यांशीच काय ते गोड गोड बोलायचे.  आणि त्यातही मग बऱ्याच जणांचा ग्रह असा होतो कि हि काय आपलीच आहे. आणि तिच्याशी वाटेल तसे वागायला मोकळे. तिचा स्वभाव चांगला आहे म्हणून ती आपल्याशी चांगली वागते नाही  हा विचार यांच्या डोक्यात येतच नाही. आणि मग ती त्याच्याशी अशी वागते मग माझ्याशी का नाही म्हणून तिला छळायला  हि तयार. एखाद्या पुरुषाचे जर लग्नानंतर संबंध असतील तरी बऱ्याच वेळा पत्नीला ते स्वीकारावे लागतात . पण याच गोष्टीचा स्त्रीने विचार करणे हि पाप.

इतकंच कशाला तर दुकानातून समान घेतल्यावर उरलेले पैसे देताना काही लोक चावट स्पर्श करायला ही मागे पुढे पाहत नाहीत. रस्त्याने चालताना हाताचा कोपरा मुद्दाम बाहेर काढून स्पर्शसुख घेणाऱ्यांची  ही कमी नाही. बाई जरा सुंदर असली की यांचा लाळ घोटेपणा सुरू. सगळ्या बाजूने नुसत्या हापापलेल्या नजरा. एखाद्या स्त्री ला मदत केली की तिच्याकडून वेगळ्याच प्रकारच्या परतफेडीची अपेक्ष् करणारे लोकही कमी नाहीत. अशाच आंबटशौकीनां मुळे स्त्री ला नको त्या व्यवसायात ढकलले जाते.

कुठल्याही नात्यामध्ये सहनही स्त्रीलाच करावे लागते. प्रत्येकाला प्रेयसी मॉडर्न आणि बायको मात्र साडीतलीच हवी असते.  लग्न आधी तिचे काही असल्यास ह्यांना त्रास का तर स्त्री च्या व्हर्जिनिटी चा पुरावा असतो. मग तुमचे काय ? हे दहा जणींना फिरवून नामानिराळे. यांच्या व्हर्जिनिटीचा पुरावा काय? तिने मात्र नवऱ्याला असेल तसे स्वीकारायचे. आणि स्वतः मात्र संशयी नवऱ्याचा आयुष्यभर मर खायचा. नवऱ्याचे व्यसनही हे रोजचेच आहे म्हणून सोडून द्यायचे. तिला हि हजार त्रास असतात पण तिने व्यसन करणे पाप. विवाहित स्त्री ने परपुरुषांशी बोलणे हि चालत नाही आपल्याकडे.  बायको असो कि प्रेयसी प्रत्येकाला ती आपली खाजगी मालमत्ता वाटते. तिने आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाशी हसून बोलणे, जवळीक साधणे  याना नकोसे असते. याना मात्र कुणाशीही कसेही वागायचा परवाना मिळालेला असतो. काही वेळा तर असे असते की एकाने तिला नाकारले तर दुसरा दिला आपुलकी चा खांदा द्यायला तयार जसे तिचे प्रेम म्हणजे बस ची सीट एक जण उठले की दुसरा बसायला तयार.  तिच्या मानसिकतेचा गैरफायदा घेणारे ही कमी नाहीत.

आज किती तरी ठिकाणी फक्त एक स्त्री आहे म्हणून तिच्या बोलण्याला महत्व दिले जात नाही. हे काम बाईने होणार नाही म्हणून तिला मागे टाकले जाते. आज सगळ्या ठिकाणी आपला ठसा उमटवून पण स्त्री नेहमी उपेक्षितच असते.  प्रत्येक पुरुष वाईट असतो असे नाही पण समाजातले ७५% लोकांची विचारधारणा स्त्री बद्दल सारखीच असते. 

एकच सांगणे आहे कि स्त्री ला एक वस्तू म्हणून बघणे सोडून द्या . तिचा आदर करा.  तिला मुक्तपणे जगू द्या. तिच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढणे सोडा. तिला तिची स्पेस द्या. ती लक्ष्मी आहे तिला तसेच तेव्हा. तिने जर  कडकलक्ष्मी चे रूप धारण केले तर मग तिच्यापासून तुमचे रक्षण कुणीच नाही करू शकत. 







Friday, 7 July 2017

प्रिय अंकुश.......

आपल्या प्रिय अभिनेता किंवा अभिनेत्री ला पत्र लिहावे असे बऱ्याच जणांना वाटत , मलाही वाटायचे नेहमी. असाच माझा हा प्रयत्न माझ्या लाडक्या अभिनेता " अंकुश चौधरी" याला पत्र लिहिण्याचा. हे वाचून तुम्हालाही तुमच्या आवडत्या अभिनेत्याची आठवण येतील. 


प्रिय अंकुश ,

खूप दिवसापासून इच्छा होती तुला पत्र लिहायची. तशी तुला आतापर्यन्त बऱ्याच जणींनी पत्र लिहिली असतील. खरे तर तुला "अहो जाहो" केले पाहिजे कारण तू सेलिब्रिटी आहेस ना. पण मी तुला "अरेच " म्हणणार कारण तू आम्हाला नेहमी आमच्यातलाच वाटतो. आणि  कदाचित आपण साधारण सारख्याच वयाचे आहोत.

माझ्या आयुष्यातले पहिले नाटक , शिवाजी मंदिर ला पाहायला गेले होते नवीनच नाटक जेमतेम १२-१३ प्रयोग ते नाटक होते " ऑल द बेस्ट". ते नाटक पहिले आणि तेव्हाच तुझ्या प्रेमात पडले. तुझे दिसणे , उंची, ऍक्टिंग  सगळेच भारी होते.  त्यानंतर फक्त तुझ्यासाठी म्हणून ते बऱ्याच वेळा पहिले.  बऱ्याच वर्षांनी मराठीत असा देखणा ऍक्टर  आला.त्यानंतर तुझा आलेला एकही सिनेमा मी चुकवला नाही. त्या काळात फार कमी मुली अशा असतील कि ज्यांना तू आवडत नसशील.  त्यावेळी बड्या बॉलीवुड स्टार च्या जोडीने तुझीही पोस्टर्स मुलींनी आपल्या कपाटात लावली असतील.  आणि किती तरी जणींच्या स्वप्नांवरही अधिराज्य केले असशील. 

कधी कोणी विचारले  की तुझा आवडता अभिनेता कोण तर साधारण पणे बॉलीवूड मधल्या एखाद्याचे नाव अपेक्षित असते पण मला कोणी विचारले तर एक क्षणाचाही विलंब न करता माझे उत्तर असते "अंकुश चौधरी".


तुझे प्रत्येक काम छान असते मध्ये काही वेळा त्यात एकसुरीपणा आल्यासारखे वाटत होते पण त्याच वेळी वेगळया धाटणीचे सिनेमे करून तुझी अभिनयक्षमता सिद्ध केलीस. आता तर तुझा अभिनय जास्त परिपक्व वाटतो. तुझ्या बऱ्याच भूमिका सामान्य माणसाला आपल्याशा वाटणाऱ्या आहेत. यंदा कर्तव्य आहे मधला राहुल ,मातीच्या चुली मधला विशाल , सावरखेड एक गाव मधला राहुल आणि डबल सीट मधला 'अमू'   असे वाटत कुणीतरी आपल्या च आजूबाजूची ही व्यक्ती आहे. तू साकारलेल्या DSP आणि सत्या , प्रत्येक कॉलेज मध्ये असा कोणीतरी एक सिनिअर असतोच ज्याला अख्ख कॉलेज टरकून असते. आणि आताच तुझा ' ती सध्या काय करते' मधला 'अनूराग' कसला दिसला आहेस तू त्यात एकदम भारी. तुला पाहताना सगळ्यांच आपले जुने प्रेम आठवले असेल. आणि माझ्या सारख्या किती जणींना असे वाटले असेल की 'अरे  यार त्या तन्वी च्या जागी मी असायला हवे होते. ' शेवटच्या त्या गच्ची वरचा सीन पाहताना नकळत डोळ्यात पाणी येते. जत्रा मधल्या "ये गो ये मैना"वर कैती छान नाचाला आहेस. आणि दिसण्याच्या बाबतीत तर तुझी तोडच नाही. दर वेळी ते गाणे पाहताना काळजचा ठोका चुकतोच. मराठीतला रोमँटिक हिरो कोण म्हटले तर पहिले नाव तुझेच येते डोळ्या समोर.  असे कितीतरी सिनेमे आहेत कि ते पाहताना असे वाटते कि " या भूमिकेसाठी अंकुश हवा होता" जास्त मजा अली असती.  

पण नुसते रोमँटिक सिनेमेच नाही तर 'रिंगा रिंगा' ' गैर ' मधले तुझी अँटी हिरो, आणि ' पोरबाजार ' मध्ये तू साकारलेली माहिती निगेटिव्ह भूमिका सगळेच अफलातून.  झकास मधल्या तुझ्या तीन भूमिका किती छान निभावल्यास तू. दगडी चाळ मधला सूर्या  त्या काळी  खरेच अशा चुकीच्या ठिकाणी अडकलेल्या मुलांचे चित्र तू तंतोतंत उभे केलेस आणि चेकमेट मधला विशाल,त्यातही   तुला त्रास दिला म्हणून त्या कै . विनय आपटे चा हि राग यायचा   , ते माझ्या आवडत्या कलाकारांच्या यादीत असले  तरीही .  कुठलेही काम असो तुझी स्टाइल काही वेगळीच. कसे आहे ना आपण सामान्य माणसे पटकन रिलेट करतो सगळ्याला. आणि टीव्ही , सिनेमा म्हणजे आपला सगळ्यांचाच वीक पॉईंट आहे.  

कुठल्याही अवॉर्ड च्या वेळी तुझ्या बरोबर  अगदी एखाद्या सिनियर कलाकाराचे नामांकन असेल ना तरी मला वाटते कि हे बक्षीस तुलाच मिळायला हवे. ज्यावेळी तुला सलग ३ वर्षे " महाराष्ट्राचा  स्टाइल आयकॉन " हा पुरस्कार मिळाला ना तेव्हा कसले भारी वाटले होते. कुठल्याही अवॉर्ड फंक्शन च्या वेळी जर तुझे नामांकन असेल  तर मी सतत देवाचा धावा करत असते कि तुलाच अवॉर्ड मिळू दे. जसे क्रिकेट च्या वेळी इतर लोक करत असतील ना तसे.  आभाळमाया, हसा चकटफू मधला साधा मुलगा . महाराष्ट्राचा स्टाइल आयकॉन किती भारी.  मला तर तू हिंदी सिनेमांच्या हीरोंपेक्षा  भारी वाटतोस.  

ज्या वेळी आम्ही कॉलेज ला होतो तेव्हा टीव्ही  आणि थिएटर शिवाय पर्याय नव्हता. एकदा तुझा नाटक व सिनेमा पाहून पोट  भरत नव्हते.  आता काय यू ट्युब वर कधीही बघता येते. तुझा "ती सध्या काय करते" मी १० वेळा तरी पहिला असेल. तुझी कुठलीही मूवी  टीव्ही वर लागली कि आमच्या घरातल्या रिमोट वर फक्त माझेच अधिराज्य असते. ऍडव्हर्टाइज च्या वेळी हि चॅनेल बदलायला देत नाही.  आणि हल्ली तर मी थिएटर मध्ये फक्त मराठी सिनेमेच पहाते . आणि तुझे जवळ जवळ ९०% सिनेमे मी थिएटर लाच पाहिलेत.  कुठल्याही चॅनेल वर जर तू आलास तरी माझी मुलगी ओरडून सांगते " मम्मी अंकुश" आणि मी हातात असेल ते काम सोडून तुला पहायला धावत बाहेर येते. इतकेच काय तर तुझ्या वाढदिवसादिवशी माझा डीपि हि तुझाच फोटो असतो.  वयाला ना सजणारी कृती असते पण काय करणार तुझी जादूच अशी आहे कि बस......... 

तुझ्यावर टीका करणारे लोक हि भेटलेत भरपूर. पण मला असे वाटते जसे एका चांगल्या डॉक्टर चे पण कुणाकुणाला वाईट अनुभव येतात. मग तुला नवे ठेवणारे लोक असणे साहजिक आहे ना. आणि माणूस जितका मोठा आणि प्रसिद्ध तितके त्याचे टीकाकार जास्त.  पण कोणी काही म्हणो तू ज्यांना आवडतो त्यांच्या वर या गोष्टीचा काडीमात्र फरक पडत नाही.  तुला गम्मत सांगू मी एकदा तुझी तुलना एका मोठ्या अभिनेत्याशी केली तर सगळे हसायला लागले मला पण काय करणार माझ्या साठी तू कुठल्याही महान अभिनेत्या पेक्षा कमी नाही ना !!!!!

सगळ्यांची असती ना तशी माझी हि एक इच्छा आहे कि एकदा तरी तुला भेटून तुझ्या सोबत सेल्फी घ्यायचा आहे. अर्थात हे काही शक्य नाही. पण झाले तर जमिनीपासून दोन इंच वर असेन  मी नक्कीच. खरेच तू माझे पहिले "क्रश" आहेस, आणि आवडता अभिनेता हि. अशीच छान छान कामे करत रहा . आणि आमच्यासारख्या तुझ्या चाहत्यांना सतत टीव्ही वर दिसत राहा. 


तुझीच एक चाहती,
मिलन 


इतके सगळे लिहून झालेय तरी  अजूनही वाटतेय " किती सांगायचंय तुला , किती सांगायचंय  तुला  ......... "









Wednesday, 21 June 2017

मी कोण होणार??


जरा कुठे मुलं शाळेत जाऊ लागलं की जो तो विचारतो "मोठा होऊन तू कोण होणार बाळा?"  मग ते बाळ ही आई बाबांनी  शिकवल्या सारखे बोलते की "मी अमुक होणार !!मी तमुक होणार!!". बिचाऱ्या त्या जीवाला माहीत ही नसते की त्या पेशा ची जबाबदारी काय आहे त्याला फक्त माहीत असते की आपण आपल्या पालकांसारखे मोठे होणार.  आपल्याला कुणीतरी मोठे व्हायचे आहे या आनंदात तो छोटासा जीव असतो पण पुढे जाऊन त्याला कशा कशाला सामोरे जायचे आहे याची मात्र त्याला बिलकुल कल्पना नसते. आपण सगळेच या प्रश्नांना सामोरे गेलो आहोत. 

प्रत्येकाचे कोणीतरी रोल मॉडेल असते. क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टींमधील लोकं जास्त असतात कारण आपल्या देशात या दोन गोष्टीना इतर कशापेक्षा हि जास्त महत्व दिले जाते. त्यामुळे साधारण कुणाला हि विचारले कि तुला काय काय व्हायचे आहे तर मुलांमध्ये जास्त मला "सचिन" किंवा "विराट" किंवा एखाद्या क्रिकेटर चे नाव घेतो.  आपण कोण होणार हे तर ठरवतो पण कारण त्या वेळेला आपल्याला त्या व्यक्तीची प्रसिद्धी , तिचे सगळ्याच माध्यमात पॉप्युलर असणे, पैसे दिसत असतात पण त्यामागे लागणारी मेहनत, हवा असणारा आत्मविश्वास हे सगळे आपल्याकडे आहे का? हा विचार करण्याचे वय नसते ते. आणि त्यात काही पालक हि मुलांच्या या बाळबोध विचारांना खतपाणी घालतात. 

आपल्या कडे पहिल्या पासूनच शिकवले जाते कि मोठे होऊन डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचे. आणि त्या साठी त्या मुलाच्या हात धुवून मागे लागले जाते. त्याला झेपत नसलेलं ओझे मुलावर टाकले जाते आणि मग काही जण फक्त मानसिक त्रास भोगतात. व्हायचे असते कुणीतरी वेगळे आणि होतात कुणीतरी वेगळे. स्वतःच्या इच्छा मारून पालकांच्या इच्छेखातर वेगळा मार्ग निवडावा लागतो. 

सगळ्यांचाच कल  पैसे आणि प्रसिद्धी असणाऱ्या पेशांमध्ये असतो. पण त्या साठी खंबीर मनाचीही आवश्यकता असते. त्या ठिकाणी असणाऱ्या रॅट रेस मध्ये आपला कितपत निभाव लागणार आहे हे नाही पहिले जात. आणि नंतर डिप्रेशन किंवा आत्महत्या हे पर्याय निवडले जातात.  आपण किती वेळा ऐकतो वाचतो अशा बातम्या पण त्याच्यावर हळहळ व्यक्त करतो, त्या व्यक्तीला दोष देतो आणि सोडून देतो पण त्यावर विचार मात्र करत नाही.  आपल्या पाल्याने काय व्हावे हे ठरवण्यापेक्षा त्याला नक्की काय व्हायचे आहे हे पहिले तर कदाचित त्याच्या आवडीच्या क्षेत्रात तो सर्वोत्कृष्ट  असेल. 

मी एकदा टीव्ही वर पहिले होते एक अभिनेत्री म्हणाली होती कि " जे कराल ते इतकं उत्कृष्ट करा कि दुसरे कोणी त्याला करताना दहा वेळा विचार करेल. म्हणजे कांदा चिरला तरी इतका सुंदर  चिरा कि दुसरे कोणी  तसा चिरणार नाही ". "मी अमुक होणार मी तमुक होणार "असे प्रत्येक जण म्हणतं आणि आपणही " वा छान!!!" हा असे म्हणून त्याला शाबासकी देतो. पण कुणी हा विचार का करत नाही कि मी " मी होणार". 'मी कुणासारखा तरी आहे या पेक्षा कुणीतरी माझ्यासारखं व्हायला हवे अशी मी माझी ओळख निर्माण करेन' या गोष्टीत जास्त आत्मविशास आहे ना. आपण प्रत्येकाने मुलांच्या मनात हि भावना रुजवली पाहिजे.  कुठल्याही क्षेत्रात जा पण तिथे स्वतःचा ठसा उमटावा. मी कुणाच्या तरी आखून दिलेल्या मार्गावर चालणार कि मी स्वतः स्वतःचा मार्ग आखणार हे आपण ठरवायचे असते. 

" शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात" अशी विचारसरणी असते आपली. आता पर्यन्त आपण कधी ऐकले नसेल कि एखादे बाळा म्हणते कि मला " शिवाजी व्हायचे आहे". अगदी गड किल्ले सर करणारे नको पण निदान अन्यायाविरुद्ध लढणारे तरी शिवाजी बनवा कि मुलांना . एकुलत्या एक मुलाला सैनिक होऊ द्यायचे नाही असाही विचार करणारी लोक आहेत, तर शिवाजी होणे दूरच. 

" मी कुणीतरी होणार " यापेक्षा " मी एक चांगली व्यक्ती होणार" असे जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकवू ना त्यावेळी खऱ्या अर्थाने " मी कोण होणार ?? " या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडेल.