Friday, 6 October 2023

सहजच...........३

 एकांत आणि एकटेपणा किती सारखे शब्द..पण दोहोंचे अर्थ अगदी टोकाचे. एकांत हवाहवासा वाटणारा तर एकटेपणा नकोसा झालेला, खायला उठणारा.


एकटेपणा ...... माणूस कशालाही घाबरत नाही तितका एकटेपणाला घाबरतो. एकट्यानं सगळे करता येते असे म्हणणाऱ्या व्यक्तींनाही कधीतरी, कुठंतरी हा एकटेपणा सलत असतो. वयाच्या कुठल्याही टप्प्यात एकटेपणा येणे हे त्रासदायकच. पण तरीही त्याला सामोरं जाऊन ,त्यातून काहीतरी करण्याचे, बाहेर पडण्याचे मार्ग शोधणे हे ज्यांना जमते ते खऱ्या अर्थाने आयुष्य जगतात. 


प्रत्येकाला एकांत हवा असतो. कधी स्वतःसाठी, तर कधी आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालविण्यासाठी. माणूस एकांतात असला बऱ्याच गोष्टींचा गुंता त्याला शांत चित्ताने सोडवता येतो. निवांत काही क्षण स्वतःबरोबर घालवता येतात. एकांत ही एक अनुभूती आहे जी गरजेची आहे. कधी कधी आजूबाजूला खूप गर्दी असणे, सतत कशात तरी व्यस्त असणे , या दैनंदिन जीवनातील धावपळीपासून थोडासा निवांतपणा मिळावा म्हणून एकांत गरजेचा असतो.


काही क्षण एकांतात घालवायचा बरे वाटतात , पण तरीही त्या एकांताच्या क्षणात एकटेपणा जाणवायला लागक की ते एकांताचे क्षण ही नकोसे वाटतात.


घ्यावा एकांताचा थोडा निवारा,

दूर कराया एकटेपणा जरा,

ना गल्लत करावी दोहोंची,

दोहोंची साथ असावी क्षणीची,

मनाने घ्यावी नवी उभारी,

जसे मातीमध्ये बीज अंकुरी♥️


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️

सहजच...........२

 सहजच..........


पूर्वी आकाशात अशी धुराची रेष दिसली की रॉकेट आलं, रॉकेट आलं म्हणून त्या धुराच्या रेषेमध्ये आम्ही पळत सुटायचो.  त्यावेळेला कल्पनाही नव्हती ते विमान असतं ,  ते धूर सोडत जाते म्हणजे रॉकेट इतकंच डोक्यात असायचे. ती रेषा एकाला ती दिसली  रे दिसली की तो किंवा ती  अरे ते बघ रॉकेट चाललंय असं करून ओरडत सुटायचे.  आणि मग अजून चार जण त्यांच्या मागे. मग अशी  आमची अख्खी फलटण ते बघायला जमायची. ती बघत जिथं पर्यंत जाता येईल तिथपर्यंत त्या रॉकेटच्या रेषेमागे जायचं.  मग घरचे ओरडतील म्हणून जास्त पुढे जजायचं नाही. पण  आकाशात  मागे सोडलेली ती धुराची रेषा पुसट होईपर्यंत बघत राहायचं. 


कधी कधी वाटायचं   १५ ऑगस्ट,  २६ जानेवारीला  टिव्हीवर दाखवतात,  तसा रंगीत धूर दिसेल त्या रॉकेट मागे.  पण तो कधी तसा दिसलाच नाही त्यामुळे थोडीशी निराशा व्हायची पण तरीही त्या रेषेची मज्जा कमी झाली नाही.


आता हे रॉकेट नाही हे विमानच आहे हे कळण्याइतके मोठे आम्ही सगळेच झालो.  तरीही  त्या रॉकेटच्या धुराकडे अनिमिष नजरेनं बघण्याचा बालिशपणा प्रत्येकाच्या मनात तसाच आहे अजूनही.   


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️




सहजच.........१

 परदेशी गेलेल्या पाल्यांच्या पालकांचं मनोगत♥️


वेळ कशी भुरकन उडून जाते. तसंच आपल्या घरट्यातली चिमणी पाखरं ही मोठी झाली की घरटी सोडून उडून जातात. काही शिक्षणसाठी, काही करियरसाठी.  अशावेळी त्या पालकांच्या मनात जे काही त्याचा सुरू असेल, त्याचा प्रत्यय मीही घेतला आहे हल्लीच.  तोच अनुभव  शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न.


आपलं मूल बाहेर जाणार, मग ते वेगळ्या शहरात असो  किंवा वेगळ्या देशात असो.  सगळ्यात आधी त्याचं आनंदातलं दुःख असतं ते आईला, एकीकडे मुलाची प्रगती असते आणि दुसरीकडे ते आपल्यापासून दूर होणार याची भीती असते.  थोड्याफार फरकाने वडिलांची ही तीच स्थिती असते. पण दिवसभर आपली मुलंच आपलं  जग असणाऱ्या आईसाठी ते जास्त त्रासदायक असतं.


मूल बाहेर जाणार म्हटलं की त्या तयारीसाठी सात-आठ महिने जातात. म्हणजे अगदी अप्लिकेशन देण्यापासून सुरवात होते.   मग हळूहळू  एक एका गोष्टींची सुरुवात होते.  आधी पेपर जमा करणे.  त्या पेपरवर्क मध्येच आपला बहुतांश  वेळ जातो. ते एकदा मार्गी लागले की मग व्हिसा आणि तिकिटांची गडबड सुरू होते. व्हिसा इंटरव्ह्यू कसा होईल ? मिळेल ना व्हिसा? या टेन्शन मध्ये काही दिवस जातात. मग त्याप्रमाणे तिकिट कधीचं काढायचं, कुठल्या कंपनी चे काढायचे, कधीच स्वस्त आहे ते पाहून ते काढून ठेवायचे. आणि एकदा का व्हिसा हातात आला की अर्धा जीव भांड्यात पडतो.


हे सगळं दिव्य सुरू असतानाच , दुसरीकडे एक वेगळीच गडबड सुरू असते. आपल्या कधीही काही काम न करणाऱ्या बाळाला सगळ्या कामांची ओळख करून द्यायची. त्यांना निदान स्वतःचे पोट भरता येईल इतका स्वयंपाक शिकवायचा. त्यांना तिथे लागणार सामान कुठं कुठं काय काय मिळते याची चौकशी करायची.  खरंतर हल्ली कुठे काय मिळत नाही असं नाही, सगळीकडे सगळंच मिळतं. पण तरीही घरचं ते घरचं असं म्हणत आपण बऱ्याच गोष्टी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. त्यातून तिथे मिळणाऱ्या गोष्टी महाग पडतील म्हणून शक्य तेवढं इथून द्यायचे. आताच्या काळात रेडी टू कूक मूळे खूप सोप्प ही झालंय सगळे.


या मधल्या काळात देश सोडून जाणार म्हणून सगळ्यांना भेटून घ्यायची गडबड. कुणी राहून जाऊ नये म्हणून सगळ्यांना भेटायचे वेळापत्रक आखणे म्हणजे अजून एक दिव्य. पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या, काळजी करणाऱ्या, आपल्या पाठीशी आशीर्वाद असणाऱ्या सगळ्यांना भेटणं हे ही तितकेच गरजेचे असते. या काळात प्रत्येक जण आपल्या ओळखीतल्या कुणाची ओळख सांगत असतात. प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करायचा प्रयत्न करतात. तेव्हा लक्षात येते की , जिव्हाळ्याची माणसे कशी असतात. कधीतरी आपल्यावर ही वेळ येईल न येईल याचा विचार न करता , आणि उपकाराची कुठलीही भावना मनात न ठेवता मदत करतात. ती मुलं तिथे गेल्यानंतर ही पालकांना मुलांची खुशाली विचारली जाते. त्यांना धीर ही दिला जातो. ही सगळी भावना खूप सुखकर असते.


"तू जास्त रडारड करू नको" असे सांगणारी मुलेही निघायच्या वेळी जास्त भावुक होतात. आणि मग ते मुलं दिसेनाशी होईपर्यंत ती मागे फिरून बघतात आणि बाहेरची माणसे त्यांना टाटा करत राहतात.


मुल एकदा बाहेरगावी निघून गेलं, त्यादिवशी ते तिथे पोहोचेपर्यंत आपल्या मनात धाकधूक असते. इतका मोठा प्रवास नीट करतील ना? बॅग्स नीट घेतील ना? तिथे नीट उत्तरे देतील ना? नंतर तिथे त्याचा कसं होईल काय होईल याची भीती. एकट्याने सगळं कसं मॅनेज करेल याचे भीती.  या सगळ्या भीती आपण आपल्या मनात साठवलेल्या असतात, पण तरीही आपण त्यांना या दाखवून देत नाही आणि त्यांना धीर देतो हे उत्तमच नाही का?


माझ्या मैत्रिणीने मध्ये व्हिडिओ केला होता की माझी मुलगी अजिबात होमसिक फील करत नाही. तिने करावं म्हणजे मी तिला काहीतरी सल्ला  देईन.  मला तो व्हिडिओ बघून फार हसायला आलो होते कारण थोड्या दिवसाने माझाही कदाचित तेच होणार होतं. पण नशिबाने माझी मुलगी ही होमसीक फील करत नाहीये.  याचा अर्थ तिला घरची आठवण येत नाही किंवा ती बिनधास्त आहे, असं नाही.  त्यांनी तेवढ्या स्ट्रॉंगली त्या गोष्टी घेतल्या.  आणि खरंतर ही खूप चांगली गोष्ट आहे. अर्थात जी मुलं होमसिक फील करतात ते चांगलं नाही असा नाही होत नाही. काही काळानंतर ती ही यातून व्यवस्थित बाहेर पडून तिथे छान रमतात.


त्या पहिल्या एक-दोन दिवसात आपल्याला घर इतकं रिकामी वाटतं.  आपल्या घरातुन एक व्यक्ती निघून गेलेली असते. लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी गेल्यावर आईवडिलांना वाटतं, तीच भावना परदेशी गेलेल्या आई-वडिलांची असते.  कारण इतके महिने, इतके दिवस, केलेली धावपळ, केलेली इतकी कामे, बारीकसारीक गोष्टी .....हे  अचानक कुठेतरी थांबून गेलेले असते. त्यामुळेच एक रिते पण आलेलं असतं.   म्हणूनच  आपल्याला खूप एकटं एकटं वाटत. घर खायला उठतं


आपल्याला वाटत असतं आपलं मूल तिथे जाऊन एकटं पडेल.  त्याच्या आजूबाजूला कोणी नसेल आपलं असं. पण खरंतर मनाने आपण एकटे पडलेलो असातो.  पण मुलांच्या आनंदात आनंद म्हणून  तो एकटेपणा ही आपण आनंदाने स्वीकारतो.  आणि तो प्रत्येकाने स्वीकारायलाच हवा. कारण आपल्या भावनांची बेडी मुलांच्या पायात अडकवणं म्हणजे त्यांच्या प्रगतीत अडथळा आणण्यासारखा आहे. आणि खरंतर इतकी वर्षे आपण मुलांची जबाबदारी यशस्वी पणे पार पाडलेली असते तर थोडा वेळ आपलेही आयुष्य जगायला मिळतो. तो वेळ ही आपण आपल्या आवडी जोपासत , काहीतरी नवीन करत छान घालवू शकतोच.


सौ. मिलन राणे - सप्रे 🖋️

Thursday, 5 October 2023

मनातला प्रेमाचा कोपरा

 1. ग्रीष्माचा उन्हासारखा देह माझा

दाह दाह करणारा

पावसाच्या थेंबासारखा स्पर्श तुझा

त्याला शांत करणारा.........♥️


©सौ. मिलन राणे - सप्रे🖋️




2. मन असे सैरभैर होई 

दिवास्वप्न पाहताना

का भास तुझे होती

मनीं विचार करताना

का तव छबी दिसावी

मज आरशात न्याहाळताना........♥️


©सौ. मिलन राणे - सप्रे🖋️



3. तुला भेटल्यावर 

सगळी गणितं चुकतात

क्षणासारखे दिवस

अगदी भुर्रकन उडतात

विचारांची चाके

गाडीच्या पुढे पळतात

मनाची पाखरं

आभाळावर उडतात

स्पर्शाने तुझ्या 

फुलांचे ताटवे फुलतात

तुला भेटल्यावर

ऋतू ही बदलतात

ग्रीष्माच्या उन्हात

श्रावणधारा बरसतात

काहीतरी जादूच

असावी  बहुधा  तुझ्यात

अशक्य गोष्टी ही

शक्य वाटू लागतात......♥️


©सौ. मिलन राणे - सप्रे🖋️


4. जादू ऐशी तुझ्या नजरेची

करी चलबिचल मनाची

रोख तुझ्या त्या कटाक्षाचा

ठोका चुकवी मम हृदयीचा

काय सांगावी दोहोंची कमाल

वार करत जाती उरी आर पार.........♥️


©सौ. मिलन राणे - सप्रे🖋️



5.तुझं रागावणं

तुझे चिडणें

तुझें प्रेमानं जवळ घेणे,

सगळंच या श्रावण सरीं सारखे,

एकाचा अनुभव घेता घेता,

दुसरं दत्त म्हणून हजर,

रागावण्यातले प्रेम 

आणि प्रेमातले रागावणं

ऊनपावसाच्या  खेळासारखे,

तरीही हवेहवेसे वाटणारे,

याच पाठशिवणीच्या 

खेळानंतर अनुभवता येतं

ते सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य,

वेगवेगळ्या रंगात रंगलेले

तुझं प्रेम, कधी गडद, कधी पुसट,

कधी प्रखर , तर कधी सौम्य,

तरीही खूप लोभसवाणे,

भान हरखून टाकणारं,

आणि दरवेळी नव्याने,

अनुभवास येणारे.......,,♥️


©सौ. मिलन राणे - सप्रे🖋️







Friday, 29 September 2023

घरगुती उद्योजकांची खंत

 खरंतर आता मी जे लिहिणार आहे त्याने माझ्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.  हे लिहिणं लोकांना  जहाल वाटू शकतं . पण आज मला हे लिहावसं वाटते माझ्या व्यवसायासाठी किंवा माझ्यासारख्या छोट्या प्रमाणात  घरगुती व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी. मला आलेला अनुभव आहे हा . कदाचित हा अनुभव बाकी ही बऱ्याच जणांना आलेला असेल. 


एक तर माझा व्यवसाय घरगुती असल्यामुळे लोकांना त्याचं महत्त्व वाटत नाही.  म्हणजे घरगुती छोटासा काहीतरी व्यवसाय आहे इतकंच, वेळ जाण्यासाठी काहीतरी हवे म्हणून.  दुसरी गोष्ट म्हणजे मी जे बनवते  तो खाण्याचा पदार्थ असल्यामुळे,  मला बऱ्याच वेळा लोक म्हणतात अगं इतके लाडू बनवतेस ना, मग द्यायचे एक-दोन टेस्ट ला.  आपल्या ओळखीची हजार माणसं असतात, जर असे एक दोन लाडूचा टेस्टला द्यायला लागले कसा चालणार माझा उद्योग. साधी गोष्ट आहे जर तुमच्या ओळखीच्यातल्या कोणाचं एखाद्या मशीनचं दुकान आहे किंवा कपड्याचे दुकान आहे  त्यांना सांगता का मला एक मशीन किंवा एखादा ड्रेस देता का वापरून बघायला.  किंवा साधीच गोष्ट जर आपल्या ओळखीत कोणाचं सोन्याचे दुकान असेल तर आपण असं सांगू का की एखाद ग्राम द्या मला सोनें, बघू तरी तुमचे सोनं शुद्ध आहे की नाही.


मग हे घरगुती व्यवसाय करणाऱ्यांच्या बाबतीतच का?  तुम्ही घरची माणसं असा किंवा जवळची माणसं असा थोडासा डिस्काउंट घेऊन तुम्ही एखादी गोष्ट विकत नाही घेऊ शकत का?  का प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी अशाच हव्या असतात?  कुठलीही गोष्ट बनवताना त्याला लागणार मटेरियल,  त्याच्यावरची मेहनत हे सगळं असेच येतं  का? आणि एखाद्याने मेहनतीने केलेली गोष्ट आपण अशी फुकट का मागावी यामागचं लॉजिक अजून मला कळलेलं नाहीये.


कधी कधी एखादा  व्यवसाय करणारी व्यक्ती ही सर्रास म्हणते लाडू चवीला  दे. तुम्ही एखादी गोष्ट विकता तेव्हा तुम्ही ती समोरच्याला फुकट देता का नाही ना?  तो दुसऱ्याच्या व्यवसायाच्या बाबत लागू होत नाही का?  हा एखादी वस्तू थोडा डिस्काउंट  दे हा मला हे सांगणं योग्य आहे पण असेच मागणे किती योग्य आहे याचा विचार प्रत्येकाने करा बोलायच्या आधी.


हा अनुभव मला आला आहे छोटे घरगुती व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकालाच येत असे पण काय होतं की जाऊदे घरचीच माणसे जवळचीच माणसे आहेत किंवा मी जर असं बोलले तर माझ्या व्यवसायावर याचा वाईट परिणाम होईल म्हणून आपण हे बोलायचं लिहायचं टाळत तिला तिथल्या तिथे उत्तर द्यायचं टाळतो किंवा त्या व्यक्तीला तिथे उत्तर द्यायचं टाळतो


मला इतकंच म्हणायचं व्यवसाय असो की छोटा तो व्यवसाय करायला त्या व्यक्तीची मेहनत लागते त्या व्यवसायावर त्या व्यक्तीचं पोट भरत असतं, त्याचा उदरनिर्वाह चालू असतो.  अशी गोष्ट आपण फुकट मागणं कितपत योग्य आहे याचा दहा वेळा विचार करा.  एखाद्या व्यक्तीने समोरून जर तुम्हाला काही भेट म्हणून दिलं तर ती गोष्ट वेगळी, पण जर तुम्ही त्या व्यक्तीकडून काही घेत नसाल,  त्यांच्या  व्यवसायाला कुठल्याही प्रकारची मदत करत नसाल तर त्या व्यक्तीकडून काही आपल्याला असंच मिळेल याचीही अपेक्षा धरू नका.


आणि घरगुती व्यवसाय करणारा माणूस ही तितकाच बिझी असतो किंवा मेहनत करतो, ऑफिसमध्ये आठ तास  काम करणारी व्यक्ती करते.  त्याचा प्रॉफिट  शेकडोत असो किंवा लाखात असो तो पूर्णपणे त्या व्यक्तीच्य मेहनतीचं फळ असतं.


तसंच तो व्यवसाय घरगुती आहे म्हणून त्याची अगदी खोलात चौकशी करण्याची गरज नसते.  प्रत्येक व्यवसायाचे सिक्रेट्स असतात.  व्यवसाय म्हंटला की प्रत्येक गोष्ट उघडपणे आपण कोणालाही सांगू शकत नाही.  हे लहान मोठा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला माहीत असतं.  त्यामुळे उगाचच काहीतरी कारण काढून कोणाच्याही व्यवसायाची अगदी खोलात चौकशी करण्याची काही गरज नसते. 


जर तुम्हाला खरंच त्याचं त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर त्या माणसाला तुम्ही खास भेटायला जा.  त्यांच्याशी बसून बोला. त्यांच्या व्यवसायाबद्दलची त माहिती करून घ्या. बोलायला काही विषय नाहीये म्हणून व्यवसायाची चौकशी करणे आणि मग मागून त्याला नाव ठेवणं  ही जी प्रवृत्ती आहे ना ती बंद झाली पाहिजे.


जर आपल्याला कोणाचं कौतुक करता येत नसेल निंदाही करू नये.  त्या व्यक्तीने त्याचा व्यवसाय उभा करायला , मग तो छोटा असू दे की मोठा असू दे किती काबाडकष्ट केलेत हे त्या व्यक्तीलाच माहीत असू शकते.


त्यामुळेच जमलेच तर घरगुती व्यवसाय करणाऱ्या लोकांकडून खरेदी करा. त्यांचा आदर करा. त्यांना कमी लेखू नका.


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️

Tuesday, 6 June 2023

चप्पल

 



चप्पल खरं तर हा विषय लिहिण्यासारखा नाही किंवा हा काय विषय आहे का लिखाणाचा?  असे लगेचच  मनात येतं.  पण मोच्याकडून शिवून आणलेल्या ठेवायला म्हणून चपलेचा खण उघडला आणि समोर एकदम दहा एक जोड. त्यातील एक घरी घालायला, एक लग्नाला किंवा एखाद्या समारंभाला जाताना,  चालायला एक, धावायला एक.  परत जरा जसा वेष त्याला तश्याच चपला असे म्हणत म्हणत  एकाचेच किमान चार पाच तरी चप्पल जोड घरात असतात.  एखादी चप्पल तुटली की ती  शिवून आणणे ही ही पद्धत आता फार जुनी झाली आहे. तुटली की ती टाकून द्यायची आणि नवीन घ्यायची. त्या इतक्या सगळ्या चपला  बघून आणि हा सगळा विचार करत मन भूतकाळात गेले.


आमच्या लहानपणी म्हणा किंवा अगदी कॉलेजमध्ये असतानाही,  आमच्याकडे जेमतेम दोन जोड असायचे चपलांचे. एक नेहमीच्या  वापराचे  आणि एक पावसाळ्यासाठी. पूर्वी सगळयाच शाळांतून बूटच घालायला हवे अशी सक्ती नव्हती. त्या काळात कितीतरी जण अनवणीही शाळेत येत असत. आणि जरी असलीच बूट घालायची सक्ती, तरी खूप जर कमी जण असे होते की ज्यांच्याकडे नवीन बूट असायचे.  घरातल्या मोठ्या मुलाला किंवा मुलीला ते बूट घेतले जायचे आणि मग त्यापेक्षा धाकटी बहीण,  भाऊ यांना ते वापरायला दिले जायचे . त्यांनाही पायात बसेनासे झाले की नंतर कुणाला तरी दिले जायचे. एक तर कुठल्या तरी नातेवाईकांच्या मुलांना किंवा मग घरी काम करणाऱ्या बाईंच्या मुलांना.



मला आठवतंय आम्ही लहान असताना जवळपास सगळ्यांकडेच  असायची, टॉयलेट बाथरूमला जाण्यासाठी म्हणून ठेवलेली  किंवा सगळ्यांची मिळून कधी  पायात चढवता येईल आणि पटकन बाहेर घालून बाहेर पडता येईल अशी पांढऱ्या रंगाची निळ्या पट्ट्यांची स्लीपर.  ती स्लीपर थोडीशी महागातली घेतली की  हिरव्या पट्ट्याची आणि थोडीशी हिरवी झाक असलेली  ती स्लीपर असायची. साधारण सगळ्यांकडे सारख्या आणि वेगवेगळ्या मापाच्या त्या स्लीपर घातल्या जायच्या. मला आठवतंय आम्ही चेंबूर ला असताना जवळजवळ सगळेच तीच घालून खेळायला यायचो आणि मग बॉनीच्या दारात त्या काढून ठेवायचो. आणि निघताना माझी कुठली, तुझी कुठली यावरून भांडणे व्हायची. पण पायात घातली की प्रत्येकाला कळायचे आपली स्लीपर कुठली, कारण प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, त्यामुळे ती एका विशिष्ट बाजूने झिजली जायची , पायात चढवली की आपोआपच समजून यायचे. आणि त्यातूनही घोळ झालाच, तर घरी गेल्यावर घरच्यांना बरोबर ओळखू यायची ती आणि मग कुणाकडे गेली असेल म्हणून शोधाशोध. पण ती ही वेगळी गंमतच होती.

पावसाळ्यात या स्लीपरच्या पट्ट्याच्या मागची बाजू उघडून त्यात एक जाड रब्बर टाकला की झाली पावसाळ्यासाठी ती तयार. तो रब्बर मागच्या बाजूने पायावर चढवला की झाली स्लीपर ची सॅंडल आणि चिखल उडायची ही भीती नाही. अशी टू इन वन , स्वस्त आणि मस्त अशी आपल्या सगळ्यांची लाडकी स्लीपर.



जशी ही स्लीपर सगळ्यांकडे असायची.  तशीच पावसाळी चप्पल खास मुलींसाठी किंवा बायकांसाठी होती ती म्हणजे बाटाची पट्ट्या पट्ट्यांची सॅंडल. लाल किंवा काळा या दोनच रंगात ती यायची. पण बहुतांश वेळा लाल रंगाची सॅंडल सगळ्या जणी घ्यायच्या. त्यामुळे पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या चार मुली असतील तर, त्यापैकी तिघींच्या  पायात तरी नक्कीच या लाल रंगाच्या सॅंडल असायच्या. 


पावसाळ्यात अजून एक गंमत असायची ते म्हणजे गंबुट.

हेही लाल किंवा काळ्या रंगाचे असायचे. आणि मग मुलं मुद्दामून त्या गंबुटात पाणी साठवून पचाक पचाक असा आवाज करत चालायची. घराजवळ आले की ते गम्बुट काढून उलटे करून त्यातलं पाणी काढून टाकलं जायचं म्हणजे घरी ओरडा मिळणार नाही. त्या गंबुटातले पाणी एकमेकांवर उडवणे हे असले प्रकार ही काही मुले करायची.


त्यावेळी शक्यतो नवीन चपला या दिवाळीला घेतल्या जायच्या. मग कोणाची चप्पल कशी आहे याच्या याचाही एक वेगळा कार्यक्रम असायचा.  ज्या मुलीला जरा उंच टाचांचे वेगळे असे बूट जर मिळाले असतील,  तर तिचा रुबाब जरा जास्त असायचा. त्यावेळी फार कमी लोक उंच टाचांच्या आपला घालायचे.  त्या उंच टाचांच्या चपलांचं इतकं अप्रूप होते आम्हाला. की ती चप्पल घालून जाणाऱ्या मुली बद्दलही डिस्कशन व्हायचं. कसं जमत असेल हिला एवढे हिल्स चे चप्पल घालून चालायला? पडायला होत नसेल का? उंच टाचांच्या चप्पल घालणाऱ्या किंवा बायका या जरा श्रीमंत अशीच काहीशी धारणा होती. एखाद्या मैत्रिणीचे तसे असतीलच चप्पल आणि ती मैत्रीण तितकी चांगली असेल.  तर तिचे ते उंच टाचांचे चप्पल घालून चालायचा प्रयत्न करायचा.  चालणं कसलं धडधडणे असायचे ते.  पाय सारखा वाकडाच व्हायचा. आणि मग जाऊ दे, पायच मुरगळेल म्हणून तो नाद सोडून दिला जायचा.



अजून एक चप्पल जिचं सगळ्यांनाच आकर्षण असायचं आणि आजही आहे,  पण तेव्हा मात्र ती शक्यतो मोठ्यांनाच मिळायची.  ती म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती कोल्हापुरी चप्पल. हल्ली कोल्हापुरी चपला सगळेच घालतात एक फॅशन म्हणून, पण त्या काळी फार कमी लोक ती चप्पल घालायचे.   मला आठवतंय माने काका ती कोल्हापुरी चप्पल घालायचे,  तसे माझे आजोबाही कधीतरी  कोल्हापुरी चप्पल घालायचे पण  शक्यतो बुटातच असायचे ते. कोणी कोल्हापूरला जाणार असले की त्यांना कोल्हापुरी चप्पल आणा हा नक्की,  करर्कर वाजणाऱ्या असे अगदी आवर्जून सांगितलं जायचं. त्या चपलांचा रुबाब काही औरच.


आता सारख्या निरनिराळ्या प्रकारच्या चपलांचे फॅड ही त्याकाळी नव्हते . आणि त्यावेळी चपलांचे इतके सगळे ब्रँडही सर्वसामान्य माणसांना माहीत नव्हते. बूट म्हटले की चामड्याचे बूट, आणि शाळेच्या  मुलांसाठी कॅनव्हास चे बूट. पावसाळी किंवा इतर चपला म्हटलं की फक्त बाटा. त्यानंतर पॅरागॉन हे नाव क्वचित कुठेतरी यायचं. आणि त्यावेळी  एखाद्या ओळखीच्या लहानश्या चपलांच्या दुकानातूनच त्या घेतल्या जायच्या.


कुठल्यातरी एका हिंदी सिनेमात एक संवाद आहे की चपलांवरून त्या माणसाची लायकी कळते.  हे वाक्य ऐकलं पु ल देशपांडे यांचे चितळे मास्तर आठवतात. त्यांच्या चपला किती झिजल्या असतील, हे त्या नुसत्या वर्णनावरून आपल्या डोळ्यासमोर येतं. खऱ्या आयुष्यातही काहींच्या बाबतीत हे असेच  सत्य सस्ते. म्हणजे हा संवाद प्रत्येकालाच लागू होतो असं नाही कारण त्या चपलांच्या मागे एक वेगळी कहाणीही असू शकते. आणि ती कहाणी जास्त महत्त्वाची असते,  त्या चपलांच्या ब्रँड आणि किमतीपेक्षा.


 आत्ता आपल्याकडे पैसा आहे, म्हणून कदाचित आपल्याला त्या साध्या चप्पल ची किंमत नसते. तुटली कि  टाकून दिली.  पण पूर्वी अगदी  मोच्याने सांगेपर्यंत, की आत्ता ही शिवता येणार नाही, इतकी ती चप्पल वापरलेली असायची.  ती त्या काळच्या लोकांची काटकसर असायची,  आणि त्या साध्या वस्तू वरले प्रेम ही.  ती काटकसर, तो ओलावा बहुधा आत्ता थोडासा कमी झाला आहे. सगळ्याच गोष्टींपासून आपण डिट्याच होऊ लागलो आहोत. कदाचित म्हणूनच आपल्या घरात माणसांपेक्षा चपलांची संख्या वाढली आहे.....एक विचार करण्यासारखी गोष्ट.


सौ. मिलन राणे - सप्रे🖋️