Saturday, 10 June 2017

पावसाळा


उन्हाच्या गरम काहिली नंतर सगळ्यांच्याच मनाला गारवा देणारा ऋतू . पावसाळा हा सगळ्यात रोमँटिक ऋतू आहे असे म्हटले पाहिजे. नुसते वातावरण जरी पावसासारखे झाले तरी मन प्रसन्न होते. कडक ऊन्हानंतर अंगावर पडणारा पहिला पावसाचा थेंब एक सुखद अनुभव देऊन जातो. पहिल्या पावसानंतर येणार तो मातीचा मंद सुगंध , त्या सुगंधाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, जणू मातीचे आणि अवकाशाच्या मिलनाचे निम्मित आहे हा पाऊस. आणि त्या स्पर्शाने हि धरतीची मोहरून गेली आहे एखाद्या प्रेयसी सारखी. पहिल्या पावसानंतर वर्षभर त्या सुगंधाची वाट पाहावी लागते अगदी प्रेयसीला प्रियकराची पाहावी लागते तशीच . 

पावसाची रूपं हि भरपूर कधी कधी आईच्या माये सारखा हळुवार, कधी बाबांच्या रागासारखा  मुसळधार, कधी प्रेयसी सारखा प्रेमळ आणि रोमँटिक, तर कधी कधी रागावलेला , सगळे उध्वस्त करणारा एखाद्या आतंकवाद्यासारखा. पण कधीतरीच तो आपण उग्र रूप दाखवतो , नेहमी असतो तो हळुवार, धुंद आणि हवाहवासा वाटणारा.  

पावसाची सुरवात म्हणजे  मुलांसाठी सगळेच नवीन ... नवीन वर्ग, पुस्तक, नवीन ड्रेस. आणि गम्मत म्हणजे पाऊस खूप पडला म्हंणून शाळेला मिळणारी सुट्टी. रेनकोट घालून, पाठीवर दप्तर घेऊन त्या पावसाच्या पाण्यात उड्या  मारत जाणारी,  साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणारी  छोटी छोटी मुले पहिली कि आपल्याला हि लहान व्हावेसे वाटते.    तसे आपल्या सगळ्यांचं हा पाऊस आवडतो. कारण कधीतरी मोठ्यांनाही याच्या मुले ऑफिस ला दांडी मारता येते. "अरे नाही रे आमच्या कडे खूप पडतोय पाऊस, गुढघाभर पाणी झालीय सोसायटी समोर आज नाही येणार ऑफिस ला !!!" असे म्हणून ऑफिस ला बुट्टी मारायची. आणि घरी बसून मस्त पैकी गरमागरम भजी आणि  वाफाळत्या चहा चा आस्वाद घ्यायचा. 

"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे " खरेच पावसामुळे सगळी कडे कसे हिरवेगार होऊन जाते. याच ऋतूत असते ती भाज्यांची रेलचेल,  वेगवेळ्या प्रकारच्या फक्त या ऋतूत मिळणाऱ्या काही खास भाज्या. याच ऋतूत येतात आपली सण , नागपंचमी, गौरीगणपती , गोपाळकाला आणि असे बरेच. सगळ्यांना एकत्र आणणारे आणि आपला उत्साह वाढवणारे हे सण.  

या पावसात " वर्षा सहलींचा" सपाटा असतो. आणि मग गुगल वर "places to visit in rainy season " हे सर्च केले जाते. ठिकाणे ठरवली जातात आणि मग झुंडीच्या झुंडी लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर अशा ठिकाणी निघतात.  पण खरेच या पावसाळी पिकनिक ची मजा काही औरच. मुसळधार पावसातून मित्र मैत्रिणीनं सोबत गाडीतून लांब फिरायला जाणे म्हणजे स्वर्ग सुखचं. प्रेमीयुगुलांसाठी तर हा खूपच खास ऋतू. एका छत्रीत एकमेकाना सांभाळत , लाजत, एकत्र भिजण्याची  मजा काही औरच.  पाऊस पडत असताना मुद्दाम छत्री न घेता पावसात भिजायचे आणि मग रस्त्यावर उभे राहून गरमागरम भाजलेले मक्याची कणसे खायची हि गम्मत तर प्रत्येक जण अनुभवतोच मग ते शाळेत जाणारे मुल असो कि ऑफिस मध्ये बॉस असलेला ५०शी चा माणूस असो. 

कधी कधी मात्र कंटाळा येतो या पावसाचा. रस्तात होणार चिखल, हातातल्या पिशव्या , छत्री , कपडे सगळे सांभाळताना होणारी कसरत फार कंटाळवाणी असते.  त्यात पावसामुळे जर ट्रेन बंद झाल्या तर अजूनच राग येतो. खरे तर राग माणसांवर असतो पण आपण दोष मात्र त्या पावसाळा देतो. कधी तरी अवेळी केलेल्या आगमनामुळे होणारी धावपळ. आणि मग ओलेत्या अंगाने ऑफिस मध्ये करावे लागलेले काम.  पण तरीही आपण सर्वच या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो अगदी चातक पक्षासारखी. 

पावसामुळे जशी झाडे, रस्ते आणि सगळ्याच गोष्टींवर साचलेली धूळ पाण्याबरोबर वाहून जाते आणि सगळे स्वच्छ होते तसेच आपण हि वर्षातून एकदा तरी आपल्या मनावरची धूळ , क्लेश, मरगळ, द्वेष, सगळे धुवून स्वच्छ मनाने सगळ्याची नव्याने सुरवात केली पाहिजे. आणि पावसात जशी सगळीकडे प्रसन्न करणारी हिरवळ असते तसे आपले मनही प्रसन्न केले पाहिजे. 

देवा कडे इतकीच प्रार्थना आहे कि दरवर्षी इतका मुबलक पाऊस पाड कि आमच्या कुठल्याही शेतकरी राजाला आत्महत्या करायची वेळ नको येऊ दे. आणि इतका हि नको जास्त पाडूस कि त्यात सगळ्यांची घरंदारं वाहून जातील. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करून पर्यावरण जपायचे. 

हे सगळे वाचताना आपल्या सगळ्यांना एक गाणे नक्कीच आठवायला हवे..... 


येरे येरे पावसा , तुला देतो पैसा 
पैसा झाला खोटा , पाऊस आला मोठा  ....... 






3 comments:

  1. Nice .... it's very true we love monsoon thought we hate it ����

    ReplyDelete
  2. मस्त नवा पाऊस जुन्या आठवणी घेउन येतो

    ReplyDelete
  3. khup chan mast......lihile ahe pavsache veg veg rup mast explain kele ahet.....

    ReplyDelete