जरा कुठे मुलं शाळेत जाऊ लागलं की जो तो विचारतो "मोठा होऊन तू कोण होणार बाळा?" मग ते बाळ ही आई बाबांनी शिकवल्या सारखे बोलते की "मी अमुक होणार !!मी तमुक होणार!!". बिचाऱ्या त्या जीवाला माहीत ही नसते की त्या पेशा ची जबाबदारी काय आहे त्याला फक्त माहीत असते की आपण आपल्या पालकांसारखे मोठे होणार. आपल्याला कुणीतरी मोठे व्हायचे आहे या आनंदात तो छोटासा जीव असतो पण पुढे जाऊन त्याला कशा कशाला सामोरे जायचे आहे याची मात्र त्याला बिलकुल कल्पना नसते. आपण सगळेच या प्रश्नांना सामोरे गेलो आहोत.
प्रत्येकाचे कोणीतरी रोल मॉडेल असते. क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टींमधील लोकं जास्त असतात कारण आपल्या देशात या दोन गोष्टीना इतर कशापेक्षा हि जास्त महत्व दिले जाते. त्यामुळे साधारण कुणाला हि विचारले कि तुला काय काय व्हायचे आहे तर मुलांमध्ये जास्त मला "सचिन" किंवा "विराट" किंवा एखाद्या क्रिकेटर चे नाव घेतो. आपण कोण होणार हे तर ठरवतो पण कारण त्या वेळेला आपल्याला त्या व्यक्तीची प्रसिद्धी , तिचे सगळ्याच माध्यमात पॉप्युलर असणे, पैसे दिसत असतात पण त्यामागे लागणारी मेहनत, हवा असणारा आत्मविश्वास हे सगळे आपल्याकडे आहे का? हा विचार करण्याचे वय नसते ते. आणि त्यात काही पालक हि मुलांच्या या बाळबोध विचारांना खतपाणी घालतात.
आपल्या कडे पहिल्या पासूनच शिकवले जाते कि मोठे होऊन डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचे. आणि त्या साठी त्या मुलाच्या हात धुवून मागे लागले जाते. त्याला झेपत नसलेलं ओझे मुलावर टाकले जाते आणि मग काही जण फक्त मानसिक त्रास भोगतात. व्हायचे असते कुणीतरी वेगळे आणि होतात कुणीतरी वेगळे. स्वतःच्या इच्छा मारून पालकांच्या इच्छेखातर वेगळा मार्ग निवडावा लागतो.
सगळ्यांचाच कल पैसे आणि प्रसिद्धी असणाऱ्या पेशांमध्ये असतो. पण त्या साठी खंबीर मनाचीही आवश्यकता असते. त्या ठिकाणी असणाऱ्या रॅट रेस मध्ये आपला कितपत निभाव लागणार आहे हे नाही पहिले जात. आणि नंतर डिप्रेशन किंवा आत्महत्या हे पर्याय निवडले जातात. आपण किती वेळा ऐकतो वाचतो अशा बातम्या पण त्याच्यावर हळहळ व्यक्त करतो, त्या व्यक्तीला दोष देतो आणि सोडून देतो पण त्यावर विचार मात्र करत नाही. आपल्या पाल्याने काय व्हावे हे ठरवण्यापेक्षा त्याला नक्की काय व्हायचे आहे हे पहिले तर कदाचित त्याच्या आवडीच्या क्षेत्रात तो सर्वोत्कृष्ट असेल.
मी एकदा टीव्ही वर पहिले होते एक अभिनेत्री म्हणाली होती कि " जे कराल ते इतकं उत्कृष्ट करा कि दुसरे कोणी त्याला करताना दहा वेळा विचार करेल. म्हणजे कांदा चिरला तरी इतका सुंदर चिरा कि दुसरे कोणी तसा चिरणार नाही ". "मी अमुक होणार मी तमुक होणार "असे प्रत्येक जण म्हणतं आणि आपणही " वा छान!!!" हा असे म्हणून त्याला शाबासकी देतो. पण कुणी हा विचार का करत नाही कि मी " मी होणार". 'मी कुणासारखा तरी आहे या पेक्षा कुणीतरी माझ्यासारखं व्हायला हवे अशी मी माझी ओळख निर्माण करेन' या गोष्टीत जास्त आत्मविशास आहे ना. आपण प्रत्येकाने मुलांच्या मनात हि भावना रुजवली पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात जा पण तिथे स्वतःचा ठसा उमटावा. मी कुणाच्या तरी आखून दिलेल्या मार्गावर चालणार कि मी स्वतः स्वतःचा मार्ग आखणार हे आपण ठरवायचे असते.
" शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात" अशी विचारसरणी असते आपली. आता पर्यन्त आपण कधी ऐकले नसेल कि एखादे बाळा म्हणते कि मला " शिवाजी व्हायचे आहे". अगदी गड किल्ले सर करणारे नको पण निदान अन्यायाविरुद्ध लढणारे तरी शिवाजी बनवा कि मुलांना . एकुलत्या एक मुलाला सैनिक होऊ द्यायचे नाही असाही विचार करणारी लोक आहेत, तर शिवाजी होणे दूरच.
" मी कुणीतरी होणार " यापेक्षा " मी एक चांगली व्यक्ती होणार" असे जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकवू ना त्यावेळी खऱ्या अर्थाने " मी कोण होणार ?? " या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडेल.