Wednesday, 21 June 2017

मी कोण होणार??


जरा कुठे मुलं शाळेत जाऊ लागलं की जो तो विचारतो "मोठा होऊन तू कोण होणार बाळा?"  मग ते बाळ ही आई बाबांनी  शिकवल्या सारखे बोलते की "मी अमुक होणार !!मी तमुक होणार!!". बिचाऱ्या त्या जीवाला माहीत ही नसते की त्या पेशा ची जबाबदारी काय आहे त्याला फक्त माहीत असते की आपण आपल्या पालकांसारखे मोठे होणार.  आपल्याला कुणीतरी मोठे व्हायचे आहे या आनंदात तो छोटासा जीव असतो पण पुढे जाऊन त्याला कशा कशाला सामोरे जायचे आहे याची मात्र त्याला बिलकुल कल्पना नसते. आपण सगळेच या प्रश्नांना सामोरे गेलो आहोत. 

प्रत्येकाचे कोणीतरी रोल मॉडेल असते. क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टींमधील लोकं जास्त असतात कारण आपल्या देशात या दोन गोष्टीना इतर कशापेक्षा हि जास्त महत्व दिले जाते. त्यामुळे साधारण कुणाला हि विचारले कि तुला काय काय व्हायचे आहे तर मुलांमध्ये जास्त मला "सचिन" किंवा "विराट" किंवा एखाद्या क्रिकेटर चे नाव घेतो.  आपण कोण होणार हे तर ठरवतो पण कारण त्या वेळेला आपल्याला त्या व्यक्तीची प्रसिद्धी , तिचे सगळ्याच माध्यमात पॉप्युलर असणे, पैसे दिसत असतात पण त्यामागे लागणारी मेहनत, हवा असणारा आत्मविश्वास हे सगळे आपल्याकडे आहे का? हा विचार करण्याचे वय नसते ते. आणि त्यात काही पालक हि मुलांच्या या बाळबोध विचारांना खतपाणी घालतात. 

आपल्या कडे पहिल्या पासूनच शिकवले जाते कि मोठे होऊन डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचे. आणि त्या साठी त्या मुलाच्या हात धुवून मागे लागले जाते. त्याला झेपत नसलेलं ओझे मुलावर टाकले जाते आणि मग काही जण फक्त मानसिक त्रास भोगतात. व्हायचे असते कुणीतरी वेगळे आणि होतात कुणीतरी वेगळे. स्वतःच्या इच्छा मारून पालकांच्या इच्छेखातर वेगळा मार्ग निवडावा लागतो. 

सगळ्यांचाच कल  पैसे आणि प्रसिद्धी असणाऱ्या पेशांमध्ये असतो. पण त्या साठी खंबीर मनाचीही आवश्यकता असते. त्या ठिकाणी असणाऱ्या रॅट रेस मध्ये आपला कितपत निभाव लागणार आहे हे नाही पहिले जात. आणि नंतर डिप्रेशन किंवा आत्महत्या हे पर्याय निवडले जातात.  आपण किती वेळा ऐकतो वाचतो अशा बातम्या पण त्याच्यावर हळहळ व्यक्त करतो, त्या व्यक्तीला दोष देतो आणि सोडून देतो पण त्यावर विचार मात्र करत नाही.  आपल्या पाल्याने काय व्हावे हे ठरवण्यापेक्षा त्याला नक्की काय व्हायचे आहे हे पहिले तर कदाचित त्याच्या आवडीच्या क्षेत्रात तो सर्वोत्कृष्ट  असेल. 

मी एकदा टीव्ही वर पहिले होते एक अभिनेत्री म्हणाली होती कि " जे कराल ते इतकं उत्कृष्ट करा कि दुसरे कोणी त्याला करताना दहा वेळा विचार करेल. म्हणजे कांदा चिरला तरी इतका सुंदर  चिरा कि दुसरे कोणी  तसा चिरणार नाही ". "मी अमुक होणार मी तमुक होणार "असे प्रत्येक जण म्हणतं आणि आपणही " वा छान!!!" हा असे म्हणून त्याला शाबासकी देतो. पण कुणी हा विचार का करत नाही कि मी " मी होणार". 'मी कुणासारखा तरी आहे या पेक्षा कुणीतरी माझ्यासारखं व्हायला हवे अशी मी माझी ओळख निर्माण करेन' या गोष्टीत जास्त आत्मविशास आहे ना. आपण प्रत्येकाने मुलांच्या मनात हि भावना रुजवली पाहिजे.  कुठल्याही क्षेत्रात जा पण तिथे स्वतःचा ठसा उमटावा. मी कुणाच्या तरी आखून दिलेल्या मार्गावर चालणार कि मी स्वतः स्वतःचा मार्ग आखणार हे आपण ठरवायचे असते. 

" शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात" अशी विचारसरणी असते आपली. आता पर्यन्त आपण कधी ऐकले नसेल कि एखादे बाळा म्हणते कि मला " शिवाजी व्हायचे आहे". अगदी गड किल्ले सर करणारे नको पण निदान अन्यायाविरुद्ध लढणारे तरी शिवाजी बनवा कि मुलांना . एकुलत्या एक मुलाला सैनिक होऊ द्यायचे नाही असाही विचार करणारी लोक आहेत, तर शिवाजी होणे दूरच. 

" मी कुणीतरी होणार " यापेक्षा " मी एक चांगली व्यक्ती होणार" असे जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकवू ना त्यावेळी खऱ्या अर्थाने " मी कोण होणार ?? " या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडेल. 


Saturday, 10 June 2017

पावसाळा


उन्हाच्या गरम काहिली नंतर सगळ्यांच्याच मनाला गारवा देणारा ऋतू . पावसाळा हा सगळ्यात रोमँटिक ऋतू आहे असे म्हटले पाहिजे. नुसते वातावरण जरी पावसासारखे झाले तरी मन प्रसन्न होते. कडक ऊन्हानंतर अंगावर पडणारा पहिला पावसाचा थेंब एक सुखद अनुभव देऊन जातो. पहिल्या पावसानंतर येणार तो मातीचा मंद सुगंध , त्या सुगंधाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, जणू मातीचे आणि अवकाशाच्या मिलनाचे निम्मित आहे हा पाऊस. आणि त्या स्पर्शाने हि धरतीची मोहरून गेली आहे एखाद्या प्रेयसी सारखी. पहिल्या पावसानंतर वर्षभर त्या सुगंधाची वाट पाहावी लागते अगदी प्रेयसीला प्रियकराची पाहावी लागते तशीच . 

पावसाची रूपं हि भरपूर कधी कधी आईच्या माये सारखा हळुवार, कधी बाबांच्या रागासारखा  मुसळधार, कधी प्रेयसी सारखा प्रेमळ आणि रोमँटिक, तर कधी कधी रागावलेला , सगळे उध्वस्त करणारा एखाद्या आतंकवाद्यासारखा. पण कधीतरीच तो आपण उग्र रूप दाखवतो , नेहमी असतो तो हळुवार, धुंद आणि हवाहवासा वाटणारा.  

पावसाची सुरवात म्हणजे  मुलांसाठी सगळेच नवीन ... नवीन वर्ग, पुस्तक, नवीन ड्रेस. आणि गम्मत म्हणजे पाऊस खूप पडला म्हंणून शाळेला मिळणारी सुट्टी. रेनकोट घालून, पाठीवर दप्तर घेऊन त्या पावसाच्या पाण्यात उड्या  मारत जाणारी,  साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणारी  छोटी छोटी मुले पहिली कि आपल्याला हि लहान व्हावेसे वाटते.    तसे आपल्या सगळ्यांचं हा पाऊस आवडतो. कारण कधीतरी मोठ्यांनाही याच्या मुले ऑफिस ला दांडी मारता येते. "अरे नाही रे आमच्या कडे खूप पडतोय पाऊस, गुढघाभर पाणी झालीय सोसायटी समोर आज नाही येणार ऑफिस ला !!!" असे म्हणून ऑफिस ला बुट्टी मारायची. आणि घरी बसून मस्त पैकी गरमागरम भजी आणि  वाफाळत्या चहा चा आस्वाद घ्यायचा. 

"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे " खरेच पावसामुळे सगळी कडे कसे हिरवेगार होऊन जाते. याच ऋतूत असते ती भाज्यांची रेलचेल,  वेगवेळ्या प्रकारच्या फक्त या ऋतूत मिळणाऱ्या काही खास भाज्या. याच ऋतूत येतात आपली सण , नागपंचमी, गौरीगणपती , गोपाळकाला आणि असे बरेच. सगळ्यांना एकत्र आणणारे आणि आपला उत्साह वाढवणारे हे सण.  

या पावसात " वर्षा सहलींचा" सपाटा असतो. आणि मग गुगल वर "places to visit in rainy season " हे सर्च केले जाते. ठिकाणे ठरवली जातात आणि मग झुंडीच्या झुंडी लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर अशा ठिकाणी निघतात.  पण खरेच या पावसाळी पिकनिक ची मजा काही औरच. मुसळधार पावसातून मित्र मैत्रिणीनं सोबत गाडीतून लांब फिरायला जाणे म्हणजे स्वर्ग सुखचं. प्रेमीयुगुलांसाठी तर हा खूपच खास ऋतू. एका छत्रीत एकमेकाना सांभाळत , लाजत, एकत्र भिजण्याची  मजा काही औरच.  पाऊस पडत असताना मुद्दाम छत्री न घेता पावसात भिजायचे आणि मग रस्त्यावर उभे राहून गरमागरम भाजलेले मक्याची कणसे खायची हि गम्मत तर प्रत्येक जण अनुभवतोच मग ते शाळेत जाणारे मुल असो कि ऑफिस मध्ये बॉस असलेला ५०शी चा माणूस असो. 

कधी कधी मात्र कंटाळा येतो या पावसाचा. रस्तात होणार चिखल, हातातल्या पिशव्या , छत्री , कपडे सगळे सांभाळताना होणारी कसरत फार कंटाळवाणी असते.  त्यात पावसामुळे जर ट्रेन बंद झाल्या तर अजूनच राग येतो. खरे तर राग माणसांवर असतो पण आपण दोष मात्र त्या पावसाळा देतो. कधी तरी अवेळी केलेल्या आगमनामुळे होणारी धावपळ. आणि मग ओलेत्या अंगाने ऑफिस मध्ये करावे लागलेले काम.  पण तरीही आपण सर्वच या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो अगदी चातक पक्षासारखी. 

पावसामुळे जशी झाडे, रस्ते आणि सगळ्याच गोष्टींवर साचलेली धूळ पाण्याबरोबर वाहून जाते आणि सगळे स्वच्छ होते तसेच आपण हि वर्षातून एकदा तरी आपल्या मनावरची धूळ , क्लेश, मरगळ, द्वेष, सगळे धुवून स्वच्छ मनाने सगळ्याची नव्याने सुरवात केली पाहिजे. आणि पावसात जशी सगळीकडे प्रसन्न करणारी हिरवळ असते तसे आपले मनही प्रसन्न केले पाहिजे. 

देवा कडे इतकीच प्रार्थना आहे कि दरवर्षी इतका मुबलक पाऊस पाड कि आमच्या कुठल्याही शेतकरी राजाला आत्महत्या करायची वेळ नको येऊ दे. आणि इतका हि नको जास्त पाडूस कि त्यात सगळ्यांची घरंदारं वाहून जातील. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करून पर्यावरण जपायचे. 

हे सगळे वाचताना आपल्या सगळ्यांना एक गाणे नक्कीच आठवायला हवे..... 


येरे येरे पावसा , तुला देतो पैसा 
पैसा झाला खोटा , पाऊस आला मोठा  ....... 






Thursday, 8 June 2017

ट्रेन मधून पर्स पडली अन ....... (महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स ०८. ०७. २०१७)

अजूनही आठवतो तो दिवस २१ सप्टेंबर २००८, रविवार होता सकाळी बँकेतून पैसे काढले ऑफिसचे आणि धावत ट्रेन पकडली. ट्रेन सुटणार होती म्हणून शेवटच्या बाराव्या डब्यात चढले. रविवार असला तरी बऱ्यापैकी गर्दी होती ट्रेन ला. एकाच स्टेशन नंतर उतरायचे म्हणून मी दारातच उभी होते. गाडी माझ्या उतारायाच्या स्टेशन ला लागतच होती इतक्यात मागून कुणीतरी बॅग ओढल्यासारखे वाटले आणि माझ्या बॅगचा बेल्ट तुटून बॅग खाली ट्रॅक मध्ये पडली. बापरे !!!ऑफिस चे पैसे, मोबाइल, माझे पाकीट, पास सगळेच त्यात. ब्रम्हांड आठवले, आपल्या पैशाचे काही नाही पण ऑफिस चे पैसे, जास्त नव्हते  पण तरीही उगाच आपल्यावर नको तो आळ येणार या विचारानेच धडकी  भरली. गाडी प्लॅटफॉर्म ला लागत होती पण  मला काही राहवेना आपण शेवटच्या डब्यात आहे हे विसरूनच गेले आणि ७व्या डब्याच्या इथेच चालत्या ट्रेन मधून उतरायला गेले. ट्रेन च्या गती मुळे  धाडकन खाली प्लॅटफॉर्म वर पडले. ट्रेन मधले आणि प्लॅटफॉर्म वरचे सगळेच ओरडायला लागले. समोर एक आजोबा म्हणाले " अग! अक्कल नाही का उडी मारतेस ?" मी फक्त " माझी पर्स" इतकंच म्हणून उठून धावत सुटले. दोन्ही गुढघे , कोपराना लागले होते. ड्रेस हि जरासा फाटला होता पण त्यापेक्षा जास्त मला त्या पर्स ची चिंता होती. धावत पहिल्या डब्या जवळ पोचले तिथे एका मुलाने माझी पर्स उचलून तिथल्या रेल्वे पोलिसांकडे दिली होती. आणि मला म्हणाला "दीदी आपला पर्स उधर है". पोलिसांकडून आधी ती पर्स घेतली.  मी तिथेच बाकड्यावर बसून राहिले , थोडा वेळ काहीच कळले नाही शुद्ध हरपल्यासारखे झाले होते , हात पाय गार पडले होते , आणि हृदयाची धडधड वाढली होती . जेव्हा जरा बरे वाटले तो पर्यंत गाडी निघून गेली होती. त्या मुलाचे आभार मानायचे हि राहून गेले.त्या मुलाच्या रूपाने बाप्पाचं भेटला होता. तो पर्यंत आजूबाजूला गर्दी जमली होती शंभर प्रश्न, शंभर सल्ले. जो तो शिव्या घालत होता. मग लक्षात आले खरंच जर चुकून पाय खाली गेला असता तर त्या थोड्या पैशासाठी जीवाला मुकावे लागले असते नाहीतर हात पाय काही तरी मोडून बसले असते. पण म्हणतात ना देव सगळे पाहत असतो. कदाचित मी केलेल्या चांगल्या कामाचे फळ म्हणून फक्त मुका मार लागण्यावरच निभावले होते आणि माझी पर्स हि त्यातली एकही वस्तू गहाळ ना होता मिळाली . त्या दिवशी पासून बाप्पावरचा विश्वास अजून वाढला. त्यानंतर मात्र जवळजवळ वर्षभर ट्रेन मध्ये कधीच दरवाजात उभी राहिले नाही. आणि अजूनही कधीतरी ट्रेन स्टेशन ला लागताना तो प्रसंग आठवला कि पाय आपोआप मागे जातात.