Saturday, 15 October 2022

दिवाळीचा अभ्यास

 हल्ली शाळा ही वेगवेगळ्या बोर्डाच्या असल्यामुळे सुट्ट्यांचे वेळापत्रक बदललं आहे. आमच्या वेळेला साधारण नवरात्रीच्या वेळेला सहामाही परीक्षा सुरू व्हायच्या, आणि साधारणपणे दिवाळीच्या तिच्या आठ दिवस आधी संपायच्या. मोजून २१ दिवस सुट्टी असायची त्यावेळी दिवाळीची.


वर्षाचा सगळ्यात मोठा सण म्हणून नेहमी अगदी आतुरतेने वाट बघितली जायची. तशी अजून बरीच कारणं होती, बाबांचा होणारा बोनस, नवीन कपडे, फटाके,  फराळाचे पदार्थ, सुट्टीत येणारे पाहुणे.  त्यामुळे लहानांपासून  मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दिवाळीची आतुरता असायची.


या दिवाळीच्या निमित्ताने एक गोष्ट मला आठवली जी आता बरीच विस्मरणात गेली आहे, बऱ्याच  शाळांमध्ये बंद ही झाली आहे.  ती म्हणजे *दिवाळीचा अभ्यास*.   हा दिवाळीचा अभ्यास म्हणजे मोठी गंमत होती.


शेवटच्या पेपर च्या दिवशी किंवा जर परीक्षेनंतर एखाद दिवस शाळा असेल त्या दिवशी एक सायकलोस्टाइल पेपर वर्गातील  सगळ्या मुलांना वाटला जायचा. त्याच्या सुरुवातीला शुभ दीपावली असे लिहुन दोन बाजूला छोटे छोटे कंदील, किंवा पणत्या प्रिंट केलेल्या असायच्या. कधी कधी वेली सारखं नक्षीकाम केलेले असायचं.  तो पेपर आला की काही मुलांना आनंद व्हायचा,  तर काही मुलांची नाक मुरडायची, सुट्टीतही अभ्यास करावा लागणार म्हणून.


त्या कागदाला एक विशिष्ट प्रकारचा वास असायचा, त्या सायक्लोस्टाईल च्या शाई चा असावा. तो वासच आमच्या दिवाळीची सुरुवात असायची.


त्या पेपर वर तारखेनुसार त्या दिवशी काय अभ्यास करायचा ते लिहिलेलं असायचं.  म्हणजे उदाहरणार्थ दिनांक २२ ऑक्टोबर २०२२ :  बे ते 10 चे पाढे लिहिणे. मराठीचे शुद्धलेखन पाच ओळी. 

दिवाळीचे चित्र काढणे.

दिनांक २३ ऑक्टोबर २०२२: बे ते १५ चे पाढे लिहिणे. मराठीचे शुद्धलेखन पाच ओळी. गोटीव कागदाचा कंदील बनवून चिकटवणे. त्या अभ्यासात फुले, पाने गोळा करून चिकटवणे. चित्रं काढणे, चित्र काढून त्यावर डाळी चिकटवणे , एखाद दुसरा निबंध. अशाप्रकारे प्रत्येक दिवसाचा अभ्यास हा लिहिलेला असायचा.  


तो अभ्यास करण्यासाठी नवीन वही ही घेतली जायची. कारण त्या कागदा वर लिहिलेलं असायचं की दिवाळीच्या अभ्यासासाठी नवीन वही करणे व ती सजवणे.  


ती वही आणायला जातानाही एक वेगळा उत्साह असायचा. कशी वही घ्यायची, कशी ती सजवायची याचे मनात चित्र रेखाटले जायचे. एकदा ती वही घरी आणली,  की अगदीं पहिल्या पानावर श्री लिहिला जायचा , मग नाव, इयता, शाळेचं नाव नेहमीप्रमाणे हे सगळे लिहीलं जायचे. आणि त्या नंतर मोठ्या दिमाखात *दिवाळीचा या अभ्यास*  असे  लिहिलं जायचे. मग वाटले तर एखादी पणती, कंदील ही रेखाटला जायचा. 


पाढे लिहिताना पट्टीने छान पैकी रेषा आखून घ्यायच्या. शुद्धलेखन लिहिताना आवडीच्या धड्यातले आवडते परिच्छेद लिहिले जायचे. सुरवातीचे दोन तीन दिवस अगदी उत्साह असायचा. रोज अगदी ना चुकता अभ्यास केला जायचा.


त्यानंतर साधारण सगळ्यांच्या परीक्षा संपून सगळी मित्र मंडळी मोकळी व्हायची. आणि मग खेळात बराच वेळ निघून जायचा. घरात  साफसफाई , फराळाचे पदार्थ याची तयारी सुरू व्हायची. नवीन कपड्यांची खरेदी, फटाके या सगळ्यांत त्या अभ्यासाच्या वहीच्या विसर पडलेला असायचा.  किंवा आज नाही करत पण उद्या नक्की दोन दिवसांचा अभ्यास करिन असे वचन देऊन , आजचे खेळाचे दान पदरी पडून घेतले जायचे. आणि नेहमीप्रमाणे उद्या कधी उजडायचा नाही.   हा अगदीच  कुणी अभ्यासू मुलांनी केला ही असेल पण त्याची शक्यता अगदीच कमी.


 दिवाळीचे चार दिवस कसे निघून जायचे कळायचे ही नाही. त्यानंतर भाऊबीजेच्या निमित्ताने आलेले पाहुणे घरी असायचे, मग तेव्हाही त्या वही चा विसर पडलेला असायचा.


हे सगळं झाल्यानंतर जशी सुट्टी संपायची वेळ जवळ यायची, तेव्हा अगदी प्रकर्षाने आठवण यायची या दिवाळीच्या अभ्यासाच्या वहीची. आणि मग व्हायची ती धावपळ.  आजचा अभ्यास उद्या करू म्हणणाऱ्या आम्हाला, आज उद्या काय तर परवा तेरवा आणि त्या आधीचा ही बऱ्याच दिवसांचा अभ्यास एकाच दिवशी करावा लागायचा. त्यात काही बनवायचं असेल तर त्या साठी लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठीची धावपळ. आणि नेहमीप्रमाणे घरातल्यां मोठ्या माणसांना लहान मुलांना ओरडायला अजून एक निमित्त मिळायचे.


मला आठवतं, आमची आशा मावशी मग दुपारी आमचं खेळणं बंद करून, आम्हाला तो अभ्यास पूर्ण करायला लावायची. त्याबरोबर पाठीत दोन धपाटे ही पडायचे. पण घाईगडबडीत ती वही पूर्ण करण्याची मजाही काही वेगळीच होती. ती वही पूर्ण झाल्यावर व्हायचीच असं नाही पण त्यातल्या त्यात  ९९ टक्के पूर्ण झाल्यावर त ती कोणी व कशी कशी सजवली आहे यावर मित्र-मैत्रिणींचा चर्चासत्र असायचं आणि कोणाला किती मार पडला याचंही.


ती वही पूर्ण करण्याची वेळ  आली की, जाणीव बाईची व्हायची ती दिवाळीची सुट्टी संपणार आहे याची आणि मग जास्त वाईट वाटायचे.... परंतु  ते वाईट वाटणे ही शाळेत जाई पर्यंतच असायचे. एकदा का शाळेत गेलं, मित्रमैत्रिणी भेटले , कुणी कुणी काय केलं, कुठं जाऊन आले हे बोलणं सुरू झाले की त्या वाईट वाटण्याचा विसर पडायचा.


पण काही म्हणा त्या दिवाळीच्या अभ्यासाची  वेगळीच गंमत असायची. आजही  त्या सायकलोस्टाइल पेपर चा वास नाकात जाणवतो.  त्या अभ्यासाची आठवण येते आणि वाटतं की पुन्हा एकदा तो अभ्यास अपूर्ण ठेवावा आणि त्यामुळे आपल्याला बोलणारी आपली  सगळी मंडळी आपल्या सोबत असावीत.... आणि पुन्हा एकदा ती जुनी दिवाळी साजरी व्हावी.



सौ. मिलन राणे - सप्रे🖋️




Friday, 8 July 2022

वडापाव

 *वडापाव*


वडापाव म्हणजे आपला सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. वडापाव हे नाव घेतलं की आपल्या तोंडाला पाणी सुटते.  सुटलं की नाही तोंडाला पाणी? 

खूप दिवस झाले,  सारखे आपले मी वडापाव चे फोटो टाकते आहे. आणि बऱ्याच दिवसात लिहायला काही सुचतच नव्हतं पण काल फोटो बघताना म्हटलं अरे!!! हा विषय आहेच की लिहायला.


बनवायला अगदी तसा सोपा उकडलेल्या बटाट्याची भाजी करायची, मग ती बेसनच्या पिठात घोळवून तेलात छान पैकी तळून काढायची. आणि मग एक पाव घेऊन त्याला छान लाल तिखट चटणी थोडीशी गोड चटणी लावून वडा घालून खायचा, इतका साधा सोपा वडापाव. पण तरीही गाडीवरचा वडापाव खाण्याची मजा काही औरच. 

 आम्हा मुंबईकरांसाठी तर वडापाव म्हणजे आद्य खाद्य असं म्हणायला हवं. कारण मला वाटतं मुंबई ८० ते ९० टक्के माणसं ही दिवसातून एकदा तरी वडापाव खात असतीलच.   एखादी व्यक्ती दिवसभर  अगदी उपाशी राहिला, काहीच खायला नाही मिळालं तरी, ती व्यक्ती दिवसभर एका वडापाव वर राहूच शकते.  


आपण जर कोणाच्या स्ट्रगल स्टोरीज ऐकला म्हणजे एखाद्या उद्योगपतीची किंवा जास्त करून एखाद्या सिनेसृष्टीत काम करणाऱ्या व्यक्तीची.  सिनेसृष्टीत काम करताना जे बाहेरून आलेत, किंवा जे इथेच असून सुरवातीच्या दिवसात काम मिळविण्यासाठी धडपडत होते.  अशी प्रत्येक व्यक्ती म्हणतेच,  की माझ्या सुरुवातीच्या दिवसात मी एक कटिंग चहा आणि एक वडापाव खाऊन दिवस काढलेले आहेत.  


बसचा प्रवास, वडापाव, रेल्वेचा प्रवास, हे म्हणजे मुंबईचा सर्वस्व आहे.  इथे येणारी अशी एकही व्यक्ती नसेल की जिने ट्रेन मधला प्रवास नसेल केला. ट्रेन, बस मधून प्रवास केला नाहीये आणि ज्या व्यक्तीने वडापाव खाल्लेला नाही अशी व्यक्ती मुंबईकर असणे कठीण.  मुंबईत राहून मुंबईचा वडापाव न खाणं म्हणजे एक पापच जणू. 

 तर असा हा वडापाव,  सगळ्या शहरात हा वडापाव फेमस आहे.  आता तर वडापाव अगदी दिल्ली काय तर  सातासमुद्रापारा पलिकडेही पोहोचला आहे, परंतु मुंबईत येऊन जर वडापाव खाल्ला नाही तर ती मुंबई ट्रीप पूर्ण होत नाही एवढे मात्र नक्की.


आता वडापाव ची स्टोरी ही बऱ्याच वेळा आपण व्हाट्सअप वर वगैरे वाचलेली, ऐकलेली आहे. वडापाव या खाद्याची  सुरुवात कुठून झाली,  त्याचा उगम कसा झाला.  पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं असतं ही आपल्या शहरात कुठला वडापाव जास्त फेमस आहे.  प्रत्येक ठिकाणी असं असतं की  हा वडापाव म्हणजे जगात भारी;  असा वडापाव दुसरीकडे मिळणार नाही.  हे वाक्य प्रत्येक शहरातला माणूस आपल्या शहरातल्या वडापावच्या टपरी बद्दल बोलत असतो. 


आमच्या चेंबूरचा ४२ चा वडापाव  म्हणजे ४२ नंबर बिल्डिंगच्या जवळ गाडी लागलेली असते म्हणून ४२चा वडापाव ( खरं नाव अनिलचा वडापाव).  विरारला बेस्ट प्रकाश वडापाव फेमस, बोरिवली चा मंगेश वडापाव फेमस आहे.  अरे, अमुक इकडचा वडापाव हा जगात भारी हे वाक्य  म्हणजे आपण जर एखाद्या  शहरात गेलो कि तिकडची लोक सांगतात की आलेच आहात  तिकडचा वडापाव एकदम भारी असतो, खाऊन जा.  म्हणजे तो वडापाव हा त्यांच्यासाठी अगदी म्हणजे हायक्लास असतो.  दुसरीकडचा वाईट असतो असं नाही . आणि गंमत म्हणजे  आपणही अगदी चवीने तो वडापाव खातो वगैरे, अगदी त्यांच्यासमोर सांगतो ही की अगदी मस्त वडापाव आहे.  पण तरीही  तिथून बाहेर पडल्यावर नक्कीच म्हणतो की आमच्याकडच्या वडापावची सर नाही या वडापावला.  असं  हे प्रत्येक जण करतो, म्हणजे आता मनातल्या मनात सगळे हसत असतील पण हे खरं आहे. 


वडापाव खाणे म्हणजे सुख आहे आणि   मुंबईच्या बाहेर जाऊनही चविष्ट वडापाव खायला मिळणं म्हणजे म्हणजे दुप्पट सुख. आम्ही गावी जातों तेव्हा खारेपाटण चा वडापाव आमच्या तराळ्यातला गगनगिरी वडापाव म्हणजर एकदम खासच.


मला आठवतो तेव्हा या वडापावची किंमत अगदी  काहीतरी सव्वा-दीड रुपया होती.  यावरून अगदी दोन ते चार रुपये वडापाव झाला होता. त्यावेळेस अगदी रुपया सव्वा रुपया इतके ही पैसे नसायचे. अगदीच कोणी पाहुणे आले आणि त्यांनी काही हातावर पैसे टेकवले तर त्याचा वडापाव खायचा. अगदीच वडापाव खायचा नसेल तर आमच्या बेचाळीसच्या वडापाववाल्याकडे (अर्थात त्याच्याकडे असं नाही सगळ्याच वडापाववाल्यांकडे) चुरापाव  मिळत असेल.  म्हणजे वडे तळल्यानंतर उरतो तो चुरा पावाला  गोड चटणी तिखट चटणी त्यात घालून दिला जातो तो चुरापाव. आम्ही खायचो त्या वेळेला तो चार आणे होता आणि नंतर तो आठ आणे झाला.  वडापाव खायला दिलेले पैसे चार वेळा चुरापाव खाऊन होईल म्हणून वडापाव खायचा ही टाळलं आहे. कधीतरी कोणी अगदीच  जर पार्टी दिली तर तो फुकटचा वडापाव खाण्याची मजा काही औरच आणि वाचवलेल्या पैशात चुरापाव.


वडापावच्या बाबतीतची एक गमतीदार आठवण आहे चेंबूरची. आमच्याकडे गणपती असायचे पाच दिवसाचे. गणपती  विसर्जनाला जाताना प्रत्येकाची धडपड असायची गणपतीच्या रिक्षातून जायची.   पण येताना मात्र आम्ही अनंतमामा ज्या रिक्षात असेल त्या रिक्षात बसायला धडपडायचो, कारण येताना अनंतमामा त्याच्या रिक्षात असणाऱ्या प्रत्येकाला वडापाव द्यायचा. अर्थात सुरुवातीला फक्त त्याच्या रिक्षात असणाऱ्या लोकांना मिळायचा.  पण काही लहान मुलांनी चुगली  केल्या नंतर मात्र मग तो सगळ्यांसाठी आणला जायचा. पण तरीही तिकडे गाडीवर उभं राहून गरम-गरम वडापाव खाण्याची जी मजा होती, ती घरी पार्सल करून आणलेल्या वडापावला येत नाही. यावरून बाकीच्यांना चिडवायला जरा मजा यायची त्यामुळे त्यावेळेला  त्या रिक्षात बसायला आमची धावपळ असायची.


खरंच असं कधी कधी वाटतं की आमची पिढी तशी खूप कमी खर्च करणारी आहे. आम्हाला वडापाव, पाणीपुरी याच्यावर भागायचं.  अगदी तुमचं स्टारबक्स मॅकडोनल्ड या गोष्टी आम्हाला नकोच असे नाही किंवा हव्या असे ही नाही.  चार मित्र मैत्रिणी असले आणि वडापाव किंवा शेव पुरी पाणीपुरी समोर असली खायला,  तरी तेवढी पार्टी ही  आमच्यासाठी पुरेशी असते 


मी जेव्हा चेंबूरला राहायचे, त्या वेळेला मी आणि माझी मैत्रीण आम्ही बऱ्याच वेळा वडापाव किंवा चुरापाव खायला जायचो.  म्हणजे जर  दोघींकडे पैसे असतील तरच खायला जायचो.  मग आम्ही दोघी जाणार तर काहीतरी कारण काढायचं की असंच फिरायला जातोय , जरा राऊंड मारून येतो. किंवा आमच्या बिल्डिंग मधली मोठी मुलं जायची वडापाव खायला, तेव्हा मग त्यांच्या बरोबर कोणालातरी दोन लहान मुलांना घेऊन जायचे त्यात कधीतरी नशिबानं नंबर लागला तर.   कोणी पाहुणे आले  की घरातली वडीलधारी माणसे सांगायची, जा तिकडचा वडापाव घेऊन ये.  मग वडापाव घेऊन येणार त्यालाही एक वडापाव मिळायचा,  त्यामुळे एवढ्या लांब वडापाव आणायला जाण्यासाठीही आमची चढाओढ असायची.  की तू जाणार की मी जाणार. 


बेचाळीसच्या  वडापावची चव अजूनही जिभेवर तशीच रेंगाळते  आहे. त्या वडापावच्या गाडीवर कितीतरी आठवणी आहेत.  तिकडे वडापाव खायला गेल्यावर  खूप गर्दी असली की थांबावं लागायचे मग कुणीतरी ओळखीचे भेटले की गप्पा,  किंवा काहीतरी गुपित सांगायचे म्हणून ही स्पेशल वडापाव पार्टी. तेव्हा असे कॉफी शॉप नव्हतें ना तास तास बसायला देणारे.  वडापावच्या गाडीवर गेल्यावर लपून-छपून वडापाव खायची मजा काही वेगळीच होती.  काहीतरी कारण खोटं सांगून आलेले असलो की मग कोणीतरी बघेल म्हणून अगदी त्या गाडीच्या मागे जाऊन पाठ करून वडापाव खाल्ला जायचा.  अर्थात असे हे सगळ्यांनीच केलं असेलच. आता या सगळ्याचा हसू येतंय पण या त्यावेळच्या गोष्टीची मजा काही वेगळीच होती.

होते असे एक खाऊन पोट भरतच नाही, कमीत कमी दोन हवे. तर कुठे जरा पोटातला वणवा  शांत होतो.  असतात काही असे लोक म्हणजे एक तर प्रकृतीची जरा जास्तच काळजी घेणारे किंवा डायबेटीस पेशंट किंवा अगदीच नाही तर ज्यांना ॲसिडीटी खूप होते  म्हणून एका वडापाव धन्यता मानणारे.  


पाऊस पडायला लागला की बटाटा भजी, कांदा भजी हा बेस्ट ऑप्शन असतो. वडापाव ला तोड नाही. बाहेरचे खायचं नाही म्हणून बऱ्याच दिवसांत वडापाव खाल्ला गेला नाही तर घरी तरी वडापाव कर आशु भुणभुण  मागे लागते. पण जरी घरी किती वडापाव खाल्ला तरी गाडीवरच्या वडापावचे समाधान घरच्या वडापावला येत नाही. वडापाव  तळलेली मिरची खाणारे ही आहेत.  म्हणजे जेवढा वडापाव आवडीने खातात तेवढ्याच आवडीने ते तळलेली मिरची ही खातात.  वडापाव,  मिरची आणि सोबत गरमागरम कटिंग चहा काय सुटलं ना तोंडाला पाणी???


वडापाव खाणे हा एक अध्यात्मिक आनंद आहे असं प्रत्येक मुंबईकराला वाटत असेल. अर्थात वडापाव न आवडणारी माणसे ही कदाचित असतील पण माझ्या लेखी अशा माणसांना गाढवाची गाढवाला गुळाची चव काय असं म्हणायला हरकत नाही. असा हा तुमचाआमचा सगळ्यांचा जिवाभावाचा वडापाव.


 अर्थात तुमच्या शहरात एखादा वडापाव फेमस असेलच ना तर त्याच्या बद्दल ची  एखादी गोष्ट मला कमेंट मध्ये लिहून पाठवा तेवढीच आठवणींची उजळणी.  किंवा तुमच्या इकडच्या वडापाववाल्याचं  नाव तरी लिहून पाठवा, म्हणजे  समजा कधी आलो तुमच्या शहरात तर निदान तिकडचा वडापाव तरी खाता येईल.


 *सौ. मिलन राणे - सप्रे*🖋️