Tuesday, 2 July 2019

गंमत भीतीची

आजचा लेख हा अगदी सहज सुचलेला लेख आहे काहीच लिहायला नव्हते म्हणून केवळ वेळ जावा म्हणून हा लेख. 

आता चहा पीत खिडकीत उभी असताना  सहज म्हणून खाली पाहिले तर लहान मुले क्लास हुन सुटली होती. कंपाऊंड मध्ये साचलेल्या पाण्यात त्यांची मजा सुरू होती, एकमेकांवर पायाने पाणी लोटताना एकाचा दुसऱ्याला पाय लागला तर त्याने लगेच त्याला नमस्कार केला ( लोटांगण नाही त्याच्या अंगाला ओझरता स्पर्श करून तो हाथ आपल्या माथ्याला लावला) अगदी साधी सरळ क्रिया पण मला यातून वेगळेच आठवले.

अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्या परंपरेने आपल्याला त्याची भीती घातली जायची आणि आपणही तीच भीती आपल्या मुलांनाही घालत आलो. अशाच काही जुन्या गोष्टीना उजाळा.

आपण लहान असताना आपल्याला भीती घातली जायची असा कुणाला पाय लावला की देवबाप्पा रागावतो हा म्हणून लगेच नमस्कार करायला लावायचा.  यात संस्कारापेक्षा भीती जास्त दाखवली जायची . आणि आपणही तेव्हाही आणि अजूनही कुणाला पाय लागला की लगेच नमस्कार करतो. कधी कधी मस्करी मध्ये एखाद्याला म्हणतो ही की मुद्दाम लाथ मारायची आणि मग हे नाटक किंवा एकदाच काय ते लाथा मारून घे आणि एकदाच काय तो साष्टांग घाल.😊

 मुलं जेवत नसले की लवकर जेव नाहीतर बुवा पकडून नेईल, ही सगळ्यात पहिली भीती...नंतरही बरेच वेळा हे करू नकोस बुवा येईल , ते करू नकोस बुवा येईल. गंमत म्हणजे हा बुवाला कधी कुणी पाहिलेला नसायचा आणि हा बुवा नक्की कोण हे विचारायची अक्कल आणि हिंमत आमच्या पिढी पर्यंत नव्हती (आताची मुले खूपच स्मार्ट आहेत).  कधी कधी बुवा म्हणून दाखवला जायचा तो म्हणजे घरातलेच कुणीतरी डोक्यावर पांघरूण घेऊन यायचे, सगळे लाईट घालवले जायचे आणि मग विचित्र आवाज काढून घाबरवले जायचे.

मारामारी करताना डोक्याला डोकं आपटले की कुणीतरी म्हणायचे "आता तुम्हाला शिंग येणार" आणि शिंग येऊ नयेत म्हणून परत एकदा एकमेकांच्या डोक्यावर डोकं आपटायचे. ते दोन घाबरलेले जीव आपल्याला शिंग कसे दिसेल या विचाराने अजून जोरानं टक्कर द्यायचे. या मागचे लॉजिक अजून कळलेलं नाहीये. एकदा मारून एक येणार तर दोनदा मारून दोन यायला हवेत ना? नाही येणार म्हणजे ते उगवणारे शिंग दुसऱ्यांदा आपटून लगेचच आत टाकून द्यायचे असे का??? किंवा आलेच तर एक वाईट दिसेल म्हणून दुसरे😀😀😀

अजून एक भीती ती तर गंमतच. कुठलेही फळ खाताना त्याची बी गिळली की पोटातून म्हणे त्याचे झाड उगवते. अर्थात फळं खाताना ती नीट बघून खावीत म्हणून हे सांगितले जायचे हे कळायला फार उशीर होतो. तोपर्यंत आपण बऱ्याच वेळा चिकू, पेरू, कलिंगड अशी बरीच झाडे आपल्या पोटातून आपण उगवताना  आपण कल्पना करून झालेले असतो.  किती वेळा तर बेंबीतून झाड (वेल) आलीय असे चित्र ही काढून झाले असेल वहीच्या शेवटच्या पानावर.

आपण सगळेच लहान असताना पोलिसांना घाबरतो याला कारण ही आपल्याला घातलेली भीती.  घरातली मुले खूप मस्ती करत असली अजिबात ऐकत नसली की मग कुणीतरी म्हणते " आता मस्ती थांबवा नाहीतर पोलीस पकडून नेतील". ही धमकी तर  वारंवार दिली जायची. रस्त्यातून जाताना पोलीस दिसले की धडकी भरायची. कित्येकदा तर आईच्या मागे लपून राहायचे. 
माझ्या सारख्या बऱ्याच डरपोक लोकांना अगदी खरी वाटावी अशी गोष्ट म्हणजे भूत. आता माणसेच भुतासारखी वागतात ती गोष्ट वेगळी. रात्रीच्या वेळी बाहेर पडायचे असले की अरे तिथं जाऊ नको भूत असते. कींवा रडू नको हा तो राक्षस येईल आणि तुला खाऊन टाकेल. आणि जरा कुणी विचित्र आवाज केला की आपली इथे टरकायची. आणि कुणीतरी सांगितले असायचे की रामाचे नाव घेतले की भुतं पळून जातात म्हणून  भीती वाटली रे वाटली की राम नामाचा जप सुरू करायचा.

सगळ्यात गंमत होती ती खोटे बोललं की सांगितले जाणारी... खोटं बोललो की बाप्पा कान कापतो...असे कुणीही नसेल की ज्यानी हे वाक्य ऐकले नसेल. पण तरीही कधीतरी लबाडी केली जायचीच आणि मग झोपताना कानावर हाथ धरून झोपायचे किंवा उठल्यावर आधी कान तपासायचे आहेत का?  प्रत्येक वेळी खोटं बोललो की ही भीती मात्र कायम असायची.

अजूनही काही गोष्टी आहेत ज्या भीती कमी आणि अंधश्रद्धा जास्त अशा आहेत त्यावर नंतर कधीतरी....

पण काहीही म्हणा त्या खोट्या भीती ची ही भीती वाटायची.  पण आता खरेच रोजच्या आयुष्यात इतक्या गोष्टी वाईट घडतात की माणसांची भीती पळून चालली आहे.  रोजच्या धकाधकीच्या जीवनात इतका व्यग्र झालाय की माणसाला सगळ्यात जास्त वाटणारी मृत्यू ची भीती ही वाटेनाशी झाली आहे. 













6 comments:

  1. Very true. Nicely explained... Good one.

    ReplyDelete
  2. भीती नाही मी त्याला tradition म्हणू शकतो
    भुताची मात्र भीती

    ReplyDelete
  3. एकदम खरे ... अगदी पारंपारिक पणे हा कधीच न दिसलेला बुवा एका पिढी पासून दुसर्या पिढीपर्यंत त्याची भीती घालून असतो..लहानपणापासून प्रत्येक चांगली गोष्ट शिकावण्यासाठी या बुवाची भीती आपल्या मनात घालून दिलेली असते.. आज त्या प्रत्येक गोष्टीमागचा अर्थ उमगतो ...पण तुझ्या या लेखाने लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या ... nice and funny..Good one Milan

    ReplyDelete
  4. लहानपण आठवले आपले बाकी एरवी आताची पिढी खुपच स्मार्ट आहे हेही खरच

    ReplyDelete
  5. दीपक जोशी विरारTuesday, 2 July 2019 at 20:20:00 GMT+5:30

    लेख फारच सुंदर......विषय अगदी वेगळाच....यावरुन आठवले ते बाळ कोल्हटकर यांचे नाटक....लहानपण देगा देवा.....खरोखरच मिळेल का हो पुन्हा एकदा.प लेख वचन नक्किच मिळाले...

    ReplyDelete
  6. Khup chan lekh aahe milan vishay sundar ghetla ahe mastch.........

    ReplyDelete