Sunday, 24 February 2019

एक भेट सुमीत राघवन शी

ज्यादिवशी माझा हॅम्लेट नाटकवरचा ब्लॉग लिहिला त्या दिवशी च काही जणांची अशी प्रतिक्रिया होती की बघ म्हणे यावर सुमीत नक्की कंमेंट करेल ( सॉरी सुमीत सर एकेरी उल्लेख केल्याबद्दल)
मला अजूनही आठवतोय तो दिवस जेव्हा पहिल्यांदा हॅम्लेट पाहिले ५ जुलै २०१८. अतिशय अप्रतिम नाटक. नाटक सुटल्यावर कलाकारांना हि भेटलो सगळेच खूप छान  बोलले. पण माणसांचा इतका गराडा असूनही प्रत्येकाशी एक दोन शब्द तरी बोलू फोटो काढणारा तो कलाकार म्हणजे "सुमित राघवन". त्यांना भेटायला आलेल्या एका काकांना जास्त वेळ ताटकळत ठेवायला लागू नये म्हणून ते आधी त्यांना भेटायला गेले आणि मग परत सगळ्या चाहत्यांना भेटले. मी निघताना त्यांना म्हटलं की आजही फास्टर फेणे म्हटले की आम्हाला सुमीत राघवनच येतो डोळ्यासमोर.

ते नाटक पाहून आल्यावर मी इतकी भारावले होते कि  त्या नाटकावर एक लेख लिहिला. "हॅम्लेट एक रोमांचक नाट्यानुभव". खूप इच्छा होती की त्या टीम पर्यंत हा लेख पोहचावा अशी. आणि माझ्या सुदैवाने आमच्या फेसबुक वरच्या एका ग्रुप मधल्या मैत्रिणींमुळे तो लेख सुमितजींपर्यंत पोहोचला. आणि चक्क त्यांनी प्रतिक्रिया  हि दिली त्यावर ( प्रतिक्रिया खाली पोस्ट केली आहे). तसे त्या नाटकातल्या एक- दोन कलाकारांनी माझी ब्लॉग लिंक शेअर केली पण मला पर्सनल अशी कंमेंट नव्हती आली कुणाचीच. पण आता तर साक्षात सुमीत राघवन ची प्रतिक्रिया ती ही इतकी मस्त. मला तर आज मै उपर आसामान नीचे असे झाले होते. माझ्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंट वर मी ती कंमेंट पोस्ट करत सुटले होते. कसले भारी वाटत होते. इतकेच  नाही तर त्यांनी तो लेख त्यांच्या टीम बरोबर शेअर हि केला.

त्यांचा या कौतुकाने मला आणखी  जोश आला आणि मी तो लेख स्वहस्ताक्षरात लिहून त्यांना भेट करायचा ठरवला. त्यासाठी आणि अजून एका कारणासाठी मला ते नाटक परत पहायचे होते. आधी मी साध्या फुलस्केप वर लिहिलं होतं. आणि मग ताई ला फोन केला ही मस्त बातमी सांगायला , तिने म्हटलं अगं इतकी क्रीएटीव्ह तू मग फक्त कव्हर देणार नुसते? काहीतरी छान बनवून दे." झाले ताई ने कीडा सोडला डोक्यात. आता जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत स्वस्थ बसेल ती मिलन कसली. आणि हातात एकच दिवस २४ चा. त्याच दिवशी मनाशी काहीतरी जुजबी ठरवून काही वस्तू आणून ठेवल्या. आणि मग घरातील काही वस्तू आणि आणलेल्या वस्तू यांचा मेळ साधून  छानसा एक बॉक्स बनवला( मिलिंद काकांनी बनवला होता त्याची कॉपी करायचा प्रयत्न😄). रात्रभर बसून गुलाबी रंगाच्या कागदावर तो ब्लॉग परत एकदा लिहून काढला. मग त्याची छान पैकी गुंडाळी करून त्याला रेड रिबीन बांधून त्या बॉक्स मध्ये ठेवला. हुश्श !!!! झाले गिफ्ट तयार. आता वाट बघत होते २५ ऑगस्ट ची.  सुमीत राघवन ला भेटायचे ते ही स्वतःच्या नावाची ओळख देत किती भारी होते हे..  परत एकदा बायकांना पडतो तो यक्षप्रश्न समोर उभा.  आता नाटकाला जाताना काय घालून जायचे?  आता सुमीत सारख्या सेलिब्रिटी ला भेटायचे म्हणजे जरा छान नटून जायला हवे ना. मग पुन्हा एकदा १० जणींना विचारून शेवटी आपला भारतीय पेहराव साडी नेसून जायचे ठरले. आम्ही शाळेचे काही मित्र मैत्रिणी मिळून गेलो होतो. आणि अजून एक स्पेशल व्यक्तीच्या मेहेरबानीमुळे आम्हाला अगदी पुढे बी लाईन ची तिकीटं मिळाली होती.( Thanks ).  तो दिवस बहुतेक आमचाच दिवस होता . माझ्या पुढच्या खुर्चीवर चक्क सचिन खेडेकर.. इतकं मस्त वाटत होते. पहिला अंक झाल्यावर मी त्यांना त्यांच्या आवाजबद्दत त्यांना कॉम्प्लिमेंट ही दिली.  ते म्हणाले ही मस्त झालेय ना नाटक , मी पहिल्यांदाच पाहतोय. मला गंमत वाटत होती किती मस्त बोलतात ही लोकं.  एकीकडे वाटत होते नाटक संपूच नये तर दुसरीकडे वाटत होते लवकर संपले तर पटकन सुमीत ला भेटता येईल.

तिसरा अंक संपला आणि मी कधी एकदा मागे जाते सुमीत सरांना भेटायला असे झाले होते. माझ्या पुढे एक आजी होत्या त्या हळू हळू चालत होत्या मी हि त्यांच्या मागून हळू हळू चालत होते पुढे जायचा प्रयत्न करत पण खूप गर्दी असल्यामुळे ते शक्य झाले नाही. शेवटी माझा तो आटापिटा बघून नाटक बघायला माझ्या शेजारी बसलेल्या माणसाने मला जागा करून दिली पुढे जायला. मी इतकी घाईत होते कि तेव्हा लक्षात आले नाही पण तो माणूस एक मिमिक्री कलाकार होता जो सचिन तेंडुलकरची खूप छान मिमिक्री करतो. हाश्श !!! शेवटी पोचले बरे तिथे. दोनच मिनिटात सुमीत सर तिथे आले. हा गराडा त्यांच्या आजूबाजूला मला पुढे जाऊ कि नको असे झाले होते. परत एक टेन्शन काय बोलतील. माझी ती छोटीशी भेट स्वीकारतील कि नाही. आता आमची भेटायची वेळ आली. त्यांना भेटले आणि तो बॉक्स हातात देत इतकेच म्हटले सर तो लेख लिहिला होता मी, त्यावर त्यांनी   लगेच म्हटले कि " मिलन सप्रे " ना. मी उडालेच. चक्क माझे नाव लक्षात मी इतकी शॉक होते कि काय बोलावे तेच कळेना मला. मी त्यांना म्हटले कि " सर, मी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिला आहे , जर व्याकरणाच्या काही चुका असतील तर समजून घ्या " त्यावर ते म्हणाले " भावना महत्वाच्या चुका नाही ." इतके मस्त वाटले ना. या पुढे काय बोलणार ? माझे ततपप होत होते माझ्या मित्राने सावरून घेतले म्हणाला कि तुम्हाला भेटून काही सुचत नाहीये तिला तेव्हा त्यांनी एकदम गोड स्माईल दिले. मग आम्ही २-३ फोटो काढले त्यांच्या सोबत आणि त्यांना पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन निघालो. मी तर जमिनीतून एखाद इंच वरच असें त्या दिवशी खूपच भारी वाटत होते.  

त्यानंतर हि जेव्हा माझ्या मिस्टरांनी नाटक पाहिल्यावर त्यांची भेट घेतली तेव्हा हि त्यांनी लेख म्हटल्यावर त्यांना माझे नाव आठवले आणि खूप मिश्किलपणे  म्हणाले म्हंजे तुम्ही मिस्टर मिलन सप्रे का?
खरेच ग्रेट माणूस.  रोज त्यांना कितीतरी नवीन नवीन लोक भेटत असतील. पण तरीही इतक्या मोठ्या कलाकाराने आपल्या लाख चाहत्यांनपैकी कुणाला  नावाने लक्षात ठेवणे ही किती कौतुकाची गोष्ट. एका सामान्य चाहतीला असे लक्षात ठेवणे म्हणजे कौतुकच . मला मनापासून आभार मानायचे आहेत सुमितजींचे तुमच्यासारख्या मोठ्या कलाकाराने माझे नाव लक्षात ठेवले , आणि मला एका खूप खूप मोठ्या आनंदाची अनुभूती दिली.   

त्यानंतर मी सुमितजींना फेसबुक वर फॉलो करायला सुरवात केली. एक गोष्ट आहे या कलाकारांची कि ते फक्त स्वतःचा नाही तर सगळ्यांचा विचार करतात. हल्ली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची पोस्ट असते. नाटकाच्या आधी साऊंड चेक च्या निम्मिताने ते नाटकातल्या कलाकारांना घेऊन मस्त गाण्याचा कार्यक्रम करतात अगदी २-३ मिनिटाचाच पण ऐकायला आणि बघायला खूप मस्त वाटते. पुलवामा च्या स्फोटात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली द्यायला त्यांनी गायलेलं गाणे ऐकल्यावर अंगावर शहारा आला आणि डोळ्यात पाणी.   त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं की आता पूर्वीसारखे  लेजंट राहिले नाही. पण मी असे म्हणेन कि तुमच्या सारखे तयार ही होत आहेतच कि ज्यांचा आदर्श येणारी पिढी घेईल. 

एक अप्रतिम नट. उत्तम गायक, सूत्रसंचालक. एक सर्वगुणसंपन्न आणि कुटुंबवत्सल असा नट.  त्यांच्या हास्यात एक वेगळीच निरागसता आहे. आपल्या प्रसिद्धी वलयाचा जराही गर्व नसणाऱ्या एखाद्या कलाकाराला तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर एकदा तरी " सुमीत राघवन"  ला नक्की भेटा. यशाच्या शिखरावर  असताना पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे सुमीत सरांकडून शिकण्यासारखे आहे.



Friday, 15 February 2019

आता पुरे झाले.... एक सामान्य नागरिक


परवाच री पिक्चर पाहून आले आतंकवाद्यांनी उरी मध्ये आपल्या जवानांवर केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून आपण केलेले सर्जिकल स्ट्राइक यावर तो पिक्चर आहे,  पिक्चर बघताना अंगावर शहारा आला
ज्यावेळी आतंकवादी आपल्या जवानांवर गोळीबार करत होते तेव्हा असे वाटत होते आपणास बंदूक घ्यावी आणि त्यांना गोळ्या झाडाव्यात.  सर्जिकल स्ट्राइक नंतर आपल्या सगळ्या जवानांना सुखरूप परत आलेले बघून आपोआप टाळ्या वाजवल्या आम्ही. 

पिक्चर बघताना वाटलं जशास तसे केले खूप छान झाले आणि मुळातच सर्जिकल स्ट्राइक मध्ये आपले सगळे जवान सुखरूप परत आले आतंकवाद्यांना कंठस्नान घालून.

पिक्चर बघून आल्यावर जाणवलं उरीचा हल्ला मोठा होता म्हणून त्याचा बदला पटकन घेतला गेला पण असेच सीमेवर रोज एक दोन एक दोन जवान आपले शहीद होत असतात, त्यांच्या सगळ्यांचा ना एकदाच काय तो बदला घ्यायला हवा. सिनेमा  बघून येऊन आज दोनच दिवस झाले आणि आता टीव्हीवर बातमी पाहिली  काश्मिरात एका सुसाईड बॉम्ब  कारने जवानांनीं भरलेल्या बस वर हल्ला केला.  जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जवान शहीद.  ती बातमी ऐकल्यापासून मनात एक वेगळीच खळबळ माजली आहे ज्यांच्यामुळे आपण अगदी निवांत आपल्या घरात झोपतो, आपला देश ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे, थंडी वारा ऊन कशाचीही परवा न करता आपल्या देशासाठी सीमेवर तैनात असतात अशा आपल्या सैनिकांना अशा भ्याड हल्ल्यामध्ये शहीद व्हावे लागते कि दुदैव आहे आपले.   

कधीतरी वाटतं किस सगळ्यांनी एकत्र यावे आणि सरकारकडे मागणी करावी की आपल्या जवानांना द्या  मुक्तपणा , जसे ते आतंकवादी काहीही विचार न करता हल्ले करतात ना, जवानांना द्या की मोकळीक त्यांना घुसून मारण्याची.  आतंकवाद्याला दहशत वाद्याला  फाशी न देता त्याला द्या आपल्या जवानांच्या हवाली आणि असे हाल करून मारू देत त्यांना कि पुन्हा हल्ला करताना त्यांनी विचार करायला हवा हजार वेळा कि भारतीय सैनिकांशी  पंगा घेतल्यावर काय होतं. आपणही त्यांच्या सारखे असे हल्ले करायला पाहिजेत ना जसा आपल्याला दहशतवादाची भीती वाटते ना तशी त्यांना भारतीय जवानांची भीती वाटली पाहिजे,  कदाचित आताही वाटत असेल म्हणून ते युद्धासाठी समोर न येत असे भ्याड हल्ले करतात.

उरी साठी एक सर्जिकल स्ट्राइक केला ना तसे इतके करायला हवेत ना कि हि आतंकवाद्यांची जमातच मुळापासून नष्ट करायला हवी. 

टीव्हीवरच्या  एका मुलाखतीत एकएका  निवृत्त कर्नल यांचे एक वाक्य खूप आवडले "Our soldiers are not trained to die they are trained attack and kill."
 
किती दुर्दैव आहे आपलं कोणीच येतो तिसऱ्या देशातला माणूस येतो आपल्या लोकांना आपली असा जीवानिशी मारतो घरी सुट्टी आनंदात व्यतीत करून करायला जाणाऱ्या माणसांवर हल्ला आणि आपण काहीच करू शकत नाही. देशासाठी प्राण द्यायची तयारी असली तरी युद्धात वीरगती हसत हसत पत्करणाऱ्या आपली सैनिकांना असे मरण नक्कीच आवडणार नाही. 

एक गाणं आहे 'ए मेरे वतन के लोगो जरा आँख मे भरलो पानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी'.  खरंतर आताही वेळ ना डोळ्यात पाणी आणण्याची नाही घरात घुसून मारण्याची त्यांनी ४० मारले ना तुम्ही ४००० मारा अशी मागणी आपण  प्रत्येक नागरिकाने केली पाहिजे.  आपली सहनशीलता म्हणजे आपला भेकडपणा नाही हे त्यांना दाखवून दिलं पाहिजे.  नुसतं  भावपूर्ण श्रद्धांजली इतकच लिहून थांबण्याची वेळ गेलीय आता. 
९/११ च्या हल्ल्यानंतर जसे ओसामा ला त्याच्या घरात घुसून मारले ना तसेच या सगळ्यांना मारले पाहिजे अगदी निवडून निवडून.

कधीं आपल्या सामान्य नागरिकांची हि चीड येते , असे काही झाले कि आपले सगळ्यांचेच राष्ट्रप्रेम उफाळून येते. पण काही जणांचे हे प्रेम इतके तकलादू वाटते ना , साधेच उदाहरण आहे   जेव्हा चित्रपटगृहात  राष्ट्रगीत लागते माणसे उभी तर   राहतात पण शंभरातले चार-पाच लोक असतात जे आपल्या राष्ट्रगीत म्हणतात मोठ्याने. त्या मल्टिप्लेक्स मध्ये  राष्ट्रगीत म्हणायची लाज वाटते ती काय या लोकांना? अशी लोक काय देशप्रेम दाखवणार? त्यांचं ते बघतील अशा प्रवृत्तीने वागतो कधीकधी आपण, पण हा विचार आपले सैनिक नाही करत. आपण इथे जात धर्म करून लढतो तिथे ते सगळ्या जाती धर्माचे फक्त देशासाठी लढतात एकत्र . असं म्हणतात ना की घरात प्रत्येक घरातला एक माणूस देशाच्या पाठवला पाहिजे खरंच आहे

खरं तर असं काही झालं आपण  व्यक्त होतो, लिहितो.  काही जण म्हणतात की आपण नुसतं श्रद्धांजली वाहून गप्प राहतो.  पण कदाचित  आपल्याला माहीत असतं की आपल्या हातात काहीच नाहीये तरी आपण एखाद्याला जाऊन गोळ्या नाही घालू शकत कदाचित तोच राग आपण व्यक्त करतो आपल्या या लिहिण्या बोलण्यातून.


कुणीतरी एक सुंदर वाक्य लिहिले आहे तो हि आज प्रेमाच्या रंगांत रंगला फरक फक्त इतकाच होता कि तो रंग देशप्रेमाचा होता. आणि काय तो विचित्र योगायोग लाल रंग प्रेमाचे प्रतीक पण हाच लाल रंग आमच्या शहीद जवानांच्या रक्ताचा हि होता ज्यांनी सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम निर्माण केले पण तितकीच चीड निर्माण केलीय शत्रू राष्ट्र विषयी.  

एक सामान्य नागरिक म्हणून मी इतकेच म्हणेन कि कदाचित  आम्ही बंदूक घेऊन सीमेवर लढायला नाही जाऊ शकणार पण तुम्ही दिलेले हे तुमच्या रक्ताचे बलिदान व्यर्थ नाही जाऊ देणार.