Tuesday, 9 October 2018

आशिष कुलकर्णी - एक गुणी अभिनेता

टीव्ही वरच्या सगळ्याच मालिका म्हणजे आपल्या जिव्हाळयाचा विषय. त्यात असलेली व्यक्तिरेखा हि आपल्याच घरची कुणीतरी व्यक्ती आहे असेच आपल्याला वाटते. आणि त्यातलीच एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता आपल्याला आवडायला लागतो. मग त्यांची कुठलीही मालिका, सिनेमा  अगदी जाहिरात सुद्धा आपण अगदी आवडीने बघतो.  असेच आज माझ्या एका आवडत्या अभिनेत्या बद्दल मला लिहावेसे वाटतेय. 
अरे हो  हो !!! माहित आहे मला अंकुश चौधरी वर लिहून झालेय. पण असे नाही ना कि दुसऱ्या कुणाचा अभिनय आवडणारच नाही. एक नायक म्हणून अंकुश नेहमीच आवडता आहे पण एक अभिनेता म्हणून जे नाव मला घ्यावेसे वाटतेय ते आहे "आशिष कुलकर्णी".

त्याने आतापर्यंत बरेच काम केले आहे सिनेमा, मालिका आणि नाटकांमध्ये . खरेतर आशिष च्या काही जास्त भूमिका पहिल्या नाहीयेत मी पण ज्या काही पहिल्या आहेत त्या अफलातून आहेत. हॅम्लेट नाटक पाहिल्यानंतर, जास्त उत्सुकतेने मी  त्याच्या मालिका बघायला लागले. त्यामुळे खूप जास्त काही नाही लिहिता येणार पण जे लिहेन ते कमी हि नसेल.

मला वाटत ७-८ वर्षांपूर्वी त्याला " मला सासू हवी" मालिकेमध्ये "विघ्नेश" च्या भूमिकेत पहिले होते पहिल्यांदा, त्या आधी त्याने काम केले हि असेल पण एका घटनेमुळे ती भूमिका प्रकर्षाने लक्षात राहिली. ती भूमिका आधी जो अभिनेता करत होता त्याच ताकदीने आशिष ने हि ती पार पडली. 
मी जेव्हा त्याच्या सोबतच फोटो सोशल मीडिया वर टाकला होता तेव्हा बऱ्याच जणांनी "अगं  , हा क्राइम पॅट्रॉल  मध्ये असतो तोच ना ? असे विचारले. म्हटले हो तोच तो ,जो रुद्रम मालिकेत होता, जो आपला माणूस चित्रपटात आहे, तोच जो कट्टी बट्टी मध्ये आहे आणि आता "आम्ही दोघी मध्ये हि आहे.

जेव्हा रुद्रम मालिका पाहायला सुरवात केली तेव्हा ज्या दिवशी आशिष ची एन्ट्री झाली "हा बघ विघ्नेश" अशी आमची सगळ्यांची रीऍक्शन होती. त्या मालिकेत एका छान , समजूतदार मित्राची भूमिका त्याने पार पडली होती. ती मालिका तर अप्रतिम होतीच पण  त्या मालिकेत सगळ्याच भागांमध्ये तो नव्हता, मग तो कधी दिसतो असे होऊन जायचे.   त्यानंतर त्याला पहिले ते आपला माणूस मध्ये छोटीशी भूमिका  "नितीन" नावाची नायकाचा मित्र , संशयाची सुई काही वेळा याच्याकडे हि वळली आहे त्या चित्रपटात. एक आहे नाना पाटेकरांसारख्या दिग्गज कलाकारापुढे त्याने आपले अस्तिव कुठे झाकोळू दिले नाही.

नंतर कट्टी बट्टी मध्ये प्रतीक महाबळ म्हणून त्याची एन्ट्री झाली. आपली प्रेयसी आपल्याला सोडून गेली म्हणून काहीसा चिडलेला आणि थोडासा आक्रमक झालेला प्रियकर उत्तम रंगवला. सुरवातीला वाटायचे का असा नेगेटिव्ह रोल ? पण बघायला मजा येत होती. मला त्यातले दोन प्रसंग जास्त प्रकर्षाने लक्षात राहिले कारण माहित नाही पण राहिले. एक त्यांच्या मारामारीचा ज्यात आशिष त्या नायकाला (पराग) दारूच्या नशेत म्हणतो कि "अरे तू का दाढी वाढवली आहेस?  मी वाढवायला हवी माझी प्रेयसी सोडून गेलीय मला ". आताही हसू येते मला त्या प्रसंगातील त्याचा तो टोन आठवून . असे वाटत होते कि खरेच दारू पिऊन केलाय कि काय सीन . त्यांनतर पोलीस स्टेशन मध्ये असताना जेव्हा पराग त्याला समजावत असतो त्यावेळी आधी राग, मग हतबलता, डोळ्यात येणारे पाणी सगळेच एकदम,  आपल्याला  कीव यावी इतका इनोसन्ट चेहरा. आधी आपल्याला त्या प्रतीक चा राग येतो आणि मग त्याचा चेहरा बघून आपल्यालाच वाटते किती वाईट झालेय याच्या बाबतीत . मस्तच...

आम्ही दोघी मालिके मध्ये हि तसाच नेगेटिव्ह रोल . भोळेपणाचा आव आणून दुसर्यांना फसवणे. काही वेळा तर त्याने कपटीपणाचा इतका छान भाव आणला होता कि किती जणींनी मनातून म्हटले असेल का असा फसवतो लोकांना. मला तर वाटायचे कि भेटून सांगावे त्याला कि , अरे बाबा तुला इतका सुंदर चेहरा दिलाय ,एखादा रोमँटिक रोल कर. पण खरे तर त्याने वठलेल्या त्या कपटी भूमिकेचा आपल्याला राग येणे हीच खरी पावती ना त्यांच्या साठी.

क्राइम पॅट्रोल चे  मध्ये हि मी त्याला ४-५ वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पहिले. एक जुना भाग पहिला त्याचा त्यात अगदी मळके कपडे , केस बारीक , अगदी गावकरी शोभून दिसत होता. पहिल्याच शॉट मध्ये तो अगदी कुत्सितपणे थुंकताना दाखवला होता. तेव्हा हि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके जिवंत होते, कि  कळत होते  त्याच्या मनात किती राग भरला आहे त्या विशिष्ट व्यक्ती विषयी. प्रत्येक भागात त्याची व्यक्तिरेखा निरनिराळ्या स्वभावाची, ठिकाणाची  होती पण प्रत्येक भूमिका खूपच छान आणि प्रभावी.

आणि आता अगदी आपल्या सगळ्यांचा पाहावेसे वाटणारे अप्रतिम  नाटक "हॅम्लेट". यात सगळेच अप्रतिम आहे. मी पहिल्यांदा पहिले तेव्हाच मला "होरेशीओ" अर्थात "आशिष" चा अभिनय आवडला होता. पण दुसऱ्यांदा जेव्हा ते नाटक खूप जवळून पाहायची संधी मिळाली. अहाहा !!! काय मस्त !!!. त्या नाटकात सगळ्यांचाच अभिनय बेस्ट. पण त्या दिवशी मी काही वेळा फक्त आशिष लाच बघत होते. त्याच्या छोट्या छोट्या हालचाली बघत होते. अर्थात पहिल्या वेळी हि हॅम्लेट ने दिलेली जबाबदारी नीट पार पडतोय का? म्हणून त्या वेळी हि मी त्याला बघितलेच होते. पण या वेळी जास्त जवळून नाटक अनुभवायची संधी मिळाली. त्याचे हावभाव, हॅम्लेट बद्दल असलेली तळमळ , त्याच्या मृत्यूने होणारे दुःख, आणि सगळ्या प्रसंगात आपल्या मित्राच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक संवेदनशील मित्र.  हॅट्स ऑफ ...  खरे तर बरेच लिहावेसे वाटतेय पण शब्दच सापडत नाहीये असेच काहीतरी झालेय.

नाटक संपल्यावर आम्ही जेव्हा कलाकारांना भेटायला गेलो सगळेच मस्त बोलले. आम्ही आशिष ला गराडा घातला होता. माझ्या मैत्रिणीच्या मुलीने केलेली विनंती त्याने शांतपणे ऐकून घेतली. आमच्या सगळ्यांचा फोटो काढावा म्हणून त्याने स्वतःहून त्यांच्या युनिट च्या माणसाला सांगितले. आम्ही निघताना त्याने आवर्जून म्हटलेले " थँक्स फॉर कमिंग " माझ्या चांगलेच लक्षात राहिले आहे. कलाकार म्हणून नाही तर एक माणूस म्हणूनही खूप चांगला वाटला. बोलताना कुठेही असे वाटत नव्हते कि आम्ही पहिल्यांदाच भेटलो त्याला. 

मी आतापर्यंत पाहिलेल्या त्याच्या भूमिकांवरून या कलाकाराबद्दल एक गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे  ती म्हणजे प्रत्येक वेळी ( मी ज्या पाहिल्या त्या) त्याचा लुक वेगवेगळा होता. आणि त्या प्रत्येक भूमिकेत अभिनय ही इतका भारी केला की म्हणतात ना ती व्यक्तीरेखा तो जगला तसेच काहीतरी. मला एकदम हिंदी मधील एक असे नाव आठवले  कि त्यांनी हि आपल्या अभिनयाने त्यांची प्रत्येक भूमिका जिवंत केली.आशिष चा अभिनय हि मला बराच तसाच वाटतो. हि तुलना नाही म्हणता येणार पण ती ताकद नक्कीच त्याच्यात आहे असे माझे प्रामाणिक मत आहे . आता जर कधी त्याला नामांकन  मिळाले ना त्याच्या भूमिकेसाठी तर सगळ्यात जास्त वोट माझेच असतील 🙂

या अभिनेत्याची एक गोष्ट कौतुक करण्यासारखी आहे कि त्याची भूमिका लहान असो किंवा मोठी तो त्याची छाप पडतो त्या भूमिकेत. भूमिका छोटी असली तरी लक्षात राहण्यासारखी असते. त्याची भूमिकांची निवड जास्त योग्य कि त्याने त्या भूमिकेला दिलेला न्याय हे जास्त चांगले हे  ठरवणे त्याने त्याच्याच अभिनय कौशल्यामुळे कठीण करून ठेवले आहे. त्याच्या आताच्या काही भूमिका पाहिल्यावर असे वाटते कि एखादा रोमँटिक अँटी हिरो करायला काहीच हरकत नाही याला .  आता जसा अंकुशच्या आजूबाजूला मुलींचा गराडा पडतो ना फोटो साठी तसाच त्याच्या भोवती हि पडावा असे मनोमन वाटतेय. लवकरच त्याला एका मुख्य भूमिकेत  (नायकाच्या ) बघायची फार इच्छा आहे. याच्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून  खूप खूप खूप शुभेच्छा. अशाच मस्त मस्त भूमिका करत राहा आणि आम्हाला सतत पडद्यावर दिसत राहा.

एका उत्कृष्ट अभिनेत्याला त्याच्या एका चाहतीने दिलेली दाद.






Saturday, 6 October 2018

दीपाली कर्णिक


दीपाली म्हणजे मला पडलेले एक कोडे आहे कधी ती मला खूप जवळची वाटते तर कधी परकी . का माहीत नाही पण असे वाटते कधीतरी.. सॉरी दीपा. कदाचित तिचा कमी बोलण्याच्या स्वभावामुळे असेल.
दीपाली ची आणि माझी ओळख पहिल्यांदा झाली ती शाळेत दहावीत. माझ्या मागच्या  बेंचवर बसायची संदिती सोबत. खूप बडबड करायचो आम्ही. म्हणजे अभ्यास ही करायचो😊. शाळेत मला कळलं होते की तिच्या बाबांनी चोरांना पकडून दिलेय तेव्हापासून खूप उत्सुकता होती त्यांना पहायची.  त्यांना जेव्हा नुसते पाहिले तेव्हा भीती वाटली  होती. उंच ,झुबकेदार मिशा. एकदम पोलीस वाटत होते पण जेव्हा बोलले तेव्हा मात्र भीती एकदम गेली. 
दीपालीला लक्षात ठेवण्याचे अजून एक कारण म्हणजे तिचे चालणे. तिच्या चालण्याची विशिष्ट अशी लकब आहे.तिच्या बोलण्याची हसण्याची ,  इतकंच काय तर तिची केस बांधायची पण एक वेगळी स्टाइल आहे.दीपाली कर्णिक म्हटले कि आपल्याला पटकन तिचा चेहरा समोर यायलाच हवा इतके तिने तिचे ते वेगळेपण जपले आहे. 
मी दहिसर ला राहिला आल्यानंतर एक दोन महिन्यांत दीपाली ही बोरिवली ला राहायला अली. तिच्या वास्तुशांती चे फोटो तिने फेसबुक वर टाकले तेव्हा आम्हाला ही गोष्ट कळली होती. त्यावेळी मला खूप वाईट वाटले होते. संध्याकाळी बऱ्याच वेळा आम्ही एकाच ट्रेन ला असायचो तेव्हा तिने घर बघतोय असे म्हटले  होते पण हे एकदम घेऊन राहायला गेली मला शॉक होता.  माझा असा गैरसमज झाला होता की मी ही गोष्ट कुणाला तरी सांगेन म्हणून तिने मला सांगितले नाही. त्यानंतर जवळजवळ सहा महिने  मी तिच्याशी बोलत नव्हते. मी रागाच्या भरात काहीतरी बोलेन म्हणून तिने माझ्याकडे गणपती ला येणे ही टाळले. २४ सप्टेंबर ला जेव्हा आमचे गेट टू गेडर होते  त्यावेळी ती आल्या आल्या मला येऊन भेटली पण मी तिला म्हटलं आपण नानंतर बोलू मला थोडा वेळ हवाय. खरेच होते कारण मला रडायला येत होते. शेवटी जाताना जेव्हा ती बाय म्हणत जवळ आली तेव्हा मात्र मी खूप रडले. तिला ही वाईट वाटलं होते ती सॉरी म्हणत होती . पण अजूनही मला त्या गोष्टीची कुठेतरी खंत आहे मनात.
२००८ ते २०१० मी आणि दीपा सकाळी एकाच ट्रेन ला असायचो ८.११ आणि आमच्या सोबत कधीतरी सचिन राऊत( हा हा तो बाजूच्या डब्यात असायचा). खूप गप्पा मारायचो. दोघींची स्टेशन  वेगवेगळ्या बाजूला यायची तरी आम्ही एका बाजूला उभ्या राहून गप्पा मारायचो. संध्याकाळी हि आम्ही बऱ्याच वेळा मागच्या पुढच्या ट्रेन ला असायचो. मी आणि मुक्ता त्या विवा मार्केट जवळ गप्पा मारायचो तेव्हा ती हि कधी कधी यायची. त्याच दरम्यान मला संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या " आयुष्यावर  बोलू काही " ची तिकीट मिळाली होती आम्ही दोघी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. पण रात्री उशीर झाला आणि व्दिता राहत नव्हती म्हणून मनीष चा दोनदा फोन हि येऊन गेला म्हणून आम्ही कार्यक्रम संपायच्या आधी निघालो.
तसे शाळेत आम्ही खूप बोललो नाही आणि अशा हि आम्ही खूप जवळच्या अशा मैत्रिणी आहोत असे कुणी म्हणणार नाही. पण मी आणि दीपाली बऱ्याच वेळा , बऱ्याच ठिकाणी एकत्र असायचो. आमची लोणावळा ट्रिप खूप धमाल झाली , त्यावेळी निघायच्या दिवशी खूप  जोरदार पाऊस  पडत होता , त्यावेळी मी आणि दिपाली सतत एकमेकींच्या संपर्कात होतो. जायचे नाही जायचे हे ठरवत होतो. पिकनिक ला तर आम्ही गेलोच इतक्या पावसात. दीपाली आणि मी येताना एकाच गाडीतून आलो होतो. ती जास्त बोलत नाही पण मधेच एखादी गुगली मात्र मस्त टाकते. 
मंदार च्या घरी पहिल्यांदा जाताना हि मी दीपाली आणि रत्ना मितेश च्या गाडीत होतो. तेव्हा मितेश पहिल्यांदा गाडी मुंबईत नेतो आहे हे ऐकल्यावर त्यांच्या रीऍक्शन बघण्यासारखी होती. तेव्हा हि जात येता  खूप धमाल केली होती. 
अशा बऱ्याच गेट टू गेदर ला आम्ही एकत्र असायचो. कारण दोघी विरार पूर्वेला राहायचो. दीपाली ची एक गोष्ट आहे कि तिला जमते तेव्हा आणि तसे ती गेट टू गेदर ला यायचा प्रयत्न करते. उगाच कारण देत बसत नाही.  इतकेच कशाला माझ्या ऑपरेशन च्या वेळी ती मला बघायला हि आली होती. एरवी ती आठवणीने फोन करेलच असे नाही पण कुणी आजारी असेल, काही घटना घडली असेल तर मात्र ती ना चुकता चौकशी करते. 
दीपा माझ्या खूप समजूतदार मैत्रिणीनं पैकी एक आहे. तिचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. खूप समजूतदार पण घेते ती सगळ्या गोष्टी . तिला खूप चिडलेले , रागावलेले मी कधी पहिले नाहीये. (बाकी मनीष ला विचारावे लागेल 😃). पण मी तरी पहिले नाहीये.अजून एक गोष्ट दीपाली ऑफिस मध्ये खूप चांगल्या पदावर आहे. पण त्या गोष्टीचा तिने कधी गर्व केला नाही. कि कधी कुणाला कमी लेखले नाही.   
तिच्या लग्नानंतर दीपाली बद्दल मला जास्त जवळीक वाटू लागली कारण तिचा नवरा मनीष राणे आणि मी एकाच गावचे आमची वाडी ही बाजू बाजूची. त्यामुळं आपुलकी जास्त. तसेच दीपाचे कौतुक ही वाटते तिने सासर माहेर यात व्यवस्थित समन्वय साधला आहे. मी हि ओझरम ची असल्यामुळे मी समजू शकते कसा स्वभाव असतो "राण्यांचा". घर ,ऑफिस , शेजारी , मित्रमैत्रिणी सगळ्याच बाजू तिने खूप छान सांभाळल्या आहेत.  एक चांगली मैत्रीण, बायको ,आई, सून, जाऊ आणि मुलगी सगळ्याच भूमिका ती यशस्वीपणे  निभावतेय. 
अजून एक गोष्ट मला या ब्लॉग च्या निमित्ताने कबूल करावीशी वाटते ती म्हणजे हल्ली हल्ली मला एक गोष्ट जाणवली आहे , दीपा जरी बोलून दाखवत नसली तरी तिचा माझ्यावर खूप जीव आहे. आमच्या शाळेच्या ग्रुप संदर्भात काही गोष्ट असेल तर ती सगळ्यात आधी मला सांगते.
दीपाली तुला एक सांगायचे आहे "  जसा आतापर्यंत आमच्या राण्यांका सांभाळेस तसेच पुढे पण संभाळ गो बाय". 





Friday, 5 October 2018

एक आभासी मैत्री


आपल्या सगळ्यांच्या काही सुप्त इच्छा असतात ज्या आपण बोलून दाखवत नाही. अशाच एका सुप्त इच्छेवर सुचलेली गोष्ट.....


आटपाट नगर होते. त्या नगरात सर्वसामान्य स्त्री होती. नवरा , बायको आणि एक गोंडस मुलगा असे ते तिघांचे छोटेखानी कुटुंब. नवरा कामावर आणि मुलगा शाळेत गेल्यावर सगळी घरची कामे आटपून टीव्ही पाहणे हा तिचा आवडता छंद. मराठी मालिका म्हणजे तिच्या अगदी आवडीच्या. जर वेळेत नाही भाग पाहता आला तर दुसऱ्या दिवशी रिपीट पाहायचे , पण मालिका चुकवायची नाही. एक दिवस अशीच मालिका पाहताना तिला तो दिसला ...अरे हा तर तोच जुन्या मालिकेत काम करणारा. इतकी वर्षे कुठं गायबच झाला होता. मध्ये एक नाटक केले होते वाटते याने. तिला तो त्या भूमिकेत हि आवडला होता .  ही चंदेरी दुनिया जशी सगळ्यांना भूल घालते तशी तिला ही आकर्षण होते. कोणीतरी आपल्या ही जवळचे असावे या दुनियेत , किंवा आपणही कधीतरी याचा छोटासा भाग व्हायला हवे असे नेहमीच वाटायचे तिला.

एक दिवस अचानक एका सोशल साईट वर तिला तो दिसला , त्याला तिने फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवली. दोन दिवसांनी त्याने ती स्वीकारली. या आभासी जगतात तो तिचा मित्र झाला होता. त्याच्यासाठी ती त्याच्या १००० मैत्रीणींपैकी एक होती. त्याच्या गावी ही नसेल कुणीतरी अशी मैत्रीण आहे. तिला खूप भारी वाटतं होते.

त्याला कधी कुठे मालिकेत, नाटकात  पहिले कि ती त्याला मेसेज करत असे, कधीतरी कुठल्या तरी सणाला हि ती त्याला शुभेच्छा देत असे. नवल म्हणजे तो हि कधीतरी त्या मेसेज ला उत्तर देत असे. मग एक दिवस त्याच्या नाटकाच्या प्रयोगाला तिला जायचे होते म्हणून तिने त्याच्या कडे प्रयोगानंतर भेटायची परवानगी मागितली. खूप आढेवेढे घेऊन त्याने हा ये म्हणून परवानगी दिली. ती खूप खुश झाली. एका ऑनलाईन सेलेब्रिटी मित्राला ती ऑफलाईन भेटणार होती. तिच्यासाठी तर तो तिच्या स्वप्नातला राजकुमार होता. नाटकात त्याच्या प्रवेशाला तिच्या काळजाचा ठोका चुकला. काहीतरी वेगळेच वाटत होते तिला. नाटक संपल्यावर लगेच ती त्याला भेटायला पळाली.त्याला भेटायचे म्हणून घाईघाईत तिने त्याच्यासाठी पत्र लिहिले होते. त्याने जेव्हा तिला नावाने ओळखले खूप खुश झाली ती तिच्या अपेक्षेच्या पलीकडचे होते हे सगळे. तो प्रत्यक्षात खूपच छान दिसत होता. तिला त्याच्याकडे नुसते पाहत राहावेसे वाटत होते. तिने निघता निघता त्याला ते पत्र दिले. अरे कशाला हे ? म्हणत त्याने ते घेतले. त्याच्या सोबत दोन फोटो काढून ती निघाली. त्याला समोर बोलू शकली नाही पण तिथून निघाल्यावर तिने त्याला मेसेज केला खूप सुंदर दिसतोस तू.

दुसऱ्या दिवशी त्याचा रिप्लाय आला थँक्स चा . त्या दिवसानंतर हळू हळू त्यांचे बोलणे वाढले. ती रोज त्याला गुड मॉर्निंग , गुड नाईट चा मेसेज करत होती. त्याला जमेल तसा तो हि बोलत होता तिच्याशी. तिला नवल वाटायचे का बरे बोलतो हा आपल्याशी? तिने विचारले पण त्याने कधी सांगितले नाही. तिला खूप उत्सुकता होतीच त्याच्या क्षेत्राविषयी त्यामुळे ती सतत त्याला काही ना काही प्रश्न विचारात असे. कधी तो उत्तर देत असे तर कधी टाळत असे. एक दिवस तिने काहीतरी विचारले आणि तो इतका चिडला कि बोलणे बंद केले. तिला खूप वाईट वाटले या गोष्टीचे. पण तिने त्याला रोज मेसेज करणे काही सोडले नाही. ८-१० दिवसांनी परत त्याने बोलायला सुरवात केली. या दिवसात ती हजारवेळा तरी त्याला सॉरी म्हणाली असेल. पण तरीही उत्तर नाही.

ती त्याच्या प्रत्येक भूमिकेचे कौतुक करत होती. तो कधी टीव्ही वर दिसला की त्याला फोटो काढून पाठवायची. तो ही तिने केलेल्या कौतुकाचा स्वीकार करत होता. अधून मधून विचारायचा बरे होतेय ना काम माझे?  ती आपली मनापासून उत्तर देई. त्याने कसेही काम केले तरी तिला आवडणारच होते.  पण तरीही तिला जर नाही आवडले तर स्पष्ट सांगत होती. कधीतरी तो तिला अशी एखादी गोष्ट सांगायचा की तिला प्रश्न पडत असे आपल्याला का बरे सांगितलं असेल हे?

 एक गोष्ट घडली होती त्याच्याशी बोलायला लागल्यापासून तिचा आत्मविश्वास वाढला होता.ती स्वतःवर प्रेम करायला शिकली होती. नीटनेटकं राहणे, छान दिसणे , स्वतःकडे लक्ष देणे तिला हवेहवेसे वाटू लागले होते. त्याने केलेल्या तिच्या स्तुती ने ती भारावून जायची. तिच्यासाठी तो खूप जवळचा होता. इतका जवळचा कि देवासमोर प्रार्थनेसाठी हात जोडले कि त्याच्यासाठी हि प्रार्थना करत असे. तिच्या जवळच्या लोकांसाठी वाटणारी तगमग तिला त्याचसाठी हि वाटत होती. त्यांच्या या वाढत्या संभाषणामुळे तिला त्याला भेटावेसे वाटत होते . त्याही बाबतीत तो फक्त तिला आश्वासने देऊन टाळत होता. त्याची कारणे खरी खोटी तिला कळत नव्हते. पण तिची इच्छा काही कमी होत नव्हती. शेवटी कंटाळून तिने ती इच्छा मनात दाबून टाकली.  त्याच्या सोईप्रमाणे तो तिच्याशी बोलत होता आणि ती हि आपल्या सगळ्या इच्छा मनात ठेवून स्वतःच्या आनंदासाठी बोलत राहिली. एका सर्वसामान्य गृहिणीला एक सेलेब्रिटी मित्र लाभला होता हेच एक मोठे समाधान होते तिच्यासाठी.

पण एक गोष्ट  तिच्या लक्षात आली होती कि मैत्री किती मनापासून असली तरी दोन्ही बाजू समान असायला हव्यात, नाहीतर ती मैत्री फक्त आभासी मैत्री असते. अशीच असते का हि मैत्री फक्त जवळ असताना जाणवणारी? मनाने तुम्ही कितीही आपले म्हटले तरी जोपर्यंत दोन्ही बाजूने स्वीकारली जात नाही तो पर्यंत एक पुसट रेषा कायम जाणीव करून देते परकेपणाची ( दोघांमध्ये असलेल्या सामाजिक प्रतिष्ठेच्या अंतराची). या सामान्य मैत्रिणीच्या मैत्रीची जाणीव होईल का त्याला ? तिच्यासाठी तो या चंदेरी दुनियेतील   पहिला आणि शेवटचा मित्र होता. त्यांची ऑनलाईन  मैत्री तशीच कायम राहिली पण त्याबरोबरच तिचा एक प्रश्न मात्र कायम अनुत्तरीत राहिला "कधी भेटायचे आपण?"