लेखाचे नाव वाचून हा लेख वाचवा कीं नाही असा प्रश्न नक्की सगळ्यांनाच पडेल. पण एक गोष्ट अशी घडली की इतके दिवस मनात असलेला विषयावर लिहावेसे वाटले.
माझ्या एका मैत्रिणीने फादर्स डे ला तिच्या बाबांविषयी खूप छान लिहून पाठवलं. तीचे ते लिखाण वाचून खूप जणांना असे वाटले असेल की आपण ही लिहायला हवे . पण प्रत्येकाला व्यक्त होता येते असे नाही ना.. मला आवडले ती खूप छान व्यक्त झाली.
खरेच आज आपल्या प्रत्येकालाच असे व्यक्त करण्याची गरज आहे. कुणाला काय वाटेल, कोण आपल्याला हसेल की काय या भीतीने आपण खूप गोष्टी मनातच दाबून ठेवतो. आपल्या भावनांना बांध घालून ठेवतो. त्याचा निचरा कुठेतरी झाला पाहिजे. सगळ्याच गोष्टी नाही व्यक्त करता येत नाहीत पण निदान ज्या गोष्टी न बोलल्यामुळे गैरसमज होऊ शकतात किंवा एखादी गोष्ट बोलल्यावर जर आपल्याला हलके वाटत असेल तर नक्कीच मोकळे व्हावे माणसाने.
आपले आयुष्य म्हणजे काही सिनेमा किंवा मालिका नाही की शेवटी सगळे गैरसमज आपोआप दूर होतील, किंवा कुणीतरी आपल्या मनातले ऐकून आपली बाजू मांडेल. इथे आपले आपल्यालाच निस्तारायचे असते सगळे.
आपली होणारी घुसमट ही आपणच दूर करायची असते. त्यासाठी व्यक्त होणे गरजेचे असते. एखादी नवी नवरी लग्न झाल्यानंतर सासारच्यांचे कडून होणारे हाल , आपल्या आईबाबांना कळलं तर त्यांचे काय होईल म्हणून गप्प सहन करते. कितीतरी वेळा गृहिणीला गृहीत धरले जाते आणि ती ही आपल्या सगळ्या इच्छा मारून आपला संसार सांभाळते. तिची ही घुसमट कुणाला दिसत नाही. कारण इतकेच असते की ती व्यक्त होत नाही. आई वडिलांच्या आग्रहाखातर आपल्याला हवी ती शिक्षणाची शाखा न घेता दुसरेच शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना आयुष्यभर तो राग मनात धुसफूसत राहतो. आई आणि बायकोच्या वादात होणारी नवऱ्याची घुसमट कधी कधी त्याला व्यसनांच्या आहारी नेते. इतकेच कशाला तर एखाद्या गोष्टीवरून आपल्या मित्रा मैत्रिणीममध्ये झालेले वाद, रागाच्या भरात आपण बोलून जातो , दुरावतो अबोला धरतो. त्यानंतर आपल्याला खूप वाटत असते की बोलून सगळे गैरसमज मिटवून टाकावेत पण तरी आपण फक्त आतल्याआत घुसमटत राहतो. समोरची व्यक्ती नाही बोलत किंवा तिला हेच हवे असेल असे चुकीचे ग्रह करून आयुष्यातला सुंदर काळ फुकट घालवतो.
आपण बोललो तर कुणाला काय वाटेल या विचाराने आपण बोलत नाही. पण कदाचित आपल्या त्या वेळीच व्यक्त होण्याने काही गोष्टी टळू ही शकल्या असत्या याची जाणीव होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
मी खूप बडबडी आहे तरी कितीतरी गोष्टी मी मनात दाबून ठेवते पण काही गोष्टी जर आपण वेळीच बोललो नाही किंवा मन मोकळे केले नाही तर आपलं किती नुकसान होऊ शकते ह्याचा वाईट अनुभव मी घेतला आहे. म्हणूनच कदाचित या विषयांवर लिहावेसे वाटले.
हल्ली वॉट्सअप्प, फेसबुक सारख्या सोशल मीडिया वरून आपल्याला काही प्रमाणात व्यक्त होता येते. ही एक चांगली बाब ही म्हणता येईल की अगदी भेटून किंवा फोन वर बोलून जर शक्य नसले तरी या मेसेजेस मधून आपण व्यक्त होऊ शकतो.
मी बोलून मोकळी होते हे काही जणांना पटत नाही म्हणे सोडून द्यायचे. सोडून दिले तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती रुखरुख राहते. असे मनावर ओझे बाळगण्यापेक्षा त्याला वाट करून दिलेली केव्हा ही चांगलीच. माझी एक मैत्रीण म्हणाली की असा काही खास प्रसंग घडला तर मी डायरीत लिहून ठेवते , हा ही एक उत्तम मार्ग आहे की आपल्या भावनांना वाट करून घ्यायचा. पण कधी कधी व्यक्त होणे म्हणजे फक्त राग काढणे असे ही होऊ शकते ना मला दुखावले मला राग आला म्हणून बोललो असे ही होते. व्यक्त होतानाही समोरच्याचा विचार करणे गरजेचे नाही का? आपली जशी घुसमट होतेय तशी त्या व्यक्तीची ही होत असेल हा साधा विचार ही आपण न करणे हे योग्य नाही ना?
प्रेमभंग असो, नोकरी धंद्यात आलेले अपयश असो आपण सगळे मनात दाबून ठेवतो. कोणाला सांगितले तर त्याचा गैरवापर केला किंवा अजून कुणाला सांगितले तर किंवा आपल्याला कुणी समजूनच घेतले नाही तर या विचाराने आपण मौन ठेवतो. पण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते की जीच्यासोबत आपण सगळे काही शेअर करू शकतो. ती व्यक्ती अगदी आपल्यला सगळयाच बाबतीत मदत नाही करू शकत कदाचित पण बोलल्याने दुःख हलके होते म्हणतात म्हणून बोलायचे. आपण आपले सुखाचे क्षण करतो ना सगळ्यांसोबत साजरे मग दुःख कुणाजवळ तरी बोलायला काय हरकत आहे.
मी बोलले तर हे नाते तुटेल की काय या भीतीने आपण बऱ्याच वेळा गप्प राहतो. पण मनात सल ठेऊन , अढी ठेऊन ते नातं रेटण्या पेक्षा . बोलून सगळी किल्मिष दूर करून निखळ नाते जपणे केव्हाही चांगलेच ना. आणि अशी नातीच आयुष्य भर टिकतात.
बोला, लिहा, रडा, ओरडा, चिडा त्यावेळी जे काही वाटेल ते सगळे करा पण व्यक्त व्हा.सगळे दुःख मनात दाबून, नैराश्याने कंटाळून मृत्यू ला जवळ करण्यापेक्षा एखाद्याचा खांदा जवळ करून अश्रूंना वाट करून देणे जास्त सोपं नाही का?