Wednesday, 20 June 2018

अव्यक्त घुसमट

लेखाचे नाव वाचून हा लेख वाचवा कीं नाही असा प्रश्न नक्की सगळ्यांनाच पडेल. पण एक गोष्ट अशी घडली की इतके दिवस मनात असलेला विषयावर लिहावेसे वाटले.
माझ्या एका मैत्रिणीने फादर्स डे ला तिच्या बाबांविषयी खूप छान लिहून पाठवलं. तीचे ते लिखाण वाचून खूप जणांना असे वाटले असेल की आपण ही लिहायला हवे . पण प्रत्येकाला व्यक्त होता येते असे नाही ना.. मला आवडले ती खूप छान व्यक्त झाली.
खरेच आज आपल्या प्रत्येकालाच असे व्यक्त करण्याची गरज आहे. कुणाला काय वाटेल, कोण आपल्याला हसेल की काय या भीतीने आपण खूप गोष्टी मनातच दाबून ठेवतो. आपल्या भावनांना बांध घालून ठेवतो. त्याचा निचरा कुठेतरी झाला पाहिजे.  सगळ्याच गोष्टी नाही व्यक्त करता येत नाहीत पण निदान ज्या गोष्टी न बोलल्यामुळे गैरसमज होऊ शकतात किंवा एखादी गोष्ट बोलल्यावर जर आपल्याला हलके वाटत असेल तर नक्कीच मोकळे व्हावे माणसाने.
आपले आयुष्य म्हणजे काही सिनेमा किंवा मालिका नाही की शेवटी सगळे गैरसमज आपोआप दूर होतील, किंवा कुणीतरी आपल्या  मनातले ऐकून आपली बाजू मांडेल. इथे आपले आपल्यालाच निस्तारायचे असते सगळे.
आपली होणारी घुसमट ही आपणच दूर करायची असते.  त्यासाठी व्यक्त होणे गरजेचे असते. एखादी नवी नवरी लग्न झाल्यानंतर सासारच्यांचे कडून होणारे हाल , आपल्या आईबाबांना कळलं तर त्यांचे काय होईल म्हणून गप्प सहन करते. कितीतरी वेळा गृहिणीला गृहीत धरले जाते आणि ती ही आपल्या सगळ्या इच्छा मारून आपला संसार सांभाळते. तिची ही घुसमट कुणाला दिसत नाही. कारण इतकेच असते की ती व्यक्त होत नाही. आई वडिलांच्या आग्रहाखातर आपल्याला हवी ती शिक्षणाची शाखा न घेता दुसरेच शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना आयुष्यभर तो राग मनात धुसफूसत राहतो. आई आणि बायकोच्या वादात होणारी नवऱ्याची घुसमट कधी कधी त्याला व्यसनांच्या आहारी नेते. इतकेच कशाला तर एखाद्या गोष्टीवरून आपल्या मित्रा मैत्रिणीममध्ये झालेले वाद, रागाच्या भरात आपण बोलून जातो , दुरावतो अबोला धरतो. त्यानंतर आपल्याला खूप वाटत असते की बोलून सगळे गैरसमज मिटवून टाकावेत पण तरी आपण फक्त आतल्याआत घुसमटत राहतो. समोरची व्यक्ती नाही बोलत किंवा तिला हेच हवे असेल असे चुकीचे ग्रह करून आयुष्यातला सुंदर काळ फुकट घालवतो.
आपण बोललो तर कुणाला काय वाटेल या विचाराने आपण बोलत नाही. पण कदाचित आपल्या त्या वेळीच व्यक्त होण्याने काही गोष्टी टळू ही शकल्या असत्या याची जाणीव होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
मी खूप बडबडी आहे तरी कितीतरी गोष्टी मी मनात दाबून ठेवते पण काही गोष्टी जर आपण वेळीच बोललो नाही किंवा मन मोकळे केले नाही तर आपलं किती नुकसान होऊ शकते ह्याचा वाईट अनुभव मी घेतला आहे. म्हणूनच कदाचित या विषयांवर लिहावेसे वाटले.
हल्ली वॉट्सअप्प, फेसबुक सारख्या सोशल मीडिया वरून आपल्याला काही प्रमाणात व्यक्त होता येते. ही एक चांगली बाब ही म्हणता येईल की अगदी भेटून किंवा फोन वर बोलून जर शक्य नसले तरी या मेसेजेस मधून आपण व्यक्त होऊ शकतो.
मी बोलून मोकळी होते हे काही जणांना पटत नाही म्हणे सोडून द्यायचे. सोडून दिले तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी  ती रुखरुख राहते. असे मनावर ओझे बाळगण्यापेक्षा त्याला वाट करून दिलेली केव्हा ही चांगलीच. माझी एक मैत्रीण म्हणाली की असा काही खास प्रसंग घडला तर  मी डायरीत लिहून ठेवते , हा ही एक उत्तम मार्ग आहे की आपल्या भावनांना वाट करून घ्यायचा. पण कधी कधी व्यक्त होणे म्हणजे फक्त राग काढणे असे ही होऊ शकते ना मला दुखावले मला राग आला म्हणून बोललो असे ही होते. व्यक्त होतानाही समोरच्याचा विचार करणे गरजेचे नाही का? आपली जशी घुसमट होतेय तशी त्या व्यक्तीची ही होत असेल हा साधा विचार ही आपण न करणे हे योग्य नाही ना?
प्रेमभंग असो, नोकरी धंद्यात आलेले अपयश असो आपण सगळे मनात दाबून ठेवतो. कोणाला सांगितले तर त्याचा गैरवापर केला किंवा अजून कुणाला सांगितले तर किंवा आपल्याला कुणी समजूनच घेतले नाही तर या विचाराने आपण मौन ठेवतो. पण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असते की जीच्यासोबत आपण सगळे काही शेअर करू शकतो. ती व्यक्ती अगदी आपल्यला सगळयाच बाबतीत मदत नाही करू शकत कदाचित पण बोलल्याने दुःख हलके होते म्हणतात म्हणून बोलायचे. आपण आपले सुखाचे क्षण करतो ना सगळ्यांसोबत साजरे मग दुःख कुणाजवळ तरी बोलायला काय हरकत आहे.
मी बोलले तर हे नाते तुटेल की काय या भीतीने आपण बऱ्याच वेळा गप्प राहतो. पण मनात सल ठेऊन , अढी ठेऊन ते नातं रेटण्या पेक्षा .  बोलून सगळी किल्मिष दूर करून निखळ नाते जपणे केव्हाही चांगलेच ना. आणि अशी नातीच आयुष्य भर टिकतात.
बोला, लिहा, रडा, ओरडा, चिडा त्यावेळी जे काही वाटेल ते सगळे करा पण व्यक्त व्हा.सगळे दुःख मनात दाबून, नैराश्याने कंटाळून मृत्यू ला जवळ करण्यापेक्षा एखाद्याचा खांदा जवळ करून अश्रूंना वाट करून देणे जास्त सोपं नाही का?

Friday, 15 June 2018

प्रीती शेणॉय


प्रिती म्हणजे नाकासमोर चालणारी सरळ साधी आणि नाकासमोर चालणारी मुलगी. असे एका वाक्यात तिचे वर्णन करता येईल.  तिच्यासोबत माझ्या भरपूर आठवणी आहेत. खरे तर विरार मधली ती माझी पहिली मैत्रीण. शाळेत जाता येताना सतत आम्ही एकत्र असायचो. आम्ही क्लास ला ही एकाच होतो आणि कॉलेजलाही. जसा संदिती चा माझ्यावर विश्वास आहे तसा तिचा ही आहे नक्कीच म्हणून तर कॉलेज ला जाईन तर मुंबईत आणि ते ही मिलन असेल त्या यावर ती ठाम राहिली.
आम्ही दोघी जवळ राहायचो त्यामुळे आम्ही शाळेत एकत्र.  दहावीत वर्गच सेम आल्यामुळं तर वर्गापर्यंत सोबत. प्रीती चे अक्षर म्हणजे मोत्याचा दाणा. प्रिती खूप मेहनती मुलगी. मला तिची फार मजा  वाटायची परीक्षेचे  इतके टेन्शन घ्यायची ना ती की बापरे , मला वाटायचं आपण इतके निष्काळजी आहोत की काय ? पण नंतर हळू हळू सवय झाली तिच्या स्वभावाची. तशी इतरांना अबोल वाटणारी प्रिती माझ्या सोबत फार बोलते.
आम्ही कॉलेज ला होतो तेव्हाची गोष्ट तिचे ऍडमिशन थोडे लेट झाले त्यामुळे तिचा कॉलेज चा पहिला दिवस होता तेव्हा आम्ही रुळलो होतो कॉलेजमध्ये. अगदी गेटवर मुले असली तरी ही मला पुढे करायची. आणि मग ती बाजूला झाली की ती आत यायची. इतकी लाजाळू. कॉलेजमध्ये मी आणि सारिका मला वाटते आम्ही दोघीच मैत्रिणी होतो तिला. सारिका आणि तिचा एक ड्रेस अगदी सेम होता तिचा काळा आणि सरीकचा जांभळा. दोघी एकाच दिवशी तो घालून आल्या होत्या आम्ही किती हसलो होतो बापरे. तसे पाहायला गेले तर आम्ही दोघी तशा अंधश्रद्धाळू होतो तेव्हा. म्हणजे आमचा एक एक ड्रेस होता तो unlucky आम्हाला. कुठे जाताना मांजर आडवे गेले की थांबायचो. एक साळुंखी दिसली की एकनेकींना बघू नको म्हणून सांगायचो. मजा होती सगळी.
ट्रेन मध्ये तर वेगळीच गंमत. पाच वर्षे आमची जायची आणि यायची अशा दर वर्षी दोन ट्रेन निश्चित असायच्या. आम्ही अशा होती ती ना की ट्रेन रिकामी असली की दारात हवा खायला उभे राहायचे आणि भरलेली असली की आम्हाला सीट हवी असयाची. ११वी-१२वी संध्याकाळी कॉलेज सुटायचे एकदा का कॉलेज सुटले की आम्ही चक्क धावतच अंधेरी स्टेशन गाठायचो. नेहमीची ट्रेन मिळावी म्हणून धावपळ. आम्हाला सगळे राजधानी विरार लोकल असे चिडवायचे. ट्रेन मध्ये आम्हाला  एक सीट ही पुरायची मी तिच्या मांडीवर बसून यायचे. तिची उंची कमी असल्यामुळे गर्दीत तिला नेहमी त्रास व्हायचा.
ट्रेन मधली अजून एक गंमत अशी की परीक्षेच्या वेळी प्रीती ना जो पेपर असेल त्याच्या नोट्स वाचायला घ्यायची. आणि ट्रेन मध्ये अंधेरी येईपर्यंत तिचे वाचन सुरू असायचे. बाकी जणी मला विचारायच्या अग तुम्ही एकाच वर्गात ना मग तू का अभ्यास करत नाही. मग मी म्हणायचे की ती आम्हा दोघींचा अभयास करतेय. प्रीती ला जरा मोठ्याने वाचायची  सवय होती त्यामुळे ती जे वाचायची ते मला ही ऐकू यायचे.
जाताना आम्ही नेहमी एकत्र पण येताना ती आधी  यायची मी नंतर माझा ग्रुप होता म्हणून जरा टाईम पास करून मग घरी. एकदा दुपारी ती कन्सेशन च्या लाइन मध्ये उभी होती आणि मी निघाले. मी घरी आले आणि जेवायला बसणार इतक्यात प्रीती चा भाऊ शक्ती घरी आला आणि म्हणाला आका कुठेय अजून घरी आली नाही मी म्हटलं अरे ती कन्सेशन घेऊन निघाली असेल. हातातला घास तसाच ठेऊन मी त्याच्या सोबत निघाले. तिचे दोन चुलत भाऊ आले होते घरी तिची आई तर पार घाबरून गेली होती. मलाही टेन्शन आले करण प्रीती अशी न सांगता कुठे जाणारी मुलगी नाही. तिच्या एका भावाने रेल्वेच्या इथे जाऊन पण चौकशी केली की काही अकॅसिडेंट ची केस आलीय का? नशिबाने तसे काही नव्हते. वाट पाहून आम्ही हैराण शेवटी ५.३० ला या बाई आल्या. कन्सेशन फॉर्म संपले होते म्हणून ती लायब्ररी मध्ये जाऊन बसली होती आणि फॉर्म आल्यावर घेऊन घरी आली. सगळ्यांच्या जीवात जीव आला. ती पहिली आणि शेवटची वेळ की तिने असे आम्हाला घाबरवून सोडले नंतर नशिबाने जेव्हा जेव्हा काही गोंधळ झाले आम्ही एकत्रच होतो.
आमच्या त्या ७-८ वर्षाच्या सोबती मध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी एकत्र केल्या. मग ते टायपिंग क्लास ला जाणे असो किंवा परीक्षेचे सेंटर असो. अगदी एम्प्लॉयमेंट चे कार्ड काढण्यापासून , पोस्टात भरती आहे म्हणून तिथे जाऊन अर्ज करणे असो. पण हे सगळे करताना आम्ही  आमचा व्यवहार मात्र क्लिअर ठेवला. अगदी कॉलेज च्या कन्सेशन फॉर्म चे २५ पैसे ही आम्ही एकमेकींना देत असू.
प्रीती च्या घरी अभ्यासाला जाणे म्हणजे मजा होती. तिला एखादी गोष्ट ( अभ्यासातील अडचण) समजावण्यात अर्धा वेळ जात असे मग थोडा अभ्यास आणि मग तिच्या आईने केलेल्या पदार्थांवर ताव मारणे. माझा रविवारी सकाळचा नाश्ता त्यांच्याच घरी. प्रीती ला मासे खूप आवडतं मग तिची आई खास तिच्यासाठी बनवत असे.
प्रितीने कॉलेज ला कधी जास्त मजा मस्ती केलेली आठवतच नाही. कॉलेज ते घर आणि घर ते कॉलेज बस इतकेच. कॉलेज मधले काही ठराविक डेज ला ती येत असे. पण कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला मात्र ती आवर्जून येत असे. ते झाले की खाऊ गल्ली , गेट वे ऑफ इंडिया अशी आमची भटकंती करून मग विरार हे दर वर्षीचे आमचे रुटीन होते.
आमच्या कॉलेज च्या रस्त्यावर बस स्टॉप होता. तिथे उभे राहणारया माणसांना बघून प्रीती नेहमी म्हणत असे की आपण कधी जाणार ग असे बस ने कामावर. देवाने तिचे म्हणणे लवकरच ऐकले पण ज्यावेळी खरेच बस ने जायची वेळ आली तेव्हा मात्र तिला ब्रह्माड आठवले. सगळ्याला मिलन सोबत लागणारी प्रीती जेव्हा एकटी अगदी पार उत्तर मुंबई मध्ये जॉब ला लागली तेव्हा मला खूप छान वाटले.
आम्ही इतकी वर्षे एकत्र होतो पण आमचा दोघींचा एकत्र असा एकही फोटो नाही. कधी कधी ज्यांच्या सोबत आपले खूप फोटो असतात त्यांच्या पेक्षा ज्यांच्या सोबत आपल्याला फोटो काढायची आठवण राहत नाही असे लोक आपल्या जास्त जवळचे असतात.
इतक्या वर्ष  आम्ही एकत्र होतो पण कधी अमच्यात वाद झाले नाहीत . रुसवे फुगवे गैरसमज याला कधी जागा होऊच दिली नाही. पण अभ्यासावरून मात्र प्रिती नेहमी बोलायची मला. तिचे आणि तिच्या आईचे ह्याबाबतीत एक मत होते. माझ्याकडे हुशारी होती पण मेहनत कमी , आणि प्रीती कडे मेहनत खूप होती. कॉलेज सोडून आज २१ वर्ष झाली या २१ वर्षात आम्ही जेमतेम १० ते १२ वेळा भेटलो आणि अगदी वर्षातून एकदा ते दोनदा बोलतो फोन वर. प्रीती त्याही वेळी मनात असून काही गोष्टी एन्जॉय करत नसे आणि आजही नाही करत. घर संसार हेच तिचे सर्वस्व आहे . भले ती मी १० वेळा बोलवून ही कुठेही गेट टू गेदर ला येत नाही. पण ते फक्त तिच्या जबाबदारी मूळे. मला गर्व आहे की देवाने मला एक सच्ची, मनाने अगदी साफ आणि एक उत्कृष्ट गृहिणी असलेली मैत्रीण दिली.


Monday, 11 June 2018

रिप्लाय


खरेतर मला या लेखाचे नाव उत्तर असे ठेवायचे होते पण उत्तर म्हटले की  प्रश्न आला आणि प्रश्न म्हटलं की सगळयांनाच भीती वाटते . म्हणून म्हटले आपल्या  सगळ्यांना जवळचे किंवा परिचित असलेले नाव देऊ म्हणजे आवडीने लेख वाचाल 😉.
एक असा शब्द जो आपल्यासगळयांनाच हवा हवासा आहे . आता तर हा शब्द  रोजच्या वापरातला शब्द झालाय. पूर्वीच्या उत्तर या शब्दाची जागा ' रिप्लाय' ने घेतली असे म्हणू शकतो आपण. 
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात दोन रिप्लाय जास्त महत्वाचे असतात एक म्हणजे नोकरी साठी येणारा आणि दुसरा लग्नाच्या वेळेचा.  
आताच्या काळात या वाढत्या सोशल मीडिया मुळे या रिप्लाय ला अंमळ जास्तच महत्व प्राप्त झाले आहे. आपण एखादा मेसेज किंवा पोस्ट टाकली की त्यावर कुणाकुणाचा आणि काय रिप्लाय आला आहे हे पहायची आपल्याला खूप उत्सुकता असते.
सगळ्यात कठीण असते या रिप्लाय ची वाट पाहणे. आपण एखाद्याला मेसेज केला त्या व्यक्तीने तो मेसेज वाचल्यावरही त्याचा रिप्लाय न येणे आणि आपण त्याची वाट पाहत राहणे या सारखे दुसरे कंटाळवाणे काम नाही.
खूप जणांची अशी अपेक्षा असते कि त्यांचा मेसेज आला की त्याला ताबडतोब रिप्लाय करावा. पण हेच जेव्हा कोणी त्यांच्या कडून अपेक्षा  ठेवते तेव्हा ते मात्र बिझी असतात. आमच्या शाळेच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर हा अनुभव आम्ही खूप वेळा घेतो. पिकनिक असो किंवा काही इतर आम्ही अगदी रोज मेसेज टाकतो पण काही ठराविक लोक सोडले तर कुणालाही वेळ नसतो रिप्लाय करायला.तर काही जण असेही असतात की मेसेज वाचतात पण रिप्लाय देणे सोईस्कर पणे टाळतात. अणि अशा लोकांना विचारले की काय झाले रिप्लाय नाही दिला तर यांची कारणे  ही ठरलेली असतात अरे पहिलाच नाही किंवा उशिरा पहिला , किंवा मग रिप्लाय करू च्या नादात राहून गेला. आता यावर काय बोलणार ना आपण😕
पूर्वी बरे होते एकदा पत्र पाठवले की ते पोचून परत तिथून त्याचे उत्तर येईपर्यंत वाट पहायची. त्या वाट पाहण्यात ही एक वेगळीच मजा होती. कोणी गेले किंवा वाईट बातमी असली की तार  करायची. तार आली की घरातले सगळेच घाबरायचे.  हल्ली मात्र जरा काही झाले की मेसेजेस टाकले जातात. आणि  त्यावर पटापट सगळ्यांचे रिप्लाय ही येतात.
कुणी गेल्याच्या बातमीवर आपण RIP रिप्लाय देतो, साधे भावपूर्ण श्रद्धांजली इतकेही आपण लिहू शकत नाही. वाढदिवसाला HBD रिप्लाय करतो.  ओके ला फक्त 'K' , थँक्स ला फक्त 'ty'  असे लिहिणाऱ्यांचा मला राग येतो. काय इतके जड असते या लोकांना दोन शब्द जास्तीचे लिहायला. कुणीतरी आपल्याला केलेल्या अभिनंदनाचा हा असा रिप्लाय करावा. सगळ्यात जास्त राग येतो ते *hmm* असा जेव्हा समोरून रिप्लाय  येतो. आपण काहीतरी पोटतिडकीने लिहीत असतो त्यावर नुसते hmm hmm. फोनवर बोलताना ही बऱ्याच वेळा असेच असते आपण बोलत राहतो आणि समोर्चाई व्यक्ती हूं की चू करत नाही. नक्की फोन सुरू आहे का ठेवला हेच कळत नाही.  तर कधी कधी एखादी व्यक्ती इतके बोलते ,मेसेज करते की त्याना काय रिप्लाय द्यावा हा मोठा यक्षप्रश्न असतो.
मला तर या रिप्लाय मधल्या ईमोजी प्रकारचे काही कळतच  नाही. नक्की कुठला ईमोजी कशाला पाठवायचा हेच कळत  नाही.  एकदा गंमत झाली माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलाचा कराटे चा एक व्हिडिओ टाकला होता मी त्याला डोळे मोठे वाली म्हणजे आश्चर्य वाली ईमोजी टाकली. तिचा रिप्लाय आला का ग लाल केला चेहरा?? मग मी तिला सांगितलं की मी आश्चर्य वाली आहे म्हणून टाकली आणि तिला वाटले ती रागाची आहे. तिने आणि मी दोघींनी कबुल केले की नक्की काय आहे माहीत नाही. आणि आम्ही दोघी स्वतःच्या अज्ञानावर मनसोक्तपणे हसलो( अर्थात ते ही ईमोजी मध्ये). 
पण काही वेळा या रिप्लाय तितकाच रोमँटिक असतो जेव्हा प्रियकर किंवा प्रेयसीने लिहिलेल्या Love you ला me too असा रिप्लाय येतो. किंवा एखाद्या छानश्या फोटो ला kiss चे ईमोजी येतात. दिवसभराच्या त्यांच्या गप्पा झाल्यावर येणार सी यू आणि टेक केअर चा रिप्लाय. खूप वाद झाल्यानंतर येणारा सॉरी चा मेसेज.
खरेतर आपण या व्हर्चुअल जगात इतके समरस झालोय ना की कधी कधी नुसत्या येणाऱ्या ईमोजी आणि हं च्या रिप्लाय वर आपण  समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि हे असे येणारे कोरडे रिप्लाय त्यावरच आपण समाधान मानायला लागलो आहे. कसलाही अतिरेक वाईटच.

आधी पत्राला उत्तर देणे होते, मेल ला रिव्हर्ट करणे होते, लग्नाला होकार नकार कळविणे होते, उत्तराला प्रतिउत्तर होते, खळखळून हसणे होते, भरभरून रडणे होते, रागावणे होते, रुसणं होते, कौतुकाने कुरवाळणे होते, पाठीवर थाप देणे होते, भेटणे होते बोलणे होते बऱ्याच गोष्टी होत्या ज्यात जिवंतपणा होता , आता मात्र त्या सगळ्याची जागा या *रिप्लाय* ने आणि मोबाईल मधल्या हसऱ्या रडक्या निर्जिव इमोजीनी घेतली. या व्हर्चुअल जगातून बाहेर येऊन खरी *उत्तरे शोधुया.

आणि हो माझ्या या ब्लॉग वर नक्की रिप्लाय करा हा😉