Friday, 18 May 2018

कंटाळा

काय झालंय हल्ली कळत नाही कुठल्या कामात उत्साह वाटत नाही. काही करावंसं वाटत नाही. नुसते आरामात बसून राहवेसे वाटत. पुस्तक वाचायला घेतले की १०-१२ पाने वाचून झाली कि कंटळा येतो. मनात विचार खूप असतात पण लिहायला घेतले की एक वाक्य ही पूर्णसुचत नाही. सगळीकडे मन ब्लॉक झाल्यासारकखे झालेय. नको नको ते  विचार येतात मनात. कधी कधी स्वयंपाक करायचा ही  कंटाळा  येतो. पॉसिटीव्ह  असे काही वाटतच नाहीये. असे वाटते सगळे सोडून कुठंतरी लांब निघून जावे. सगळ्यांपासून लांब एकांतात कुठेतरी.  पण आपण सामान्य माणसे असे नाही करू शकत ना!! आपले संसार आपल्या जबाबदाऱ्या असे अचानक सोडून नाही जाता येत ना. शी बाई खूप कंटाळा आलाय म्हणत एक एक दिवस ढकलायचा.
प्रत्येकाच्याच आयुष्यात असे क्षण येत असतीलच ना? म्हणजे आपल्या सामान्य माणसांना असा कंटाळा वारंवार येतो. मला आठवतंय मी लहान असताना अशी वाक्य जास्त कानावर पडत नव्हती. म्हणजे फार क्वचितच. हल्ली मात्र रोज दिवसातून एकदोन जणांकडून तरी ऐकायला  येतेच हे वाक्य" अरे यार!! जाम कंटाळा आलाय!!
रोज ऑफिस ला जाणारी  व्यक्ती असो, ट्रेन ने प्रवास करणारी व्यक्ती असो , शाळा कॉलेजमध्ये जाणारी मुले असोत किंवा गृहिणी.
माझी एक मैत्रीण आहे तिला विचारले ना की काय ग काय  करते आहेस तर तिचे उत्तर ठरलेले असते काही नाही ग नेहमीचे काम . कंटाळा आलाय रोज उठा ऑफिस ला या घरी जाऊन परत सगळी कामे करा. रोज तीच कामे करून एक प्रकारचा एकसुरी पण येतो ना.   असेच आपल्यातल्या  बऱ्याच जणांचे होत असते.
अगदी आपण कुठेतरी मस्त सुट्टी घेऊन फिरून आलो तरीही कधीतरी तो कंटाळा जात नाही. म्हणजे ते सुट्टीचे दिवस आपण मजेत घालवतो पण परत एकदा रुटीन ला सुरवात केली की पाहिले पाढे पंचावन्न.
ठीक आहे आपण नोकरदार माणसे कधीतरी कंटाळा आला तर ऑफिस ला सुट्टी घेऊ शकतो किंवा अगदी जेवणाचा कंटाळा आला तर खिचडी टाकू शकतो किंवा हॉटेल मधून मागवू शकतो.  पण मला कधी कधी प्रश्न पडतो समजा एखाद्या नामवंत कलाकाराला असे अचानक वाटले की आज जाम कंटाळा आलाय नाही जायचे शूटिंग ला मग ते लोक काय करत असतील?? म्हणजे त्यांच्या मूड साठी अख्ख शूटिंग रद्द, की त्यांच्याशिवाय बाकीच्यांचे पूर्ण करत असतील? . समजा एखादा क्रिकेटपटू आहे आणि ऐन मॅचच्या वेळी त्याला असे वाटले की आज मूडच नाही खेळायचा तर ??  पहिल्या बॉल ला विकेट टाकून येत असेल का? किंवा गोलंदाजला वाटले च्यायला खूप धुतला अपल्यायला आता गोलंदाजी नाही करायची.. मग तो आपण लहानपणी जा मला नाही खेळायचे म्हणून हातपाय आपटत निघून जायचो तसा निघून जात असेल काय?? की कंटाळा आला म्हणून मुद्दाम वाईट गोलंदाजी करत असेल परत नको द्यायला म्हणून??  किंवा एखाद्या डॉक्टर ला जर ऐन ऑपरेशन च्या दिवशी असे वाटले आज मूड नाही मग?? त्या पेशंट चे काय?? मला पडलेल्या गहन प्रश्नांपैकी हे काही प्रश्न. अजून आहेत पण वाचताना तुम्ही कंटाळून जाल म्हणून एक दोनच सांगितले.  कदाचित  असे प्रश्न सगळयांनाच पडत असतील. .
आताच्या काळात मन रमवायला बऱ्याच गोष्टी आहेत. अगदी साधे व्हाट्सअप फेसबुक घेऊन बसलो तरी तास दोन तास असे निघून जातात. पण त्याच्या अति वापराने ही कंटाळा येतो. एखादा नवीन ग्रुप केला की त्यावर पाहिले काही दिवस खूप बडबड होते , आणि काही दिवसानी फक्त पाठवलेले मेसेज पुढे पाठवणे इतकेच. कधी कधी तर त्या ग्रुप ला कंटाळून लोक ग्रुप सोडूनच देतात.
हल्ली तर शाळा कॉलेज मधली मुले तर सर्रास म्हणत असतात "क्या बोर हो राहा है यार, कुछ मजा ही नही" .  सतत मोबाईल वर व्यस्त असणाऱ्या , मित्र मैत्रिणींसोबत प्रत्येक वीकएंड ला मजा करणाऱ्या या मुलाना कसला कंटाळा येतो तेच कळत नाही?  आम्हाला तर या वयात असताना शाळा कॉलेज अभ्यास आणि खेळणे यातून कंटाळा करायला वेळच मिळायचा नाही.पण हल्लीच्या मुलांना सगळे असून का कंटाळा येतो ही खरंच एक संशोधनाची बाब आहे.
हा कंटाळा जोपर्यंत आपल्या मूड शी निगडित असतो ना तो पर्यंत सगळे ठीक असते. कधी न कधी आपण त्या मूड मधून बाहेर येतो. पण हाच कंटाळा जेव्हा आपल्या आयुष्याशी जोडला जातो तेव्हा मात्र त्याचे रूप काही वेगळे असते. प्रेयसी किंवा प्रियकराने फसवले म्हणून आयुष्याला कंटाळून जीव देणारे ही लोक आहेत.  कर्ज झाले ते फेडता येत नाही म्हणून आयुष्य संपवणारे लोक ही आहेत. एखाद्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या आणि आजाराला कंटाळून लोकांनी आत्महत्या केलेल्या बातम्या ही आपण  ऐकतो वाचतो. आताच एक रागंडया पोलीस अधिकाऱ्याने अशीच आत्महत्या केली.  का बरं असे होत असेल?? शारीरिक व्याधीचे कारण असो वा कुणी सोडून जाण्याचे, कुणी आयुष्याला कसे कंटाळून जाऊ शकते?  ते ही इतके टोकाचे की ते संपविण्याची पाळी यावी.
आयुष्य खूप सुंदर आहे त्यापेक्षा ते खूप अनमोल आहे. असे कंटाळून ते संपवणे पूर्ण चुकीचे नाही का? कंटाळा आला कुणाशी तरी बोला. आपल्या आवडी निवडी जपा. मस्त गाणी ऐका , एकटेच स्वतःशी बोला. खूप काही गोष्टी असतात. पण आपण एकच गोष्ट धरून बसतो आणि कंटाळून जातो. कदाचित ह्या व्हर्च्युअल जगात माणसे माणसांना दुरावली आहेत म्हणून हे जास्त घडत आहे. कंटाळा तर प्रत्येकाला कधी ना कधी येतोच पण तो घालवायचा प्रयत्न आपला आपल्यालाच करायचा असतो. सतत काहीतरी नवीन करत रहा. एक करून कंटाळत दुसरी करा. तुमचा मूड आपोआप ठीक होईल.
चला खूप दिवसांनी इतके सगळे लिहून आता मला कंटाळा आला😉
आणि जास्त लिहीलं तर तुम्ही कंटाळा कराल वाचायला.....मला माहित आहे तुम्ही नाही कंटाळणार , फक्त जराशी गम्मत कंटाळा घालवायला😊😊



4 comments:

  1. kharach mast na kantalta vachle alela kantala nighun gela ...feeling nice..baryach divsani refreshingg lekh vachun maja aali 😉

    ReplyDelete
  2. EkdAm javalcha shabda var kelel varnan khup cHan ahe.

    ReplyDelete
  3. म्हणून च प्रत्येकाला कसला कसलातरी छंद पाहिजेच. तरच तो माणूस आयुश्यात कुठल्याही वयात कंटाळा न येता वेळ आनंदात घालवू शकतो.अस माझ मत आहे.पण विषय छान निवडला म्हणून कौतुक.

    ReplyDelete
  4. khupch mast ha milan tai .... kantala ya word che kay kay hote te mast sagitale ahe..........

    ReplyDelete