ही एक सत्य घटना आहे. त्या व्यक्तीचे नाव न लिहिता माझ्या शब्दात मी ही मांडत आहे.
एक वयस्कर जोडपे. मुलबाळ काही नाही. बाईंनी नेमाने आपले घर सांभाळले. आणि नवरा किती तरी वर्षे भिक्षुकी चे ( पौरोहित्य) काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. वयपरत्वे दोघेही थकले होते. काकांना तितके काम होत नव्हते. पण आधी साठवून ठेवलेल्या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. तसेच जवळ असलेली भावंडे ही थोडी थोडी मदत करत होते.
काकांचा एक रिक्षावाला ठरलेला होता. काकांना कुठेही पूजेला जायचे असेल, काही सामान आणायचे असेल तर तो रिक्षावाला सतत त्यांच्या सोबत असायचा. उतरत्या वयामुळे काका काकू दोघांमध्ये ही चिडचिडेपणा आला होता. आणि आता दोघांनाही बाहेर जाणे झेपत नव्हते त्यामुळे त्यांच्या बाजारहाटाची जबाबदारी ही त्या रिक्षावल्यावर आली होती. तो ही नेटानं सगळी कामे करत होता.
काकांचे घर तळमजल्यावर वरच होते आणि घराच्या गॅलरी ला ही एक दरवाजा होता त्यामुळे त्यांना बाहेर पडताना जिन्यापर्यंत जाण्याची गरज पडत नव्हती. काकांना स्थूलपणामुळे जास्त चालता येत नसल्याने ते त्या मागच्या दाराने बाहेर येऊन एक दोन फेऱ्या मारत.
असेच एक दिवसभराची कामे आटपून दोघे काका काकू झोपायला गेले. काका नेहमी त्या मागच्या दाराच्या जवळच्या बेड वर झोपत. सकाळी नेहमी प्रमाणे काकू उठल्या बघतात तर काका जागेवर नव्हते. आधी त्यांनी घरात शोधलं. बाथरूम टॉयलेट सगळे बघितले पण काका नव्हते. मग झेपत नसतानाही त्या घराबाहेर पडल्या आजूबाजूला पाहिले पण काका कुठेच नव्हते. त्या घाबरल्या काका कुठे गेले? नक्की काय झाले असेल? हजार प्रश्न. रिक्षा शिवाय काका कुठे जात नसत, मग नक्की गेले कुठे? त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन केले . सगळीकडे काकांची शोधाशोध सुरू झाली. आजूबाजूच्या सोसायटी मध्ये, नातेवाईक , मित्र मंडळी सगळ्या ठिकाणी फोन करून विचारून झाले . पण काकांचा कुठेच पत्ता नाही . सीसीटीव्हीत मध्ये पाहून झाले पण फक्त गेटपर्यंत जाताना दिसले. पुढे काय ? कुठे गेले? आता मात्र सगळेच घाबरले. शेवटी काकांचा फोटो घेऊन पोलीस ठाणे गाठले. तिथे हरवले आहे मध्ये काकांचे नाव आणि फोटो दिला. आधी कुणी तसेच कुठे सापडले आहे का पाहिले , बाकी शक्यता ही पडताळून पहिल्या. पण तशी काही नोंद नव्हती. पोलिसांनी नियमाप्रमाणे २४ तासांनी तक्रार नोंदणी करू असे सांगितले. काका मिळतील या एकमेव आशेवर हतबल होऊन सगळे घरी निघाले. हे सगळं करताना काकांचा नेहमीचा रिक्षावाला ही सोबत होता.
दुपार टळून गेली, संध्याकाळ होत आली. रडून रडून काकी अर्ध्या झाल्या. आपल्या परीने शोध घेणे आणि वाट पाहणे इतकेच हातात. सगळे हताश होऊन बसले होते. इतक्यात काकांच्या भावाचा फोन वाजला. समोरून आवाज आला मी आरे कॉलनी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. तुमचे कोणी हरवले आहे का? त्यांनी नाव सांगितले पण नाव चुकीचे होते पण आडनाव मात्र त्यांनी बरोबर घेतले. काकांच्या भावाने सांगितले हो माझा भाऊ हरवला आहे. पण नाव हे नाही. मग पोलिसाने फोन त्या सापडलेल्या माणसाकडे दिला. आवाजावरून काकांच्या भावाने त्यांना लगेच ओळखलं. त्यांनी पोलिसां ना सांगितले की ते माझे भाऊ आहेत मी त्यांना घ्यायला येतो. काकांचे भाऊ काकांच्या रिक्षवाल्याला घेऊन निघाले. संध्याकाळची वेळ ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे त्यांना पोचायला उशीर होत होता. त्यात त्या पोलिसांचा सारखा फोन येत होता . कधी येणार न्यायला? नक्की येताय ना? त्यांचे ही बरोबर होते. असे कितीतरी लोक असतील ज्यांना कळवूनही त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला येत नाही. शेवटी सगळे पोचले पोलीस स्टेशनमध्ये. काका समोर बसले होते. कुठेतरी शून्यात नजर होती. सगळ्या फॉर्मलिटीएस झाल्यावर काकांना घेऊन निघाले.
जेव्हा ते काकांना घ्यायला गेले तेव्हा त्या पोलिसाने त्यांना साधारण काय घडले ते सांगितले. १००% असेच नसेलही. पण काकांनी जितके सांगितले होते त्यावरून त्यांनी अंदाज बांधला. पहाटे काका उठले. गेटबाहेर येऊन त्यांनी एक रिक्षा थांबवली. रिक्षवाल्याला गोरेगाव ला न्यायला सांगितलं. गोरेगाव ला काकांची एक बहीण राहत होती . रिक्षावाल्याने गोरेगाव आल्यावर काकांना विचारले नक्की कुठे जायचे आहे. पण त्यांना नीट सांगता येईना. आणि काकांकडे पैसे ही नव्हते . त्या रिक्षवाल्याने काकांना आरेच्या जंगलात सोडले जिथे आसपास कोणी भटकण्याची शक्यता नव्हती. पण रात्री गस्त घालणारी पोलिसांची गाडी तिथे आली. त्यांनी काकांना पाहिले. जवळ जाऊन त्यांची चौकशी केली. त्यांना नीट काही सांगता येईना. त्यांना त्यांचे नाव विचारले तर नाव त्यांनी चुकीचे सांगितले पण आडनांव मात्र दोन्ही वेळी एकच सांगितले. कुठे राहता याची माहिती विचारली तर एकदा शिवडी म्हणाले एकदा पार्ले . शिवाडीला त्यांचा भाऊ राहतो. त्यांना ते आठवले असेल. शेवटी पोलिसांनी ठरवले की याना घेऊन जाऊ. पोलीस स्टेशन ला नेल्यावर पोलिसांनी काकांना खायला दिले. मग परत चौकशी सुरू केली. पण काकांना काही नीट सांगता येत नव्हते ते आधीचेच परत सांगत होते. त्या पोलिसांनी मग ठरवले की काकांचे बोटांचे ठसे घ्यायचे आणि त्यांच्या आधारकार्ड वरून त्यांची माहिती शोधायची. त्यासाठी त्यांनी जवळच्या आधारकार्ड सेन्टर ची माहिती ही काढून ठेवली. परत एकदा काकांना विचारले की कुणाचा फोन नंबर आठवतेय का? काकांनी खूप प्रयत्न करून एक नंबर सांगितला. पण तो मोबाइल नंबर होता आणि काकांना आठच नंबर आठवले होते. खूप प्रयत्न करूनही त्यांना पुढचे दोन नंबर आठवेनात. मग त्या पोलिसांनी ठरवले या आठ नंबर च्या पुढे १-१, १-२ असे नंबर लावून फोन करायचे. शक्य तितके प्रयत्न करायचे या काकांना घरीं पोचवण्याचे असे त्यांनी ठरवलेच होते. त्यांनी फोन लावायला सुरवात केली. ८-१० चुकीचे नंबर लावल्यावर मात्र एक नंबर लावला तो काकांच्या भावाचा. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले होते. आणि असे हे काका त्यांच्या घरी सुखरूप पोहचले.
काका जरी सापडले असले तरी काही प्रश्न मात्र अनुत्तरित च आहेत. जसे घराबाहेर पडल्यावर लगेच रिक्षात बसणारे काका इतके चालत बाहेर कसे गेले? नुसत्या हाफ पॅन्ट आणि बनियन वर असणाऱ्या काकांना रिक्षात बसवताना त्या रिक्षावाल्याच्यत काहीच शंका कशी आली नाही? त्याला जर असे सोडायचे होते तर त्याने परत त्या जागीच का सोडले नाही? प्रवेश बंदी असलेल्या भागात तो गेलाच कसा?? दिवसभर काका जर त्या जंगलात होते तर त्यांना काही झाले नाही हे नशीब. सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त काकच देऊ शकतात. पण दुर्देवाने त्यांना त्या दिवशी ते रिक्षात बसले त्यानंतरचे काहीच आठवत नाहीये.
हा लेख लिहिण्याचा उद्देश इतकाच की अजूनही या जगात माणुसकी शिल्लक आहे त्या पोलिसाच्या रुपात . देव कधी कुणाच्या रुपाने मदतीला येईल हे सांगता येत नाही.
खरच अशा काही माणसांमुळेच आज माणुसकी जगात टिकून आहे .... निस्वार्थीपणे सेवा कोण करते कोणासाठी आजकाल ... छान लिहिलेयस मिलन .
ReplyDeleteBhushan tu agdi barobar bolas aaj Kal jagat manuski urli nahi re
ReplyDeletePan kuthetari to dev ahe he matra khar
Ratna
Angavar shahara ala vachun...kay paristhiti zali asel nemki tyanchi? Kuthlya manasthitit gele astil? Ani polisanchi pan kamal ahe... Shevti experience kami yeto to asa ... Thnx for sharing
ReplyDeleteright milan tai police lokana salam asech kam karat raha ani milan tai asech tu lihit raha...........
ReplyDelete