Monday, 25 September 2017

मंदार

*मंदार*
खरे तर याच्या विषयी काय आणि किती लिहायचे हा खूप मोठा प्रश्न. आमची मैत्री कधी झाली नीटसे आठवत नाही. पण दहावीच्या सुट्टीत अमितच्या घरी केलेली मजा आठवते आहे. कदाचित तीच आमची पहिली नीट झालेली भेट.
त्यानंतर आमची बऱ्याच वेळा भेट झाली पण ती नुसतीच hi hello पर्यंत मर्यादित होती. मंदार चे घर साने काकूंच्या  शेजारी होते त्यामुळे अशा भेटी होत होत्या. पण पुढे हीच मैत्री इतकी घट्ट होईल असे वाटलेच नव्हते.
२००८ मध्ये जेव्हा आमचे पाहिलं गेट टू गेदर झाले तेव्हा आमचे काही जास्त बोलणे झाले नाही सगळेच पहिल्यांदा भेटत होते त्यामुळे प्रत्येकाशी मोजकेच बोलणे झाले. त्यावेळी प्रत्येकाचे फ़ोन नंबर घेतले . पण तरीही २००८ ते २०१० आमचे जास्त काही बोलणे किंवा भेटणे झालेले मला आठवत नाही. २०११ मध्ये जेव्हा त्याच्या नवीन घरी गेलो होतो तेव्हा सगळ्या जुन्या आठवणी निघाल्या आणि तेव्हा वाटलं की आपण शाळेतल्या मित्रमैत्रिणींनी भेटले पाहिजे आणि तिथून सुरू झाला आमच्या टीम १९९२ चा प्रवास.
कधी कधी मंदार चा खूप राग ही येतो. नुसता बॉसिंग करत असतो. हे कर ते कर नुसत्या ऑर्डर्स देणार. आणि मग त्याचा फॉलो अप . इतक्या वेळा एकच गोष्ट विचारेल की मग मी तर वैतागून सांगते तूच कर ना सगळे. आणि कधी तर असा वागतो की जगात हाच एकटा बिझी आहे बाकी रिकामी. पण तरीही तो आणि मी अगदी मनापासून काम करतो आमच्या ग्रुप साठी. ग्रुप मध्ये कार्यक्रमाचे मेसेज टाकणे , सगळ्यांना आठवण करून देणे बरीच कामे तोच करतो. कधी कल्पना त्याची कृती माझी तर कधी कल्पना माझी कृती त्याची. आता तर आम्ही एकमेकांना इतके ओळखतो की बऱ्याच वेळा त्याच्या आणि माझ्या कल्पना बऱ्याच वेळा सारख्याच होतात.
दाखवताना असे दाखवतो की मी कुठलीही गोष्ट सिरियसली घेत नाही पण तसा हळवा आहे. कुणी आजारी असो किंवा  कुणाचे काही झालेले असो याला जायला जमले नाही तरी फोन करून हा नक्की चौकशी करणारच.  कधी कधी  तो इतका पॅनिक होतो की बस मी आजारी पडले तर कार्यक्रम पुढे धकलूया म्हणत होता. एखादी गोष्ट नाही म्हटली की लगेच जाऊ दे मग सगळे कॅन्सल करू हे उत्तर ठरलेले. इमोशनल ब्लॅक मेल करणे कोणी याच्या कडून शिकावे. पण तरीही एक खूप चांगला, काळजी घेणारा आणि सगळ्यांना जोडून ठेवणारा आहे. मला जास्त अभिमान वाटतो की हल्लीच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळात तो त्याचा आई वडिलांच्या सोबत आहे आणि खूप छान सांभाळून आहे. अर्थात त्यात त्याला त्याच्या बायकोची म्हणजे मनालीची ही तितकीच उत्तम साथ आहे. मुख्य म्हणजे ती आमच्या मध्ये  ही अगदी मिसळून जाते.  मंदार बद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे त्याने " देहदान" केले आहे आणि आमच्या समोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.
‌२०१४  मध्ये जेव्हा आम्ही सगळ्या शिक्षकांना बोलावून स्नेहसंमेलन करणार होतो तेव्हा काही कारणाने आमच्यात खूप वाद झाले होते . किती तरी दिवस आमचा अबोला ही होता. त्यानंतर जवळपास ६ महिने आम्ही एकमेकांशी नीट बोलतही नव्हतो. असे वाटत होते की कदाचित आता काही परत पूर्वी सारखे होणार नाही. एकमेकांना खूप बोलून सगळे आरोप प्रत्यारोप करून आम्ही मोकळे झालों होतो. पण आमच्या अबोलयाचा परिणाम जेव्हा जाणवायला लागला तेव्हा आम्ही दोघांनीही माघार घेतली.  हीच वेळ असते की ज्या वेळेला आपली मैत्रीची भावना आपल्याला सावरते. आणि एका गेट टू गेदर च्या निमित्ताने आम्ही परत बोलायला लागलो.  मैत्री च्या परीक्षेत आम्ही शंभर पैकी शंभर गुणांनी पास झालो. अशी तर लुटुपुटूची आमची बरीच भांडणं होतात रागाने कधी मी तर कधी तो ग्रुप ही सोडतो पण ते तेव्हढ्यापुरताच असते. आपल्याला कोणीतरी मस्का मारावा ही निव्वळ भावना. राग वैगरे प्रकार नाही.  आमचा ग्रुप जिवंत ठेवण्यामागे मंदार चा खूप मोठा वाटा आहे. सतत काही न काही बोलणे असतेच ग्रुप वर. मी केलेल्या कुठल्याही पोस्ट वर त्याचे कंमेंट नाही असे होतच नाही. मलाही त्याचे काही कंमेंट नाही आले तर चुकल्या सारखे होते. कोणाची फिरकी कशी घ्यायची हे त्याला पक्के ठाऊक आहे. मला तर चिडवून चिडवून बेजार करतो. आता आम्हाला एकमेकांबरोबर गोष्टी शेअर करायची इतकी सवय झालीय की त्याने एखादी गोष्ट मला न सांगता दुसऱ्या कुणाकडून कळली तर वाईट वाटते. माझ्याशीच असे नाही तर प्रत्येकाशी त्यांचे संवाद सुरू असतात. पण तरीही कधीतरी सिक्रेट ठेवतोच. 

‌इथे ना एक गंमत सांगावीशी वाटतं अमित ला मंदार ला डिफेकटिव्ह पीस म्हणतो  मलाही आधी नवल वाटायचे असे का?? पण त्याची छोटी छोटी १०-११ ऑपरेशन झाली आहेत. काय सहनशीलता ....बापरे. कदाचित त्यामुळे तो अर्धा डॉक्टर झालाय😊😊.

‌मंदार मध्ये एकच बदल हवा त्यानें थोडे धीर धरायला शिकायला हवे. कधी कधी यामुळे तो आम्हाला सगळ्यांना धारेवर धरतो.

‌पण तरीही  एक चांगला मित्र , भाऊ ,मुलगा वडील आणि नवरा मला वाटतं सगळ्याच भूमिका तो व्यवस्थित पार पडतोय .
‌जोपर्यंत टीम १९९२ आहे तोपर्यंत मिलन आणि मंदार आहेत किंवा जोपर्यंत मिलन आणि मंदार आहेत तोपर्यंत  टीम १९९२ ची धुरा अशीच सांभाळत राहणार.👍

Wednesday, 20 September 2017

एक पत्र

प्रिय मैत्रीण ,

खरंतर पत्र लिहिण्याची काही गरज नाही आणि आताच्या मेसेजच्या जमान्यात अगदी आऊटडेटेड तरीही पत्र ते पत्र टाइप करण्यापेक्षा लिहून जास्त छान व्यक्त होता येते असे मला वाटते. . जे काही आहे ते आता आपण समोरासमोर बोलू शकतो इतकी मैत्री आपल्यात आता नक्कीच झाली आहे. पण तरीही काही गोष्टी अशा नाही जमणार मला तुझ्यासमोर बोलायला . अर्धे अधिक तर मी तुला पहिले कि विसरूनच जातो, तरी मला बोलल्याचे समाधान . म्हणून हा उपाय मस्त तुझ्यापर्यंत नाही पोचले तरी मला आपले बोलल्याचे समाधान. तू त्या दिवशी विचारात होतीस ना कि सांग बरे दोन चार आठवणी. आता सांगतो पण कंटाळू नकोस हा आणि हसू तर अजिबात नकोस. कारण तुझ्या स्माईल वरच तर फिदा झालो ना मी. आठवत नाही पहिल्यांदा तुला कुठे पाहिले ते. पण एक दिवस शाळेच्या गेटजवळ मुलींच्या घोळक्यात तुला  खळखळून हसताना पहिले आणि संपलोच मी. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी खूप वेगळीच वाटलिस तू इतर मुलींपेक्षा. आणि त्यानंतर मात्र माझा एकही दिवस गेला नाही कि मी तुला शोधले नाही. कधीतरी चोरून तर कधी समोरासमोर तुला पाहणे हा छंदच झाला होता माझा. शाळा सुटताना , भरताना अगदी मधल्या सुट्टीत सुद्धा फक्त तुला बघण्यासाठी माझा सगळं आटापिटा असायचा. मित्रांच्या किती शिव्या खाल्ल्या  आहेत ते माझे मलाच माहित. तू मला आवडतेस हे जवळजवळ सगळ्या वर्गालाच ठाऊक झाले होते . कदाचित तुलाही त्याची कल्पना आलीच होती. पहिल्यांदा मला कुणीतरी इतके आवडले होते आणि कुणीतरी आवडणे हि चूक नाही. म्हणून माझ्या खास मित्रांमध्ये मी हे बोललो हि होतो. त्यामुळे त्यांचे मला तुझ्यावरून चिडवणे अंमळ जास्तच वाढले होते. 

मला चांगले आठवतेय शाळा सुटताना एका मुलाने तुला धक्का मारला होता. कसले झापले होतेस तू त्याला. तुझ्या बरोबर तुझ्या दोन चार मैत्रिणी हि आल्या मग त्याला ओरडायला . तेव्हा मात्र थोडी भीती वाटली होती कसली डेंजर मुलगी आहे असे वाटले होते क्षणभर. मी हि तुझ्या मागे पुढेच असायचो शाळा भरताना आणि सुटताना त्या मुळे  थोडे टेन्शन आले होते. शाळेतही कुठल्या शिक्षकांनी काही  आणायला सांगितले कि जाता येता माझी नजर तुझ्या वर्गावर जायची. कधीतरी तू दिसायचीस कधीतरी नाही. मग थोडेसे नाराज व्हायला व्हायचे. तू शाळेला दांडी मारलीस कि माझा जीव मात्र कासावीस व्हायचा. मग दहा वेळा काही ना काही कारणाने आवारात दहा फेऱ्या व्हायच्या. 

आता अगदी आपण दोघेही संसारात व्यवस्थित रमलोय तरीही तुझ्याविषयीची ओढ किंवा आवड कमी झाली नाही. तुझ्या बरोबर लग्न करावे किंवा साधा रोमान्स करावा असे स्वप्नातही वाटले नाही. तुझे आसपास असणेही आवडायचे मला. मला अजूनही तू आपल्या सेंड ऑफ च्या दिवशी नेसलेली ती जांभळ्या रंगाची हिरव्या काठाची साडी आठवतेय. किती गोड दिसत होतीस तू त्यात. असे वाटत होते कि दिवस संपूच नये. कारण त्या नंतर शाळा हि बंद म्हणजे तुझे दिसणेही बंद मन कासावीस झाले होते. नंतर परीक्षेच्या काळात आपलीच शाळा सेन्टर असल्यामुळे दिसलीस तू पण त्या दहावीच्या परीक्षेच्या टेन्शन मध्ये बाकी काही सुचत नव्हते. 

त्यानंतर कॉलेज , जॉब लग्न सगळे होईपर्यंत आपले काही कधी भेटणे झालेच नाही. कधीतरी रस्त्यात एकमेकांसमोर आल्यावर एक स्माईल इतकेच . पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात तुझी छबी नेहमीच राहिली. तुला पूर्णपणे विसरलो असे कधी झालेच नाही. नंतर एक दिवस फोन आला " अरे !! आपल्या दहावीच्या बॅचचे गेटटुगेदर आहे. आणि मन परत भूतकाळात गेले. त्या निमित्ताने  तू परत भेटशील म्हणून त्या मित्राचे हजार वेळा आभार मानले असतील मी.  ज्या वेळी तुला पहिले ना त्या लाल रंगाच्या ड्रेस मध्ये किती छान दिसत होतीस. आणि तुझे ते हसू जसेच्या तसे सगळे विसरायला लावणारे. त्या दिवशीही माझ्या मित्रांनी मला काही सोडले नाही तुझ्या वरून चिडवणे सुरूच होते. त्या ऑकवर्ड स्थिती मुले तुझ्याशी धड बोलताही आले नाही मला. असा राग आला होता त्या मित्रांचा पण तरीही त्यादिवशी आपण सगळ्यांचेच फोन नंबर घेतले होते त्यामुळे एक आनंद होता मनात. पण तरीही तुला फोन करायचे हिम्मत काही झाली नाही. पण ज्या दिवशी तुझा फोन आला बापरे!!!! ऑफिस च्या खुर्चीत जवळ जवळ उडालोच होतो मी. किती बालिशपणा तरीही मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पहिल्यांदा तुझा आवाज ऐकला मस्त वाटले. अगदी नॉर्मल गप्पा मारून ५-१० मिनिटात फोन ठेवलास तू. मी मात्र आठवडाभर त्याच विश्वात होतो. कदाचित बायकोलाही ती गोष्ट जाणवली असेल. त्यानंतर मात्र बऱ्याच वेळा आपल्या छोट्या छोट्या भेटी होत होत्या. मला अजूनही आठवतेय तू पहिल्यांदा जेव्हा माझ्या गाडीत बसली होतीस पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होतास. तुला घरी ड्रॉप करेपर्यंत माझ्या काळजाची धडधड काही थांबत नव्हती. तू मात्र बडबड करण्यात दंग होतीस. तू, तुझी बडबड आणि तुझे हसू समोरच्याची पार विकेट घेते. 

पण तरीही एक गोष्ट सांगू का तू इतक्या मुलांशी बोलतेस अगदी मोकळेपणाने. शाळेतही तुला एका मुलाच्या नावाने चिडवायचे पण कधीही मला राग नाही आला. किंवा जळफळाट हि नाही झाला. तू माझी होतीस माझ्यासाठी आणि फक्त माझ्यासाठी. एकतर्फी प्रेम नाही म्हणता येणार तरीही अव्यक्त प्रेम म्हणता येईल. आता तर आपण इतके छान बोलतो. महिन्यातून कधी कधी तर आठवड्यातून हि बोलणे होते आपले. अगदी आपल्यात काही नसले तरी तुला गमवायची भीती वाटायला लागली आहे मला . तुझ्याबरोबर असताना ना का कुणास ठाऊक अगदी तरुण झाल्यासारखे वाटते. सगळे त्रास टेन्शन विसरायला होतात. तुझी बडबड ऐकत राहावीशी वाटते आणि तुझे हसू पाहत राहावेसे वाटते. एक विनंती आहे तुला समज उद्या देव ना करो आपल्यात काही गैरसमज झाले तर काही न बोलता बोलणे बंद नको करू. जमले तर बोलून किंवा भेटून गैरसमज दूर करू.  पण न बोलता मला न कळवता परस्पर निर्णय नको घेऊस इतकीच विनंती.  कारण माझ्या आयुष्यातली माझी पहिली आवड आणि माझी एक चांगली मैत्रीण मला गमवायची नाही. मैत्रीची हि अस्पष्ट रेषा ना ओलांडता सगळे सांभाळून अगदी मरेपर्यंत मला तू माझ्या आयुष्यात हवी आहेस. कारण तुझे असणेच माझ्या साठी खूप जास्त महत्वाचे आहे. 

तुझाच एक मित्र, 

ता. क. :  व्याकरणाच्या चुका काढू नकोस आणि अक्षर पाहून किंवा लिहिलेलं वाचून हसू नकोस प्लिज







Tuesday, 19 September 2017

निरागस मैत्रीचे रूप...... महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स १५. ०९. २०१७ )

आम्ही आमच्या शाळेचे 

आम्ही चेंबूर च्या " आमची शाळा " चे १९९२ बॅच चे विद्यार्थी. आमच्या पैकी बरेच जण अजूनही चेंबूर मध्ये असल्यामुळे भेटीगाठी होत होत्या. एप्रिल २०१३ ला आमचा वॉट्सअँप चा शाळेचा ग्रुप बनवला.  आणि त्यानंतर  आम्ही  २९ जुन २०१३  ला चेंबूर ला आमच्या शाळेजवळच पहिल्यांदा भेटलो.  १९८८ मध्ये इयत्ता पाचवी  झाल्यावर मी चेंबूर ची आमची शाळा सोडून दुसऱ्या शाळेत गेले, नंतर तब्बल  २५ वर्षांनी मला माझे बालमित्रमैत्रिणी  भेटले. काय क्षण होते ते. इतक्यावर्षानंतर प्रथमच.. आम्ही साधारण ११ जण होतो त्यावेळी. बरेच जण बदलले होते तर काहींच्या चेहऱ्यात अजिबात बदल नव्हता अर्थात वय वाढल्याच्या खुणा थोड्या फार खुणा प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसत होत्या. त्यातले काही जण हि शाळा किंवा कॉलेज सोडल्यावर प्रथमच एकमेकांना भेटले होते.  पुन्हा भेटण्याच्या निमित्तानं सगळेच परत एकदा बालपणात रमून गेले होते. सगळ्या जुन्या आठवणी निघत होत्या , काहीत मी होते तर काहीं मध्ये मी नव्हते. मनातून थोडे वाईट वाटत होते कि मी बरेच काही मिस केले याचे. पण त्या पुनर्भेटीचा आनंद काही औरच होता.  त्यानंतर आम्ही दर ३ महिन्यातून एकदा भेटतोच. ' फ्रेंडशिप डे ' च्या निम्मिताने एक पावसाळी पिकनिक असतेच.  खूप मज्जा करतो आम्ही अगदी वय विसरून लहान मुलांसारखी मज्जा करतो.  अशा वेळी अगदी खूप व्यस्त असलेले आमचे बरेच मित्र मैत्रिणी आवर्जून वेळ काढून येतातच. दर वेळी अजून कुणीतरी नवीन मित्रमैत्रिण आमच्या सोबत असते. खूप छान वाटते जेव्हा मित्र मैत्रिणीची संख्या कमी न होता ती वाढत जाते.  आणि प्रत्येक वेळी आठवणींच्या आल्बम मध्ये नवनवीन आठवणींची भर पडत जाते. खरंच शाळेत झालेली ती निरागस मैत्री कायम तशीच राहते कारण तेव्हा जातपात , गरीब श्रीमंत असा भेदभाव नसतो. आमची हि मैत्री अशीच कायम निरागस आणि घट्ट राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .