Wednesday, 17 May 2017

विकी आणि शशी

सकाळचे ६. १५ -६. ३० झाले होते. डबे बनवायच्या गडबडीत. इतक्यात फोन वाजला. नाव पाहून डोक्याला सूक्ष्म आठी पडली. सकाळीच हिचा फोन मनात शंकेची पाल चुकचुकली. बातमी अपेक्षित होती पण इतक्या लवकर... . मी थरथरत्या हाताने फोन घेतला. एक वाक्य कानावर पडले " विकी गेला" मी विचारले " कधी ?"      " पहाटेच" समोरून तिचे उत्तर. मी म्हटलं " कळवते बाकीच्यांना" आणि फोन ठेवला. क्षणभर काहीच सुचत न्हवते. हात पाय थरथरत होते. घसा कोरडा पडला. दोन मिनिट अशीच बसले मग पटापट ३-४ फोन केले. पण कुणीच उचलला नाही. काय करावे सुचत न्हवते. मग समोरून एक फोन आला. बातमी सांगितली तर विश्वासच बसेना. त्याने अजून २-४ जणांना फोन केले आणि खात्री केली. हो आमच्या बरोबरच " विकी साळवी " आम्हाला सोडून गेला होता. कॅन्सर सारख्या आजाराला ३-४ वर्ष तोंड देत होता. शेवट माहित होता पण तो इतक्या लवकर येईल असे कुणालाही वाटले नव्हते. 

शाळेत असतानाच तो मला आठवत नाही. पण एक वर्ग मित्र म्हणून तो जेव्हा हि समोर आला तेव्हा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू होते. मला आठवतेय शाळे नांतर २००८ ,मध्ये आम्ही सगळे पहिल्यांदा भेटलो होतो. त्यावेळी खूप मोकळे पणाने बोलला होता तो. नंतर त्यानेच आम्हाला त्याच्या गाडीतून घरी सोडले होते.  नंतर २०१२ ,मध्ये हि आम्ही जेव्हा भेटणार होतो शाळेत तो कुठेतरी बाहेर जाणार होता म्हणून त्याचे काँट्रीब्युशन त्याने माझ्या ऑफिस ला येऊन दिले होते. मला त्रास नको म्हणून तो तिथपर्यंत आला होता. त्यावेळी बायको मुलाची ओळख करून दिली.  कसे असते ना धडधाकट दिसणारा मानूस आतून काय सहन करत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. 

त्यानंतर थोड्या महिन्यांनी कळले कि त्याला कॅन्सर आहे. ट्रीटमेंट सुरु होती. आम्ही मित्र मैत्रिणी त्याला अधे मध्ये फोन करून त्याची चौकशी करत होतो. त्याचे पहिले ऑपरेशन झाले ना तेव्हा आम्ही त्याला भेटायला गेलो होतो. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून अजिबात वाटले नाही का हा इतका आजारी आहे. त्याने त्याचे झालेल्या ऑपरेशन चे व्रण दाखवले. पाठीवरून छातीपर्यंत कट होता. बघून जीव हादरून गेला. डोळ्यात टचकन पाणी आले. जेमतेम स्वतःला सावरत बाहेर पडलो. कौतुक वाटले खूप त्याचे किती धीराने घेत होता सगळे. शारीरिक त्रासाचा लवलेश चेहऱ्यावर कुठेच नव्हता. 

त्याचा जाण्याच्या आधी त्याची इच्छा म्हणून आमच्या ग्रुप मधले ३-४ जण त्याला भेटून आले होते. त्याच्या सोबतचे फोटो हि शेअर केले होते. तेव्हा वाटले होईल हा बरा. कारण त्यावेळीही त्याच्या चेहऱ्यावरचे हसू काही कमी झाले नव्हते.  आणि अचानक अशी बातमी. आम्ही सगळे त्याच्या घराजवळ जमलो होतो. काय बोलायचे काही सुचत नव्हते. त्याचा तो निश्चल देह पाहिल्यावर मात्र रडू आवरले नाही. आपल्या बरोबरीचं , वयाचे कुणीतरी आपल्यातून कायमचे निघून जाणे बापरे खूप विचित्र भावना. सगळे सोबत असून कोणी काही करू शकत नाही किती असाहाय्य वाटते. आपल्याच बरोबरच्या मित्राला असा शेवटचा निरोप देणे खूप कठीण. 

आजही जेव्हा आम्ही सगळे भेटतो तेव्हा त्याची आठवण दर वेळी येते. आमच्या पहिल्या गेट तू गेदर च्या वेळेचा त्याचा लाल टी शर्ट मधला फोटो पहिला कि अजूनही डोळे पाणावतात. 

तसाच आमच्या आमची शाळेच्या ग्रुप मधला "शशी."  त्याची पहिली भेट झाली होती ती जोशी बाईंच्या ७५ च्या वेळी. असावारीने त्याची ओळख "BMC का आदमी" अशी करून दिली होती. किती हसलो होतो तेव्हा. त्या नंतर महिनाभर आसावरी ला खूप पिडले आणि शशीला  तर नावच पडले "BMC का आदमी". त्यानंतर आमच्याबरोबर तो एकदा पिकनिक ला आला होता किती मजा केली होती. नंतर २-३ वेळा काम आहे म्हणून त्याला आम्हाला भेटणे जमले नाही. आणि एक दिवस अचानक एका मित्राने ग्रुप वर टाकले शशी इस नो मोअर . बापरे काय हे त्याला जाऊन १५ दिवस झाले होते आणि आम्हाला कुणाला काही कळलेच नाही. कामाचे प्रेशर, आणि त्याची व्यसने याने घात केला त्याचा. सगळे अर्धवट टाकून निघून जावे लागले. शाळेनंतर इतक्यावर्षानी जेमतेम ८-१० महिन्याचा सहवास. सगळ्यांना हसण्याचे कारण देणारा "BMC का आदमी" आमच्यातून निघून गेला कायमचा. 

नियती पण काय खेळ खेळते. सगळ्यांसोबत खेळत खेळाता विकी आणि शशी सारख्या मित्रांना अचानक एक्सिट घ्यायला लावते. मात्र आपल्या सगळ्यांच्या हृदयातून मात्र ते कधीच एक्सिट घेत नाहीत , उलट आपल्या मनात त्यांच्या आठवणींचा एक वेगळा कप्पा तयार होतो. 

आयष्य किती अनपेक्षित असते ना म्हणूनच आलेला प्रत्येक क्षण माणसाने मनापासून जगावं. कुठलाही राग , द्वेष , मत्सर मनात ना ठेवता. काय माहित आपण कधी एक्सिट घेऊ ते? या वेळी आनंद मधला सवांद आठवतो " जिंदगी और मौत तो उपरवाले के हात में है जहाँपनाह , हम सब तो रंगमंच कि कठपुतलिया है ......... कौन कब कैसे उठेंगा ये कोई नाही बता सकता ."




विकी

शशी 


Tuesday, 16 May 2017

लेख महाराष्ट्र टाइम्स (मुंबई टाइम्स ) १५. ०५. २०१७

शाळेच्या त्या सोनेरी आठवणी 
० एप्रिल २०१७ आमच्या अ . व. स्मारक विद्यामंदिर , विरार च्या १९९१-१९९२ बॅचचा संस्मरणीय दिवस. शाळा सोडून २५ वर्षे झाली म्हणून आम्ही " टीम १९९२" ने एक छोटेसे स्नेहसंमेलन केले. या वेळी १५-२० नाही तर तब्बल ६० जणांचा यात सहभाग होता. पालघर, नाशिक, कोल्हापूर, कणकवली अशा ठिकाणाहून विद्यार्थीविद्यार्थिनी खास या कार्यक्रमासाठी आले होते. विरार कणेर फाट्याला एका  फार्म हाऊस वर हा कार्यक्रम करण्यात आला.  शाळेत लहान असताना खेळाला जाणारा चमचा लिंबू चा खेळ खेळण्यात आला त्यामुळे आपले आताचे वय विसरून सगळे शाळेच्या वेळेत शिरले. संगीत खुर्ची खेळताना सगळेच शाळेत खेळायचे तसे रडीचा डाव खेळत होते. शाळेत शिक्षक, प्रिंसिपल असणाऱ्या मुली किंवा मोठ्या  कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असणारे हे सगळे शाळेचे मित्र मैत्रिणी आपला हुद्दा , वय विसरून मजा करत होते. शाळेतल्या जुन्या आठवणींना छान उजाळा दिला जात होता. आणि गप्पांची महफिल सजली होती. काही जण शाळा सोडल्यावर प्रथमच भेटले होते त्यामुळे त्यांना किती आणि कुणाकुणाशी बोलू असे झाले होते. शाळेतल्या कटू आठवणी विसरून सगळेच एकमेकांची मस्करी करत होत .  सगळ्यांना या दिवसाची कायम आठवण राहावी म्हणून प्रत्येकाला शाळेचा फोटो आणि तारीख असलेली  एक भेटवस्तू  देण्यात आली . शाळेत आपल्याला बक्षीस मिळाल्यावर होतो तसाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते भेटवस्तू  घेताना दिसत होता. 

ह्या कार्यक्रमासाठी १०-११ जणांनी ३ महिने खूप मेहनत घेतली. हा आपला शाळेचा कार्यक्रम नसून घरचेच कार्य असल्यासारखे सगळे आपापली कामे नेमाने करत होते. सकाळी ९ वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी ५.३० ला संपला. स्नेहभोजन , करमणुकीचे कार्यक्रम, मजा मस्ती आणि गप्पां यामुळे दिवस कधी सुरु झाला आणि संपला  कळलेच नाही. आणि ५० वर्षपूर्ती च्या वेळीही असेच एक स्नेहसंमेलन करू असा संकल्प आम्ही सगळ्यांनी केला. आणि खरेच तो पर्यंत सगळ्यांना निरोगी आणि सुधृढ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना म्हणजे त्याही वयात आम्ही अशीच मजा करू जशी आता केली. हा दिवस खरंच आठवणीत राहील असाच गेला. 



Saturday, 13 May 2017

टर्निंग पॉईंट

'टर्निंग पॉईंट' सगळ्यांच्या आयुष्यात येणारी हि महत्वाची वेळ. एक असा टप्पा ज्यात आपले सगळे आयुष्य बदलून जाते. काहीतरी खूप चांगले होते किंवा काहीतरी खूप वाईट. कधी कधी चांगल्यातुन वाईट घडते तर कधी वाईटातून चांगले. पण हा टप्पा मात्र कुणालाही चुकत नाही. टर्निंग पॉईंट ला वयाची मर्यादा नसते .  कधी कुठल्या  वेळी आपले आयुष्य बदलेल हे सांगता येत नाही.

काही लोकांचे शालेय जीवनात आयुष्य बदलते तर काहींचे कॉलेज मध्ये. काही लोकांना नोकरी लागल्यावर , तर काहींचे लग्न झाल्यावर  आयुष्य बदलून जाते. वयाच्या साठाव्या वर्षीही माणूस काहीतरी अदभूत करून जातो. शाळेत असताना लागलेली वाईट संगत किंवा  शाळेत एखाद्या  शिक्षकाचे मिळालेले उत्तम मार्गदर्शन हे हि आपल्या आयुष्याला दिशा देते.

कधी कधी आयुष्यात आलेली एखादी व्यक्ती ही आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊन जाते. आपला हरवलेला आत्मविश्वास आपल्याला परत मिळवून देते. तर कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातुन कायमची किंवा तात्पुरती निघून जाते आणि त्या व्यक्ती च्या अचानक जाण्याने आपण खुप खचून जातो. कधी कधी इतके त्या व्यक्ती वर अवलंबून असतो कि त्या व्यक्तीशिवाय आपण काही करू शकत नाही असे वाटते. त्यावेळी त्यातून बाहेर येऊन काहीतरी जिद्दीने करून दाखवणाऱ्या व्यक्ती आयुष्यात कधीच मागे वळून पाहत नाही.

एखादी अशी घटना घडते की आपले आयुष्यच बदलून टाकते. घेतलेला एक चुकीचा निर्णय आपली वाताहत करू शकतो तर एक बरोबर निर्णय आपले जीवन मार्गी लावू शकतो.  तर काही जण यशाच्या परमोच्च ठिकाणी असताना असे काही वागतात कि त्याना अपयशाची कटू चव चाखावी लागते.

खेळा मध्ये हि हा टर्निंग पॉईंट खूप महत्वाचा असतो. बऱ्याच वेळा आपण एखादा खेळ पाहताना म्हणतो " कसली मॅच फिरवली त्याने". एखाद्याच्या चांगला  खेळ हातातून जाणारा डाव जिंकून देतो तर  वाईट खेळ हातातोंडाशी आलेला डाव दुसऱ्याच्या पदरात पाडतो. 

आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्यात वेगवेगळे बदल घडवत असते. कधीतरी कुणीतरी केलेला अपमान हि आपल्या आयुष्याला कलाटणी देतो. झालेल्या प्रकारामुळे आपण काहीतरी चांगले करायच्या जिद्दीला पेटतो. आणि त्याच जिद्दीने काहीतरी वेगळे करून दाखवतो. 

आपल्या जीवनात घडलेली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी काहीतरी चांगलेच घेऊन आली आहे असा विचार जर प्रत्येकाने केला तर नक्कीच आपल्या जगण्याला एक वेगळा अर्थ लाभेल. काय वाईट काय चांगले याची शहनिशा न करता, जर त्यातून आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करून, वाईट गोष्टी मध्ये न अडकता चांगल्या गोष्टी घेऊन पुढे गेलो तर नक्कीच आपल्या आयुष्यात एक चांगला टर्निंग पॉईंट येईल. 

ज्या गोष्टी मुळे किंवा व्यक्ती मुळे आपल्या जीवनात बदल घडलेले असतात ते कधीच विसरू नये कारण जेव्हा जेव्हा आपल्याला हरल्यासारखे वाटते किंवा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा तीच गोष्ट आठवून आपण आधीप्रमाणे जिद्दीने पुढे जाऊ शकतो. 

जिथे आपण आपल्याला सापडतो , आणि आपलाच आपल्यावरचा आत्मविश्वास वाढवतो तोच आपल्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट. फक्त एखादी घटना किंवा एखादी व्यक्ती हि आपल्याला तो शोधण्यासाठी भाग पाडते. 







Thursday, 4 May 2017

रियुनिअन

हल्ली आपण बऱ्याच वेळा ऐकतो " अरे! परवाच आमचे शाळेच्या मित्रमैत्रिणींचे रियूनिअन झाले." त्या दिवशी अमुक अमुक च्या कॉलेज ग्रुप चे रियूनिअन झाले. कुणी ५,१० वर्षांनी भेटते, कुणी २० एक वर्षांनी भेटते तर कुणी तब्बल  ४०-५० वर्षांनी भेटतात. खरच पण गम्मतच असते या रियूनिअनची दर वेळी नवीन विषय , नवीन आठवणी .
आम्ही हि भेटतो शाळेचे मित्र मैत्रिणी अगदी २-४ महिन्यातून एकदा नेमाने . कधी कधी तर अगदी ४-५ जणच असतो पण प्रत्येक वेळची मजा काही वेगळीच असते. मला एकदा कुणीतरी म्हटले होते " काय म्हणे सारखे सारखे भेटता?" , कुणाला सांगावे गेटटुगेदर आहे आणि कुठे फोटो टाकावेत तर सगळे म्हणतात काय तेच तेच चेहरे असतात आणि म्हणे गेटटुगेदर.  पण म्हणजे त्याच त्याच मित्रमैत्रिणींना भेटणे म्हणजे गेटटुगेदर नाही का ? कि दर वेळी २०-२५ जणच हवे भेटायला. रस्त्यात दोन मैत्रिणींनी तासनतास गप्पा मारणे ही ' रियूनिअन च ना? ' ज्या लोकांना परत परत भेटावेसे वाटते त्या साठीच करतो ना गेट टू गेदर.
काही लोकांना ही संकल्पनाच पटत नाही. कशाला भेटायचे सारखे? सतत त्याच गप्पा ,तीच लोक, वायफळ गप्पा. तर काही लोकांना हे ही रॉयल हवे असते, कॉर्पोरेट मीटिंग सारखे. गेट टू गेदर म्हणजे त्याना वेळ आणि पैसे याचा अपव्यय वाटतो.

तसे पहायला  गेलो  तर आपल्या कुटुंबाची हि बरीच रियूनिअन होतात. लग्न, मुंज, बारसे आणि असे इतर समारंभ  म्हणजे एक प्रकारचे फॅमिली गेट टू गेदरच   ना. मित्र मैत्रिणींना भेटायला असे समारंभ नसतात म्हणून आपण ते ठरवून करतो. काही लोकांना आपल्या ३-४ खास लोंकाना एकत्र येऊन भेटण्यात मजा येते. तर आमच्यासारख्या काही लोकांना सगळ्यांनाच एकत्र आणण्याची इच्छा   असते.

ह्या रियूनिअन चे सगळ्यात जास्त महत्व वाटतं ते अशा लोकांना जे आपल्या शाळेचे ठिकाण सोडून दूर कुठेतरी राहायला गेलेले असतात . शरीरानं ते अशा वेळी उपस्थित नसले तरी मनाने मात्र  ते कायम तिथं असतात. हल्ली या सोशल मीडिया मुळे  जग खूप जवळ आलेय पण नुसत्या वर्चुअल मैत्री पेक्षा प्रत्यक्ष भेट चांगलीच ना.

अशा गेट टू गेंदर च्या वेळी प्रत्येकाच्या  काही ना काही गमती सांगितल्या जातात. इतकी वर्षे लपून ठेवलेली सिक्रेट बाहेर येतात. दर वेळी नवीन कुणा ला तरी बळीचा बकरा बनवला जातो आणि मग त्याची मनसोक्त फिरकी घेतली जाते.  जुने रुसवे फुगवे विसरले जातात आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. 

 एक मात्र नक्की इथे फॅमिली गेट टू गेदर च्या वेळी होते तशी प्रॉब्लेम्स ची चर्चा नाही होत. आपण कसे सरस हे दाखवण्याची चढाओढ नसते. इथे केलेल्या गमतीची आणि घडलेल्या किश्श्यांची चर्चा होते. फक्त आणि फक्त धमाल केली जाते. मुळात इथे प्रत्येक जण आपला हुद्दा , ऐश्वर्य विसरून आपल्या वयाच्या सवंगड्यासोबत आपला जीव रमण्यात गुंग असतो. कधी कधी अशाच वेळी वर्षानुवर्षे अबोला धरलेल्या दोन व्यक्ती बोलायला लागतात. तर कधी ना तुटणारे ऋणानुबंध जुळून येतात. अजाणत्या वयात झालेले गैरसमज इथे दूर होतात. अशा वेळी कळते कि कोण काय करते, कुठे असते. प्रत्येकाचे नव नवीन , रोमांचिक अनुभव ऐकायला मिळतात. कितीतरी वेळा आपण एखाद्याला गृहीत धरलेले असते पण बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर भेटल्यावर कळते कि आपण किती चुकीचा विचार करत होतो. आपल्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींचे प्रगती पाहून आपल्याला हि त्यांचा अभिमान वाटतो. अशा वेळी कुणा एकाचे कौतुक होत नाही , तर प्रत्येक जण कुणाचे ना कुणाचे कौतुक करत असते. आपल्यापेक्षा माझी मैत्रीण किंवा माझा मित्र किती चांगला हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे फक्त मैत्रीतच होऊ शकते. 

कधीतरी या चांगल्या गोष्टीत एखादे गालबोट हि लागून जाते , पण इतक्या चांगल्या घडलेल्या गोष्टीमधे अशी गोष्ट दुर्लक्षित करावी. आणि त्या चांगल्या आठवणी घेऊन पुढे जावे. पण खरंच प्रत्येकाने बालमित्रमैत्रिणीसोबत जोडून राहावे. कारण त्यांच्यासोबत घालवलेले काही तास आपल्याला आपले त्रास, दुःख आणि मुख्य म्हणजे आपले वय विसरायला लावतात. वाढते वय विसरून शाळेच्या,बालपणीच्या आठवणीत रममाण होण्याची मजाच काही औरच .