Saturday, 6 July 2019

गाणे

गाणे म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर आपल्या आवडीच्या गाण्यांचा स्लाईड शो सुरु होतो. किती महत्वाचे स्थान आहे ना गाण्यांना आपल्या आयुष्यात. आपल्या सगळ्यांचेच  अगदी खूप आवडीचे असे एक तरी गाणे असतेच, ते गाणे आपल्या आयुष्याच्या खूप जवळचे असते.  खरंतर आवडीचे असे एक गाणे सांगणे खूप कठीण असते म्हणूनच कदाचित गाण्याची प्लेलिस्ट असते.  प्रत्येक प्रसंग, व्यक्ती, ऋतू सगळ्याचे एक वेगळे गाणे. 

आपण अगदी एकटे असताना आपल्याला बऱ्याचदा गाणे गुणगुणायची सवय असते  कदाचित त्यामुळे आपल्याला थोडा वेळ का होईना आपल्या एकटेपणाचा विसर पडतो.   आपल्यापैकी बरेच जण बाथरूम सिंगर असतो. कधी कधी गम्मत होते कुणीतरी कुठेतरी एखादे गाणे गुणगुणत असते आणि ते चुकून आपल्या कानावर पडते आणि थोड्या वेळाने आपणही तेच गाणे गुणगुणायला सुरवात करतो. अगदी ते आवडीचं नसले तरीही आणि मग " काय हे कुठले गाणे म्हणतेय मी ?" असे स्वतःलाच दोष देऊन एकटेच हसतो. 

कधी कधी एखाद्या गाण्याच्या ओळी आपल्याला आपल्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगांची आठवण करून देतात, तर कधी तरी पटकन एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते. आणि आपण एकदम भावनिक होऊन जातो.  आपल्या प्रत्येक मूड आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यासाठी एक एक   गाणे बनलेले असते असे नाही का वाटत तुम्हाला?   कधीतरी असेही होते कि एखाद्या विशिष्ट व्यक्तीमुळे आपण एखादे गाणे ऐकले असते आणि ज्यावेळी  आपल्याला त्या व्यक्ती ची प्रकर्षानं आठवण येत असते तेव्हा साहजिकच आपण ते गाणे लावतो. कधीतरी एखादा प्रसंग घडतो जेव्हा मागे गाणे सुरु असते किंवा एखाद्या प्रसंगाला एखादं गाणे अगदी चपखल बसते. 

प्रत्येक गाणे आपल्याला वेग वेगळ्या कारणाने लक्षात राहते. कधी त्याचा गीतकार , कधी संगीतकार, कधी गायक,तर कधी त्यातल्या पात्रांमुळे.  तर काही गाणी ते लिहिताना किंवा चित्रित करताना घडलेल्या गोष्टींमुळे हि लक्षात रहातात . देशभक्तीपर गाणी ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. आणि ती गाणी ऐकताना आपल्या समोर त्या काळाचे चित्र उभे राहते. लता दीदींचे " ए  मेरे वतन के लोगो" ऐकताना तर डोळ्यातून पाणीच येते. कुठेही राष्ट्रगीत लागले कि आपण सगळे सोडून उभे राहतो. देवाची गाणी ऐकताना आपण इतके तल्लीन होती कि त्या देवाची मूर्ती समोर असल्याचा भास होतो कधीतरी आपल्याला.  हि ताकद असते गाण्यांमध्ये, सगळे विसरून आपण त्यात समरस होऊन जातो. 

गाणे म्हणजे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अगदी साधंच उदाहरण घ्यायचे झाले तर आपण कुठे पिकनिक ला गेलो  किंवा फिरायला गेलो तर गाणी म्हणणे हा उत्तम विरंगुळा असतो. विडंबनपार काव्य  म्हणायला जास्त मजा येते. गाण्याच्या भेंड्या खेळताना तर अजून मजा .. अशी आपल्याला भरपूर गाणी आठवतील पण त्या वेळी मात्र एक एक गाणे आठवताना मारामार. आणि आठवली तरी त्याची सुरवातच आठवत नाही असे होते. पण बऱ्याच वेळा असे होते कि भेंड्या खेळताना आपल्याला जुनीच गाणी जास्त आठवतात. नवीन गाणी पटकन आठवली जात नाही. शेवटी जुने ते सोने. 

आणखी एक गम्मत अशी कि एखाद्या गाण्यात एखाद्या नायिकेने घातलेला ड्रेस किंवा साडी पटकन लक्षात राहते. बऱ्याच स्त्रियांच्या तोंडात हे वाक्य असते " अगं !! त्या गाण्यात तिची साडी काय सॉलिड आहे ना !!!" .  इतकेच कशाला तर काही गाणी त्या सिनेमाच्या प्रसंगाला इतकी एक वेगळीच गोडी देतात. बऱ्याच वेळा गाण्यांमुळे आपल्याला सिनेमा लक्षात राहतो. एखादा सिनेमा अगदीच टुकार असतो पण त्यातले गाणे मनाला अगदी स्पर्शून जाते.

दोन पिढ्यामध्ये या गाण्यावरूनही वाद होतात. जुनी पिढी म्हणते " आमच्या वेळी काय गाणी होती अर्थपूर्ण, सुंदर संगीत, शब्द  आणि आताची गाणी नुसती धांगडधिंगा ". तर नवीन पिढी म्हणते " काय तुमची ती ओल्ड सोन्ग्स,  बोअरिंग  .. नुसती स्लो " . प्रत्येक पिढी प्रमाणे गाण्याच्या चालीही बदलल्या. पण जुनी पिढी जेवढी तन्मयतेने गाणी ऐकतात तेवढीच नवीन पिढी हि. पूर्वी  गाण्यातून काही संदेश हि दिला जायचा , हल्लीची गाणी बरीचशी फक्त "ट" ला "ट " जोडून तयार केलेली असतात. अर्थात सगळीच नाही. काही नवीन गाणी अगदी जुनी पिढी हि गुणगुणते. काही म्हणा जुनी गाणी ऐकायला मिळणे हि वेगळीच पर्वणी  आहे. फेसबुक च्या 'स्मृतिगंध' नावाच्या पेज वर या अशा जुन्या गाण्यांचा खजाना आहे.  जुनी गाणी कधी जुनी वाटतच नाही. दार वेळी ऐकताना ती अजून तरुण वाटतात. 

जशी गाण्यात जादू आहे ना तशी ते गाणे बनविणाऱ्या प्रत्येकात जादू आहे. बऱ्याच वेळा एखादे गाणे आपल्याला त्या गायक किंवा गायिकेमुळे लक्षात राहते. सिनेमात गाणी गाणारे गायक आपल्याला लक्षात राहतातच पण शास्त्रीय संगीत गाणारे गायकही आपल्याला त्यांच्या शैलीमुळे लक्षात राहतात. आपल्या आधीच्या पिढ्या खूपच नशीबवान त्यांनी खूप मोठ्या मोठ्या गायकांना, संगीतकारांना ऐकले. आताच्या काळात राहुल देशपांडे, महेश काळे, आनंद भाटे, आरती अंकलीकर याना , आणि अशा बऱ्याच गायकांना ऐकणे म्हणजे मंत्रमुग्धता.  या सगळ्यांनाच काहीतरी अचाट दैवी शक्ती लाभली आहे असेच वाटते. म्हणूनच कदाचित संगीत हि एक उपचार पद्धती पण आहे.

गाणी हि नुसती गाणी नाहीत ती एक भावना आहे, जी ऐकताना तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या प्रिय व्यक्ती येतात. कधी तरी त्या गाण्याचे बोल इतके आपलेसे असतात कि असे वाटते "अरे हेच बोलायचे होत मला." आपण जेव्हा एखाद्या व्यक्ती पासून दुरावलेले असतो आणि अशा वेळी एखादे प्रेम गीत किंवा विरह गीत कानावर पडले तर आपल्या समोर ती व्यक्ती येते, त्या व्यक्ती बरोबरच्या आठवणींचा एक पट आपल्या डोळ्यासमोरुन जातो. आणि डोळे आपोआप भरून येतात. असे वाटते कि हे गाणे त्याही व्यक्तीने ऐकावे कि जेणेकरून त्या हि व्यक्तीला आपल्या भावना कळतील .  

आपल्यामध्ये असे खूप जण असतील (माझ्यासारखे) ज्यांना कदाचित गाण्यातलं जास्त काही काळात नाही पण गाणी ऐकायला मनापासून आवडते. चांगल्या गाण्याला दाद द्यायला आवडते. सगळीच गाणी मी आवडीने ऐकते पण अभंग मला जास्त भावतात (किंवा तो एकाच प्रकार मला 🙂). आवडते गाणे एकाच वेळी १० वेळा ऐकायला आवडते, मग ते जुने असो किंवा माझ्या आजोबांच्या काळातले असो. कितीतरी वेळा आपण गाणे म्हणताना चुकीचे शब्द अगदी बिनधास्त गातो कधी कधी ते खपूनही जातात. पण समोर कुणी जाणकार असेल तर मग आपली फजिती लक्षात येते. गाण्याचा प्रकार कळण्यापेक्षा त्यातले भाव हृदयाला भिडणे जास्त महत्वाचे आहे.

आपल्या मनातील भावना उलगडण्याचे एक उत्तम मार्ग म्हणजे गाणे.  कदाचित हि गाणी आहेत म्हणूच आपले जीवन थोडे सुखकर आहे. त्या गाण्यांच्या ओघात आपण कधी कधी आपले सगळे दुःख विसरून जातो आणि नकळत आपल्या ओठावर हसू फुलते. गाणे कुठल्या प्रकारात मोडते हे माहित असण्यापेक्षा ते गाणे मनापासून ऐकणारे कान असावेत .  गाणे ऐकताना डोळे मिटून तल्लीन होणारी व्यक्ती हि गाण्याची खरी दर्दी. 

                            " जीवन गाणे गातच जावे , झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे" 






Tuesday, 2 July 2019

गंमत भीतीची

आजचा लेख हा अगदी सहज सुचलेला लेख आहे काहीच लिहायला नव्हते म्हणून केवळ वेळ जावा म्हणून हा लेख. 

आता चहा पीत खिडकीत उभी असताना  सहज म्हणून खाली पाहिले तर लहान मुले क्लास हुन सुटली होती. कंपाऊंड मध्ये साचलेल्या पाण्यात त्यांची मजा सुरू होती, एकमेकांवर पायाने पाणी लोटताना एकाचा दुसऱ्याला पाय लागला तर त्याने लगेच त्याला नमस्कार केला ( लोटांगण नाही त्याच्या अंगाला ओझरता स्पर्श करून तो हाथ आपल्या माथ्याला लावला) अगदी साधी सरळ क्रिया पण मला यातून वेगळेच आठवले.

अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्या परंपरेने आपल्याला त्याची भीती घातली जायची आणि आपणही तीच भीती आपल्या मुलांनाही घालत आलो. अशाच काही जुन्या गोष्टीना उजाळा.

आपण लहान असताना आपल्याला भीती घातली जायची असा कुणाला पाय लावला की देवबाप्पा रागावतो हा म्हणून लगेच नमस्कार करायला लावायचा.  यात संस्कारापेक्षा भीती जास्त दाखवली जायची . आणि आपणही तेव्हाही आणि अजूनही कुणाला पाय लागला की लगेच नमस्कार करतो. कधी कधी मस्करी मध्ये एखाद्याला म्हणतो ही की मुद्दाम लाथ मारायची आणि मग हे नाटक किंवा एकदाच काय ते लाथा मारून घे आणि एकदाच काय तो साष्टांग घाल.😊

 मुलं जेवत नसले की लवकर जेव नाहीतर बुवा पकडून नेईल, ही सगळ्यात पहिली भीती...नंतरही बरेच वेळा हे करू नकोस बुवा येईल , ते करू नकोस बुवा येईल. गंमत म्हणजे हा बुवाला कधी कुणी पाहिलेला नसायचा आणि हा बुवा नक्की कोण हे विचारायची अक्कल आणि हिंमत आमच्या पिढी पर्यंत नव्हती (आताची मुले खूपच स्मार्ट आहेत).  कधी कधी बुवा म्हणून दाखवला जायचा तो म्हणजे घरातलेच कुणीतरी डोक्यावर पांघरूण घेऊन यायचे, सगळे लाईट घालवले जायचे आणि मग विचित्र आवाज काढून घाबरवले जायचे.

मारामारी करताना डोक्याला डोकं आपटले की कुणीतरी म्हणायचे "आता तुम्हाला शिंग येणार" आणि शिंग येऊ नयेत म्हणून परत एकदा एकमेकांच्या डोक्यावर डोकं आपटायचे. ते दोन घाबरलेले जीव आपल्याला शिंग कसे दिसेल या विचाराने अजून जोरानं टक्कर द्यायचे. या मागचे लॉजिक अजून कळलेलं नाहीये. एकदा मारून एक येणार तर दोनदा मारून दोन यायला हवेत ना? नाही येणार म्हणजे ते उगवणारे शिंग दुसऱ्यांदा आपटून लगेचच आत टाकून द्यायचे असे का??? किंवा आलेच तर एक वाईट दिसेल म्हणून दुसरे😀😀😀

अजून एक भीती ती तर गंमतच. कुठलेही फळ खाताना त्याची बी गिळली की पोटातून म्हणे त्याचे झाड उगवते. अर्थात फळं खाताना ती नीट बघून खावीत म्हणून हे सांगितले जायचे हे कळायला फार उशीर होतो. तोपर्यंत आपण बऱ्याच वेळा चिकू, पेरू, कलिंगड अशी बरीच झाडे आपल्या पोटातून आपण उगवताना  आपण कल्पना करून झालेले असतो.  किती वेळा तर बेंबीतून झाड (वेल) आलीय असे चित्र ही काढून झाले असेल वहीच्या शेवटच्या पानावर.

आपण सगळेच लहान असताना पोलिसांना घाबरतो याला कारण ही आपल्याला घातलेली भीती.  घरातली मुले खूप मस्ती करत असली अजिबात ऐकत नसली की मग कुणीतरी म्हणते " आता मस्ती थांबवा नाहीतर पोलीस पकडून नेतील". ही धमकी तर  वारंवार दिली जायची. रस्त्यातून जाताना पोलीस दिसले की धडकी भरायची. कित्येकदा तर आईच्या मागे लपून राहायचे. 
माझ्या सारख्या बऱ्याच डरपोक लोकांना अगदी खरी वाटावी अशी गोष्ट म्हणजे भूत. आता माणसेच भुतासारखी वागतात ती गोष्ट वेगळी. रात्रीच्या वेळी बाहेर पडायचे असले की अरे तिथं जाऊ नको भूत असते. कींवा रडू नको हा तो राक्षस येईल आणि तुला खाऊन टाकेल. आणि जरा कुणी विचित्र आवाज केला की आपली इथे टरकायची. आणि कुणीतरी सांगितले असायचे की रामाचे नाव घेतले की भुतं पळून जातात म्हणून  भीती वाटली रे वाटली की राम नामाचा जप सुरू करायचा.

सगळ्यात गंमत होती ती खोटे बोललं की सांगितले जाणारी... खोटं बोललो की बाप्पा कान कापतो...असे कुणीही नसेल की ज्यानी हे वाक्य ऐकले नसेल. पण तरीही कधीतरी लबाडी केली जायचीच आणि मग झोपताना कानावर हाथ धरून झोपायचे किंवा उठल्यावर आधी कान तपासायचे आहेत का?  प्रत्येक वेळी खोटं बोललो की ही भीती मात्र कायम असायची.

अजूनही काही गोष्टी आहेत ज्या भीती कमी आणि अंधश्रद्धा जास्त अशा आहेत त्यावर नंतर कधीतरी....

पण काहीही म्हणा त्या खोट्या भीती ची ही भीती वाटायची.  पण आता खरेच रोजच्या आयुष्यात इतक्या गोष्टी वाईट घडतात की माणसांची भीती पळून चालली आहे.  रोजच्या धकाधकीच्या जीवनात इतका व्यग्र झालाय की माणसाला सगळ्यात जास्त वाटणारी मृत्यू ची भीती ही वाटेनाशी झाली आहे.