Wednesday, 1 May 2019

वास्तव

मनातसुद्धा नव्हते या महाराष्ट्र दिनाची सांगता अशी काही होईल.. पण कधी कधी एक असा प्रसंग अनावधानाने घडतो आणि आपल्या डोळ्यावर असलेले गैरसमजांचे दरवाजे खाडकन उघडतात.. असेच काहिसे घडले आज.

आज मला स्वतःबद्दल च गर्व वाटतं आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक जागरूक नागरिकाचे कर्तव्य पार पाडले मी. संध्याकाळी विरार हुन धावत धावत ट्रेन पकडली.  लेडीजच्या डब्ब्यापर्यंत पोहचणे शक्य नसल्याकारणाने  सुरवातीच्या पुरुषाच्या डब्ब्यातच बसावे लागले.  डबा बऱ्यापैकी भरलेला होता. एक दोन माणसे दारात उभी होती. एक ६० एक वर्षाचे आजोबा ही दारात उभे होते. त्यांच्या शेजारी एक २०-२२   वर्षाचा मुलगा आणि त्याच वयाची एक मुलगी. मी जाऊन सीट वर बसले . माझ्या समोरच्या सीट वर त्या दोघांसोबत असणारी एक त्यांच्यापेक्षा लहान असलेली मुलगी. आधी त्या मुलीच्या चेहऱ्यावर १२  वाजलेले होते. त्या मुलाला मधेच एक कॉल आला. तो त्या फोनवर बोलत असताना तिने त्याच्या हातातला मोबाईल खेचून घेतला.  आणि ती तोंड फुगवून उभी राहिली. त्यांच्यासोबत असणारी ती दुसरी मुलगी माझ्या समोरच्या सीट वर येऊन बसली. थोड्यावेळाने जशी ट्रेन हळू झाली तशी ती मुलगी उठून तिच्या तोंडातला मावा थुंकायला दाराजवळ गेली.  असे तिने दोन तीन वेळा केले. 

जसे वसई आले तसे त्या गेटवर उभ्या असणाऱ्या प्रेमी युगुलांचे भांडण मिटले होते. आता ते अगदी एकमेकांच्या जवळ उभे होते. गाडीत बसायला तशी जागा होती पण तरीही ती दोघे दारातच उभी. त्यांच्या सोबतची ती मुलगी एकदा त्यांच्या समोर जाऊन उभी राही परत जागेवर येऊन बसे. काहीतरी विचित्रच वागत होती. डब्ब्यात प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये व्यस्त होते. जसे वसई सोडले तसे ते प्रेमी युगुल जरा अजून जवळ आले. आता फक्त हातात हात होते. जशी जशी ट्रेन पुढे जात होते त्या दोघांमधले अंतर कमी होत गेले. त्या मुलाने त्या मुलीच्या कमरेत हात घातला होता. आणि दुसऱ्या हाताने तिच्या गळ्यातील लॉकेट बघत होता. थोड्या वेळाने त्याचे दोन्ही हात तिच्या गळ्याभोवती होते. मग हळू हळू त्याचे हात तिच्या शरीरावर फिरत होते. त्यांच्या सोबतची ती  मुलगी त्यांच्या समोरच होती. नंतर ते दोघे एकमेकांना मधेच किस करत होते. ट्रेन च्या दरवाज्याजवळ उभे राहून त्यांचे हे चाळे सुरु होते. दारात उभे असलेल्या त्या आजोबानी आपला चेहरा फिरवून घेतला. समोर एक मुलगा उभा होता तो अनिमिष नजरेने त्यांच्याकडे बघत होता मग जसे मी त्याच्या कडे रागाने पहिले त्याने खाली पहिले. 

समोरच्या बाजूला ४-५ काही तरुण मुले बसली होती ती हि त्यांच्या कडे बघून एकमेकांना खुणवत होती. त्यांना बघून हसत होती. डब्यात सगळे जण हळू हळू कुजबुजत होते. पण कोणी उठून बोलले नाही. नायगाव, भाईंदर दोन स्टेशन गेली. त्यांचे आपले चाळे सुरूच. उतरणारी माणसे दुसऱ्या बाजूने उतरत होती. माझा पारा चढत होता. पण पुरुषांच्या डब्यात बाईने काय बोलायचे हा शुल्लक विचार करून शांत बसले.  पण शेवटी माझा ताबा सुटला , मीरारोड स्टेशन गेले आणि मी माझ्या बॅग्स खांद्याला अडकवल्या . ओढणी नीट बांधली. आणि तिमिरातीतच दरवाज्याजवळ आले. आणि त्यांच्या अंगावर जवळजवळ ओरडलेच. " काय रे अक्कल आहे का तुम्हाला? कुठे उभे आहेत दोघे? काय चाळे सुरु आहेत ? जरा आजूबाजूला बघा आपल्यापेक्षा वयाने मोठी माणसे आहेत." माझा आवाज ऐकून ते दोघे एकमेकांपासून जरा बाजूला उभे राहिले. समोरची ती त्यांच्या सोबतची मुलगी त्यांना खुणावत होती कि दोघांनी आत जाऊन बसा. ते पाहून अजून चीड आली मला. त्या तरुण मुलांना विचारले " अरे मराठी आहात ना तुम्ही, एरवी मराठी चा झेंडा मिरवता ना मग असे घाण चाळे बघताना रक्त खवळले नाही का ? बोलायचे ना त्यांना का तुम्ही हि असेच वागत पब्लिक मध्ये ? " तशी ती मुले म्हणाली काकी आम्ही बोललो असतो तर उगाच मारामारी झाली असती. " ते हि बरोबरच होते म्हणा.  मग एक माणूस येऊन मला म्हणाला कि " मॅडम तुम्हाला कोणी काही बोलले का ?" मी म्हटले मला का बोलेल कुणी? हे चाळे सगळे बघताय आणि मूग गिळून गप्प बसलात.  तर म्हणे " आम्ही बोललो कि याना वाटते आम्ही मुद्दाम बोलतो" जो तो आपण गप्प बसण्याची करणे देत होता. खरेतर एक एक झापड मारायची होती मला त्या दोघांना पण नाही मारले. 

त्यावेळी पूर्ण डबा कुजबुजत होता कि बरे झाले बोलल्या मॅडम. काय चालले होते त्यांचे. कळत नाही का? त्यावेळी पूर्ण डब्याला उद्देशून बोलले मी कि सगळ्यांना किळस वाटत होती पण सगळे नुसते बघत होते. बोलायला एकानेही तोंड उघडले नाही.  सगळे माझ्या त्या चिडलेल्या अवताराकडे बघत होते. पण त्यावेळी मला कुणाचीही पर्वा नव्हती. मला जे चूक वाटले त्याच्यावर मी बोलले होते. डब्यात सगळे बसलेले आणि ती  दोघे, त्यांच्या सोबतची मुलगी आणि मी असे आम्ही चौघे उभे होते. सगळेजण माझ्याकडे कौतुकाने बघत होते. एक काकी म्हणाल्या पोरी बरे झाले बोललीस. पण का कुणास ठाऊक आज कुठूनतरी वेगळेच बळ अंगात संचारले होते. इतक्या पुरुषांमध्ये एकट्या स्त्री चा आवाज होता. आणि सगळे पाठीशी होते. 
वाईट वाटत होते एकाच गोष्टीचे कि महाराष्ट्र दीना दिवशी महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या घाणेरड्या गोष्टीवर कुणी बोलायला तयार नव्हते. नुसते गर्जा  महाराष्ट्र माझा म्हणून स्टेटस ठेवतात. पण प्रत्यक्षात काय ते आज पहिले. पण मला मनापासून बरे वाटत होते कि मी  महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थाने साजरा केला. खूप मोठी गोष्ट नाही केली पण जे केले ते त्या डब्यात असणाऱ्या लोकांना कायम लक्षात राहील. 

जय हिंद जय महाराष्ट्र