(खरंतर एका महान व्यक्तीबद्दल लिहिण्याची पहिलीच वेळ. खूप काही अनुभव गाठीशी नाहीये. पण प्रयत्न अगदी प्रामाणिक आहे. काही चुकले तर क्षमा असावी. सुरवातीलाच सगळ्यांची माफी मागूनच लेखाला सुरवात करतेय. )
आधी मनात आले एकच भाग पाहिला आहे दुसरा भाग पाहिल्यावर लिहू...पण नंतर वाटलं नको लिहूनच टाकते एक महिना अजून थांबण्याची तयारी नाही....
लहानपणापासून आजपर्यंत पहिल्यांदा असे झाले की फर्स्ट डे फर्स्ट शो पहिला. हल्लीच कुठलातरी सिनेमा पाहिला गेलो होतो तेव्हा मध्यंतरात जाहिरात आली" भाई व्यक्ती की वल्ली" येतोय ४ जानेवारी ला आणि तेव्हाच ठरवले की नक्की पहायचा.
त्यांनतर आलेला त्या सिनेमाचा प्रत्येक प्रोमो अगदी पुन्हा पुन्हा पहिला . फेसबुक वरच्या स्मृतिगंध पेजवरची प्रत्येक पोस्ट वाचली, पहिली. टीव्ही वर ज्या ज्या कार्यक्रमात या सिनेमाच्या कलाकारांचा सहभाग होता तो प्रत्येक कार्यक्रम पहिला. म्हणजे मनाशी अगदी शंभरदा पाठांतर केले होते कि हा सिनेमा पहिल्याच दिवशी पाहायचा. म्हणजे कुणी काही सांगायच्या लिहायच्या आधी बघायचा त्यातली उत्सुकता घालवायची नव्हती. किंवा कोणी काही लिहिलेले वाचण्याआधी मला लिहायचे होते.
जसे हॅम्लेट नाटक पाहून आल्यावर मी भारावून गेले होते आज पुन्हा तसेच झालेय सगळीकडे दिसतात ते फक्त " पु. ल ". आजच्या पिढीतहि असे कुणीही नसेल कि ज्यांना पु. ल. देशपांडे. माहित नाहीत. कारण नाच रे मोरा गाण्यावर लहानपणी नाच केला नाही असे एकही मूल नसेल. ज्यांना पु. ल ना प्रत्यक्षात पाहता आले नाही अशा बऱ्याच जणांना पु.ल चे दर्शन घडवणारा हा सिनेमा आहे. अर्थात त्याने खूप व्हिडिओ आहेत एकपात्री प्रयोगांचे , मुलाखती आहेत पण त्यांचा जीवनपट उलगडणारा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. या साठी महेश मांजरेकरांचे मनपूर्वक आभार. हा चित्रपट पाहताना आपण समरसून जातो अगदी. म्हणजे घडणारी घटना हि आपल्यासमोरच घडतेय कि काय असेच वाटते.
सुनीताबाईंनी पु.ल साठी किंवा त्यांच्या संसारासाठी आपल्या मातृत्वाचा केलेला त्याग खूप मोठा आहे. तो प्रसंग पाहताना आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. असे म्हणतात व्यसन वाईट असते पण सुनीताबाईंनी भाईंशी लावलेली पैज. कि अंमलदार नाटक पूर्ण लिहून झाल्याशिवाय सिगारेट देणार नाही. आणि भाईंनी अंमलदार चा दुसरा अंक एका रात्रीत लिहून काढला. म्हणजे व्यसनासाठी काही चांगल्या गोष्टी हि घडू शकतात. म्हणतात ना यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तश्याच सुनीताबाई वाटल्या मला. कशाचीही तक्रार ना करता नवऱ्याला सांभाळून घेणाऱ्या, वेळीच त्यांना शिस्त लावणाऱ्या. आपल्या नवऱ्यातले गुण ओळखून त्यांना पूर्णपणे साथ देणाऱ्या.
पु. ल. च्या लहानपणापासून सुरु होणारा हा सिनेमा. हळू हळू त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा उलगडत जातो. कुठेही थांबत नाही कि कंटाळवाणा होत नाही. सिनेमातले संवाद हि इतके सहज आणि सुंदर आहेत कि खूप आपलेसे वाटतात. त्या दोन तासात आपण त्या काळात जातो. आपण इतके एकरूप होतो तो सिनेमा पाहताना कि त्या घडणाऱ्या ना त्याप्रमाणे नकळत आपल्या प्रतिक्रिया हि येत जातात अगदी आपसूकच. म्हणजे भाईंच्या आठवणींनी त्यांच्या भावाला गलबलून येणे, त्यांच्या वडिलांचे निधन अशा काही क्षणी डोळे आपोआप पाणावतात. तर भाईंच्या चुटकुल्यांवर पटकन हसू येते. गाण्याच्या वेळी मान आपोआप डोलायला लागते.
रंगभूषाकार आणि कलादिग्दर्शक याचे हि तितकेच कौतुक. अगदी तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. तर त्यांच्या कलाकारांच्या वेषभूषेवरूनच लक्षात येते कि हि व्यक्तिरेखा कुणाची असेल इतका अफलातून मेकअप. त्यात कलाकारांनी केलेलं काम भूमिका जिवंत केल्या सगळ्या.
कलाकारांबद्दल तर काय लिहावे आणि कुणा कुणा बद्दल लिहावे. सचिन खेडेकर या माणसाच्या आवाजातच अशी काही जादू आहे ना कि सुरवात केली कि मंत्रमुग्ध व्हायला होते. त्यात त्यांचे पु. ल. च्या वडिलांचे काम. अप्रतिम, मुलावर अतोनात विश्वास असणारे, त्याला हवे तसे जगू देणारे, मुलाला संगीताची आवड आहे म्हणून त्याला महागडी हार्मोनियम आणून देणारे प्रेमळ वडील. अश्विनी गिरी पु. ल. च्या आई .... नऊवारी मधली त्याकाळातली स्त्री , मुलांना दटावणारी, सुनेचे लाड करणारी आणि प्रसंगी भावुक होणारी आणि तरुण ते वयस्कर ह्या दोन्ही काळात होणारे बदल खूप छान दाखवलेत. महेश मांजरेकर नाथा कामत , आणि आपल्या सगळ्यांचा लाडका सुनील बर्वे तितकीच लाडकी भूमिका करतोय डॉ. जब्बार पटेलांची. दोघांमध्ये साम्य दोघेही चिरतरुण. श्री.वसंतराव देशपांडे , कुमार गंधर्व, प. भीमसेन जोशी, पद्मनाभ, स्वानंद किरकिरे, अजय पुरकर छान छबी उमटवली आहे. इरावती हर्षे सहज अभिनय , तरुण सुनीता बाई अत्यंत उत्कृष्ट. प्रेम, लग्न, भाईंचा थोडासा चंचलपणा सांभाळून घेणारी , वेळीच कठोर निर्णय घेणारी बायको खूप सुंदर अभिनय. आणि सागर देशमुख भाईंच्या भूमिकेत अगदी चपखल निवड म्हणायला हरकत नाही. इतक्या मोठ्या माणसाची भूमिका खूप ताकदीने पेलली आहे. बोलणे, देहबोली अगदी हुबेहूब. नक्कल नाही पण अनुसरण खूपच छान.
पु. ल. च्या आसपास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे रेखाटन खूप विचारपूर्वक, आणि चोखंदळपणे केले आहे. अरे !!! या व्यक्तिरेखेसाठी हा कलाकार शोभला असता असे कुठेच येत नाही मनात, किंवा आपण इतके गुंतलेलो असतो कि दुसऱ्या कुणाचा विचारच येत नाही डोक्यात असे म्हणायला हि हरकत नाही.
नाथा कामत, अंतू बरवा , रावसाहेब या पु. ल. च्या व्यक्ती आणि वल्ली मधल्या व्यक्ती त्यांना कुठे आणि कशा भेटल्या याचे प्रसंग इतके खूप अप्रतिम गुंफले आहेत. इतर लोकांमध्ये आपले वेगळेपण जपणारी हि माणसे भाईंना भेटली , त्यांना त्यांचे ते वेगळेपण भावले आणि त्यांनी ते अजरामर केले.
सिनेमात सगळ्यात शेवटी प. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे आणि पेटीवर पु. ल. देशपांडे यांची मैफिल .. वसंतराव गाणे म्हणतात " कानडा राजा पंढरीचा " आणि त्यात गंधर्व आणि पंडितजी त्यांना साथ देतात. पडद्यावर पाहताना मला वाटत होते कि खरेच मी एखाद्या मैफिलीतच बसलेय कि काय? गाणे सुरु असताना आपोआप आपणही ते गाणे गुणगुणायला सुरवात करतो. ते गाणे जिथे संपले तिथे मी अक्षरशः टाळ्या वाजवल्या. उठून उभीच राहणार होते पण लक्षात आले हे नाटक नाही सिनेमा आहे.
महेश मांजेकरांनी खरेच कलाकारांची भट्टी इतकी अप्रतिम जमवून आणली आहे कि त्याला तोड नाही. प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम केलंय . भरपूर नवीन चेहेरे आहेत पण ते हि इतके अप्रतिम मिसळले आहेत या चित्रपटात. मला ऋषिकेश जोशींचे वाक्य आठवले एका मुलाखती मधले कि कितीतरी जणांचे पदार्पण आहे या सिनेमातून.
या सिनेमाबद्दल कुणाला काय काय वाटेल ते प्रत्येक जाणकार लिहीतीलच पण मी या चित्रपटाचे एकाच शब्दात वर्णन करेन "अफलातून".
पूर्वार्ध बघितल्यावर आपली उत्कंठा इतकी शिगेला पोचते कि आता कधी उत्तरार्ध बघतो असे होऊन जाते. आणि नक्कीच प्रत्येक जण वाट पाहिलं ८ फेब्रुवारी २०१९ ची.
आज पु. ल. असते तर या सिनेमाला शाबासकी म्हणून व्यक्ती आणि वल्ली भाग २ नक्की लिहिले असते या सगळ्या कलाकारांसाठी.
पुन्हा एकदा पु. ल. देशपांडे या महान अवलियाला आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल महेश मांजरेकरांचे खूप खूप आभार. आणि ८ फेब्रुवारी ची वाट बघतेय उत्सुकतेने ......
या सिनेमातला एक संवाद मला फार आवडला आपल्याकडचा दुःखाचा कोटा लवकर संपवला तर उरतो तो फक्त आनंद.
या सिनेमातला एक संवाद मला फार आवडला आपल्याकडचा दुःखाचा कोटा लवकर संपवला तर उरतो तो फक्त आनंद.
आज "भाई व्यक्ती कि वल्ली" या चित्रपटाच्या रिलीज च्या निमित्ताने आमच्या मिलिंद सप्रे काकांनी रेखाटलेले पु. ल. देशपांडे याचे चित्र.