Friday, 6 December 2019

साडी ती शेवटी साडीच (स्त्री चे पहिले प्रेम )

"काय ग काय झाले असा का चेहरा?" "काय सांगू ग नणंदेचे लग्न आहे , चांगली येवल्याला जाऊन पैठणी आणली , पण सासूबाईंना पसंद नाही पडली, म्हणे जांभळ्या रंगाची आणायची  आता यांना  कोण सांगेल तो रंग नाही शोभायचा यांना. हौस तर भारी साड्या नेसायची १०० एक साड्या तरी असतीलच कपाटात तरी दर वेळी नवीनच हवी ते हि अगदी त्यांच्या पसंतीचीच.
 हा संवाद काही वर्षांपूर्वीचा. तर हल्लीचा संवाद काही असा  ....
"अगं ! गेट टू गेदर ला जायचे आहे ना,  काय ड्रेस कोड ठेवूया... साडी नेसूया का सगळ्या जणी?" "साडी नको ग बाई!!!  एक तर नेसायला वेळ लागतो. आणि ती सांभाळायला पण त्रास. त्यात आता पूर्वीचे ब्लॉऊज होत ही नाहीत म्हणजे तो हि नवीन घ्या , अजून खर्च" असे उद्गार आपण नेहमीच ऐकतो.
पण तरीही काही उत्साही बायका असतात ज्या सणावारालाच नाही तर इतरही प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून साडीच नेसतात. 

तसे पाहायला गेले तर हल्लीच्या काळात साडी खूप कमी नेसली जाते.रोजच्या आयुष्यात जीन्स , पंजाबी ड्रेस यांनी साडीची जागा घेतली आहे. आणि ते काही अंशी बरोबर हि आहे. रोजच्या धावपळीच्या रुटीन मध्ये जीन्स किंवा पायजमा चढवला  वर एखादा टॉप घातला कि झाले काम. इथे त्या गडबडीत साडी नेसणे आणि ती संभाळणे म्हणजे एक दिव्यच वाटते आपल्याला. ट्रेन च्या त्या गर्दीत पदर सांभाळायचा , निऱ्या  सांभाळायच्या , पर्स सांभाळायची कि स्वतःला हा मोठा यक्ष प्रश्न असतो. त्यामुळे हे असे शॉर्टकट बरे पडतात. पुन्हा पावसाळ्यातही प्रश्न असतोच ती भिजलेली साडी दिवसभर वागवणे म्हणजे एक दिव्यच. उन्हाळ्यात खूप उकाडा मग तो ब्लॉउज, साडी, परकर असे  सगळे घातले कि घामाने चिंब भिजलोच म्हणून समजा.

आपली आजी अगदी  रोज नऊवारी साडी नेसायची तर आपली आई सहावारी. घरातली सगळी काम करतानाही त्यांना कधी या साडीची अडचण झाली नाही. पण आता आपल्याला अगदी दोन तीन तास साडी नेसायची असेल तरी आपण दहा वेळा विचार करतो. पूर्वी घरात नेसायला दोन आणि सणावाराला दोन अशा मोजक्याच साड्या असायच्या बायकांकडे. आता साड्यांचा गठ्ठा वाढलाय आणि नेसायचे प्रमाण कमी झालेय.

पण काही म्हणा साडी मध्ये जी नजाकत आहे ती इतर कुठल्याही पेहरावात नाही. जरा आठवून बघा  कि ड्रेस किंवा जीन्स घातल्यावर कुणी तुम्हाला पटकन खूप चांगली कॉम्पलिमेन्ट दिलीय, कुणीतरी पटकन मागे वळून पाहिलेय. पण तेच साडी नेसल्यावर लोक तुम्हाला अगदी आवर्जून सांगतात कि "छान दिसतेस साडीमध्ये. अधून मधून जरा नेसत जा."

खरे हि आहे ते साडीत  जितके  स्त्री सौन्दर्य खुलून येते तितकं बाकी कशातच नाही. साडी नेसली की आपोआप एक स्त्रीत्व येते आपल्या वागण्यात. एक वेगळाच आत्मविश्वास येतो. इतर कशावरही करता येत नाही असे सोळा शृंगार ही करता येतात साडीवर. साडी नेसली कि त्यावर बांगड्या काय घालायच्या, गळ्यात काय, टिकली कुठली , कानातले कुठले एकापाठोपाठ एक अजून शंभर प्रश्न येतात. अर्थात हे सगळे प्रश्न आपल्या आवडीचे असतात. साडी नेसून साजशृंगार केल्यावर आपणच आपल्याला आरशात किती वेळा निरखून बघतो सांगा बरं . खरे आहे कि नाही आपणच जर आपल्या प्रेमात पडतो तर लोक का नाही पडणार?

बरे साड्यांचे प्रकारही भरपूर, रंगसंगती हि भरपूर. तसेच प्रत्येक सणा समारंभाला साडी नेसायचे प्रकारही भरपूर. जवळचे लग्न असेल तर शालू किंवा पैठणी, लग्न लागताना लागणारी पिवळी साडी, पूजेला बसताना हिरवी साडी, साधा सभारंभ असेल तर नारायण पेठ , ऑफिस ला जाताना कॉटन च्या वारली पेंटची साडी अशी भरपूर उदाहरणे देता येतील. साडी नेसल्यावर बहुतेक बायका आवर्जून एक गोष्ट करतात ती म्हणजे डोक्यात गजरा किंवा फुलं माळणे. त्याशिवाय साडी नेसणे अधुरे वाटते.

साडी नेसायची प्रत्येक प्रांताची आपली एक वेगळी कला आहे एक परंपरा आहे. गोल नेसली जाणारी बंगाली साडी, उजव्या बाजूला पदर येणारी गुजराती साडी. प्रत्येक प्रांताची आपापली पद्धत. वेगवेगळ्या नृत्यप्रकारात नेसले जाणारे साडीचे प्रकार हि वेगवेगळे भरतनाट्यम, मणिपुरी, कुचिपुडी, कथ्थक . आपल्या महाराष्ट्रातच साडी नेसायचे किती वेगवेगळे प्रकार आहेत ब्राह्मणी प्रकारची नऊवारी, साधी नऊवारी, कोळी लोकांची वेगळी पद्धत तर काही लोक गुढग्यापर्यंत नेसतात ती नऊवारी नेसायची वेगळीच पद्धत. . आपल्या कडे परंपरागत चालून आलेली नऊवारी साडी. याचा थाट काही औरच. नऊवारीसोबतच त्याचा शृंगार हि भारदस्त. नथ, बुगडी, तोडे, डूल , तन्मणी, आणि अजून कितीतरी असे दागिने जितके घालू तितकी त्या साडीची शोभा वाढविणारे.

असेच काही साड्यांचे प्रकार :
पैठणी म्हटली कि डोळ्यासमोर येते सुंदर रंगसंगती आणि पदरावरचे मोर.
नारायण पेठ म्हटली कि मऊ सिल्क आणि मोठे काठ , विरुद्ध रंगसंगती
जिजामाता म्हटले कि छान बारीक नक्षीचे मोठे काठ
कोसा सिल्क मध्ये एक वेगळाच शाही अंदाज जाणवतो
पुणेरी कॉटन च्या साड्या नेसायला हलक्या आणि दिसायला सुंदर
पेशवाई च्या नावातच श्रीमंती आहे. बारीक बुट्ट्यांची हि भरलेला पदर असलेली साडी
वारली प्रिंट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील चित्रांचा एक उत्तम नमुना तोच साडीवर उताराला कि त्या साडीची बात काही औरच होऊन जाते


साडी नेसणे हि देखील एक  कलाच आहे. काही बायका अगदी चापून चोपून छान साडी नेसतात, पदर तीन निऱ्यांचा लावायचा कि दोनच, का पदरावरचा जरतारीचा मोर नाचवायला तो असाच सुटा सोडायचा. एक साडी पण त्यातही नानाविध प्रकार. ड्रेस सारखा घातला ओढणी टाकली आणि निघाले असे होत नाही.

साडी नेसायची आहे म्हटल्यावरच मनात जे येत तेच आपले खरे स्त्रीत्व. ती नेसणे , सांभाळणे, तिच्यावर साजेसा शृंगार करणे यातून त्या स्त्रीच्या टापटीप पणाचा , आवडीनिवडीचा अंदाज येतो.

घरातही आपल्या मुलीने साडी नेसायची म्हटली की आयांचे धाबे दणाणतात. एक तर आपली आणि त्यांची आवड वेगळी ...म्हणजे हा ढीग काढला की त्यातून एक साडी निवडणार . नाही पसंद पडली तर नवीन घ्या.  साडी एखादी पसंद पडलीच तर त्यावरचा ब्लॉऊज आवडत नाही. त्यातुन सलामत बाहेर पडलो की ती नेसवण्याची कसोटी.  अग इथून सैल आहे ग, निऱ्या कमी घे, पदर बघ सारखा पडतोय, लहानच झालाय...अशा सगळ्या दिव्यातून पार पडल्यावर....ती सांभाळत चालायची कसरत.  साडी नेसवून ती सगळे आटपून सुखरूप राहेपर्यंत आई चे बीपी हायच असते. एकदा घरी येऊन सोडली की सुटकेचा निश्वास टाकला.
अशावेळी सगळ्यांनाच आपले बालपण आठवते अगदी साधी ओढणी मिळाली तरी ती साडी सारखी गुंडाळून घ्यायची, अगदी लहान असलो तर घरात जी स्त्री असेल तिच्या कडून आणि जरा  मोठे झालो कि स्वतःची स्वतः. ती साडी नेसून मग घरभर मिरवायचे. आणि सगळ्यांकडून कौतुक करून घ्यायचे हे प्रत्येक मुलीने हे एकदा तरी नक्कीच केले असेल. साडी नेसून मास्तरीण बाई होण्याची मजा हि काही औरच होती. शाळेत शिक्षक दिनानिमित्त साडी नेसायला मिळायची .  

जसे आई साठी मुलीने साडी नेसणे हे एक दिव्य असते. तसे जेव्हा मुलगी कॉलेज मध्ये "सारी डे " ला जेव्हा पहिल्यांदा साडी नसते तेव्हा तिच्या वडिलांचे मन आतून गलबलून जात असेल. छोटी छोटी म्हणताना अचानक आपली मुलगी किती मोठी झाली याची पहिल्यांदाच होणारी जाणीव. आणि मग पुढे दिसणारे तिचे लग्न आणि तिचा विरह. एका तिच्या साडी नेसण्याची त्या बाबाला लागणारी हुरहूर.

लहानपणी ज्या  साडी नेसण्याचं अप्रूप वाटायचे तेच आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कंटाळवाणे काम झालेय. पण तरीही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी साडी नेसायची इच्छा प्रत्येक स्त्रीला असतेच.

साडी नेसताना एक वाक्य नेहमी आपल्या तोंडी असते " या पुरुषांचे बरे , पॅन्ट शर्ट चढवले कि निघाले." पण अहो, स्त्रियांनाच का तर कधी कधी पुरुषांना हि नेसावी लागतेच कि साडी .... असे काय करता अहो नाटक सिनेमात नाही का नेसत पुरुष साडी ? तसे तर खूप जणांनी हे कृत्य केला आहे तरी साडी नेसलेला पुरुष म्हटले कि डोळ्यासमोर सगळ्यात आधी येतात ते पुरुष म्हणजे कै. पं. बालगंधर्व (अर्थात त्यांचे काम नाही पहिले पण जे काही फोटो पहिले त्यात त्यांचे सौंदर्य अप्रतिमच ),   अशी हि बनवाबनवी मधले कै. लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिनजी, अर्थातच पंडितांचे काम करणारा कलाकार सुबोध भावे. .... आणि सगळ्यात लाडकी मोरूची मावशी अर्थात कै.  विजय चव्हाण  त्यांनी खऱ्या अर्थाने साडीतल्या पुरुषाला अजरामर केले. (अर्थात पूर्वी पुरुषच स्त्री पात्र करायचे तेव्हा नेसतच होते) 

हवाहवाई म्हणणारी मि . इंडिया  मधली फ्रॉक घातलेले श्रीदेवी व्हायचे कि चांदनी मधली शिफॉन च्या साड्या नेसणारी मादक श्रीदेवी व्हायचे हे आपले आपण ठरवायचे (हे उदहारण फक्त गंमती दाखल आहे). 
अर्थानं साडी हे शालीनतेचे उत्तम उदाहरण आहे.

हा आता तिला पाहिल्यावर पडणाऱ्या शिट्या हव्या असतील तर साडी शिवाय पर्याय नाही.

तर मैत्रिणींनो साडी नेसा, सुंदर दिसा आणि आपली परंपरा जपा. आणि नवऱ्याच्या खिशाला मोठी कात्री लावा.



 

 

   






Sunday, 10 November 2019

आनंदवन-एक अभूतपूर्ण हृदयस्पर्शी अनुभव

आनंदवन-एक अभूतपूर्ण हृदयस्पर्शी अनुभव
कुष्ठरोग नाव ऐकले की मनात भीतीपेक्षा आधी किळस येते अशी आपली परिस्थिती आहे. खरेतर हा रोग संसर्गजन्य आहे  म्हणून यापेक्षा गेल्या जन्माच्या काहीतरी भीषण पापाची शिक्षा म्हणून झालेला हा रोग अशा लोकांना वाळीत टाकले जाते. "महारोग" हे भीती दायक नाव देऊन त्या भीतीचा पगडा आपल्या मनावर बसलाय. पण खरे  तर सगळ्यात कमी संसर्गजन्य असलेला  रोग आहे हा. ज्याला हा आजार झाला आहे तो औषध घेत नसेल आणि तुमची प्रतिकार शक्ती खूप कमी असेल तरच होतो हा.  आणि कदाचित हा एकमेव असा आजार आहे कि त्याला एक ठराविक वेळच औषध घ्यायची जरुरी आहे. हा आजार वंशपरंपरने येणाराही आजार नाही. पण तरीही या आजाराच्या रुग्णाला वाळीत टाकले जाते. पूर्वी तर अशा रुग्णांना जिवंतपणे गाडले जायचे. अजूनही काही ठिकाणी हे घडतेच आहे. आईवडिलांना जर झाला असेल तर त्यांना आनंदवनात आणून सोडले जायचे आणि मुलांना सांगितले जायचे कि त्यांचे आईवडील वारले. लग्न मोडली जायची. 

पण याच सगळ्यांचे वडीलांसारखे संगोपन केले त्या वडिलांना आपण ओळखतोच स्वर्गीय. मुरलीधर आमटे अर्थात आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे "बाबा आमटे". याच रुग्णांना घेऊन एका छोट्या गावात त्यांनी  नंदनवन फुलवले ते गाव म्हणजे "आनंदवन" . आपल्याकडे स्वयंभू देव असतात इथे देवासारखी  स्वयंभू माणसे आहेत. आज ७०  वर्षानंतर ही इथे रुग्ण कायमचे राहायला आहेत ही आपल्यातल्या माणुसकीची हार आहे तर आनंदवनातल्या प्रेमाची जीत.

बाबांनंतर ही धुरा म्हणण्यापेक्षा हा वारसा तसाच आपल्या खांद्यावर घेतला ते त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विकास आमटे यांनी तर हेमलकसा सारख्या दुर्गम भागातल्या आदिवासींना शिक्षण आणि आरोग्य देण्यासाठी उभारलेला प्रकल्प हाती घेतला तो त्यांचे धाकटे पुत्र डॉ. प्रकाश आमटे यांनी.

आज आपण माझ्या लेखातून फेरफटका मारणार आहोत याच आनंदवनात. 

आनंदवनात प्रवेश करतानाच त्याच्या प्रसन्न वातावरणाची झुळूक आपल्याला जाणवायला लागते. जिथे आपली राहायची सोय केलेली आहे तिथे प्रवेश करतानाच छान छान फुलझाडे आहेत. आणि समोरच एक फलक आहे ज्यावर लिहिले आहे "We do not have Wi-Fi., Talk to each other and Pretend it's 1995" आणि खरेच तिथे नाहीच आहे तेच बरे नाहीतर तिथल्या वातावरणाची खरी मजा न अनुभवता आपण त्या मोबाईलच्या कृत्रिम दुनियेतच रमून जाऊ. तिथे दोन्हीबाजूला छोटी छोटी फुलझाडे  आहेत. गुलाब, झेंडू, तगर, सदाफुली अशी काही परिचित झाडे हि आहेत. समोर  गवताची हिरवळ आहे. पहाटेच्या दवबिंदू पडलेल्या गवतावर चालताना पायाला जो मुलायम स्पर्श होतो तो अनुभवण्यात काही वेगळीच मजा आहे. 

 आनंदवनात एक विभाग आहे "काष्ठशिल्प विभाग " जिथे उन्मळून पडलेली झाडे, टाकाऊ लाकूड यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविल्या जातात. तिथे एक लामणदिवा असतो तसे लाकडाचे शोपीस आहे ते एका अखंड लाकडापासून बनविले गेले आहे. हाताच्या पंजाच्या  आकाराची एक खुर्ची आहे. तर एक म्हशीचा पुतळा हि तिथे लाकडापासून बनविला गेला आहे. काचेच्या बाटलीत बनविल्या जाणाऱ्या वस्तू हि आहेत. 

 त्यानंतर येतो तो हस्तकला विभाग यात भेटकार्ड , भिंतीवर लावली जाणारी चित्रे बनवली जातात. पण याचे एक वैशिष्ट्य आहे. यात रंग नाही वापरले जात बरे का !! यात वापरल्या जातात त्या वस्तू म्हणजे केळीच्या झाडाची साले, मक्याच्या कणीसाची साले, भाताचे तूस. सालांचे वेगवेगळ्या  रंगछटांचे दोऱ्यासारखे गठ्ठे बनविले जातात.ते हवे त्या आकारात कापून मग ते गोंदामध्ये बुडवून जाडकापडावर असलेल्या नक्षीकामावर चिकटवले जातात. आणि त्यापासून बनविली जातात उत्तम चित्रे. त्यातच दुसरा भाग आहे , त्या भागात टाकाऊ झालेली कपड्यांचे छोटे छोटे तुकडे केले जातात. आणि ते वरील प्रमाणेच रंगसंगतीनुसार चिकटवले जातात. त्या कापडाच्या कोलाज मधून तयार होणारी चित्रे फारच अप्रतिम असतात. 

एक विभाग आहे बैठका, सतरंजी बनविण्याचा विभाग. इथे प्रथम दोऱ्याला रंग करून आणला जातो. नंतर  ते आणलेले दोरे वेगवेगळे केले जातात. त्या दोऱ्यांचे छोटे छोटे रीळ बनविले जातात. मग ते दोरे ४-५ च्या प्रमाणात एकत्र करून त्याचे एकत्रीकरण केले जाते जेणेकरून सतरंजी विणताना दोरे गुंतायला नको. मग त्या मागावर सतरंजी विणली जाते.छोटी सतरंजी विणायला एक तर मोठी सतरंजी विणायला जास्त बायका एकत्र काम करतात.

अजून एक विभाग आहे तो हातमाग जिथे छोटे रुमाल, पंचे, धोतर बनविले जाते. इथे सगळे काम हे हातमागावर चालते. काही हातमाग मॅन्युअल आहेत तर मुंबईची एक मिल बंद झाल्यावर त्यांनी तिथे दिलेल्या काही ऑटोमॅटिक मशीन आहेत. इकडच्या कापडाची गुणवत्ता हि खूप चांगली आहे. हातालाच त्याचा मुलायमपणा जाणवतो. 

एके ठिकाणी आपण घरी वापरतो ती पत्र्याची कपाटे बनवली जातात. त्याचा पत्रा इतका जाड असतो कि ती गुणवत्ता  आता आपल्याला बाजारात मिळणे शक्य नाही. त्या कपाटाची अजून एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे त्या कपाटाला आरश्यासमोर एक छोटासा जाळीचा खण असतो. म्हणजे आपल्याला आरशात बघताना पटकन लागणाऱ्या गोष्टी आपण तिथे ठेऊ शकतो. तिथेच आनंदवनात वापरले जाणारे हातमाग हि बनवले जातात. तसेच वापरल्या तेलाच्या डब्यांपासून चाळण्या बनविल्या जातात. अजून एक महत्वाची गोष्ट तिथे बनवली जाते ती म्हणजे तिथे लागणाऱ्या व्हील चेअर हि तिथेच बनविल्या जातात. त्यामुळे त्यांची खरी सोय जाणून त्या प्रमाणे त्याचे डिजाईन केले गेले आहे. 

आनंदवनात फक्त कुष्ठ रोगीच नाहीत तर दिव्यांग लोकांनाही आश्रय दिला जातो. त्यांच्यासाठी तिथे शाळा चालवली जाते. " संधी निकेतन " मध्ये अशा मुलांना काही प्रकारचे तांत्रिक शिक्षण दिले जाते. आणि मग तिथूनच काही जणांना नोकरी साठी संधी उपल्बध करून दिल्या जातात. यात बऱ्याच वेळा अशी मुले असतात ज्यांना त्यांच्या घरच्यांनी हा किंवा हि काही कामाचे नाहीत, खायला एक तोंड जास्त म्हणून नाकारलेले असते. अशीच मुले मग स्वतः कमावून घर हि सांभाळतात. इथे अशा मुलांना फिजिओथेरपी मिळावी म्हणून एक हॉस्पिटल बांधले जात आहे. हे अशा प्रकारचे भारतातले पहिले हॉस्पिटल असेल जे अशा दिव्यांगांना नियमित फिजिओथेरपी देण्यासाठी उभारले जाणार आहे. इतका विचार तर काही लोक आपल्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींसाठी हि करत नाहीत. 

 एकदा फार पूर्वी जेव्हा या रुग्णांना सिनेमा बघावयास नेले होते तेव्हा त्यांचा सिनेमा पाहून झाल्यावर त्या सिनेमाघरवाल्यानी अख्खे सिनेमाघर धुवून काढले होते. कुष्ठरोग्यांचे गाव म्हणून इथे जास्त कुणी यायला तयार होत नसत. हि सल आमटे कुटुंबियांच्या कायम मनात होती.  आणि मग याच दुःखावर उपाय म्हणून उभा राहिला तो "स्वरानंदनवन " ऑर्केस्ट्रा. इथल्या दिव्यांग लोकांमधले, रुग्णामधले  कलागुण ओळखून श्री. विकासभाऊ आमटे यांनी त्यांचा स्वतःचा एक ऑर्केस्ट्रा तयार केला. इथे वादक, गायक, नृत्य सादर करणारे सगळेच त्यांचेच. या गावात येऊन प्रयोग करायला नकार मिळणाऱ्या याच गावातल्या ऑर्केस्ट्राचे मुंबई पुणे इथे १५ च्या वर प्रयोग झालेत. यातून मिळणार सर्व निधी हा आनंदवनासाठी वापरला जातो. "लोकशाही" लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य असे म्हणतात ..... हीच लोकशाही खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळते. 

 या आनंदवनात एकंदरीत ११ तलाव आहेत. त्यात काही मानव निर्मित आहेत. एक तलाव चिवडा खाता खाता बांधले गेले म्हणून त्याचे नाव " चिवडा तलाव " असे ठेवले आहे. या तलावांमुळे इथे शेतीमध्ये दोन वेळची पिके घेतली जातात. भात शेती सोबत इथे भाज्या, फळे हि पिकवली जातात. इथला अजून एक व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय. इथे गाई म्हशींचे पालन करून येणारे दूध हे विकले जाते. सुरवातीला कुष्ठरोग्यांच्या वसाहतीतले दूध घ्यायचे नाही म्हणून नाकारणारी लोक आता तिथले दूध घ्यायला रांग लावतात. कधी कधी दूध संपून जाते पण रांग नाही. या वरूनच तिथल्या दुधाच्या दर्जाची आपण कल्पना करू शकतो. 

इथे पाणीसाठ्याची जशी मानव निर्मित तलावं  आहेत. तशी इथे अजून एक आश्चर्यजनक गोष्ट आहे. ती म्हणजे इथली डोम च्या आकाराची घरे. हि घरे बांधली जातात ती फक्त विटांनी. विटांची तिरपी चालत ठेऊन हि घरे बांधली जातात. याचे छत हे अर्धवर्तुळाकार असते. त्या वर रंगीत टाईल्स चे तुकडे बसविले जातात. जेणेकरून ऊन त्यावरून परावर्तित होऊन घरातील तापमान बाहेर पेक्षा कमी राहील. या घरामध्ये बाहेरपेक्षा साधारण ५ डिग्री तापमान कमी असते. इथे जराही लाकडाचा  वापर केला जात नाही त्यामुळे या घरांमध्ये उंदीर होत नाही. हि संकप्लना आहे आदरणीय श्री. विकासभाऊ आमटे यांची. रुग्णांना उंदीर चावून त्यांना जखम होऊ नये. बाहेरच्या उकाड्याचा त्यांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून हि खास रचना. 

या विभागात पाणी आणि वीज टंचाई आहे हे आपणा  सर्वाना माहीतच आहे. त्यामुळे इथे मोठे सोलर पॅनल बसविण्यात आले आहे. जेणेकरून फक्त सरकारी विजेवर अवलंबून राहून कामे खोळंबायला नको. 

आजपर्यंत आनंदवनातून लाखो कुष्ठरोगी बरे होऊन गेले आहेत. काही जे इथे आले ज्यांना घरच्यांनी नाकारले म्हणून ते अजूनही इथेच आहेत. त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हि आनंदवनाची जबाबदारी आहे. अजूनही इथे रुग्ण येतात. काही निघून जातात काही इथेच राहतात. त्यांच्या साठी इथे एक हॉस्पिटल आहे. सकाळ दुपार इथे रुग्ण तपासले जातात. आजूबाजूच्या गावातूनही रुग्ण इथे तपासणी साठी येतात. आपल्या मुंबई पुण्याकडे सापडणार नाही इतकी स्वच्छता आहे त्या हॉस्पिटल मध्ये. इथे एक हेल्थ ए टी एम  मशीन आहे ज्यात आपल्या ३३ चाचण्या करता येतात. डिजिटल एक्सरे  ची हि इथे सोय आहे. इथे बरेसचे मेडिकल कॅम्प होतात. ज्यात हजारो रुग्णावर शस्त्रक्रिया केल्या जातात अगदी मोफत.

इथे अजून एक खूप वेगळी गोष्ट आहे ती म्हणजे इथले स्वयंपाकघर. इथे एकच सार्वजनिक स्वयंपाक घर आहे. सगळ्यांचा स्वयंपाक हा एकाच ठिकाणी बनतो. इथे कामावर येणाऱ्या बाईला घरच्या स्वयंपाकाची चिंता नसते. तिन्ही वेळचे जेवण हे इथे एकत्रित केले जाते. जे या प्रकल्पात थोडे लांब काम करतात त्यांना डबे पोहचविले जातात. साधारण दीड ते दोन हजार माणसांचा एकत्र स्वयंपाक किती मोठी गोष्ट. याच स्वयंपाकघरात साधारण ८०-९० सिलेंडर लागायचे. पण इथे आता बायोगॅस प्लांट हि उभारण्यात आला आहे. दररोज साधारण ५ टन शेण आणि ३ टन टाकाऊ अन्न यापासून ४०० घन मी. गॅस ची निर्मिती होते. त्यामुळे आता तिथे लागण्याच्या सिलेंडर ची संख्या आता ५ वर आली आहे. 

आणि ह्या सगळ्या विभागात काम करणारी माणसे आहेत ती या आजारातून बरे झालेले रुग्ण. आता आजारी असणाऱ्या रुग्णाची सेवा करायला माणसे मिळत नाही म्हणून इथेच बरे झालेल्या रुग्णांना प्रशिक्षण दिले जाते मग तेच या रुग्णाचे ड्रेसिंग करणे, त्यांची काळजी घेणे हि कामे करतात.  इथे बरे झालेले रुग्णाचं काम करतात म्हणून त्यांच्याकडून जास्त वेळ काम करून घेतले जात नाही. त्यांच्या तब्बेतीचा पुरेपूर विचार करून त्यांचे कामाचे तास आहेत. 

आनंदवनात एक जागा आहे जिथे "श्रद्धेय बाबा आमटे  आणि साधना ताई " यांची समाधी आहे. आपल्या शरीराचा निसर्गाला उपयोग व्हावा म्हणून बाबांची  त्यांना अग्नी देऊ नये अशी इच्छा होती . म्हणून ते गेल्यावर त्यांना एके ठिकाणी पुरले गेले. आणि मेल्यानंतर हि बाबांच्या कुशीतच राहावे म्हणून त्यांच्या शेजारी साधनाताईंनाही त्यांच्या निधनानंतर तिथेच पुरले गेले. यावर कुठलीही समाधी बांधली जाऊ नये अशी बाबांची इच्छा होती म्हणून तिथे एक चौथरा बांधून तिथे निरनिराळ्या प्रकारची फुलझाडे लावली जातात.

त्यासमोरच आहे ते अनाम वृक्षांची आणि अनाम मूक कळ्यांची स्मरण शिला. सुरवातीला यांना  लग्नाचा अधिकार हि नव्हता. साधनाताईंनी पुढाकार घेऊन त्यांना तो मिळवून दिला. पण त्यांना प्रजननाचा अधिकार नव्हता,  का तर मुलाला हि होईल आजार. म्हणून त्यांचे कुटुंबनियोजनाचे ऑपेरेशन करून त्यांचे लग्न लावून दिले जायचे. आणि मग तिथे आलेल्या एखाद्या मुलाला हे  जोडपे वाढवत असे. मुलाला पालक मिळत व त्यांची मुलाची इच्छा पूर्ण होत असे आणि एक कुटुंब पूर्णत्वास येत असे . पण पुढे जाऊन सौ. भारती ताईंनी पुढाकार घेऊन त्यांना तो अधिकार हि मिळवून दिला. यात त्यांना किती जणांशी लढा द्यावा लागला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. त्या वेळी त्या न जन्मलेल्या बाळांची म्हणजेच अनाम मूक कळ्यांची स्मरणशिला. आणि आनंदवन उभारताना नाईलाजाने थोडी वृक्षतोड करावी लागली म्हणून त्यांची आहे अनाम वृक्षांची स्मरणशीला. आपण इथे दुसऱ्याला किती दुखावले तरी माफी मागत नाही, आपला अहंकार जपून ठेवतो. आणि इथे दोष न देणाऱ्या गोष्टींचीही माफी मागितली गेली. किती मोठी गोष्ट शिकवून जातात हि माणसे.

त्या शेजारी बाबांच्या "भारत जोडो" अभियानाची (sea to snow)  काही क्षण चित्रे आहेत. बाबांना पाठीचा त्रास होता, त्यामुळे ते एक तर चालत किंवा झोपून राहत. तर या अभियानात त्यांनी ज्या बस ने प्रवास केला ती बस कम अँबुलन्स तिथे उभी आहे. 
 
आनंदवनात एक खूप चांगला नियम आहे इथे माणूस गेल्यावर त्यांच्या नावाने एक वृक्ष लावला जातो आणि त्याचे पालनपोषण केले जाते. लंडन मधल्या एका ख्रिस्ती व्यक्तीने आपल्याला मरणोत्तर आनंदवनात विसावा मिळावा म्हणून स्वतःला अग्नी द्यायची इच्छा व्यक्त केली आणि त्याप्रमाणे त्यांना अग्नी देऊन नंतर त्यांच्या अस्थी आनंदवनात आणून पुरल्या गेल्या. आज त्यांचे हि स्मरण स्थान तेथे आहे.

इथे अजून एक उपक्रम राबवला जातो ज्याचे नाव आहे आनंदवन घन वन प्रकल्प. आपण साधारण ३ फुटावर एक झाड लावतो. पण इथे एक एक फुटावर झाडे लावली जातात. जेणेकरून कमीतकमी जागेत घनदाट जंगल तयार होईल, आणि त्यातून जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला मिळेल. जपान मधून आलेल्या मियावाकी यांनी हि कल्पना सुचवली होती. आज आनंदवनातील या प्रकल्पाचे अनुकरण बऱ्याच ठिकाणी केले जाते. 
 
 "टाकाऊ पासून टिकाऊ" हि संकल्पना पुरेपूर अनुभवली ती आनंदवनात. कुठलीही गोष्ट वाया न घालवता त्याचा पुरेपूर उपयोग कसा करायचा हे इथे येऊन बघण्यासारखे आहे. डॉ. विकास भाऊ आमटे यांना डॉक्टर म्हणावे कि इंजिनिअर हा मोठा यक्ष प्रश्न आहे. हुद्द्याने डॉक्टर असलेल्या या वल्ली ने आनंदवनात आणि सोमनाथ इथे केलेल्या वास्तू हे इंजिनीअरिंग चे उत्तम उदाहरण आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे काय हे अनुभवायला मिळते ते इथेच. 

आनंदवनाला " स्मार्ट व्हिलेज " म्हणून पुरस्कार मिळाला आहे. आपल्याला फार कौतुक आहे चीन चे कि त्यांचे उत्पादन जास्त कारण त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची सोय आहे, शाळा आहे सर्व काही आहे. मीठ आणि तेल सोडले तर इथे सगळ्याचे उत्पादन करते. पण आपल्याला आपल्याच देशात असलेल्या आनंदवनात हे असेच आहे याची पुसटशी कल्पना हि नाही (खूप जणांना नसेल). कदाचित आनंदवन हे एकमेव असे गाव असेल जिथे एका पूर्ण गावाचे एकच रेशन कार्ड आहे. ज्या नागरिकांना त्यांची बोटे वाकडी झाल्यामुळे, किंवा नसल्यामुळे सरकार आधार कार्ड देऊ शकत नाही, त्यांना त्यांची सरकारी ओळख देऊ शकत नाहीत . त्याच लोकांना आंदनवानाने त्यांच्यातले गुण जाणून त्यांना स्वतःची ओळख दिली. 

आपल्याकडे आंतरजातीय विवाह  असतो. पण आनंदवनात एक आगळी वेगळी कल्पना राबवली जाते इथे असतो अंतरदिव्यांग विवाह. मूक , बधिर, अंध मुलांचा. पण असे असले तरी त्यांना होणारी बाळे हि सुधृढ आणि कुठलेही व्यंग नसणारी असतात. 

ज्या लोकांना आपल्याला हात लावावासा वाटत नाही अशा लोकांना घेऊन वसवलेले हे गाव.  इथली स्वच्छता, शिस्त आणि मॅनॅजमेन्ट आपल्याला लाजवेल अशी आहे. रिकाम्या झोळीत आपण बरेच काही भरून घेऊन येतो. आजही ज्या लोकांना कुष्ठरोगा बद्दल गैरसमज आहेत ना त्यांनी नक्कीच भेट द्यावी इथे. जरा जराश्या गोष्टीचा आपण बाऊ करून बसतो. इथे बोटं नसलेली , किंवा वाकडी असलेली लोकं किती अप्रतिम कलाकृती तयार करतात. इथे कुणाच्या हि चेहऱ्यावर मरगळलेले भाव नाहीत. सगळेच प्रसन्न आणि टवटवीत. आणि मुख्य म्हणजे अतिशय स्वच्छताप्रिय. इकडे काम हि एक श्रद्धा आहे. फक्त उदरभरणाची सोय नाही. इथे वृध्दाश्रमातल्या आजी हि आम्ही भेटायला गेल्यावर अगदी आनंदी झाल्या होत्या. आम्ही नुसता नमस्कार म्हटले तरी आम्हाला भरभरून आशीर्वाद देत होत्या. 

आज श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई नंतर त्यांचे जेष्ठ पुत्र डॉ. विकास भाऊ आणि त्यांच्या पत्नी (डॉ) सौ . भारतीताई   आमटे यांनी त्याच श्रद्धेने आणि भक्तीने तो वारसा पुढे चालवला आहे. आपण सेलिब्रिटीज ना , किंवा पडद्यावरच्या नायक नायिकांना भेटायला खूप उत्सुक असतो . त्यांच्या जीवनात काय सुरु आहे याची हि आपल्याला फार उत्सुकता असते. पण खरे उत्सवमूर्ती तर आम्ही याची देही याची डोळा आनंदवनात पहिले. हात गगनात पोहचले असताना पाय जमिनीवर रोवलेले. आपल्याकडे विठ्ठल रखुमाई आहेत आनंदवनात " बाबा आणि साधना ताई नंतर " " डॉ. विकास भाऊ आणि सौ.(डॉ) भारती ताई " याच आनंदवनाच्या लोकांच्या विठ्ठल रखुमाई आहेत. म्हणूनच कदाचित आनंदवनात एकही देऊळ नाही. इथे जात पात नाही. धर्मभेद नाही. आरक्षण नाही. इथे आहे ती फक्त आणि फक्त माणुसकी, श्रद्धा माणसाची माणसावरची, आणि विश्वास. हल्ली शहरांमध्ये जन्मदात्यांना हि सांभाळायला मुलांना जीवावर येते. इथे तर इतके मोठे कुटुंब सांभाळायची जबाबदारी किती सहज उचलली जातेय.

मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कि काही थोर कर्तृत्व नसताना डॉ. विकास भाऊ आमटे आणि सौ. (डॉ)भारती ताई आमटे यांच्याशी आम्हाला संवाद साधता आला. अर्थात आम्ही सगळे निःशब्द होतो. पण त्या वेळात जे काही श्री. विकास भाऊंच्या मुखातून ऐकले ते काळीज पिळवटून टाकणारे होते. किती वेळ तरी डोळे भरून आले होते आणि मन दुःखी झाले होते. 

पु.ल . देशपांडे यांनी आनंदवनाविषयी एक वाक्य म्हटलं होते " पर्यटक म्हणून जा आणि परीवर्तित होऊन या."  हे वाक्य किती खरे आहे याची प्रचिती नक्कीच येते. अगदी खूप नाही पण ५% बदल तर नक्कीच होतो. आपण किती मी पणात जगतो याची लाज वाटायला लागते. 

हा लेख ज्यांना आवडला त्यांनी कृपया हा आपल्या मित्रपरिवरात शेअर करा. जेणे करून थोडेसे का होईना आपल्याकडून जनजागृती होईल. आणि शक्य असल्यास आनंदवन ला भेट ही जरूर  द्या. दगडी देव तर आपण नेहमीच बघतो...जिवंत देव बघितल्याची प्रचिती एकदा घ्यायलाच हवी.

हा लेख म्हणजे फक्त अडीच दिवसात मी अनुभवलेलं आनंदवन आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व. पण हा लेख अंतरंगीच्या अगदी खोलातून आलेला लेख आहे.  खरंतर अजून बरेच काही लिहिण्यासारखे आहे कारण हा विषय असा ठराविक शब्दात मांडण्याचा विषय नाही. मी फक्त १% प्रयत्न केला आहे. 
 दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती 


छोटी सतरंजी बनवताना

मोठी सतरंजी बनवताना

आनंदवनातील हॉस्पिटल

भाताचे तूस, कणीसाचे साल, केळीच्या झाडाचे साल वापरून केलेली भेटकार्ड

श्रध्येय बाबा आमटे आणि साधनाताईंचे समाधी स्थळ

काष्ठशिल्प विभाग

कापडाच्या तुकड्यांपासून बनविलेले भेट कार्ड

सोलर पॅनल आणि डोम आकाराचे घर


ख्रिस्ती व्यक्तीचे स्मरण स्थान

हेल्थ ए टी एम मशीन

संधी निकेतन

आनंदवनातील स्वयंपाकघर


बायोगॅस प्लांट




अनाम वृक्षांची आणि अनाम मूक कळ्यांची स्मरणशीला

आनंदवनातील हातमाग










Saturday, 12 October 2019

आई

हा ब्लॉग कदाचित माझ्या भावनांचा निचरा करण्याचा प्रयत्न आहे. 

आपल्याला शाळेत नेहमी निबंध लिहायला देत असत. विषय अगदी ठरलेले असत. माझा आवडता नेता, प्राणी, मला पडलेलं स्वप्न किंवा मी अमुक अमुक झालो तर. या सगळ्याच विषयाबरोबर एक विषय असायचा माझी आई, माझे बाबा हा विषय जास्त कधी कुणी लिहिलेला मला तरी आठवत नाही. कदाचित तेव्हा नोकरी करणाऱ्या आई नसतील जास्त. 

पण तरीही आई हा विषय दिला कि सुरवात ठरलेली असायची. माझ्या आईचे नाव हे आहे. ती घरात अमुक अमुक कामे करते. मला डबा करून देते, माझा अभ्यास घेते, माझ्या आई ला हे आवडते, ते आवडत नाही. . असे बरेच काही .... आणि मग शेवटचे वाक्य म्हणून माझी आई मला खूप आवडते. अगदी साधा सरळ आणि मनस्वी निबंध. बाई हि त्याला १० पैकी ८ गुण तरी द्यायच्या. त्याही आईच होत्या ना मुलांना नाराज कसे करणार. 

मग जसे जसे मोठे होत गेलो तसे आईचे महत्व वाढत गेले आयुष्यातले, पण दुर्दैवाने कधी कधी ते त्या वेळी लक्षात नाही येत. आई नोकरी करणारी असो किंवा घरी राहणारी तिचे विश्व म्हणजे तिचा संसार आणि तिची मुले. मुलांच्या शाळा , कॉलेज, अभ्यास खाणे पिणे .... तिला काय माहित नाही असे होत नाही. पण आपल्या मुलांना किती ठाऊक असतात आपल्या आईच्या आवडी निवडी. आपण जसे मोठे होत जातो तसे आपण आपल्या विश्वात रमत जातो. शाळा , कॉलेज, मग नोकरी, आणि मग लग्न. या सगळ्यात आपले आई कडे लक्ष देणे राहूनच जाते. हल्ली तरी मदर्स दे, फादर्स डे च्या निमित्ताने आणि या सोशल मीडियामुळे का होईना थोडा मुलांना आईबद्दल थोडी फार माहिती असते. 

कसे असते ना जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा  कितीतरी गोष्टींमध्ये आई आपल्याला ओरडत असते , हे करू नको , ते करू नको. तेव्हा आपण किती वैतागतो ना आई वर. खास करून मुली ... कि किती बंधन घालते हि आपल्यावर. पण हीच गोष्ट जेव्हा आपण आई होतो तेव्हा कळते. कधीतरी किती वेळा तरी आपले अगदी वाद हि होतात तिच्याशी. आईचे प्रेमच नाही माझ्यावर असे हि मनात बोलून जातो कधी कधी आपण. त्यावेळी फक्त राग असतो ना डोक्यात. ती बिचारी आपल्याला ओरडून विसरून हि गेलेली असते तिच्या बाकीच्या कामांच्या गडबडीत. आपण अगदी अबोला हि धरून मोकळे होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात तेव्हा एक तर तिचे वय झालेले असते किंवा ती आपल्यात नसते. किंवा आपण आपल्या संसारात जेव्हा तिची भूमिका करतो तेव्हा सगळे आठवते.

दुर्दैवाने आज माझी आई माझ्या सोबत नाही. तसा मला माझ्या आईचा सहवास फार कमी लाभला. लहानपण आजी आजोबांकडे गेले, मग कॉलेज आणि लगेचच लग्न. त्यामुळे हवा तसा वेळ तिच्या सोबत नाही घालवता आला. लांब राहिल्यामुळे मला वाटायचे कि माझ्यावर आई चे प्रेम कमी आहे माझ्या इतर दोन भावंडांपेक्षा. पण हे किती चूक होते हे कळायला उशीर झाला .

तश्या आईच्या आठवणी आहेत खूप पण तिचा मला जास्त सहवास आठवतो तो तिच्या शेवटच्या दिवसातला. तिच्या बरोबर घालवलेले ते हॉस्पिटल मधले २० दिवस. माझ्या आईला इतके खचलेले मी कधीच बघितले नव्हते. तिला होणारा त्रास तिच्या चेहऱ्यावर दिसायचा पण काही करण्याची वेळ निघून गेली होती. आणि आताही कधी आई स्वप्नात आली तरी ती हॉस्पिटलमध्येच असते. 

एकच समाधान कि मला त्या शेवटच्या दिवसात माझ्या आईची सेवा करायला मिळाली. नाहीतर आयुष्यभर स्वतःचे मन खात राहिले असते कि आई साठी आपल्याला काहीच करता आले नाही. आज माझ्या कितीतरी मित्र मैत्रिणींच्या आई या जगात नाही. कुणी अगदी अचानक निघून गेल्या, त्यांना किती त्रास होत असेल याची कल्पना आता येते कि त्यांना कितीतरी करायचे असेल आई साठी आणि काही करायची संधीच मिळाली नाही . त्यावेळी त्यांना सांगायचो कि तिचे आयुष्यच तेवढे. पण जेव्हा स्वतःवर वेळ आली तेव्हा जाणवले. कि आई आहे तोपर्यंत खरेच तिची खरी किंमत कळात नाही पण ती गेल्यावर जाणवते कि किती मोठी पोकळी तयार झालीय. 

आईच्या हातच्या स्वयंपाक हा आपल्या सगळ्याच्या आवडीचा विषय. माझ्या आईसारखा स्वयंपाक दुसऱ्या कुणाचाच नसतो हि आपल्या सगळ्यांचीच भावना. आमचेही तसेच , माझ्या आईच्या हाताचे चिकन, वडे, पुरणपोळ्या, शिरा, रव्याचा लाडू याची चव आहाहा !!!!. अगदी साधी डाळतांदूळाची खिचडी केली तरी ती हि सुंदरच. दिवाळीच्या फराळात चकल्या , कधीच नरम नाही झाल्या अगदी कुरकुरीत . तिच्या रेसिपीने मी करून पहिले पण आमच्या क्षणिकच कुरकुरीत. आणि करंज्या तर अगदी पांढऱ्या तरी अजिबात कच्च्या नाहीत. तसे सगळेच जेवण खूप रुचकर.. आंबोळ्या आणि काळ्यावाटाण्याचं सांबार ... सगळेच. आजही मी काही बनवले तर माझी मुलगी लगेच म्हणते शीलू आजी ची टेस्ट नाही याला.

आता हि काही जणांचे म्हणणे असते move on हे घडतच राहते. खरे आहे पण आई ती आई असते आयुष्यात किती पुढे गेलो तरी तिच्या कौतुकाची नेहमीच कमी जाणवते. अडत कुणाचेही कुठेही नाही पण तिची उणीव वेळो वेळी जाणवते. 

माझ्या  नशिबाने मला आईसारखी माया करणाऱ्या अजून तीन व्यक्ती मिळाल्या अर्थात आईची उणीव नाहीच भरून निघू शकत पण त्या तिघी आई समान आहेत मला. एक तर माझ्या सासूबाई . दुर्दैवाने त्याही नाहीत आता पण सूनेपेक्षा मुलीसारखे जास्त वागवले त्यांनी मला. त्याच्या सोबत खूप फिरले. विरार ला आल्या कि त्यांच्या हातचे स्पेशल पदार्थ नेहमीच करून देत. सासुरवास मधला सा हि कधी जाणवू दिला नाही त्यांनी. दुसऱ्या म्हणजे पांचाळ काकी ... खरे तर या माझ्या शेजारी पण अगदी आईसारख्या. घरातले कुणाचे आजारपण असो, काही अडचण असो सतत पाठीशी. माझ्या आजारपणात जसे माझ्या आईने माझ्या हातात सगळे दिले तसे त्यांनी माझ्या आजारपणात केले. अगदी मनापासून. माझ्या घरी काही कार्य असले कि माझ्या पेक्षा त्यांनाच चिंता जास्त. आईसारखा त्यांचा ओरडा हि गोड वाटतो. त्यामाझ्या आईसारख्या आहेत म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मी त्यांची मानसकन्या आहे. आणि तिसऱ्या आमच्या शेलारकाकी. कौतुकाच्या ठिकाणी कौतुक आणि चुकले कि तिथेच ओरडणाऱ्या. दिवाळीला न चुकता भेटवस्तू देणाऱ्या. कडक शिस्तीची आई असे म्हणू शकतो आपण. 

खरेच जाणारा माणूस जातो आपले आयुष्यही सुरळीत सुरु राहते. पण त्या आठवणी सतत आपल्या मनात ती ज्योत तेवत ठेवतात. आणि आईशी तर आपली नाळ जोडलेली असते. मग move on असे म्हणून ती अशी कशी तुटेल ना?

खरेच आहे पण आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. 

आणि आपण सगळे निबंधामध्ये लिहायचो तसे म्हणून माझी आई मला खूप आवडते ...... 

अजून खूप सारे होते लिहिण्यासारखे पण लिहिताना डोळे जास्तच भरून येत असल्यामुळे शक्य नाही लिहिणे...






Saturday, 6 July 2019

गाणे

गाणे म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर आपल्या आवडीच्या गाण्यांचा स्लाईड शो सुरु होतो. किती महत्वाचे स्थान आहे ना गाण्यांना आपल्या आयुष्यात. आपल्या सगळ्यांचेच  अगदी खूप आवडीचे असे एक तरी गाणे असतेच, ते गाणे आपल्या आयुष्याच्या खूप जवळचे असते.  खरंतर आवडीचे असे एक गाणे सांगणे खूप कठीण असते म्हणूनच कदाचित गाण्याची प्लेलिस्ट असते.  प्रत्येक प्रसंग, व्यक्ती, ऋतू सगळ्याचे एक वेगळे गाणे. 

आपण अगदी एकटे असताना आपल्याला बऱ्याचदा गाणे गुणगुणायची सवय असते  कदाचित त्यामुळे आपल्याला थोडा वेळ का होईना आपल्या एकटेपणाचा विसर पडतो.   आपल्यापैकी बरेच जण बाथरूम सिंगर असतो. कधी कधी गम्मत होते कुणीतरी कुठेतरी एखादे गाणे गुणगुणत असते आणि ते चुकून आपल्या कानावर पडते आणि थोड्या वेळाने आपणही तेच गाणे गुणगुणायला सुरवात करतो. अगदी ते आवडीचं नसले तरीही आणि मग " काय हे कुठले गाणे म्हणतेय मी ?" असे स्वतःलाच दोष देऊन एकटेच हसतो. 

कधी कधी एखाद्या गाण्याच्या ओळी आपल्याला आपल्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगांची आठवण करून देतात, तर कधी तरी पटकन एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते. आणि आपण एकदम भावनिक होऊन जातो.  आपल्या प्रत्येक मूड आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यासाठी एक एक   गाणे बनलेले असते असे नाही का वाटत तुम्हाला?   कधीतरी असेही होते कि एखाद्या विशिष्ट व्यक्तीमुळे आपण एखादे गाणे ऐकले असते आणि ज्यावेळी  आपल्याला त्या व्यक्ती ची प्रकर्षानं आठवण येत असते तेव्हा साहजिकच आपण ते गाणे लावतो. कधीतरी एखादा प्रसंग घडतो जेव्हा मागे गाणे सुरु असते किंवा एखाद्या प्रसंगाला एखादं गाणे अगदी चपखल बसते. 

प्रत्येक गाणे आपल्याला वेग वेगळ्या कारणाने लक्षात राहते. कधी त्याचा गीतकार , कधी संगीतकार, कधी गायक,तर कधी त्यातल्या पात्रांमुळे.  तर काही गाणी ते लिहिताना किंवा चित्रित करताना घडलेल्या गोष्टींमुळे हि लक्षात रहातात . देशभक्तीपर गाणी ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. आणि ती गाणी ऐकताना आपल्या समोर त्या काळाचे चित्र उभे राहते. लता दीदींचे " ए  मेरे वतन के लोगो" ऐकताना तर डोळ्यातून पाणीच येते. कुठेही राष्ट्रगीत लागले कि आपण सगळे सोडून उभे राहतो. देवाची गाणी ऐकताना आपण इतके तल्लीन होती कि त्या देवाची मूर्ती समोर असल्याचा भास होतो कधीतरी आपल्याला.  हि ताकद असते गाण्यांमध्ये, सगळे विसरून आपण त्यात समरस होऊन जातो. 

गाणे म्हणजे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अगदी साधंच उदाहरण घ्यायचे झाले तर आपण कुठे पिकनिक ला गेलो  किंवा फिरायला गेलो तर गाणी म्हणणे हा उत्तम विरंगुळा असतो. विडंबनपार काव्य  म्हणायला जास्त मजा येते. गाण्याच्या भेंड्या खेळताना तर अजून मजा .. अशी आपल्याला भरपूर गाणी आठवतील पण त्या वेळी मात्र एक एक गाणे आठवताना मारामार. आणि आठवली तरी त्याची सुरवातच आठवत नाही असे होते. पण बऱ्याच वेळा असे होते कि भेंड्या खेळताना आपल्याला जुनीच गाणी जास्त आठवतात. नवीन गाणी पटकन आठवली जात नाही. शेवटी जुने ते सोने. 

आणखी एक गम्मत अशी कि एखाद्या गाण्यात एखाद्या नायिकेने घातलेला ड्रेस किंवा साडी पटकन लक्षात राहते. बऱ्याच स्त्रियांच्या तोंडात हे वाक्य असते " अगं !! त्या गाण्यात तिची साडी काय सॉलिड आहे ना !!!" .  इतकेच कशाला तर काही गाणी त्या सिनेमाच्या प्रसंगाला इतकी एक वेगळीच गोडी देतात. बऱ्याच वेळा गाण्यांमुळे आपल्याला सिनेमा लक्षात राहतो. एखादा सिनेमा अगदीच टुकार असतो पण त्यातले गाणे मनाला अगदी स्पर्शून जाते.

दोन पिढ्यामध्ये या गाण्यावरूनही वाद होतात. जुनी पिढी म्हणते " आमच्या वेळी काय गाणी होती अर्थपूर्ण, सुंदर संगीत, शब्द  आणि आताची गाणी नुसती धांगडधिंगा ". तर नवीन पिढी म्हणते " काय तुमची ती ओल्ड सोन्ग्स,  बोअरिंग  .. नुसती स्लो " . प्रत्येक पिढी प्रमाणे गाण्याच्या चालीही बदलल्या. पण जुनी पिढी जेवढी तन्मयतेने गाणी ऐकतात तेवढीच नवीन पिढी हि. पूर्वी  गाण्यातून काही संदेश हि दिला जायचा , हल्लीची गाणी बरीचशी फक्त "ट" ला "ट " जोडून तयार केलेली असतात. अर्थात सगळीच नाही. काही नवीन गाणी अगदी जुनी पिढी हि गुणगुणते. काही म्हणा जुनी गाणी ऐकायला मिळणे हि वेगळीच पर्वणी  आहे. फेसबुक च्या 'स्मृतिगंध' नावाच्या पेज वर या अशा जुन्या गाण्यांचा खजाना आहे.  जुनी गाणी कधी जुनी वाटतच नाही. दार वेळी ऐकताना ती अजून तरुण वाटतात. 

जशी गाण्यात जादू आहे ना तशी ते गाणे बनविणाऱ्या प्रत्येकात जादू आहे. बऱ्याच वेळा एखादे गाणे आपल्याला त्या गायक किंवा गायिकेमुळे लक्षात राहते. सिनेमात गाणी गाणारे गायक आपल्याला लक्षात राहतातच पण शास्त्रीय संगीत गाणारे गायकही आपल्याला त्यांच्या शैलीमुळे लक्षात राहतात. आपल्या आधीच्या पिढ्या खूपच नशीबवान त्यांनी खूप मोठ्या मोठ्या गायकांना, संगीतकारांना ऐकले. आताच्या काळात राहुल देशपांडे, महेश काळे, आनंद भाटे, आरती अंकलीकर याना , आणि अशा बऱ्याच गायकांना ऐकणे म्हणजे मंत्रमुग्धता.  या सगळ्यांनाच काहीतरी अचाट दैवी शक्ती लाभली आहे असेच वाटते. म्हणूनच कदाचित संगीत हि एक उपचार पद्धती पण आहे.

गाणी हि नुसती गाणी नाहीत ती एक भावना आहे, जी ऐकताना तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या प्रिय व्यक्ती येतात. कधी तरी त्या गाण्याचे बोल इतके आपलेसे असतात कि असे वाटते "अरे हेच बोलायचे होत मला." आपण जेव्हा एखाद्या व्यक्ती पासून दुरावलेले असतो आणि अशा वेळी एखादे प्रेम गीत किंवा विरह गीत कानावर पडले तर आपल्या समोर ती व्यक्ती येते, त्या व्यक्ती बरोबरच्या आठवणींचा एक पट आपल्या डोळ्यासमोरुन जातो. आणि डोळे आपोआप भरून येतात. असे वाटते कि हे गाणे त्याही व्यक्तीने ऐकावे कि जेणेकरून त्या हि व्यक्तीला आपल्या भावना कळतील .  

आपल्यामध्ये असे खूप जण असतील (माझ्यासारखे) ज्यांना कदाचित गाण्यातलं जास्त काही काळात नाही पण गाणी ऐकायला मनापासून आवडते. चांगल्या गाण्याला दाद द्यायला आवडते. सगळीच गाणी मी आवडीने ऐकते पण अभंग मला जास्त भावतात (किंवा तो एकाच प्रकार मला 🙂). आवडते गाणे एकाच वेळी १० वेळा ऐकायला आवडते, मग ते जुने असो किंवा माझ्या आजोबांच्या काळातले असो. कितीतरी वेळा आपण गाणे म्हणताना चुकीचे शब्द अगदी बिनधास्त गातो कधी कधी ते खपूनही जातात. पण समोर कुणी जाणकार असेल तर मग आपली फजिती लक्षात येते. गाण्याचा प्रकार कळण्यापेक्षा त्यातले भाव हृदयाला भिडणे जास्त महत्वाचे आहे.

आपल्या मनातील भावना उलगडण्याचे एक उत्तम मार्ग म्हणजे गाणे.  कदाचित हि गाणी आहेत म्हणूच आपले जीवन थोडे सुखकर आहे. त्या गाण्यांच्या ओघात आपण कधी कधी आपले सगळे दुःख विसरून जातो आणि नकळत आपल्या ओठावर हसू फुलते. गाणे कुठल्या प्रकारात मोडते हे माहित असण्यापेक्षा ते गाणे मनापासून ऐकणारे कान असावेत .  गाणे ऐकताना डोळे मिटून तल्लीन होणारी व्यक्ती हि गाण्याची खरी दर्दी. 

                            " जीवन गाणे गातच जावे , झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे" 






Tuesday, 2 July 2019

गंमत भीतीची

आजचा लेख हा अगदी सहज सुचलेला लेख आहे काहीच लिहायला नव्हते म्हणून केवळ वेळ जावा म्हणून हा लेख. 

आता चहा पीत खिडकीत उभी असताना  सहज म्हणून खाली पाहिले तर लहान मुले क्लास हुन सुटली होती. कंपाऊंड मध्ये साचलेल्या पाण्यात त्यांची मजा सुरू होती, एकमेकांवर पायाने पाणी लोटताना एकाचा दुसऱ्याला पाय लागला तर त्याने लगेच त्याला नमस्कार केला ( लोटांगण नाही त्याच्या अंगाला ओझरता स्पर्श करून तो हाथ आपल्या माथ्याला लावला) अगदी साधी सरळ क्रिया पण मला यातून वेगळेच आठवले.

अशा कितीतरी गोष्टी होत्या ज्या परंपरेने आपल्याला त्याची भीती घातली जायची आणि आपणही तीच भीती आपल्या मुलांनाही घालत आलो. अशाच काही जुन्या गोष्टीना उजाळा.

आपण लहान असताना आपल्याला भीती घातली जायची असा कुणाला पाय लावला की देवबाप्पा रागावतो हा म्हणून लगेच नमस्कार करायला लावायचा.  यात संस्कारापेक्षा भीती जास्त दाखवली जायची . आणि आपणही तेव्हाही आणि अजूनही कुणाला पाय लागला की लगेच नमस्कार करतो. कधी कधी मस्करी मध्ये एखाद्याला म्हणतो ही की मुद्दाम लाथ मारायची आणि मग हे नाटक किंवा एकदाच काय ते लाथा मारून घे आणि एकदाच काय तो साष्टांग घाल.😊

 मुलं जेवत नसले की लवकर जेव नाहीतर बुवा पकडून नेईल, ही सगळ्यात पहिली भीती...नंतरही बरेच वेळा हे करू नकोस बुवा येईल , ते करू नकोस बुवा येईल. गंमत म्हणजे हा बुवाला कधी कुणी पाहिलेला नसायचा आणि हा बुवा नक्की कोण हे विचारायची अक्कल आणि हिंमत आमच्या पिढी पर्यंत नव्हती (आताची मुले खूपच स्मार्ट आहेत).  कधी कधी बुवा म्हणून दाखवला जायचा तो म्हणजे घरातलेच कुणीतरी डोक्यावर पांघरूण घेऊन यायचे, सगळे लाईट घालवले जायचे आणि मग विचित्र आवाज काढून घाबरवले जायचे.

मारामारी करताना डोक्याला डोकं आपटले की कुणीतरी म्हणायचे "आता तुम्हाला शिंग येणार" आणि शिंग येऊ नयेत म्हणून परत एकदा एकमेकांच्या डोक्यावर डोकं आपटायचे. ते दोन घाबरलेले जीव आपल्याला शिंग कसे दिसेल या विचाराने अजून जोरानं टक्कर द्यायचे. या मागचे लॉजिक अजून कळलेलं नाहीये. एकदा मारून एक येणार तर दोनदा मारून दोन यायला हवेत ना? नाही येणार म्हणजे ते उगवणारे शिंग दुसऱ्यांदा आपटून लगेचच आत टाकून द्यायचे असे का??? किंवा आलेच तर एक वाईट दिसेल म्हणून दुसरे😀😀😀

अजून एक भीती ती तर गंमतच. कुठलेही फळ खाताना त्याची बी गिळली की पोटातून म्हणे त्याचे झाड उगवते. अर्थात फळं खाताना ती नीट बघून खावीत म्हणून हे सांगितले जायचे हे कळायला फार उशीर होतो. तोपर्यंत आपण बऱ्याच वेळा चिकू, पेरू, कलिंगड अशी बरीच झाडे आपल्या पोटातून आपण उगवताना  आपण कल्पना करून झालेले असतो.  किती वेळा तर बेंबीतून झाड (वेल) आलीय असे चित्र ही काढून झाले असेल वहीच्या शेवटच्या पानावर.

आपण सगळेच लहान असताना पोलिसांना घाबरतो याला कारण ही आपल्याला घातलेली भीती.  घरातली मुले खूप मस्ती करत असली अजिबात ऐकत नसली की मग कुणीतरी म्हणते " आता मस्ती थांबवा नाहीतर पोलीस पकडून नेतील". ही धमकी तर  वारंवार दिली जायची. रस्त्यातून जाताना पोलीस दिसले की धडकी भरायची. कित्येकदा तर आईच्या मागे लपून राहायचे. 
माझ्या सारख्या बऱ्याच डरपोक लोकांना अगदी खरी वाटावी अशी गोष्ट म्हणजे भूत. आता माणसेच भुतासारखी वागतात ती गोष्ट वेगळी. रात्रीच्या वेळी बाहेर पडायचे असले की अरे तिथं जाऊ नको भूत असते. कींवा रडू नको हा तो राक्षस येईल आणि तुला खाऊन टाकेल. आणि जरा कुणी विचित्र आवाज केला की आपली इथे टरकायची. आणि कुणीतरी सांगितले असायचे की रामाचे नाव घेतले की भुतं पळून जातात म्हणून  भीती वाटली रे वाटली की राम नामाचा जप सुरू करायचा.

सगळ्यात गंमत होती ती खोटे बोललं की सांगितले जाणारी... खोटं बोललो की बाप्पा कान कापतो...असे कुणीही नसेल की ज्यानी हे वाक्य ऐकले नसेल. पण तरीही कधीतरी लबाडी केली जायचीच आणि मग झोपताना कानावर हाथ धरून झोपायचे किंवा उठल्यावर आधी कान तपासायचे आहेत का?  प्रत्येक वेळी खोटं बोललो की ही भीती मात्र कायम असायची.

अजूनही काही गोष्टी आहेत ज्या भीती कमी आणि अंधश्रद्धा जास्त अशा आहेत त्यावर नंतर कधीतरी....

पण काहीही म्हणा त्या खोट्या भीती ची ही भीती वाटायची.  पण आता खरेच रोजच्या आयुष्यात इतक्या गोष्टी वाईट घडतात की माणसांची भीती पळून चालली आहे.  रोजच्या धकाधकीच्या जीवनात इतका व्यग्र झालाय की माणसाला सगळ्यात जास्त वाटणारी मृत्यू ची भीती ही वाटेनाशी झाली आहे. 













Friday, 28 June 2019

चहा - तुमचा माझा...सगळ्यांचा

छान पाऊस पडतोय , गरमागरम भजी आणि कडक आले घातलेला चहा होऊन जाऊ दे ... असा संवाद आता पावसाळ्यात आपल्याला सर्रास ऐकायला मिळतो. तर "चहा,  नको रे बाबा!! मला ऍसिडिटी होते " हे वाक्य तर दहातली नऊ जण म्हणताना आपण ऐकतो. तरीही चहा हे नक्कीच एक अमृतपेय आहे.  काही म्हणा पण या मुसळधार पावसात गरमागरम वाफाळता चहाचा कप घेऊन गॅलरीत किंवा खिडकीत बसून त्याचा आस्वाद घेण्याचे सुख काही औरच.

मला कॉफी हे श्रीमंतांचे पेय वाटते, तर चहा गरिबांपासून श्रीमंतांचे सगळ्यांचे लाडके पेय आहे.  एखाद्या मोठ्या कॉफी शॉप मध्ये जाऊन २५०-३०० रुपयाची ती कडू कॉफी पिण्यापेक्षा , टपरीवरचा १० रुपयाचा चहा जास्त चांगला वाटतो. अर्थात प्रेस्टिज म्हणून कधीतरी ते हि करायला हरकत नाही.

भरपावसात गाडीतून लांब फिरायला जावे आणि वाटेत असणार्‍या चहाच्या टपरीवर गरम गरम चहा आणि कांदा भजी खावी काय ते  स्वर्गीय सुख. तुम्ही कधी अनुभवलं आहे का ? आपल्या कुठल्याही पिकनिकचे किंवा कुठल्याही प्रवासाची सुरुवात आणि शेवट हा टपरीवरच्या चहानेच होतो.

प्रत्येक नाक्यावर अशी एक तरी टपरी असते जिथे चार मित्रांची टोळकी जमतात, तिथे मित्रांचे कट्टे  लागतात. गप्पा होतात, मोठे  मोठे डिस्कशन होतात. कटिंग आणि वडापाव किंवा कटिंग  आणि भजी ची पार्टी होते, लाखोंच्या उलाढालीत होतात , नाटक सिनेमाची बोलणी, आखणी होतात, कितीतरी कलाकार अशाच टपऱ्यांवर लहानाचे मोठे झाले असतील. कोणाच्या घरची  टेंशन तेथे शेअर केली जात असतील तर कोणाचे आनंदाचे क्षण साजरे केले जातात. 

 आपल्यातल्या बहुतेक जणांची दिवसाची सुरुवात ही सकाळच्या चहाने होते. एक  ठराविक प्रकारच्या स्वादाचा  चहा मिळाला  की दिवस कसा भन्नाट जातो.  "अरे सकाळी चहा घेतल्याशिवाय मला  प्रेशर येत नाही " येत नाही  असं वाक्य म्हणणारा प्रत्येक घरात एक तरी माणूस असतोच. घरात कधी कधी प्रत्येकाला वेगळा चहा लागतो म्हणजे कुणाला बिनसारखरेचा, कुणाला दुधाचा, कुणाला खूप उकळवलेला तर कुणाला  बिना दुधाचा. एक चहा पण घरातल्या घरातही त्याचे किती प्रकार. म्हणे हवा तसा चहा मिळाला नाही तर किक बसत नाही. बरे जसे चहा चे प्रकार वेगळे तसा प्रत्येकाचा चहाचा कप हि वेगळा असतो ठराविक कपात चहा प्यायल्या शिवाय तो प्यायची मजा येत नाही.

 खरेतर चहाचे म्हणजे चहा पावडर चे हि खूप प्रकार असतात पण  आपल्या सामान्य माणसांसाठी चहा म्हंटला कि तो टाटा, लिप्टन , सोसायटी किंवा ताज हेच डोळ्यासमोर येतात. आमच्या लहानपणी ताजमहल चहाची जाहिरात लागायची या जाहिरातीत दस्तुरखुद्द पं. झाकीर हुसेन असायचे, त्यामुळे  मला नेहमी वाटायचं हा चहा फक्त श्रीमंतांसाठी असावा. एवढा मोठा माणूस जाहिरात करतोय म्हणजे. कारण  बाकीच्या चहाच्या जाहिरातीत कोणीतरी अगदी आपले सामान्य चेहरे असायचे.  आमच्याघरी  आई पूर्वी ममरी चहा घेऊन यायची , तेव्हा हे ब्रँड वगैरे चे प्रस्थ जास्त नव्हते. नंतर मात्र तिची गाडी सोसायटी  चहावर जी वळली की अजून पर्यंत त्याच्यावरच होती. 

चहा म्हणजे दोन मनांना एकत्र आणणारा दुवा होतो कधी कधी. चहा पिता पिता आपण खूप साऱ्या गप्पा मारतो  समोरच्यासोबत . एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण खूप दिवसांनी भेटली कि " चल , कुठेतरी बसून मस्त चहा पिऊ आणि गप्पा मारू. " हे वाक्य अगदी ठरलेले असते. चहा फक्त बहाणा असतो , तो  वेळ असतो जो आपल्याला समोरच्यासोबत घालवायचा असतो. लग्नाच्या आधीहि चहा आणि कांदे पोह्यांचा कार्यक्रमच होतो. पहिली भेट हि चहा पासूनच सुरु होते (आता कॉफी ने).  चहासोबत आपण बऱ्याच विचारांची हि देवाणघेवाण करतो. एक चहा दोघात मिळून प्यायची मजा हि न्यारीच. एकाने चहा कपात तर एकाने बशीत चहा प्यायचा. 

आपल्याकडे कुठल्याही वेळी पाहुणे आले तरी आपण आधी हेच विचारतो चहा घेणार ना. हल्ली सीजन प्रमाणे विचारणे बदलले आहे हि गोष्ट वेगळी. पण सुरवात मात्र चहानेच होते. " अहो जास्त नाही , अर्धा कप तरी घ्या " म्हणून आग्रह केला जातो. दुपारचे जेवण कितीही उशिरा झाले असले तरी ४-४.३० ला घरातल्या पुरुष मंडळींचे फर्मान येतेच "चला चहा टाका आता चहाची वेळ झाली."  ऑफिस मध्ये काम करून कंटाळा आला कि मित्रांसोबत टी टाइम म्हणून टपरी वर जाऊन एक कटिंग आणि सोबत एक सिगारेट ... . डोळ्यावर झोप आली कि पटकन एक अर्धा कप चहा मारायचा सगळी झोप गायब. काही म्हणा चहा म्हणजे पण एक नशा आहे , वेळेत नाही मिळला कि जीव कासावीस होतो. आणि एकदा सवय लागली कि ती सुटणे फार कठीण. ह्या चहाचे ज्याला व्यसन लागते ना त्यांना तुम्ही कधीही विचारा चहा घेणार का ? हो अर्धा कप चालेल असे त्यांचे उत्तर ठरलेले असते. 


एरवी हायजिन म्हणून ठराविक ठिकाणीच खाणारी लोक हि चहा मात्र कुठेही पितात. मग ती सायकल वर किटली घेऊन येणाऱ्या पोऱ्या कडची असो , कि एखाद्या कळकट्ट टपरी वरची , कि चाय गरम, चाय म्हणत ट्रेन मध्ये ओरडत येणाऱ्या त्या माणसांकडची असो. चहाला कसलेच बंधन नसते. जसे चहा कुठे प्यायचा यावर बंधन नाही तसे चहा बरोबर काय खायचे याला हि मर्यादा नाही. म्हणजे चहा सोबत काही खपून जाते म्हणजे चहा सोबत वडापाव खा, किंवा खारी खा , किंवा फरसाण खा. सगळे चांगलेच लागते. शिळी चपाती तुपावर गरम करून ती चहा सोबत खाणे हा बऱ्याच जणांचा नाश्ता असेल बालपणी. चहा सोबत भरपूर बटर लावलेला पाव असेल तर त्याची मजा काही औरच ... सुटले ना तोंडाला पाणी.
 
आम्ही मैत्रिणी जेव्हा जमतो तेव्हा रात्रभर जागरण असते, पण मी लवकर झोपते ,  त्याची शिक्षा म्हणून मला मध्यरात्री कधीतरी उठवून चहा बनवायला सांगतात. मी आपली  अर्धवट झोपेत चहा बनवते पण ह्या आपल्या चहाला नाव ठेवायला तयार. साखरच जास्त झालीय, दूधच जास्त आहे, आले कमी झालेय नीट उकळला नाहीये. थोडक्यात काय तर मला चहा नीट बनवायला जमत नाही. आता हे वाक्य इथे टाकण्याचे कारण तुम्ही सुज्ञ वाचकांनी जाणलेच असेल. (बरोबर हे वाचून कधी येऊ चहासाठी असे विचारायला नको म्हणून 😃😃😃😃

चहा जसा सगळ्या वर्गातल्या लोकांचा तसाच तो सगळ्या ऋतूंचा हि आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात चहा हि गरज असते. पण उन्हाळ्यात उकडतेय म्हणून चहा न पिणारे लोक विरळाच. दिवसातून एखादा चहा झाला नाही तर दिवस सार्थकी लागत नाही आपला. मला चहा ना आवडणाऱ्या लोकांचे नवल वाटते. एका अमृतपेयाला मुकतात असे वाटते. 


माझ्या बकेटलीस्ट मधली अजून एक इच्छा आहे कि एकदा तरी ताज हॉटेल ला जाऊन चहा प्यायचा. कारण तोच बहुधा परवडणारा असेल 😃😃. कधीतरी नक्कीच होईल पूर्ण हि इच्छा. 

खरेतर चहा वर खूप तज्ञ लोकांचे लिहून झालेय म्हणून विचार करत होते लिहू कि नको. पण मला वाटते कि हे जे लिहिले आहे ते आपल्या सामान्य माणसांच्या मनातला चहा आहे.  आणि जिच्यामुळे  हा ब्लॉग लिहायची माझी इच्छा प्रबळ झाली  ती "हर्षा पेणकर" , आमचे दोन चहा प्रेमी " विकी" आणि "आकांक्षा" हा ब्लॉग खास तुमच्या साठी. 💖 

" चहाला वेळ नसते .... पण वेळेला चहाच लागतो "  

चला तर मग सगळ्या चहा प्रेमींनी एखादी "टी " पार्टी करायाला हरकत नाही.  मौसम भी है दस्तूर भी है  . . . . . . . . . . . . काय म्हणताय मग येताय ना चहा प्यायला.