Saturday, 22 September 2018

आपली माणसे

काल एका मित्राचा फेसबुक प्रोफाइल बघताना त्याची एक जुनी  पोस्ट वाचली " आपली माणसे खरेच आपली असतात का ?' त्यावरचे कंमेंट काही वाचले नाहीत. पण मनात विचार आला कि हा प्रश्न तर कधी ना कधी प्रत्येक माणसाला पडत असेल ना. खूप साधा सरळ प्रश्न पण  अंतर्मुख करणारा ,त्याचे उत्तर तितकेच कठीण ना !!!
मुळात या प्रश्नाच्या उत्तराची सुरवातच एका प्रति प्रश्नाने होते असे मला वाटते तो म्हणजे नक्की हि आपली माणसे कोण?  आपली जी रक्ताच्या नात्याने जोडलेली आहेत ती? कि जी वैचारिक पातळीवर आपल्याला हवी असतात ती? कि काही कारण नसताना ज्यांच्याशी आपल्याला बोलावेसे वाटते भेटावेसे वाटते ती ?
 आपली माणसे म्हटले कि रक्ताच्या नात्यातील, नातेवाईक, नवरा बायको, हीच लोक आपल्या डोळ्यासमोर येतात. आपला विचारांचा प्रवाहच इथून सुरु होतो. हि आपल्या माणसांची व्याख्या वेळ आणि काळ आणि गरज यानुसार बदलते बहुतेक. आपला मनुष्य स्वभावच कदाचित तसा आहे. जसे एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला वेळ देत असते, आपल्यासाठी काही करत असते तेव्हा ती आपल्याला आपल्या जवळची वाटते. पण तीच व्यक्ती जर कधी आपल्याला वेळ देऊ शकली नाही कि आपण लगेच त्या व्यक्तीला परके करून टाकतो. कधी कधी हा हि विचार करत नाही कदाचित त्या हि व्यक्तीला काही अडचण असेल. कुठेतरी त्याही व्यक्तीचे हात बांधलेले असतील.
काही वेळा असेही होते कि आपण कुणाच्या तरी खूप जवळचे असतो , आपल्या नातेवाईकांपेक्षा , घरच्यांपेक्षा , मित्रमैत्रिणीपेक्षा पण हि गोष्ट आपण उघडपणे नाही बोलू शकत. कारण कधी कधी समाजाची, किंवा कोण काय म्हणेल या भीतीने , आजूबाजूच्या परिस्थितीमुळे, आपल्याला काही माणसे जवळची असूनही त्यांच्याशी चारचौघात परकेपणाने वागावे लागते. हि गोष्ट कदाचित जास्त त्रासदायक असते प्रत्येकासाठीच.
असे म्हणतात कि हल्लीच्या जगात कुणीच कुणाचे नाही. काही अंशी हे खरे हि वाटते. हल्ली नवरा बायको सारखे पवित्र बंधनात बांधलेले नाते हि तुटते. आपण नेहमीच ज्यांना आपले म्हणतो अशी आपली मुले ती हि कधी कधी आईवडिलांना सोडून निघून जातात, मग कुणीतरी शेजारी पाजारी , वृद्धाश्रमातील त्यांच्यासारखीच एकटी पडलेली काही मंडळी त्यांना सोबत करतात त्यांना संभाळतात  मग अशा वेळेला प्रश्न पडतो कि नक्की कोण आपले आणि कोण परके?
कधी वाटते कि जिथे आपण समोरच्या माणसांकडून अपेक्षा ठेवायला लागतो ना तिथेच आपल्या परक्याचा भेद सुरु होतो. एखाद वेळी जर आपण खूप आपली मानणारी व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा एक तर त्या व्यक्तीची आपल्याकडची गरज संपलेली असते किंवा ती व्यक्ती खरेच कधीच आपली नसते. फक्त आपणच त्या व्यक्तीला आपले समजून गमवायला घाबरत असतो. समोरच्या व्यक्ती साठी आपण कधी त्यांच्या जवळचे नसतोच. 
कधीतरी आपण एखाद्याला आपलेसे समजून त्या व्यक्ती साठी खूप काही करतो. त्याची काळजी घेतो, त्याला सर्व प्रकारे मदत करायचा प्रयत्न करतो. पण त्या व्यक्तीला फक्त आपल्या कामाशी काम असते. अशा वेळेला मग वाटते कि आपल्यासाठी जवळची असणाऱ्या व्यक्तीसाठी आपण कुणीच नाही. एकतर्फी प्रेमासारखे हा हि एकतर्फी आपलेपणाचा झाला नाही का ? 
तर कधीतरी एकदा किंवा दोनदाच भेट झालेल्या व्यक्ती बद्दल आपल्याला आपले पणा वाटू लागतो आणि हीच भावना समोरच्या व्यक्तीची ही असते.
आपली माणसे हि नेहमी आपलीच असतात पण आधी आपली माणसे कोण हे ओळखता यायला हवे. जी माणसे आपला विचार न करता आपल्याला सोडून कधीही परत न येण्यासाठी निघून जातात ती कधीच आपली नसतात. जी माणसे कसलीही अपेक्षा ना करता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात, आपल्या गुणदोषांसकट आपल्याला स्वीकारतात, आपल्या दुःखात ज्यांच्या डोळ्यात पाणी येते आणि आपल्या आनंदात ज्यांच्या ओठांवर हसू फुलते, आपल्या प्रगतीसाठी जी मनोमन प्रार्थना करतात, आपल्याला कधीही मागे ओढायचा प्रयत्न करत नाहीत, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचे ज्यांना कौतुक असते, लांब राहूनही ज्यांना आपली आठवण असते,   तीच खरी आपली माणसे. आणि जर समोरची व्यक्ती जर तुम्हाला १००% आपले मानत असेल तर आपण निदान ५०% तरी त्या व्यक्तीचा विचार करावा. कारण जेव्हा आपल्याला कुणाबद्दल तरी प्रश्न पडतो कि आपली माणसे आपलीच असतात का तेव्हा हा हि विचार करावा कि आपल्याबद्दल हि कुणीतरी कुठेतरी हा विचार करत असेलच ना.

मला एक नक्की सांगावेसे वाटते मला हि अजून या प्रश्नाचे उत्तर पूर्णपणे सापडले नाहीये कि आपली माणसे खरेच आपली असतात का? पण मी मनापासून जोडलेली माणसे खरंच माझी आहेत आणि जी मला आपली वाटतात त्यांनी मला आणि मी त्यांना त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारले आहे. 

आणि हो मित्रा  तुझे खूप खूप आभार तुझ्या एका वाक्यावर मला इतके लिहिता आले. माझ्या आपल्या माणसांमध्ये तू हि आहेस बरं का 🙂🙂🙂


Wednesday, 19 September 2018

मिलन- एक अजब रसायन

हा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्या मैत्रिणीने (मुक्ता कदम) माझ्यासाठी लिहिलेले ४ शब्द. खऱ्या अर्थाने मैत्रीचे चीज झाले. मुक्ता खूप खूप धन्यवाद. तसेच भूषण तुलाहि.

 
गेले दोन वर्ष मिलन चे बरेच लेख वाचले. तिने लिहिलेले व्यक्ती विशेष तर उत्तमच. जणू काही आपण त्या व्यक्ती ला भेटतोय असे लिखाणातून जाणवते. म्हणून विचार आला कि अशा हरहुन्नरी, सतत सर्वांसाठी २४ * ७ मदत करायला तयार असणाऱ्या मिलन वर  आपण हि दोन चार वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करावा. सध्या माझ्या आयुष्यातली  मैत्रीण, फिलॉसॉफर, गाईड, आणि हो फिनान्शिअल कन्सल्टन्ट म्हटले तरी चालेल अशी एकमेव व्यक्ती ती आहे. तसेच मला अजिबात कंटाळा न करता मेहंदी काढणारी ही फक्त तीच  आहे.
मिलन आमच्या शाळेत दहावीत आली आणि सर्वांमध्ये लगेच मिसळून गेली. लोकांना आपलेसे करायचे कसब आधी पासूनच आहे तिच्याकडे. मला आठवते ती आणि मी  बऱ्याच वेळा मधल्या सुट्टीत शाळेजवळच्या दुकानात पान पसंद च्या गोळ्या खायचो. नंतर कॉलेज , लग्न या काळात भेटी थोड्या कमी झाल्या. २००८ मध्ये आमचे पहिले गेट टू गेदर झाले त्या नंतर आम्ही परत कॉन्टॅक्ट मध्ये आलो.या नवीन भेटीत आधी आम्ही फक्त चॅट फ्रेंड्स होतो. पण लकीली आमच्या ट्रेन हि कधी सारख्या तर कधी मागे पुढे असायच्या. मग ओघाने एकमेकांसाठी थांबणे आले. ट्रेन मध्ये हि आमच्या पैकी एक कोण नसेल तर बाकीच्या बायका विचारायच्या आज दुसरी कुठे?  मिलन ला सगळे माझी वसई वाली मैत्रीण म्हणून ओळखायच्या.  स्टेशन वर उतरलो कि मग विवा जवळ परत गप्पा. त्या कधी संपायच्याच नाहीत. भाजी च्या पिशव्या घेऊन हात दुखले तरी तिथेच उभे असायचो. 
माझी एक्सेल गुरु, ऑनलाईन बँकर हि तीच. माझे गणित एकदम भारी आहे आणि माझ्या आई नंतर ते बहुतेक तिलाच समजले आहे. तिच्या मुळे खरेच बरेच पैसे वाचलेत माझे. मी हिशोबात नेहमी घोळ घालते मी आणि मग मिलन तो निस्तारून देते.  माझे नेट सेट क्लिअर करायला हि तिने खूप मदत केली. माझे परीक्षेचे % नेहमी तीच काढून देते. मला आठवतेय  मी जेव्हा अमेरिकेला गेले होते फिरायला तेव्हा मला सामानाची लिस्ट करून द्यायलाच नाही तर माझी खरेदी , ऑनलाइन रिचार्ज करणे हे सगळे  ती स्वतःहून करत होती. तिच्याशी तिथून स्काईप वर बोलताना मी खूप खुश असायचे. माझ्या घरच्यांना हि आश्चर्य वाटायचे काय इतके बोलते हि मिलन शी.

मिलन च्या मैत्री मध्ये लहान, मोठे, गरीब, श्रीमंत असे भेदभाव कधीच नसतात. अगदी ट्रेन मधले कुणी असो किंवा दुकानातली कुणी सेल्स गर्ल ,किंवा तिच्या  आजूबाजूचे, कुणा  मित्रमैत्रिणीचे पालक असोत, किंवा शाळेतल्या बाई ती सर्वांशी मोकळे पणा ने बोलते. तिच्या या स्वभावामुळे तिने खूप माणसाने जोडली आहेत. पण मला हे खटकते कारण मला वाटते तिने फक्त माझ्याशीच बोलावे ( काय करू स्वभाव आहे माझा तसा ). सगळ्यांना मदत करणे हा तिचा प्लस पॉईंट आहे. कुणी न सांगताच हि नेहमी मदत करायला तयार असते. अर्थात फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक आहेत जे तिच्या मदतीची, ती घेते त्या काळजीची जाणीव ठेवतात. आणि असे हि लोक आहेत ज्यांना तिचा हा स्वभाव आवडत नाही. असो पण या सगळ्याचा विचार करेल तर ती मिलन कसली. 
अजून एक तिचा प्लस पॉईंट जाणवला तो म्हणजे तिला जर का एखादे सीक्रेट सांगितले तर ते तिच्याकडे कुलूपबंद होऊन जाते. अशी कित्येकांची कितीतरी सिक्रेट्स तिच्या कडे असतील पण ती त्याचा कधी गैरफायदा घेणार नाही कि कुणाकडे बोलून दाखवणार नाही.

वरून जितकी खंबीर वाटते ना तितकीच ती आतून हळवी आहे. कोणी तिच्याशी बोलले नाही , रागावले तर तिला लगेच वाईट वाटते. विचार करत राहील कि आपले काही चुकले का? तिला किती वेळा सांगितले कि दुसऱ्यांची काळजी करून स्वतःला त्रास करून घेणे   सोडून दे  पण नाही स्वतःला त्रास झाला तरी समोरच्या व्यक्तीला ती दुखावणार नाही. 
 मिलन आणि मंदार नेहमी आमच्या बॅच च्या  गेट टू गेदर साठी प्रयत्न करतात. मला नेहमी वाटायचे मिलन आपल्याला सगळे सागंते म्हणजे तारखा, अरेंजमेंट ,पण तसे नसायचे काही गोष्टी ती मला सगळे ठरल्यावरच सांगते. त्यातूनच मग काही गैरसमज निर्माण झाले होते. पण अशा समज गैरसमजातून च आमची मैत्री वाढत गेली. कित्येकदा तर तिच्यावर रागावून मी तिला ब्लॉक हि केले होते. पण असा एकही दिवस गेला नसेल कि तिचा विचार आला नाही मनात. माझ्या कुटुंबानंतर मला जर कोणी जवळचे असेल तर ती मिलन. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही एकमेकींशी शेअर करतो. 
अर्थात तिला जवळची अशी बरीच माणसे आहेत. 
आता नोकरी सोडल्यापासून मिलन स्वतः साठी जगायला शिकली आहे. स्वतःसाठी वेळ द्यायला लागली आणि त्यातूनच एक लेखिका जन्माला आली. मिलन तुझा हा छंद असाच वाढू दे. सतत काही ना काही काम करत राहणे हे हि आवडते काम आहे तिचे. कधीही  विचारले काय करते आहेस तर ती कधी बोलणार नाही काहीच नाही असे. सतत काहीतरी उद्योग सुरूच. 
जरा दुसऱ्यांचा विचार कमी केलास आणि समोरच्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले (मग ते घरचे असोत कि मित्रमैत्रिणी  )  तर तुझे आयुष्य अजून सुंदर होईल. 
मिलन  नावाप्रमाणे " Bringing Together " या गोष्टीला आपले ब्रीदवाक्य बनवले आहे. 

आम्हा सगळ्यांना जोडून ठेवणारा दुवा आहे ती.