Wednesday, 14 February 2018

( रिटर्न गिफ्ट...... महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स १४. ०२. २०१८ )

 मी दुसरी किंवा तिसरी मध्ये होते. चेंबूर ची 'आमची शाळा' माझी शाळा. रास्ता क्रॉस केला की माझ्या शाळेची इमारत होती. माझी आजी मला शाळेत सोडायला यायची. आजी सोडायला नसेल येणार तर मला शाळेत जायचा कंटाळा येत असे. नेहमी आजी शाळेत सोडून गेली की मी रडायचे, आजीला सोडून शाळेत बसायला नको असायचे. म्हणून थोडा वेळ थांबून मग  आजी घरी जात असे. माझा वर्ग पहिल्या मजल्यावर होता तरी मी तळमजल्यापर्यंत आजीच्या मागून येत असे. असेच एक दिवस आजी मला शाळेत सोडून गेली. आधी रडून झाले मग मी आमच्या वर्गाच्या दुसऱ्या दरवाज्यातून खाली आले. कोणाचे लक्ष नाही बघून ग्राउंड मधून रस्त्यावर धूम ठोकली. पण आमचे बाबाजी काका जे बाहेर ग्राउंड साफ करत होते (त्यांची झाडू घेऊनच) आणि जाधव बाई दोघे माझ्या मागे धावत आले. तो पर्यंत मी रस्ता ओलांडून घरी पोचले होते आणि आशा मावशी मारेल या भीतीने लपून बसले होते.  बाबाजी काका घरी आले आणि मावशीला सांगितले की मी शाळेतून पळून आलेय. मावशीने मला मी लपलेल्या जागेवरून खेचून बाहेर काढून मला त्यांच्या सुपूर्त केले. 
मग भोकाड पसरलेली मी , मावशी, बाबाजी काका आणि जाधव बाई अशी आमची वरात शाळेत पोचली. बाईनी खूप समजावले पण काही केल्या मी शाळेत बसायला तयार नव्हते. तो दिवस जेमतेम शाळेत बसले नंतर जवळजवळ आठ दिवस शाळेत गेले नाही. बाई एकदा घरी ही येऊन गेल्या आणि म्हणाल्या की तू नीट शाळेत आलीस ना तर मी तुला गंमत देईन.  पण मी काही ऐकेना. कसेबसे समजूत काढून, तर थोडेसा दम देऊन एक दिवस मला शाळेत नेले. मला अजूनही आठवतात त्या बाई घारे डोळे , कुरळे केस. बोलणें अगदी मृदू. सातपुते बाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या त्या. शाळेत गेल्यावर त्यांनी मला जवळ बोलावले. मला खूप भीती वाटत होती एक तर मार तरी पडेल नाहीतर ओरडा बसणार. पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडले सांगितल्या प्रमाणे बाईनी मला पूर्वी मिळत ना मोठ्या मागे रबर असलेल्या आणि पंजाच्या आकाराचे टोपण असणाऱ्या दोन पेन्सिल दिल्या आम्ही त्याला 'हातवाल्या पेन्सिल' म्हणायचो. म्हणाल्या अशीच शाळेत शहाण्या बाळासारखी येत जा. मी खूप खुश होते. सगळ्यांना  त्या पेन्सिल दाखवत सुटले होते. गिफ्ट म्हणजे काय असते हे न कळणाऱ्या वयात मला आमच्या बाईनी मला  छान रिटर्न गिफ्ट दिले होते. त्या गिफ्ट च्या निमित्ताने का होईना मला शाळेची भीती गेली ती कायमची. परत मात्र अगदी आजारी असतानाही कधी शाळा किंवा कॉलेज ला दांडी मारली नाही.


Tuesday, 13 February 2018

माणुसकी

ही एक सत्य घटना आहे. त्या व्यक्तीचे  नाव न लिहिता माझ्या शब्दात मी ही मांडत आहे.
एक वयस्कर जोडपे. मुलबाळ काही नाही. बाईंनी नेमाने आपले घर सांभाळले. आणि नवरा किती तरी वर्षे भिक्षुकी चे ( पौरोहित्य) काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. वयपरत्वे दोघेही थकले होते. काकांना तितके काम होत नव्हते. पण आधी साठवून ठेवलेल्या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. तसेच जवळ असलेली भावंडे ही थोडी थोडी मदत करत होते.
काकांचा एक रिक्षावाला ठरलेला होता.  काकांना कुठेही पूजेला जायचे असेल, काही सामान आणायचे असेल तर तो रिक्षावाला सतत त्यांच्या सोबत असायचा. उतरत्या वयामुळे काका काकू दोघांमध्ये ही चिडचिडेपणा आला होता. आणि आता दोघांनाही बाहेर जाणे झेपत नव्हते त्यामुळे त्यांच्या बाजारहाटाची जबाबदारी ही त्या रिक्षावल्यावर आली होती. तो ही नेटानं सगळी कामे करत होता.
काकांचे घर  तळमजल्यावर वरच होते आणि घराच्या गॅलरी ला ही एक दरवाजा होता त्यामुळे त्यांना बाहेर पडताना जिन्यापर्यंत जाण्याची गरज पडत नव्हती. काकांना स्थूलपणामुळे जास्त चालता येत नसल्याने ते त्या मागच्या दाराने बाहेर येऊन एक दोन फेऱ्या मारत.
‌असेच एक दिवसभराची कामे आटपून दोघे काका काकू झोपायला गेले. काका नेहमी त्या मागच्या दाराच्या जवळच्या बेड वर झोपत. सकाळी नेहमी प्रमाणे काकू उठल्या बघतात तर काका जागेवर नव्हते. आधी त्यांनी घरात शोधलं. बाथरूम टॉयलेट सगळे बघितले पण काका नव्हते. मग झेपत नसतानाही त्या घराबाहेर पडल्या आजूबाजूला पाहिले पण काका कुठेच नव्हते. त्या घाबरल्या काका कुठे गेले? नक्की काय झाले असेल? हजार प्रश्न. रिक्षा शिवाय काका कुठे जात नसत,  मग नक्की गेले कुठे? त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन केले .  सगळीकडे काकांची शोधाशोध सुरू झाली. आजूबाजूच्या सोसायटी मध्ये, नातेवाईक , मित्र मंडळी  सगळ्या  ठिकाणी फोन करून विचारून झाले . पण काकांचा कुठेच पत्ता नाही . सीसीटीव्हीत मध्ये पाहून झाले पण फक्त गेटपर्यंत जाताना दिसले. पुढे काय ? कुठे गेले? आता मात्र सगळेच घाबरले. शेवटी काकांचा फोटो घेऊन पोलीस ठाणे गाठले. तिथे हरवले आहे मध्ये काकांचे नाव आणि फोटो दिला. आधी कुणी तसेच कुठे सापडले आहे का पाहिले , बाकी शक्यता ही पडताळून पहिल्या. पण तशी काही नोंद नव्हती.  पोलिसांनी नियमाप्रमाणे २४ तासांनी तक्रार नोंदणी करू असे सांगितले. काका मिळतील या एकमेव आशेवर हतबल होऊन सगळे घरी निघाले. हे सगळं करताना काकांचा नेहमीचा रिक्षावाला ही सोबत होता.
‌दुपार टळून गेली, संध्याकाळ होत आली. रडून रडून काकी अर्ध्या झाल्या. आपल्या परीने शोध घेणे आणि वाट पाहणे इतकेच हातात. सगळे हताश होऊन बसले होते. इतक्यात काकांच्या भावाचा फोन वाजला. समोरून आवाज आला मी आरे कॉलनी पोलीस स्टेशन मधून बोलतोय. तुमचे कोणी हरवले आहे का? त्यांनी नाव सांगितले पण नाव चुकीचे होते पण आडनाव मात्र त्यांनी बरोबर घेतले. काकांच्या भावाने सांगितले हो माझा भाऊ हरवला आहे. पण नाव हे नाही. मग पोलिसाने फोन त्या सापडलेल्या माणसाकडे दिला. आवाजावरून काकांच्या भावाने त्यांना लगेच ओळखलं.  त्यांनी पोलिसां ना सांगितले की ते माझे भाऊ आहेत मी त्यांना घ्यायला येतो. काकांचे भाऊ काकांच्या रिक्षवाल्याला घेऊन निघाले.  संध्याकाळची वेळ ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे त्यांना पोचायला उशीर होत होता. त्यात त्या पोलिसांचा सारखा फोन येत होता . कधी येणार न्यायला? नक्की येताय ना? त्यांचे ही बरोबर होते. असे कितीतरी लोक असतील ज्यांना कळवूनही त्यांचे  नातेवाईक त्यांना घ्यायला येत नाही.  शेवटी सगळे पोचले पोलीस स्टेशनमध्ये. काका समोर बसले होते. कुठेतरी शून्यात नजर होती. सगळ्या फॉर्मलिटीएस झाल्यावर काकांना घेऊन निघाले.
जेव्हा ते काकांना घ्यायला गेले तेव्हा त्या पोलिसाने त्यांना साधारण काय घडले ते सांगितले. १००% असेच नसेलही. पण काकांनी जितके सांगितले होते त्यावरून त्यांनी अंदाज बांधला. पहाटे काका उठले. गेटबाहेर येऊन त्यांनी एक रिक्षा थांबवली. रिक्षवाल्याला गोरेगाव ला न्यायला सांगितलं. गोरेगाव ला काकांची एक बहीण राहत होती  .  रिक्षावाल्याने गोरेगाव आल्यावर काकांना विचारले नक्की कुठे जायचे आहे. पण त्यांना नीट सांगता येईना. आणि काकांकडे पैसे ही नव्हते . त्या रिक्षवाल्याने काकांना आरेच्या जंगलात सोडले जिथे आसपास कोणी भटकण्याची शक्यता नव्हती. पण रात्री गस्त घालणारी पोलिसांची गाडी तिथे आली. त्यांनी काकांना पाहिले. जवळ जाऊन त्यांची चौकशी केली. त्यांना नीट काही सांगता येईना. त्यांना त्यांचे नाव विचारले तर नाव त्यांनी चुकीचे सांगितले पण आडनांव मात्र दोन्ही वेळी एकच सांगितले. कुठे राहता याची माहिती विचारली तर एकदा शिवडी म्हणाले एकदा पार्ले . शिवाडीला त्यांचा भाऊ राहतो. त्यांना ते आठवले असेल. शेवटी पोलिसांनी ठरवले की याना घेऊन जाऊ. पोलीस स्टेशन ला नेल्यावर पोलिसांनी काकांना खायला दिले. मग परत चौकशी सुरू केली. पण काकांना काही नीट सांगता येत नव्हते ते आधीचेच परत सांगत होते. त्या पोलिसांनी मग ठरवले की काकांचे बोटांचे ठसे घ्यायचे आणि त्यांच्या आधारकार्ड वरून त्यांची माहिती शोधायची. त्यासाठी त्यांनी जवळच्या आधारकार्ड सेन्टर ची माहिती ही काढून ठेवली. परत एकदा काकांना विचारले की कुणाचा फोन नंबर आठवतेय का? काकांनी खूप प्रयत्न करून एक नंबर सांगितला. पण तो मोबाइल नंबर होता आणि काकांना आठच नंबर आठवले होते. खूप प्रयत्न करूनही त्यांना पुढचे दोन नंबर आठवेनात. मग त्या पोलिसांनी ठरवले या आठ नंबर च्या पुढे १-१, १-२ असे नंबर लावून फोन करायचे. शक्य तितके प्रयत्न करायचे या काकांना घरीं पोचवण्याचे असे त्यांनी ठरवलेच होते. त्यांनी फोन लावायला सुरवात केली. ८-१० चुकीचे नंबर लावल्यावर मात्र एक नंबर लावला तो काकांच्या भावाचा. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले होते. आणि असे हे काका त्यांच्या घरी सुखरूप पोहचले.
काका जरी सापडले असले तरी काही प्रश्न मात्र अनुत्तरित च आहेत. जसे घराबाहेर पडल्यावर लगेच रिक्षात बसणारे काका इतके चालत बाहेर कसे गेले? नुसत्या हाफ पॅन्ट आणि बनियन वर असणाऱ्या काकांना रिक्षात बसवताना त्या रिक्षावाल्याच्यत काहीच शंका कशी आली नाही? त्याला जर असे सोडायचे होते तर त्याने परत त्या जागीच का सोडले नाही? प्रवेश बंदी असलेल्या भागात तो गेलाच कसा?? दिवसभर काका जर त्या जंगलात होते तर त्यांना काही झाले नाही हे नशीब. सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त काकच देऊ शकतात. पण दुर्देवाने त्यांना त्या दिवशी ते रिक्षात बसले त्यानंतरचे काहीच आठवत नाहीये.
हा लेख लिहिण्याचा उद्देश इतकाच की अजूनही या जगात माणुसकी शिल्लक आहे त्या पोलिसाच्या रुपात . देव कधी कुणाच्या रुपाने मदतीला येईल हे सांगता येत नाही.




Tuesday, 6 February 2018

"मितेश "

याच्याविषयी लिहायला कुठून सुरवात करू कळत नाहीये. आम्ही एका शाळेत होतो पण शाळेतली मैत्री असे म्हणता येणार नाही. त्यावेळी एकमेकांवर खुन्नस जास्त. माधवी चा भाऊ इतकीच शाळेतली त्याची ओळख खरे तर. खूप नंतर कळले कि मला जे वडिलांसारखे आहेत त्या पाटील काकांचा हा मुलगा. 
शाळेत असतानाचा मितेश मला आठवतोय तो अगदी " अँग्री यंग मॅन ".  खूप जण नक्कीच घाबरत असतील त्याला शाळेत असताना. सतत पारा चढलेला असायचा. आम्ही एकदा ग्राउंड वर खेळात असताना त्यांच्या वर्गातल्या एका मुलाला माझा धक्का लागला हा लगेच आला होता ओरडायला. मला अजूनही त्याचा तो चिडलेला चेहरा स्पष्ट आठवतोय. एकदा आम्ही शाळेत येत असताना त्याच्या आई ने त्याची जीवशास्त्राचे प्रयोगवाही आम्हाला दिली होती त्याला द्यायला तो घरी विसरला होता. ती वही शाळेत जाईपर्यंत आम्ही पूर्ण चाळून पहिली. त्याला बाईंनी दिलेले ग्रेड , त्याची ड्रॉइंग्स. आणि शाळेत बाई मुलांना जास्त चांगले मार्क देतात असा निष्कर्ष हि काढला.  पण शाळेत गेल्यावर ती वही त्याला न देता माधवीच्या हातात दिली आणि तिला सांगितले " तुझ्या भावाला दे ". भीतीच वाटायची त्याच्याशी बोलायला ( अजूनही थोडी वाटतेच). शाळेत असताना त्याच्या ग्रुप ने केलेल्या कारामतींचे एक एक किस्से ऐकायला यायचे तेव्हा राग यायचा कशी हि मुले आहेत मस्तीखोर असे वाटायचे. पण आता तीच मुले इतकी बदलली आहेत. 
खरेतर आम्ही एकाच एरियात राहायचो पण कधी एकमेकांशी बोललो नाही. शाळेतली "अ" वर्ग विरुद्ध "ब " वर्ग खुन्नस होती ना. फार कमी मुले मुली होते जे एकमेकांशी बोलायचे.
आम्ही कधी बोलायला लागलो नीटसे आठवत नाही. पण २०११ मध्ये जेव्हा मंदार च्या नवीन घरी जायचे होते तेव्हा त्याच्या गाडीतून गेलो होतो. ती त्याची मुंबईतली पहिली ड्राईव्ह होती. आमच्या सोबत ज्या दीपाली आणि रत्ना होत्या, त्यांना याची कल्पना नव्हती. पण भाईंदर च्या ब्रिज यानंतरच्या सिग्नल ला जेव्हा तो थोडासा गडबडला,  तेव्हा पटकन म्हणाला की, मी पहिल्यांदा मुंबईत आणतोय गाडी ...त्यावर मागे दोघींची जी रीऍक्शन होती.... त्या दोघी शॉक होत्या... आणि मी हसत होते(मनात आले होते काय गरज होती हे बोलायची ) ,  पण मस्त ड्राईव्ह होती ती. त्यावेळी GPS चे प्रस्थ नसल्याने वाट चुकत विचारत आम्ही पोचलो होतो मंदार कडे.  पहिल्यांदा मितेश ला इतके बोलताना ऐकले होते आम्ही.
‌त्यानंतर बऱ्याच वेळा त्याच्या गाडीतून फिरणे झाले कुठे गेट टू गेदर असले की आमचे ईस्ट वाल्यांचे लटांबर त्याच्या गाडीत. सगळयांना घरपोच सर्विस. २०१२ मध्ये जेव्हा आम्ही शाळेला बेंचेस दयायचे ठरवले होते त्यावेळी त्याच्या ओळखीने बेंचेस ची किंमत थोडी कमी झाली होती.
‌२०१३  जुलै मध्ये आम्ही लोणावळा गेलो होतो पिकनिक ला. हा जोरदार पाऊस . वाटले होते बहुतेक कॅन्सल. पण गेलो. त्या धुमदार पावसात पण मस्त चालवली गाडी त्याने. त्या दिवशी रात्री माधवी आणि मितेश ची पत्ते खेळताना चाललेली जुगलबंदी ऐकून मज्जा येत होती. दोघांपैकी एकही बोलण्यात मागे हलायला तयार नाही. एकमेकांचा एकही शब्द खाली पडू देत नव्हते. आम्ही सगळे मस्त एन्जॉय करत होतो त्यांचे संभाषण.
त्याच वर्षी डिसेंबर मध्ये नंदनवन रिसोर्ट ला गेलो होतो. त्यावेळी मुली खूप आणि मुले तीनच असे होते. ती पिकनिक ही त्याच्यासोबत मुक्ता ने गाजवली होती. आमच्या छोट्या कंपनी सोबत सकाळी बॅडमिंटन खेळणारा हा मितेश मामा सगळ्यां बच्चेकंपनी चा लाडका झाला होता.  या दोन्ही पिकनिक आमच्यासाठी खूप खास आहेत.
त्यानंतर आमचे बऱ्याच वेळा भेटणे झाले गेट टू गेदर च्या वेळी.  प्रत्येक वेळी त्याचा नवीन पैलू पाहायला मिळायचा.  शाळेत अँग्री यंग मॅन असलेला हा मुलगा आता खूपच बदलला आहे. खूप शांत संयमी आणि समजूतदार.
त्याला फोन केल्यावर त्याची " हा बोला मॅडम" म्हणायची पद्धत मला जाम आवडते. त्याला फोन करून म्हटले ना अरे काही नाही तुला डिस्टर्ब करायला फोन केला की याचे उत्तर ठरलेल " मी कधी डिस्टर्ब होत नाही." आता खरे खोटे तो आणि देवच जाणे. काही असो पण त्याच्याशी बोलल्यावर खूप बरे वाटते.
तो जरी शांत असला तरी आपण जर एखादी चूक केली तर तिथल्या तिथे आपल्याला टोकायला कमी करत नाही. रागावल्यानंतरचा जमदग्नी चा अवतार त्याच्या सगळ्या जवळच्या व्यक्तींनी एकदा तरी अनुभवला असेल. याची अजून एक खासीयत अशी की याच्या मनाचा ठाव घेणे म्हणजे एक अशक्य गोष्ट. कुणाचे कौतुक करताना ही हा फार मोजून मापून करेल. मला याचे खूप कौतुक आहे पण आतापर्यंत त्याने माझे असे मनमोकळे कौतुक केलेलं मला आठवत नाही. एकदा माझ्या ब्लॉग वर याची 'खूप छान अशी कंमेंट आली तेव्हा मला जरा आश्चर्य वाटले इतक्या लगेच वाचला ब्लॉग म्हणून मी त्याला तसे विचारले ही. आणि अपेक्षित उत्तर मिळाले. म्हणे खरं सांगू नाही वाचला ब्लॉग पण मी कधीच काही लिहीत नाही आणि तुला वाईट वाटते म्हणून लिहिले. बरे वाटले चला इतका तर विचार येतो या मैत्रिणीचा. इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की माझ्या दोन आर्टिकल नंतर " तू काय लेखिका होणार की काय?" असे प्रश्नार्थक का होईना पण माझ्या लिखाणाचा हुरूप वाढवणारे वाक्य तो बोलून गेला आणि एक दोन करता करता ४० लेख झाले.  लेखिका होईन की नाही माहीत नाही पण लिहिण्याची इन्स्प्रिंरेशन मात्र मिळाली. 
मंदार मितेश ला मुलांचा बॉस आणि कधी कधी डॉन म्हणतो. का ते माहित नाही? पण माझा असा अंदाज कि सगळे त्याचे ऐकतात म्हणून असेल.  एक गोष्ट मात्र नक्की कि तो स्वतःची कुठलीही गोष्ट समोरच्याला अशा प्रकारे पटवून देतो कि ती टाळणे त्या व्यक्ती साठी अशक्य असते.
मितेश चा अजून एक गुण म्हणजे तो जे काही करतो ते मनापासून असते मग ती मैत्री असो की त्याचे काम किंवा एखादी ऍक्टिव्हिटी. १७ सप्टेंबर २०१७ मध्ये याने पहिली ५ की मी ची मॅरेथॉन पूर्ण केली. आणि त्यानंतर कदाचित विरार वसई मधली एकही मॅरेथॉन त्याने चुकवली नाही.  मला वाटते अगदी पूर्ण नाही पण या गोष्टीचे ५०% श्रेय याची बायको " जस्मिता" हिचे असणार. एकदा आम्ही बोलत असताना याचे बाबा मला म्हणाले होते " मितेश मुलगा म्हणून सतत माझ्या पाठीशी उभा राहतो". आई वडिलांकडून असे उद्गार निघणे म्हणजे किती भाग्य. त्यादिवसपासून त्याच्याबद्दल चा आदर जास्त दुणावला.
मितेश जशी मॅरेथॉन धावतोस आणि ती पूर्ण करतोस तसाच आयुष्यात खूप पुढे जा आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर अशी मनापासून इच्छा.

खूप बिझी असणाऱ्या, सतत माणसांच्या गराड्यात असणाऱ्या या मित्राला या मैत्रिणीची कधी आठवणही येत नसेल पण माझ्यासाठी खूप स्पेशल मित्र आहे हा आणि कायम राहील.