Sunday, 28 January 2018

सुरांची मैफल - एक अनुभव

सगळ्यात प्रथम तर महाराष्ट्र टाईम्स चे आभार. त्यांच्या उपक्रमामुळे आम्हाला " सूर नवा ध्यास नवा" च्या सेट वर जायची संधी मिळाली.  एक नवीन अनुभव आणि तोच अनुभव मी आता सांगणार आहे. माझ्या शब्दात.
रविवारी पेपर मध्ये आले की ज्यांना सूर नवा ध्यास नवा च्या सेट वर जायचे आहे त्यांनी नाव नोंदणी करा. एक उत्सुकता म्हणून मी नाव नोंदणी केली. शूटिंग बुधवारी होते. सोमवार गेला,  मंगळवार दुपारपर्यंत काही फोन आला नाही. मी म्हटले झाले बहुतेक आपला नंबर नाहीं लागला. पण ५.३० च्या दरम्यान फोन आला की उद्या ९.३० वाजता बोरीवली ला भेटा. माझा विश्वासच बसेना. इतका आनंद झाला होता. माझी सगळी कामे बाकी होती पण मी आपली वेड्यासारखी त्या फोन चा च विचार करत होते. नक्की नेतील ना? खरेच जायचे आहे का? माझा विश्वास बसत नव्हता. फक्त नाचायचे तेवढे बाकी राहिले होते. मग अजून गडबड सुरू झाली , उद्या काय घालून जायचे हा यक्ष प्रश्न..... शेवटी बरचे ड्रेस, साड्या उलट पुलट करून झाल्यावर एक साडी नक्की केली, मग त्यावरचे सगळे म्याचिंग चे काढून झाले. २-३ फ़ोन करून झाले.
त्या रात्री धड काही झोप लागली नाही. काय असेल ? कसे असेल??  परत तिथे सगळेच अनोळखी , एकटे बसून काय करायचे?? असे हजार प्रश्न.... आणि त्याही पेक्षा उत्सुकता आणि आनंद.
झाली बाबा सकाळ एकदाची.. घरातली काम आटपून निघायची तयारी केली. तिथे उशीर नको म्हणून लवकरच निघाले भीती मनात उशीर झाला आणि आपल्याला सोडून गेले तर.. तिथे पोचता पोचता फोन आला त्यांचा ... हुश्श वेळेत आहोत आपण. तिथे गेले तर आधीच ४-५ जणी होत्या तिथे.  सगळेच उत्सुक होते. तसे त्यातल्या काहींनी आधी असे प्रोग्राम पाहिले होते. आम्ही जे पहिल्यांदा जाणारे होतो ते त्यांचे अनुभव ऐकत होतो.  आम्ही ७-८ वेगवेगळ्या वयोगटातील बायका होतो तिथे पण आम्ही सगळ्या एकमेकींना एकेरीच संबोधत होतो. वयाच्या मर्यादा ओलांडून आम्ही छान मैत्रिणी झालो होतो. बस मध्ये ही मजा करत होतो. नेहमीप्रमाणे सेल्फी काढायला सुरवात झाली होती. पुरुषही उत्साही होते. एक काका वाशी तर एक काका कल्याण हुन आले होते. आणि गंमत म्हणजे सगळेच तिथे कोणाच्या ना कोणाच्या लांबच्या किंवा जवळच्यांच्या ओळखीचे होते. जग किती लहान आहे याचा प्रत्यय येतो अशा वेळी.
१०.१५- १०.३० ला पोचलो स्टुडिओत. अजून उत्सुकता. तिथे गेल्यावर श्री. महेश काळे आणि शाल्मली बाहेरच दिसले. त्यांच्याशी बोलायला जाणार इतक्यात ते तयारीला गेले. मग नाश्ता करून आम्ही आत सेट वर गेलो. आधी जागा पकडून घेतली. मग ५-१० मिनिटे बसल्यावर आम्ही सगळ्यांनी स्टेज वर आक्रमण केले .. हो आक्रमणच जवळ जवळ. सगळेजण फोटो काढायला स्टेज वर. आधीच त्या स्टेज वर किती माणसे. ते वादक, लाईट वाले, सेटिंग वाले, आणि त्यात आम्ही. काय मस्त होता तो सेट. किती लाईट्स, कॅमेऱ्याची मोठी ट्रॉली. ते चालवणारी माणसे. सगळ्यांच्या कानाला ते हेडफोन लावलेले. माणसांची नुसती धावपळ सुरू होती. त्या सेटवर शिरताना एक छोटीशी रूम होती त्यात ७-८ मोठे मोठे टीव्ही होते. आणि पूर्ण स्टेज त्यात दिसत होता. दोन तीन माणसे तिथे काहीतरी करत होती . हो!! काहीतरी,  कारण हे सगळेआमच्यासाठी नवीनच ना. कोण काय करतोय काही कळत नव्हते. फक्त त्यांचे संवाद ऐकताना गम्मत येत होती. आणि सगळीकडे वायर्स चे जाळे होते.
आधी स्टेज वर जिथे गायक उभे राहतात तिथे उभे राहून फोटो झाले. काही सेल्फी काही ग्रुप. नुसता उत्साह ओलांडून जात होता. मग तिथे एक स्पर्धक आला मग त्याच्या सोबत . हळू हळू एक  एक स्पर्धक येत गेले मग त्यांच्या सोबत फोटो आम्हाला ६४ जी. बी पण कमी पडले असते त्यादिवशी जर पूर्णवेळ बसलो असतो. त्या स्पर्धकांना सुद्धा खूप छान गाता. तुमचे ते गाणे खूप आवडले , आज कुठले गाणे? अक्षरशः भंडावून सोडले त्यांना. (असे आम्हाला मनात वाटले) ते सगळेच खूप छान हसून उत्तर देत होते. मग आम्ही आमचा मोर्चा  वादकांकडे वळवला . आधी त्यांच्या सोबत फोटो काढले. त्यांचे भरपूर कौतुक केले. त्यांनी ही आमच्या प्रश्नांची मस्त उत्तर दिली. त्यातला तबल्यावर साथ देणारा प्रसाद पाध्ये मला जास्त आवडला. इतक्यात अवधूत , महेश आणि शाल्मली आले म्हणून आम्हाला जागेवर बसायला सांगितले. आम्ही सगळे अय्या!! अवधूत ने बघ काय घातलंय, महेश किती साधा आहे, शाल्मली ची हेअर स्टाइल बघ करत जागेवर जाऊन बसलो. थोड्याच वेळात आम्हाला परत स्टेज वर बोलावलं महाराष्ट्र टाईम्स साठी फोटो काढायला. आधी कॅप्टन बरोबर फोटो काढून झाल्यावर स्पर्धकांबरोबर फोटो काढले. फोटो काढता काढता तेजश्री ला हळूच तू खूप गोड दिसतेस सांगून झाले. फोटो काढताना मोबाईल नाही घ्यायचा असे सांगितले होते पण फोटो काढून झाल्यावर पटकन मोबाईल आणला आणि महेश काळे ना गाठले. अवधूत ला आधी भेटले होते म्हणून त्याला सतवायला गेले नाही परत. महेश ला माझ्या मुलीने दिलेला निरोप दिला की तिला त्याचे गाणे खूप आवडते. तर त्याने सांगितले की माझा प्रोग्रॅम आहे षण्मुखानंद ला त्याला घेऊन या , आणि मला भेटायला आणा तिला. नवीन पिढीतील शास्त्रीय गाण्याची ओढ पहिली की बरे वाटते.  त्याला मी सहज विचारले तुमचा हात कसा आहे आता??  तर त्याने लगेच त्याला लागलेले दाखवले आणि म्हणाला की बघा ना ४-४ खिळे ठोकून ठेवले आहेत. मला हसूच आले. इतका मोठा माणूस पण किती साहजिक बोलत होता. खरेच ग्रेट. डोके आभाळाला टेकलेले असताना पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे अशा माणसांकडून शिकावे.
झाले आता शूटिंग सुरू होणार. आम्हाला परत जागेवर पळवले. आम्ही बसलो आणि तिथे एक माणूस आला आणि म्हणाला की मी सांगेन तेव्हा त्या स्टेज वर बघून टाळ्या वाजवा. आम्ही शाळेत म्हणायचो तसे एका सुरात होsss म्हणालो. मग आकाशवाणी व्हावी तसा कुठूनतरी आवाज आला वन, टू, थ्री ऍक्शन.. आणि आम्ही टाळ्या वाजवायला लागलो. मला तर खूप हसायला येत होते रिकाम्या स्टेज कडे पाहून टाळया वाजवताना. मग तेजश्री आली स्टेज वर तिने त्या स्क्रोल वर पाहून वाचायला सुरवात केली. वाचताना तिच्या लक्षात आले की तिचा आवाज स्पीकर वर येत नाहीये. मग तिची ड्रेसर आणि तो माईक वाला दोघे येऊन ते नीट करून गेले. मग परत तोच अदृश्य आवाज ऍक्शन म्हणाला आणि खरे शूटिंग सुरू झाले. त्या आधी जिचे पाहिले गाणे होते तिने त्या वादकांसोबत एकदा मुखडा गाऊन पहिला. त्या वादकांना सूचना देणाऱ्या माणसाने बऱ्याच सूचना केल्या.  सुरवातीचे सगळे झाल्यावर प्रमुख पाहुणे " संगीतकार प्यारेलाल" जी आले. सगळे उठून उभे राहिलो. तो मगाशी आम्हाला सूचना देणारा माणूस म्हणाला की ते आले की उभे राहून टाळ्या वाजवाल का?? आम्ही म्हटले अर्थातच इतका मोठा माणूस न सांगताच करू आम्ही. ते स्टेज वर येण्याआधी त्यांच्या स्वागतासाठी काय वाजवायचे याची चर्चा झाली त्या वादकांमध्ये आणि त्या सूचना देणाऱ्या माणसामध्ये. मग आपल्या सगळ्यांचा आवडता कर्मा सिनेमा चा तो पिस वाजवण्यात आला. प्यारेलालजी आल्यावर स्टेज वर वेगळेच चैतन्य आले. टाळ्यांचा कडकडाट, सगळे उभे राहिले होते.  इतका अनुभवी माणूस पण किती   आल्या आल्या म्हणाले की मी आज येथे नवीन पिढी करून शिकायला आलो आहे. इथून नवी सुरवात. ते स्थानापन्न झाल्यावर गायिकेला सुरवात करण्यास सांगितली. गाणे झाल्यावर कॅप्टन ना गाणे कसे झाले असे विचारले गेले. त्यावर अवधूत ची टिप्पणी खूप छान होती. किती अभ्यास करून येतो तो माणूस. प्रत्येक गाण्याचा त्याचा परिपूर्ण अभ्यास असतो. आणि महेश बद्दल काय सांगायचे, त्याचे मराठी तर अप्रतिमच. जे बोलतो ते किती तळमळीने. त्याच्या बोलण्यातून त्याची गाण्यावरची श्रद्धा दिसून येते. नंतर प्यारेलालजी ची वेळा गाण्याबद्दल बोलायची. किती आठवणी त्या प्रत्येक गाण्यामागच्या.  त्या माणसाला खरेच मानायला हवे आज लक्ष्मीकांत जगात नाहीत पण त्यांची आठवण काढली नाही असे एकही वाक्य प्यारेलालजी नी उद्गारले नाही. सलाम त्यांच्या मैत्रीला आणि सलाम लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीला.
तिथे स्पर्धकांमध्ये ही किती खेळीमेळीचे वातावरण. एकमेकांशी स्पर्धा करायला हे आले आहेत असे अजिबात वाटत नव्हते. प्रत्येक जण एकमेकांशी मस्त हसून खेळून बोलत होते. सगळेजण एकमेकांना गुडलक देत होते. गाण्याला दाद देत होते. तिथे आलेल्या दोन स्पर्धकांच्या छोट्या गोंडस मुलीं सोबत खेळत होते. तेजश्री साठी असणारी वाक्य जेव्हा एक स्पर्धक म्हणत होती तेव्हा परत त्या अदृश्य आवाजाने सूचना केली की स्पर्धाकांसाठी स्क्रोल नाही. मला अजूनही कळलं नाहीये की तो आवाज नक्की कुणाचा होता आणि कुठून येत होता.
प्रत्येक गाण्यानंतर थोडी विश्रांती असायची त्यात सगळ्यांचे मेकअप चे टचअप. वादकांची एक रिहर्सल होत होती. शेवटी आमची निघायची  वेळा झाली. पण आम्हाला अजून एक गाणे ऐकायचे होते , ज्या स्पर्धकांचे गाणे होते त्याची मावशी आमच्या सोबत होती. त्यांनी त्या आयोजकांना विनंती केली आणि अजून थोडा वेळ  आमच्या पदरी पडला. मस्तच झाले ते गाणे. शेवटी इच्छा नसताना तिथून निघालो. खूप नवीन आणि अविस्मरणीय अनुभव घेऊन. खूप मजा आली. एक दिवसाची आमची छोटी पिकनिक झाली ती.
म्हणतात ते खरच छोटा पडदा असो वा मोठा ही चंदेरी दुनिया म्हणजे जादुई स्वप्न नगरी. या स्वप्न नगरी मध्ये आम्ही एक छोटासा फेरफटका मारून आलो.

बरे ही गम्मत इथेच संपत नाही हा.......
ज्यावेळी तिकडचे फोटो मी सगळीकडे पोस्ट केले. तेव्हा किती जणांनी विचारले अगं!! तू कशी गेलीस? आम्हाला सांगायचे आम्ही आलो असतो.. वा मस्त महेश काळे!!! कसा आहे ग तो?? अवधूत बरोबर फोटो का काढले नाहीत?? हजार प्रश्न. पण जाम भारी वाटत होते. सगळयांना सरप्राइज होते. मी सगळ्यांना मेसेज केले होते की सोमवारी कलर्स वर ९.३० वाजता " सूर नवा ध्यास नवा" नक्की पहा. जे नेहमी पाहत होते त्यांनी म्हटले आम्ही पाहतोच , जे पाहत नव्हते त्यांनी म्हटले तुझ्यासाठी नक्की बघू. कधी सोमवार उजाडतो असे झाले होते. आणि ज्या दिवशी टीव्ही वर कार्यक्रम दिसला त्या दिवशी तर फोन आणि मेसेजेस ... जराही उसंत नव्हती. सगळे भरभरून कौतुक करत होते. माझी एक मैत्रीण चक्क मोजत होती की मी किती वेळा दिसले.  काही जण म्हणाले की तू काय त्या कॅमेरामन ला पैसे दिलेस ?? की तो ओळखीचा होता ?? सतत तुझ्यावर कॅमेरा.  म्हणे काळ्या साडीत उठून दिसत होतीस ते किती जाडी दिसतेस ते काय नुसती हसून टाळ्या वाजवत होतीस इथपर्यंत सगळे कंमेंट. काहींनी म्हटले बघ हा चुकून एखादी ऑफर यायची काम करायची..तर एक काका म्हणाले मला वाटले तू गाणार आहेस की काय? मी म्हटले की मी गायले ना तर ती कट्यार मलाच मिळेल. माझा आवाज ऐकून पळून जातील सगळे मग काय कट्यार माझीच. माझा नवरा म्हणाला तू तर टी आर पी वाढवलास कार्यक्रमाचा. त्याच्या ही मित्रमैत्रिणी नि त्याला मेसेजेस केले. त्याच्या एका अमेरिकेतल्या मैत्रिणीने ही फ़ोन केला होता. खूप कौंतुक झाले. नातेवाईक, मित्रमैत्रिणी , आजूबाजूचे सगळेच खुश. काही न करता सेलिब्रिटी झाले होते. टिव्ही वर यायची इच्छा मात्र पूर्ण झाली. 
 माझे गुडलक आणि सगळ्यांचे आशीर्वाद. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. 










Thursday, 25 January 2018

( रिटर्न गिफ्ट...... महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स २५. ०१. २०१८ )


रिटर्न गिफ्ट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एखादी वस्तू येते पण आमच्या वाढदिवसाला आम्हाला मिळले एक वेगळेच रिटर्न गिफ्ट.  
आम्ही कॉलेज ला होतो तेव्हा  मार्च १९९३. माझा आणि माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस लागोपाठ असतो. अकारावीचे पहिलेच वर्ष कॉलेजमधला पहिलाच वाढदिवस म्हणून खूप आनंदी होतो. एक वेगळीच उत्सुकता होती. शाळेत गिफ्ट वैगेरे प्रकार नव्हते तितके पण कॉलेजमध्ये गेल्यावर ही प्रथा सुरू व्हायची साधारण. आमचे दोघींचे वाढदिवस म्हणून आमचा एक  मित्र खास आम्हाला गिफ्ट आणायला म्हणून चर्चगेट ला गेला होता.  तारीख होती १२ मार्च १९९३. साधारण ३-३.३० च्या दरम्यान बातमी आली की मुंबईत म्हणे खूप ठिकाणी बॉम्ब स्फोट झालेत.  म्हणजे अगदी दादर पासून चर्चगेट पर्यंत. बातमी ऐकून काळजात धस्स झाले. अरे बापरे!! आमचा मित्र तर चर्चगेट लाच गेलाय. त्या वेळी मोबाईल नव्हते आणि फोन ही आशा वेळी लगेच बंद व्हायचे. काय झाले असले?? आमचा मित्र सुखरूप असेल का ? या धकधूकीत घरी गेलो. बातम्या पाहिल्यावर टेन्शन अजून वाढले होते.  तो जिथे जाणार होता तिथे ही एका ठिकाणी स्फोट झाला होता. वाढदिवसाचा सगळा उत्साह निघून गेला होता. डोळ्यासमोर फक्त तोच दिसत होता. 
दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज ला जायची तयारी केली.  अगदी जीवावर येऊनच. नवीन ड्रेस घालून जायची ही इचछा नव्हती. रडूच येत होते पण जेमतेम आवर घातला होता.  जड पायांनी आणि जड मनाने कॉलेज ला गेलो. सगळीकडे कालच्या बातमीची चर्चा त्यामुळे अजून भीती वाढत होती. माझी मैत्रीण जिचा वाढदिवस होता आदल्या दिवशी ती तर गळून गेली होती. आम्ही एकमेकांना त्या मित्राबद्दल विचारत होतो पण कुणाला काही माहीतच नव्हते. आशा वेळी वाईट विचारच जास्त येतात ना मनात. आम्ही दोघी कॉरिडोअर मध्ये उभ्या राहून गेट कडे पाहत होतो. दोघींच्या पोटात गोळा आला होता. कालपासून सतत देवाचा धावा सुरूच होता. त्याच्या सोबत येणारे हीकुणी ही आले नव्हते म्हणून डोळ्यात प्राण आणून आम्ही दोघी गेट वर नजर ठेवून होतो.  आणि नेहमीप्रमाणे अगदी कॉलेज भरता भरता आमच्या त्या मित्राने गेट मधून एन्ट्री केली. हुश्श!! जीव भांड्यात पडला. आम्हा दोघींच्या डोळ्यात पाणी होते. आमचा मित्र सुखरूप होता आणि तो नेहमीप्रमाणे खालून हसत हसत आम्हाला हात करत होता. त्याच्या हातात आमच्यासाठी गिफ्ट होते. पण त्याहीपेक्षा अनमोल गिफ्ट देवाने आम्हाला दिले होते. आपोआपच आमचे हात जोडले गेले देवाचे आभार मानायला.
त्यावेळी त्याला पाहून झालेला आनंद शब्दात सांगणे फार कठीण. आजही वाढदिवसाच्या दिवशी तो प्रसंग आठवला की डोळ्यात पाणी, अंगावर शहारे आणि ओठावर हसू या तिन्ही गोष्टी एकाच वेळी असतात. 

Sunday, 14 January 2018

अधुरी कहाणी भाग २

सना ला जवळ घेऊन त्याने ठरवलं खरे की इतिहासाची पुनरावृत्ती द्यायची नाही. पण कसे? काय? हजार प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते. सनाचा रडका चेहरा आणि तिची अवस्था पाहून त्याचा जीव कासावीस होत होता. त्याला तिची आठवण झाली त्याने ही तिच्याशी नाते तोडल्यावर परत वळून पाहिले नव्हते. तिचे काय झाले असेल याचा त्याने विचारही केला नाही. आता मात्र त्याला त्या त्रासाची जाणीव होत होती. आणि मग जीव जास्तच घाबरून जात होता.
आज कोणालाही धड जेवण गेले नव्हते. बायकोची धुसफूस सुरू होती. सना जेमतेम दोन घास खाऊन झोपायला गेली. हा मात्र अस्वस्थ होऊन हॉल मध्ये फेऱ्या मारत होता. काय करावे सुचत नव्हते आधी तिचा मग सनाचा चेहरा समोर येत होता. दोन तासानंतर त्याच्या डोक्यात काहीतरी आले. बऱ्याच वेळानी तो शान्त बसला आणि घड्याळ पाहिले तर १ वाजून गेले होता. तो झोपायला गेला. सकाळी उठल्यावर ऑफिस ला निघायच्या आधी तो सनाच्या खोलीत गेला रडून रडून हाल झाले होते तिचे. त्याने सनाला सांगितले बेटा दोन दिवस सुट्टी टाक ऑफिस ला आपण जरा बाहेर जाऊन येऊ. सनाने फक्त मान हलवली. तिने बाबाला उलटून एकही प्रश्न विचारला नाही , तिचा बाबांवर पूर्ण विश्वास होता. त्याने बायकोला सांगितले " अगं ऐक मी आणि सना दोन दिवस गावी जातोय" कपाळावर आठ्या आणत तिने विचारलं "का?" . त्याने तितक्याच शांतपणे उत्तर दिले " तिला आपली आता जास्त गरज आहे. तिने थोडे विशालच्या विचारातून बाहेर पडावे म्हणून तिला नेतोय गावी. तू येणार आहेस का?". ती मानेनेच हो म्हणाली.
 सकाळी तिघे निघाले. नेहमी बाबाच्या बाजूला पुढे बसायचे म्हणून हट्ट करणारी किंवा मीच चालवणार कार म्हणून मागे लागणारी सना आज एकटी मागे जाऊन बसली होती. त्याने डोळ्यानेच बायकोला काही बोलू नको म्हणून खूण केली. गाडी चालवताना त्याचे अर्धे लक्ष सना कडे होते. अधून मधून तो तिला काही ना काही सांगत होता . पण सना चे अजिबात लक्ष नव्हते ती नुसते हम्म हू अशी उत्तर देत होती. तिचे लक्ष फक्त तिच्या मोबाईल मध्ये होते आणि डोळ्यात पाणी. संध्याकाळ होता होता ते घरीं पोहोचले. थोडी साफसफाई केल्यावर बायकोने किचन चा ताबा घेतला.  तो आणि सना बाहेर अंगणात खुर्च्या टाकून बसले. सना चे लक्ष अजूनही मोबाईल मधेच होते. ती विशाल चे फोटो पाहत होती. आणि डोळ्यांच्या कडापाणावलेल्या होत्या. त्याने सना ला सांगितले उद्या आपण दोघे जरा बाहेर जाऊ मला बोलायचे आहे तुझ्याशी. सना मानेने हो म्हणाली. जेवण आवरून ते झोपायला गेले. दोघी झोपायला गेल्यावर याने विशाल ला फोन करायचे ठरवले.  त्याने विशाल ला फोन केला दोनदा रिंग झाल्यावर त्याने कट केला. थोडा वेळ वाट पाहून त्याने परत फोन केला परत तेच. त्याने आधी त्याला मेसेजेस ही केले होते पण रिप्लाय नाही. साधारण त्याला अंदाज आला होता विशालच्या वागण्याचा. सकाळी फ्रेश होऊन सना आणि तो समुद्रावर गेले फिरायला. त्याने बोलायला सुरुवात केली सना बेटा मला आज तुला काहीतरी महत्वाचे सांगयाचे आहे. माझ्या भूतकाळाबद्दल. इतका वेळ मोबाईल मध्ये गढून गेलेल्या सना ने डोके वर केले आणि बाबा कडे आश्चर्य वाटून पाहायला लागली. आता तो फक्त बोलत होता आणि सना ऐकत होती. त्याने तिला सांगितले की त्याच्या ही आयुष्यात अशी व्यक्ती होती जी त्याच्यावर अतोनात प्रेम करत होती. पण माझ्या करीयर च्या वाटेवर तिला वेळ देऊ शकलो नाही मग एक दिवस असाच सगळी नाती तोडून फक्त कामावर लक्ष केंद्रित केले. त्या दिवसात तिचा पूर्ण विसर पडला. त्यानंतर मी लग्न केले आणि एक दिवस कळलं की ती गेली माझी वाट पाहून . त्यावेळी मला थोडा धक्का बसला बस.... मी इतका तुमच्या सगळ्यात गुंतलो होतो की तिच्या जाण्याचे जास्त दुःख ही झाले नाही. पण त्यादिवशी जेव्हा विशाल साठी तुला रडताना पाहिले तेव्हा  मला तिची प्रकर्षाने आठवण झाली.  तिच्या यातना मी तुझ्या डोळ्यात पाहिल्या. तिच्या प्रेमाची जाणीव त्यावेळी जाणवली मला. खूप अपराधी वाटले. सना बेटा मी माझे प्रेम गमावून बसलो , मला तुला नाही गमवायचे. तो रडू लागला. सना ला काय करावे कळेना. तो पुढे म्हणाला सना बेटा माहीत आहे खूप कठीण आहे पण यातून बाहेर पड. आम्ही आहोत तुझ्या सोबत. तो पुढे म्हणाला आपण नूतन मावशी कडे जाऊ, तुला मदत होईल . नूतन मावशी आईची खास मैत्रीण , कॉउन्सलर, सनाची लाडकी, आईपेक्षा तिची मावशी शी गट्टी जास्त. सनाला ला खरेतर काही कळत नव्हते. बाबाला इतके अगतिक तिने पाहिल्यानंदा पाहिले होते. बाबाचा भूतकाळ तिच्यासाठी धक्कादायक होता. त्याच्या अश्रूंनी त्याची तगमग बोलून दाखवली होती.  एकीकडे विशालची आठवण दुसरीकडे बाबाची काळजी. ती फक्त हो जाऊया म्हणाली. थोड्या वेळाने ते घरी परतले. दोघेही शांत, बायकोला काही कळेना. त्याने नंतर सांगतो म्हणून तिला टाळले. दोन दिवस राहून ते परत आले. सना मध्ये थोडा बदल होता ती मध्येच बाबाशी स्वतःहून बोलायला येत होती. रुटीन सुरू झाले. रविवारचा दिवस साधून ते तिघे नूतन मावशी कडे गेले. तोवर त्याने बायकोला साधारण गोष्टी सांगितल्या त्यामुळे ती ही कटकट ना करता तयार झाली. जेवण आटोपल्यावर तिने सनाला बेडरूम मध्ये बोलावले. आणि म्हणाली बाबाने कल्पना दिलीय मला पण एक कॉउन्सलर म्हणून मला तुझ्याकडून ऐकायचं आहे.  तू सांग परत एकदा. सनाने पहिल्यापासून सगळे सांगितल. आणि रडत रडत च म्हणाली मावशी खूप प्रयत्न करते पण नाही विसरता येत आहे. सगळ्या गोष्टी आठवतात पुन्हा पुन्हा.  मावशी ने सगळे शांतपणे ऐकून घेतलं मग म्हणाली सना  आता मी सांगेन ते नीट ऐक. मी आता फक्त तुला दिशा दाखवतेय त्यावर चालायचे की नाही हे तूलाच ठरवावे लागेल. पण यातून बाहेर पडायला तुझी मदत फक्त तूच करू शकतेस. सगळ्यात आधी मोबाईल मध्ये , कॉम्पुटर मध्ये त्याचे जेवढे फोटो आहेत सगके डिलिट कर. त्याला ब्लॉक नको करुस पण सोशल मीडियावर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्याच्याशी डिस्कनेक्ट हो. त्याचे नंबर ही डिलिट कर फोनमधून तरी डोक्यातून नाही होणार कदाचित पण निदान इथे तरी. कामात व्यस्त राहा , आईला मदत कर. बाबांशी गप्पा मार, मित्र मैत्रिणींना भेट मजा कर पण त्याचा विषय शक्य तितका टाळ. एखादी आवड जप. इतकी मोठी हो की विशाल ला पश्चात्ताप होईल तुला नाकारल्याचा. खूप कठीण आहे हे सगळे पण कर. एकदम नाही पण जमेल हळूहळू.  सना सगळे ऐकत होती, काही गोष्टी पटत होत्या तर काही कठीण वाटत होत्या. पण मावशी बरोबर तासभर बोलून तिला बळ आले होते. आणि बाबाचे शब्द तिला आठवत होते. तिने मनाशी निर्धार केला, विशाल ला विसरणे जरी शक्य नसले तरी ती त्याला आता स्वतःच्या आयुष्यातून दूर ठेवणार होती. तिला स्वतःची ओळख निर्माण करायची होती.
ते घरी आले जातानाची सना आणि येतानाची सना यात फरक होता, तिच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास आला होता. मनाशी काहीतरी पक्के करून ती बाहेर पडली. थोड्या दिवसातच दोघांना सना मधला फरक जाणवू लागला होता.  नेहमीप्रमाणे नूतन मावशीची जादू काम करत होती.  आता  ८-९ महिने होत आले सना विशाल च्या विचारातून बाहेर पडली होती. मावशीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तिने अंमलात आणली होती. मधूनच कधीतरी तिच्या डोळ्यात पाणी दिसे पण ते तेवढ्या पूरताच असे.  ऑफिस मध्ये ही सना ची प्रगती होत होती. तिला एक मोठे प्रोजेक्ट चे काम देण्यात आले होते. सगळे आलबेल होत होते. तो आणि बायको दोघेही खुश होते. त्याला हायसे वाटत होते पण त्याने केलेल्या चुकीची खंत मात्र त्याला सलत होती. असेच एका रात्री जेवण आटोपल्यावर तिघे गप्पा मारत बसले होते , गप्पा ऐन रंगात आल्या होत्या. तो जोशात दोघींना काहीतरी सांगत होता. इतक्यांत सना चा फोन वाजला. सनाने फोन घेतला समोरून एक आवाज , सना म्हणाली " हा, बोल विशाल." विशाल चे नाव ऐकून दोघे शांत झाले. त्यांना टेन्शन आले आता कुठे सना सावरत होती आता परत. सना पुढे म्हणाली , " मी तुला कधीच माफ केलेय , पण आपल्यात जे होते ते केव्हाच संपलेय. मला परत नको त्या गोष्टी. " इतके बोलून तिने शांतपणे फोन ठेवला. दोन सेकंद फोन कडे पाहत राहिली आणि मग परत बाबा कडे वळून म्हणाली " हा बाबा बोल , पुढे काय झाले?" . तिला नॉर्मल पाहून दोघे सुखावले. तुम्ही गप्पा मारा मी पटकन कॉफी करून आणते म्हणत बायको उत्साहाने स्वयंपाक घरात गेली. त्याने सना कडे पाहिले ती हसत होती. त्याने तिचा चेहरा हातात घेतला आणि हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आता ही त्याच्या डोळ्यात पाणी होते......एकीकडे मुलीला सावरल्याचे आनंदाश्रू तर दुसरीकडे तिच्या आठवणींचे दुखाश्रु.........