Sunday, 23 December 2018

नूतन ताई - माझी रोल मॉडेल

खरं तर  महाराष्ट्र टाईम्स मध्ये तिच्याविषयी  लिहून झालेय पण २५० शब्दात नूतन ताईचे  वर्णन म्हणजे फारच  कमी शब्द आहेत.  तिच्यासाठी माझा हा एक ब्लॉग हि कमीच पडेल.
नूतन ताई माझी अगदी लहानपणापासूनची  रोल मॉडेल.  तीच जितकी  सुंदर आहे ना, तितकीच हुशार .   जवळजवळ सहा फूट उंची, म्हणतात ना ते चाफेकळी सारखं नाक आणि शुभ्र दंतपंक्ती , काळे कुरळे ,घनदाट आणि लांबसडक केस,  त्याचा मानेवर सैलसर अंबाडा ,  छोटेसे कानातले,  कपाळावर मोठी टिकली , ओठांवर हलकी गुलाबी रंगाची लिपस्टिक , डोळ्यात काजळ . अंबाडा घालून झाल्यावर दोन्ही बाजूने एक एक बट कानावर खेचायची तिची ती स्टाईल माझ्या अजूनही लक्षात आहे आजही तयारी करताना ती ही गोष्ट करतेच.   तिला बघितल्यावर प्रथमदर्शनी कोणी तिच्या प्रेमात पडेल अशीच.नाही नाही मी हे नुसतं म्हणत नाहीये खरच अगदी तशीच आहे
 आता आपण अगदी माझ्या लहानपणा  पासून सुरुवात करुया मी जेव्हा एक दोन वर्षाची होते ना तेव्हा माझ्याकडे म्हणे काळा आणि गुलाबी  रंगाचा फ्रॉक होता त्यात मी अगदी बाहुली दिसायचे असे ती म्हणते  म्हणून तिने माझं नाव तिची जपानी डॉल असं ठेवलं आता या डॉल चा डॉल हाऊस झाला आहे तरीही ती मला अजूनही तिची जपानी डॉल च म्हणते.
लहानपणी बऱ्याच वेळा आशाताई आणि ती मला त्यांच्या सोबत फिरायला घेऊन जायचं. मलाही मजा यायची त्यांच्या बरोबर फिरायला कारण दोघीही माझ्या खूप आवडत्या . त्यांनी मला त्यांच्या बरोबर फिरायला नेले  की बरेच जण विचारायचे तुमची धाकटी बहीण का? मी बरीच त्यांच्या सारखी दिसत असावी . जशीजशी मोठी झाले   तशी नूतन ताई मला जास्तच आवडायला लागली.  तिचं व्यक्तिमत्व असा आहे ना की समोरच्याला भारावूनच टाकेल. ती पंजाबी ड्रेस मध्ये छान दिसते, जीन्स मध्ये छान दिसते आणि साडी मध्ये तर क्या बात है!!!!
जितकी दिसायला छान आहे ना तितकीच कडक स्वभावाची आहे.  आशाताई   साधी होती ती कधी रागवायची नाही ,  पण नूतन ताई जास्त रागवायची. भर  दुपारी आम्ही जेव्हा  पत्ते खेळायलाबसायचो ना गॅलरीमध्ये तेव्हा आम्ही खूप आवाज करायचो  आणि तेव्हा ती आम्हाला  बऱ्याच वेळा ओरडायची ." खाली जाऊन खेळा  जरा झोपायला देत नाही ".  ती ओरडून गेली कि आम्ही अगदी हळू हळू आवाजात बोलायचं तिच्या भीतीने पण खेळणे काही सोडायचो नाही . 

मला एक प्रसंग आठवतोय मी एकदा लग्नाला जात होते आणि मी ताई ला दाखवायला गेले बघ कशी  दिसतेय. तर ते सांगायचे सोडून मला तिने तिचा नवीन ड्रेस दिला घालायला. आणि तो कायमचा मलाच दिला. मी नेहमीच तयार झाले कि तिला दाखवायला जायचे कशी दिसते? कारण मला तिचे दिसणे , तयार होणे नेहमीच आवडायचे. मी बऱ्याच वेळा तिची नक्कल करायचा प्रयत्न करायचे आणि अजूनही करते .
तेव्हा आम्हाला पाचवी पासून इंग्लिश विषय असायचा. माझा शाळेचा अभ्यास आशा मावशी करून घ्यायची. पण शाळेच्या व्यतिरिक्त माझे  जे काही  इंग्रजी चांगले आहे ते तिच्यामुळे. तेव्हा त्यांच्या घरी स्टारडस्ट मॅगझीन, टाइम्स ऑफ इंडिया पेपर यायचे. मी ती मॅगझीन नुसती चाळत बसायचे त्यातले फोटो पहायचे . तेव्हा ताई ने मला एक अट मॅगझीन पाहायचे असेल तर त्यातला कुठलाही एक लेख वाचायचा आणि त्याचे मराठीत भाषांतर करायचे.    डिक्शनरी घेतली तर चालायची ,पण कुणालाही विचारायचं नाही. स्वतःचे स्वतः करायचे. त्यामुळे मला स्पेल्लिंग लक्षात राहायला लागल्या. बरेच शब्द कळायला लागले. आणि मुळात इंग्लिश वाचायची आवड लागली. आजही मी इंग्लिश बोलायला थोडी कचरते म्हणून ती नेहमी माझी शाळा घेते. ती बऱ्याच वेळा माझ्याशी इंग्लिश मध्ये बोलते आणि मी मात्र अजूनही मिंग्लिश मधेच बोलते.
 मराठी माध्यमातून शिकलेल्या ताईचे इंग्लिश वर प्रचंड प्रभुत्व आहे. तिला वेळ असेल तेव्हा ती सतत काही ना काही वाचत असते, किंवा कुठलेतरी चांगल्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकत बसते.  ताईचे वाचनही खूप दांडगे आहे. मराठी असो वा इंग्लिश ती सतत काहीतरी वाचत राहते.  त्यामुळेच तिचे दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. सायकॉलॉजि मध्ये मास्टर्स केलेली ताई काही वर्ष कॉलेज मध्ये प्रोफेसर होती. त्यानंतर तिने कॉऊंसिलर म्हणून हि काम केले. ती जे करते ते उत्तम करते. 

ताईला खरे तर स्वयंपाकाची आवड नाहीये असे ती म्हणते खरे पण तिच्या हाताला अप्रतिम चव आहे. व्हेज असो किंवा नॉन व्हेज ती सगळेच अतिशय चविष्ट बनवते.  ताईला टापटीपपणा आणि साफसफाई ची खूप आवड आहे. बेशिस्तपणा तिला अजिबात खपत नाही.  ताईला इतर गृहिणीसारखं टीव्ही वरच्या मालिका बघायला हि आवडते. पण दिवसभराचा तिचा कार्यक्रम आखलेला असतो, सकाळ संध्याकाळ चालायला जाणे, नियमित योगा करणे इतर सगळी कामे त्यामुळे तिला आवडणाऱ्या मालिका ती रेकॉर्ड करून ठेवते आणि मग रात्री आरामात त्याचा आस्वाद घेते. तिला जुनी गाणी, जुन्या काळातल्या हेरॉईन खूप आवडतात. साधना आणि रेखा तर तिच्या ऑल टाईम आवडत्या आहेत.

ताईचे मिस्टर संदीप दादा, हसायला आले ना ताईचा नवरा आणि दादा???  भावोजी म्हणायला हवे ना ... पण संदीप दादा ताई चा मित्र म्हणूनच लहानपणापासून पाहिलेलं. आणि भावोजी म्हणावे असा लांबचा तो कधी वाटलाच नाही. संदीपदादा हि खूप हुशार. स्वतःच्या हुशारीच्या बळावर आज तो एका मोठ्या कंपनीत डायरेक्टर च्या पदावर आहे. त्या दोघांची हि हुशारी त्यांच्या मुलाने समीर ने घेतली आहे.  खूप हुशार, आणि छान असे हे त्रिकोणी कुटुंब.

समीर एकदा लहान असताना आम्ही त्याच्या सोबत खेळत होतो आणि तो इथे तिथे पळत होता. अचानक तो पळता पळत पडला , त्याला लागले आणि तो रडायला लागला जोरजोरात. आम्ही जाम टरकलो होतो आता काही खैर नाही ताई ओरडणार. आम्ही त्याला जवळ घेऊन कुठे लागले ते बघत होतो.. त्याला रडू नको रडू नको म्हणून समजावत होतो. इतक्यात ताई बाहेर आली तिने पहिले तर समीर ला जास्त काही लागले नव्हते आपटल्यामुळे थोडे लाल झाले होते. आम्ही आपले त्याची समजूतच काढत होतो भीतीने. तर ताई रागावलीच आमच्यावर म्हणे पडू दे जरा, लागू दे थोडेसे. पडल्याशिवाय मोठा कसा होणार तो? आणि त्याला हि कळेल कि काय केले कि आपल्याला त्रास होतो. आम्ही सगळे चाट होऊन ताई कडे पाहतच राहिलो. किती वेगळेपण इतर आईवडील मुलाकडे लक्ष दिले नाही म्हणून ओरडले असते पण ताईने वेगळेच कारण दिले. म्हणूनच ताई आम्हाला जास्त आवडते.

दिवाळीतही आमची भरपूर मजा असायची. ताईच्या घरी भरपूर मिठाई असायची, मग त्यातला एक बॉक्स ती आमच्याच्यासाठी तिच्या दाराजवळच्या कपाटावर ठेवायची. आम्ही खेळून आलो कि त्यातली मिठाई न विचारता घ्यायची.  आम्ही तर तो बॉक्स एका दिवसात फस्त   करायचो , पण ती कधी आमच्यावर रागावली नाही.  देण्याच्या बाबतीत ताईचा हात कुणी धरू  शकत नाही.   तिला शक्य तेवढी आणि शक्य तशी मदत ती नेहमीच करत असते. गरीब श्रीमंत असा भेदभाव तिने कधीच केला नाही. कि आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा बडेजाव तिने केला नाही.
मी नोकरी सोडल्यानंतर माझ्या आयुष्यात एक दोन गोष्टी अशा घडल्या होत्या कि मी डिप्रेशन मध्ये गेले होते. स्वतःचाच राग येत होता. त्यावेळी मी ताईला भेटले. तिच्याकडे गेल्यावर आधी एक मोठी बहीण म्हणून तिने माझे स्वागत केले पण नंतर चे दोन तास ती एक कॉऊन्सिलर होती आणि मी तिची पेशंट. त्या दोन तासात तिने मला खूप काही गोष्टी समजावल्या . त्या दोन तासाच्या आमच्या चर्चेनंतर मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या. ती भेट माझ्यासाठी खूप महत्वाची ठरली होती. तिच्या त्या समजावण्याने कसलेतरी अनामिक बळ आले होते. खूप पॉझिटिव्ह  विचार घेऊन मी तिथून बाहेर पडले होते. आताही जेव्हा कधी हरल्यासारखे वाटते तेव्हा मी तिचे त्या वेळेचे बोलणे आठवते.
जेव्हा हॅम्लेट वरच्या ब्लॉग वर सुमीत ची कमेंट आली तेव्हा ती खूप खुश झाली होती. मी त्याला ब्लॉग लिहून भेट करायचे ठरवल्यावर तिनेच मला म्हटले होते " अगं , इतकी क्रिएटिव्ह आहेस तू मग काहीतरी छानसे बनवून दे त्याला " आणि म्हणून मी मस्त तो खलित्यासारखा बनवून दिला तिला. माझ्यापेक्षा जास्त तिला कौतुक होते ... आजही ती जेव्हा म्हणते ना कि " I  am  proud  of you " .. तेव्हा खूप मस्त वाटते. आणि थोडे टेन्शन हि येते कि तिच्या या विश्वासाला नक्की पात्र आहे ना मी ?  माझ्यासाठी माझ्या ब्लॉग वर येणारी तिची प्रतिक्रिया हि खूप खास असते.

माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर स्त्री कोण असे विचारले तर माझे उत्तर नेहमीच असेल " नूतन ताई" कारण दिसायला आणि वागणुकीत   दोन्ही गोष्टीत सुंदर असणाऱ्या व्यक्ती फार दुर्मिळ असतात त्यातलीच एक आमची ताई. तिला कशाचाही अजिबात गर्व नाही, कि कधी ती दिखाऊपणा करत नाही.   ती एक उत्तम गृहिणी आहे, आई आहे, बहीण आहे, बायको आहे, मैत्रीण आहे, मुलगी आहे, एक उत्तम कॉऊन्सिलर आहे, प्रोफेसर आहे, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ती एक उत्तम माणूस आहे. 

माझे दिलखुलास कौतुक करणारी, माझे काही चुकले तर मला समजावणारी, वेळीच माझा कान पकडणारी , चांगल्या वाईट गोष्टींची ओळख करून देणारी, माझ्या चुकीच्या निर्णयावर मला खडसावणारी, अजूनही लहान मुलीसारखे माझे लाड पुरवणारी. आणि मी हि कुणीतरी स्पेशल आहे याची जाणीव करून देणारी, माझ्या छोट्या छोट्या प्रगतीवर खुश होणारी, माझी रोल मॉडेल सर्वगुणसंप्पन नूतन ताई. मी देवाची शतशः आभारी आहे कि माझ्या आयुष्यात तिला पाठवले.

तिला न भेटताच माझे बरेच मित्र मैत्रिणीही तिचा आदर करतात. आणि ती हि नावाने सगळ्यांना ओळखते आणि आवर्जून सगळ्यांची चौकशी करते.

तिने सांगितलेली एक गोष्ट माणसाने स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेतली तर तुमच्यावर कुठल्याच वाईट गोष्टींचा प्रभाव पडणार नाही.



Sunday, 25 November 2018

मैत्री कि आकर्षण


कुणीतरी हवे आपल्याला मनापासून समजून घेणारे. आता तुम्ही म्हणाल तसे तर खूप जण असतात कि आपल्याला समजून आपले आई बाबा आजी आजोबा नवरा बायको, मुलेहो ते हि आहेच कि. पण खरेच हे सगळे आपल्याला मनापासून समजून घेतातकितीतरी अशा गोष्टी असतात ज्या आपण आपल्या जोडीदारासोबत हि नाही वाटून घेऊ शकत. कितीतरी गुपिते जी कुणालाही नाही सांगता येत
अशा वेळी हवे असते कुणीतरी आपले. आता त्यावर आहेच उत्तर कि आपले मित्र मैत्रिणी असतातच ना ज्यांच्या सोबत आपण सगळे काही वाटून घेऊ शकतो. हे हि खरेच आहे कि.... मग आता घोडं अडले कुठे?

आता प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा कि कोण आहे आपल्यावर अगदी मनापासून समजून घेणारे? ज्यांना ठामपणे एक नाव घेता येईल ते खरेच नशीबवान. तरीही प्रत्येकाची समजून घेण्याची व्याख्या काही वेगळीच असते

अर्थात ते मिळतेच असे नाही. पण प्रत्येकाला कुणीतरी असे हवे असते ज्या व्यतींशी आपण अगदी मोकळेपणाने काही हि बोलू शकतो. जेव्हा कधी एकटे वाटते त्या व्यक्तीशी दोन शब्द बोलल्यावर एकटेपणा कुठल्या कुठे निघून जातो. असे कुणीतरी हवे जे आपल्यातल्या लहान मुलाला सहन करणारेकितीही बालिशपणा केला तरी आपल्याला समजून घेणारकाय हा पोरकटपणा? किंवा आता काय लहान आहे का तू असे वागायला ? असा कधीही प्रश्न ना करता तुम्ही जे वागलं ते खपवून घेणारे. अर्थात आपणही समोरच्या व्यक्तीचा बालिशपणा खपवून घेतला पाहिजे. तुम्हाला कधीही गरज लागली तरी हातातली कामे सोडून तुमच्यासाठी वेळ देणारे. आता बिझी आहे मग बोलू .... म्हणजे माणूस मारतोय आणि तुम्ही पाणी पाजायला तुमच्या सवडीने जाणार असेच झाले ना ते

आता असा प्रश्न मनात आला असेलच ना कि असे फक्त प्रियकर प्रेयसी असू शकतातअसू दे ना मग ... पण दोन मैत्रिणी, दोन मित्र किंवा मित्र मैत्रीण कुणीही असू शकतो ना. पण दोन मैत्रिणी किंवा मित्र ,अगदी प्रियकर प्रेयसी हि आपण समजूच शकतो

पण कधीतरी असे होते जेव्हा एक मित्र आणि मैत्रिणी असे असतात तेव्हा? त्यांच्या भावना कितीही शुद्ध असल्या तरी लोक नवे ठेवतातच. माझा दादा म्हणाला होता मला कि मैत्रीला नात्याचे नाव दिले कि त्याला बंधने येतात. खरेच आहे

पण आपल्याकडे दुर्देव असे कि हे कुणी मानतच  नाही. इतकेच कशाला त्या मैत्रीतही बऱ्याच वेळा असे होते कि समोरची व्यक्ती तुमच्याशी खूप मोकळेपणाने बोलते म्हणजे तिच्या मनात काहीतरी वेगळेच आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. एखाद्या व्यक्तीशी आपण अगदी नियमित बोललो कि ती व्यक्ती आपल्याला खूप जवळची वाटू लागते. जरी भेटलो नाही तरी एक आपुलकीचे नातं तयार होतेपण कधी कधी काय होते ना कि त्यातल्या एखाद्याच्या मनात काहीतरी वेगळेच विचार येतात. समोरची व्यक्ती अगदी मोकळेपाणाने बोलते म्हणजे तिला सगळेच चालू शकते असा विचार करू लागतात. एका अर्थाने गृहीत धरू शकतात

मग बोलण्यातले विषय भलतीकडे जायला लागतात. समोरच्या व्यक्तीच्या मनातही नसतात असे विषय बोलले जातात. काही वेळा वेगळे विषय म्हणून त्यावर चर्चा हि होते पण तेच विषय जेव्हा खऱ्या विषयाकडे वळतात तेव्हा त्यातली एक व्यक्ती नेहमीच दुखावली जाते कारण तिच्या भावना तशा नसतात.  

आपल्याला एखादी व्यक्ती मोकळेपणाने भेटते किंवा बोलते तेव्हा ते फक्त शारीरिक आकर्षणच असेल असे नाही ना. दोन विरुद्ध लिंगी व्यक्ती जर जवळ आल्या तर त्याची वाट एकाच ठिकाणी का धरण्याचा आग्रह केला जातो हे आता पर्यंत उलगडणारे कोडे आहेएखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याची , कामाची स्तुती करणे  हे फार स्वाभाविक असते पण कधी कधी हे काही विशिष्ट कारण समोर ठेवूनच केले जाते. तर कधी कधी एखादी व्यक्ती हि निर्मळ  मनाने कुठलीही अपेक्षा ना ठेवता फक्त आपुलकी खातर करत असेल हा विचारच केला जात नाही
एखादी व्यक्ती आपल्याशी मोकळेपणाने बोलली कि आपण त्या व्यक्तीला काही अंशी गृहीत धरायला लागतो. कदाचित ती व्यक्ती आपल्यात एक चांगला मित्र किंवा मैत्रीण शोधात असेल हा साधा विचारही मनाला शिवत नाही. आपल्या मनात असणाऱ्या भावना अतिशय उथळपणे मांडल्या जातात आणि असलेल्या मैत्रीचा हि बळी दिला जातो
फार कधीतरी हे आकर्षण दोन्ही कडून असते. पण अगदी फारच कमी वेळा. आपल्या आयुष्यात येणाऱ्या नवीन मित्र किंवा मैत्रिणींमध्ये आपण तो कंफर्ट  झोन शोधत असतो जो काही वेळा आपल्याला कुणातही मिळत नाही. किंवा आपल्या अगदी जवळची दोस्त मंडळी इतकी लांब गेलेली असतात कि आपल्याला वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांना नाही सांगू शकत. आता काही व्यक्ती होतच नाहीत व्यक्त पण ९९% व्यक्तींना कुणीतरी लागतेच जवळचे
एक साधी सरळ गोष्ट कि मैत्रीचा हात पुढे करून त्याआडून काहीतरी वेगळे अपेक्षित ठेवण्यापेक्षा आणि समोरच्या व्यतीच्या भावनांना दुखावण्यापेक्षा, स्पष्ट राहून मैत्री करा म्हणजे एकतर मैत्री होणारच नाही किंवा तुमचे मत बदलेल
एख्याद्याकडे एक शरीर म्हणून बघण्याची मानसिकता बदलली ना तर बऱ्याच मैत्री या सुलभ होतील. आणि आपला हि दृष्टिकोन बदलेल







 






-