Sunday, 31 December 2017

व्यसन

व्यसन  शब्द उच्चरला कि आपल्या डोळ्यासमोर कुठलातरी अमली पदार्ध सेवन करणे  हेच येते. पण खरंच फक्त एखादी झिंग अण्णांरी गोष्ट घेणे म्हणजेच व्यसन का ? 
 पिढी दार पिढी आपली व्यसने बदलत असतात. आपल्या आधीच्या पिढीला दारू, पान , तंबाखू अशी व्यसन होती. आपल्या ९०च्या दशकातल्या मुलांना होते ते टीव्ही चे व्यसन. नवीनच आलेल्या ह्या इडियट बॉक्स ने सगळ्यांचं वेड लावले होते. त्यावर येणाऱ्या अड्वर्टाइस मुले नको नको त्या गोष्टी हि मुलांपर्यंत पोचायला लागल्या. पानपराग , गुटखा अश्या गोष्टींची  भर पडत गेली. पण त्यावेळी रिमोट प्रकार नसल्यामुळे थोडेसे बंधन होते त्यावर. पण आता ह्या इडियट बॉक्स पेक्षा एक भयंकर व्यसन लागलेय सगळ्यांना. अगदी लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच ते म्हणजे " मोबाइल". या विषयावरून सगळ्याच घरात थोड्या फार प्रमाणात सारखेच वातावरण असते. सतत वाद होतच असतात. " काय हि आज कालची मुले सतत त्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून असतात " असे संवाद जिथे तिथे ऐकायला येतात. दिवस असतो रात्र असो सतत सगळे मोबाइलवर. या मोबाइल मुले आपली मुले अजून कशाकशाच्या आहारी जातील हे सांगणे कठीणच. हल्ली ब्लू व्हेल सारख्या गेम चे हि व्यसन लागू शकते मुलांना. कुणी आले गेले संभाषण नाही, कुठल्या समारंभात गेले तिथे हि नुसते सगळे " सेल्फी" काढण्यात व्यस्त असतात. मोबाइल मुले एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद कमी झालेत आणि नुसते व्हर्च्युअल अटॅचमेंट वाढल्यात.
 आत्ताच्या परिस्थितीत लोकांना अजून एक गंभीर व्यसन लागले आहे ते म्हणजे " काम " करण्याचे. हल्ली कुणालाही विचार  " काय आहेत कुठे ?" " नाही यार !! खूप काम आहे रे ऑफिस मध्ये " . जो तो कामात बुडालेला . वेळ, काळ, घरदार सगळे सोडून फक्त काम आणि काम. हे हे एक  व्यसनच ना? अशी माणसंही जर एखाद दिवस ह्यांना चुकून आराम मिळाला ना तर कासावीस होतात.
माझ्या एका मित्राने मला म्हटले कि "अगं !!! किती बोलतेस जरा कमी बोल मी" त्याला उद्धटपणे उत्तर दिले "तू किती पितोस जरा कमी पी" तर तो हसून म्हणाला कि " मी कमीच पितो" मग मी हि म्हटले कि जसे तुला वाटते ना तसे मला हि वाटते कि मी कमीच बोलते. हि खरेच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात करणे हे एक व्यसनच ना.कुठलीही गोष्ट अति प्रमाणात करणे हे एक व्यसनच ना.
काही जणांना सट्टा , जुगार व्यसन असते. त्याचा आहारी ते इतके जातात कि त्यात सगळेच गमवून बसतात आणि मग त्या टेन्शन ला विसरायला अजून कसलेतरी व्यसन मागे लावून घेतात. 
कितीतरी वेळा या व्यसनांमुळे संसार तुटले जातात. घरातल्या वादांमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. घरादाराची राखरांगोळी होते. आणि मग शेवटी डोक्याला हात लावून बसण्याशिवाय पर्याय नसतो.
पण खरंच व्यसन करणे इतकं गरजेचं असते?. जी काही टेन्शन  असतात ती जातात का व्यसने करून? अशा वेळी देवानंद चे गाणे आठवते मैं जिंदगी का साथ निभाता चला गया .... हर फिक्र को धुवे मे उडाता  चला गया
मला हेच कळत नाही का लोकांना आपल्या माणसांपेक्षा ही व्यसने जवळची वाटतात. ह्यात पराभव नक्की कुणाचा त्या व्यसनी माणसाच्या इच्छाशक्तीचा की त्याच्या जवळच्या माणसांचा जी त्या व्यक्तीला समजून घ्यायला कमी पडली. की विजय त्या सगळ्या निरुपयोगी वस्तूंचा जी माणसांपेक्षा वरचढ ठरली.
का बरे लोकांना ही व्यसने जवळची वाटतात.  जगात एकही माणूस नाही की ज्याला टेन्शन नाही म्हणून प्रत्येक जण व्यसनी होते का?? जसे विचार करून आपली दुःख कमी होत नाहीत तशी या निरुपयोगी वस्तूंच्या सेवनानेही नाही होत.   जसे आपण म्हणतो की येणाऱ्या अडचणीना सामोरे जायचे टेन्शन घ्यायचे नाही तसेच व्यसन ही करायचे नाही.
कुठल्याही व्यसनाचे आपल्या शरीरावर वाईट परिणामाच होतात. कुठलातरी असाध्य आजार होण्याची शक्यता ही असतेच. पण आपण हे जर कुणाला समजवायला गेलो तर म्हणणार की निर्व्यसनी व्यक्तींना ही होतात की असे आजार. खरे आहे पण तरीही ज्या गोष्टींचे दुष्परिणाम माहीत आहेत त्या सवयी लावूनच का घ्या?
प्रत्येक व्यसनी माणसाकडे लोकांचा दृष्टिकोन वेगळाच असतो. ते कितीही नीट वागले तरी त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवणे कठीणच.
पण एख्याद्या माणसाला एखादे व्यसन आहे म्हणून आपण त्याला पूर्णपणे वाईट नाही ठरवू शकत. कदाचित ती व्यक्ती आपल्या बाकीच्या जबाबदाऱ्या अगदी नेटाने पार पडत असेल. पण कितीही चांगली व्यक्ती असली तरी बोलताना माणसे आधी त्याचे दुर्गुणच आठवतात.
तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे शक्य होईल तितके व्यसनांपासून दूर राहा. जगा आणि जगू द्या. सिगारेटच्या धुरात किंवा दारूच्या ग्लासात आपली दुःख लपवण्यासपेक्षा ती आपल्या माणसासोबत राहून विसरायचा प्रयत्न करा.

असाही नवीन वर्षाचा काही ना काही संकल्प आज सगळेच करणार जमले तर हा संकल्प करा जमले तर एक तरी व्यसन सोडू. 

नूतन वर्षाभिनंदन 

 

Thursday, 21 December 2017

संदिती

संदिती
आमची मैत्री नेमकी कशी आणि कधी   झाली ते आठवत नाही. पण दहावीत असताना ती माझ्या मागच्या बेंचवर बसायची. शाळेत जाता येताना ही आम्ही जास्त कधी एकत्र नासायचो. पण दहावीच्या त्या वर्षात आम्ही एकत्र आलो. आमच्या दोघींची कॉलेज वेगवेगळी होती पण आम्ही कायम एकत्र असायचो. माझा एक दादा आम्हाला " चंगू  मंगू " म्हणायचा.  कॉलेज ती ५ वर्ष . दिवसातून एकदा तरी आम्ही भेटायचोच. सकाळी किंवा संध्याकाळी . माझ्या दिवसभराच्या गमती जमती कधी तिला सांगते असे व्हायचे. बऱ्याच वेळा माझा संध्याकाळचा चहा तिच्याच घरी असायचा. तिच्या आई साठी हि मी घरातली चौथे अपत्य झाले होते. तिच्या घरी २-३ तास गप्पा मारल्यावर ती मला खाली सोडायला यायची मग तिथे परत तासभर गप्पा. मग थांब तुला थोडे पुढे सोडायला येते म्हणून ती घरपर्यंत यायची. मग मी परत तिला अर्ध्या रस्तात सोडायला जायचे. जेव्हा कुठे बाहेर जाऊन आलो कि हे चक्र उलट असायचे मी तिला सोडायला जायचे. त्या जीवदानी रोड ला हि आमच्या सगळ्या गप्पा पाठ असतील इतका वेळ आम्ही रस्त्यात गप्पा मारायचो. माझी आई मला नेहमी रागवायची कि तुमच्या गप्पा कधी संपणारच नाही म्हणून. पण तिची आई मात्र कधी रागावलेली मला आठवत नाही.  आम्ही ना जेव्हा एकमेकांना बाय म्हणताना ना दोन बोटे जुळवून मग शेक हॅन्ड करतात तसे करायचो, म्हणजे आता फायनल बाय  असे पण त्या नंतर हि आमच्या गप्पा चालूच राहायच्या. असे निदान ३-४ वेळा म्हणायचो कि " ए , आता हे फायनल हा!" पण ते फक्त बोलण्यापुरताच. माझा दादा मला म्हणायचं अरे झाले ३ वेळा जा आता. आम्ही एकमेकींच्या इतक्या जवळ होतो तरी कधी आम्ही एकमेकींच्या घरी राहायला गेलो नाही. जे काही असेल ते रात्री ८.३० पर्यंत. मग दुसऱ्या दिवशी. 
 माझ्या आयुष्यातली एकही घटना किंवा गोष्ट नाही जी तिला माहित नाही. माझी सगळी सीक्रेट तिला माहित आहेत आणि तिची मला.माझे पहिले प्रेम, पहिली नोकरी, पहिला पगार, माझ्या सगळ्या आवडी निवडी अशी एकही गोष्ट नाही जी तिला माहित नाही. ज्यावेळी मी अगदी बावळट, दोन वेण्या घालणारी , कुणाच्याही खिजगणतीत नसणारी होते ना तेव्हापासून तिला मात्र माझ्यावर काहीतरी वेगळाच आत्मविश्वास होता. तेव्हा हि ती माझे नेहमीच कौतुक करायची. माझी एकूण परिस्थिती त्यातून मी केलेला स्ट्रगल सगळ्याची ती साक्षीदार आहे. 
आम्ही दोघी सोबत अर्धी मुंबई भटकलो आहोत. सिद्धिविनायक, महालक्ष्मी, फॅशन स्ट्रीट. खूप मज्जा करायचो. खूप भटकायचो. फॅशन स्ट्रीट वरून तिला घेतलेले दोन स्कर्ट मला अजूनही आठवतात. आयुष्यात पहिल्यांदा तिने घासाघिस केली असेल. आणि सांगितलेल्या भावापेक्षा कमी भावात कपडे घेऊन आल्यामुळे भलतीच खुश होती ती. एकदा ती पाटकर कॉलेज ला असताना ची गोष्ट. मी तिच्यासोबत तिच्या कॉलेज ला गेले होते मग तिथून थोडी खरेदी करून आम्ही गोरेगावलाच एका हॉटेल मध्ये गेलो. तिथे आम्ही डोसा ऑर्डर केला होता. आणि तो वेटर असा शंकू सारखा भाला मोठा डोसा डिश मध्ये घेऊन आला . मला तो काही काट्याचमच्याने खाता येईना म्हणून आम्ही तो हाताने खायला सुरवात केली. मग लक्षात आले कि समोरच्या टेबल वर बसलेली दोन मुले आमची ती त्रेधातिरपीट बघून हसत होते. इतके लाजल्यासारखे झाले. आम्ही पटापट तो डोसा संपवून बाहेर आलो. आणि वेड्यासारख्या हसत होतो. त्या मुलांना घाबरून असे बाहेर येण्यावर आम्हाला आमचेच हसू येत होते. 
अजून एक प्रसंग आहे जो तिला आठवत नसेल. एकदा तिला दिवाळीला दोन ड्रेस मिळाले होते तेव्हा तिने ते दोन्ही ड्रेस मला दिले होते कारण होते तिला ते आवडले नव्हते. पण खरे कारण होते कि त्या वेळी माझ्याकडे नवीन ड्रेस नव्हता हे तिला माहित होते म्हणून तिने मला ते ड्रेस दिले होते.
त्याकाळात एकत्र असणाऱ्या आम्ही तिच्या लग्नानंतर खूप दूर झालो होतो. मनाने नाही तर फक्त शरीराने.  कितीतरी वर्षे  आमचा एकमेकांशी अजिबात कॉन्टॅक्ट नव्हता. साधे फोनवर बोलणेही झाले नाही आमचे. पण तरीही जेव्हा तिच्या बाळाला बघायला आम्ही गेलो होतो असे वाटलेच नाही कि इतकी वर्षे आम्ही लांब होतो.  ती माझ्यावर कधी रागावली नाही कि मी तिला फोन केला नाही कि सगळीकडे भटकते पण तिला भेटायला गेले नाही. कसली म्हणून तक्रार नसते तिची. आताही तिला भेटायला येते म्हणून कितीतरी वेळा मी जात नाही पण ती गेल्यावर मागचे कधीच बोलून दाखवत नाही.
मला तिच्या लग्नाला ही जाता आले नव्हते पण तिच्या साखरपुड्याची मेहंदी मी काढली होती.
मला तिच्या बोलण्याची पद्धत जाम भारी वाटते म्हणजे मी एखादी गोष्ट तिला सांगितली नसेल आणि म्हटले कि अग बोलले होते तुला तर तिचे उत्तर असणार " साली , नालायक कधी बोललीस मला ? हे मला माहीतच नाही " आणि एखादे चांगले काम केले तर म्हणेल " मेले , काय काय उद्योग करत असतेस." आता माझ्या भटकंती करण्यावरून मला नवीन नाव ठेवलेय " भिंगरी" . ती काही बोलली ना तरी मला राग नाही येत. तिच्या शिव्याहि (नॉर्मल) गोड वाटतात मला. कारण त्यात तिचे प्रेम असते.
संदिती विषयी एक गोष्ट कदाचित  जास्त कुणाला माहीत नाहीये ती म्हणजे ती खूप छान गाते.  शाळेत असताना " शिशा हो या दिल हो " हे गाणे तिच्या कडून खूप वेळा ऐकले आहे. आता बहुतेक गाणे सोडलय तिने. ज्या वेळी माझ्या चपात्या म्हंजे देशाचे नकाशे असायचे तेव्हा  तिच्या चपात्या अगदी गोल गोल असायच्या. तिच्या हाताचा स्वयंपाक हि अप्रतिमच. तिच्या आईच्या हाताची चव तिच्या हातात उतरली आहे.
मला तिच्याबद्दल एक खूप वेगळंच फीलिंग आहे. खूप खंबीर , सहनशील आहे ती. असे म्हणतात की बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म पण हीचा तीसरा जन्म होता तो. बाळंतपणाच्या वेळी झालेले ट्यूमर चे ऑपेशन,  त्यातून आलेले पॅरॅलीसिस पण. बाळापासून ८-१० दिवस लांब ठेवले होते तिला. पण या सगळ्यावर मात करून जिद्दीने उभी राहिली ती. . खरे तर युग मुळे तिला पुनर्जन्म मिळाला. तीन महिन्यांच्या युग ला घेऊन जेव्हा ती विरार ला आली होती मी आणि दीपाली तिला बघायला गेलो होतो. खूप अशक्त दिसत होती पण तरीही सगळे करत होती. तिच्या माने वरचा तो ऑपेशन चा कट पाहून काळजात एक चमक उठून गेली. तिच्या शारीरिक त्रासाचे दुःख तर होतेच पण त्यापेक्षा जास्त मनात सल होती की माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणींच्या गरजेच्या वेळी मी तिच्या जवळ तर नव्हतेच पण मला काही माहिती ही नव्हते. ज्या वेळी ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा माधवी तिला बघून अली होती. आणि आम्ही तिला जास्त फ़ोन करून तिला त्रास देऊ नका असे स्पष्ट बजावले होते. त्यावेळी माधवी मैत्रीण कमी आणि डॉक्टर जास्त होती. त्यामुळे तिचे ते म्हणणे आम्ही निमूटपणे ऐकले होते. आता हि ती पडली तिच्या पायात रॉड टाकावा लागला पण त्याही अस्वस्थेत तिचे काम करणे काही  थांबले नाही. दोन -तीन महिन्यातच ती व्यवस्थित चालायला लागली. तिच्या या जिद्दीला मनापासून सलाम. सगळी दुखणी सहन करून तिच्या चेहऱयावर सतत एक स्माईल असते. देवाने तिला भरपूर बळ दिले आहे. 
असे म्हणतात ना की सगळ्या जगाने पाठ फिरवली तरी अशी एक व्यक्ती असते जी आपल्या सोबत राहते आणि मी खात्रीने सांगते की माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती म्हणजे संदिती. ती माझ्यावर ओरडेल, रागावेल पण मला एकटे पडणार नाही.  माझी चूक असली तरी ती आधी ती मी का केली ते समजून घेईल. पण मी चुकले म्हणून मला वाळीत टाकणार नाही. कारण माझ्या आयुष्यात एक अशी घटना घडली होती कि तेव्हा ती एकटीच माझ्या बाजूने बोलली होती.
माझ्या आयुष्यातली संदिती अशी एकमेव व्यक्ती असेल जिच्या विषयी मी कधीच काहीच वाईट बोलले नसेन अगदी तिच्या पाठीमागे हि नाही . तिच्यातल्या उणीवा मला कधी जाणवल्याचं नाहीत किंवा मला त्या जाणून घ्यायची इच्छा झाली नाही. आम्ही कधी भांडलो नाही , तिने मला कधीच रडवले नाही आणि मी तिच्या समोर कधी रडले नाही. पण आज  लिहिताना मात्र माझ्या डोळ्यात पाणी आहे कारण देवाची मी  खूप खूप आभारी आहे मी त्याने मला पूर्णपणे समजून घेणारी मैत्रीण दिली. इतके असूनही आता जेव्हा ती विरार ला आलेय तर मी विरार सोडून गेलेय. मला तिच्यासाठी काहीच करता येत नाही हि गोष्ट मनाला सारखी खटकत राहते.
माझा हा लेख वाचल्यावर कदाचित माझ्या बऱ्याच जवळच्या व्यक्तींची मने दुखावली असतील, तुम्ही सगळेच माझ्या जवळचे आहात पण कदाचित जी नाळ संदितीशी जोडली गेली ती कुणाशीही जोडली नाही जाणार. तिचे आणि माझे नाते म्हणजे दुधात मिसळलेल्या साखरेसारखे आहे कधीही वेगळे न होणारे.


Friday, 8 December 2017

१४ डिसेंबर १९९४

१४  डिसेंबर १९९४ (बुधवार) माझ्या आयुष्यातील कटू दिवसांपैकी एक दिवस. ज्या दिवशी माझी लाडकी आजी आम्हाला सोडून गेली. अजूनही तो दिवस जसाच्या तास आठवतोय . 
मला नीट आठवत नाहीये पण सोमवार का मंगळवारी आजीचा फोन आला होता कि आज आजोबांबरोबर चेंबूर स्टेशन ला जाऊन आले नवीन मंगळसूत्र घेतलेय तर तू येऊन बघून जा. पण मी नाही म्हटले म्हणाले "अगं ! रविवारी येते म्हणजे राहायला मिळेल. उद्या आले तर परत सकाळचे कॉलेज ." तिने दोन तीन वेळा परत सांगितले पण मी माझ्या नाही वर ठाम माझ्या नेहमीच्या सवयी प्रमाणे. मग म्हणाली ठीक शनिवारी ये कॉलेज हुन डायरेक्ट. तस माझ्या आजीला दागिन्यांचा सोस नव्हता तिला कसलाच सोस नव्हता खरंतर . खूप साधी भोळी होती. सगळे तिला " बाई" म्हणायचे. आणि आजोबा "इंदू". कधी कधी आम्ही तिला हाक मारायचो " इंदू आजी". आजी आजोबानी खूप लाड केले माझे. 
मी F.Y.B.Com ला होते सकाळचे कॉलेज आम्ही ५.२५ ची ट्रेन पकडायचो.  त्यादिवशी आमच्या कॉलेज चा पिंक डे होता. मस्त पूर्ण पिंक पंजाबी ड्रेस घालून अगदी तयार होऊन कॉलेज ला गेले. साधारण १०-१०.३० ची वेळ ऑफ पिरियड होता म्हणून आम्ही बाहेर कॉरिडोर मध्ये टाइमपास करत उभे होतो. मी, नमा, सोनाली, आशु, शिल्पा सगळेच. इतक्यात आशु म्हणाला "मिलन तुझी आई आलीय बघ. " मी मागे वळून न बघताच त्याला ओरडले कि "प्लीज अशी काहीतरी मस्करी करू नको". तेवढ्यात अजून कुणीतरी म्हणाले "अरे तुझे भाऊ , बहीण पण आलेत."  तेव्हा मात्र मागे पहिले तर खरंच आई , अमोल , शीतल तिघेही आले होते. आईचा चेहरा रडवेला वाटत होता. आई म्हणाली चल निघायचे आहे चेंबूर ला जायचे आहे. मला काही कळेना पण जास्त प्रश्न ना विचारात मी बॅग घेऊन आई बरोबर निघाले. कॉलेज च्या बाहेर आईने टॅक्सी केली. टॅक्सी म्हटल्यावर लक्षात आले कि नक्कीच काहीतरी झालेय वाईट. कारण टॅक्सी ची चंगळ परवडणारी नव्हती त्या काळात. गाडी सुरु झाल्यावर वैतागून आईला विचारले काय झालेय सांग तरी. मग आई म्हणाली कि सकाळी 'जो' अंकल आले होते त्यांनी सांगितले कि आजी गेली. त्या वेळी फोन असला तरी एखाद कुणाकडे तरी. आणि नेमके सगळे फोन बंद होते म्हणून ते चेंबूर हुन विरार ला आले होते. पण मला विश्वास बसत नव्हता कि आजी गेली. दोन दिवस आधी तर बोललो होतो आम्ही. पण 'जो' अंकल खोटे का सांगतील?  
तरी एकदा मी आई ला म्हणाले कि तू चुकून  आजी ऐकले असेल आजोबा म्हटले असतील ते. कारण आजोबाना दोन अटॅक येऊन गेले होते. पण आई म्हणाली आजीचं गेली. मला तरीही विश्वास बसत नव्हता. आई सारखी रडत होती. मला काही केल्या रडायला येत नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी डोळ्यातून पाणी येत  माझ्या पण त्या वेळी जराही नाही. माझा विश्वासच नव्हता त्या गोष्टीवर. आजीचे असे अचानक जाणे माझ्या पचनी पडत नव्हते. आईचे रडणे सुरु होते , मध्ये मध्ये ती आजीच्या जुन्या आठवणी सांगत होती. त्यात मला ओरडून हि झाली तुला बोलावले होते ना तू गेली का नाहीस. मला कळतंच नव्हते का आई अशी का करतेय? माझा विश्वास नव्हताच बसत काही केल्या.  शेवटी आमच्या बिल्डिंग समोर गाडी थांबली. बरीच गर्दी होती खाली. काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे दिसत होते. टॅक्सितून उतरल्यावर आई जोरजोरात रडायला लागली. मी मात्र अजूनही शांतच होते. घर कडे जाताना सगळे डोक्यावरून हात फिरवत होते. सगळेच रडत होते मी सोडून. जिने चढून वर गेलो आई धावत आमच्या खोलीत गेली  आतली रडारड जास्त जोरात सुरु झाली तरी मी मात्र अजूनही रडत नव्हते. कदाचित त्या वेळी लोकांना वाटले असेल कि जिच्यावर आजीचा सगळ्यात जास्त जीव होता तिला साधे तिच्या जाण्याने रडू हि येऊ नये. पण माझे फक्त मला आणि मलाच माहित होते. मी मान्यांच्या दारात पोचले आणि एकदम आजोबा समोर आले मला जवळ घेऊन म्हणाले " मिनू, तुझी आजी गेली ग" . त्या क्षणी असे वाटले कि पायाखालची जमीन सरकतोय कि काय. आजोबाना घट्ट मिठी मारून मी जोरजोरात रडायला लागले. इतक्यावेळची माझी खोटी अशा संपली होती. खरंच माझी आजी हे जग सोडून गेली होती कायमची. त्या क्षणी वाटले का नाही आले मी  ती बोलावत होती तेव्हा. खरंच तिला कळले होते का तिचे मरण? तिची मला भेटायची शेवटची इच्छा हि मी पूर्ण केली नाही.  मान्यांचे घर ते आमचे घर जेमतेम १० फुटांचे अंतर पण ते हि १० मैलांसारखे वाटत होते. आजोबानी मला आत नेले. सगळेच जोरजोरात रडायला लागले. म्हणे बघ बाई तुझी लाडकी नातं आलीय. आजीला त्या आराम खुर्चीत बसवले होते. समोर आशा मावशी होती तिची अवस्था तर बघवत नव्हती. काही वेळ वाटले सगळे म्हणत आहेत तसे खरंच मी आलेय म्हणून उठेल का एकदा आजी. मी जाऊन तिच्या जवळ बसले. तिचा हात हातात घेऊन तिची बोटे फोल्ड करायचा प्रयत्न केला. तिच्या हाताला जेव्हा फ्रॅक्चर झाले होते तेव्हा मी अशीच तिची बोटे फोल्ड करायचे आणि मग ती म्हणायची नको ग दुखतंय  वाटले कदाचित आताही बोलेल ती. पण नाही सगळे संपले होते. 
देवाने तिला हवे तसे मरण दिले होते. चालता फिरता पहिल्याच अटॅक मध्ये ती गेली. कधी कधी देवाचा राग येतो मला किती लवकर नेले माझ्या आजीला. आमचे कुणाचे शिक्षण हि पूर्ण झालेलं पहिले नाही तिला. ताईचा तर लास्ट वर्ष होते. डॉक्टर होणार होती ती. पण म्हणतात ना कि जो माणूस सगळ्यांना आवडतो तो देवालाही आवडतो म्हणून नेले असेल त्याने आजीला. त्यादिवसापासून आज पर्यंत जेव्हा जेव्हा तो दिवस आठवतो डोळ्यात पाणी येते. डोळ्यासमोरून तो दिवस काही जात नाही. आजही १४ डिसेंबर ला सकाळी उठले कि मनात एक भीती दाटते. २३ वर्ष उलटली पण जखम काही सुकत नाही , दरवर्षी तिच्यावरचे खपली निघतेच. आजी गेल्यानंतर कितीतरी वर्ष तिचे अस्तित्व जाणवत होते. चेंबूर हुन निघाले कि मागच्या खिडकीत ती नेहमीच उभी राहून टाटा करायची अगदी आम्ही दिसेनासे होईपर्यंत. खूप वेळा ती तिथे आहे असेच वाटायचे. खालून खेळून आल्यावर मी बाहेरच्या खोलीत बसून राहायचे कि आता आजी आतून चहा घेऊन येईल. पण बराच वेळ झाल्यावर लक्षात यायचे कि आता मागितल्याशिवाय चहा नाही मिळणार. सगळे हातात द्यायची आजी. माझी आवडीचे काही बनवले कि मला ते नेहमी जास्त मिळायचे. शैला मावशी कधी कधी म्हणायची मुलींवर केले नाही तितके प्रेम तुम्ही नाती वर करता. खरेही होते ते. मला कुणी ओरडले तरी आजीला वाईट वाटायचे. मग जवळ घेऊन समजवायची ती. आजही कधी कधी खूप एकटे वाटले कि आजीचं आठवते सगळ्यात आधी, असे वाटते कि तिच्या मांडीत डोके ठेऊन झोपावे. आजी आजोबा दोघेच असे होते कि ज्यांनी निस्वार्थी प्रेम केले. माझ्या चुकांना प्रेमाने पोटात घेणारे. मी कितीही हट्टी , जिद्दी असले तरी मायेने समजावणारे. माझे एकूण एक लाड पुरवणारे. 

आम्हाला तिच्यासारखे साधी राहणी , उच्च विचार असे नाही जगाता येणार,  तिच्यासारखे सगळ्यांचे सगळेच निरपेक्ष भावनेने नाही करता येणार पण तिच्या सारखे कायम माणसे जोडून राहण्याचा नक्की प्रयत्न करू.
 
 आजी खूप आठवण येते ग तुझी  ....... .......