Tuesday, 17 October 2017

मला भावलेली झी मराठी वरील मालिका - श्रीयुत गंगाधर टिपरे

मला भावलेली झी मराठी वरील मालिका - श्रीयुत गंगाधर टिपरे 

खूप अप्रतिम मालिका . ती मालिका कमी आणि आपल्याच घरातले चित्रण जास्त वाटायचे.   प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात आजी आजोबा हवे असतात. आपले लाड पुरवणारे , गोष्टी सांगणारे आणि छान छान खाऊ देणारे. असेच शिऱ्या आणि शलाकाचे लाडके आजोबा  श्रीयुत गंगाधर टिपरे म्हणजे "आबा". नातवा इतकेच नाती वरही प्रेम करणारे. तिच्या करियर आणि भविष्यासाठी निर्णय घ्यायला मदत करणारे , शिऱ्या चे क्रिकेट चे वेड जपणारे आणि त्याचा बरोबर कधी कधी खोडकर होणारे आबा. सुनेला मुलीप्रमाणे वागवणारे आणि मुलाच्या पाठीशी नेहमीच उभे राहणारे. 

आबांचा मुलगा शेखर टिपरे. नोकरी आणि घर एवढेच विश्व. एकदम मध्यमवर्गीय माणूस. खूप साधा सरळ. मुलांशी संवाद साधणारा त्यांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला पाठिंबा देणारा आणि वेळ पडल्यावर रागावणारा हा बाबा. अगदी बघताना आपल्या वडिलांनीच आठवण यावी. शेखर चे ऑफिस चे मित्र अगदी घरच्यासारखे. त्यांचे ऑफिस च्या टी टाइम मध्ये चहाच्या टपरीवर चहा प्यायला जाणे. कोणालाही आपल्या ऑफिस चे आठवण यावी असेच वातावरण. शेखर खूप शांत आणि संयमी. 

आबांची सून म्हणजे श्यामला टिपरे. एक साधी सरळ गृहिणी. घर संसार, तिची मुले , सासरे आणि नवरा इतकेच विश्व आहे तिचे. घरातल्या सगळ्यांची काळजी घेणे हे तिचे परमकर्तव्य. तरीही मुलांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवणारी. मायेने जवळ घेणारी तर शिऱ्याचा चुकांवर रागावणारी. आपली मुलगी शलाका हिची आई कमी आणि मैत्रीण जास्त. सासऱ्यांना वडिलांप्रमाणे जपणारे हि लघवी सून. 

आबांचा लाडका नातू आणि त्यांच्या खोडकरपणाचा भागीदार "शिऱ्या". आपल्या घरात जसा एकादे भावंडं असते ना खूप मस्तीखोर तरीही लाडके असा हा "शिऱ्या".  इतर मुलांसारखे ह्याला हि क्रिकेट चे खूप वेड. म्हणून दार वेळी घरच्यांचा ओरडा हि खातो. आई ने काही काम सांगितले कि ते करायचा कंटाळा पण खेळायला म्हटले कि तयार.  घरात असलेले आजोबा म्हणजे त्याची ढाल. काही असेल तरी सगळे आधी आबांना सांगायचे आणि मग  आबांकडून घरच्यांना. चूक झाली तरी आबांना माहित होते म्हणून आपला बचाव करायला मोकळा. तरीही घरातल्या प्रत्येकाचा आदर करणारा आणि आज्ञानधारक मुलगा. 


टिपरे घरातली लाडोबा म्हणजे शलाका टिपरे. नटण्या मुरडण्याची आवड असणाऱ्या या मुलीला करियर हि त्याच क्षेत्रात करायचं आहे. खूप मनमिळावू शांत मुलगी . आपली कामे सांभाळून आईला जमेल तशी मदत करणारी. आई बाबांची लाडकी. भावाशी वाद झाले तरी त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी हि मुलगी. 


श्रीयुत गंगाधर टिपरे-"आबा" -दिलीप प्रभावळकर . त्यांच्या "अनुदिनी" या कादंबरीवर आधारलेली हि मालिका. केदार शिंदे यांची निर्मिती आणि तितकेच सहज दिग्दर्शन. झी वरच्या सर्वोतोकृष्ट  मालिकांपैकी हि एक. 


दिलीप प्रभावळकर - श्रीयुत गंगाधर टिपरे उत्तम अभिनय. त्यांनी रेखाटलेल्या ८०-८५ वर्षाच्या वृद्धाची भूमिका अप्रतिमच. त्याच्या बोलण्याची ती ढब काही वेगळीच. किती जणांना अजूनही त्यांच्या बोलण्याची नक्कल करावीशी वाटते. 

राजन भिसे- शेखर टिपरे. मध्यमवर्गीय कुटुंब प्रमुखाची साकारलेली भूमिका अतिशय सुंदर. बघताना आपले वडील आठवावेत इतकी जिवंत. 

शुभांगी गोखले- श्यामला टिपरे. आई , सून , बायको असावी तर अशी इतका छान अभिनय. साडीचा पदर खोचलेला आणि अंबाडा अगदी आईची आठवण. स्वयंपाक घराबाहेर येताना त्याच पदराने घाम पुसण्याची प्रत्येक गृहिणीची सवय. खूप बारीक बारीक गोष्टी अगदी खुलून मांडल्या आहेत. 

विकास कदम- शिऱ्या टिपरे . आपल्या घरातला वाटावा इतका जिवंत अभिनय. आज हा नवीन काय घोळ घालणार अशी नेहमीच उत्सुकता. आजोबांशी असलेली त्याची मैत्री पाहून कितीतरी मुलांनी आपल्या आजोबांशी मैत्री केली असेल. 

रेश्मा नाईक - शलाका टिपरे. आपणही हिच्यासारखेच असावे असे कितीतरी कॉलेज कन्यकांना वाटले असेल. साधी, सरळ, सोज्वळ आणि सुंदर अशा सगळ्याच गोष्टी शलाका मध्ये. 

त्या मालिकेचे शीर्षक गीत हि किती निराळे होते. " सोयम तोयंम ताना नुंम तू तानांनी " हेच बोल आणि संगीत. पण त्याचे चित्रीकरण इतके सुंदर होते कि ती पात्र सगळी डोळ्यासमोर यायची. नुसते शीर्षक गीत ऐकून मालिका पाहायची इचछा व्हायची.

एकंदरीतच हे कुटुंब आपल्या आसपासचे वाटावे इतके खरे. मनाला भावणारे. आपले विश्व विसरायला लावून आपण अगदी त्यांच्यात सामावून जातो इतके अप्रतिम कलाकृती. म्हणूनच माझ्याच काय तर झी च्या सगळ्याच प्रेक्षकांना हि मालिका नक्कीच भावली असणार

Tuesday, 10 October 2017

त्या एका पत्राचे उत्तर

प्रिय मित्र,
       बरे झाले त्या दिवशी माझे एक काम तुझ्या ऑफिस जवळ होते आणि तू मला तुझ्या ऑफिस मध्ये येऊन भेटायची परवानगी दिलीस. काय मस्त गप्पा झाल्या आपल्या. फोनवर नीट नाही बोलता येत त्यापेक्षा समोरासमोर गप्पा जास्त छान होतात. आणि मूख्य म्हणजे मला तू मलाच लिहिलेल्या पत्रा बद्दल कळले. कसला आहेस रे तू चक्क ६ महिने ते तसेच ऑफिस च्या लॉकर मध्ये ठेवलेस.  मी आले नसते तर पत्र तसेच राहिले असते आणि मग तू फाडून टाकले असतेस.
खूप छान लिहीलं आहेस. वाचताना थोडेसे हसू आलेच त्याबद्दल सॉरी. पण वाचताना मन अगदी भूतकाळात गेले. किती सुंदर आठवणी लिहिल्या आहेस तू. अगदी सगळे डोळ्यासमोर आले. मला तुझ्या इतके काही सगळेच आठवत नाहीये पण वाचता वाचता काही गोष्टी सहज लक्षात आल्या.
      खरे सांगायचे तर मला अगदीच कळलं नव्हते असे नाही पण लक्षात आले होते की तू माझ्याकडे सतत पाहत असतोस. आणि ते आवडत ही होते की आपण कुणासाठी तरी स्पेशल आहोत. ते वयच असते ना अल्लड या सगळ्या गोष्टींनी भारावून जाणारे. आणि काय रे शहाण्या मला डेंजर म्हणतोस तू ही काही अँग्री यंग मॅन पेक्षा कमी नव्हतास  जरा काही आले की हमरी तुमरी वर यायचास. किती वेळा तरी शाळेच्या मैदानात भांडताना पाहिलेय मी तुला आणि तुझ्या मित्रांना. शाळेतही शिक्षकांना काय कमी त्रास दिलात का तुम्ही. काय एक एक गोष्टी  ऐकायला यायच्या तुमच्या... बापरे!!!! काय टारगट ग्रुप होता तुमचा आता बदलले सगळे ती गोष्ट वेगळी.  मला ही ना तू सेंड ऑफ च्या दिवशी घातलेला वांगी कलर चा शर्ट आठवतो. माझा आवडता रंग म्हणून लक्षात राहिला बहुतेक. खरे सांगू तर सेंड ऑफ च्या दिवशी तू येऊन काहीतरी बोलशील असे वाटले होते पण तू काही आला नाहीस भित्री भागूबाई.  तुझे मित्र तुला चिडवतात मी बाजूने गेले की कुजबुजतात सगळे काळात होते आणि त्याची गम्मत ही वाटत होती. हळू हळू तू ही मला आवडायला लागला होतास हे आता मी कबूल करते. हे फक्त माझ्या एकाच मैत्रिणीला माहीत होते. त्यादिवशी मलाही वाटले होते की आता काही आपली भेट नाही आणि तुझे ते चोरून पाहणे ही नाही.
      ज्या दिवशी मलाही फोन आला ना आपल्या गेट टू गेदर चा त्यादिवशी मी ही खुश होते इतक्या वर्षांनी सगळे भेटणार होते आणि तू ही. मस्त वाटले खूप बोलता नाही आले पण नंबर मिळालं होते सगळ्यांचे. मी खूप दिवस वाट पाहिली पण तू काही कॉल केला नाहीस शेवटी मीच कॉल केला.  थोड्याफार फरकाने माझी ही अवस्था सारखीच होती. तुझ्याशी बोलून छान वाटतं होते. मलाही आठवतेय मी पहिल्यांदा तुझ्या गाडीत बसले तेव्हाच. आमची मैत्रिणींची बडबड सुरू होती आणि तू एकटाच बिचारा ड्राइवर सारखा. तरीही डोळ्याच्या एक कोपऱ्यातून तुझे माझ्याकडे बघणे जाणवत होते. मनातल्या मनात खूप हसू येत होते. तुला एक सांगू का तू काही बोलला नाहीस, तरी तुझे डोळे बरेच काही बोलून जातात. आपल्या प्रत्येक पिकनिक किंवा गेट टू  गेदर च्या वेळी तुझे माझ्या आसपास असणे सगळ्यांच्याच लक्षात येत होते. मला कधी कधी खूप हसू यायचे तुझे.
        ए!! तू म्हणालास ते अगदी खरंय त्या चॅट पेक्षा हे पत्र मस्त ऑपशन खरेच खूप मस्त वाटते लिहिताना आणि जास्त मोकळेपणानं लिहिता येते. आपण बहुधा शाळेत लिहिली त्यानंतर पत्र लिहिलीच नसतील ना कुणाला? हा बेस्ट मार्ग शोधल्यास तू. तसा हुशारच आहेस तू आणि स्मार्ट सुद्धा.
         मला ना तुझे खूप कौतुक वाटते की इतक्या सगळ्या गोष्टी होत्या पण तू अजिबात बोलला नाहीस. आणि मुळात तुझे प्रेम नव्हते हे स्पष्ट केलेस. हे पत्र एकआर्थी मला वाचायला मिळाले ते बरेच झाले. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. त्यामुळे सगळे चिडवतील किंवा तू काहितरी गैरसमज करून घेशील म्हणून मला ही आता तुझ्याशी बोलणे टाळायाला नको. आता अगदी छान मोकळं मोकळ वाटतेय.
         शाळेनंतर आपण बऱ्याच वेळा समोरासमोर आलो पण कधी बोललोच नाही ना..मला तर तुझे शाळेतले रूप आठवून भीती वाटायची बोलायला यायची. आणि नंतर लग्न संसार करिअर यात गुंतून गेल्यावर हळू हळू विसर पडला. त्या गेट टू गेदर च्या निमित्ताने आठवण झाली सगळी. आता खूप बदलला आहेस तू. खूप समजूतदार आणि केअरिंग झाला आहेस. दर वेळी तुझे नवीन रूप समोर आले.  
       खरेच पण शाळेचे दिवस काही वेगळेच म्हणजे सगळेच असायाचे अभ्यासाचे टेन्शन , बाईंचा धाक, मजा मस्ती आणि प्रेमप्रकरणं सुद्धा. बहुतेक  पहिले प्रेम किंवा तुझ्यासारखी पहिली आवड हि शाळेतलीच असेल. आपल्या बॅच ला हि असे किती जण असतील ना ज्यांना कुणी ना कुणी आवडत असेल. मला ना तुझे पत्र वाचताना आताचा तो नवीन चित्रपट "ती सध्या काय करते " आठवला. तुझ्यासारखेच त्या पिच्चर च्या हिरो चे. शाळेतले पहिले प्रेम. हा आता तुझे प्रेम नाही म्हणता येणार इतकेच बाकी सगळे सारखेच. तीच हुरहूर , तेच चोरून पाहणे, आणि मुळात सगळे फक्त मनातल्या मनात ठेवणे. फक्त तो बोलला स्पष्ट आणि तू लिहून काढलेस इतकेच. पण खरेच मस्त मला तर खूप स्पेशल वाटते आहे. कुणाला तरी आपण आवडणे आणि ते हि इतकी वर्ष हे किती मस्त आहे. एकदम झकास !!!!. आणि मला तसे खूप जण म्हणतात कि तुझे स्माईल छान आहे पण तू बोलल्यावर जास्तच आवडायला लागले माझे मलाच. 
   तू म्हणालास तसे नक्कीच मला हि आयुष्यभर तुझी एक चांगली मैत्रीण बनून राहणे खूप आवडेल. आणि तू हि लक्षात ठेव कि काही गैरसमज झाले तर तू हि परस्पर निर्णय नको घेऊ. आम्ही मुली जरा रडूबाई असतो ना म्हणून. आणि माझी एक अट आहे हा आपण जेव्हा कधी भेटू त्या वेळी तू मला न विसरता एक चॉकलेट घेऊन यायचे. 
तुझी प्रिय मैत्रीण,
    ए पण एक मात्र नक्की आपण कुठल्याही वयाचे असलो तरी आपली आवडती व्यक्ती आपल्या समोर आली की पोटात आपोआपच फुलपाखरे उडायला लागतात.

आणि तू हि हसू नकोस पत्र वाचताना. आणि आपण ना ह्यापुढे ६ महिन्यातून एकदा तरी पत्र लिहू एकमेकांना तेवढीच गम्मत.