" कौतुक " करावे चार चौघात आणि निंदा करावी एकांतात पण आपण नेहमी उलटच करतो.आपण एखाद्याची निंदा चार चौघात करतो पण कौतुक करताना मात्र एकट्यातच करतो. नेहमी दुसर्यांनी करावेसे वाटते पण आपण करताना कंजूसी करतो. अगदी मनापासून आपण किती जणांचे कौतुक करतो? आपण नवीन घेतलेल्या वास्तूचे हि आपल्याला कौतुक असते पण माणसाचे करायला काचकूच करतो आपण. एखादी व्यक्ती जर चांगले काम करत असेल तर आपण ती व्यक्ती भेटली कि तिचे तोंडभर कौतुक करतो पण तेच कौतुक आपण चार लोकांमध्ये नाही करत. फार कमी लोकं अशी असतात जी सगळ्यांसमोर दुसऱ्याची प्रशंसा करतात. दुसऱ्याचे श्रेय लाटायला मात्र सगळेच बसलेले असतात. हल्लीच्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये याचा प्रत्यय जास्त येतो. जुनिअर माणसे राब राब राबतात आणि त्या कामाचे श्रेय मात्र त्यांच्या बॉस ला मिळून जाते. अप्रेझल च्या वेळी या खेळी दिसून येतात.
आई वडील आपल्या मुलांचे करतात ते सोडले तर मनापासून असे फार कमी कौतुक होते. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचे सर्वच जण कौतुक करतात. मग त्याचे बोबडे बोल, रांगणे , चालणे प्रत्येक गोष्टीचे कौतुक होते.अगदी पहिल्या आलेल्या दातांपासून पहिल्या आजारपणापर्यंत सगळेच. मग जशी जशी मुले मोठी होतात तसे कौतुक कमी होत जाते. मग शाळेत अभ्यासात केलेली प्रगती, स्पर्धांमध्ये मिळालेलं बक्षीस अशा ठराविक वेळीच मग कौतुकाची थाप पडते पाठीवर. काही वेळा मुला मुलांन मध्ये हि कौतुक करताना भेटभाव केला जातो जे मुलं अभ्यासात हुशार असते, किंवा दिसायला सुंदर असते त्याचे जास्त कौतुक केले जाते. आणि कधी कधी यामुळेच दुसऱ्या मुलांच्या इतर चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष होते.
आपल्या घरातही आई, बायको इतका छान स्वयंपाक करते पण फार थोडेच घराचे असतात कि जे त्या माउली चे कौतुक करतात. भाजीत मीठ कमी पडले तर पटकन सांगतील पण तीच भाजी छान झाली असेल तर कुणी बोलणार नाही. "रोजच तर करतेस स्वयंपाक , रोज रोज काय सांगायचे" असे वर उत्तर असते. तसेच दिसण्याच्या हि बाबतीत असेच कोणी एखाद वेळी सुंदर दिसत असेल तर पटकन आपण सांगणार नाही कि "किती सुंदर दिसते आहेस आज" पण तेच जरा चुकीचा पेहेराव असेल तर " मेलीने काय घातलेय शोभते तरी का?" असे पटकन बोलून मोकळे होते.
आपण जर कुठल्या सोशल साईट वर फोटो किंवा पोस्ट टाकले कि १० वेळा बघतो कोणी लाईक केले , कुणी कंमेंट केली पण तेच जेव्हा दुसरे कुणी पोस्ट करते तेव्हा हा ठीक आहे , वाचतो आणि सोडून देतो. एखादी पोस्ट आवडली कि पटकन शेअर करतो पण ती पोस्ट आवडली हे दाखवत नाही. माझ्या एका मैत्रिणीने बरोबर लिहिले होते एका सोशल साईट वर " कि इथे एक नियम हवा , एखादी पोस्ट लाईक केल्याशिवाय शेअर करायची नाही." त्यातही आपण भेदभाव करतो, आपल्या एखाद्या नावडत्या व्यक्तीने कितीही चांगले काम केलेले असो, आपल्याला ते जरी मनापासून आवडलेले असले तरी आपण त्याचे कौतुक करत नाही.
घरात नवीन सून अली कि सगळे तिचे तोंड भरून कौतुक करतात , पण हळू हळू हेच कौतुक टिकेमध्ये बदलायला लागते. बाळंतपणात स्त्री चे भरपूर कोडकौतुक होते. ती तिच्या आयुष्यातली एकमेव अशी वेळ असते जेव्हा तिच्या प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. डिलिव्हरी नंतर जर मुलगा झाला तर त्या कौतुकाला भरतेच येते , पण जर मुलगी झाली तर थोडासा आवर घातला जातो या कौतुकाला. पुढे हि हा भेद सुरूच राहतो मुलीने एखादी गोष्ट केली तर त्याकडे दुर्लक्ष होते पण तीच गोष्ट मुलाने केली कि त्याचे कौतुक सगळ्यांसमोर केले जाते.
कौतुक करावे तर सूर्य किरणांसारखे करावे. कुठलाही भेदभाव ना ठेवता ते प्रत्येक गोष्टींच्या वाढीला मदत करतात . खरंच आपणही तसेच केले पाहिजे त्या त्या क्षणी त्या त्या व्यक्तीचे गोष्टीचे कौतुक करायला शिकले पाहिजे. आवडती नावडती असा भेद सोडून प्रत्येक चांगल्या गोष्टीचे कौतुक केले पाहिजे. कारण आपल्या एका कौतुकाच्या थापेने समोरच्या व्यक्तीला अजून काही तरी चांगले करावे या साठी दुप्पट उत्साह येतो.
कौतुक करावे तर सूर्य किरणांसारखे करावे. कुठलाही भेदभाव ना ठेवता ते प्रत्येक गोष्टींच्या वाढीला मदत करतात . खरंच आपणही तसेच केले पाहिजे त्या त्या क्षणी त्या त्या व्यक्तीचे गोष्टीचे कौतुक करायला शिकले पाहिजे. आवडती नावडती असा भेद सोडून प्रत्येक चांगल्या गोष्टीचे कौतुक केले पाहिजे. कारण आपल्या एका कौतुकाच्या थापेने समोरच्या व्यक्तीला अजून काही तरी चांगले करावे या साठी दुप्पट उत्साह येतो.